लाऊडस्पीकर लावण्यामागची नेमकी मानसिकता
लाऊडस्पीकर लावण्यामागची नेमकी मानसिकता काय असते ? ह्याचं उत्तर कुणी साध्या , समजेल अशा पद्धतीने देऊ शकेल का इथे ?
शहरात राजकीय कारणांनी लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर बद्दल विचारत नाहीये . सार्वजनिक गणेशोत्सवाच्या , नवरात्रीच्या वेळी लावले जाणारे लाऊडस्पीकर , लग्न , मुंज , बारसे , सत्यनारायणाची पूजा व अन्य धार्मिक प्रसंग अशा वेळी लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरमागची मानसिकता जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे . मिपावरचे विचारवंतच ती शमवू शकतील असं वाटल्याने हा धागा काढला आहे .
हा प्रश्न आजच पडलेला नाही , वेळोवेळी डोकं वर काढतो . आज निमित्त झालं ते म्हणजे चार घर सोडून असलेल्या शेजाऱ्यांच्या घरातील बारशाचं . सकाळी नऊ पासून ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत अविरत लाऊडस्पीकर वर गाणी सुरू होती .. हे जरा अतीच झालं , सहसा आमच्या परिसरात बारशाच्या वेळी कोणी एवढा वेळ गाणी लावत नाहीत , तरी दिवसाचे किमान 3-4 तास एवढया वेळासाठी लावतातच . आमचा ग्रामीण भाग आहे . शहरात बारसे ह्या प्रसंगासाठी तरी लाऊडस्पीकर लावत नसावेत अशी माझी अटकळ आहे पण मिपावर ग्रामीण भागात वास्तव्य असलेलेही सदस्य असावेत . तुमचा काय अनुभव आहे ?
आज एवढा धागा काढून शंकानिरसन करून घेण्याचा प्रयत्न करण्याचं कारण म्हणजे आज आणखी 2 - 3 प्रश्न पडले आणि " का हे लोक दुसऱ्यांना पीडण्यासाठी लाऊडस्पीकर लावतात ? " हा मला पडलेला जुना प्रश्न अपरिपक्व असावा , माझं काहीतरी चुकत असावं अशी शंका आली .
बारसं म्हणजे बाळाच्या नामकरणाचा प्रसंग . यावेळी बाळाचं वय जास्तीत जास्त 1 ते 2 महीने एवढं असतं . मग ज्या ठणाणा आवाजाचा मोठ्या माणसाच्या कानाला त्रास होतो तो आवाज बाळाला तापदायक ठरेल हा विचार बाळाची अनुभवी आज्जी , ती हयात नसल्यास , बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी - त्याने 2 शिंका जरी दिल्या तरी घाबरीघुबरी होणारी त्याची आई आणि नुकताच बाबा झालेला त्याचा बाप ह्यांपैकी कोणाच्याच मनाला शिवत नाही का ? की बाळाला मोठ्या आवाजाचा काही त्रासच होत नाही ? मला लहान बाळांची काही माहिती नाही , ज्यांना आहे त्यांनी सांगा ... बाळाला एवढ्या मोठ्या आवाजाचा खरंच काहीच त्रास होत नाही का ? दुसरा प्रश्न असा की आईला वाटतं असतं लाऊडस्पीकर वगैरे लावू नयेत पण ते ती ठामपणे घरातल्या उत्सवप्रिय पुरुषांना सांगू शकत नाही , तिच्या मताला तेवढी किंमत नसते , अशी परिस्थिती असते का ? की मुळात आईलाही तेवढीच हौस असते , बारसं दणदणीत साजरं करण्याची ? यातली कोणती गोष्ट खरी आहे ?
आता मूळ प्रश्न असा की बारसे , सत्यनारायणाची पूजा , देवळात चाललेले भजन - कीर्तन , लग्न या सगळ्या प्रसंगांत लाऊडस्पीकर लावून तो आवाज 1- 2 मैलाच्या परिसरातील लोकांपर्यंत पोहोचावा असं लोकांना नक्की का वाटतं ? इतर लोकांना सत्यनारायणाची पूजा किंवा देवळात चाललेलं कीर्तन भजन ऐकायचं असेल तर ते तिथे उपस्थित राहतील .
सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव यामध्ये लावली जाणारी गाणी ( यांचं स्वरूप अलीकडे नको तेवढं बदलू लागलं आहे , भक्तीगीतांच्या जोडीनेच बेबी डॉल आणि राणी कधी व्हणार तू माझ्या लेकराची आई अशी भयंकर गाणी कानावर येऊ लागलीत , विशेषतः विसर्जनाच्या दिवशी असल्या फिल्मी गाण्यांना उत येतो , पण तो मुद्दा इथे नको ) मंडपापर्यंत मर्यादित असली तर कार्यकर्त्यांचा आणि भक्तगणांचा उत्साह वाढतो हे समजू शकतं .. पण ती एक दोन किमी अंतरावरच्या लोकांनाही ऐकू जावीत एवढ्या मोठ्याने लावायचं प्रयोजन काय असतं ?
लग्न - मुंज - बारसे हे कौटुंबिक , खाजगी प्रसंग ... या प्रसंगी लावली जाणारी गाणी ही उत्साहासाठी हॉलपर्यंत / घरापर्यंत मर्यादित असली तर समजण्यासारखं आहे पण ती आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांना ऐकायला जावीत एवढ्या मोठ्या आवाजात लावण्याची इच्छा माणसांना नेमकी का होते ? जर सख्ख्या आईलाही छोट्या बाळाच्या कम्फर्ट पेक्षा मोठ्या स्वरात गाणी लावून सेलिब्रेशन करायची हौस आवरत नसेल तर या गाणी - संगीत लावण्याच्या प्रेरणेमागे नक्कीच काहीतरी ठोस मूलभूत कारण असावं अशी माझी धारणा झाली आहे पण ते नेमकं काय ते लक्षात येत नाही आहे .
एवढ्या मोठ्या आवाजात स्वतःला गाणी ऐकायची असतात म्हणून कोण लावत असतील हे पटत नाही , हल्ली जवळजवळ प्रत्येकाकडे निदान प्रत्येक आधुनिक संगीतप्रेमी माणसाकडे मोबाईल आणि इअरफोन असतातच तेव्हा इअरफोन वापरून हव्या तेवढ्या ठणाणा आवाजात अगदी मध्यरात्रीही गाणी ऐकता येऊ शकतात .... त्यासाठी अशा सण समारंभांच्या निमित्ताची वाट पाहण्याची गरज नसते . आपल्याला आवडणारी गाणी जबरदस्तीने दुसऱ्यांना ऐकायला भाग पाडणे , जेणेकरून त्यांनाही ती आवडतील असा सुप्त हेतू असण्याची एक शक्यता वाटते ... पण हा माझा अंदाज झाला... तो चूकही असेल .
मिपाकरांनी यावर अभिप्राय द्यावेत व माझी शंका दूर करावी ही विनंती . खरंतर ही नुसती जिज्ञासेतून उत्पन्न झालेली शंका नाही ... आणखीही एक कारण आहे . एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनाचा आपल्याला अतिशय राग येत असतो , ही व्यक्ती अशी का वागते आहे हे न समजणं हे बऱ्याच वेळा त्या रागाचं कारण असतं . तेच जर त्या व्यक्तीच्या तशा वर्तनाला काही शास्त्रीय / मानसशास्त्रीय कारण - बेस आहे हे कळलं तर राग येत नाही किंवा कमी येतो .... तारस्वरात लावली जाणारी चित्रविचित्र गाणी हा माझा विकपॉइंट आहे , अत्यंत संताप येतो आणि काहीही करू शकत नसल्याने मनःशांती पार बिघडून जाते . सुरेश वाडकर किंवा अजित कडकडे , अनुराधा पौडवाल यांची भक्तीगीतं कितीही मोठ्या स्वरात लावली तरी त्रास होत नाही पण अलीकडे विचित्र नवीन संगीत दिलेली ( उदा . कोंबडी पळाली / जंजीर दाखवाल का यांच्या चालीवर गायलेली ) भक्तीगीतं ( ! ) आणि नवीन फिल्मी गाणी ऐकून अक्षरशः जीव जाईल तर बरं असं वाटतं . ही ओव्हर रिऍक्शन आहे हे कळतं पण काय करावं समजत नाहीये . तेव्हा निदान अशा कर्णकटू आवाजात गाणी लावण्यामागे काहीतरी मानसशास्त्रीय कारण असेल असं कळलं तर हा मनस्ताप बराच कमी होईल असं वाटतं .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]