भीमा-कोरेगाव : चष्मा काढून बघा
"या हिंदुत्ववाल्यांचंच काहीतरी आहे", "उगाच जनतेला भडकावतात", "दलितांची अस्मिता यांच्या डोळ्यात खुपतेय", "दलितांची प्रगती यांना बघवंत नाहीय्ये" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या चष्म्याआडूनच करायचा आहे हे खास आहे.
(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे. : मुळात हे स्मारक २०० वर्षांपूर्वीचं. १९२७ पूर्वी त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते. परंतु १९२७ मध्ये प्रथम आंबेडकरांनी याला आपल्या अभिमानाचा विषय बनविले. तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्धात पेशव्यांचा पराभव झालेला होता: असेलही. इंग्रजांनी १८१८ पर्यंत भारताचा बराचसा भाग आपल्या नियंत्रणात आणला होता. स्थानिकांचा सैन्यात समावेश करून, भारतातील राजेराजवाड्यातील फुटीचा, दुहीचा लाभ घेऊन, इथल्या राजांना एकमेकांविरूद्ध लढायला लावून इंग्रजांनी भारताच्या बहुतांशी भूभागावर कब्जा मिळविला होता. पेशव्यांचे उरलेसुरले राज्य जिंकून घेणे हा इंग्रजांसाठी फक्त काही काळाचाच प्रश्न होता. पेशव्यांचं राज्य तसंही खिळखिळं झालंच होतं. जनरल वेलस्लीने महादजी शिंद्यांच्या मोठ्या फौजेचा आधीच पराभव केला होता. होळकराने पुणे लुटून पेशव्यांचं साम्राज्य पूर्ण मोडकळीला आणलेलं होतं. एखाद्या डगमगत्या खांबाला टिचकी मारली तरी तो खांब कोसळतो. तसेच पेशयांच्या पराभवाला एक छोटासा धक्का आवश्यक होता आणि तो भीमा-कोरेगाव येथे मिळाला व साम्राज्य भुईसपाट झालं. इंग्रजांच्या सैन्यात काही महारांचा समावेश होता. परंतु त्यामुळे पेशवे हरले व महार जिंकले हा शुद्ध भ्रम आहे. तसं म्हणायचं असेल तर पहिलं व दुसरं महायुद्ध भारताने जिंकलं असं म्हणावं लागेल. इंग्रजांच्या सैन्यात महार नसते तरी पेशवे हरलेच असते. हे युद्ध पेशवे हरले नाहीत व महार जिंकले नाहीत. जिंकले ते इंग्रज व हरला तो भारत. परंतु या युद्धाला पेशवे वि. महार म्हणजेच ब्राह्मण वि. अस्पृश्य असे मखर चढवून युद्धानंतर २०० वर्षांनी वातावरण पेटविणे कोणत्या संस्कृतीत बसतं?
(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत हिंदू संघटनांना, संघाला, ब्राह्मणांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ब्राह्मण हा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. ब्राह्मणांच्या वागण्यातल्या असलेल्या/नसलेल्या विसंगती शोधून, त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्यांपैकी किती जणं सावरकर जयंती साजरी करतात? किती जण थोरले बाजीराव पेशव्यांचे योगदान मानतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते संघवाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं.
(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं :- लढवय्या महारांवर अशी सक्ती करणं शक्य होतं का? अशा लोकांना वतने कशी व कोणी दिली असावीत? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खरं होतं. पण आता तशी स्थिती आहे का? २०० वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी जे होतं त्याची शिक्षा आता २०० वर्षांनंतर का?
(४) प्रकाश आंबेडकरांनी मनुवाद्यांविरूद्ध आवाज उठवला: मुळात मनुस्मृती भारतातील ९९.९९% हून अधिक जनतेने वाचलेली नाही. मनुस्मृतीत काय लिहिलंय, काय नाही याबद्दल इथल्या जनतेला कणभरही घेणंदेणं नाही. १४०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकातील कालबाह्य झालेल्या क्रूर गोष्टी जशाच्या तशा आज अंमलात आणण्याचा आग्रह धरणार्या एका मोठ्या समाजगटाबद्दल प्रकाश आंबेडकरांची दातखिळ बसलेली असते. परंतु एक पूर्णतः कालबाह्य झालेल्या व जनतेने पूर्णतः दुर्लक्षित केलेल्या पुस्तकाचा सातत्याने बागुलबुवा दाखविण्यामागे नक्की अन्यायाविरूद्ध लढण्याचाच हेतू आहे का? राजकीय कारकीर्द पूर्णपणे संपलेल्या प्रकाश आंबेडकरांना स्वत:च्या जीवावर वर येण्याऐवजी मेवाणी, खलिद असल्यांची गरज का लागते? उमर खलिदवर देशद्रोहाचे आरोप आहेत. भारताचे हजारो तुकडे व्हावेत अशी इच्छा मनी बाळगून तशा घोषणा देणारा यांच्या मांडीला मांडी लावून कसा काय बसतो? भाजप किंवा संघाविरूद्ध राजकीय लढा देणे समजू शकते. परंतु त्यासाठी खलिदसारखे साथीदार बरोबर घ्यायचे? १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर याच प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की भारताने अणुचाचणी केल्याबद्दल पाकिस्तानला २००० कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी कारण भारतामुळे पाकिस्तानला सुद्धा खर्चिक अणुचाचणी करावी लागली.
(५) भीमा-कोरेगाव दंगलीमागे भिडे-एकबोटे आहेत: भीमा-कोरेगाव समारंभाच्या पूर्वसंध्येला मुद्दाम शनिवारवाड्यासमोर सभा घेऊन, त्यात मेवाणी-खलिद सारख्यांना बरोबर आगपाखड करणारी भाषणे करणे यामागे नक्की कोणता उद्देश होता? १ जानेवारीला शिवरायांचे चित्र असलेल्या तरूणाला मारहाण करणारे नक्की कोण होते? १ जानेवारीला वातावरण पेटलेले असताना मुद्दाम ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद करण्याची चिथावणी देऊन वातावरण अजून पेटविण्याचा प्रयत्न का केला? बंदच्या दिवशी शेकडो बसेसचं, वाहनांचे नुकसान झाले, लाखो मनुष्यतास वाया गेले, पोलिसांच्या लाठीमारात एका तरूणाला प्राण गमवावे लागले, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? त्यामागे भिडे, एकबोटे आहेत याचे पुरावे आहेत का? प्रकाश आंबेडकर स्वतःच्या खिशातून अब्जावधी रूपयांची नुकसानभरपाई देणार आहेत का? आंबेडकरांचे स्वतःचे राजकीय पुनरूज्जीवन करण्यासाठी जनतेला फार मोठी किंमत द्यावी लागली आहे.
एखाद्या उभ्या असलेल्या स्ट्र्क्चरला देवस्थानाचे स्वरूप देऊन आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्या भारतीय समाजाला थेट १८ व्या शतकात नेऊन, "मनुवाद", "ब्राह्मणी कावा" असा बागुलबुवा उभा करून हिंदू समाजात फूट पाडणार्यांनी हिंदू संघटनांविरूद्ध कांगावा करावा हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
यांनी जंगजंग पछाडूनसुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना नावडणारे हिंदू पक्ष सत्तेवर आलेत. पुरस्कार परतीची नाटके करून झाली, विकासाला वेडा ठरवून झाले, पाकिस्तानची मदत मागून झाली, शिक्षण-पदव्यांची उठाठेव करून झाली . . . हे सातत्याने अपयशी ठरताहेत. म्हणून आता ठेवणीतले जातीयवादाचे अस्त्र बाहेर काढले आहे. पेशवाई, मनुवाद, ब्राह्मणी कावा असे अस्तित्वात नसलेले बागुलबुवा निर्माण करून समाजातील एका गटाला भयभीत करून समाजात फूट पाडून आपली पोळी भाजणे हा एकमेव उद्देश यामागे आहे.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।उमर खालिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसताना आणि कबीर कला मंचवाल्यांची गाणी ऐकताना ही प्रतिज्ञा गुंडाळून ठेवण्यात आली होती.