वाटाडे - पावनखिंड लढ्यातील महत्वाचे भागीदार भाग - 1
वीर बाजी प्रभू देशपांडे
कासारी नदीच्या पावनघळीतील स्मारक
शिवा(जी) काशीद
सिद्दी जोहर हबशी सरदार
शिवाजी महाराज
वरून शांत दिसणारी खोल घळ
भर पावसाळ्यातील खिंडीतील जलप्रपाताचे रौद्र रुप
इरले घेतलेले वाटाडे - भाग 1
पन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या महाराजांच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांचे वाटाडे. हे वाटाडे कोण असावेत? त्यांची निवड महाराजांनी कशी केली असावी? या वाटाड्यांना योग्य तो रस्ता खरोखरच दाखवता आला का? त्यांच्या हातून काही गफलत तर झाली नसेल? आणि झाली असेल तर त्यावर मात महाराजांनी कशी केली असावी या सर्व बाबी मिलिटर कमांड़रांच्या आखणीच्या कारवाईत फार महत्वाच्या ठरतात. या अंगाने प्रस्तूती करायचा प्रयत्न. जेंव्हा सुटकेची रात्र ठरवली गेली असावी त्याआधी महाराजांनी गडावरील अनेक जणांची विचारपूस करून ज्यांना गडावरून खाली उतरण्याच्या विविध लहान मोठ्या वाटा आणि गजापूर पर्यंत जाण्याच्या मार्गाची माहिती असावी. उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपल्याला वाटांची माहिती असल्याचा दावा केला असावा. या सर्वांना वेगवेगळ्या गटात वाटून महाराजांच्या विविध सरदारांनी त्यांच्या वाटांची खात्री करून घेण्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेतल्या असाव्यात. शेवटी त्यामधील तीस-चाळीस जणांचा विचार करून त्यांना वेगळे बोलावून घेऊन कसे जायचे याबाबत चर्चा केली असावी. अगदी पुढे दोन जणांची एक जोडी वाटेच्या डाव्या अंगावरील आणि दुसरी जोडी उजव्या अंगावरील खुणाखाणा शोधत जाताना ओहोळ, खाचखळगे, निसरड्या जागा, वाटेत आडव्या येणाऱ्या झाडी, फांद्या यातून वाटेत चुकामूक न होता. अगदी शेवटच्या मावळ्यांना यायला जमेल असे वाट काढत जायचे ठरले असेल. त्यांच्या मागे मागे वाटाड्यांच्यातील 'पक्के' म्हणून बरोबर घेतलेले काही वाटाडे त्यांच्या मागाऊन येणाऱ्या महाराजांच्या बुट्टी डोलीशी संपर्कात राहून आपण बरोबर दिशेने आणि खुणेच्या ठरलेल्या वाटेवरून निघाल्याची खात्री करून देत असावेत. एकूण ६०० जणांच्या पायदळाची विभागणी सध्याच्या* परंपरेने ३ ते ४ कंपनींमध्ये केली असे मानले तर प्रत्येक कंपनी कमांडर, आपल्या बरोबरचे सैनिक मागोमाग येत आहेत का? कोणीतरी मागे राहिले तर का व किती? मागच्या कंपनी कमांडरच्या बरोबर यायची व्यवस्था आधीच ठरली असावी. रात्रीच्या वेळी, वाट सोडून भर पावसात, नाले, ओढे भरभरून त्यातून जाणाऱ्या सैनिकांवर लक्ष ठेवून कंपनी कमांडरच्या हाताखालच्या प्रत्येक प्लाटून कमांडरचे काम असावे. पाण्यातील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज चुकल्याने पाय मुरगाळणे, खरचटणे या सारख्या किरकोळ पण चालायच्या गतीला बाधा आणणाऱ्या घटनातून व रक्त पिणाऱ्या **जळवांच्या तडाख्याने अनेक जणांचा वेग मंदावला असावा. हातातील काठीचा आधार घेऊन तोंड बंद ठेवून चुपचाप कमीतकमी आवाज करत जायचा प्रयत्न असावा. एका मागे एक येणाऱ्या ३ ते ४ कंपनींच्या बरोबर पुन्हा दोन वाटाड्याची जोडी ठेवून चालताना पडणाऱ्या अंतरामुळे आधीच्या कंपनीचा मागच्या कंपनीशी सतत संपर्कात राहायला व नेमक्या वाटेने जायला मार्गावर लक्ष ठेवून असतील. वेळोवेळी तोंडात बोटे घालून शिट्ट्यांच्या संकेतातून सर्व सैनिक आणि वाटाडे यांच्यात मेळ बसवला जात असावा. पावसांच्या सरी अती तीव्र झाल्यातर महाराजांच्या डोलीशी संपर्कात राहून थांबण्याचा आदेश सर्वांना पोचवायला संकेत केले जात असावेत. डोक्यावरच्या इरल्यांतून टपकणाऱ्या पाण्याच्या धारा, पाठीला बांधलेल्या ढाल-तलवारी, काही खायला बरोबर आणलेले, हातात लाकडी लाठी व भाल्याचे पातळ बांबू असा साधारण वेश असलेल्या प्रत्येक मावळ्यांनी पायात काय घातले असावे किंवा नसावे यावर विचार केला जावा. या शिवाय महाराजांच्या बुट्टी कावडीला उचलून नेताना त्यांच्या बरोबरच्या राखीव दलासाठी दोर-शिड्या, जादाचे भाले, तीर कमानी, तलवारी, दरवाजे फोडायला घण, पहारी या सारख्या अत्यंत जरूरच्या सामानाची वजनदार 4-5 बुट्ट्यांची ओझी बरोबर असावीत. अशाच विविध शस्त्रांच्या 4-5 बुट्टीडोल्या बुट्या प्रत्येक कंपनी किंवा प्लाटून बरोबर असाव्यात. बाजींच्या बरोबरच्या सैनिकांत दांडपट्टे प्रवीण पथकाच्यासोबत अनेक दांडपट्ट्यांचे जोड बरोबर असावेत. पौर्णिमेच्या रात्रीच्या काळोख्या अंधुक प्रकाशात खांदे बदल करत करत एकदम चढ आणि उतार असलेल्या ठिकाणी काळजीपुर्वक जाताना त्यांची गती तासाला 2 किमी किंवा त्याही पेक्षा कमी असावी. महाराजांचा मार्ग आणि तोतया शिवाजी यांच्या गडावरून खाली उतरण्याच्या वाटा, दरवाजे वेगळे असावेत? ते एकाच वेळी बरोबर निघाले असावेत आणि विशिष्ट भागात सुखरूप पोचल्यावर मग वाटांची दिशा बदलून पुढे गेले असावेत यावर विचार केला जाऊ शकतो. या अभ्यासात मिलिटरी कमांडर दोन्ही शिवाजी आपापल्या ठरवलेल्या वेगवेगळ्या एकदम चढ-उतार असलेल्या दरवाजातून गराडा पडलेल्या सैनिकांना चुकवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची संधी पाहून निसटले असावेत असे मानतात. म्हणून तोतया शिवाजी मसाईपठारावरून कोकणात जाणाऱ्या रुळलेल्या मार्गाने जात असावेत. पकडले नाही गेले तर अंबा घाटातून उतरून कोकणतळ गाठायचा आणि खऱ्या शिवाजींच्या किंवा नेताजी पालकरांशी पन्हाळ्यातील बातमी सांगायची. पकडले गेले तर विशाळगडाचे अजिबात नाव देखील काढायचे नाही असे ठरवले असावे. ....भाग १ समाप्त…
•* मिलिट्री फॉर्मेशन्स
**##जळवांचा जलवा!
[**वाटेत एका गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे, त्या म्हणजे "जळवा". पावसाळ्यात सह्याद्रीच्या अनेक परिसरात या दिसतात. पण या ट्रेकमधे त्यांचा उपद्रव जास्तीच जाणवतो. मला तरी या जळवांचा त्रास झाला नाही, पण काही सोबत्यांना त्यांनी प्रसाद दिलाच. (सौजन्य - दुर्गविहारींचा धाग्यातून जमवलेली माहिती)
💬 प्रतिसाद
(9)
द
दुर्गविहारी
Sat, 04/14/2018 - 07:59
नवीन
या विषयावर या पुर्वी पावनखिंड लढा . मात्र या धाग्यात प्रामुख्याने पावनखिंडीचे भौगोलिक स्थान आणि नक्की पावनखिंड कोणती याच अनुषंगाने चर्चा झाली. मात्र सामरिदृष्ट्या फार विचार झालेला नाही.
थोडे माझे मत मांडतो. जेव्हा पन्हाळ्यावरुन विशाळगडावर जाण्याची योजना नक्की झाली असेल, तेव्हाच मुख्य वाट आणि पर्यायी वाटांचा विचार करुन ठेवला गेला असेल.
महाराजांचे नियोजन पहाता कदाचित दोन चार दिवस आधी काही मावळ्यांनी या वाटेने जाउन किती वेळ लागतो, नेमकी वाटांची अवस्था काय आहे? काय त्रास होउ शकतो, याचा अभ्यास नक्कीच केला असेल. कारण हि मोहीम जिवावरची होती. आले मनात आणि निघालोय असे शक्यच नव्हते.
वाटेवरचा जळवांचा त्रास विचारात घेता, मावळ्यांनी बहुधा तंबाखू किंवा हळद जवळ बाळगली असेल.
आता शिवा काशिदच्या पालखीविषयी. शिवाने पालखी नेउन चकवा द्यायचा, हे अगदीच क्रिटीकल सिच्युएशनसाठी असणार. विनाकारण कोणाचे बलिदान महाराज द्यायला लावणार नाहीत. मसाई पठार आणि पन्हाळा जोडणारी डोंगररांग अरुंद आणि खड्या चढणीची आहे, तेव्हा पावसाळ्यात तरी पहारेकरी घोड्यावर स्वार असतील असे वाटत नाही. पायी गस्त घालणार्या पहारेकर्यांना चुकवणे जड जाणार नाही. त्यातच कडाक्याच्या उन्हात आणि सह्याद्री परिसरात पडणार्या महामुर पावसाने सिध्दीचे सैनिक वैतागले असणार.'अशातच उद्या तो शिवा शरण येणार' हि बातमी पहार्याच्या कामात शिथील होण्यासाठी पुरेशी आहे. नक्की सांगता येणे कठीण आहे पण कदाचित हा प्रसंग साजरा करण्यासाठी काही सैनिक मद्यप्राशन करुन निवांत झाले असण्याची शक्यता आहे.
आता पाठलाग होतानाची परिस्थिती पाहु. माझ्या मते सातशे सैनिक तीन भागात विभागले असतील, वाटाडे आणि थोडे मावळे पुढे धोका नाही, याची खात्री करण्यासाठी पळत असणार. मधे अर्थातच महाराजांची पालखी आणि सैन्याचा मोठा भाग असणार. आणि मागे दिड- दोनशे सैनिकांची एक तुकडी थोडी मागे असेल, जी चुकून पाठलाग करणारा शत्रू जवळ आलाच तर त्याला मागेच रोखून धरण्यासाठी चालत असणार.
पाठलाग होण्याची शक्यताही या मोहिमेत गृहित धरली असेल असे वाटते आणि तसे झाले तर काय करायचे आणि युध्द शक्यतो कोठे करायचे याचेही नियोजन असेल असे वाटते. जे महाराज शिवा काशिदच्या पालखीचा पर्याय तयार ठेवतात, ते या वाटेवरच्या युध्दासाठी सज्ज असणार हे गृहित धरायला हरकत नसावी. तेव्हा कदाचित घोडखिंडीपर्यंत शत्रुला चकवा देत जायचे आणि तिथेच युध्दासाठी तयार रहायचे अशी योजना असणे शक्य आहे.
एकतर कमी सैन्यबळ आणि रात्रभर झालेली पलायनाची दगदग बघता शक्यतो अरुंद जागा आणि गनिमी काव्यासाठी योग्य भुप्रदेश निवडला असणार.
दुर्दैवाने आज आपल्याला हे सर्व अंदाज बांधावे लागतात कारण तात्कालीक बरीचशी कागदपत्रे नष्ट झालेली आहेत. विश्वसनीय मानली जाणार्या सभासदाच्या बखरीमधे या युध्दाचा उल्लेखच नाही. विशॅष म्हणजे बेन्नव कलमी बखर सोडली तर चित्रगुप्ताची बखर, चिटणीसाची बखरसुध्दा या संदर्भात काहीच भाष्य करत नाही.
महाराजांच्या समकालिन असलेल्या कविंद्र परमानंद कृत "शिवभारत" या ग्रंथात या घटनेसंदर्भात काय लिहीले आहे ते वाचण्यासारखे आहे यासाठी काही पानांची लिंक देतो.
Shivbharat
त्यामुळे या संपुर्ण घट्नेत लष्करी हालचाली कश्या झाल्या असतील याची केवळ कल्पनाच करणे आपल्या हाती आहे.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sat, 04/14/2018 - 17:06
नवीन
पुढील भागात यावर विचार केला जाऊ शकतो.आणखी एक शक्यता की जर तोतया शिवाजी पकडला जाऊ शकतो तर खरा देखील लगेचच सापडू शकतो! यावर शक्कल अशी की या ६शे ते ७शे सैन्याचा जथ्थ्या मागोमाग आणखी एक शस्त्र सज्ज जथ्था महाराज गस्ती मेटे पार करे पर्यंत बरोबर होता. तो महाराज सुखरूप सटकले आहेत याची खात्री करून परतला असावा.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 04/14/2018 - 09:34
नवीन
शशश्शिकन्त,
हे वाक्य दुरुस्त करायला हवंय :
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sat, 04/14/2018 - 16:10
नवीन
शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्याच्या वास्तवात घडलेल्या घटना, पलायन, हे नेताजी पालकर आणि महाराजांच्या प्रधान मंडळास सांगायचे... असे म्हटले पाहिजे होते...
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sun, 04/15/2018 - 03:55
नवीन
या शक्यतांपैकी वाटाड्यांच्या कामगिरीवरील शक्यतांवर हा धागा केंद्रित आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/16/2018 - 06:02
नवीन
लेखन आवडले. काहीजण विशाळगड ते पन्हाळगड पायपीट करून पाहतात. मी केलेली नाही. एक मोठा शत्रु मागे असताना कसे अवघड असेल याची कल्पना येते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/16/2018 - 06:29
नवीन
इतक्या अवघड वाटेने अतिशय कमी वेळात निसटायचे असताना महाराज पायी जाण्याऐवजी पालखीत बसून का गेले असावेत? पालखी वाहून व सारखा खांदेपालट करून भोईंची प्रचंड दमछाक झाली असणार व हालचाली खूप संथ झाल्या असणार.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 08:25
नवीन
श्रीगुरुजी,
दिशाभूल करण्यासाठी कदाचित पालखीतून तोतया गेला असेल. खरे महाराज घोड्यावरून सटकलेले असू शकतात. अर्थात, हा माझा केवळ अंदाज आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Tue, 04/17/2018 - 03:39
नवीन
धन्यवाद. भाग २, भाग ३ मधे यावर अधिक लेखन आहे.
- Log in or register to post comments