Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यातून मार्ग काय?

उ
उपयोजक
Tue, 06/25/2019 - 19:11
🗣 111 प्रतिसाद
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे. तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल... अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत. तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले... कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत... मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू.... ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते. त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली... ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध. ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. महारुद्र मंगनाळे ------------------------------------------------------ ------------------------------------------------------ आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये. सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा. आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच. https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/ या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही. मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!) शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये? खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का? स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं? खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्‍या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का? हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच. मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे. यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय. लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्‍याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड... शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं? यात रमायला आहे मोबाईल डाटा. सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही. शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्‍यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे. प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय? पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_
वर्गीकरण
प्रकटन माहिती चौकशी समाज जीवनमान

प्रतिक्रिया द्या
55220 वाचन

💬 प्रतिसाद (111)
न
नाखु Mon, 07/01/2019 - 19:07 नवीन
चलती आहे पण फक्त आपल्या मोहल्ला आणि एरीयातच , परराज्यातील येऊन इथे ढोस देउन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दहशत निर्माण करतील पण इथला एकही गुंडपुंड बिहार उत्तर प्रदेश इथे जाऊन दबदबा निर्माण करणारा नाही. स्थानिक नागरिकांना पिडण्यातच मुदुर्मकी गाजविली जाते. गाववाल्यांचा अनुभवी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चौथा कोनाडा Tue, 07/02/2019 - 14:18 नवीन
येतील, येतील, लवकरच येतील ! नाहीतरी सध्या काही मराठी माणसांनी गुन्हेगारीत उत्तर भारतीयांशी कोलॅब्रेशन केलेलेच आहे. दोन्ही टीमा मिळून महराष्ट्रात काम करत असतात. मग, आरोपी शोधण्यासाठी / अटक करण्यासाठी पोलिसांना परमुलुखाचा दौरा करावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ह
हस्तर Tue, 07/02/2019 - 14:37 नवीन
https://www.quora.com/What-is-the-salary-of-Mukesh-Ambanis-cook
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गवि गुरुवार, 06/27/2019 - 10:29 नवीन
धाग्यावरील काही उल्लेखांच्या संदर्भात: इतकी वाईट इडली, चटणी, इतकं वाईट सांबार.. इतका वाईट मेदूवडा, इतका वाईट डोसा (वाईट म्हणजे बेचव अशा अर्थाने.. खराब झालेले असं नव्हे) देणाऱ्या अनेक हायवे कामत औटलेट्सची अन्यत्र फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि एकूण इतकी प्रसिद्धी कशाने झाली असावी? प्रसिद्धीत "चव" हा एक किमान घटक असावा लागतो अशी समजूत आहे. इडली ही सिग्नेचर डिश म्हणून उल्लेख केल्यास इडली, मेदूवडा आणि डोसा हे तरी चांगले असावेत. की अगदी योगायोगाने मी फक्त वाईट औटलेट्समधेच खात गेलो?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 06/27/2019 - 10:42 नवीन
फ्रँचाइजचा व्यवसाय कसा करू नये याचा वस्तुपाठ म्हणजे विठ्ठल कामतांची हॉटेल्स. त्यांना काहीही ब्रॅण्डिंग आणि प्रमाणीकरण नाही. जसे तुम्ही अनोळखी शहरात गेलात आणि दुरूनदेखील पिवळ्या रंगाचा एम दिसला कि तिथे मॅक डी आहे असा विश्वास तुम्हाला ब्रॅण्डिंग मुळे मिळतो. मॅक डी च्या अमुक आउटलेटचा बर्गर खाल्ला का असे आपण म्हणत नाही कारण कुठेही त्याची चव सारखीच असते. अगदी कच्च्या मालाच्या वापरापासून चवीचे सातत्य जपले जाते. त्या उलट कामतांची आउटलेट्स. त्यांना ना कुठली ओळख ना चवीचे सातत्य ना किमतीची खात्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 11:20 नवीन
नाही सगळीकडे तिच परीस्थीती आहे. ८-१० वर्षांपूर्वीचा गोष्ट आहे, बिसलेरी ची कींमत ₹ १० होती तेव्हा ह्याच्या आउटलेट्स मधे ती ₹ ४० ला मिळायची. गिर्हाईकांनी बोंबाबोंब केल्यावर या माणसानी बिसलेरी बरोबर संगनमत करुन त्याच्या आउटलेट्स मधे विकल्या जाणार्या बाटल्यांवरची Mrp ₹ ४० प्रींट करून घेतली होती. त्याच्या आउटलेट्स वर बहिष्कार टाकण्यास आल्याने स्वानुभव नाही पण ईतरांचे अनुभव चव आणि कींमतीच्या बाबतींच अजुनही तसेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चौकटराजा गुरुवार, 06/27/2019 - 11:29 नवीन
मी शाळेतला पहिल्या नंबरचा विदयार्थी पण आवड व कुवत याची सांगड न घातल्याने शिक्षणात व नंतर चुकीच्या कंपनीत नोकरी ई कारणा मुळे तसा करियर मध्ये फेल .आज मी ठीक जीवन जगत असलो तरी माझे कर्तृत्व शून्य आहे असे मी मानतो. आज मी जेंव्हा चाळीशीतील तरुण दीड दीड लाख पगार घेताना पाहतो त्यावेळी त्यांचा अभ्यास ही करीत असतो. यांना कंपनीनी इतक्या मोठ्या पदावर ठेवताना चापलुसी हा एकच निकष तर लावला नसेल ना ? असा मला प्रश्न पडतो. मी माझ्या सर्कल मध्ये " आमची १९५० च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी काल पट्टीवर योग्य वेळेस जन्माला आली व योग्य वेळी हे जग सोडणार आहे ! " असे म्हणत असतो. योग्य वेळी जन्माला आली अशा अर्थाने की औद्योगिक क्रान्ती नंतर हा असा काळ आहे की जिथे जगातील अनेक देशाना स्वातंत्र्य मिळून बहुतांश ठिकाणी लोकशाहीची स्थापना झाली .म्हणजेच हीन कुळात जन्माला आला तरी कुणीतरी मोठा होण्याची संधी मानवी इतिहासात प्रथमच निर्माण झाली. योग्य वेळी मरणार अशा अर्थाने की आता विकास नावाच्या औषधाचे दुश्परिणाम दिसायला सुरूवात होते आहे. माझया मते येती ४० ते पन्नास वर्षात जगात भयानक उलथापालथ होण्याची शक्यता आहे . त्यात वातावरण समस्या, पाणी समस्या वगरे असणार आहेतच पण सर्वात कराल समस्या म्हणजे " बेकारी ".ज्या ज्या लोकांनी वीस वीस वर्षाचे हप्ते बांधून जागा घेतल्या आहेत ते ही वीस वर्षे पैसे भरू शकणार आहेत का याबद्दल मला शंका आहे. सब प्राईम सारखे एखादे मोठे आर्थिक संकट २००८ साली फक्त अमेरिकेत आले ते जगावर येऊ शकते असे मला वाटत आले आहे. माझे लहानपणी वीज बिल भरण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुटी घ्यावी लागत असे आता एक घास घेतल्या सारखे ते काम होते. काही नवीन रोजगार निर्माण होतील ही . उदा . ओला उंबर सारख्या सुलभ गाड्या . पण त्याचा परिमाण असा की अनेक लोक पार्किग,कर, विमा यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतः: ची गाडी घेण्याचे रद्द करतील. आज अनेक कामे " वर्क फ्रॉम होम " अशी करता येतात सबब अशा कामाचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम मेट्रो, बस या व्यवसायावर होईल . १९७० च्य सुमारास उद्दामपणे तुम्हाला डावलून पुढे जाणारा रिक्षावाला आज याचका सारखा " यायचे का?" असे विचारत असतो . हा बदल आपण लक्षात घेतला की पुढे काय होणार याचा अंदाज येऊ शकतो . ज्ञानाचा प्रस्फोट होत असल्याने फसवणुकीवर आधारित व्यवसाय तर बंद होतीलच . त्याचबरोबर कायदा व वैद्यक क्षेत्रातील जाण वाढल्याने याही व्यवसायावर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बरेच लोक बेकारी वाढल्याने अन्न या " सनातनी " व्यवसायाकडे वळतील . आजही वळत आहेत .सबब एकाच रस्त्याला सलग ५० वडापावच्या गाड्या अशी सध्या अतिरंजित वाटणारी स्थिती येऊ शकते .धरण बांधण्यास योग्य जागा संपत गेल्यास , रस्त्याचे जाळे पुरेसे वाढल्यास याही क्षेत्रात अवकळा येऊ शकते. मुलाला एकाकी पणा येऊ नये म्हणून मुलीचा चान्स घेणाऱ्या तरुण जोडप्याला हे कसे कळणार ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 12:01 नवीन
जेव्हा पासून पृथ्वी वर सजीव निर्माण झाला आहे (त्यात माणूस येतो तो कोण्ही वेगळा नाही)तेव्हा पासून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे .पाण्याची कमतरता,अन्नाची कमतरता असे प्रसंग करोडो वेळा पृथ्वी वर येवून गेले आहेत . त्यातून जे निभावले ते जगले बाकी संपले जे संपले किंवा जे जगले त्या मुळे परिस्थिती मध्ये काही फरक पडत नाही . पुढे सर्व वाईटच घडेल असं काही नाही . निसर्ग स्वतः लोकसंख्या कमी करेल . पुरुषांना मध्ये वांझ पण वाढत आहे हे त्याचंच निर्देशक आहे . लग्न न करणे ह्याच सध्या चलती आहे . माणूस विचार पूर्वक सर्व संकट शी मुकाबला करेल आणि भविष्यात आता पेक्षा पण किती तरी आरामदायी आयुष्य माणूस जगत असेल . उत्पत्ती आणि विनाश हे हा निसर्गाचा नियम आहे त्या साठी उद्या वाईट होईल म्हणून आज दुखी होवू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 13:03 नवीन
स्वामीजी आप महान है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकटराजा गुरुवार, 06/27/2019 - 16:51 नवीन
आतापर्यंत चा मानवी इतिहास पाहिला तर तत्वत: " जो पोट देतो तो घास देतो " हे म्हणणे मान्य करता येईल पण भविष्य काळ हा इतिहासाला बांधील नसतो .मानवी शरीरात देखील आयुष्यभर निसर्गाशी संघर्ष चालू असतोच पण कितीही काळजी घ्या एके दिवशी तो संघर्ष संपतोच . निसर्गापुढे मानव तोकडा आहे . ( खरे तर व्यापक अर्थाने तो ही निसर्गा चाच एक भाग आहे ) .तुम्ही मांडलेला विचार खूप दूरचा आहे .माझी काळजी आहे येत्या पन्नास वर्षासाठीची .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 11:33 नवीन
त्यांच्या पुस्तकं नुसार त्यांना त्यांच्या भावा नी सर्व व्यवसाय वर हक्क सांगून विट्ठल जी ना हाकलून दिले आहे आहे खूप वर्षा पूर्वी . ज्यांनी व्यवसाय वाढवला त्यांनाच घराच्या बाहेर काढलं गेले. आणि त्या नंतर ते five star hotel chya व्यवसायात आले अत्यंत घडतर परिस्थिती मध्ये आणि त्यांनी पाहिले five star hotel airport समोर उभे केले . बाकी कामत हॉटेल शी विट्ठल कामत ह्यांचा आता काही संबंध नाही
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 11:38 नवीन
काय म्हणतां ? खरच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 11:43 नवीन
>>>बाकी कामत हॉटेल शी विट्ठल कामत ह्यांचा आता काही संबंध नाही>>> कामत हाॅटेलशी नसेल पण विठ्ठल कामतच्या फ्रॅनचाइज शी आहे ना? तो मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/27/2019 - 11:47 नवीन
ओह. म्हणजे "इडली ऑर्किड आणि मी"वाले विठ्ठल कामत यांचा हायवेजवरील कामत रेस्टॉरंट चेनशी संबंध नाही ? मला उगीच त्यांच्या फोटोवरुन केलेला लोगो (रेखाचित्र) तिथे वापरलेलं पाहिल्याचं वाटलं होतं. चुकीचं आठवत असेल. रोचक माहिती. धन्यवाद. व्हिट्स हे नक्की त्यांचं हॉटेल असावं. तिथे जेवण ठीक होतं. अप्रतिम नव्हे. पण एकदाच जेवल्याने पक्के मत देता येत नाही. असो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 06/27/2019 - 13:07 नवीन
व्हित्झ वॉझ ओके ओके. अर्थात हल्ली बार्बेक्यु आणि बुफे पैशाला पासरी झालेत. अश्या वातावरणात वेगळी टेस्ट अशी काय मिळणार? पण रेट मात्र दाबुन होता तेव्हा पण त्यांचा. आता बंद झाले बहुतेक. अवांतर - मला हल्ली पंजाबी आणि मराठी जेवणाचा नॉशिया आलाय, तेच तेच खाऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
झ
झेन गुरुवार, 06/27/2019 - 15:47 नवीन
मराठी माणसाला दूस-या मराठी माणसाचे कौतुक करवत नाही. बकवास चवीमधेसुध्दा सातत्य आणि विविधता असते या कामताकडे.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 06/28/2019 - 12:09 नवीन
विषय खोल आहे, पण मताच्या पिंका टाकतोय.. १. लोकसंख्या : आपण भारतात प्रचंड संख्येने आहोत, आणि त्याचमुळे प्रचंड संख्येनी वाढतोय. १९६१ मध्ये भारताची जनसंख्या जवळपास ४५ कोटी होती. १९९१ मधे जवळपास ८९ कोटी आणि २०१९ मधे १३५ कोटी पेक्षा जास्त.. म्हणजे मागील ६० वर्षांत आपली लोकसंख्या जवळपास तिप्पट झाली आहे, पण त्याच्या तुलनेत नोकरी किंवा व्यवसायांच्या संध्यामधे तितकी वाढ झाली का? तर नाही. बर्‍याच प्रतिसादकर्त्यांनी म्हट्ल्याप्रमाणे उलट ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाची गरज कमीच होत चालली आहे. २. श्रमप्रतिष्ठा नसणे : आपल्या समाजात श्रमाला प्रतिष्ठा नाही. बर्‍याच अंशी ह्याला आपली वर्णव्यवस्था जवाबदार आहे. अंगमेहनतीचे काम असलेले व्यवसाय हे पारंपारीकरित्या जातींच्या उतरंडीत खाली असलेल्या जातींची अखत्यारी मानले जातात. म्हणूनच गावातला बेरोजगार तरुण बेकार बसेल, पण 'हा' किंवा 'तो' व्यवसाय करणार नाही. 'आपल्याले शोभते का बे ते काम?' ही गुर्मी आहेच. ३. शालेय गुणांचा फुगवटा : पुन्हा एकदा, बर्‍याच प्रतिसादकर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे, आजच्या शिक्षणपद्धतीने गुणांचे फुकट वाटप सुरु केलेले आहे. त्यामुळे बर्‍याच मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा देखील त्यांच्या आकलनशक्ती किंवा शैक्षणिक कुवतीबद्दल गैरसमज होतो.. त्यातही 'एक चाटू और सब घोटू' पद्धतीत कल/ कुवत आणि आवड नसतांनाही 'अबक' कोर्सकरीता अ‍ॅडमिशन घेणे, आणि मग पुन्हा 'आपल्याले शोभते का बे ती नोकरी' करत स्वतःच्या इनफ्लेटेड इगोला जपणे सुरु राहते. सिस्टमला शिव्या देणे, हा छंदपण जडतो.. माझ्यामते ह्याला वर्तमानकालीन उपाय फार कमी आहेत. 'डेमोग्राफीक डिव्हीडेंड'चे कौतूक करण्यात जवळपास वीस वर्षं गेलीत आपली. आता हाच 'डेमोग्राफीक डिव्हीडेंड' आता 'डेमोग्राफीक बर्डन' बनत चाललाय. 'स्किल आणि व्होकेशनल एज्युकेशन' बद्दल निर्णय घेतांना आपण श्रमप्रतिष्ठेबद्दलच्या आपल्या परंपरा आणि जातीनिगडीत कल्पनांना लक्षातच घेतलं नाही, आणि आता वैतागलेल्या, खच्ची झालेल्या बेकार तरुणांचे ओझे वाहतो आहोत. स्वतःची किंवा आपल्या मुलांची आवड आणि कल ओळखून खोट्या शैक्षणिक/व्यावसायिक कल्पनांना बळी न पडता संधी शोधणे, हाच उपाय आहे ह्यावर.. बाकी स्पर्धापरीक्षांमध्येही अत्यंत प्रामाणिकपणे स्वविश्लेषण करणे फार गरजेचं असतं. क्लासवाले किंवा पुस्तक लिहून प्रेरणास्त्रोत बनणारे एकतर स्वतःचा खिसातरी जपत असतात किंवा गंडतरी.. त्यात वाहावून जाण्यात अर्थ नाही.. लोकसंख्येला आळा घालणे, ही आजच्या काळाची तातडीची गरज आहे. भरमसाठ जनसंख्या आपल्या नैसर्गिक स्तोत्रांवरही असहनीय ताण आणत आहे, आणि भविष्यात हा ताण वाढतच जाणार. पाणीसंकट आ वासून उभं आहे. We are trampling over the natural resources, and other species who are an invariable part of the nature to our own peril.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/28/2019 - 15:08 नवीन
बाकी स्पर्धापरीक्षांमध्येही अत्यंत प्रामाणिकपणे स्वविश्लेषण करणे फार गरजेचं असतं. क्लासवाले किंवा पुस्तक लिहून प्रेरणास्त्रोत बनणारे एकतर स्वतःचा खिसातरी जपत असतात किंवा गंडतरी.. त्यात वाहावून जाण्यात अर्थ नाही.. +१०० लोकसंख्येला आळा घालणे, ही आजच्या काळाची तातडीची गरज आहे. याची सुरुवात ३० वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होती. तर त्याचा प्रभाव आता दिसू लागला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
R
Rajesh188 Fri, 06/28/2019 - 12:30 नवीन
नीट विचार केला तर आपल्या कडे सेवा देणारे खूप आहेत पण दर्जा नाही . फक्त लग्न समारंभात जेवण केले तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या ही सेवेचा दर्जा हा अत्यंत खराब आहे . साधे घरात रंग जरी द्यायचा असेल तरी प्रामाणिक पने ८ तास काम करणारी लोक भारतात उपलब्ध नाहीत . शुद्ध तूप तुम्हाला कोठेच मिळणार नाही अशी गंभीर अवस्था आहे . ह्या परिस्थिती मध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला खूप मार्केट value आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/28/2019 - 15:07 नवीन
प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला खूप मार्केट value आहे प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला मार्केट मध्ये value येईपर्यंत फार काळ जावा लागतो. हॉटेलचे उदाहरण घ्या. चांगला दर्जेदार पदार्थ वाजवी भावात मिळतो आहे हे समजून हॉटेल चालायला लागेपर्यंत काही वर्षे जावी लागतात. एवढा धीर आणि सबळ आर्थिक स्थिती सर्वांची असतेच असे नाही. त्यातून लोकांना शेंडी लावून आपले काम चालते आहे हे लक्षात येताच लोक अशा मार्गाला पटकन वळतात कारण यात झटपट पैसा/ प्रसिद्धी मिळते. आणि लोकांना लक्षात येईपर्यंत दुसरा व्यवसाय चालू करता येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे कि दर्जेदार सेवा न देताहि बरेच दिवस काम चालू शकते.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 06/30/2019 - 08:31 नवीन
भारतीय जनतेने काठ-कसर हा प्रकार बंद करावा अथवा किमान ८०% नी कमी करावा, सगळ्या गोष्टी जुगाड करुन आणि/किंवा स्वस्त हवे आहे म्हणाल्यावर नोक-या पगार कुठुन मिळणार वरिल बदल होण्यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न करावे, पैसा खेळता राहिला तर सगळ्यांना काम मिळेलं, जनतेने देशांतर्गत पर्यटन करावे व सरकारने त्यास प्रोत्साहन आणि infrastructure & security पुरवावी या मुळेही प्रचंड जाॅब निर्माण होतीलं सध्या एवढचं बादवे, असे म्हणतात कि इतर देश बचत करतात व अमेरिकन जनता इत्यादी त्यावर चंगळ करतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 08:36 नवीन
‘रोजगारसंधी’ गिळंकृत करणारा ‘विकास’! याच जोडीला समाजात निर्माण झालेला दुसरा मोठा प्रश्न :- राज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित: सर्वेक्षण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/30/2019 - 08:50 नवीन
राज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित: सर्वेक्षण खरेच !?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चौथा कोनाडा Sat, 07/06/2019 - 11:36 नवीन
धन्यु मदनबाण लिन्क साठी ! लेखात नमूद केलेली खालील विधाने बेरोजगारीवर योग्य प्रकाश टाकतात ! त्या श्रमिकवर्गात पांढरपेशी श्रमिक देखील आले. .... श्रमिक वर्गावर, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने काय संकटे ओढवली असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो. राज्याच्या या स्थितीला अनेकांनी ‘जॉबलेस ग्रोथ’ – म्हणजे ‘रोजगारसंधींविना विकास’ असे म्हटले आहे. परंतु वास्तविक हे केवळ तेवढेच नसून हा ‘रोजगारसंधी कमी-कमी करणारा विकास’ किंवा ‘जॉब रिडय़ूसिंग ग्रोथ’ आहे. मानवी श्रमांवर कमीत कमी अवलंबित्व ठेवून, यंत्रे आणि उपकरणे यांवरच भिस्त ठेवणारा हा विकास आहे, ..... आर्थिक उत्पन्नही वाढले. पण म्हणून श्रमिकांना उत्पन्न मिळाले असे नाही; कारण श्रमशक्ती उपलब्ध असूनही तिला रोजगारच मिळालेला नाही. उलट बेरोजगारीचे प्रमाणच दर वर्षी आणखी आणखी वाढत राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 08:56 नवीन
खरेच !? अर्थसंकल्प सादर करण्याआधी २०१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात आज ५४.४ टक्के पुरुष, तर ४४.८ टक्के महिला अविवाहित आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/30/2019 - 09:28 नवीन
हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे. कारण, भारतातील ५०% टक्के व्यक्तींचे वय २५ पेक्षा कमी आहे आणि ६५% व्यक्तींचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि सद्या विवाहचे वय सर्वसाधारणपणे वाढलेले आहे. म्हणून, जर लग्नासाठीच्या कायदेशीर किमान वयावरील सर्व व्यक्ती अविवाहित समजल्यास, वरील आकडे मिळणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गवि Sun, 06/30/2019 - 09:42 नवीन
हेच विचार मनात आले. शिवाय तो नोकऱ्या निर्माण करण्याचा एक मुद्दा. अधिकाधिक लोकांना काम मिळावं म्हणून तंत्रज्ञान कमी करुन मानवी श्रम अधिकाधिक वापरणाऱ्या नोकऱ्या तयार करण्याचा सूर अनेक ठिकाणी दिसतो. असं मत मांडणारे लोक कुठल्या लॉजिकने असं समजतात की व्हॅल्यू क्रिएशन नसलेले जॉब्स तयार करण्याने खरा रोजगार निर्माण होईल? मोबदला द्यायला निमित्त म्हणून व्हॅल्यूलेस रोजगार निर्माण करणं हे रोजगार निर्माण न करण्यासारखंच आहे. पन्नास टक्के बेरोजगारांना खड्डा खणण्याचं काम देऊन पगार दिला आणि उर्वरित पन्नास टक्के बेरोजगारांना तो खड्डा भरण्याचं काम देऊन पगार दिला तर पुष्कळ जॉब्ज निर्माण होतील. पण व्हॅल्यू क्रिएशन शून्य. (उदाहरण केवळ सुलभीकरणासाठी, सामान्यपणे दिलं जाणारंच उदाहरण आहे) "तो खड्डा बनावा हे तो माझी इच्छा" अशी वाढीव मागणी बाजारात कोणातरी मोबदला देऊन करत असेल तरच त्या पगाराला अर्थ आहे. एरवी टॅक्सपेयर्सच्या खिशातून पैसा त्या बेरोजगार लोकांना थेट अनुदान म्हणून देणे हाच प्रकार झाला. अशी कृत्रिम मागणी बनवून सरकारने स्वतःच बाजारात (टॅक्सपेयर्सच्या इच्छेविना पण त्यांच्या पैशांतून) स्युडो ग्राहक बनून उभे राहण्यापेक्षा थेट बेकारभत्ता द्यावा. नाटक कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/30/2019 - 09:46 नवीन
... म्हणून या आकड्यांची दोन-तीन दशके किंवा जास्त जुन्या आकड्यांशी (सामाजिक बदल सोडून) तुलना करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 11:18 नवीन
हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे. ह्म्म, हे मात्र खरंय ! बाकी मी जेव्हा आजुबाजुला बघतो तेव्हा माझे काही मित्र जे कॉलनीत,कंपनीत किंवा इतरत्र आहेत ते अविवाहित असल्याचे पाहतो. एक हापिसातला मित्र जॉबचा स्ट्रेस आणि लग्न न होण्याचे फस्ट्रेशन सहन न होउन देश सोडुन गेलेला आहे. पाणी, नोकरी आणि छोकरी हे गंभीर मुद्दे झालेले आहेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 10:13 नवीन
ऑटोमेशन खूप प्रश्न निर्माण करेल . ड्रायव्हर सहज उपलब्ध असताना आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असताना . सेल्फ drive car chi गरजच नाही त्या मुळे खूप लोकांच्या नोकऱ्या जातील . विविध वस्तूंचे प्रोडक्शन करणारे कारखाने माणसा चा उपयोग न करता यंत्राचा वापर केला तर खूप लोक बेरोजगार होतील . असे सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढेल . लोक स्वतःच्या गरजा कमी करायला सुरावत करतील नोकरी नाही पैसे नाहीं तर ते कमीत कमी गरजेच्या वस्तू खरेदी करतील . मग जे विशाल प्रोडक्शन यंत्रा मार्फत केले जाईल ते खरेदी कोण करणार . आज समजा १०० साबण विकले जातात ते २५ च विकले जातील म्हणजे साबण उत्पादन बंद करावे लागेल . लोकांची purchasing power Kami झाल्यावर आर्थिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल हा सुद्धा धोका आहेच की . बेरोजगार लोक कसे ही सुखी भाकरी वर जागतिक नाही तर गुन्हेगारी कडे वळतील . असंख्य अस्वस्थ तरुण असलेल्या जगात कायदा सुव्यवस्था टिकवणे एक आव्हान बनेल . जगाच्या बऱ्याच भागात असुरक्षित वातावरण निर्माण होईल
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/30/2019 - 10:22 नवीन
चक्र वास्तवात याच्या बरोब्बर उलट्या दिशेत फिरतं. मुद्दे अगदी हेच. ते योग्य. पण परिणामांचा अंदाज उलट दिशेने केलेला दिसतो. यंत्राने केलेला साबण बनवायला जो पर युनिट खर्च येतो त्यानुसार तो स्वस्तात विकता येतो आणि अधिक लोक तो घेऊ शकतात. याउलट हाताने बनवलेले साबण लेबर कॉस्टने इतके महाग पर युनिट पडतात की ते फार कमी एलिट क्लासलाच परवडू शकतात. इथे साबण ऐवजी वस्त्र किंवा अन्य काही ठेवून पहा. अतिरेक अयोग्य, तारतम्य हवं हे सर्व मान्यच. पण मनुष्य श्रम बळेच वापरात आणायचे असं ठरवलं तर त्यात "व्हॅल्यू क्रिएशन" होत नाही. हा मुद्दा सहज चर्चेत नोंदवला जातच नाही आणि तोच मूलभूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 10:43 नवीन
ऑटोमेशन मुळे आर्थिक मंदी येईल ही भीती निराधार आहे असे तुम्हाला सुचवायचे आहे का. वस्तू खरदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होणारच नाही ह्याला काय आधार आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 11:25 नवीन
How robots change the world We estimate up to 20 million manufacturing jobs are set to be lost to robots by 2030. In Middle of Trade War, America’s Busiest Port Gets Ready for Robots Exclusive: Amazon rolls out machines that pack orders and replace jobs

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/30/2019 - 12:11 नवीन
ही अतिरेकाची , एका टोकाची उदाहरणं असू शकतील. त्यामागेही काही हिशोब असेल. पण एकूणात एफिशियन्ट आणि वेगामुळे किफायतशीर उत्पादन पद्धती उपलब्ध असताना केवळ अधिक माणसांचे श्रम उपयोगात आणता यावेत म्हणून इनएफिशियन्ट मार्गाने उत्पादन करणं यातून तेजी किंवा कोणतीही प्रगती अजिबात होत नाही. प्रगती सोडा, खऱ्या अर्थाने "पगार"ही नसतो तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गवि Sun, 06/30/2019 - 12:30 नवीन
तू (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून हं मबाशेठ) कार, बस, रिक्षा, बाईक ऐवजी चार मजुरांनी उचललेल्या मेण्यातून / पालखीतून ऑफिसला जाशील का? त्यांना किमान रोजगाराच्या नियमानुसार समजा 300 रुपये प्रत्येकी रोज द्यायचा आहे. (किंवा 50 देतो, घेणार तर घे, असं म्हणून त्यांचं शोषण करणे हा दुसरा मार्ग) म्हणजे 1200 रुपये देऊन रोज ऑफिसला जाशील का? (अंतर जास्त असेल तर 10 - 10 किमीवर मजुरांची टीम बदलेल. त्यांना पुन्हा 1200 रुपये). ऑफिसात पोचायला सहा तास आणि परतायला सहा तास. आठ रोजगार उत्पन्न होतील. एकट्या तुझ्यासाठी. तुला 1200 रोज प्रवासाला परवडतील इतका उत्तम पगार तुला देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात असेल ? तिथेही भरपूर मानवी श्रम वापरून उत्पादन होत असेल तर तू जे उत्पादन कंपनीसाठी करशील त्यातून ते 1200 वाढीव वसूल व्हावे लागतील. म्हणजे तुझ्या कंपनीची उत्पादने अगदीच गडगंज श्रीमंत अशा 2 टक्के लोकांसाठी असतील. सध्या ते विसरून जाऊ. आता हे काल्पनिक उदाहरण उलट बाजूने पाहू. हीच मेणा वाहतूक सर्व्हिस त्यातल्या एका मेणावाहक मजुराला खुद्द वापरायची आहे असं समजू. (आयुष्यात प्रगतीचं लक्षण म्हणून किंवा कधी गरज पडली म्हणून) तर तो 1200 रुपये देऊन ती घेऊ शकेल? नाही. (त्यातून तो 300 या न्याय्य रोजगाराऐवजी तुम्ही 50 रुपयांत पिळून घेतलेला मजूर असेल तर त्याला कोणतीच सेवा वस्तू परवडणार नाही.) इथे "चरखा, कापूस सूत, हातमाग, खादी" विरुद्ध "यंत्रमाग, कृत्रिम धागा रेयॉन, वेगवान उत्पादन" किंवा अन्य काहीही कल्पून बघ. वस्त्रनिर्मितीत जास्त मानवी श्रम वापरायचे (पगार देता येण्यासाठी) तर तो पगार इतक्या मजुरांना देऊन बनलेली खादी खुद्द त्या मजुरांनाच परवडणार नाही आणि सामान्य लोकांनाही. तिला मागणी कशी असेल. ही मंदीची केस बनते. यंत्रमागाने कमी लोकांना रोजगार मिळेल. पण कापड खूप मोठ्या लोकसंख्येला परवडेल अशा दरात मिळेल. त्याला मागणी असेल. असे व्यवसाय स्वतःसोबत अन्य रोजगार संधी उत्पन्न करतात. विषय गहन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 06/30/2019 - 12:15 नवीन
योग्य त्या अर्थपूर्ण आणि सध्या असलेल्याच नोकऱ्या अर्धवेळ करणे, अधिक कर्मचारी नेमणे आणि पगार विभागून जास्त लोकांना देणे हा मार्ग त्यातल्या त्यात प्रभावी ठरु शकतो. जिथे पगार किमान गरजेच्या दुपटीहून जास्त आहेत तिथे हे शक्य आहे. किमान पुढील नवीन भरतीच्या वेळी. पण मग भरपूर पगार मिळवणारे लोक हे सहन करणार नाहीत. तिथे सामूहिक हित वगैरे विचार फालतू ठरतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 17:57 नवीन
गवि सेठ नविन तंत्रज्ञान येत राहते आणि आधीचे जाते त्यानुसार माणसांचे काम देखील जाते आणि नविन काम देखील उपलब्ध होत राहते, परंतु गेल्या काही वर्षात मात्र तंत्रज्ञान बदलण्याचा काळ त्याचा अपडेट होण्याचा कालावधी देखील झपाट्याने बदलला आहे आणि बदलतो आहे ! अगदी रोजच्या मोबाइल वापरात देखील हल्ली अ‍ॅप्स ना देखील आता जवळपास रोज अपडेट अव्हेलेबल असतो. पुर्वी कंपनीत इमेलसाठी लोटस डॉमिनो सर्व्हर वापरला जायचा आणि लोटस इमेल क्लायंट असायचे मग आउटलुक मेल क्लायंट आले आणि मायक्रोसॉफ्ट सर्व्हर्स आले, परंतु टेक्नॉलॉजी बदलुन सुद्धा त्यावर काम करणारी माणसे कमी झाली नव्हती फक्त फंक्शन्ल चेंज झाला ! मात्र क्लाउड आल्यावर अख्खा सेटअप बदलला आणि कंपनीच्या आत असलेल्या सर्व्हस पासुन डेटा सेंटर / डेटा बेस हे सगळच क्लाउडवर मुव्ह झालं आणि कंपनीच्या मेलिंग सिस्टिमसाठी असलेला अख्खा सेटअप त्यांच्या माणसां सकट गायब झाला ! म्हणजेच या सेटअप मध्ये असलेल्या सगळ्यांच्या नोकर्‍या गेल्या. ट्रक मधुन सामान भरण्याचा किंवा काढण्याचा अगदी लो-स्किल जॉब देखील आता नष्ट होणार आहे, बर्गर बनवणारा रोबोट बाजारात आहे आणि रोबो वेटर देखील हाजिर आहे. Robots Edge Closer to Unloading Trucks in Amazon-Era Milestone

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चौकटराजा Sun, 06/30/2019 - 13:24 नवीन
आज एक व्हिडीओ गोवा भागातील काजू फॅक्टरी चा पाहिला . सर्व कामे लोक हाताने करीत होते. उलट टर्की मधला काज्यू फॅक्टरी चा ही व्हिडीओ पाहिला . त्यात सर्व कामे यंत्रे करीत होते . माझ्या माहिती प्रमाणे हे काम खूप क्लिष्ट असल्याने त्यात अनेक प्रक्रिया आहेत म्हणून काजू फार महाग आहेत .टर्की मधील काजूचा भाव भारतातील भावाच्या खूपच खाली आहे . मी काम करीत असलेल्या कारखान्यातून सुमारे दहा हजार कामगारांना निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले व कामे यंत्रावर करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले कारण स्पर्धेत टाकून राहायचे असेल तर मालाचा दर्जा तर टिकवावा लागतो सबब प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी प्रथम बळी पर्याय असलेल्याचा देण्यात येतो . उदा कारकून मंडळी , शिपाई ई. बागकाम, सिक्युरिटी ई कामे आता सर्रास ठेकेदाराकडून करून घेतली जातात . आज शाळेत प्रवेश घेणार्या इतक्या बाळकांना कोण काम देणार हा प्रश्न माझ्यासमोर सतत पिंगा घालीत असतो.अनेकांनी एका मुलावर ( मुलगा बरे ) समाधान मानण्याचे सुरू केले आहे पण बाकीच्यांचे काय ? खर्च वाढवून अर्थव्यवस्था चालविता येते पण तो काही दीर्घकाळ चालणारा उपाय नव्हे . शेवटी साधनसंपती व मागणी यांनीच मूळ अर्थव्यवस्था बनत असते. आज बँक ,पोस्ट , सरकारी खाती यांच्यात ७० ८० च्य दशकाप्रमाणे भरती होते का ? मानवाचे शरीर ज्याप्रमाणे काही काळ औषधानी ,कृत्रिम प्राणवायूने जगावितां येते पण त्याला जशी मर्यादा आहे तरी अर्थव्यवस्थेला ही .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 14:18 नवीन
स्वतःची बुध्दी असणारी यंत्र फक्त उत्पादन क्षेत्रात च वापरली जातील असे नाही . माणूस आणि यंत्राच्या कार्य क्षमतेत फरक आहे .मानवाला शारीरिक मर्यादा आहेत . यंत्र म्हणजे अफाट ताकत आणि परत ती बुद्धिवान पण झाली (आपणच त्यांना बुद्धिवान करतो)तर लष्करात सुद्धा माणसाचे output यंत्र पेक्षा कमी असेल तिथे सुद्धा माणसाची जागा यंत्र घेतील . पोलिस,न्यायधिष,ड्रायव्हर,pilot, train Che driver,salesman,waitor,asha खूप साऱ्या ठिकाणी माणसेच लागणार नाहीत . आणि समाजातील खूप मोठा हिस्सा हा निर्धन होईल .उत्पादने जी निर्माण होतील भले यंत्र वापरून उत्पादित होत असतील पण ती उत्पादने असतील तर माणसा साठी किती ही स्वस्त असली तरी रोजगार च नसलेला समाजाचा मोठा हिस्सा ते खरेदी कशाला करतील . टूथपेस्ट,साबण,कपडे,चमचमीत अन्न,हे तो नक्की टाळेल कारण ते विकत घेण्याची त्याच्या कडे ताकत च नसेल. मुंबई मध्ये बरेच फ्लॅट विक्री वाचून पडून आहेत कारण ते विकत घेण्याची ताकत लोकांकडे आहे . बँके चे कर्ज घेवून ती ताकत ग्रहकडे येते पण त्या फ्लॅट चे खरे मूल्य हे घरेदी किमती पेक्षा खूप कमी असते.१० लाखाचा फ्लॅट चे भाडे २००० रुपये सुद्धा मिळत नाही .उद्या कर्ज फेडले गेले नाही तर ती प्रॉपर्टी विकून बँकेचे पैसे वसूल होवू शकत नाही कारण मुळातच त्याच्या वर असलेले कर्ज खऱ्या मूल्य पेक्षा खूप जास्त असते (एक उदाहरण म्हणून घावे)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 14:35 नवीन
आज आपण ज्या वस्तू रोजच्या जीवनात वापरतो त्याचे उत्पादन यंत्राचा वापर करून केलेला आहे . कोणती वस्तू स्वस्त आहे बाईक चा विचार केला तर तिची कमीत कमी किंमत ६०००० आहे . तिचे उत्पादन मूल्य किती असेल २५००० रुपये . मग हा जो फरक आहे तो फायदा म्हणून मोजला जातो . आणि तो फायदा मधल्या साखळीत कमी प्रमाणात विभागला जातो आणि उत्पादन करणाऱ्या ला जास्त प्रमाणात मिळतो एकच व्यक्ती कडे साधनसंपत्तीचा खूप मोठा हिस्सा जातो . आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून काही ठराविक लोकांकडे खूप मोठी संपत्ती जमा झाली आहे . उत्पादन खर्च वाढतो म्हणून कामगार नकोत हे कारण पटत नाही .२० percent होणारा फायदा ४० percent झाला पाहिजे म्हणून कामगर नकोत हे खरे कारण आहे असेच मला वाटत
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/30/2019 - 14:50 नवीन
हा मुद्दा / विचार अयोग्य नाही. पण केवळ कामगारांचा पगार हाच उत्पादनखर्च वाढण्यामागचा घटक नाही. उत्पादकता, वेग, volume, अचूकता, प्रमाणितपणा अशा अनेक गोष्टींनी उत्पादन घेण्यातली किफायत ठरते. दोन टोकं आहेत , दोन्ही टोकाच्या परिस्थिती सदोषच. दोरीवर तोल सांभाळत कसरत करत पुढे जावं लागतं. उजवीकडे तोल जावो किंवा डावीकडे .. कपाळमोक्ष होणारच. शेवटचा विचार, श्रेय : श्री. राजीव साने (युगांतर पुस्तकाचे लेखक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकटराजा Sun, 06/30/2019 - 15:27 नवीन
संपत्तीचे वाटप हा सामाजिक, नैतिक. राजकीय प्रष्ण आहे अर्थशास्त्रीय नाही . एका कडे संपत्ती जमा होते याचे कारण नुसते भांडवल नाही , तर उद्यमशीलता , महत्वाकांक्षा , कल्पकता , संशीधकता व बुद्धी हे ही त्यात येतात . हे सारे गुण एकत्रीतपणे समाजाकडे म्हणजेच सरकारकडे असतील तर अंबानी ,बजाज यांची गरज नाही . पण असे सरकार निदान लोकशाहीत तरी अस्तित्वात नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकटराजा Sun, 06/30/2019 - 15:20 नवीन
एक सोनोग्राफिस्ट सांगत होते काही वर्षात अल्ट्रा सोनो ग्राफी रोबोच करेल. त्याला निर्दोष शरीर रचनेचे काही शेकडा फोटो पुरविण्यात येतील व तो सर्व स्वतः: करून रिपोर्ट देखील प्रिंट करेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 15:59 नवीन
मध्ये काही वर्षा पूर्वी एक बातमी होती मायक्रोसॉफ्ट ला तिचे पाय windows saftware साठी एका विशिष्ट सॉफ्टवेअर( किंवा हार्डवेअर) गरज लागायची आणि ते दुसरी कंपनी पुरवायची पण तेच मायक्रोसॉफ्ट नी फुकट द्यायला survat केली त्यामुळे ती दुसरी कंपनी बंद झाली . आणि केस कोर्टात गेल्यावर मायक्रोसॉफ्ट ला दोषी ठरवून मोठा दंड भरावा लागला ही मनोवृत्ती काय दर्शवते . खूप लोकांना आठवत असेल पाहिले जागोजागी गाड्यांना रंग देण्याची garage होती. कारण ठराविक वर्षांनी गाडीचा रंग उडायचं आणि त्या मुळे रंग देण्याचा रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण झाला होता . आता गाड्यांचे रंग उडतच नाहीत त्या मुळे हा रोजगार बंद झाला ही सुद्धा जी मनोवृत्ती car उत्पादक कंपनीच्या द्वारे दाखवली गेली त्याच्या पाठीमागे असलेले कारण मायक्रोसॉफ्ट chya उदाहरणातील कारण एकच आहे . मी सर्वात मोठा takatwan व्यक्ती झालो पाहिजे . आणि ह्या मुळे बऱ्याच क्षेत्रात स्वयं रोजगार निर्मिती बंद झाली आहे . मोठ्या कंपन्या पैसे chya जोरावर एकाधिकार शाही गाजवत आहेत
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 06/30/2019 - 16:18 नवीन
कारण ठराविक वर्षांनी गाडीचा रंग उडायचं आणि त्या मुळे रंग देण्याचा रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण झाला होता . आता गाड्यांचे रंग उडतच नाहीत त्या मुळे हा रोजगार बंद झाला ही सुद्धा जी मनोवृत्ती car उत्पादक कंपनीच्या द्वारे दाखवली गेली त्याच्या पाठीमागे असलेले कारण मायक्रोसॉफ्ट chya उदाहरणातील कारण एकच आहे .
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ? कारचे रंग उडत रहायला हवेत ? रोजगार निर्मिती व्हावी म्हणून मुद्दम कमी दर्जाची उत्पादने बनवून विकावीत ? काहीही हं राजेश :)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 06/30/2019 - 16:24 नवीन
Automation चे बरे (चांगले, स्वस्त उत्पादन) वाईट (रोजगार जाणे) परिणाम आहेतच पण टोकाचे Automation एकदम एका टप्प्यात होवू शकणार नाही. अनेक कंपन्यांकडे त्याकरिता लागणारे भांडवल नसेल तर ज्यांच्याकडे असेल त्याही खप , बाजारातली स्थिती याचा अंदाज घेत सावध पावले टाकतील. driver less car तर २०३० पर्यंत भारतासारख्या देशात रस्त्यांवर अवतरतील हे अशक्य वाटते. विमानाच्या पायलटला जरी Automation ने replace केले तरी खूप झाले. पायलटचा पगार प्रचंड असतो..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 17:02 नवीन
ऑटोमेशन मुळे रोजगार जातीलच असे पण नाही . फक्त हे कोलीत माकडाच्या हातात नसावे. घरात किंवा ऑफिस मध्ये विजेचे दिवे,साऊंड सिस्टीम,पडदे बंद किवा चालू करण्यासाठी मोठ्या शहरात ऑटोमेशन चा वापर केला जातो. ऑटोमेशन करणाऱ्या कंपनीचं app mobile वर डाउनलोड करून त्या मार्फत तुम्ही घरातील विजेचे दिवे,साऊंड system , पडदे ह्या मोबाईल मार्फत नियंत्रण ठेवू शकता . फक्त ह्या कामासाठी नोकरी कधीच उपलब्ध नव्हती . पण ऑटोमेशन मुळे रोजगार निर्मिती झाली . System installation साठी ,ती repair करण्यासाठी माणसाची गरज लागली . म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगार च नव्हतं तिथे रोजगार निर्माण झाले असे सुधा होवू शकत ऑटोमेशन मुळे रोजगार कमी न होता रोजगार चा प्रकार बदलू शकतो
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 06/30/2019 - 17:11 नवीन
प्रश्न: अधिकाधिक यांत्रिकीकरणामुळे मानवाला रोजगार शिल्लक राहील का? उत्तर: नक्कीच राहील, एवढेच नव्हे तर रोजगार वाढतच जाईल. दोन प्रकारे या उत्तराचे स्पष्टीकरण देता येईल - १. ऐतिहासिक दृष्टीने - ज्या दिवशी मानवाने पहिला दगड उचलून प्राण्याची शिकार केली त्या दिवसापासून खरंतर यांत्रिकीकरणाला सुरुवात झालीे. तेव्हापासून आजवर, आर्थिक मंदीच्या काही क्षणभंगुर लाटा वगळता मानवी रोजगाराला मागणी सतत वाढतच राहिली आहे. अर्थात अपेक्षित स्किल-सेट अधिकाधिक वेगाने बदलत राहिलेला आहे ही बाब वेगळी. २. तार्किक दृष्टीने - वेगवेगळ्या देशांची सरकारे आणि खाजगी कंपन्या या, सध्याच्या जगातील सर्वशक्तिमान entities आहेत आणि त्या लोकांच्या पैशांवर चालतात. लोकांना रोजगार नसेल आणि पर्यायाने त्यांच्याजवळ पैसा नसेल तर ते कर भरु शकणार नाहीत आणि वस्तू सेवा विकत घेऊ शकणार नाहीत; पर्यायाने अनुक्रमे सरकारे आणि कंपन्या बंद पडतील. त्यामुळे रोजगारविहीन समाज अशी परिस्थिती या दोन्हीही entities (सर्वशक्तिमान असल्यामुळे) येऊ देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 06/30/2019 - 17:20 नवीन
Afterthought - कदाचित असंही होईल, रोजगार-विहीन लोकांना निरुपयोगी ठरवून नष्ट केले जाईल. ... पण आजवर असं कधी झालंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ह
हेमंतकुमार Mon, 07/01/2019 - 04:06 नवीन
आणि चर्चा. सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा