भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन
'सध्ध्याचा काळ मोठा कठीण आहे' हे वाक्य तुमचा सततच पाठलाग करायला लागले कि समजावे तुमची तारुण्याची गाडी उताराला लागली आहे. सहसा जगण्याची उस्तवार करताना जो संघर्ष करावा लागतो त्याचा आणि या वाक्याचा फारसा संबंध नसतो. पण जेंव्हा तुमच्या डीएनएचाच भाग बनून राहिलेल्या तुमच्या समजुतींना आता काही किंमत नाही हे कळायला लागते तेंव्हा एक वेळ अशी येते कि अगदी क्षुल्लक करणानेदेखील तुमच्या निग्रहाचा बांध फुटतो आणि ते सुरवातीचे वाक्य आपोआप तुमच्या ओठावर येते.
सुरवातीपासून सुरुवात करायची म्हटले कि प्राथमिक शाळेत विरुध्ध अर्थाचे शब्दांच्या जोड्या जेंव्हा शिकलो ते दिवस आठवतात. 'चांगले-वाईट', 'मऊ-कठीण' या शब्दांच्या बरोबरच एक जोडी येते ती म्हणजे 'सनातन-सुधारक'. यातला सनातन या शब्दाला तेंव्हा किंमत नव्हती. कर्मठ, विज्ञानाची कास न धरणारे, रोगाची साथ आल्यानंतर मरीआईचा गाडा गावाबाहेर नेऊन सोडणे वगैरे गोष्टी करणाऱ्या लोकांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. साहजिकच आगरकर, फुले, महर्षी कर्वे, वगैरे लोकांना युग पुरुषांचा मान होता.
स्वातंत्र्यनंतरच्या काळात अजून काही युग पुरुष होते पण सामाजिक बदलांमध्ये त्यांची भूमिका क्रांतिकारकांसारखी नव्हती. जसे कि रँग्लर परांजपे, डॉ. परुळेकर, शंतूनराव किर्लोस्कर, विक्रम साराभाई वगैरे. आपल्या कामाच्या निष्ठेने ते लोकांमध्ये आदरास पात्र ठरले होते. त्या काळची जनता देखील वेगळीच असावी. भिलईचा पोलाद कारखाना, भाक्रा नांगलसारखे प्रकल्प हेच आधुनिक भारताची तीर्थक्षेत्र असतील यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
भाषा आणि संस्कृती या बाबत कुणालाही फारसा कळवळा नव्हता. संस्कृती हि प्रवाही असली पाहिजे आणि भाषेने आधुनिकतेचे आव्हान पेलले पाहिजे यावर व्यापक प्रमाणाव एकमत होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मेंदी आणि टिकली लावू दिली जात नाही हे नियम म्हणून सर्वांना मान्य होते. भाषा आणि संस्कृतीचे पाइक यांचा आवाज कोल्हेकुई पेक्षा फार मोठा नव्हता.
पण प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात या उक्तीप्रमाणे संस्कृती रक्षकांना देखील सुगीचे दिवस आले. सुधारक या शब्दाची चमक आता सनातन या शब्दाला आली आणि सुधारक मरतुकड्या कुत्र्यासारखे केविलवाणे झाले. मुलांनी भिकबाळी घालणे आणि मुलींनी नथ घालणे आता सर्वमान्य झाले. चांगल्या घरातील मुलं मुली दोन-दोन महिने चालणाऱ्या ढोल-ताश्यांच्या सरावांवर खर्च करू लागलीत. इतरत्र कालचक्राला सुसंगत बदलण्याचे आव्हान असेल. आम्ही मात्र कालचक्राची चाकं उलटी फिरवण्यात समाधानी आहोत.
प्रतिक्रिया
- परंपरांची पडताळणी न करता त्यांचे अनुकरण करणे
- परंपरा न पाळणाऱ्यांची निर्भत्सना करणे; प्रसंगी त्यांना त्रास देणे
- परंपरांमध्ये कालानुरूप बदल न करणे
- आणि या सर्वांमध्ये वरताण म्हणजे परंपरा आणि धर्म यांची सांगड घालणे
यातील शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी मी गुरु नानकांचे उदाहरण देतो म्हणजे फार गदारोळ होणार नाही. गुरु नानक एकदा नदीवर स्नानासाठी गेले असताना त्यांना एक व्यक्ती अर्ध्य देताना दिसते. गुरु त्यांना विचारतात तुम्ही हे काय करता आहात. त्यावर ती व्यक्ती सांगते कि मी माझ्या स्वर्गातल्या पितरांना पाणी पाजत आहे. यावर गुरु नानक नदीचे पाणी जोरात किनाऱ्यावर ढकलतात. तो माणूस विचारतो तुम्ही हे काय करता आहेत त्यावर गुरु नानक त्याला सांगतात कि मी थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या माझ्या शेताला पाणी देत आहे. तो माणूस विचारतो असे शेताला पाणी देणं कसं शक्य आहे. त्यावर गुरु नानक त्याला म्हणतात कि जर तुमचे अर्ध्य स्वर्गातल्या पितरांना पोहचत असेल तर मी ढकलतो ते पाणी शेताला मिळायलाच हवे. आपल्याकडे देखील धर्माच्या बाबतीत अधिकारी व्यक्तींनी धर्माचे स्तोम माजवू नका असे सांगितले असताना देखील आपण परंपरा जोमाने पाळतो. यातील काही परंपरांना तर धार्मिक अधिष्ठान पण नाही!!