अनटायटल टेल्स ४
#क्षणांवर स्वार मने#
एक फोटोच्या क्लिक मागे कितीतरी हजार गोष्टी अगदी आठवण म्हणून फोकस झालेल्या असतात.रंगसंगती बॅकग्राऊंड आणि खुद्द फोकस व्यक्ती सुद्धा तिच्या अनेकविध मुड्स सह अशी स्थिर किंवा जागच्या जागी थांबलेली!
शरद सम्यक जेव्हा फोटो काढतो तेव्हा तो अक्षरशः जिवंत करतो असं त्याच्याबद्दल अनेक जण बोलत असतात आणि त्याने आपला फोटो काढावा म्हणून मरत असतात.
त्याच्या आयुष्यात अतिशय धांदरट अशी किमया सिंग आली आणि त्याची फोटोग्राफी काहीतरी वेगळंच होऊ लागली
त्याचे फोटो जिवंत तर होतेच पण आता ते स्वतःहून गोष्ट रंगवू लागलेत.किमया ऍक्टरेस आहे आणि प्रचंड महत्वकांक्षी तरीही शरद साठी कधीही कुठेही धावू लागते.ते एकमेकांना डेट करतायेत हे फोटोतल्या क्लोजअप ला सुद्धा समजलेलं पण दोघेही मान्य करतच नव्हते
तो दिवस उजाडला आणि आज काहीच करावंसं वाटू नये इतका कंटाळा अंगभर अजगरासारखा पसरलेला
किमयाचं काहीतरी अल्बम शूट चालू होतं आणि तिने शरदला फोन करून उठवलंच!
हे शरी,प्लिज ये ना रेsss अशी लडिवाळ विनवणी सम्यक चे सगळे स्टील्स हलवून गेली.
छान कॉफी. फ्रेश हॉटेल आणि सोबत एकमेकांना पूरक!
खरंतर प्रश्न हा होता की सुरवात कुणीतरी करायची आहेच पण ती कुणी करावी?
तेवढ्यात मॅनेजर तिथे आला!
सर,आज हम हमारे हॉटेल मे 'कॉफी विथ लव्ह' सेलिब्रेशन कर रहे हैं और ये हैं आपका कुपन. बस नाम और नंबर नोट कर के छोड देना!क्या पता आप लकी विनर हो.
सर, आपकी मिसेस बहोत खूबसुरत हैं.
सम्यक आणि किमया दोघांचे चेहरे अगदी स्तब्ध!!
हा क्षण खरंच कॅमेरामध्ये टिपण्याजोगा झालेला.
कॉफी झाली. रस्ते पुन्हा तेच पण त्याची वळणे आता कुठे समजू लागली होती समजावू लागली होती आणि हा प्रवास काहीतरी विलक्षण आहे हेही मनाने हेरलं.
किमयाला अभिनेत्री असल्याने ग्लॅमर आणि प्रकाशझोत यांची सवय होतीच पण सम्यक खरंतर हे सगळं टिपून घेणारा आणि तरीही अलिप्त राहणारा तिसरा प्रेक्षक असल्याने यातूनही त्याने हवं ते चित्र टिपलंच.
ओढ आली हुरहूर आली नकळत काळजी वाढली आणि शब्दांची गरजच भासू नये इतकं तादात्म्य आलं.
प्रेमात असंच होत असेल बहुधा म्हणूनच किती हलकं आणि फ्रेश आहे सारं जग! असा फील सर्वांगावर दाटला.
#मग मधला पाऊस चिखल आणि कामासाठी धावपळ#
फोटो असे का वागत आहेत? अभिनय हवा तसा का होत नाहीये?
तुम्ही तुम्हीच असूनही तुम्हाला हवं तसं का वागत नाहीये तुम्ही? बस झाला हा फिल्मी रोमान्स!
वेळ देता येत नाहीये एकमेकांना , मग त्या भेटी त्या कॉफी ला काय अर्थ आहे का? हुरहूर काळजी हे सगळं फक्त तेवढ्या क्षणालाच होतं का?
चेहऱ्यावर रंग फासून आणि ते चित्तारून माणसे त्यांचा मूळ स्वभाव नाही बदलू शकत!तो असतोच आतमध्ये आणि लाव्हारसासारखा येतो फसफसून अचानक!
विषय बदलले दिशा विस्कटल्या
फ़ोटो काढावा असं उचंबळून आतून काही येईना.मॉडेलिंग च्या ऑफर कमी झाल्या.रात्री झोपताना आता उद्या काय करायचं हा प्रश्न त्रास देऊ लागला..
शरद आणि किमया जवळपास दोन वर्षे एकमेकांना भेटले नाहीत!
कारण काहीही असो दोघांच्या भावनांची तीव्रता केवळ भेट होऊ शकली नाही म्हणून बोथट झाली.
#समारोप#
काय बिनसलं माहीत नाही पण दुसऱ्या बाजूने काय काय विचार होऊ शकतो याचं अतिक्रमण झालं स्वतःच्याच मनावर!
म्हणजे तिला आता भेटावं असं वाटत नसणार किंवा त्याच्या आयुष्यात अजून दुसरं कोणी आलं असेल! या अनुषंगाने काहीही डोक्यात दोघांच्याही घुमत राहिलं आणि फक्त भेटी कमी झाल्याने अंतरे वाढत गेली.
विचार तेही स्वतःशी जेव्हा बोलू लागतात तेव्हा ते प्रचंड विषारी आणि ताकदवान असतात.
आता किमया घरीच असते . लहान मुलांच्या ट्युशन घेते आणि फावल्या वेळात फक्त सिनेमे पाहते.
शरद त्याची आवड सोडून आयटी कंपनीत सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो.
आजूबाजूला आकर्षक बरीच मंडळी आहेत पण मनात आता तसंवालं फिलिंग भरून येत नाही आणि दिवस नुसतेच सरकत राहतात.
प्रतिक्रिया