छपाकसे पेहेचान ले गया...
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं.
हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे-
1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.
2) दीपिका- दीपिकाचा तर आपण पंखाच.सध्याच्या सर्वोत्तम हिंदी अभिनेत्रींनपैकी एक.
3) विक्रांत मेसे (उच्चार कसा करायचा ?)- मिर्झापुर मधला बबलू भैया. याचा स्क्रीन प्रेसेन्स जबरी आहे.
ठीक, आता मला हा सिनेमा फार का आवडला, ते सांगतो.
1) संवेदनशीलता-
डायरेक्टर समोर मोठ्ठ चॅलेंज आहे, कि पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुःख हे प्रेक्षकापर्यंत प्रभावीपणे पोचवायचय. हे करताना खूप ह्रदयद्रावक आणि भेसूर गोष्टी दाखवता आल्या असत्या, आणि त्या सत्य परिस्थितीला धरूनच असल्या असत्या. त्यामुळे मी सरकारी कॅन्सरविरोधी जाहिरातींसारख्या दृश्यांची कल्पना करत होतो, आणि ते अपल्याच्यानं बघवणार का असा विचार करत होतो. पण मेघना गुलजार ने तेच ह्रदयद्रावक दुःख आणि यातना अपल्यापर्यंत अतिशय उत्तमरीत्या पोचवले आहे.
2) कथबांधणी-
कथेचं स्ट्रक्चर अगदी विचार करून ठरवलं आहे. आशादायी वर्तमान आणि वारंवार होत असणाऱ्या पाशवी घटना आलटून पालटून समोर येतात. कथेमध्ये प्रेक्षक गुंतून राहतो.
3) संवाद-
निव्वळ अप्रतिम. छपाक सिनेमा काय चीज असणार आहे हे अगदी सुरुवातीच्या काही डायलॉग्जमध्येच कळते. संवादामधून कथेचे अगदी लहान लहान कंगोरे अगदी शिताफीने दाखवले गेलेत. आयपीसी मध्ये ऍसिड अटॅक बद्दल अजूनही किती जुनाट तरतुदी आहेत हे अजिबात अनैसर्गिक/कृत्रिम न वाटता सहजपणे आपल्या पर्यंत पोहचते.सिनेमाची सुरुवात 2012 च्या निर्भया आंदोलनातून होते. विक्रांत सुरुवातीलाच निर्भया बलात्कार प्रकरणी होणाऱ्या आंदोलनांचा परीघ किती लहान आहे हे त्याच्या साध्यासुध्या पण ताकदवान वाक्यांमधून सांगतो. "आंदोलनामुळे किती ट्रॅफीक जाम झालंय" या बस कंडकटर च्या वाक्यातून तुमच्या आमच्या, सगळ्यांचाच बोथट संवेदना दिसतात.
मालतीच्या कुटुंबियांचे, संस्थेमधील समदुःखी मैत्रिणींचे, सगळ्याच संवादांची भट्टी मस्त जमली आहे. खास करून उल्लेख करायचा तो म्हणजे मालतीच्या वकिलबाई आणि तिच्या मैत्रिणींचे संवाद. हे संवाद आपल्याला कायद्यातल्या विविध तरतुदी कळवण्यासाठी बखुबीने पेरले गेले आहेत.
4)अभिनय-
विक्रांतच पात्र छपाक मध्ये बबलू भैया पेक्षा अगदी वेगळं आहे. अमोल ऍसिड अटॅक सर्व्हायव्हर्स साठी एक संस्था चालवतो. तत्वनिष्ठा तगडी आहे. हा पत्रकार असूनही स्वतःला समाजकार्यात झोकून दिलेला आहे. विक्रांतने अमोलच्या भूमिकेला न्याय दिला असला, तरी दीपिकाच्या उत्तुंग अभिनयापुढे विक्रांत कडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.तसेच वकिलबाईंचा नवरा म्हणून अगदी छोट्याश्या रोलमध्ये आनंद तिवारी पण भाव खाऊन जातो.
दीपिका... काय बोलावं ?
दीपिकानं मालतीची भूमिका मस्त केलीये या पलीकडं काय सुचतच नाही. कारण ही भूमिका बर्फी मधल्या प्रियांका चोप्राच्या भूमिकेसारखी नाही की त्यातून अभिनयकौशल्य अगदी उठून ठळकपणे दिसेल. तरीही काही अगदी सौम्य भूमिका असतात ज्या आपल्याला आवडून जातात, पण नेमकं बोट ठेवता येत नाही का आवडल्या म्हणून ! या सिनेमात आपण दीपिकाला शोधत राहतो कायमच. फक्त चेहरा बदलल्या मुळे नव्हे, तर यामुळे की दीपिका नावाची सुंदर आणि उत्साहाने खळखळणारी मुलगी या सिनेमात नाहीच आहे. सिनेमात आहे आपली पूर्ण ओळख हिसकावून घेतल्यावर पुन्हा जगणारी मालती नावाची मुलगी.
चेहरा विद्रुप झाल्यामुळे स्वतःला कोशात गुरफटून घेणारी मालती, नोकरी साठी वणवण करणारी मालती, कोर्टमध्ये बचावपक्षाच्या वकिलाच्या हल्ल्यांना निमूटपणे सामोरी जाणारी मालती, दुःख सारून पुन्हा हसणारी मालती... यातलं कुठलंही परिवर्तन जराही खडबडीत झालं नाही, हे दीपिका आणि मेघनाचे श्रेय आहे. जेव्हा एक पत्रकार तिला प्रश्न विचारतो " तुमच्या हल्लेखोराला तुमच्या PIL बद्दल माहिती आहे का ?" (हल्लेखोर त्या वेळेस बेल वर सुटून विवाहित सुद्धा झाला आहे आणि बाप सुद्धा झाला आहे)- तेव्हा "पता नहीं, जानते हो तो अच्छा है" अस सूडाच्या पार जाऊन केवळ ऍसिड विक्रीवर बंदी यावी याचा विचार करणारी मालती आपल्याला अंतर्मुख करणार हे नक्कीच !
5) गाणी-
गुलजारच्या साहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या चपखल ओळी आणि शंकर एहसान लॉय यांच्या संगीतातून मिळालेलं टायटल सॉंग अगदी श्रवणीय आहे. छपाक टायटल ट्रॅक
कोई चेहरा मिटा के और आंख से हटा के चंद छिटे उडा के जो गया छपाक से पहचान ले गया ! कोई चेहरा गिरा जैसे मोहरा गिरा जैसे धूप को ग्रहण लग गया छपाक से पहचान ले गया !तर असा हा सिनेमा. 2020 च्या सुरुवातीलाच इतका तगडा घोडा ऑस्कर रेस साठी मिळाला आहे. संबंधीत बातमी- लक्ष्मी अग्रवाल च्या वकीलबाईंनी कोर्टात तक्रार केली असून, कोर्टाने सिनेमा निर्मात्यांना 15 जानेवारी पर्यंत वकीलबाईंना सिनेमामध्ये श्रेय देण्याचा/नावाचा उल्लेख करण्याचा आदेश दिला आहे. अवांतर- रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपटाची IMDb रेटिंग 4.2 आहे. 82% टोमॅटोमिटर असलेल्या सिनेमाचा खराखुरा स्कोर इतका कमी खचितच असू शकत नाही. इतकं spitefull व्हावं का ? आणखी अवांतर- देश वाचवण्यासाठी दीपिकाला बहिष्कृत करा आणि देश वाचवण्यासाठी तिकीट खरेदी करा म्हणणाऱ्या दोघांची वटवट ऐकून कान किटले आहेत. एक अतिशय सुदंर सिनेमा आहे, जरूर बघावा. हा, दीपिकाला मदत करणे हे उदात्त मोटिव्ह तर आपल्याला कधीही चालेल ;)
प्रतिक्रिया