Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदू अंत्यसंस्कार

अ
अत्रन्गि पाउस
Mon, 01/27/2020 - 07:44
💬 19 प्रतिसाद
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश. अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो १ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत? २) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का? एकूणच ते हार बुक्का वगैरेंनी एक भेसूर पणा येतो असे वाटते ३) पुढे दहनपूर्व उपचारांमध्ये पिठाचे गोळे, काळे तीळ वगैरे वापरून एकूण दृश्य अजूनच भयानक दिसू लागते. अर्थात ह्या मागे मन गुंतवणे आणि मृतदेह दहनाला पूरक द्रव्य म्हणून तूप वगैरे वापरणे हे उद्देश समजू शकतात परंतु ह्या एकूणच प्रक्रियेत थोडा सोपेपणा / सौंदर्य (होय मला सौंदर्यच म्हणायचे आहे ) आणता येणार नाही का? (मी ज्ञानप्रबोधिनी विषयी ऐकून आहे त्यात नेमके काय करतात??) ४) पुढे अस्थी राख विसर्जन करणे ह्यात "युझर मॅन्युअल" काय सांगते? ५) हिंदू लोक दफन करतात का आणि हो असेल तर कसे केव्हा ?? अन्य धर्मीयांमध्ये सर्वसाधारण पणे हे विधी ठोस आणि एकही फाटा न फोडता जसे च्या तसे, म्हणजे धर्मगुरू म्हणेल ते आणि तसे, करतात असा माझा समज आहे तो खरा कि खोटा? बाकी मुद्दे चर्चा जशी पुढे जाईल तसे मांडीनच

प्रतिक्रिया द्या
12976 वाचन

💬 प्रतिसाद (19)
M
mayu4u Mon, 01/27/2020 - 08:16 नवीन
अंत्यसंस्कार करुच नयेत. देहदान करावं. ते शक्य नसल्यास कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युत किंवा वायु दाहिनीत मृतदेहाचं दहन करावं. सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/28/2020 - 14:20 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
क
कंजूस Mon, 01/27/2020 - 14:11 नवीन
विधी काय कशाला असतात हे जाणून घ्या. मग करायचे का नाही हे ठरवा. तुमची/व्यक्तिगत इच्छा. १)गावाकडे लहान समाज असतो . करायला भाग पाडतात. पण शहरात कोणी कोणाला विचारत नाही तिथे सर्व फाटे शक्य असतात. २) हिंदू धर्मात कोणाला कुठे (जन्मानंतर धर्मात घेणे, लग्नकार्य आणि मरण ) अडवले जात नाही. तसे इतर धर्मात नाही. या तीन स्पीड ब्रेकरांत अडवले जाते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 01/27/2020 - 17:37 नवीन
हो पण मुळात करायच्या गोष्टी आहेत तरी काय काय ... आता साधी गोष्ट : दहाव्या दिवशीच्या क्रियाकर्माला उपस्थितांनी अंघोळ करुन यावे कि पारोसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ह
हेमंतकुमार Mon, 01/27/2020 - 14:15 नवीन
सर्व धर्माच्या मृतदेहांकरता माझं हेच मत आहे. जे काही प्रेम, आदर व्यक्त करायचा तो ती व्यक्ती जीवित असे पर्यंत. मृत्यू झाला की उरतं ते केवळ निर्जीव शरीर
. + १११
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 01/27/2020 - 16:32 नवीन
मृत्यू नंतरचे जीवन, पुनर्जन्म ,स्वर्ग-नरक याबद्दल सर्वच धर्मांत अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. मृताची/ आप्तांची आर्थिक, सामाजिक स्थिती यावरही मृत्यू पश्चात क्रीयाकर्मांवर प्रभाव असतो. mayu4u यांचे मत मलाही पटते. अलीकडेच कायाप्पावर आलेली एक पोस्ट इथे द्यावीशी वाटल्याने देत आहे. अमेरिकेतील सुखान्त* *अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर हॉस्पिस (हॉस्पीटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंतकाळ जवळ आलेला असतो अशांना `हॉस्पिस'मध्ये ठेवतात.* अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांत व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. अमेरिकेतील हॉस्पिसमध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री-अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. आम्ही सकाळी ११च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी आमची ती नातलग निवर्तली. हॉस्पिसमधल्या शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि `सॉरी' म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे अंत्यविधी (फ्यूनरल)ची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील `फ्यूनरल होम' या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्न्ॅक्ट दिले होते. दु:खाचा आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरूण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टीफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या बाहुलीसारखा दिसत होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता तो हॉल चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाड्या उभ्या राहतील अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छ मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्न्ध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते. तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्यावेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रूंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाड्यांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअम-पर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता. विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थीबरोबर डेथ सर्टीफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठ्या पुड्यात केक्स, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते. हे लेखन माझे नाही .मला जसे मिळाले , तसेच पाठवत आहे .मला खुप आवडले .
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 01/27/2020 - 18:08 नवीन
अंत्यसंस्कार हे जरी मृत्यू पावलेल्या देहावर / मृतात्म्यासाठी केले जात असले तरी त्यांची गरज ही जिवंत असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांसाठी असते. थोडक्यात धर्म आपले अफूच्या गोळीचे काम इथे करतो. जसे इतर गोष्टीत आपण आपल्याला परवडणारे, आवडणारे, पटणारे पर्याय निवडतो (उदा. वैद्यकीय उपचार, भटकंती इत्यादी इत्यादी), तसंच इथेही अंत्यसंस्काराबाबत करायला हरकत नाही. बाकी इतर सर्व तपशील कर्मकांडाचा भाग आहेत, त्यातले जे पटते आणि मनाला समाधान आणि शांती देते ते करावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/27/2020 - 19:30 नवीन
अत्रन्गि पाउस, ज्यांना विहित शास्त्रानुसार अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यांच्यासाठी हे दोन लेख आहेत : १. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १) : https://www.sanatan.org/mr/a/872.html २. मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २) : https://www.sanatan.org/mr/a/880.html वरील दोन लेखांच्या आधारे तुमच्या शंकांची उत्तरं यथाशक्ती देतो :
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
पूर्ण माहितीसाठी वरील दोन दुवे कृपया वाचावेत. त्यांच्यात केवळ आवश्यक विधीच दिलेले आहेत. सर्व मजकूर इथे देत नाही. विहित संस्कार अतिशय सोपे व सुटसुटीत आहेत. ते सोडून बाकी सर्व कृती टाळायला हरकत नाही.
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का? एकूणच ते हार बुक्का वगैरेंनी एक भेसूर पणा येतो असे वाटते
सजावट किमान असावी. मृताच्या गळ्यात एक हार पुरेसा आहे.
३) पुढे दहनपूर्व उपचारांमध्ये पिठाचे गोळे, काळे तीळ वगैरे वापरून एकूण दृश्य अजूनच भयानक दिसू लागते. अर्थात ह्या मागे मन गुंतवणे आणि मृतदेह दहनाला पूरक द्रव्य म्हणून तूप वगैरे वापरणे हे उद्देश समजू शकतात परंतु ह्या एकूणच प्रक्रियेत थोडा सोपेपणा / सौंदर्य (होय मला सौंदर्यच म्हणायचे आहे ) आणता येणार नाही का? (मी ज्ञानप्रबोधिनी विषयी ऐकून आहे त्यात नेमके काय करतात??)
सौंदर्य आणणे याचा माझ्या मते अर्थ इतरांनी मनाने स्थिर असणे असा आहे. त्याकरता श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त करावा. काही ठिकाणी गरुड पुराण वाचतात (वैकल्पिक).
४) पुढे अस्थी राख विसर्जन करणे ह्यात "युझर मॅन्युअल" काय सांगते?
दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसर्‍या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी अस्थी गोळा करणे अधिक चांगले असते. दहा दिवसांनंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास तीर्थश्राद्ध करून विसर्जन करावे.
५) हिंदू लोक दफन करतात का आणि हो असेल तर कसे केव्हा ??
३ वर्षाखालील बालकाचा मृतदेह कोणतेही अंत्यसंस्कार न करता पुरला तरी चालतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 01/28/2020 - 09:45 नवीन
मनापासून धन्यवाद हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सौन्दर्य Mon, 01/27/2020 - 21:19 नवीन
खूपच चांगला धागा काढला आहे. अंत्यविधीच्या वेळेस अगदी जवळचे नातेवाईक, मित्र परिवार दुःखी असला तरी आलेली अनेक मंडळी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आढळतात. गावाकडील रीतिरिवाज हे बहुतेक समान असतील असे वाटते पण शहरात मात्र त्याची एकच सरमिसळ झालेली आढळते. क्रिया करवणारे गुरुजी (ह्यांना काही वेगळे संबोधन आहे का ? जसे किरवंत ?) ज्या समाजाचे असतील त्या त्या समाजाच्या प्रथेप्रमाणे विधी केले जातात. मग अनेक वेळी काही वयस्कर व जाणकार ( ?) मंडळी 'आमच्यात असे करतात" म्हणून त्यात फाटे फोडतात. गरमागरमी होते, व शेवटी क्रिया मार्गी लागते. क्षमा करा, इथे एक गमतीदायक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमच्या सोसायटीत एका गुजराथी गृहस्थाचे देहावसान झाले. सोसायटीतील आम्ही मुले सर्व तयारीला लागलो. तिरडी बांधणे, मडके आणून त्यात निखारे घालणे, फुले, हार आणणे वगैरे. एका गुरुजींना पण आणले. शेवटी खांदा देताना त्या गृहस्थाचा मुलगा व आम्ही इतर तीन मित्र ह्यांनी तिरडी उचलली. 'जय राम श्रीराम' म्हणत स्मशानाच्या दारात पोहोचलो. वाटेत अनेक खांदेपालट झाले होते. स्मशानाच्या दारात गुरुजींनी फर्मान सोडले कि ज्यांनी सर्वप्रथम खांदा दिला होता त्यांनी पुढे येऊन पुन्हा तिरडीला खांदा द्यावा. बहुतेक सगळे मित्रच असल्यामुळे ते सगळे अंत्यविधीच्या तयारीत गुंतले होते त्यांना शोधून आणून एकत्र केले गेले त्यात जवळजवळ वीस एक मिनिटे गेली. तोपर्यंत ज्यांनी तिरडीला खांदा दिला होता ते तहानेने व्याकुळ झाले होते, दुपारचे रणरणते ऊन, घामाने थबथबलेले, (पुन्हा पाणी प्यायचे नाही, पायात चपला घालायच्या नाहीत वगैरे कायदे) पायात चपला नसल्याने जमिनीवरचे खडे बोचत होते, वरचे वजन वाढत हॊते, त्यांना अगदी नको जीव झाला होता. त्यात ते सर्व प्रथमचे चार खांदेकरी जमा केल्यावर गुरुजींनी पुन्हा फर्मान सोडले, "जे पुढच्या बाजूला होते त्यांनी मागच्या बाजूला जा, व शेवटच्या खांदेकरयांनी ह्या खांदेकरयांच्या पायाखाली एक एक खडा किंवा दगड ठेवावा" मग पुन्हा कोण पुढे होते कोण मागे ह्यावरून रण माजले. लोकं कासावीस, काही तापली, काही पेटली, काहींनी 'घेतली' होती ते हमरीतुमरीवर आले. शेवटी गुद्दागुद्दीवर पाळी आली आणि शेवटी काही शहाण्यासुरत्यांनी मध्यस्ती केली, गुरुजींना समजावले व शेवटी त्या अंत्ययात्रेने स्मशानात प्रवेश केला. पुढे अजून काही काही घडले पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 01/28/2020 - 05:21 नवीन
खरे तर कोणतेही धार्मिक संस्कार तीन कारणांसाठी केले जातात . १. अनमिक शक्तीविषयी भय २. आयुष्यात आलेली त्रुप्ती ३. सामाजिक रीत या तिनीही गोष्टी फाट्यावर मारायची मनसिकता ज्याच्यात असते त्याला कोणत्याही सोपस्कारास सामोरे जावे लागत नाही. धार्मिक कार्य म्हणजे काही आय सी यू मधील प्रोटोकोल व ऐक्शन फ्लो चार्ट नव्हे ! मृताला कोणताच प्रॉब्लेम नसतो असतो तो जिवंत लोकांना !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 01/28/2020 - 05:58 नवीन
मृताला कोणताच प्रॉब्लेम नसतो असतो तो जिवंत लोकांना ! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ग
गामा पैलवान Tue, 01/28/2020 - 08:50 नवीन
चौकटराजा, माझ्या मते अंत्यसंस्कार हे मृतासाठी करायचे असतात. त्याला गती मिळावी म्हणून. त्यामुळे इतर कोणत्याही उपायाने गती मिळणार असेल तर अंत्यसंस्कारांना फाटा द्य्द्यला हरकत नाही. मात्र पर्यायी मार्ग लागू असणाऱ्या मृतांची संख्या नगण्य आहे.त्यामुळे सर्वसामान्य मृतांसाठी अंत्यसंस्कार करावेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 01/28/2020 - 15:47 नवीन
त्याच्या गतिची काळजी नसते ...आपल्यावर वा पुढच्या वंशावर त्या अतृप्त आत्म्याची छाया पडू नाही अशी भितीयुक्त ( काल्पनिक ) भावना मनात असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 01/28/2020 - 17:59 नवीन
चौकटराजा, तुम्ही जी भीतीयुक्त भावना म्हणता ती उत्पन्न न होण्यालाच सामान्य लोकं गती मिळणे म्हणतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कानडाऊ योगेशु Tue, 01/28/2020 - 07:44 नवीन
तुम्ही आतापावेतो जसे वागत आला आहात तश्याच पध्दतीने अंत्यकर्म केले तर पुढे त्रास होणार नाही. म्हणजे पापभीरु असाल तर जी कर्मकांडे करायची आहेत ती करुन मोकळे व्हा. जर लिबरल असाल तर त्यानुसार भूमिका घ्या. ह्याबाबतीत एकदा का विधी झाले तर पुन्हा यु टर्न नाही.उगाच नंतर रूखरूख लागुन राहते कि अमुक केले तर बरे झाले असते वगैरे विचार करुन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/28/2020 - 14:27 नवीन
स्वतःचे मृत्यू नंतरचे धार्मिक विधी स्वतःच करवून घ्यायचे. जे जे डोंबिवली येथे ते ते अखिल ब्रम्हांडात ....
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/28/2020 - 16:37 नवीन
अंधश्रद्धा वगैरे होती पूर्वी म्हणून तरी पिरामिड, ममी झाले आणि इजिप्तचा इतिहास कळला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/29/2020 - 14:39 नवीन
एक वेगळा विचार-- अंत्यविधी हे त्या माणसाच्या आयुष्याची समाप्ती झाली हे स्वीकार करण्यासाठी असावेत. लष्करात / नौदलात असताना असंख्य मृत्यू पाहिले किंवा माणूस बेपत्ता झालेला पाहिला आहे. उदा. गोव्यात असताना एक हेलिकॉप्टर समुद्राच्या पाण्यात कोसळले आणि त्यातील असलेले दोन वैमानिकांच्या मृतदेहांचा ठाव ठिकाण लागला नाही. दोन्ही वैमानिकांच्या बायकांनी आपला नवरा जिवंतच आहे अशी भूमिका घेतली होती. त्यापैकी एकीला एका ज्योतिषाने सांगितले होते कि तुमचा नवरा कुठल्या तरी किनाऱ्याला लागला आहे आणि तिथे बेशुद्ध आहे काही दिवसांनी शुदधीवर आला कि घरी परत येईल. बोटी, पाणबुडे आणि शोध पथके याना ४८ तासांनी काही आतडी आणि एक मूत्रपिंड फक्त पाण्यावर तरंगताना आढळले. जोवर सैनिकाच्या जवळच्या नातेवाईकांनी आपला नातेवाईक मृत पावला आहे हे स्वीकारले नाही तोवर missing in action म्हणून ७ वर्षे थांबावे लागते. तोवर पत्नीला अर्धा पगार दिला जातो आणि सात वर्षेनंतर missing in action presumed dead म्हणू मृत झाला आहे असे स्वीकारले जाते आणि सर्व विम्याचे पैसे, संतोष फंड, सुटीचा पगार इ रोकड मिळते आणि निवृत्तीवेतन चालू होते. जर त्या स्त्रीने मृतदेहावर अंत्य संस्कार न करता नवरा परत येणार आहे म्हणून मृत्युपत्रावर सही करण्यास नकार दिला तर वरील परिस्थिती उद्भवते. यास्तव जे काही हातास लागेल त्यावर अंत्यसंस्कार केले जातात वरील स्थितीमध्ये दोन्ही वैमानिकांच्या वडिलांना गोव्यत बोलावून दोघांची डी एन ए चाचणी केली आणि मिळालेल्या आतडी आणि मूत्रपिंड याबरोबर वडिलांचे जुळवले असता ती डी एन ए या वरील स्त्रीच्या सासऱ्यांशी जुळली. त्यामुळे आतडी आणि मूत्रपिंड पाण्यावर तरंगत असलेला माणूस जिवंत राहणे शक्य नाही हे तिने अत्यंत निराश मानाने आणि नाईलाजाने मान्य केले आणि या प्रकरणावर पडदा पडला. २०० २ च्या आय एल ३८ च्या विमान अपघातात १७ नौसैनिक मृत्यू मुखी पडले त्यांचे पार्थिव म्हणजे केवळ जळलेले माणसाचे अवयव किंवा मांसाचे गोळे होते. ते केवळ पिशव्यात भरुन तसेच नातेवाईकांना दाखवण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण अशांच्या बायका आपला नवरा गेला आहे हे सहजासहजी स्वीकारत नाहीत अशा वेळेस हे सर्व कर्मकांड कामास येते. अर्थात सर्व कर्मकांड केलेच पाहिजेत असे मुळीच नाही. परंतु थोडे फार कर्मकांड हे अतिशय जवळच्या माणसाना( त्यांचे दिवसवर सगळं व्यवस्थित केलं) याची मानसिक शांतता देते हेही तितकेच खरे आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा