तिरुपती दर्शन (पूर्वतयारी) भाग १

नमस्कार मंडळी,
तिरुपती दर्शनासाठी ५ मार्च ला जाण्याचा मुहूर्त काढला आहे. यापूर्वी तिरुपती पहिले नसल्यामुळे जाण्याची प्रचंड उस्तुकता आहे. त्यातही कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत जात असल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. तयारी तर झाली आहे, बँग पाठीला बांधून निघण्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पाहत आहे. जाणकार मंडळींकडून काही सूचना, इतर काही पाहण्याची ठिकाणे, आलेले अनुभव इत्यादी चे स्वागतच आहे.
त्याचे झाले असे की, मागच्या महिन्यात एका मित्राच्या लग्नामध्ये आमची कॉलेज मधील काही मित्रमंडळी भेटली. गप्पाच्या ओघात एकत्र कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत पक्का केला. तसे तर कॉलेजला असताना गोव्याला जाण्याचा प्लान आखला होता, मात्र तो फिसकटला. असो, त्याप्रमाणे येत्या रविवारी भेटून कार्यक्रम ठरवू असे पक्के केले. त्याप्रमाणे रविवारी आम्ही भेटलो आणी जायचे कसे यावर बराच खल केला. एकाने सुचविले की आपण विमानाने जावू, त्यावर दुसर्याने सुचविले की तेवढ्या पैशात गाडी करून जाऊ म्हणजे एखाद ठिकाण जास्तीचे पाहण्यात येईल. एकजण म्हणाला गाडीने गेलो तर दिवस खूप लागतील त्यापेक्षा रेल्वेने जाऊ वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. आम्ही सर्वांनी त्याला होकार दिला व रेल्वेने जाण्याबाबत एकमत केले. त्यातल्या त्यात उन्हाळा सुरु होत असल्यामुळे रेल्वेचे थर्ड AC चे तिकीट काढावे असे ठरले. त्याप्रमाणे रेल्वेने जाणे-येणे, राहण्यासाठी रूम बुकिंग,आणी दर्शनासाठी पास बुक करणे यासाठी प्रत्येकी पाच एक हजार खर्चाचे अंदाजपत्रक काढले. त्याप्रमाणे सगळ्यांनी पाच -पाच हजार रुपये गोळा करण्याचे ठरविले. तसे मला online व्यवहाराचा थोडाफार अनुभव असल्यामुळे सर्व बुकिंग करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपिवली. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनी बहुमताने त्यांचा म्होरक्या म्हणून माझी नेमणूक केली.
तिरुपती सहल पूर्ण होईपर्यंत कोणाला काही सूचना, माहिती देता यावी यासाठी whats app वर आम्ही सहा मित्रांचा एक temporary ग्रुप केला. पाच मार्च ला जाण्याचे आणि सात मार्च चे परतीचे रेल्वे चे तिकीट बुक केले. तसेच विशेष दर्शनाचे रू 300 चे पास देखील बुक केले. तिरुपती देवस्थान च्या संकेतस्थळावर रूम available दाखवत नसल्यामुळे तिथे जाऊन काहीतरी सोय करू असा विचार केला.
जाण्यायेण्याची तयारी तर झाली होती.
पुढचा टप्पा तसा अवघड होता. तो म्हणजे गृहमंत्र्याच्या परवानगीचा., आम्ही मित्रांनी तिरुपतीला जाण्याचे बुकिंग केले म्हणल्यावर "आता मला काय विचारता" असा उद्गीव्न प्रश्न माझ्या पत्नीने विचारला. "मग कसं करू" हा पुढील प्रश्न मी विचारताच "बघू" असे म्हणत तिने तिचा निर्णय राखून ठेवला. काहीही झाले तरी जायचेच आता माघार नाही या माझ्या निर्णयावर मी ठाम होतो. त्यानंतर दोन दिवस घरात मला प्रचंड शांतता जाणवत होती. माझ्या कपड्यांची packing करण्यासाठी मी एक छोटी bag शोधत होतो. समोरच माझी पत्नी थांबली होती.
"येताना तुला काय आणू ?" असा भोळा प्रश्न मी विचारताच तिने माळ्यावरील एक बऱ्यापैकी मोठी bag माझ्यासमोर आणून आदळली.
"काही दिसले तर घेवून या" असे म्हणत तिने माझ्यापुढे सरकविलेली bag मला "काय दिसेल ते घेवून या" असा अप्रत्यक्ष इशारा देत होती. हुश्श ! काही का असेना परवानगी मिळाली, माझा जीव भांड्यात पडला. बाजूलाच थांबलेल्या माझ्या लहान मुलीने "पप्पा मला मोठ्ठी डॉल घेवून या" असे म्हणत ती आणण्याचे वचन माझ्या कडून घेतले.
एकंदरीत सर्व बुकिंग आणी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यामुळे तशी काही अडचण नव्हती. आता फक्त सामानाची packing करण्याचे राहिले होते. तसेतर प्रवासात फार कमी समान सोबत रहावे यावर माझा भर असतो. स्नान केल्यानंतर बदलावयाचे कपडे , टॉवेल, टूथब्रश इतकेच साहित्य सोबत घेतले आहे. बाकी पावडर,पेस्ट,खोबरेल तेल,शाम्पू, deo, face wash, साबण इत्यादी साहित्य आणण्याची जबाबदारी आमच्या ग्रुप मधील एकावर ढकलण्यात आली.
प्रवासाच्या दिवशी दुपारी जेवणाची जबाबदारी एकाने आनंदाने उचलली. घरून हुरडा, कांद्याचे धपाटे,मिरचीचा खर्डा, दही, शेंगाची आणि खोबऱ्याची चटणी असा फक्कड मेनू त्याने नुकताच आमच्या whats app ग्रुप वर जाहीर केला. सर्वाना जबाबदाऱ्याचे समान वाटप करण्यात आले.
परिचयातील आणी शेजारील काही लोकांनी "आमचाही नमस्कार सांगा" असे म्हणत कुणी ५० ,१००,२५० रुपये माझ्याकडे जमा केले. "येताना आमच्याकरता प्रसादाचा लाडू घेवून या" अशी तीन वेळेस "री" ओढून सांगितले. साधारण ९ लोकांचे नमस्कार सांगावयाचे असल्यामुळे आणि प्रवासाला जाण्यास अजून काही दिवस असल्यामुळे नमस्कार सांगायच्या व्यक्तींची मी एक यादीच बनवून टाकली.
असो, तयारी तर झाली आहे. packing देखील झाली आहे. चला तर मग ,आल्यावर भेटूच. आणी हो तुमचा देखील नमस्कार सांगायचा असेल तर नक्की सांगा.

मलाही तिरुपति (आणि परिसर) काय आहे हे पाहायचे आहेच.
एक सोपानमार्ग आहे तो ट्रेकिंगसाठी आहे. रेणीगुंठा ते तिरुपति -सोपानमार्ग फ्री बस असतात असं कळलं. तिथून पायी चढून वरती तिरुमला येथे जायचं. फ्री चोल्ट्री (धर्मशाळा )वरतीच आहेत. तुमच्यापैकी कुणी तसे गेल्यास माहिती मिळेल.
तिरुमला'चे (तिरुमलै = श्रीचा पर्वत) बालाजी मंदिर होण्या अगोदर ते वराहावतारक्षेत्र म्हणून मानलं होतं. त्याचं देऊळ आहे व ते दर्शन प्रथम घ्यावं लागतं.
बाकी परिसराची वन डे टुअरही असते.
-------
जाण्यापूर्वी लेखाला सुरुवात केली ते आवडलं. " आम्ही जाऊन येतो, मग पुन्हा आपण जाऊ तेव्हा सर्व पटापट दाखवेन" हे सांगून टाका म्हणजे तुमची ट्रिप आनंदाची होईल.
तिथे जाण्यासाठी योग्य काळ म्हणजे दसरा ते दिवाळीच्या दरम्यान असे एकाने सांगितले.

अर्थातच ! , जाऊन आल्यावर नक्की अनुभव share करीन. आपण केलेल्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार.

तिरुपतीस आमचाही नमस्कार सांगावा. बाकी संबंधीत शब्द व्युत्पत्ती जिज्ञासूंसाठी आमचा एक अनुषंगिक चर्चा धागा आहे याची या निमीत्ते जाहीरात करुन घेतो.

मी तिरुपती ला दरवर्षी जातो त्यामुळे काही गोष्टी सांगू शकतो.
१. दर्शनाचा क्रम खाली तिरुपती दर्शन. नंतर तिरुमला साठी पायी जा १३ किलोमीटर रस्ता आहे . सर्व सोयी आहेत आणि चलत गेल्या मुळे दर्शन लवकर होते. नंतर वराह स्वामी चे दर्शन घ्या. नंतर मुख्य मंदिर दर्शन आणि येताना पद्मावती देवी चे दर्शन घ्या.
२. खाली आणि वरी TTD चे रूम्स भेटतात. लाईन मध्ये लागा.
३. वरी अन्न छत्रा मध्ये जेवण घ्या खूप सुंदर असते.
काही मदत लगेल तर सांगा.

आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे रूम मिळण्याबाबत चिंता मिटली. बाकी चालत जाण्याबाबत अजून तरी आमच्यात एकमत झाले नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे अन्नछत्रामध्ये नक्की प्रसाद घेऊ. एका व्यक्तीस किती लाडू मिळतात किंवा ते हवे तितके विकत घेता येतात का? याबाबत काही माहिती द्यावी . प्रतिसादाबद्द्ल खूप खूप धन्यवाद !

300 रूपये वालं तिकीट आहे त्यावर 4 लाडु फ्री भेटतील आणि त्या व्यतिरिक्त 25 रु ला एक या प्रमाणे हवे तेवढे लाडु भेटतील. वेळ असेल तर श्रीकाल हस्ती मंदिरात जा. तिरुपती पासुन 40 किमी अंतरावर आहे. मंदिर खुप सुंदर आहे.
#रेल्वे ने जाणार आहात तर रेनिगूंटा / तिरुपती पासुन बस नेच जा. खासगी गाडी ने गेला तर चेकपोस्ट ला जास्त वेळ लागतो.

श्रीकाल हस्ती मंदिरात जा. तिरुपती पासुन 40 किमी अंतरावर आहे. मंदिर खुप सुंदर आहे.

+१
मला हे मन्दिराचे वास्तूशिल्पकला खुपच आवडले. अजिबात गर्दी नसल्यामुळे खुप शांतनिवांत वाटले तो अनुभव विसरू शकत नाही.
इतरांसारखा मी देखील ५-६ तासांची उपसहलीमध्ये भेट दिली, वेळ पुरला नाही.
(स्वर्णमुखी नदीच्या काठावर वसलेलं, कालहस्तीश्वर हे मुलत: शिवमंदिर आहे, पण हे राहू-केतु पूजा व शांति या साठी खुप प्रसिद्ध आहे.
आमचं आणि ज्योतिष, ग्रह, पूजा, शांती असल्या प्रकाराशी जमत नसल्यामुळे अर्थात राहू-केतुना दुरूनच नमस्कार केला. )

वास्तुशिल्पकला तर निव्वळ अप्रतिम आहे पण आम्ही गेलो त्यावेळी उत्सवा निमित्त ढोल वादन बघितलं आणि अक्षरशः न विसरता येणारा अनुभव भेटला. दोरीच्या टोकाला गोल आकारात कपडा बांधलेला आणि दोरी गोल गोल फिरवत बरोबर आरती च्या ठोक्यावर वादन करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ढोल एकच आणि वादक तीन. न चुकता, न थांबता, गुंतागुंत न करता अचुक वादन करत होते. आम्ही कमीत कमी एक तास पाहत होतो. असं वादन त्या व्यतिरिक्त इतर कुठेही मी तरी नाही बघितलं.

" कला बघायची, ज्योतिष, ग्रह, पूजा, शांती दूर ठेवायची"
आपुन भी ऐसाच सोचतंय .. फिर वो मंदिर या मस्जिद या येशू का घर ...कि फ़रक पेंदा! हा पण मस्जिदीती जाणारे आमच्या देवळात मातर कंदीबी फिरकत नाहीत... त्यास्नी पाप लागतं म्हणे .. आमचं द्रीष्टीने कोणीच काफिर नसतो .. पण अफसोस ची बात भाई लोग हि कि त्यांच्या दृष्टीने "सगळेच उरलेले काफिर असतात !!! किती दिस आपण अफसोस करत बसणार ... हे प्रभू सोडावं रे एकदा

माझ्याकडे तिरुपति तिरुमलाची २०१४ ची डायरी आहे. त्यात काही माहिती दिली आहे ती देवस्थान साईटवर नाही.

दुसऱ्या एका By Walk To Tirumala, Alipiri mettu ..... site वर पायऱ्या चढून जाण्याची माहिती आहे.

खूपच उपयुक्त माहिती आहे. पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांसाठी निश्चितच मार्गदर्शक, खूप खूप धन्यवाद !

तुम्ही पहिल्यांदा जात आहात तर रेणीगुंठा पासून बसनेच जा. तिरूमलामध्ये आधी राहण्याचे बुकींग झाले असते तर बरे झाले असते. वर सर्व देवस्थानाचं असत म्हणजे सर्व भक्तनिवास वगैरे. आता वर जाऊन आधी रूम शोधण्यापासून सुरवात करावी लागेल. बाकी दर्शन झाल्यावर वर काही ठिकाण आहेत जी पाहण्यास जाऊ शकता. वरती देवस्थानाच्या बसेस असतात ज्या मोफत आहेत. पण एखादी खाजगी जीप केलीत तर तो साधारण तीन तासात सर्व ठिकाण फिरवून आणतो.
तुम्ही कोणत्या ट्रेनने जाणार आणि परतीची ट्रेन कोणती ते लिहिले नाही. कारण तुम्ही पाच मार्च जाण्याची आणि सात मार्च तिथून निघण्याची तारीख लिहिली आहे. त्यामुळे बहुतेक तुम्हाला इतर जास्त काही पाहता येणार नाही अशी मला शक्यता वाटतेय.

आम्ही ६ मार्च ला सकाळी सहा वाजता तिरुपती येथे पोहचणार आहोत आणी परतीची गाडी ७ मार्च ला रात्री पावणे ११ वाजता आहे. त्यामुळे पूर्ण दोन दिवस हातात आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करू. प्रतिसादाबद्द्ल खूप खूप आभार !

तिरुपति तिरुमला डायरी २०१४ मधली माहिती scanned pdf, 52 MB .26 pages.

रेट्स बदलले असतील पण बाकी सोयी तपासता येतील.
(( देवस्थानाने भाविकांच्या माहितीसाठीच दिले असल्याने कॉपीराइट नसावे.))

तिरुपति(खाली ) येथे इस्कोन टेंम्पल ,गोविंद राजलू ,कोदंड स्वामी , कपिलेश्वर अशी मंदिरे आहे ती तुम्ही रिक्षा ७०० ८०० rs करून बघू शकता वेळ अर्धा दिवस
ह्यामध्ये पद्मावती ला कसे करतंय बघा त्याला रिक्षा ने गेले १०० रुपये.
वरती जाताना तिरुमला येथे तिरुपती मंदिर आहे :) कळली का गोची ?
तर वरती जाताना आपल्याला ट्रॅक्स ७०० ८०० करताना वाटे तेली बरीच मंदिर दाखवत ,परवडते वेळ लागतो अर्धा दिवस
हि वेळ तुमच्या पास ची वेळ बघून ठरावा .
तीन दिवस हवेत एवढे सगळे बघायला
नॅशनल पार्क पण आहे .
कलाहस्ती एका दिवस लागतो तिचे बस ने जा तिथे प्रत्येक जण पूजा करू शकतात ५०० मिनिमम छान आहे मंदिर
वेळ विचारून घेणे
प्रत्येक ठिकाणी रांग आहे .

सहा मार्च ला दुपारी १ वाजताचा दर्शन पास आहे. त्यामुळे बहुतेक त्यादिवशी इतर काही ठिकाणे पाहता येतील किंवा नाही याबाबत शंका आहे. बाकी सात मार्चचा दिवस इतर दर्शनाकरिता राखीव ठेवला आहे. प्रतिसादाबद्द्ल खूप खूप आभार !

१५ वर्षापूर्वी असेच मित्र मैत्रिणी व त्यातील काहींचे पालक असे ग्रुपने गेलो होतो. त्यातील एक दरवर्षी तिरुपतीला जायचा त्यानेच सर्व सोय केलेली असल्याने मस्त सहल झाली. हरिप्रिया एक्सप्रेसने. तिरुपतीचे दर्शन घेतले की महालक्ष्मीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे त्यामुळे शेवटी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन यात्रा पूर्ण केली. आल्यावर प्रवासवर्णन नक्की टाका. शुभेच्छा