आजारांच्या जागतिक साथी
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......
१. इ.स. १३४६ -५३
प्लेग अर्थात काळ्या मृत्यूची महासाथ
हा आजार Yersinia pestis या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू निसर्गतः उंदीर आणि तत्सम प्राण्यांत आढळतो. उंदरांना विशिष्ट पिसवा चावत असतात आणि त्याच या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. मुळात अशी रोगट पिसू उंदीर आणि माणूस या दोघानाही चावते. या मानवी आजारात शरीरातील लिम्फग्रंथी मोठाल्या सुजतात, त्यांच्यात रक्तस्त्राव होतो आणि मग त्या मरतात. पुढे संपूर्ण शरीरात विषबाधा होते, अंगावर काळेनिळे चट्टे पडतात आणि अखेर रुग्ण दगावतो.
या साथीचा उगम आशियात झाला आणि मग ती फैलावली. त्याकाळी जागतिक दळणवळण आणि व्यापार समुद्रमार्गे असायचे. त्यामुळे विविध जहाजे आणि बंदरांवर उंदीर आणि त्यांना चावणाऱ्या पिसवा खूप पैदा होत. तसेच बंदराच्या मर्यादित जागेत मानवी समूह दाटीवाटीने वावरत. हे घटक या जागतिक साथीस कारणीभूत ठरले. या महासाथीत सुमारे १५ कोटी माणसे मृत्यू पावली.
२. इ.स. १८५२- ६०
कॉलराची महासाथ
हा आजार Vibrio cholerae या जिवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार दूषित पाण्यातून होतो. हा आजार झालेल्या माणसाच्या विष्ठेतून हे जंतू समाजात पसरतात. घनदाट लोकसंख्या, सांडपाण्याची गलीच्छ व्यवस्था, दुष्काळी व युद्धकालीन परिस्थिती या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही महासाथ फैलावली. कॉलरा झालेल्या रुग्णास प्रचंड जुलाब होऊन त्याच्या शरीरातील पाणी संपुष्टात येते. परिणामी मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत जगात या आजाराच्या ६ मोठ्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी ही तिसरी साथ होती. तिचा उगम भारतात गंगा नदीच्या पट्ट्यात झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
३. इ.स. १८८९-९०
फ्लूची महासाथ
या आजाराचे पूर्ण नाव ‘इन्फ्लूएन्झा’ असे आहे. तो एका विषाणूमुळे होतो आणि त्या विषाणूचे बरेच प्रकार असतात. ही साथ ‘‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N8) या प्रकारामुळे आली होती. या आजारात सुरवातीस ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसतात. पण आजार बळावला की श्वसन, हृदयक्रिया, मेंदूकार्य आणि स्नायू या सर्वांवर गंभीर परिणाम होतात.
या साथीचा उगम आशियात झाला असा समज होता. परंतु, संशोधनानंतर वेगळी माहिती मिळाली. या आजाराची सुरवात जगात एकदम ३ ठिकाणी झाली – तुर्कस्तान, क्यानडा आणि ग्रीनलंड. या सुमारास जगभरात शहरे लोकसंख्येने फुगू लागली होती. त्यामुळे या आजाराचा फैलाव वेगाने झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
४. इ.स. १९१०-११
कॉलराची महासाथ
हिचा उगम भारतात झाला आणि पुढे ती फैलावली. एव्हाना आरोग्यसुविधांमध्ये बरीच सुधारणा झालेली होती. त्यामुळे ही साथ तशी लवकर आटोक्यात आली. यावेळी सुमारे १ लाख लोक दगावले.
५. इ.स. १९१८
फ्लूची महासाथ
पुन्हा एकदा ‘इन्फ्लूएन्झा’ विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. याखेपेस जगातील सुमारे १/३ लोक याने बाधित झाले होते. त्यापैकी सुमारे १५% मृत्युमुखी पडले. या साथीचे एक वैशिष्ट्य दखलपात्र आहे. यापूर्वी अशा साथींत बहुतांश लहान मुले, वृद्ध आणि दुबळे लोक आजारास बळी पडत. पण यावेळेस पूर्ण उलटे चित्र दिसून आले. बहुसंख्य रुग्ण हे तरुण आणि धडधाकट असे होते.
६. इ.स. १९५६-५८
आशियाई फ्लूची महासाथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H2N2) मुळे आली. तिचा उगम चीनमध्ये झाला. मृत्यूसंख्या सुमारे २० लाख.
७. १९५८
हाँगकाँग फ्लूची साथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N2) मुळे आली. तशी ती लवकर आटोक्यात आली. तरीसुद्धा त्यात १० लाख लोक मरण पावले. त्यापैकी निम्मे लोक हे हाँगकाँगचे रहिवासी होते.
आतापर्यंतच्या फ्लूच्या ४ साथी पाहता एक लक्षात येईल. ‘इन्फ्लूएन्झा’ या विषाणूचे विविध उपप्रकार हे आजार घडवत असतात. साधारणपणे एखाद्या साथीदरम्यान नवीन औषधे आणि लसींचा शोध लागतो. त्यातून विषाणूच्या एका प्रकाराचा मुकाबला करता येतो. आता माणसाला वाटते की आपण त्या जन्तूवर विजय मिळवला. पण तसे नसते. जंतूपण हुशार असतात ! ते उत्क्रांत होतात आणि त्यांची नवी प्रजाती आपल्या पूर्वीच्या औषधांना पुरून उरते.
८. २००५- २०१२
एड्सची महासाथ
हा आजार HIV या विषाणूने होतो. त्याचा प्रथम शोध १९७६मध्ये आफ्रिकेतील कोंगोमध्ये लागला. १९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. वरील काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती. आजपर्यंत या आजाराने ३.६ कोटी लोक मृत्यू पावले आहेत.
आजच्या घडीला या आजारावरील अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे.
वरील जागतिक साथींच्यानंतर काही काळ ‘एबोला’ या विषाणूने धुमाकूळ घातला होता. पण आज तरी तो आजार पश्चिम आफ्रिकेपुरता मर्यादित झाला आहे.
...........
आणि लोकहो,
सध्या चालू असलेली ‘करोना’ची जागतिक साथ आपण अनुभवत आहोत. प्रगत वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे आपण आता ही साथ लवकर आटोक्यात आणू शकू असे वाटते. या साथीसंबंधी विपुल लेखन या संस्थळासह अनेक माध्यमांतून झालेले आहे. म्हणून पुनरुक्ती टाळतो.
या साथीत ....
जे मरण पावले आहेत, त्यांना आदरांजली,
जे आजारी आहेत, त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा,
आणि
ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह समारोप करतो.
**********************************************
१९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. २००५- २०१२ या काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती.आपण "मोठी साथ" बघतोय लेखात, निव्वळ आजाराचा शोध नाही.