तदेव लग्नम् ..
परवा एका मेंदीच्या कार्यक्रमाला गेले होते.हल्ली लग्नात हळद,मेंदी,संगीत,लग्न,खाना,रिसेप्शन,बारात (काही राहिलेले असल्यास चूभूदेघे) अशी 'इव्हेंटस् ची लांबलचक मालिका असते. लग्नाला 'इव्हेंट'म्हणायचे हे लक्षात ठेवावे लागते. त्याची एक इव्हेंट मँनेजमेंट असते. आणि ती करायला एक मॅनेजर असतो. ह्या सगळ्याचा एक बिझनेस असतो.
तर मगाशी म्हटलेल्या मेंदीच्या कार्यक्रमालाही गर्दी होती.
सगळ्याजणी खूप नटून आल्या होत्या. मुलगी जिथं बसली होती ती जागा 'डेकोरेट' केली होती. त्यासाठी खास एक बाई आली होती. तिच्या भोवती दोन मुली मेंदी काढत होत्या.
हाताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत. नंतर पायाच्या बोटापासून ते पिंढरीपर्यंत! हातापायांना मेनीक्युअर ,पेडीक्युअर झालेले होतेच. ते मेंदी काढणं सकाळी अकरापासून चाललं होतं म्हणे!आत्ता चार वाजायला आले होते. मग दोन्ही हात जायबंदी झालेल्या त्या मुलीला कुणी चहा पाजत होतं, कुणी पाणी पाजत होतं, कुणी खाणं भरवत होतं. त्या मुलीची पार्लरभेट आज संध्याकाळीच व्हायची होती. ती फेमस पार्लरवाली तेव्हाच उपलब्ध होती. तिनं केलेली हेयरस्टाईल मोडू नये म्हणून ती नवरी रात्रभर अवघडत पालथीच झोपणार होती म्हणे,असं तिथं आलेल्या एका बाईनं मला सांगितलं. त्याचवेळी संगीत गाणाऱ्या बायका नटूनथटून आल्या. त्यांनी सिनेमातली लग्नगीतं गायला सुरुवात केली. सगळेच इतके नटले होते आणि सगळं घरच विद्युत् रोषणाईनं लखलखलं होतं की मला आपण'हम आपके है कौन' सिनेमा बघायला आलो आहोत असे वाटले.
एखादा सिनेमा किंवा नाटक बोअर झालं की मी आणि माझी मैत्रीण थिएटरमधून उठून येतो. त्या मेहेंदी आणि संगीत कार्यक्रमातूनही मी यजमानीणबाईंना "महत्त्वाचं काम आहे"असं सांगून सटकले.
मला आमच्यावेळची लग्नं आठवली. वैवाहिक आयुष्याबद्दल निसंदिग्ध माहिती नसायचीच,उलट थोडी धास्तीच असायची.
त्यामुळे चेहऱ्यावर चिंताच असायची. माझ्या लग्नात पहाटे तेल लावून मला नहायला घातलेलं होतं. ब्यूटी पार्लर त्यावेळी नव्हतंच(असं मला वाटतं) त्यामुळे मेकपचा प्रश्नच नव्हता. चेहरा आणि केस तेलकट झालेले. आईवडिलांना सोडून जायचं म्हणून तोंड रडवेलं झालेलं. साड्या, शालू फारसे चमकदार,मुख्य म्हणजे 'डिझायनर' वगैरे नाहीत.
एकूणच त्यावेळी वधूच्या अंगावर दागिने मोजकेच. जनरली हुंडा, मानपान ऐपतीप्रमाणे केलेलं. (कॉलेजात वादविवाद स्पर्धेत हुंड्याविरुद्ध दिलेली त्यांची भाषणं फुकट गेलेली असायची.) रिसेप्शन वगैरे नाही. जेवणाचा मेनू ठरलेला. मसालेभात, जिलेबी, मठ्ठा, उकडलेल्या बटाट्याची भाजी, मटकी उसळ वगैरे.आग्रह व्हायचा. पैजा लावून जेवणं व्हायची.
उखाणे,नाव घेणं, "ऐकू आलं नाही, पुन्हा घे" इत्यादि ठराविक 'चेष्टा'व्हायच्या. सर्वसाधारणपणे लग्नं अशीच व्हायची.
आता नवरानवरी लग्नात एकमेकांशी गप्पा मारतात.
हास्यविनोद करतात. आमच्यावेळी म्हणजे,स्वतःच्या लग्नाला बसलेलो नसून,मुलाच्या मुंजीला बसल्यासारखे चेहऱ्यावर प्रौढ भाव असायचे.
माझ्या मागच्या पिढीत तर वडीलच मुलगा किंवा मुलगी पसंत करायचे. एकदम लग्नातच मुलगामुलगी एकमेकांना पाहायचे.
भावी काळातली लग्नं कशी असतील? मुलगामुलगी लग्न करुनच आईवडिलांना भेटायला येण्याची प्रथा हळुहळू सुरु होईल का? फक्त लग्न, पण मुलं नकोत ही संकल्पना येतेय, आलीय... ती पुढं सर्रास रुढीच होईल का? मूल दत्तक घेण्याची पद्धत वाढेल का? गर्भाशयाबाहेर मूल वाढवण्याची(आय व्ही एफच्या पुढे जाऊन पूर्णकाळ गर्भ प्रयोगशाळेतच वाढवण्याच्या तंत्राच्या शोधाची वाट स्त्रिया पाहतील का?) आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांची संख्या झपाटयाने वाढेल का? की फॉर्मल लग्नच होणार नाहीत?
'लिव्ह इन'ची संख्या बेसुमार वाढेल? दोन मुलगे किंवा दोन मुलीच लग्न करतील? किंवा तसेच राहतील? वात्सल्य ही सहजप्रेरणाच मरुन जाईल का?मुलं म्हणजे जबाबदारी, स्वातंत्र्यावर मर्यादा असं वाटेल? लोकसंख्या आपोआप नियंत्रित होईल?
काय होईल, कुणास ठाऊक! समाज बदलत असतो. परिस्थिती बदलत असते. आपण फक्त सामोरं जायचं. स्वीकार करायचा. कारण बुद्धिमान तोच असतो जो बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो. कुठल्याही परिस्थितीत तग धरतो. "जगून" दाखवितो. म्हणूनच माणूस जगावर राज्य करतोय ना!
काय होईल, कुणास ठाऊक! समाज बदलत असतो. परिस्थिती बदलत असते. आपण फक्त सामोरं जायचं. स्वीकार करायचा.हे महत्वाचंपण हे शुट आउट करण्यासाठी निदान ५०००० तरी खर्च येत असावा.ते तुम्ही कोणत्या लोकेशनला, किती दिवसांचे करताय त्यावर अवलंबून आहे. आता आम्ही Pre Wedding साठी कधी लवासा कधी अलिबाग जातो. या मार्चमध्ये उदयपूर जायचे होते पण कोरोना आड आला. असो. शिस्तबद्ध वेळ मिळाला तर त्या आठवणी अनमोल असतात. अल्बम मध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आता. जसे मॅट, मेटॅलिक, ग्लॉसी, वेल्व्हेट असे अजून बरेच प्रकार आहेत. आजी लेख छान झालाय. मराठी लग्न सुद्धा हिंदी सिनेमा टाईप होतायत. पण एक गोष्ट खटकते काही लग्नात. पार्लर ला वेळ लावतात, मिरवणुकीला वेळ लावतात. नियोजनाच्या वेळेपेक्षा तास-दीड तास लग्न उशिरा लागते. हे सगळं चालवतात. पण गुरुजींचा विधी चालू झाला कि आटपा लवकर म्हणतात. आपल्याला काय, वेळेनुसार बदलत राहायचं.