शूद्दलेकन.
"तूमचे लीखाण अतीषय आवडते.नेहमि लीहीत रहा."
मी वाक्य वाचले. वाक्याचा अर्थ समजून खरंतर आनंद व्हायला पाहिजे. पण झालं असं की, तो अर्थ मला समजलाच नाही. वाक्यांत झालेल्या 'शीद्दूलेकना'च्या चुकाच आधी डोळ्यांत आणि डोक्यात घुसल्या. वाक्य दुरुस्त करुन घेतलं. पुन्हा वाचलं तेव्हा आशय ध्यानात आला, आणि मग मनाला समाधान वाटलं.
माझं नेहमी असंच होतं. शुद्धलेखनातल्या चुका आधी दिसतात. ह्याला मुख्य कारणं दोन. एक म्हणजे लहानपणी कडवेकरसरांनी शुद्धलेखन चांगलं घटवून घेतलं. अक्षर तर सुवाच्य आणि वळणदार झालंच, पण लेखनही शुद्ध झालं. त्यांचं ऋण विसरता न येण्याजोगं. शाळेतच शुद्धलेखन आणि हस्ताक्षर घटवून घेणं अतिशय महत्त्वाचं. तेच बऱ्याचदा होत नाही. दुसरं कारण म्हणजे मी प्रेसमधे काम केलं. तिथं प्रूफकरेक्शन म्हणजेच मुद्रितशोधन करायला लागायचं. त्याकाळी खिळे जुळवून छपाई केली जायची. महामंडळाच्या व्याकरणाच्या नव्या नियमांची पुस्तिका माझ्या हाताशीच असायची. तिचा आधार घेत मी न चुकता मुद्रितशोधन करायची. त्यामुळं माझं शुद्धलेखन अधिकच बिनचूक झालं. माझ्या हातांतही जुने नियम किती नाही म्हटलं तरी बसले होते. अनेक शब्दांवर अनुस्वार द्यायची सवय झाली होती. ती काढून टाकावी लागली. गति, मति यांसारखे शब्द आता नव्या नियमाप्रमाणे दीर्घ म्हणजे गती, मती असे झाले होते. अनुच्चारित अनुस्वार आता द्यायचे नव्हते, पण झालं, गेलं, केलं यांसारख्या क्रियापदांवर आणि अनेकवचनावर ते द्यायचे होते. असं कितीतरी! पण नवे नियम लवकरच अंगवळणी पडले.
रेडीओवर काम केल्याने आधीच शुद्ध असलेले उच्चार अधिक स्पष्ट आणि शुद्ध झाले. रेडिओवर बोलण्याच्या विशिष्ट वळणानुसार ते सॉफ्टही झाले.
बऱ्याचजणांना असं वाटतं की शुद्धलेखनाचा अट्टहास करु नये. हा साहित्यक्षेत्रातल्या 'साडेतीन टक्केवाल्यांचा' काहीतरी दुराग्रह आहे. शिवाय भाषा ही लेखकाचं, वक्त्याचं 'लिहिणं' 'बोलणं' पोचविण्यासाठी आहे. कम्युनिकेट करण्यासाठी आहे. ते 'पोहोचलं'की झालं. ते शुद्धच कशाला पाहिजे? शिवाय दर पंधरा मैलांवर भाषा बदलते. ग्रामीण भाषा, शहरी भाषा असाही फरक असतो. ग्रामीण साहित्य आणि साहित्यकार यांचं योगदान फार मोठं आहे.
सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,नागपूर,पुणे,मुंब ई ह्या प्रत्येक ठिकाणची मराठीच पण ती वेगळी असते. ही भाषेची संपन्नता आहे. त्या त्या भाषेतलं शब्दांचं उच्चारण वेगळं, आपापल्या ढंगाप्रमाणं असतं. ही भाषेची विविधता हे तिचं सौंदर्यच आहे. त्याबद्दल मला अभिमानच वाटतो. तिथे शीद्दुलेकन किंवा पानी किंवा रगत किंवा रिपूट किंवा सुप्रीटण असे बोलीभाषेतले किंवा अपभ्रंश झालेले शब्द योग्यच ठरतात.
प्रश्न येतो 'प्रमाण'भाषेचा वापर होतो तेव्हा! अशा लेखनात मात्र ती शुद्धच हवी. शिक्षकानं, प्राध्यापकानं, निवेदकानं,समालोचकानं शुद्धच (प्रमाण म्हणू) आणि बिनचूक बोललं पाहिजे. प्रमाण भाषेत लिहिणाऱ्या लेखकानं नियमानुसार व शुद्धच लिहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. इंग्रजीत स्पेलिंगच्या चुका झाल्या तर आपण वैतागू ना? तसं मराठीत पण चुका झाल्या तर वैतागायला होणारच. मेंदूला वाचलेली अक्षरं "प्रोसेस" करताना काहीतरी एक नियम गृहीत धरलेले असणं सोयीचं जातं. मग ते प्रमाणीकरण कोणत्याही प्रकारे केलेलं का असेना. मला वाटतं हा मुद्दा साडेतीन टक्केवाल्यांचा म्हणून धिक्कारु नये. तसंच साडेतीन टक्केवाल्यांनीही इतरांना तुच्छ लेखू नये. आशय हा आत्मा आहे तर शुद्धलेखन हा त्याचा पेहराव आहे. त्याचं प्रसाधन आहे. 'प्रमाण' मराठीची शुद्धता जपण्याचं शिवधनुष्य सगळ्यांनी मिळून उचलूया. त्याचबरोबर भाषेच्या विविधांगी स्वरुपाचा अभिमान बाळगूया. शुद्धलेखनाचं 'शीद्दूलेकन'होण्यापासून वाचवूया.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra