Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शूद्दलेकन.

आ
आजी
Mon, 04/27/2020 - 09:45
💬 44 प्रतिसाद
"तूमचे लीखाण अतीषय आवडते.नेहमि लीहीत रहा." मी वाक्य वाचले. वाक्याचा अर्थ समजून खरंतर आनंद व्हायला पाहिजे. पण झालं असं की, तो अर्थ मला समजलाच नाही. वाक्यांत झालेल्या 'शीद्दूलेकना'च्या चुकाच आधी डोळ्यांत आणि डोक्यात घुसल्या. वाक्य दुरुस्त करुन घेतलं. पुन्हा वाचलं तेव्हा आशय ध्यानात आला, आणि मग मनाला समाधान वाटलं. माझं नेहमी असंच होतं. शुद्धलेखनातल्या चुका आधी दिसतात. ह्याला मुख्य कारणं दोन. एक म्हणजे लहानपणी कडवेकरसरांनी शुद्धलेखन चांगलं घटवून घेतलं. अक्षर तर सुवाच्य आणि वळणदार झालंच, पण लेखनही शुद्ध झालं. त्यांचं ऋण विसरता न येण्याजोगं. शाळेतच शुद्धलेखन आणि हस्ताक्षर घटवून घेणं अतिशय महत्त्वाचं. तेच बऱ्याचदा होत नाही. दुसरं कारण म्हणजे मी प्रेसमधे काम केलं. तिथं प्रूफकरेक्शन म्हणजेच मुद्रितशोधन करायला लागायचं. त्याकाळी खिळे जुळवून छपाई केली जायची. महामंडळाच्या व्याकरणाच्या नव्या नियमांची पुस्तिका माझ्या हाताशीच असायची. तिचा आधार घेत मी न चुकता मुद्रितशोधन करायची. त्यामुळं माझं शुद्धलेखन अधिकच बिनचूक झालं. माझ्या हातांतही जुने नियम किती नाही म्हटलं तरी बसले होते. अनेक शब्दांवर अनुस्वार द्यायची सवय झाली होती. ती काढून टाकावी लागली. गति, मति यांसारखे शब्द आता नव्या नियमाप्रमाणे दीर्घ म्हणजे गती, मती असे झाले होते. अनुच्चारित अनुस्वार आता द्यायचे नव्हते, पण झालं, गेलं, केलं यांसारख्या क्रियापदांवर आणि अनेकवचनावर ते द्यायचे होते. असं कितीतरी! पण नवे नियम लवकरच अंगवळणी पडले. रेडीओवर काम केल्याने आधीच शुद्ध असलेले उच्चार अधिक स्पष्ट आणि शुद्ध झाले. रेडिओवर बोलण्याच्या विशिष्ट वळणानुसार ते सॉफ्टही झाले. बऱ्याचजणांना असं वाटतं की शुद्धलेखनाचा अट्टहास करु नये. हा साहित्यक्षेत्रातल्या 'साडेतीन टक्केवाल्यांचा' काहीतरी दुराग्रह आहे. शिवाय भाषा ही लेखकाचं, वक्त्याचं 'लिहिणं' 'बोलणं' पोचविण्यासाठी आहे. कम्युनिकेट करण्यासाठी आहे. ते 'पोहोचलं'की झालं. ते शुद्धच कशाला पाहिजे? शिवाय दर पंधरा मैलांवर भाषा बदलते. ग्रामीण भाषा, शहरी भाषा असाही फरक असतो. ग्रामीण साहित्य आणि साहित्यकार यांचं योगदान फार मोठं आहे. सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,नागपूर,पुणे,मुंब ई ह्या प्रत्येक ठिकाणची मराठीच पण ती वेगळी असते. ही भाषेची संपन्नता आहे. त्या त्या भाषेतलं शब्दांचं उच्चारण वेगळं, आपापल्या ढंगाप्रमाणं असतं. ही भाषेची विविधता हे तिचं सौंदर्यच आहे. त्याबद्दल मला अभिमानच वाटतो. तिथे शीद्दुलेकन किंवा पानी किंवा रगत किंवा रिपूट किंवा सुप्रीटण असे बोलीभाषेतले किंवा अपभ्रंश झालेले शब्द योग्यच ठरतात. प्रश्न येतो 'प्रमाण'भाषेचा वापर होतो तेव्हा! अशा लेखनात मात्र ती शुद्धच हवी. शिक्षकानं, प्राध्यापकानं, निवेदकानं,समालोचकानं शुद्धच (प्रमाण म्हणू) आणि बिनचूक बोललं पाहिजे. प्रमाण भाषेत लिहिणाऱ्या लेखकानं नियमानुसार व शुद्धच लिहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. इंग्रजीत स्पेलिंगच्या चुका झाल्या तर आपण वैतागू ना? तसं मराठीत पण चुका झाल्या तर वैतागायला होणारच. मेंदूला वाचलेली अक्षरं "प्रोसेस" करताना काहीतरी एक नियम गृहीत धरलेले असणं सोयीचं जातं. मग ते प्रमाणीकरण कोणत्याही प्रकारे केलेलं का असेना. मला वाटतं हा मुद्दा साडेतीन टक्केवाल्यांचा म्हणून धिक्कारु नये. तसंच साडेतीन टक्केवाल्यांनीही इतरांना तुच्छ लेखू नये. आशय हा आत्मा आहे तर शुद्धलेखन हा त्याचा पेहराव आहे. त्याचं प्रसाधन आहे. 'प्रमाण' मराठीची शुद्धता जपण्याचं शिवधनुष्य सगळ्यांनी मिळून उचलूया. त्याचबरोबर भाषेच्या विविधांगी स्वरुपाचा अभिमान बाळगूया. शुद्धलेखनाचं 'शीद्दूलेकन'होण्यापासून वाचवूया.

प्रतिक्रिया द्या
19604 वाचन

💬 प्रतिसाद (44)
क
कंजूस Mon, 04/27/2020 - 11:01 नवीन
प्रश्न येतो 'प्रमाण'भाषेचा वापर होतो तेव्हा! अशा लेखनात मात्र ती शुद्धच हवी. शिक्षकानं, प्राध्यापकानं, निवेदकानं,समालोचकानं शुद्धच (प्रमाण म्हणू) आणि बिनचूक बोललं पाहिजे. तरीही बोली भाषा संवाद स्वरूपात घुसडणे योग्य ठरेल. अन्यथा ती हरवेल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 04/27/2020 - 11:09 नवीन
जेव्हा व्यवहारात त्या लिहिण्या बोलण्यामागील भावना शुद्ध असतात त्यावेळी हा प्रमाण भाषेचा मुद्धा गौण बनतो. नीतीन केळकर यांनी एकदा साहित्य संमेलनाच्या भाषणात बोली प्रमाण भाषा हा मुद्दा आणला होता.स्थानिक बोली कुठलीही असली तरी बातम्या देताना प्रमाण भाषा वापरली पाहिजे कारण सर्व महाराष्ट्रात एकच आशय व एकच अर्थ पोहोचला पहिजे. साहित्यिक कार्यक्रमात बोली भाषेचे आविष्कार समृद्धी देतात हे ठीक आहे. बोली भाषेत अनेक छटा संस्कार,मेंदुचा भाषेशी संबंधीत भाग, जीभेची लवचिकता,स्थानिक संस्कृतीचा पगडा वयाच्या कुठल्या टप्प्यात भाषा अवगत झाली असे अनेक मुद्दे त्या संबंधी येतील
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/27/2020 - 11:13 नवीन
शुद्धलेखन आवश्यक आहे,असे समजवणारा लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सचिन Mon, 04/27/2020 - 13:26 नवीन
या विषयाला हात घालणे आवश्यक आहे. आजकाल "राडा" वगैरे शब्द सर्रास मराठी वृत्तवाहिन्या हेडलाईनमधे वापरतात. प्रमाणभाषा व्यवस्थितपणे धाब्यावर बसवली जाते. कोणतीही वाहिनी ५ मिनिटे जरी पाहिली तरी १० चुका सापडतील.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 04/27/2020 - 13:29 नवीन
१. इंग्रजीत स्पेलिंगच्या चुका झाल्या तर आपण वैतागू ना? २. आशय हा आत्मा आहे तर शुद्धलेखन हा त्याचा पेहराव आहे. त्याचं प्रसाधन आहे बरोब्बर ! (हे बरोबर असं हवं)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/27/2020 - 13:51 नवीन
तुमच्या बहुतांश मतांशी सहमत.... शुद्धलेखन महत्वाचे आहेच.. बातम्या, निवेदिका आणि तत्सम ग्लोबल ठिकाणी भाषा / शुद्धलेखन यांची मागणी योग्यच. पण शुद्धलेखन , व्याकरण हे योग्य नसल्यास बर्याचश्या अश्या व्यक्तींना साडेतीन टक्केवाल्यांचा हा दुराग्रह आहे असे वाटते हे मला योग्य वाटत नाही. उलट असा गैरसमज तुम्ही पहिला मनातुन काढला पाहिजे. उलट ज्यांची लिखानात भाषा शुद्ध असते त्या लोकांचा हेवाच वाटत असतो अश्या अशुद्ध लिहिणार्‍या लोकांना. जाती पाती वर काही नसते..शुद्धलेखनाचा आग्रह कोणीही करु शकते, शाळेतले शिक्षक पण करायचेच.. मी स्वता खुप अशुद्ध लिहितो, कदाचीत खेडेगावात झेडपीला शिकलो असल्याने आणि तेंव्हा घरात कोणी जास्त शिकलेले नसल्याने कोणी माझ्याकडे लक्ष दिले नसेल... पण भाषा शुद्ध नसल्यास त्याने व्यक्त होऊच नये काय ? समजा ज्याची भाषा शुद्ध आहे, पण गणित कच्चे आहे, त्याने फायनान्स आणि आकडेमोड करुच नये असे कोणी म्हणते का ? एखादा भाषेत हुशार असतो .. एखादा गणितात.. एखादा इतिहासात... पण कश्यात ही विशारद असला तरी त्याला व्यक्त व्हायला भाषा लागते, मग एखादा गणितातला माणुस त्याचे प्रमेय भाषेच्या माध्यमातुन सांगु लागला तर तुझी भाषा सुधार मग बोल असे म्हणुन चालेल काय ? असो .. त्यामुळे शुद्धलेखनाचा आग्रह हवाच, पण तो कुठे , कुठपर्यंत आणि कशासाठी हे ही महत्वाचे वाटते, आणि जात पात मग ते शिकलेले असो वा नसो मध्ये आणलीच नाही पाहिजे, तो जी मध्ये आणातो त्याच्याच मनात जास्त दुराग्रह असतो असे माझे स्पष्ट मत आहे.. आपल्याला शुद्धलेखनात आणि बोलण्यात शुद्ध असलेले सगळे मित्र प्रिय आहेत, आणि त्यांना पण माझा इतिहास, गणित आणि प्रोग्रॅम चा आनंदच होता.. त्यामुळे आवशकता असेल तेथे योग्य, नसेल तथे नाही..
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 04/28/2020 - 04:57 नवीन
शुद्ध भाषा ही निर्वयैक्तिक गोष्ट आहे, ज्याला आवड आहे तो निव्वळ वाचन, बोलणं आणि लेखन यातून ती विकसित करु शकतो. त्यामुळे शुद्ध भाषेवर मालकी सांगणं किंवा ज्यांच्याकडे ती आहे त्यांचा उपहास करणं दोन्हीही गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ह
हेमंतकुमार Mon, 04/27/2020 - 15:38 नवीन
लेखाशी सहमत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/27/2020 - 15:48 नवीन
सुद्दलेकन वेगळं, प्रमाणभाषा वेगळी. ------------ १) मला धा रूपे भेटले. २) फाटल्या वेळी तो म्होटी टोपली घेऊन आलता. चालतंय. पण ३) त्याच्यासोबत काय झालं ते या विडीयोत पाहा; ४) ही गोष्ट बरोबर नाही आहे; ५) माझी मदद करा. हे मराठी नाही.
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Mon, 04/27/2020 - 20:21 नवीन
अगदी बरोबर, असल्या मराठी मुळे बातम्या, मालिका बघवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
संजय क्षीरसागर Tue, 04/28/2020 - 05:08 नवीन
लेखिकेनं प्रमाण भाषा आणि तिचं लेखन या विषयी लिहीलं आहे. बोली भाषेचं लेखन तदनुसारच असणार, त्यात अशुद्धचा प्रश्न येणार नाही. मला धा रूपे द्या, मला ध्हा रुप्ये द्या, मला धा रुपे द्यावा..... यात अशुध्दचा प्रश्न नाही ! कारण ती प्रमाण भाषा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौकस२१२ Wed, 05/13/2020 - 01:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मीअपर्णा Mon, 04/27/2020 - 18:28 नवीन
सर्वप्रथम आजी, तुमचं लेखन फार आवडतं. नेहमी प्रतिक्रिया दिली गेली नसेल म्हणून हे लिहून घेते :) मला वाटतं तुमचा मुद्दा. जिथे भाषा लेखन मग ते मायाजाल किंवा पुस्तकांसाठी असेल आणि इतर ठिकाणे जसं बातम्या इ. तिथे शुद्ध असावे हा आहे तो पटला आहे. माझा ब्लॉग अगदीच बाळ असतानाच्या काळात एक पोस्ट लिहिली होती तिची लिंक द्यायचा मोह आवरत नाही.त्या पोस्टच्या प्रतिक्रियांमध्ये वादही झाले होते आणि मला वाटतं तेव्हा तर काही इतर ब्लॉगर्सना मी त्यांना उद्देशून लिहिले असा स्वतःच गैरसमजही करून घेतला असंही ऐकलं होतं. असो. त्यानंतर मी स्वतःच या विषयावर कुणाशीही बोलणे इ. बंद केले. आज ते सर्व आठवलं. http://majhiyamana.blogspot.com/2009/11/blog-post_06.html
  • Log in or register to post comments
S
Sanjay Uwach Mon, 04/27/2020 - 19:19 नवीन
आपली भाषा शुद्ध असावी किंव्हा आपले लिखाण शुद्ध असावे असे प्रत्येकाला निश्चितच वाटते, मात्र आपण जे लिहतो किंव्हा बोलतो हे शुद्ध आहे कि अशुद्ध आहे हे कदाचित लक्षात येत नाही . याला तशी कारणे हि आनेक आहेत . मुळ बोली भाषा ,इंग्रजी शिक्षणाचा परिणामी किंव्हा आपण लिहलेला शब्द बरोबर आहे कि नाही हे तपासण्यास लागणारी कोणतीही सुलभ सुविधा नसणे . आपण एकादा लिहीलेला शब्द मनांत बऱ्याच वेळी द्विदा उत्पन करतो . सर्वच शाळेत या गोष्टी व्यवस्थीत शिकवले जाते असे पण नाही . या साठी एक सॉफ्टवेअर आहे व ते मी वापरतो असे कुणीतरी मिपाच्या लेखात म्हंटले होते . आजी खरोखरच भाग्यवान म्हणाव्या लागतील कि त्यांना छापखान्यात ,रेडिओ केंद्रात याचे प्रशिक्षण मिळाले त्या मुळे या दुर्लक्ष होणाऱ्या गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या . अशुद्ध शब्द कसा चुकीचा आहे हे कळल्यावर परत चूक होणार नाही . माझी बायको मला नेहमी म्हणते "दागिणा "म्हणू नका "दागिना " म्हणा पण मी जन्मभर दागिणा हाच शब्द ऐकला .
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 04/28/2020 - 01:45 नवीन
अक्षी बराबर हाये आज्जे तुजे सुद्दलेकन येयलाच पायजेले.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/28/2020 - 10:13 नवीन
चामुंडराय, त्यम्च्याशी सहमत आहे. तुम्ही लिहिलंय ते अप्रमाण भाषेतली शुद्ध लिपीच आहे. तेच जर : अकशी ब्राबर हाये आज्जे तुज्जे सूद्दलेकन येयालाच पैजेले. असं लिहिलं तर अशुद्ध लेखन होईल. लेखनाचा संबंध लिपीशी आहे. त्यामुळे शुद्धलेखन म्हणजे ऱ्हस्वदीर्घ यथोचित पद्धतीने लिहिलेत का इतकंच तपासणे होय. व्याकरणादि नियम व उचित शब्दयोजना या गोष्टी प्रमाणभाषेशी निगडीत आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
स
संजय क्षीरसागर Tue, 04/28/2020 - 10:43 नवीन
शुद्धलेखनाशी डायरेक्टली जोडता आलं नाही तरी भाषाशुद्धीशी संबधित आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 04/28/2020 - 14:42 नवीन
अगदी बरोबर. भाषा आणि लिपी यांच्यात रेघ कुठे मारावी इतकाच प्रश्न आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मदनबाण Tue, 04/28/2020 - 14:54 नवीन
आजी मुद्दा पटलाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 04/28/2020 - 16:21 नवीन
लेख आवडला. सर्व मतांशी सहमत.
  • Log in or register to post comments
य
योगविवेक Sat, 05/02/2020 - 17:26 नवीन
शुद्ध लेखन तपासणी करायला मराठीत काय सोय आहे?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/03/2020 - 14:28 नवीन
ही सोय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगविवेक
स
सस्नेह Sat, 05/02/2020 - 17:37 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
ब
बटाटा चिवडा Sat, 05/02/2020 - 20:35 नवीन
शुद्धलेखन मध्ये ध ला द असायला हवा की द ला ध (शुध्दलेखन)??
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 05/03/2020 - 07:17 नवीन
द ला ध. ते लिहायच्या २ पद्धती आहेत : १. द च्या पोटात ध , किंवा २. द चा पाय मोडून पुढे ध.
  • Log in or register to post comments
ब
बटाटा चिवडा गुरुवार, 05/21/2020 - 18:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ब
बटाटा चिवडा गुरुवार, 05/21/2020 - 18:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
आ
आजी Sun, 05/10/2020 - 11:28 नवीन
कंजूस-प्रमाण भाषा शुद्ध हवीच हे तुमचं मत माझ्या मताशी जुळतंय. प्रकाश घाटपांडे-तुमचं मत पटलं. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे-लेख आवडल्याचं वाचून बरं वाटलं. सचिन-वाहिन्यांवरील भाषा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कधी लिहिताय बोला. संजय क्षीरसागर-तुमचंं मत पटलं. गणेशा-शुद्धलेखनाचा दुराग्रह नको.प्रत्येकाला मार्गदर्शक लाभतोच असे नाही. हे तुमचे म्हणणे पटले. कुमार१-धन्यवाद. कंजूस-तुम्ही दिलेली उदाहरणं पटली.वाहिन्यांवर अशीच भाषा वापरतात. "माझ्या वर हसू नकोस."वगैरे. सुचिता१-एकदम सहमत. मीअपर्णा-आज हा विषय निघाला ना पण! संजय उवाच-शुद्धलेखन व शुद्ध भाषा शिकवणारा मार्गदर्शक मिळणं दुर्लभ आहे.हे तुमचे मत खरे आहे. चामुंडराय-येकदम पटलं बगा! गामा पैलवान-बरोबर आहे तुमचं. गामा पैलवान-भाषा आणि लिपी यांच्यात योग्य जागी फुली मारावी. मदनबाण-धन्यवाद. योगविवेक-शुद्धलेखनाच्या नियमांची पुस्तकं बाजारात विकत मिळतात.अगदी पॉकेट बुक्स सुद्धा. स्नेहांकिता-द् चा पाय मोडून ध. कुमार१-द् चा पाय मोडून ध लिहिणं बरोबर,पण मोबाईलवर टाईप करताना द् च्या पोटातच ध येतो. सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
ब
बटाटा चिवडा Tue, 05/12/2020 - 21:29 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Tue, 05/12/2020 - 21:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Tue, 05/12/2020 - 21:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Tue, 05/12/2020 - 21:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
स
सचिन Wed, 05/13/2020 - 08:29 नवीन
मी हे वाहिन्यांना लिहिले आहे अनेकदा. स्क्रीनच्या फोटोसहित आणि काहीवेळा वृत्तनिवेदकाचा आवाजही रेकॉर्ड करून. आजकाल अनेक वृत्तनिवेदक वा "ग्राऊंड झीरो" वाले रिपोर्टर्स "न - ण" वाले आहेत. पण काहीही फरक पडलेला नाही. असो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Wed, 05/13/2020 - 18:00 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Wed, 05/13/2020 - 18:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Wed, 05/13/2020 - 18:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
ब
बटाटा चिवडा Wed, 05/13/2020 - 18:02 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
अ
अभिबाबा Wed, 05/13/2020 - 15:52 नवीन
आजीय,लेख झकास.सगळ्या मुद्यांची पूर्ण सहमत आह। शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
अ
अभिबाबा Wed, 05/13/2020 - 15:54 नवीन
आजीय,लेख झकास.सगळ्या मुद्यांची पूर्ण सहमत आहे. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 05/13/2020 - 17:09 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 05/13/2020 - 20:14 नवीन
आजी तुमच्या लेखाशी शंभर टक्के सहमत. तुमच्या लेखात उल्लेखलेल्या व्याकरणाच्या अनेक चुका आपण दैनंदिन जिवनात करत असतो व दुर्दैवाने त्या आपल्याला एखाद्या जाणकाराने दाखवून दिल्याशिवाय कळतंही नाहीत. मी माझ्या परीने शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करतो पण कित्येक वेळा ते चूक की बरोबर हेच कळत नाही. मग अश्यावेळी मुंबईतील माझ्या काही जाणकार मित्रांची मदत घेतो. व्याकरणाच्या नियमांचे काही सोपे पुस्तक कळविल्यास मदत होईल. माझ्या मते अश्या चुका होण्याची ही काही मुख्य कारणे - १) पुस्तक वाचन कमी झाले आहे किंवा बंद झालंय. क्षमा करा, झालं आहे. (झालंय, केलंय, पाहिलंय हे शब्द बरोबर आहेत का ?) २) आसपासच्या विवीध भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे चुकीची मराठी भाषा सतत कानावर पडणे. ३) मराठी बोलणाऱ्या लोकांची शुद्ध मराठी बोलण्याचा, लिहीण्याचा आग्रह धरण्याविषयी अनास्था. ४) “समोरचा जे सांगू ईच्छितो आहे ते कळल्याशी मतलब, भाषेचा तोच ऊपयोग आहे त्यामुळे भाषा शुचिर्तेचा आग्रह धरणे चुकीचे आहे” हा पसरलेला गैरसमज. ५ ) टिव्ही, सोशल मिडीया, वृत्तपत्रे, विवीध फलक (ही यादी भरपूर लांब होईल) ह्यातील चुकीच्या मराठीमुळे चुक काय ? बरोबर काय ? हेच कळेनासे झाले आहे. ६ ) समोरची व्यक्ती चुकीचे मराठी शब्द, व्याकरण वापरत असेल तर तीला न सुधरवणे. ह्यात आपले कुटूंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी व मित्रही आले. असे न करण्यामागची अनेक कारणे आहेत. मी जवळजवळ १८ वर्षे गुजरातमध्ये काढली, व मागची दहा वर्षे ह्युस्टनमध्ये आहे. येथे फारसे मराठी बोलणारे नाहीत, मराठी पुस्तके मिळत नाहीत, ती भारतातून मागवावी लागतात व त्यांच्या वजनामुळे ती खर्चिक ठरतात. प्रदीर्घ काळ जर आपण आपली भाषा शुद्ध स्वरूपात ऐकली नाही, वाचली नाही तर त्याचा आपल्या भाषेवर वाईट परिणाम होतो हा माझा अनुभव आहे. हिंदीत विभक्ती प्रत्यय वेगळा लिहिला जातो, उदा.: हिमालय की शुभ्रता, तेच मराठीत तो जोडून लिहिला जातो, (हिमालयाची शुभ्रता). माझे कित्येक मराठी मित्र मराठीत लिहिताना हा विभक्ती प्रत्यय हिंदी सारखा वेगळा लिहितात. मी माझ्या मराठी मित्रांना, नातेवाईकांना व्हाट्सअप, ईमेल, टेक्स्ट मेसेज हे सर्व मराठीतूनच (देवनागरी लिपी) पाठवतो व त्यांनी देखील उत्तर मराठीतूनच द्यावे हा आग्रह व कित्येक वेळा हट्ट धरतो. मी ह्या सर्वाना मराठी फॉन्ट्स (अक्षरे ?) डाउनलोड करायला लावतो. जवळच्या मित्रांच्या मराठीतील चुका (माझ्यापरीने) सुधारवण्याचा प्रयत्न करतो. एखादा व्याकरणाच्या चुका असलेला मेसेज आला तर तो शुद्ध करूनच पुढे पाठवतो. तेव्हढीच आपल्या माय मराठीची सेवा. आपण सर्वानी आपापल्या परिने शक्य तितकी काळजी घेतली तर मराठीची ही अनावस्था काही अंशी तरी दूर होईल अशी खात्री आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 05/21/2020 - 18:11 नवीन
साहित्यिकांचे ओडिओज ऐकणं हा भाषाशुद्धीचा सर्वात सोपा आणि रंजक उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 05/21/2020 - 18:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 05/22/2020 - 14:57 नवीन
चांगला मार्ग सुचविलात मात्र नुसत्या ऐकण्याने लिहिताना ऱ्हस्व, दीर्घच्या चुका कशा टाळता येतील ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा