जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
--श्री मंगेश पाडगावकर
मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला.
एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो.
तिचा बराचसा सल्ला फोनवरच असतो. परंतु काही रुग्ण ताप खोकला असला तरीही तुम्हाला दाखवायचंय असा आग्रह धरतात. अगोदर ताप आला होता हे सांगत नाहीत. त्यामुळे आता ती सुद्धा लोकांवर विश्वास ठेवायला कचरू लागली आहे. बाकी दोन महिन्यात एकाही रुग्णाने टेलिफोनवर दिलेल्या सल्ल्याचे पैसे किती हे विचारले नाही.पैसे घ्यायचे नाही हे ठरवलेच होते परंतु निदान तेवढे सौजन्यही कुणी दाखवले नाही.
माझ्या कडे येणारे रुग्ण सोनोग्राफी साठी येतात त्यामुळे सुदैवाने त्यांना कोव्हीड असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मला तेवढी भीती नाही. अर्थात वेळ सांगून येत नाही. कधीतरी आपल्याला सुद्धा हा रोग होणार आहे हे गृहीत धरूनच मी चाललो आहे. मला स्वतःची चिंता नाही पण वृद्ध आईवडिलांची (८४ आणि ७८) आहे. पण जे नशिबात असेल ते मी स्वीकारले आहे.
एका मुतखडा असलेल्या रुग्णाने माझ्या सहायिकेला विचारले कि मला किती सवलत मिळेल? तिने त्याला विचारले कि दारूच्या दुकानाच्या रांगेत उभा होतास तिथे विचारलेस का किती "कन्सेशन" मिळेल ते.
दर दोन दिवसांनी तुम्ही "असे केले नाही तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू" म्हणून सरकारची/ महापालिका आयुक्त यांची धमकी वृत्तपत्रात वाचायला मिळते आहे.
ते पाहून काही वेळेस डोके फिरते. खरोखरच व्यवसाय बंद करून टाकावा कोणत्याही वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवावे सहा आकडी पगार घ्यावा. पाट्या टाकून घरी यावे आणि थंड झोपावे सरकार आणि जनता झक मारली असे डोक्यात येते. ते माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आणि क्लास मध्ये शिकवण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही.
माझी पदवी आणि पदव्युत्तर पदवी हि प्रथितयश संस्थेची असल्याने त्याला शिक्षणाच्या बाजारात भरपूर किंमत आहे आणि क्लास मध्ये मी एक वर्षं शिकवलेले सुद्धा आहे तेंव्हा त्यात नवीन काहीही नाही. (तेच ते वर्षानुवर्षे शिकवायचे हे फार कंटाळवाणे आहे म्हणून मी पुढे ते सोडून दिले)
अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे.
तुमच्या सेवेची कुणालाही किंमत राहिलेली नाही हे गृहीत धरले तरीही असे धमकी देणे डोक्यात जाते.
तरीही मी रोज दवाखान्यात जातो आहे. कारण साकी नाका, डोंबिवली पासून रुग्ण किती कष्ट घेऊन येतात.
कुणी मुतखड्यामुळे तळमळत आहे. कुणा गरोदर स्त्रीला बाजारात मोटारीने ठोकले आहे आणि पायाचे हाड मोडले आहे. तिला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची काळजी वाटते.
कुणा स्त्रीला ११ वर्षांनी दिवस गेले आहेत पण रक्तस्त्राव होतो आहे. अशा स्त्रीला तिचे बाळ सुखरूप आहे हे दाखवताना / सांगताना तिच्या डोळ्यात जी कृतज्ञता असते त्याची किंमत पैशात होत नाही
असे रुग्ण पाहून घरी बसायची मानसिक तयारी होत नाहीये.
एक अजून गंमतशीर गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यात पोट बिघडलेले केवळ तीन रुग्ण आले होते. हॉटेले बंद असून लोक बाहेर न खाता घरीच खात असल्यामुळे हि एक सकारात्मक बाब दिसून आली. यातील दोन जणांनी दोन दिवसा पूर्वीचे चिकन आणि प्रॉन्स खाल्ले म्हणून पोट बिघडले आणि आज चि रुग्ण होती तिने SWIGGY वरून काही तरी मागवले म्हणून पोट बिघडले होते.
आता लॉक डाउनचा दुसरा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या १० दिवसात ४ स्त्रिया नको असलेले गर्भारपण घेऊन आल्या होत्या. एकीला दोन मुलगे १४ आणि १० वर्षे दुसरीला एक मुलगा एक मुलगी ६ आणि ४ वर्षे. तिसरीच्या दोन्ही मुली १५ आणि १२ वर्षाच्या. आणि चौथीचा मुलगा १० महिन्यांचा आहे.
या सर्व स्त्रिया अर्थात विवाहित आहेत आणि जवळपासच राहणाऱ्या आहेत.
अशी स्थिती दिवाळीच्या आसपास असते. नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट दोन्ही परत भेटणारे नकोत.
माझ्या एका नातेवाईकाच्या बायकोला आणि एका वर्गमत्रिणीच्या नवऱ्याला कोविड मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते आणि त्यांना तेथे जाताही येत नव्हते. अशा लोकांना धीर देणे आवश्यक असते. त्यात माझा एक आठवडा गेला. सुरुवातीला मुलांनी थोडी कटकट केली कि बाबा तू घरी आल्यावर सारखा फोनवर असतोस. त्यांना समजावून सांगितले कि नातेवाईकांची मनस्थिती काय आहे. आणि अमुक माणूस एक दिवसात मृत्यू पावला सारख्या बातम्या वाचून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते, अशा लोकांना धीर देणे त्यांच्या जखमेवर फुंकर घालणे हे पण आवश्यक आहे. अर्थात मुले समंजस आहेत. दोघे आता घरी बरे होऊन परत आले आहेत
जाता जाता -- दारूची दुकाने उघडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट- पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एक किमी लांब रांग आणि तिला शिस्त लावण्यासाठी दुपारी १ वाजता उन्हात उभे असलेल्या पोलिसांची दया आल्यामुळे मी घरी जाऊन २ लिटर लिंबूसरबत तयार केले आणि मुलुंड पूर्वं येथे तीन ठिकाणी दारुच्या दुकानाच्या रांगा मध्ये उभे असणाऱ्या पोलिसांना देण्यासाठी गेलो.
तिन्ही रांगांत स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने उभे होते. ( खरं तर अर्ध्या रांगा याच लोकांमुळे होत्या).
पहिल्या रांगेत पोलिसाला सरबत देत असताना दोन गणवेशातील महापालिका कर्मचारी त्या पोलिसाला विनंती करत होते. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत मुलूंड स्मशानभूमीत काम करतो. पोलिसाने काय पाहिजे विचारले तर त्यांना रांगेत उभे न राहता थेट दारू विकत घ्यायची "मेहरबानी" हवी होती.
दुसऱ्या रांगेत जुन्नर जवळच्या गावातील महिला पोलीस होती. तिच्याजवळ तिचा एक गाववाला ओळख काढून गप्पा मारू लागला आणि मग हळूच दारूसाठी विनंती करु लागला.
तीन रांगातील पोलिसांना सरबत दिल्यावर मी पोलीस स्टेशन वर जेवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरबत देण्यास गेलो तेथे असलेले इन्स्पेक्टर साहेब सांगत होते. काय सांगणार डॉक्टर दोन दिवसापूर्वी स्थानिक आमदार सगळ्यांना फुकट रेशन वाटत होते (१० किलो गहू १० किलो तांदूळ ४ किलो डाळ आणि २ लिटर तेल असं काहीतरी मी एका रांगेच्या ठिकाणी बोर्डावर लिहिलेलं वाचलं होतं). त्या रांगेत असलेले निदान दहा तरी मजूर आज दारूच्या रांगेत उभे होते. पहिल्या मजुराला मी हाकलणार होतो कि दोन दिवसापूर्वी फुकट शिधा पाहिजे म्हणून रांगेत उभा होतास आणि आता दारू साठी. पण नंतर बाकी रांगेत असे भरपूर लोक दिसत होते. शेवटी मी सोडून दिले.
काही वेळाने माझ्या समोर दोन माणसे इन्स्पेक्टर साहेबाना "गूळ" लावण्यासाठी लाळघोटे पणा करत होती.
ते पाहून मला शिसारीच आली.
अर्थात मी घरी केलेले लिंबू सरबत घेऊन गेलो होतो म्हणून त्यांनी ते घेतले पण एकंदर त्यांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड ड्रिंक चा पुरवठा करणारे माझ्या सारखे इतरही लोक होतेच.
बाकी आमचे आयुष्य संथगतीने चालले आहे त्यात नवीन असे काहीही घडत नाही.
धुणी भांडी स्वयंपाक झाडू पोछा हे घरचे सर्व मिळून करत आहोत. त्यामुळे एकावर भर येत नाही आणि त्यात रडारड करण्यासारखे काहीच नाही कारण सर्वच लोक तसे करत आहेत.
मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याची चिंता राजकारण्यांना( कोणत्याही पक्षाचे असोत), सरकारी लोकांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांना सुद्धा आहे. दुर्दैवाने त्यातील कोणालाच अशा प्रचंड प्रमाणावर असलेल्या जागतिक साथीचा अनुभव नाही. तरी आहे त्या शस्त्रानिशी ते लढत आहेत.
निदान आपण त्यांच्या श्रमात हातभार लावू शकत नसलो तरी अनाठायी टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची तरी करत नाही एवढे ध्यानात घेता आले तरी खूप आहे असेच म्हणेन.
माझी वृत्ती अशी आहे कि जे वाईट घडायचे आहे ते घडून गेले आहे. येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे.
त्यामुळे मला नैराश्य येत नाही.
खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता शोधेल किंवा परिस्थिती दाखवून देईलअसे प्रश्न उठवणारे अनेक मातब्बर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे २०१४ ते २०१९ कार्यरत झाले होते. असहिष्णुता, अवार्ड वापसी, हिंदूंचा बागुलबुवा असे अनेक स्टंट करूनही २०१९ ला जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. जोपर्यंत मोदी यांना राहूल सारखा पर्याय दिला जात आहे, केजरीवालसारखे वाचाळवीर टीका करत आहेत आणि ऑनलाईन फोरमवर कोणतीही तमा न बाळगता दिसेल त्या मुद्द्यावर फक्त टीका करणारे तुमच्या सारखे आयडी आहेत तोपर्यंत जनतेच्या मनात मोदींच्या विरोधकांची प्रतिमा "फ्रॉड" अशीच राहणार. बाकी २०२४ ला मोदी स्वतः निवडणूक लढवतील याची शक्यता खूप कमी आहे आणि दुसर्या चेहर्यावर भाजपाला मते मिळाली नाहीत तर २०२४ला मोदी नसतानाही "मोदी लाट ओसरली" असे म्हणायला तुमच्यासारखे लोकं कमी करणार नाहीत याचीही खात्री आहे.. त्यामुळे सध्यातरी तुम्हाला शुभेच्छा देतो. :)