लाल पिवळी ब्रेकिंग न्यूज..
सध्या टीव्हीवर नव्या मालिका प्रक्षेपित होत नाहीत, त्यामुळे सगळेच जण बातम्याच बघतात. बातम्या सगळ्या कोरोनाच्याच असतात.
"एक मोठी बातमी येतेय" किंवा लालभडक पार्श्वभूमीवर "ब्रेकिंग न्यूज" असं म्हणत प्रत्येक गावात, जिल्ह्यात,मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात (कंटाळा आला ना लिस्ट वाचून) रोज किती रुग्ण वाढताहेत, बळी पडताहेत, किती बरे होताहेत, याची आकडेवारी सांगितली जाते.
ते महत्वाचं असेल, पण रिपीट रिपीट तेच बघायचा खरंच कंटाळा येतोय हेही खरं.
या माध्यमांनीच आपल्याला सतत कुठल्या कुठल्या ब्रेकिंग न्यूज देऊन शेफारून ठेवलंय. आपल्याला आता बातम्यांतही नावीन्य पाहिजे. आसपास सतत काहीतरी नवीन घडलं पाहिजे. नव्याचा हव्यास जडवलाय ह्या माध्यमांनीच. त्यामुळे रिपीट बातम्या नको वाटतात. चहा पिता पिता आणि सँडविच खाता खाता आपण आरामात ह्या कोरोनाच्या बातम्या बघतो. बातम्या म्हणजे मनोरंजन. करमणूक. मन निब्बर झालंय. शरम वाटते पण हेही मनोरंजन आता होईनासं झालंय.
टीव्हीवर निवेदिका एक बातमी सांगते, मग म्हणते,"याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. तो कोणत्याश्या गावी असतो. मग त्याच्याशी जोडल्यावर तो "प्रतिनिधी 'अधिक' वेगळं काहीही न सांगता तेच डिटेल्स सांगतो जे निवेदिकेनं एकदा सांगितलेले असतात. माहितीत कुठलीच भर पडत नाही. आणि कमाल म्हणजे प्रतिनिधीनं सांगितलेली बातमी त्याचा संपर्क संपल्यावर तीच निवेदिका पुन्हा एकदा जाता जाता सांगते. (हेच वर्तमानपत्रांच्या बाबतीत.
पान क्रमांक अमुक वर पुढील बातमी असं छापतात आणि पुढील पानावर तेच डिटेल्स पुन्हा छापतात. सध्या पेपरही येत नाहीये.)
म्हणजे तीच ती बातमी आपण तीन वेळा ऐकतो.
सगळ्याच प्रतिनिधींचे आवाज चांगले नसतात. काहीजण पडेल आवाजात बोलतात. काहीजण खालच्या पट्टीत ,खर्जात बोलतात. काहीजण अति उंच पट्टीत बोलतात. काहीजण खूप जास्त बोलतात किंवा काहीजण खूपच थोडक्यात आटोपतात.
बातमी देणारा मुख्य निवेदक/निवेदिका मात्र सतत अतिशय उत्तेजित होऊन बोलतात. होम शॉपिंग चॅनेल्स, नापतोल वगैरेवर सेल्सपर्सन्स जसे उत्तेजित आवाजात बोलतात तसेच हेही. जणु त्यांना बातम्या लवकरात लवकर "सेल" करायच्या असतात. सगळेच जण खूप फास्ट बोलतात. बोललेले शब्द ऐकून, मेंदूपर्यंत त्याचा संदेश जावून बातमीचं आकलन तर झालं पाहिजे?!
फार नाही तीन सेकंद द्या, श्वास घ्यायला तरी थांबा. वाघ मागं लागल्यासारखे बोलतात. पाच मिनिटांत पन्नास बातम्या, दहा मिनिटांत शंभर बातम्या. फटाफट न्यूज. जुन्या काळात डबल स्पीडने ग्रामोफोन रेकॉर्ड लावावी तसं.
काही हिंदी न्यूज चँनल्सवर खूप ओरडून बोलतात. त्यामुळे 'शोर ज्यादा न्यूज कम' असा प्रकार होतो. त्यापेक्षा सह्याद्रीवरच्या शांत स्वरात दिलेल्या बातम्या कानाला चांगल्या वाटतात. पण त्यांत चालू सरकारची भलामण असते तीही सारखी कंटाळवाणी वाटते. सह्याद्रीचा तांत्रिक दर्जा,आवाजाची गुणवत्ता तेवढी चांगली नसते. खाजगी चँनल्सची तांत्रिक गुणवत्ता मात्र फार चांगली असते.
एका चॅनलवरच्या दोन वार्ताहर मुलींचे आवाज इतके खरखरीत आहेत की फरशीवर कुणीतरी पत्रा घासतंय असं वाटतं.
निवेदक प्रतिनिधीला "अधिक माहिती" विचारतो पण त्यानं जराही विस्ताराने सांगत वेळ लावल्यास किंवा दुसरी अधिक महत्वाची बातमी , व्यक्ती आल्यास त्याला सरळ कट् करतो. यात त्या बिचाऱ्या प्रतिनिधीचा अपमान होतो.
बातम्यांत सारखे ब्रेक्स येतात. काही हिंदी चँनल्सवर तर बातमी एक मिनिट आणि जाहिराती पाच मिनिटे दाखवतात. जाहिरातींनी हाही मिडीया अक्षरशः पोखरुन काढलाय. शिवाय राजकीय प्रभाव न्यूज चॅनेलगणिक जाणवतोच. असो.
दर अर्ध्या तासाने बातम्या लावायच्या म्हणजे म्हणजे प्रेक्षकांना बातम्यांचा सतत खुराक काय पुरवणार? मग त्याच त्याच बातम्यांचं पीठ पुन्हा पुन्हा जात्यात घालून दळणं आलंच.
पडद्यावर अर्ध्या भागात निवेदक, उरलेल्या अर्ध्या भागात ब्रेकिंग न्यूजचा मजकूर. खाली एक पट्टी सरकत असते. सर्वांत वर एक पट्टी सरकत असते. डाव्या भागात जिथं निवेदक असतो तिथं जाहीराती झळकत असतात. प्रेक्षकांनी नक्की काय बघायचं. मला तर लहान मुलाच्या तोंडात दाई जबरदस्तीनं घासावर घास कोंबतेय असं वाटतं.
प्रेक्षकांच्या मनाला उत्तेजित करण्याचे, त्यांचं हपापलेपण वाढविण्याचे हे सगळे उद्योग आहेत असे वाटते. यापेक्षा रेडिओवरच्या बातम्या चांगल्या. निवेदकाचा आवाज स्थिर. सावकाश, स्पष्ट उच्चार. योग्य गति. आणि बातम्यांचा मर्यादित अवधि. त्याचा परिणाम अधिक प्रभावीपणे पडतो. त्या फक्त 'ऐकण्याच्या' असल्याने डोळ्यांवर आणि मेंदूवर अतिरिक्त ताण पडत नाही.
मगाशी लिहिल्याप्रमाणे सध्या कोरोनाच्या बातम्याच फक्त दिल्या जाताहेत. राजकीयदृष्ट्या महत्तवाच्या कितीतरी बातम्या जाता जाता थोडक्यात दिल्या जातात. ट्रंप चीन संबंध, पी ओ केचं हवामानवृत्त भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या देणं, भारत चीनमधला डोकलाम संघर्ष, भारत नेपाळ बिघडलेले संबंध, भारत पाक सीमेवरच्या चकमकी, या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या मला इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्यांवर कळल्या. स्थानिक वाहिन्यांवर अनेक ठिकाणी त्याचा उल्लेखही नाही. काही बातम्या तर लपवल्या गेल्या त्या यू ट्यूबवरुन कळल्या. यांत बातम्यांचा समतोल कुठे आहे?
एक मात्र खरं टीव्हीच्या पँनेलवर बसून लाईव्ह कँमेरा फेस करणं, बातम्यांच्या क्लिप्स,वार्ताहरांशी संपर्क, तज्ज्ञांशी संपर्क, त्याचवेळी समोरच्या न्यूज इतक्या वेगानं न अडखळता वाचणं, कौशल्याचं काम आहे. खायचं काम नाही. फार मोठं प्रसंगावधान त्यासाठी लागतं. मी रेडिओवरच्या लाईव्ह डायल इन कार्यक्रमाच्या वेळी अनेकदा त्याचा अनुभव घेतला आहे.
फक्त थोडं "शोर कम, न्यूज ज्यादा" हे ब्रीद ठेवावं इतकंच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum