[अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य
या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे भोगावीच लागतात - चांगल्या कृत्यांची चांगली फळे मिळतात, तर वाईट कृत्यांचे दु:खद परिणाम भोगावे लागतात. हाच सिद्धांत पुढे असे सांगतो की कर्मफलांचे सारे 'संचित' त्याच जन्मात भोगावे लागणे क्रमप्राप्त नसल्याने शिल्लक राहिलेला भाग पुढच्या जन्मात भोगावा लागतो. (जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्वसंचीत केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले - समर्थ रामदास स्वामी) त्यामुळे कर्माचे विविध प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. हिंदूंच्या विविध दर्शनांमधे ('schools of thought') उल्लेख असलेल्या पुढील वर्गीकरण पद्धतीचा संदर्भ श्री रमण महर्षी देत असतः
१. संचित कर्मः पूर्वजन्मांमधे साठलेले कर्मांचे ऋण
२. प्रारब्ध कर्मः संचित कर्माचा एक उपसंच, जो या जन्मी भोगणे भाग पडते. कर्माचा सिद्धांत मानवी जीवनातल्या सगळ्या घटना पूर्वनियोजीत असतात असे प्रतिपादन करत असल्याने प्रारब्ध या शब्दाचा अर्थ 'नियती' या स्वरूपात देखील घेतला जातो.
३. आगामी कर्मः या जन्मी केलेल्या कृत्यांमुळे आणि विचारांमुळे संचितात सतत पडत असलेली भर. या पैकी उर्वरित कर्मभोग पुढच्या जन्मात भोगावा लागतो.
श्री रमण महर्षींना उपरोक्त कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. क्वचित प्रसंगी महर्षी असे देखील सांगत असत की एखादी व्यक्ती तिच्या जीवनात करत असलेली प्रत्येक कृती तसेच तिला जीवनभर येत गेलेले सगळे अनुभव तिच्या जन्माच्या वेळीच निर्धारित केलेले असतात. त्यामुळे आपल्याला जर काही स्वातंत्र्य असेल तर ते इतकेच आहे की कर्ता किंवा अनुभोक्ता (सच्चिदानंद स्वरूपापेक्षा विभक्त स्वरूपात) अस्तित्वातच नाही हे जाणून घेणे! आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.
श्री रमण महर्षी कर्माच्या सिद्धांताला ईश्वरी संकल्पाचे प्रकट स्वरूप मानत असत. ते असा उपदेश देत असत की आत्मसाक्षात्कार होण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या प्रारब्धावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य-सदृश स्वरूपातला ईश्वर मानावाच लागतो. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कर्मांचे परिणाम भोगावेच लागतील असा दंडक या ईश्वरानेच घालून दिलेला आहे. प्रत्येक जीवाला संचित कर्मापैकी कुठला भाग कुठल्या जन्मी भोगावा लागेल याची निवड देखील ईश्वरच करतो. आत्मस्वरूपाचा बोध करून घेत कर्मबंधनाची लक्ष्मणरेषा लांघून पुढे जाणे हा एकमेव मार्ग मुक्तीच्या दिशेने जाणारा आहे. देहतादात्म्याने तसेच कर्ताभावाने वावरत असलेल्या व्यक्तीला ईश्वरी न्यायसत्तेच्या अधिकारक्षेत्राबाहेर अन्य कुठल्याही मार्गाने पळून जाता येत नाही.
प्रश्नः देहपात होईपर्यंत प्रारब्ध भोगावे लागते असे मानले जाते. देह अस्तित्वात असतानाच प्रारब्धावर मात करणे शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जड देह आणि सच्चिदानंद स्वरूप यांच्या मधे शिरकाव केलेल्या अहंकार या तिसर्या घटकावर कर्माची गती अवलंबून आहे. जिथे कर्माच्या सिद्धांताची सत्ता चालते तो अहंकारच जर त्याच्या उगमस्थानी (स्व-स्वरूपात) विलीन होत शून्यवत झाला, तर पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असलेली कर्माची गती आपोआप थांबते. जिथे 'अहं' नाही तिथे कर्माची गती आपोआप खुंटते.
प्रश्नः अशी कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे जी संचित कर्माचा एक छोटासा हिस्सा निवडते, आणि असे ठरवते की तो अमुक एका जन्मात प्रारब्धाच्या स्वरूपात भोगावा लागेल?
रमण महर्षी: प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळे भोगणे अनिवार्य असले, तरी त्याचे/ तिचे हित साधता येईल अशा दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न ईश्वरी सत्ता करते. ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असला तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदापि करत नाही. मानवाचे अचेतन मन चांगल्या आणि वाईट कर्मांचे भले मोठे गोदाम आहे. याच गोदामातून त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाला सहाय्यभूत ठरेल अशा गोष्टींची, मग त्या सुखद असोत किंवा दु:खद, नेमकी निवड ईश्वर करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट यदृच्छेने कधीच घडत नाही.
प्रश्नः आम्ही आज जे अनुभवतो आहोत ते प्राग्जन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. आम्ही पूर्वी केलेल्या चुका जर आम्हाला समजल्या, तरच आम्हाला त्या दुरूस्त करता येतील.
रमण महर्षी: तुम्ही एखादी चूक दुरूस्त केलीत असे गृहीत धरले, तरी तुम्हाला असंख्य जन्म घ्यावे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जन्मोजन्मी गोळा केलेले संचित कर्म शिल्लक उरते. त्यामुळे आपण विचारणा करत आहात ती पद्धत मुळातच चुकीची आहे. तुम्ही कर्माच्या वृक्षाची जितकी छाटणी कराल, तितक्याच जोमाने त्याची वाढ होते. तुम्हाला कर्म-वृक्षाचे मूळ शोधून काढून ते छाटून टाकावे लागेल.
प्रश्नः कुठलेही नियोजन न करता किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न न करताच एखादी भोग्य वस्तू मला विनासायास मिळाली, आणि मी तिचा उपभोग घेतला, तर (कर्माच्या दृष्टीने) तिचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत, नाही का?
रमण महर्षी: तसे होत नाही. प्रत्येक कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. प्रारब्धवशात एखादी गोष्ट तुमच्या नशिबी आली, तर तुम्हाला ती टाळता येत नाही हे खरे आहे. ती गोष्ट अधिक प्रमाणात मिळावी, किंवा त्या अनुभवाची पुनरूक्ती व्हावी अशी भावना न ठेवता, त्या गोष्टीबाबात फारशी आसक्ती न बाळगता तुम्ही तिचा स्वीकार केलात तर 'जन्म घेणे लागे वासनांचे संगे' या उक्तीप्रमाणे आगामी जन्मांना कारणीभूत ठरून ती तुमचे नुकसान करणार नाही. याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की त्या गोष्टीचा उपभोग घेताना तुमची आसक्ती वाढली आणि साहजिकच ती अधिक प्रमाणात मिळावी अशी तुमची वासना बळावली; तर अशा वासनांची परिणती अपरिहार्यपणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' अशा शृंखलेत होते.
प्रश्नः एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना (जन्मस्थान, जन्मत:च मिळणारे ठराविक देशाचे नागरिकत्व, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाची निवड किंवा व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख, लग्न, अपत्यप्राप्ती) पूर्णपणे कर्मप्रारब्धानुसार घडतात हे मी समजू शकतो, पण तिच्या संपूर्ण जीवनपटातला एकून एक तपशील संगतवार लक्षात घेतला तर अत्यंत गौण ठरतील अशा कार्यकलापांसकट तिने केलेली प्रत्येक कृती आधीच निश्चीत झाली असावी हे कसे शक्य आहे? (रमणाश्रमात त्या काळी विद्युत उपकरणे नव्हती) आता क्षणभर इकडे लक्ष द्या. माझ्या हातात असलेला पंखा मी नुकताच खाली ठेवला. मी अमुक एके दिवशी, अमुक वाजून अमुक मिनीटांनी आधीच ठरलेल्या कालावधीपुरता वापर करून झाला की तो पंखा आधीच ठरलेल्या ठिकाणी खाली ठेवला - हे सगळे पूर्वनिर्धारीत आहे का?
रमण महर्षी: खचितच. देह करत असलेली प्रत्येक कृती आणि त्याला ज्या ज्या अनुभवांमधून जावे लागते ते सारे अनुभव या दोन्ही गोष्टी देह अस्तित्वात येतो तेव्हाच ठरलेल्या असतात.
प्रश्नः मग मानवाला असलेल्या कर्म स्वातंत्र्याला किंवा आपण करत असलेल्या कृत्यांची त्याने/ तिने जबाबदारी घेण्याला काय अर्थ उरतो?
रमण महर्षी: देहतादात्म्यापासून मुक्त होण्याचे सामर्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानप्राप्तीचा निदीध्यास घ्यावा आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने स्वरूपज्ञान प्राप्त करावे या एकाच बाबतीत मानव स्वतंत्र आहे. मानवी देह अटळ असलेल्या प्रारब्धाप्रमाणे पूर्वनिर्धारीत कार्यकलापातून जाण्यासाठी बाध्य असतो. देहाशी तादात्म्य साधून कर्मफलात गुंतून पडायचे, की कर्मफलात आसक्ती न ठेवता प्रारब्धवशात होत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचे निव्वळ साक्षी बनून रहायचे ही एकच गोष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र मानवाकडे प्रत्येक क्षणी असते.
पुरवणी:
समसामयिक असलेले रमण महर्षी आणि आईनस्टाईन हे आपापल्या प्रांतातले दिग्गज प्रत्येक गोष्ट पूर्वनिर्धारीत असते (Everything is predetermined) असे मानत होते. त्या संदर्भात गॅरी वेबर यांनी केलेल्या विवेचनाचा दुवा देत लेखमालेचा समारोप करतो -
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
💬 प्रतिसाद
(30)
म
मूकवाचक
Fri, 07/03/2020 - 12:02
नवीन
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 07/03/2020 - 12:25
नवीन
छान.
आवडलं.
आईन्स्टाईनची मते सांगणारा व्हिडीओ पण आवडला.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 07/03/2020 - 14:31
नवीन
रमणांनी तीन बेसिक चूका केल्या आहेत.
१. > प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे.
संपूर्ण अंधार दर्शन ! > कुठे आहे ही प्रणाली आणि कोण मॅनेज करतं ती ?
२. > प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळे भोगणे अनिवार्य असले, तरी त्याचे/ तिचे हित साधता येईल अशा दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न ईश्वरी सत्ता करते. ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असला तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदापि करत नाही.
फुल आट्ट्या लावण्यात !
नीती-अनीती या मानवी कल्पना आहेत.
कुणाच्या डॅडींचे डॅडी आले तरी कृत्याच्या फलिताचा, नैतिकतेच्या बेसिसवर अल्गरिदम लिहिता येणार नाही.
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्यांच्या कृत्याचा निवाडा कोण करु शकतं आणि
त्यावरनं संचित ठरवणारा प्रोग्रॅम जगातल्या कुठल्याही माईच्यालाला ला लिहिणं शक्य नाही.
_____________________________________________
काँप्युटरही तुमची लाईन आहे, आणि तुमच्यासकट इथे जे कुणी त्या क्षेत्रात आहेत त्यांना स्वतःच्या ज्ञानाशी प्रामाणिक राहून वरच्या दोन प्रष्णांची उत्तरं देता येईल का ?
________________________________________
३. > रमण स्वतः मुक्त असतील तर त्यांना इतकी साधी गोष्ट लक्षात कशी आली नाही की मु़क्ती आता आणि इथे आहे.
ती भविष्यात आणि काही करण्यावर अवलंबून असेल तर ती मुक्तीच नाही !
_____________________________
आइन्स्टाईननी त्याच्या विधानाचं स्पष्टीकरण देतांना घोळ केला आहे :
You Can Will What You Want but You Can't Will What You Will.
विधानाचा दुसरा भाग असं दर्शवतो की `आपली इच्छा ठरवणारा इतर कुणी तरी अस्तित्वात आहे !'
कोणे तो आणि कुठे असतो ?
त्यानी काय इच्छा करावी हे कोण ठरवतं ? आणि
याचा आइन्स्टाईनकडे पुरावा काय ?
आइन्स्टाईनसारख्या प्रगल्भ शास्त्रज्ञाकडून इतकी अशास्त्रीय आणि ढोबळ चूक अपेक्षित नव्हती; पण तो सिद्ध नव्हता त्यामुळे त्याच्या विधानाचा दुजोरा इथे घेण्यात काही अर्थ नाही.
_____________________________________
थोडक्यात, कुणीही कितीही आपटली तरी पूर्वसंचित आणि कर्मविपाक या बोगस गोष्टी आहेत.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 07/03/2020 - 15:03
नवीन
पुभाप्र
पुभाशु
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 07/03/2020 - 15:17
नवीन
नाही झाला ना काही उपयोग ?
आता करा नामस्मरणाला सुरुवात.
शांत झोपेचा सोपा उपाय !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 07/03/2020 - 16:32
नवीन
ॐ हरि ॐ
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 07/03/2020 - 15:21
नवीन
हे फार महत्त्वाचे आहे. पैसा / व्यसन आड येत नाही.. त्याची चटक आड येते हे श्रीमहाराजांचे वचन आठवले. एकुणात सर्व संत / साधू शेवटी एकच आहेत. :-)
एक श्रीमहाराजांचंच उदाहरण आहे [शब्द कदाचित थोडे बदललेले असतील, पण भावार्थ असा आहे] -
एकदा एका साधकानं विचारलं, "प्रारब्ध म्हणजे काय"? श्रीमहाराज लवकरच सांगेन म्हणाले.
पुढे काही दिवसांनी प्रवासाला जाणे झाले. तेव्हा रेल्वे फलाटावर जिथे ते बसले होतेत, तिथेच त्यांनी आपली कफनी झटकून, पुढ्यात अंथरली.
थोड्यावेळानं त्यांना बघून लोकं दर्शनाला येऊ लागले. येतांना प्रत्येकजण, काही न काही त्यांच्यासाठी घेऊन येई आणि अर्पण करी. आणि श्रीमहाराज त्या सर्वांशी बोलत बोलत, विचारपूस करत त्यातलीच एखादी वस्तू प्रसाद म्हणून देत जात. असे बराच वेळ चालले. जेव्हा गाडी येण्याची वेळ झाली तेव्हा श्रीमहाराज उठले. उठतांना त्यांनी आपली कफनी परत झटकली. ती आपली कोरी ती कोरीच. तेव्हा ते वळून त्या साधकाला म्हणाले, "प्रारब्ध हे असं असतं. ते आपलं येतं आणि जातं. त्यात आपण गुंतून न पडलं म्हणजे झालं."
महर्षी सुद्धा हेच सांगताहेत, नाही? :-)
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 07/03/2020 - 16:34
नवीन
मस्त आहे उदाहरण.
फक्त जगता आले पाहिजे.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 07/03/2020 - 17:56
नवीन
मला वाटतं जोवर ते सहजपणे येत नाही, स्वभाव तसा होत नाही तोवर आत्यंतिक कठीण आहे.
ज्यांना ते सहज-स्वभावे शक्य होतं त्यांना ते कठीण का सोपं, असा विचारच येत नाही. :-)
- Log in or register to post comments
V
vikramaditya
Fri, 07/03/2020 - 18:23
नवीन
Thank you for sharing...
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Fri, 07/03/2020 - 21:31
नवीन
खूप छान. लेख वाचून गदिमांचे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे गाणे आठवले.
बाकी चांगल्या आणि वाईट कोणत्याही परिस्थितीत कर्माची साखळी मोडण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे मात्र अगदी पटले.
करोनाचा अगदी एक पेशंट जरी शिल्लक राहिला तरी पुन्हा जगभर पसरायला वेळ लागणार नाही तसे अगदी शेवटच्या कर्माचे प्रारब्ध भोगतानासुद्धा पुन्हा अनेक कर्म निर्माण होऊन पतनाचे भय उरतेच.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 07/04/2020 - 21:34
नवीन
तसंही हे जग कॅल्क्युलेटॅड पद्धतीने चाललं आहे, कि रॅण्डम चाललं आहे, कि रॅण्डम कॅल्क्युलेशन्स वर चाललं आहे, कि कॅल्क्युलेटेड रॅण्डमनेसवर चाललं आहे... कि अजुन भलतच काहि आहे.. हे कधिच कळणार नाहि. तसं कळायची सोयही नाहि, शक्यताही नाहि. ज्याला जेव्हढी गरज वाटली त्याने ज्ञानसागरातुन आपली घागर तेव्हढी भरुन घ्यावी. पण घागर भरली म्हणुन समुद्र संपला असा मूर्खासारखा विचार करुन नये.. केला तरी कोणाला काहि हरकत नसावी :)
थोडक्यात काय...
तर आपण आपलं श्रीकृषार्पणमस्तु म्हणुन मोकळं व्हावं हेच खरं :)
अध्यात्माच्या बाबतीत मिपावर तसंही लेखन कमि होतं . पण जे काहि थोडंफार झालय त्यात हि लेखमाला अत्योत्कृष्ट म्हणावी लागेल. पण तसं बघितलं तर हा ज्ञानीयाचा वेध आहे... त्यात ज्ञानाचा वेध आनुषंगीक रित्या आलाय. कुठलाही अवास्तव बडेजाव, बुबाबाजी, किंवा महर्षींना सर्वश्रेष्ठ वगैरे लेबलं चिकटवण्याच्या आटापिटा न करता वेगवेगळे विषयांचा आटोपशीर मागोवा घेतला गेला. हे फार आवडलं.
मुकवाचकंचं अभिनंदन आणि धन्यवाद.
_/\_
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 07/05/2020 - 08:45
नवीन
मी केलेल्या विनंतीला मान देऊन इतकी सुंदर लेखमाला लिहील्याबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार.
लेखमालेत आलेल्या मुद्द्यांकडे चिकित्सक नजरेने पाहील्यास काही मुद्द्यांवर असहमती दर्शवता येईल. मात्र तसे करताना कोणताही ज्ञानी पुरुष (किंवा स्त्री) हा त्याच्या काळाचे अपत्य असतो. त्यामुळे त्यांचे विचार हे काल सुसंगत असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांचे विचार हे खरच कालप्रवाहपतित होते की त्यांच्यासारख्या द्रष्ट्याला काही आकलन झाले होते ज्याला त्यांनी "क्ष" असे नाव दिले हा ही विचार करायला हवा.
उदाहरण द्यायचे झाले तर या लेखात प्रारब्ध कर्माच्या अनुषंगाने आलेला "नियती" हा शब्द. नियती हा शब्द "चांगल्या" घटनांच्या संदर्भात वापरता येऊ शकत असला तरी तो प्रामुख्याने "वाईट" घटनांच्या संदर्भात वापरला जातो. नियती ही अशी शक्ती समजली जाते की तिच्या इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही. त्यामुळे एखाद्याने काही एक ध्येय गाठण्यासाठी लाख प्रयत्न केले पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण नियतीची तशी ईच्छा नव्हती. आता हेच चिकित्सक नजरेने पहायचे झाल्यास आपण म्हणू शकतो की प्रत्येक वेळी प्रयत्न केल्यावर यश मिळतेच असे नाही. काही वेळा अन्य बाह्य घटक आपल्या प्रयत्नांवर शिरजोर होऊन आपल्याला यशापासून दूर ठेवतात. थोडक्यात चिकीत्सक ज्याला "अन्य बाह्य घटक" म्हणतो, त्याला आपल्या पूर्वसुरींनी नियती असे नाव दिले होते.
त्यामुळे काही मुद्द्यांवर असहमत होऊनही ज्ञानी पुरुषांच्या काळाच्या कसोटीवर टिकणार्या विचारांना आपण आपलेसे करायला हरकत नाही. रमण महर्षींचे आत्मभानाबद्दलचे विचार समजायला अतिशय सोपे आहेत. मात्र हे सारं ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. मूकवाचक यांनी हे ज्ञान मराठीत आणण्यासाठी सुंदर लेखमाला लिहीली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 07/05/2020 - 09:52
नवीन
सर्वप्रथम प्रदीर्घ आणि अभ्यासपुर्ण मालिकेबद्दल मुकवाचक ह्यांचे अभिनंदन !
आणि "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" ह्या वृतीला दुर्लखित करुन लेखन पुर्ण केल्याबद्दल विषेश आभार !
मुकवाचक ह्यांना लिहिते केल्याबद्दल गावडे सरांचे विषेष आभार ! मिसळपाव वर असेच नवनवीन लेखकांना लिहिते करत राहिल्यास साचले पणा येणार नाही ! विषेश करुन दुसर्यांचे निरुपद्रवी अशा श्रध्दा भंजन करण्याची वृत्ती फोफावत असताना हे लेखन पाहुन काहीसा दिलासा मिळाला.
शुभं भवतु !
(मुळ लेखनावरील माझा प्रतिसाद स्वतंत्रपणे देत आहे. )
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 07/05/2020 - 10:35
नवीन
रमणामहर्षींच्या मतांचा आदर आहे पण....
काहीकाही मुद्द्यांवर असहमती दर्शवतो :
कर्मसिध्दांत अत्यंत किचकट शब्दात मांडल्याने अनाकलनीय झालाय असे मला वाटते. मी माझ्या लेखी जे सोप्पे आहे त्या शब्दात सांगायचे म्हणले तर हे सिंपल लिनियर रिग्रेशन मॉडेल सारखे आहे . (अॅडीटिव्ह मॉडेल म्हणता येईल पण आपल्याला सिंप्लिफाय करयाचे आहे , कॉम्प्लेक्स नाही ;))
आपल्या बाबतीत जे घडते ते ३ कर्मांची बेरीज असते . संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियामाण कर्म
उदाहरण द्यायचे असेल : संचित म्हणजे साठवलेले , क्रियामाण म्हणजे आत्त्ता जे करत आहोत ते आणि प्रारब्ध म्हणजे जे आपल्याला एक्क्ष्प्लेन करता येत नाही ते.
समजा तुम्ही गेली २० वर्ष सिगारेट पिताय तर ते तुमचे संचित कर्म आहे समजा तुम्हाला उद्या कॅन्सर झाला तर ते त्याचे फळ असेल ,
समजा आत्ता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी उभेराहुन सिगारेट पिताय तर ते तुमचे क्रियामाण कर्म असेल , समजा तुम्हाला पोलिसांनी पकडुन दंड लावला तर ते त्याचे फळ असेल .
पण समजा असा मस्त पाऊस पडत आहे , तुम्ही मस्त झाडाखाली उभेराहुन भिजत भिजत सिगारेट पिताय अन तुम्हाला कॅन्सरही झाला नाही अन पोलिसांनीही दंद केला नाही पण अचानक तुमच्या डोक्यावर वीज कोसळली अन तुम्ही मेलात तर ते प्रारब्ध कर्म असेल ! अर्थात ज्याचा कार्यकारण भाव स्पष्ट करता येणार नाही असे !
हे इतकं सोप्प आहे !
हे ईश्वर , न्यायसत्ता , अधिकार्शेत्र वगैरे काहीही नसते असे माझे प्रांजळ मत आहे . हे केवळ सामान्यमाणसांनी सामान्य माणासांच्या आकलनासाठी निर्माण केलेले शब्द आहेत . न हि मनुष्यात श्रेष्ठतरं विध्यते क्वचित ! असे व्यासमुनींनी म्हणुन ठेवले आहे . ( त्यांनी नसेल म्हणले तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) माणसापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही ह्या जगात ! त्यामुळे हे ईश्वर , सत्ता , अधिकारक्षेत्र वगैरे सगळे फोल आहे ! इथे कोणीही नियंता वगैरे नाही कोणी हिशेब ठेवत नाही.
मुळातच देव किंव्वा ईश्वर कोणीतरी क्षुद्र मानवांच्या कर्म अकर्माचे हिशेब लेजर मेंटेन करतो ही कल्पनाच खुप हास्यास्पद आहे =))))
पण कर्म असते , आपण कायमच करत असतो, त्यातुन कर्मफल ही निर्माण होत असतेच मग ह्यातुन सुटण्याचा मार्ग काय ह्यावर भगवद्गीतेत अत्यंत सोप्प्य शब्दात उत्तर दिलेले आहे :
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥८१॥
म्हणजे कसं की बिनधास्त धनुष्य उचला , बिनधास्त संशप्तकांचा खात्मा करा, बिनधास्त शिखंडीच्या आडुन आजोबांना मारा, काय वाट्टेल ते करा पण करताना "जिंकले काय किंव्वा मेलो काय, मला शष्प काही फरक पडत नाही , मला हे करायला जमतं , आवडतं आणि म्हणुन मी करणार मग त्यातुन जे काही व्हायचे असेल ते होवो" असा अॅट्टीट्युड ठेवुन कर्मे करायला यायला लागली की आपण सुटलो ! कर्मफळाची काळजी न करता फुल्ल बिनधास्त लढ तु भावा !
ह्या विषयीही माऊलींचे काही अप्रतिम श्लोक आहेत ते क्वोट करतो , जास्त विवेचन करत बसत नाही , कारण आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचे नाहीये , हे सारं स्वांन्तःसुखाय आहे :)
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जही ॥ ५-६६ ॥
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥
_____________________________________________________________ ईत्यलम
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 07/05/2020 - 18:23
नवीन
क्रियमाणाचे तीन प्रकार असू शकतात.
१.त्याचे संपूर्ण फळ लागलीच मिळते. कींवा
२. त्याचे संपूर्ण फळ या जन्मात न मिळाल्याने संचितात जमा होते. आणि
३. मिळणाऱ्या फळाचा काही भाग तात्काळ, काही भाग संचितात आणि काही भाग त्याच जन्मात पण उशिराने. शिवाय त्याचे प्रमाणही कमी जास्त होऊ शकते.
हे क्रियमाणच सर्वात महत्वाचे असते. त्यानेच आपल्या प्रारब्धात बदल घडवून आणता येऊ शकतो. त्यासाठीच कर्म करताना “मी करतो” ह्या भावाचा लोप करता आला तर नव्याने कर्मफलच निर्माण होत नाही. घटना नेहमीसारखीच घडते. आपण प्रतिक्रिया पण नेहमीसारखीच देतो. पण तरीही कर्मसिद्धान्ताप्रमाणे (भोगायला लागणारे) क्रियमाणच तयार होत नाही. जर क्रियमाण निर्माणच झाले नाही तर कर्मसिद्धान्ताच मूळ आधारच नाहीसा होतो.
हे क्रियमाणच असे आहे की ते त्यानंतरचे प्रारब्धाचे क्षण भोगायला लावत असते. यापद्धतीने माणूस त्याच्या आयुष्यातले प्रारब्ध भोगत असतो. पण प्रारब्ध भोगत असताना क्रियमाणच निर्माण न झाल्याने ही साखळीच तुटते. यापद्धतीने प्रत्येक माणूस जन्मत:च ठरून गेलेले प्रारब्ध सुद्धा काही प्रमाणात बदलू शकतो. माणसाच्या हातात फक्त करण्याएवढे एवढेच आहे व ते क्रियमाणाबदल असून अत्यंत परिणामकारक आहे. यासाठीच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक क्रियमाणासाठी सांगितला गेलेला आहे.
प्रारब्धाचा काही भाग अनुकूल असतो तर काही भाग प्रतिकूल असतो. आपल्या क्रियमाणामुळे ह्या प्रारब्धाचा यातील कोणता भाग आता भोगायचे हे ठरत असते. हे सर्व ठरून गेलेल्या पध्दतीने होत असल्याने त्यात निवड करण्याची शक्ति माणसात नसते. माणूस पराधीन असतो.
पण क्रियमाणच निर्माण होण्याची ही साखळीच तुटली तर मात्र सगळंच बदलून जाते. प्रारब्धातील काय भोगायचे व काय नाही ह्याची किल्लीच जणू त्या माणसाच्या हाती आल्यासारखे होते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्याकोळी. प्रत्येक माणसाच्या हत्येमागे एक दगड रांजणात टाकायचा त्याचा परिपाठ होता. असे सात रांजण भरलेले होते. पण नारदमुनी भेटले. त्यांनी दिलेले रामनाम जपताना त्यातच तल्लीन होऊन गेले व सच्चिदानंद स्वरूपापेक्षा विभक्त स्वरूपात ते शिल्लकच राहिले नाहीत. ते कायमच रामनामाद्वारे रामाच्या स्मरणात किंवा रामनामाद्वारे सच्चिदानंद स्वरूपाच्या बोधात राहिले. त्यामुळे निर्धारित पद्धतीने क्रियमाण निर्माण होण्याची प्रक्रीयाच बंद पडली.
त्यांनी केलेल अशुभ कर्माचे प्रारब्ध आकर्षित करेल असं क्रियमाणच त्याच्याकडून निर्माण झालं नाही. ( जे नाॅर्मली ठरल्यानुसार झाले असते) त्यामुळे त्यांना त्यांच्या अशुभ कर्माची फळे त्या जन्मात भोगायला लागली नाहीत. शिवाय जीवनमुक्त झाल्याने ती फळे आजतागायत भोगायला लागली नाहीत.
माउलींच्या शब्दात सांगायचे झाल्यास, हरिपाठात ते म्हणतात.
हरि उच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥११.१॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥११.२ ॥
अर्थात ही सर्व उच्च दर्जाची स्थिती आहे. यावेळचे नाम हे मी व माझे यातून आलेले नसते. त्यावेळची नामाची स्थितीबद्दल माऊली हरिपाठात म्हणतात.
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा॥२६.४॥
इथे ज्ञानदेव व श्रीहरी वेगवेगळे नाहीयेत. अद्वैत प्रस्थापित झालेले आहे.
मात्र यापेक्षा कमी दर्जाचे नाम काय करते?
तर ते आपले अशुभ कर्माचे फळ मिळण्याची वेळ लांबवू शकते.
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढे ॥१४.२॥
हे सगळे निष्काम नामाला लागू आहे. थोडक्यात क्रियमाण नीट हाताळणे हे “योग:कर्मसु कौशलम्” आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 07/05/2020 - 20:33
नवीन
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ ४-१६ ॥
असे खुद्द कृष्णाने गीतेत सांगुन ठेवले आहे , आपण काय बोलणार !
मी दिलेल्या सिम्पल लिनियर रिग्रेशन मॉडेल च्या उदाहरणाने पाहिल्यास हे विधान चुकीचे ठरते. कोव्हेरियेट्स आणि एरर टर्म इन्डिपेन्ड्ंट असतात. त्यांचे कोरीलेशन शुन्य असते. हे बेसिक अॅझम्प्शन आहे !
प्रारब्धाची व्याख्याच आहे की जे आपल्याला एक्स्प्लेन करता येत नाही ते ! त्यात कसा काय बदल घडवणार ? जर बदल घडवता आला तर ते प्रारब्ध नव्हतेच ते संचित होते !
मी दिलेल्या दुसर्या उदाहरणात , जर तुमच्या डोक्यावर वीज पडणार असेल तर तुम्ही कितिही अन काहीही क्रियामाण कर्म केले तरी त्याने काहीही उपयोग होणार नाही. आपले हे विधान की प्रत्येक माणूस जन्मत:च ठरून गेलेले प्रारब्ध सुद्धा काही प्रमाणात बदलू शकतो. हे प्रारब्धाच्या व्याख्येलाच चुकीचे ठरवणारे आहे.
क्रियामाण कर्म / संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे इन्डिपेंडंट आहे .
ज्याचे नामस्मरण करायचे त्या खुद्द रामाला किंव्वा कृष्णालाही क्रियामाण कर्माने प्रारब्ध ओव्हरराईड करता आले नाही तिथे इतरांची काय कथा !!
नामस्मरणाचा उद्देश हा प्रारब्ध किंव्वा संचित कर्माचा लय करणे हा नाही (कारण ते शक्यच नाही !) उलट प्रारब्ध संचित ह्यातुन जे काही फळ निर्माण होणार आहे त्या विषयी समबुध्दी निर्माण करणे हे आहे. घशाचा कॅन्सर होणे हे रामकृष्ण परमहंसांचे प्रारब्ध होते , त्यांन्नी त्यांच्या कालीमातेच्या भक्तीने , क्रियामाण किंव्वा संचित कर्माने ओव्हर राईड केले नाही , (करता येणे शक्यच नाही, ) उलट जे काही होईल ते समबुध्धीने स्विकारले !
असो ह्यावर वादविवाद करण्यात काहीही गम्य नाही , आपपल्या अनुभव विश्वानुसार आपपले मत विचार बनत गेलेले असतात. माझेच एकट्याचे योग्य असा माझा अभिनिवेष नाही. कदाचित आपले मत आपल्यासाठी योग्य असेल ! एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति !!
बाकी नामस्मरण करताना किमान मी तरी कधीही कोणीतरी अज्ञात शक्तीने आपल्याला येऊन मदत करावी अन आपल्या शुल्लक सम्नस्यात येऊन लक्ष घालावे अशी अपेक्षा केली नाही.
उलट वडीलांनी राज्यत्याग करायचा आदेश दिला , किंव्वा आईने १४ वर्ष जंगलात जायला सांगितलं , किंवा रानावनात फिरत असताना कोणीतरी काहीही कारण नसताना आपली बायको उचलुन नेली, युध्दात भावाला बाण लागुन तो मरणासन्न होऊन पडला , किंवा इतके कष्ट करुन ज्या बायकोला सोडवली तिचा केवळ लोकापवादामुळे त्याग करावा लागना अन पुढे युध्दात पोरांच्याच समोर उभे ठाकावे लागले. असल्या सतराशे साठ समस्या आल्या तरी ज्या माणसाची मनःशांती ढळली नाही , चित्ताचे समत्व ढळले नाही , त्याने बाकी काहीकेले नाही तरी चालेल फक्त हा एक गुण आपल्यात यावा इतकी सद्बुध्दी दिली तर पावलो ह्या उद्देशाने नामस्मरण करायचो. ( आता तर तेही करत नाही. )
आणि कृष्णनामाची कथा तर त्याही पेक्षा भन्नाट आहे - एकदा का प्रारब्ध आपल्या हातात नाही जे व्हायचंय ते शांतपणे, चित्त विचलीत न होता भोगायचे आहे हा विचार ठाम मनात गेला की माणुस केवळ क्रियामाण कर्मावर फोकस करुन आयुष्यात कसा " राडा" , " कल्ला " आणी " हॅवॉक " करु शकतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण !
कृष्णाविषयीचे भोंगळ विचार बाजुला ठेवुन जेव्हा खांडवदाह पर्व , जरासंध वध , किंव्वा मुळ महाभरतातील प्रसंग , विशेषकरुन जयद्रथ वध्याच्या अदल्या रात्री कृष्णाचा अन दारुकाचा संवाद हे सारं वाचलं की असं वाटतं - बास बास आपल्याला असाच राडा करायचा आहे आयुष्यात !
किंवा हरिनामाविषयी बोलाल तर जेव्हा विष्णुंनी शेषनागाला आश्रय दिला तेव्हा गरुडाचा अन विष्णुंचा संवाद अत्यंत खतरनाक आहे ! डोक्याला शॉट !
नामस्मरण करुन असे काही गुण अंगी आले तर अर्थ आहे नाही तर काय उपेग ?
असो खुप विषयांतर झाले ! आपल्या मताचा आदर आहेच , काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेष नाही , लिहायला मजा आली म्हणुन लिहिले !
|| राम कृष्ण हरि ||
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 07/05/2020 - 20:51
नवीन
काय आहे ते 'डोक्याला शॉट' संवाद ? टंका कि इकडेच.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/06/2020 - 02:55
नवीन
हे टंकाच. आवडेल वाचायला. मनापासून बोलतोय.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/06/2020 - 02:44
नवीन
नामस्मरणाने काही करायची इच्छा धरणे म्हणजे ते सकाम झाले. मी निष्काम नामाबद्दल म्हणतोय.
तुम्ही क्रियमाणाने प्रारब्धात बदल करण्याबद्दल बोलताय. मी क्रियमाणाने होणाऱ्या बदलाबाबत बोलतोय.
एखादी गोष्ट करणे वेगळे. पण कोणतीच अपेक्षा किंवा हेतू नसताना ती होणे वेगळे.
मी शब्दांत नीट मांडू शकलो नाही. मांडणेच अवघड आहे. असो.
आपल्या विचारांचा आदर आहे. हे सगळंच स्वान्तसुखाय असल्यामुळे थांबतो.
_/\_
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 07/05/2020 - 10:36
नवीन
- Log in or register to post comments
स
सतीश विष्णू जाधव
Sun, 07/05/2020 - 17:53
नवीन
कर्म सिद्धांतआणि भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश खूप भावाला.
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
Mon, 07/06/2020 - 00:04
नवीन
हि संपूर्ण माला अतिशय सुरेख झाली आहे. याचे पुस्तक काढण्याचा नक्की विचार करा.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Mon, 07/06/2020 - 08:09
नवीन
हे संपूर्ण लेखमालेचं सार म्हणता येईल!
_/\_
- (मुमुक्षू) सोकाजी
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 07/06/2020 - 09:09
नवीन
या धाग्यावर मनमोकळे प्रतिसाद दिलेल्या मिपाकरांना - सर्वश्री संजय क्षीरसागर, शाम भागवत, अरा, सगा, सोत्रि, जयंत नाईक, अत्रुप्त आत्मा, मार्कस ऑरेलियस, कोहंसोहं१०, विक्रमादित्य आणि सतीश विष्णू जाधव यांना मनःपूर्वक धन्यवाद.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 07/06/2020 - 09:51
नवीन
श्री. रमण महर्षींच्या शिकवणीविषयी थोडेफार लेखन करून ठेवले होते. ते आंतरजालावर प्रकाशित करण्याचा मानस नव्हता. ते श्री. सतिश गावडे यांच्या प्रोत्साहनामुळेच ते शक्य झाले. सगा यांना पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.
या लेखमालेला मिळालेले व्यक्तीपरत्वे सिद्ध, साधक, मुमुक्षू अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून दिलेले सगळेच प्रतिसाद स्तुत्य आणि स्वागतार्ह आहेत. त्यात खास उल्लेख करायचा झाला तर श्री. शाम भागवत आणि श्री. राघव यांनी दिलेले ब्रह्मचैतन्य प. पू. गोंदवलेकर महाराजांचे उल्लेख असलले प्रतिसाद "साधू दिसती वेगळाले, परि. ते स्वरूपी मिळाले" ही समर्थ रामदास स्वामींची उक्ती सार्थ करणारे असल्याने त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत.
प्रत्येक प्रकरणातला सारांश (अर्थातच माझ्या आकलनाप्रमाणे) या प्रमाणे आहे:
प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप
'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत.
प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी
अध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.
प्रकरण ३ - ज्ञानी
ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान! गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.
प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)
मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही. देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे.
प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)
या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो. पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते. तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.
प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)
'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे. मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.
प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण
जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते. अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत.
प्रकरण ८ - गुरूतत्व
ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्गुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते. आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.
प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य
भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहे. साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत.
प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता
जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी 'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते. नानाविध मानसिक विभ्रमांचे मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.
प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण
दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.
प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन
आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही. अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम - संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.
प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया
हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.
प्रकरण १४ - समाधी
सहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.
प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे.
प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या
शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, उत्कट भावभावनांचे मानसिक स्थिती सतत दोलायमान ठेवणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येत असल्याचे लक्षात येते. श्री रमण महर्षींचा कल मात्र उघडपणे 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच सुखद अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने/ साधिकेने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला/ तिला तितक्याच तत्परतेने मार्गदर्शन करत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.
प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व
अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो. अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. सृष्टी - दृष्टी वाद या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत. आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो.
प्रकरण १८ - पुनर्जन्म
देहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते. त्या पैकी काहींचा असा दावा आहे की जीवात्मा स्वर्ग किंवा नरकात जातो, तर काहींचा असा दावा आहे की जीवात्मा नवा देह धारण करून पुनर्जन्म घेतो. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म तर सोडाच, (आत्मस्वरूपाचा) जन्म आणि मृत्यु देखील संभवत नसल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.
प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप
ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).
प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता
दु:ख भोगणारा जीव, जगत आणि ईश्वर हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते. जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता.
प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य
श्री रमण महर्षींना कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/06/2020 - 12:04
नवीन
अहो, समारोपाचा धागा वेगळा काढायचा ठरला होता ना?
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Mon, 07/06/2020 - 21:10
नवीन
शाम भागवत म्हणतात ते पटले. सारांश अतिशय उपयुक्त आहे आणि ते एका वेगळ्या धाग्यात देता आले तर बघा
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/06/2020 - 13:02
नवीन
महर्षिं बद्दल बरेच ऐकुन होतो पण त्यांची सगळी पुस्तके इंग्रजी मधुन उपलब्ध असल्याने त्या वाटेला फारसे गेलो नव्हतो.
तुमच्या या लेखमालेमुळे महर्षिंच्या तत्वज्ञानाची ओळख झाली. सगळेच काही समजले असे नाही. त्या करता ही लेखमाला पुन्हा पुन्हा वाचावी लागेल.
या विषयी अजूनही काही लिहावेसे वाटले तर जरुर लिहा.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
V
vikramaditya
Tue, 07/07/2020 - 04:41
नवीन
अतिशय उपयुक्त आहे आणि ते एका वेगळ्या धाग्यात देता आले तर बघा....+1
- Log in or register to post comments