Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती

म
माहितगार
Fri, 07/03/2020 - 16:47
💬 10 प्रतिसाद
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात. अपयशाने बर्‍याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्‍याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्‍याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो. (हे सारे चाणक्याचे नाही माझे मत आहे) ज्ञान जगातील सगळीकडून मिळवा हे ऋग्वेद सांगून गेला तरी भारतीयांना ते निटसे मनावर घेणे का औघड जाते माहित नाही, त्यामुळे शत्रुपक्षाचा आणि त्याच्या नितींचा अभ्यासात आपण कमी पडत रहातो. (आमच्या सैन्याला योगा शिकवणे ठिक पण सोबतीला मार्शल आर्टमध्येही तरबेज ठेवले तर नुकासान होत नसावे असो) भारतात जसे चाणक्य होऊन गेला चिन मध्येही काही होऊन गेले असावेत. त्यातील इंग्रजी विकिपीडियावरील मला समजलेले काही चिनी चाणक्यनितीचे - भारतीय चाणक्य काहीच नाही वाटले तर तो दोष चाणक्याचा नव्हे परदेशस्थ चाणक्यांचा अभ्यास टाळणार्‍या आमचा आहे- दाखले खाली देतोय. १) समुद्रपार करण्यासाठी स्वर्गालाही चकवा द्या - ध्येयसाध्य करण्यासाठी तुमच्याश्रेष्ठांनाही मनातले खरे ध्येय न सांगता चकवा द्या २) झाओला वाचवण्यासाठी वेईला वेढा घाला - शत्रू तुमच्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याच्या नाजूक (जागेवर) गोष्टीवर ताबा मिळवून त्याला नामोहरम करा. ३) शत्रुचा गळा उधारीच्या केसाने कापा - केसाने गळा कापणे अशी आपल्याक्डे म्हण आहे त्याच धर्तीवर आहे पण यात अधिक काय आहे तर आपल्याकडे क्षमता नसेल दुसर्‍याची क्षमता वापरून शत्रुला नामोहरम करा यात - शत्रुवर हल्लाकरण्यासाठी मित्रराष्ट्राचे साहाय्य घेणे, शत्रुच्या अधिकार्‍यांना आर्थीक लालूच देणे, किंवा शत्रुची स्वतःची क्षमता त्याच्या स्वतः विरुद्ध वापरणे ४) युद्धाचे स्थळ आणि वेळ तुमच्या सोईची अशी पाहून निवडलेली पण शत्रुला चकीत करणारी असावी- (हे जरासे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यासारखे दिसते) . म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवणार नाही पण शत्रु थकेल. शत्रु कनफ्युज झाला आणि थकला की त्याला पूर्ण तयारीने नामोहरम करा. ५) शत्रुचे जळते घर लूटा - शत्रुराष्ट्रात हेरगिरी करून अंतर्गत बंडाळी अथवा इतर कारणाने शत्रू देश अशक्त झालेला असताना आक्रमण करा. ६) पुर्वेकडे आवाज करा आणि पश्चिमेकडे हल्ला करा - मुलतः तुमच्या चालीबाबत शत्रू गाफील रहावा म्हणून वेगळ्या दिशेने कुच केल्याचा बहाणा करा आणि प्रत्यक्ष हमला वेगळ्या आपल्या हिताच्या स्थळावरून करा. ७) आभास निर्मिती - जिथे काहीच नव्हते तिथे ते असल्याचा, अथवा जिथे आहे तिथे काही नसल्याचा आभास निर्माण करा आणि दावे करा. ८) शत्रु समोर आमीष ठेऊन जाळ्यात अडकवा हे ही शत्रुला गाफील ठेवून नामोहरम करण्याच्या नितीचा भाग आहे. ९) शत्रुच्या जळत्या घरावर नदी पलिकडून (सुरक्षीत राहून नजर ठेवा) - उद्देश्य शत्रुचे जळते घर लुट्ण्याचाच या नितीत ते व्य्वस्थित जळलय याची खात्री करून लूटा १०) तोंडावर हास्य ठेऊन पाठीत खंजीर - शत्रु संपवण्यासाठी सर्वकाही ११) आवळा देऊन भोपळा मिळवा - किंवा भोपळा मिळवण्यासाठी आवळ्याचे आमीष द्या १२) संधीसाधू रहा छोटीही संधी सोडू नका १३) सापाला घाबरवण्यासाठी गवतात काठी आपटा - बेसिकली शत्रु घाबरेल असा अचानक आश्चर्यकारक धक्का द्या १४) जुनी प्रेते उकरून त्यात प्राण फुंका १५) वाघाला गुहे बाहेर येण्याचे आमीष देऊन मग नामोहरम करा- अर्थात अगदी कुत्राही आपल्या गल्लीत शेर असतो त्याला गल्लीच्या बाहेर म्हणजे सामर्थ्य स्थानाच्या बाहेर येण्याचे आमीषास बळी पाडून मग नामोहरम करा. १६) सापळ्यात आलेले शिकार मटकण्या आधी त्याला भटकू द्या. सापळ्यात आलेले शिकार शेवटचा जोर लावून मोठा प्रतिहल्ला करू शकते, हे टाळण्यासाठी सापळ्याच्या आत त्याला भटकण्याची संधी द्या जेणे करून त्याला स्वतंत्र असल्याचा खोटा आभास होईल, प्रतिहल्ला करण्या एवजी तो सुटकेच्या विचारात / प्रयत्नात वेळ घालवेल पण सुटका नाही हे लक्षात आल्या नंतर शिकार स्वतःच निराशेने लढण्याचा इरादा सोडून आत्मसमर्पण करेल. म्हणजे कमीत कमी कष्टात शत्रु नामोहरम होईल. १७) नायक अथवा सेनानायक संपवा म्हणजे शत्रु सैन्य दिशाहीन होऊन पळून जाईल किंवा तुम्हालाच सामील होईल अर्थात काही शत्रु सैन्य बदल्याची कारवाई करू शकते याचे भान ठेवा १८) चुलीतली लाकडे विझवा म्हणजे बंब आपोआप थंड होईल. अर्थात शत्रुचे मुख्य मुद्दा अथवा मुख्य क्षमता संपवा म्हणजे त्याची लढण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही संपलेली असेल. १९) मासेपकडण्यासाठी पाण्याची शांतता खळखळाट करून बिघडवा ज्यामुळे मासे गोंधळतील आणि गोंधळाच्या स्थितीचा फायदा शत्रुला नामोहरम करण्यासाठी उठवा २०) तुम्ही बलाढ्य शत्रुच्या जाळ्यात अडकला तर तोंड लपवून काढता पाय घ्या. २१) जाळ्यात पकडलेल्या शिकारीचे सुटकेचे सर्व दोर कापा - शत्रुस मदत मिळू शकणारे मदतीचे सर्व मार्ग बंद करत जा २२) दूरच्या राष्ट्रांशी मैत्री करा, शेजारी राष्ट्राला शत्रु समजून संधी मिळेल तसे गिळंकृत करा २३) शत्रुला नामोहरम करण्यासाठी तात्पुरते मित्र मिळवा आणि शत्रुला संपवल्यावर तात्पुरता मित्र संपवा २४) शत्रुचे आधाराचे खांब पोखर खांबांनी बदला २५) येडा बनून पेढा खा २६) शत्रूला छतावर येण्याचे आमीष द्या आणि शिडी काढून घ्या म्हणजे परतीचे दरवाजे बंद करा. २७) वठलेले झाड शोभीवंत सजवून शत्रूला सापळ्यात पकडण्यासाठी आमीष दाखवा २८) अतिथी अथवा नौकर बनून जा आणि मालक बना २९) इप्सित साध्य करण्यासाठी अप्सरांना पाठवा ३०) रिकाम्या किल्ल्याचे तंत्र शत्रु बलाढ्य आणि जिंकण्याच्या स्थितीत असेल तर त्याला चकवण्यासाठी तणावा खाली असल्याचे न दर्शवता सर्व सुरळीत असल्याचा तणावा खाली नसल्याचा आभास द्या. युद्धाच्या तयारी असूद्या पण तयारीचेचे प्रदर्शन न करताच तुमच्या शांततेबद्दलच शत्रुला शंका येऊन रिकाम्या किल्ल्यात सापळे असल्याचा आभास निर्माण करा जेणे करुन शत्रू माघारी फिरेल. यावर इंग्रजी विकिपीडियावर एक स्वतंत्र अख्खा लेख आहे जिज्ञासूंसाठी दुवा ३१) शत्रुच्या घरात भांडणे लावा ३२) स्वतः जखमी झाल्याची बतावणी करून शत्रूचा विश्वास संपादन करा आणि मग शत्रूचा घात करा. ३३) चातुर्य खेळींची साखळी एकासोबत एक किंवा एकानंतर एक चालू ठेवा ३४) शत्रू जिंकणार असल्यास तात्पुरती स्ट्रॅटेजीक माघार घ्या, शरणागती पूर्ण पराभव असते, तडजोड अर्धा पराभव असते पण तात्पुरती स्ट्रॅटेजीक माघार पराभव नसते तर तयारीनिशी पुन्हा तोंड काढण्याची संधी असते. आपल्याकडे युद्धात सर्व माफ असल्याची म्हण आहे पण उर्वरीत काळ नितीमत्त्ता शब्द पाळणे इत्यादी मुल्यांवर भारतीयांचा भर असतो, पंचतंत्र, चाणक्य निती कृष्णनिती, छ. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा सर्व लक्षात घेतले तरी नितीमत्तेची पायमल्लीचे समर्थन केले जात नाही. उपरोक्त चिनी तत्वज्ञान वाचताना नेहरू ते मोदी चिनी नेतृत्वाने बिनबोभाट दिलेले चकवे उपरोक्त तत्वज्ञान वाचल्यावर आश्चर्याचे वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय चकवेगिरी करता अजूनही बरेच चिनी तत्वज्ञान आहे. त्याची आपल्याकडे काय किंवा जगभरात काय चर्चा बरीच कमी झालेली आहे. * सौजन्य संदर्भ ईंग्रजी विकिपीडिया लेख Thirty-Six Stratagems * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया द्या
5967 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/29/2021 - 21:45 नवीन
आजवर ठाऊक नसलेली महत्वपूर्ण माहिती देणारा हा लेख दुर्लक्षित कसा राहिला याचे आश्चर्य वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 03:57 नवीन
कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या पुस्तकांत आहेत....
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 04/30/2021 - 06:46 नवीन
१७) नायक अथवा सेनानायक संपवा म्हणजे शत्रु सैन्य दिशाहीन होऊन पळून जाईल किंवा तुम्हालाच सामील होईल अर्थात काही शत्रु सैन्य बदल्याची कारवाई करू शकते याचे भान ठेवा गलवान मधे हेच घडलं आणि भारताने बदल्याची कारवाइ करुन चिनचे नाक ठेचलं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/30/2021 - 10:35 नवीन
२०२० मधील एका दिवाळी अंकातील लेखात हे सर्व दाखले वाचलेत. चीनमध्ये काही काळ राहणाऱ्या एका मराठी महिलेने हा लेख लिहिलात. हे दाखले (बहुतेक) कन्फ्युशिअस या चिनी तत्त्वज्ञाने सांगितलेत. चीन आपल्या जुन्या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर करून देत नाही व जगापासून ते ज्ञान लपवून ठेवतो असे त्या लेखिकेने लिहिले आहे. शत्रूची एक इंच जागा मिळाली किंवा मूठभर तांदूळ मिळाले, तरी ते सोडू नका, असाही एक दाखला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 11:07 नवीन
हे ज्ञान बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, भारता बाहेर गेले असावे, हा माझा अंदाज आहे .... ह्या अंदाजाला दोन कारणे आहेत .... 1. चाणक्य हा पण एक तक्षशिला येथील विद्यार्थी होता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या पुस्तकांत त्याने वेळोवेळी हे ज्ञान त्याच्या गुरूंनी दिले, असा स्पष्ट उल्लेख केला आहे ... जिथेजिथे गुरूंची मते पटली नाहीत, तिथेतिथे त्याने, ती का पटत नाहीत, ह्याची कारणमीमांसा देऊन, पर्यायी उपाय सुचवले आहेत 2. कौटिल्याच्या गुरूपरंपरेचा उल्लेख, भारद्वाज, पराशर ॠषी इथपर्यंत पोहोचतो तर राजाश्रयाचा उल्लेख, अजातशत्रु, पर्यंत पोहोचतो....ही दोन्ही उदाहरणे कंन्फुशियसच्या आधीची आहेत ... थोडक्यात सांगायचे तर, बौद्ध धर्माचा प्रसार होत असतांनाच, हे ज्ञान कंन्फुशियसला मिळाले .... दुर्दैवाने, गोरा सांगे तेच सत्य, असे मानणारी आपली प्रजा असल्याने, ह्या ज्ञानावर चीनचा शिक्का बसला... संदर्भ: कौटिल्याचे अर्थशास्त्र, पान क्रमांक 24-25 , राजाश्रय गुरूपरंपरेचा उल्लेख, 126-127-128
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Fri, 04/30/2021 - 12:07 नवीन
अगदी शक्य आहे, ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रात चीनने बरीच उसनवारी ऐतिहासिक काळापासून केलेली आहे. भारतातून परतलेल्या चिनी प्रवास्यांकडून संस्कृतातील पाठ्य ज्या मेहनतीने अनुवादीत करुन घेतले गेले ते अलिकडील काळात पाश्चात्यांच्या पेटंटांची व्यवस्थित चोरी चिनी लोकांनी कोणत्याही वैषम्या सिवाय केली. अगदी सध्याचे चिनी अध्य्क्ष जगभराची माहिती घेऊन या आणि कम्युनीस्ट आणि चिनी मुल्यात घोळून वापरा म्हऊन उघडपणे सांगतात. भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 13:07 नवीन
भारतातूनच माहिती गेली म्हणून आपण आत्मसंतुष्ट रहाणार आहोत की त्यांच्या कडची माहिती मिळवण्याकडेही लक्ष देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असावा किंवा कसे. --------- त्यामुळे इतिहास न विसरता, मिळेल तिथून आणि जमेल त्या मार्गाने, ज्ञान आणणे हीच आपली प्राथमिकता राहिली आहे ... दोन उदाहरणे देतो, परम संगणक आणि अणूबाॅम्ब ------ आजही, भारतीय बुद्धीवान माणसे जगांत नांव कमावून आहेत पण, दुर्दैवाने आपण, Hidden Talent शोधायला कमी पडतो आणि उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या माणसांना, भारतातच राहण्यासाठी सोय सुविधा करून देत नाही... -------------- जाता-जाता, चीन हा देश उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याचे सर्वोत्कृष्ट मिश्रण आहे... एकीकडे साम्यवादी एकाधिकारशाही तर दुसरीकडे भांडवलशाही... दोन्ही दगडांवर तो देश व्यवस्थित पाय ठेवून आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 04/30/2021 - 12:23 नवीन
वापरले नाही तर नुसती ग्रंथांची पुजा करून काय फायदा, महात्मा गांधी रात्रंदिवस गीतेचे पाठ वाचत, देशाच्या फाळणीला गृहयुद्धाचा पर्याय सोडून होकार करून बसले. दुसरे चिनी लोकांनी स्वतःचे काय जोडले आहे तेही बघीतले पाहीजे. उपरोक्त लेखातील चातुर्यनिती त्यांच्या एकुण विदेशनिती तत्वज्ञानाचा केवळ १० टक्के भाग आहे. त्या महाभागांचे अजूनही बरेच काही तत्वज्ञान आहे त्याने दबून जाण्याचे कारण नाही पण शत्रुची निती नीट समजून घेतल्या शिवाय त्याला नामोहरम करणे कठीण जाऊ शकते हे आत्मप्रौढीचे भाग बाजूस ठेऊन त्यांच्या निती भावनेचा भाग बाजूस ठेऊन अभ्यासावयास हव्यात की नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Fri, 04/30/2021 - 11:58 नवीन
चीन म्हटले की भारतीयांची भूमिका complacent वाटते ? गूगल बाबानुसार complacency = a feeling of smug or uncritical satisfaction with oneself or one's achievements. स्मग = having or showing an excessive pride in oneself or one's achievements. का कोण जाणे, केवळ 'आत्मसंतुष्ट' शब्दात 'complacency' शब्दाची पूर्ण अर्थछटा येत नाही असे वाटते. बहुधा uncritical आणि स्मग = आत्मप्रौढी हि अर्थछटा 'आत्मसंतुष्ट' शब्दात येत नसावी. complacency करीता अधिक योग्य मराठी शब्द कोणता असेल ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/30/2021 - 13:02 नवीन
अल्पसंतुष्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा