माझं नाशिक
माझा जन्म नाशिकचा. अशोकस्तंभाजवळच्या कुठल्याश्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला. ४१२, वकीलवाडी हे माझं आजोळ. तिथं मामाचं कुटुंब आणि आजी आजोबा राहायचे. ४१२ चं घर भाड्याचं. जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच दुसर्या मजल्यावर मामाचं घर. पुसटसं आठवतंय आता. बाहेरची मुख्य खोली, माजघर आणि रस्त्याकडेला उतरत्या कौलांनी निमुळती झालेली एक माडी. दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नाशिकला जायचा. कधी आईवडीलांबरोबर तर कधी मामांसोबत. त्या घरातली माडी ही माझी आवडती जागा. माडीसमोरच अशोकस्तंभाकडे जाणारा रस्ता होता. रस्त्याच्या कडेलाच मारुतीचं लहानसं देऊळ. माडीतल्या खिडक्यांतून ते लहानसं देऊळ थेट दिसायचं, समोरच्या रस्त्यावरची वर्दळ रात्री अगदी शांत होऊन जायची. दिव्यांच्या पिवळट झिरपणार्या प्रकाशात रात्री खिडकीतून ते देऊळ बघत बसायला मौज वाटायची. उन्हाळ्याच्या दिवसांत मामा कधीमधी कुल्फ्या घेऊन यायचा.
४१२ च्या डावीकडील रस्ता काटकोनात एक वळण घेऊन वळायचा तो पंचवटी हॉटेलच्या गल्लीत यायचा. तिकडून बाहेर पडलं की मेहेरसमोरुन येणारा मुख्य रस्ता आणि तिथेच हुतात्मा स्मारक. पंचवटीत आम्ही कधीकधी जेवायला जात असू. ४१२च्या उजवीकडील रस्ता निघायचा तो तांबट आळीत, भांड्याची असंख्य दुकाने तिथे असायची, तांब्याची भांडी मिळणारी तर अधिकच, तिथे सदान् कदा तांब्यांच्या भांड्यांना ठोके मारत असलेला घण्ण घण्ण असा आवाज येत असे. तांबट आळीतून रविवार कारंजाला जायचा रस्ता होता. वाटेत माधवजी का बढियाचे चिवड्याचे दुकान होते. त्याच्या जवळच माझी मोठी मावशी राहायची. पुढे गेल्यास दुकानांच्या रांगेतच वणीच्या सप्तशृंगीची प्रतिकृती असलेली मूर्तीचे दुकानातच निर्माण केलेले देऊळ होते, अजूनही असेल. ही भव्य मूर्ती काच लावून बंदिस्त केलेली होती. तिथून पुढे जाताच येई रविवार कारंजा अर्थात आर के. हा नाशिकचा प्रसिद्ध चौक. शहरातला अगदी मध्यवर्ती भाग. दुसरा मध्यवर्ती भाग असे तो म्हणजे पंचवटी कारंजा. रविवार कारंजाला जरी आर के हे नाव पडले होते तरी पंचवटी कारंजा मात्र पंचवटी ह्या नावानेच ओळखला जाई.
माझा दुसरा मामा पंचवटीच्या जवळ मखमलाबाद नाक्याजवळ हेमकुंज इथ राहात असे. ती पण एक लहानशी अशी कॉलनीच होती. सुरुवातीला एक लाकडाचा वखारवजा कारखाना, मग मालकाचा बंगला आणि चाळीसारखी काही भाड्याची घरे आणि मध्ये मोकळी झाडोर्याने भरलेली जागा. तिथं मी नेहमीच जायचा. मामेभावाबरोबर गेलेले ते दिवस अजूनही आठवतात. जवळच्याच एका गोठ्यात आम्ही दूध आणायला जात असू, तिथं एक वर्कशॉपवजा कुठल्याश्या रसायनांचा एक कारखाना होता. त्याच्या पाठीमागेच एक खड्डा केलेला असे आणि काळपट चिकट रसायनांनी पूर्ण भरलेला असे. त्याला आम्ही डांबराचं तळं म्हणत असू. तिथून अजून थोडं पुढं गेल्यावर मावशीचं घर येई. मावशीच्या घरासमोरच भोकराचं एक झाड आणि त्यापलीकडे शेत. मी आणि भाऊ भोकर्याच्या झाडावर चढत असू आणि एखादं भोकर उचलून तोंडात टाकत असू. दिसायला बोरासारखं असल्याने आम्हाला त्याचं आकर्षण असे मात्र तोंडात टाकताच त्याच्या कडवट चवीने आम्ही तोंड वेंगाडत असू.
मावशी कधीमधी भोकरांची भाजी करे. विशेष म्हणजे ह्या घरात माझ्या दोन मावश्या राहिल्या. तांबट आळीतील घर सोडल्यावर मोठी मावशी काही वर्षे इकडे होती, तिने ते भाड्याचे घर सोडल्यावर त्याच जागेत माझी दुसरी मावशी राहायला आली.
४१२ वकीलवाडीजवळच होते शालिमार. सीबीएस अर्थात सेन्ट्रल बस स्टॅण्ड वरुन सरळ येणारा रस्ता ह्याच चौकात येत असे. इथं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. आम्ही मात्र त्याला जॅक्सन गार्डन ह्याच पूर्वाश्रमीच्या नावाने ओळखत असू. ह्याच कलेक्टर जॅक्सनचा वध हुतात्मा अनंत विष्णू कान्हेरे यांनी केला होता. ही बाग मोठी होती आणि दोन भागांनी मिळून बनलेली होती. एका भागात हिरवळ, फुलझाडे असंत, तिकडे आमचे आईवडील, मामा, मावश्या गप्पा मारत बसंत आणि आम्ही पोरं खेळण्यांच्या ठिकाणी हुंडदत, जंगल जिम, घसरगुंड्या, झोपाळे, जिराफ, झुलता पूल अशी नानाविध खेळणी तिथं होती. बरोबर मध्यभागी रॉकेट होते. ते दोन तीन थरांनी बनलेले होते. पहिल्या थरात घसरगुंडी होती, नंतर आतलीच शिडी चढून रॉकेटच्या अग्रभागी आम्ही येत असू. आतमध्ये दोन लोखंडी बाकडी होती. हा भाग आम्हाला खूपच उंच वाटत असे. इथून सगळ्या बागेचे विहंगम दृश्य दिसे. खेळून झाल्यावर भेळभत्ता आणलेला असे, तो खाल्ल्यावर काही वेळा तिथं जवळच असलेल्या उसाच्या गुर्हाळातला रस आम्ही पीत असू.
कालांतराने ४१२, वकीलवाडीतले भाड्याचे घर मामाने सोडले व त्याने सिडकोत त्याने स्वतःचे घर घेतले. दुसरा मामाही तिथून जवळच राहायला आला. सिडकोतल्या घरापासून पांडवलेणे जेमतेम पाचेक किमी अंतरावर होते. गॅलरीतून कोरीव लेण्यांची माळ अगदी सहजच नजरेस पडे. तिथल्या विहारांचे स्तंभ देखील अगदी स्पष्ट दिसत. आम्ही बरेच वेळा पांडवलेणीच्या बसने तिथं जात असू. खूप नंतर पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक बांधलं गेलं, इतकं देखणं स्मारक पण दोन तीन वर्षातच देखभालीअभावी त्याची दुरवस्था होत गेली. मी आणि मामेभाऊ काहीवेळा सायकलले तिथे जात असू. एकदा तर पाथर्डी फाट्यामार्गे देवळाली आणि तिथून भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान बघायला गेलो होतो.
नाशिकला गेलो आणि रामकुंडात डुंबलो नाही असे सहसा होत नसे. . तेव्हा रामकुंड खूपच स्वच्छही असे. कमरेइतक्या पाण्यात आम्ही डुंबत असू. रामकुंडाच्या मागील बाजूस गांधी तलाव मात्र खोल असे, तिथे आम्ही अभावानेच डुंबलो. गांधीतलावातूनच रामकुंडाच्या पुढील पात्रात एक मोरी काढली होती. तिथून पाण्याचा फुफाटणारा प्रवाह बघण्यात मौज वाटे. रामकुंडातच पोहत असताना पायात काहीतरी टोकदार वस्तू घुसली होती तेव्हा मुंदडांच्या दवाखान्यात दोन टाके घातले होते हे आजही आठवते. दसर्याच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम गंगाघाटावर असे, ती फटाक्यांची रोषणाई एकदा पाहिली होती. नंतर गोदावरी अस्वच्छ होत गेली आणि आमचे गंगाघाटावर जाणेही कमी होत गेले. घाटावर अनेक मंदिरे होती. गंगा गोदावरी मंदिर, सांडव्यावरची देवी, दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर आणि तिथली भव्य घंटा. ही भव्य घंटा चिमाजीअप्पांनी वसईच्या स्वारीत जिंकून आणली होती. नारोशंकराचे मंदिर अतिशय देखणे आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी आले म्हणजे पूर आला तर नारोशंकराच्या घंटेला पाणी लागल्यास महापूर आला असे नासिककर म्हणतात. महापुराचे अजून एक परिमाण म्हणजे सरकारवाड्याच्या पायर्यांना पाणी लागणे. रविवार कारंजा आणि पंचवटी कारंजा ह्यांना जोडणार्या नाशिकच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया पुलाला लागूनच सुंदरनारायणाचे अप्रतिम मंदिर आहे. तिथं आम्ही बरेचदा जात असू. व्हिक्टोरिया पूल ओलांडल्यावर एक रस्ता नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात जाई. वाटेत सीतागुंफा असे. अरुंद अशा दगडी जिन्याने बसत बसत गेलं की सीतामाईच्या मंदिरात प्रवेश होई. दर्शन घेऊन वर आलं की रस्ता सरळ काळाराम मंदिराच्या आवारात जाई. जवळच कपालेश्वर मंदिरही होते. काळाराम मंदिर हे चहूबाजूंनी दगडी भिंत असलेले भव्य मंदिर. मंदिराचे दगड दुधात उकळून मंदिर बांधले असे म्हणतात. मंदिर अतिशय देखणे. मंदिराच्या पुढ्यातच हनुमान मंदिराचा मंडप. हनुमानाची मूर्ती थेट रामाच्या समोर. हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूने पाहिल्यास मंदिरातील काळा राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती दिसत. रामाच्या मंदिरात जायला १४ पायर्या असंत, ते म्हणजे १४ वर्षाच्या वनवासाचे प्रतिक. नाशिकला गेलो आणि काळाराम मंदिरात गेलो नाही असं सहसा होत नसे.
नाशिकहून बरेचदा वणीच्या सप्तशृंगीला जाणं होई. सप्तशॄंगीच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव, तिथून वणीला जायला मिनीबस असंत, एकदोनदा नांदुरीहून पायवाटेनेही सप्तशृंगीला गेलो होतो. मिनीबसने जात असतात पायवाट तीनचार ठिकाणी रस्त्याला छेदून जात असे. सप्तशृंगी देवी कड्यात वसली होती. सरळसोट उत्ताल कडा, कड्यातच मातेचं मंदिर. पाचेकशे पायर्या चढून आम्ही जात असू. देवीची शेंदुर लावलेली मूर्ती अतिशय भव्य, तिरकी मान, ताणलेले डोळे, अठरा हात. देवीच्या समोरच मार्कण्डेय गड होता, त्याच्या बाजूला रवळ्या जवळ्या, धोडपच्या खाचेचे दर्शन होई. आख्खी अजिंठा सातमाळ रांग तिथून खूपच सुंदर दिसे. खाली गावात बरेचदा बकरे बळी द्यायला आणलेले दिसत, हल्ली हे होत नाही. दर्शन घेऊन आल्यावर शीतकड्यावर जात असू, तिथून मार्कंण्डेय अगदीच समोर दिसे. तिथूनच एक अवघड पायवाट सरळसोट कड्याला लगटून खाली उतरे आणि सप्तशृंगी आणि मार्कंण्डेयाच्या खिंडीत जाऊन मार्कंण्डेय गडावर चढे.
नाशिकचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथली म्हसोबाची स्थाने. नाशिक अतिशय जुनं असल्याचा फिल ही स्थानं देतात. सुरुवात होई नाशिकरोडच्या घंटी म्हसोबा देवस्थानाने. एसटीतून येता जाता दिसणारे मंदिर त्याच्या मंडपात बांधलेल्या शेकडो, हजारो घंटांमुळे लक्षवेधी असे, इथे असंख्य भाविक नवस करीत आणि नवसाची पूर्तता घंटादानाने होई. ह्या असंख्य घंटा ह्या मंदिरात टांगलेल्या असंत. तुलनेने हे मंदिर मात्र अलीकडचे मात्र जुन्या नाशकात रस्त्यालगत म्हसोबाची असंख्य स्थाने दिसत, आजही दिसतात. भिंतीवर कोरलेले रेड्याचे मुख आणि त्याच्या आजूबाजूला त्रिशुळ, दंड. इतर कुठल्याही शहरात अशी स्थानं मी पाहिली नाहीत. म्हणजे म्हसोबा तसे सर्वत्रच दिसतात पण रेड्याचे मुख फक्त नाशकातच.
नाशिकला गेलो की बरेचवेळा सोमेश्वरला जाणं व्हायचं. सर्व नातेवाईक निघत. घरुन आणलेला डबा सोबत असे. वाटेत गोदावरीकाठचे नितांत सुंदर नवश्या गणपतीचे मंदिर असे. मंदिरात जाऊन आम्ही पुढे सोमेश्वरला जात असू. तिथं मग दर्शन मग वेगवेगळे खेळ खेळणे आणि सोमेश्वरचा धबधबा पाहणे असे कार्यक्रम होत. नदीच्या प्रवाहाने दगड कातून सोमेश्वरच्या घळी निर्माण झाल्या होत्या. पावसाळ्यात याचे अत्यंत रौद्र दर्शन होई. बरेचदा देवळाई कॅम्पलाही जाणे होत असे. तिथं गेलो की खंडोबाच्या टेकडीवर चढून सूर्यास्त बघणे आणि नंतर कॅम्पात फिरणे होत असे. देवळाई कॅम्प एकदम आखीवरेखीव होता. सरळ रेषेत दुकाने आणि त्याला छेदणारे समांतर रस्ते. स्वस्त आणि चित्रविचित्र वस्तूंच्या दुकानांमुळे इकडेतिकडे बघत कॅम्पात फिरायला मजा येई.
मी आणि भाऊ बरेचदा नाशिकच्या मेनरोडवरुन हिंडत. नाशिकचा मेनरोड म्हणजे एकदम भारी. दुतर्फा विविध दुकानं व त्याला लंबाकार असणारे सर्व रस्ते गंगाघाटावर जात. एकदा असेच कुठलातरी सिनेमा पाहू म्हणून मेनरोडच्याच मधुकर टॉकिजला आम्ही टर्मिनेटर-जजमेन्ट डे पाहिला तो ९० च्या दशकात. क्वचित अशोकस्तंभाजवळच्या चित्रा, विकास या थिएटर्समध्ये देखील सिनेमे पाहणे होई. रविवार कारंजापासून सुरु होणारा मेनरोड भद्रकालीजवळ संपे, तिथून रस्ता वळून शालिमारला येई.
नाशिकची खाद्यसंस्कृती हा वेगळाच विषय. नुसत्या मेनरोडवरही खाण्यापिण्याची चंगळ असणारे स्पॉट्स असंत. सुरुवात होई ती आरकेवरील अननसाच्या सरबताने. तिथं एका हातगाडीवर हे सरबत मिळे. अत्यंत चविष्ट,सरबतात अननस आईसक्रीमचा गोळा टाकला जाई. आता ह्या हातगाडीचे दुकान आले आहे. पुढेच सुरती मिठाईवाल्याचे दुकान असे. आतल्या बाजूस बसायला बाकडी टाकलेली असंत, तिथे कढीभेळ मिळे. हा एकदम स्वादिष्ट प्रकार होता. मेनरोडवरच माधवजी, मकाजी, कोंडाजी अशा चिवडेवाल्यांची दुकाने असंत मात्र खरी मजा यायची ती भद्रकालीजवळच्या मकाजी पहिलवानाच्या दुकानात. इकडचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जागेवर बसून चिवडा खाता येई. दुकानात खुर्च्या टेबलं होती. अर्धाशेर गरमागरम ताजा चिवडा मागवायचा. सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर असे. लैच जबरी लागायचा तो. भद्रकालीलाच बुधाची फेमस जिलेबी मिळायची. जिलबी मात्र विशेष आवडता प्रकार नसल्याने मी त्याच्या वाटेला फारसा जात नसे. तिथून जळच सायंतारा साबुदाणावड्याचे दुकान होते, अजूनही आहे. इथल्याइतका खुसखुशित साबुदाणावडा मी दुसरीकडे कुठेही खाल्ला नाही. इथे कायम वड्यांसाठी रांगा असतात. एका प्लेटीत दोन वडे घेऊन वडेवाला शेंगदाणा, तिखट आणि दह्यापासून बनवलेली भरपूर चटणी प्लेटीत ओतायचा. ती चटणी प्लेटभर पसरत असे. तिचा आकार आणि रुप पाहून आम्ही त्या वडा प्लेटीला उलटीवडा म्हणत असू मात्र ती भयंकर टेस्टी असे.
मेनरोडलाच पांडे मिठाईवाल्याचे दुकान होते. त्याची अजून एक शाखा पंचवटीत आहे. लस्सी प्यावी ती पांडेचीच. इथली लस्सी पिता येते हे तिचे वैशिष्ट्य. इतर ठिकाणांसारखी ती चमच्याने खावी लागत नाही, पातळ श्रीखंडासारखी ती लागत नाही, जेलीसदृश दिसत नाही. इथला जंबो ग्लास जवळपास अर्ध्या लिटरचा असावा. लस्सी किंचित अगोड वर मलईचा गोळा. पांडेकडची मलई बर्फी तर लैच जबरी. केळीच्या पानावर बर्फी वाढून तो द्यायचा. शालिमारपासून जवळच असलेल्या नेहरु उद्यानाच्या समोर असलेली शौकिन भेळपुरी तर लाजवाब. शौकिनइतक्या वेगाने भेळ बनवणारा अजून कोणी मी तरी पाहिला नाही. पातेल्यात भेळ झटपट तयार करुन विद्युतवेगाने तो कागदाच्या पुड्यात भरे व त्यावर बारीक शेव पसरे. मात्र भेळेपेक्षाही इथली पाणीपुरी जास्त भन्नाट असे. बर्फ टाकून बनवलेले चिंचेचे थंडगार पाणी आणि त्यावर बटाटा कुस्करुन केलेला मसाला. सर्वसामान्यांसाठी नॉर्मल पाणीपुरी मिळे मात्र पट्टीच्या खवय्यांसाठी इथली झटका पाणीपुरी खूपच फेमस असे. शौकिनने त्याचे मायक्रो, मिनी आणि मेगा असे तीन प्रकार पाडले होते. बटाटा कुस्करुन तो त्याचा खास चाट मसाला त्यात मिसळे आणि भरपूर लाल तिखट टाकत असे. तो गोळा एकत्र करुन पुरीत चिंचेचे थंडगार पाणी करुन त्यावर त्या ढिगाचा डोंगर पसरे. डोंगराच्या चढत्या आकाराप्रमाणे त्याचे मायको, मिनी, मेगा असे प्रकार होत. मेगा झटका भलतीच जहाल असे. एक पाणीपुरी खाल्यावरच नव्यांचे कान अगदी बधिर होत जात. मेगावाल्यांना तो आधी विचारे ,"तुम्ही उद्या गावाला तर जात नाही आहात ना? तरच खा". भलेभले एका पाणीपुरीतच गारद होत असत. मग तो स्वत:हून सौम्य पाणीपुरी देई. काही पट्टीचे मात्र सहाच्या सहाही मेगा झटका पुर्या खात. माझ्यासाठी एक झटका पुरे होई. हा झटका बसल्यानंतर ह्याचे परिमार्जन करण्यासाठी राउतला जाणे गरजेचे होई. भद्रकालीच्या समोर असलेल्या राउतकडे सोड्याचे विविध प्रकार मिळत. त्यातला डबल जीरा मसाला सोडा आमच्या खास आवडीचा. हा एकदम सुपरस्ट्राँग सोडा होता. नाकातून झण्ण्ण् झिणझिण्या निघत. ते फिलिंग एकदम जबरी वाटे. मेनरोडलाच अकबर सोडेवाल्याचेही हॉटेलवजा दुकान होते, त्याच्याकडेही सोड्याचे भरपूर प्रकार मिळत पण राऊत सोडेवाल्याची चव त्याला नाही.
नाशिकला जाणे आणि अंबिकाची मिसळ चुकवणे म्हणजे महापाप. ही नाशिकची प्रसिद्ध काळ्या मसाल्याची मिसळ. अगदी सकाळपासून मिसळीसाठी तिथं रांगा लागत. जागा तुलनेने खूपच लहान. कशीबशी जागा मिळे, एका ताटलीत शेव, फरसाण, कांदा येई त्यावर काळा रस्सा पसरलेला असे शिवाय एक वाडगा भरुन रस्साही सोबत येत असे. एकदम चवदार मिसळ. ह्याच्या चवीमुळे हा मिसळीत झिंगे/सोडे घालतो अशी वदंता होई. म्हणून ह्याने नंतर चक्क दुकानात मिसळीच्या बोर्डावर शुद्ध शाकाहारी असे लिहिले होते. सातपूरला श्यामसुंदरची मिसळ फेमस असे, त्याकाळी तिथे मिसळीसोबत येणारे पाव भाजून मिळत, मिसळीपेक्षा ते आकर्षण जास्त असे. पाथर्डी फाट्यालगतच्या एका हॉटेलातही मिसळ चांगली मिळत असे. नाशिकचा कॉलेजरोड हा तिथला उच्चभ्रू परिसर, तिथल्या समोरासमोरील दोन मिठाईंच्या दुकानांत कचोरी-समोसा छान मिळत. सिडकोतल्या मामाच्या घराजवळ स्टेटबॅन्केच्या बाजूला चौपाटी होती. तिथला आदर्श समोसा खूपच भारी. बॅन्केसमोर वडापाववाल्याची एक हातगाडी होती, त्याचा धंदा इतका वाढत गेला की त्याने समोरील आख्खी बिल्डिंगच बिकत घेऊन टाकली होती. इथली कापसेकी बादशाही कुल्फी लैच भारी असे. प्युअर बासुंदीची कुल्फी तो देई.
नाशिकला असताना त्रंबकेश्वर, अंजनेरीलाही जाणे होत असे. तिकडील डोंगर एकदम कड्यासुळक्यांचे. अंजनेरी तर प्रचंड मोठा डोंगर खालून त्याची भव्यता नजरेस येत नसे. अंजनेरीलाच १२ व्या शतकातली जैन, हिंदू मंदिर संकुले आहेत. ब्रह्मगिरीवर जाणे फार आवडत असे. गंगाद्वार सततच्या पायर्यांमुळे उगाच दमछाक करणारे वाटे मात्र ब्रह्मगिरी उंच असूनही तिथल्या अद्भुत द्वाररचनेमुळे, आजूबाजूच्या खड्या कातळसुळक्यांमुळे जाणे मोठे आनंददायक होई. तिथे माकडांचा भयानक उपद्रव असे. ब्रह्मगिरीच्या पश्चिम कड्यावर जटामंदिर आहे, ज्वालामुखीजन्य खडकांची ही रचना. ह्या अशा रचनेमुळे तिथे शंकराने जटा आपटून गंगेला मुक्त केले असे भाविक मानतात. पलीकडे उतरणारी एक अवघड वाट ह्याच कड्यातून जाणारी. समोर हरिहरचा त्रिकोणी सरळसोट कातळकडा अगदी नजरेत भरे. ब्रह्मगिरीपेक्षाही काकणभर अधिकच भव्य असलेला बाजूचा ब्रह्मा पर्वत अधिकच भव्य दिसे.
बालपणीचे दिवस सरले, नंतर नोकरीच्या व्यापामुळे हळूहळू नाशिकला जाणे कमी होत गेले. माझ्या तिकडे जाण्यापेक्षा मामांचेच इकडे येणे अधिक होते. गेल्या चारसहा वर्षात नाशिकला जाणे झाले नाही. शेवटचे गेलो होतो ते नाशिकच्या एका मामेभावाच्या घरी सरसंघचालक मोहनजी भागवत आले होते तेव्हा. ते त्याच्याकडेच मुक्काम्/इ होते. नाशिकला त्यांची एक मोठी सभा आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठका होत्या. एकदम साधा माणूस. त्यांच्यासोबत संध्याकाळी टेरेसवर शाखा करुन चक्क 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही संघप्रार्थना मीही म्हटली होती. शाखेत अगदी लहानपणी गेल्यानंतर दोनेक दशकांनी पुन्हा एकदा खुद्द सरसंघचालकांसोबत शाखा करण्याचा योग आला. त्यानंतर मात्र नाशिकला अजूनही गेलो नाही, दरवर्षी जाऊ म्हणतो पण काही ना काही कारणाने जाणे लांबतच जाते. ह्यावर्षी बाईकने जायचा प्लान होता तर लॉकडाउनमुळे राहिले. मात्र जाणे जरी होत नाही तरी तिथल्या आठवणी थोडीच पुसता येतात, त्या तर मजसोबत कायम आहेतच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthisthttps://www.misalpav.com/node/36112