Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संवाद

A
aanandinee
Fri, 08/07/2020 - 01:07
💬 104 प्रतिसाद
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा? आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे. मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल. अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया. • फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती) • Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती) • हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती) • सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती) • पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका) सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं. भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं. सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं. सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही. भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते. भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ... डॉ. माधुरी ठाकूर https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1

प्रतिक्रिया द्या
37205 वाचन

💬 प्रतिसाद (104)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/07/2020 - 04:35 नवीन
डॉक्टर, लेखन माहितीपूर्ण आहे, मन:पूर्वक आभार. पुढील भागांंच्या प्रतीक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 08/10/2020 - 05:23 नवीन
+1 हेच म्हणायचंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
B
Bhakti Fri, 08/07/2020 - 06:20 नवीन
खुप अभ्यासपूर्ण लेखन.अभिनंदन.खुपच छान वाटलं वाचताना.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 08/07/2020 - 06:46 नवीन
रोचक. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/07/2020 - 07:05 नवीन
या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाबद्दल आपण लिहिता आहात हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मनोविकाराबद्दल एकंदर गैरसमजच जास्त आहेत. ज्यात हे कधीच बरे होणार नाहीत पासून मनोविकार तज्ज्ञ नुसत्या झोपेच्या गोळ्या देतात पासून अशा औषधांचे साईड इफेक्टसच जास्त आहेत आणि त्यांचा काहीही फायदा होत नाही पर्यंत. हि स्थिती सुशिक्षित माणसांची आहे यात अनेकदा डॉक्टर सुद्धा गैरसमजांचे बळी पडलेले दिसतात. मग अशिक्षित माणसात तर हे "बाहेरचं" आहे. करणी केली आहे भूतबाधा आहे पासून मनोविकार तज्ज्ञांकडे गेले तर ते शॉकच देतात पर्यंत. याशिवाय अंधश्रद्धा आणि गैरसमजुती तर बक्कळ आहेतच. आपण जितक्या विस्ताराने लिहाल तितके गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
A
aanandinee Fri, 08/07/2020 - 20:27 नवीन
सुबोध, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. मनोविकारांबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत. मी जे शिकले आहे, पाहिलं आहे ते या लेखमालेत सोप्या शब्दांत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Fri, 08/07/2020 - 19:44 नवीन
पुढील भागाची वाट बघतोय. हि लेखमाला इतरांनाही फॉर्वर्ड करणार.
  • Log in or register to post comments
A
aanandinee Fri, 08/07/2020 - 20:28 नवीन
आपल्या प्रतिक्रियेकरिता धन्यवाद! पुढला भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट करण्याचा विचार आहे. लेखमाला अवश्य share करा. वर लिहिल्याप्रमाणे Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
A
aanandinee Fri, 08/07/2020 - 20:16 नवीन
  • Log in or register to post comments
A
aanandinee Fri, 08/07/2020 - 20:17 नवीन
डॉ. बिरुटे, भक्ती, रातराणी आपल्या प्रतिक्रियांकरिता खरंच आभारी आहे. मी या वेळी प्रतिक्रियांची विशेष वाट पाहत होते कारण फार वैद्यकीय शब्दांचा मारा होत नाहीये ना, साधारण प्रतिसाद कसा आहे याची मला खूप उत्सुकता होती. आपल्या प्रतिक्रियांनी हुरूप आला आहे
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/07/2020 - 20:43 नवीन
मुळात भय हे एकच आहे > आपण नष्ट होऊ ! याची दोन उपांग आहेत > एक, शरीर नष्ट होईल आणि दोन, प्रतिमा भंग होईल. तुम्ही दिलेले साहीप्रकार या मुळ भीतीत येतात. भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही. आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 09/03/2020 - 06:29 नवीन
आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.
भिती घालविण्याचा ह्या पेक्षा दुसरा चपखल मार्ग नाही.
ते थांबवण्याच्या दोन हमखास लागू पडणाऱ्या पद्धती म्हणजे ‘मन प्रयत्नपूर्वक दुसऱ्या विचाराकडे वळवणं’ (distraction technique), आणि साक्षी भाव (mindfulness)
आनंदीनी यांनी दुसर्‍या भागात साक्षी भाव (mindfulness) हा मार्ग सांगितला आहे, त्यानेच संक्षी म्हणता आहेत तो उलगडा होऊ शकतो. - (मनस्वी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Sat, 08/08/2020 - 08:23 नवीन
है शाबास तज्ज्ञ-- पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ... सर्वज्ञ -- भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/08/2020 - 20:21 नवीन
मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे. ज्याप्रमाणे चित्रपट हा अनेक स्थिर चित्रं गतीमानतेनं डोळ्यासमोरुन नेल्यावर हालचालीचा भास होतो; तसा अनेक विचारांच्या गतीमान प्रवाहामुळे मनाचा भास होतो. हे कळल्यावर तुमची निम्मी भीती संपेल, कारण मन अशी काही अज्ञात शक्ती नाही. एकेक विचार वेगवेगळा आहे. भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे. हा झाला पार्ट वन. _______________________________________ विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे. हे देखिल पिक्चरप्रमाणेच आहे. जेवढा तो व्यक्तीला खरा वाटतो तितका तो सखोल परिणाम करतो. विचार हा भ्रम आहे म्हटल्यावर त्यामुळे भीती निर्माण होणं अशक्य आहे. अर्थात, यासाठी तुमच्याकडे कमालीचा अवेअरनेस (सजगता) हवा. अवेअरनेस म्हणजे नक्की काय हे अप्रिय आठवणींपासून सुटका प्रकरणात तुम्हाला सांगितलं आहेच. कारण तिथेही नेमका हाच प्रश्न होता; लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. ते वाचा म्हणजे तुम्हाला आणखी लाईट पडेल. आणि हे देखिल कळेल की नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, मग मला प्रतिसाद देतांना ते भान कायम राहील. अर्थात, तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! तस्मात, आता मुद्दा भरकटवणे आणि व्यक्तिगत प्रतिसाद देणे टाळाल तर पुन्हा उघडे पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:41 नवीन
आम्ही कशाला मुद्दा भरकटवू. आम्हाला एवढाच कळतं कि कोणी एखाद्या विषयात ( येथे मनोविकाराशास्त्रात) पदव्युत्तर तीन वर्षे घासली आहेत. आणि त्यानंतर अनेक वर्षे व्यासंग केला आहे. त्यांना थोडं तरी कळत असेल कि नाही? मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, काय विचार मौक्तिके आहेत ( हायला पण विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे --इति सर्वज्ञ) म्हणजे हि पण विभ्रम मौक्तिके आहेत तर. तुम्हाला आणखी लाईट पडेल.तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! आम्ही काय सर्वज्ञ आहोत का लाईट पडायला? आणि पडला तर उचलून घेऊ हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 08/10/2020 - 07:53 नवीन
असं दिसतंय. तुम्हाला शब्दच्छलाशिवाय काहीही जमत नाही. आता सांगा : १. कुठे असतं हे मन ? २. ज्या विचाराची चर्चा चालू आहे तो वस्तुस्थिती विभ्रमित करण्यापलिकडे काय करतो ? ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ? ४. इतकी वर्ष मेडिसिनमधे (घासून का काय ते) तुम्हाला मुद्दा कसा लक्षात येत नाही ? का न वाचता आणि विचार करता प्रतिसाद ठोकता ? आता लेखिकेचं मत जाणून घ्या म्हणजे जास्त शोभा होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 09:26 नवीन
जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे अर्थातच म्हणून तर लेखिकेला पुढचे भाग सविस्तर लिहायला सांगितले आहेत. आपण तर कोण कुठले-- गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी झालंच तर श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम अशा संतांना सुद्धा न समजलेले अध्यात्म कोळून प्यायला आहात. आम्ही साधे चार बुकं वाचलेले मुमुक्षु भिक्षुक आहोत, आपल्यासारखे शत ग्रन्थ पचवून उच्चपदाला पोचलेले व्युत्पन्न अन सर्वज्ञ थोडीच आहोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 08/10/2020 - 15:02 नवीन
मुमुक्षु भिक्षुक झाली म्हणजे बरीच प्रगती आहे ! आता मुद्दा पकडायला शिका > जाणीव वर्टीकल व्हायला ते फार उपयोगी आहे. भय काय आहे आणि मन अशी काही चीज आहे का ? यावर चर्चा चालू आहे. संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/11/2020 - 10:28 नवीन
जाणीव वर्टीकल व्हायला हायला जाणीव हॉंरीझॉन्टल असते का? संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत. इथे आम्ही कुठे मरायला लागलोय कि संतांकडे वाचवण्यासाठी साकडं घालून बसलोय ? बाकी तुमच्या सारख्या माणसाशी वाद घालायला लै मज्जा यायलीये बघा. तर मुद्दा कसा पकडायचा? हा मुद्दा आहे सध्या. ते मन आणि भय राहू दे बाजूला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 08/11/2020 - 11:16 नवीन
जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?
अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित विचार म्हणजे जाणीवेचा रोख त्या विचारांप्रमाणेच हॉरिझाँटल असतो. त्याचा परिणाम म्हणजे मुद्दा कळत नाही. काल काय प्रतिसाद दिला ते आज लक्षात रहात नाही. एकदा दुसर्‍याची लायकी, मग प्रतिसादाची लायकी आणि शेवटी स्वतःची लायकी काढतो ! जाणिव वर्टीकल होणं म्हणजे संपूर्णपणे वर्तमानात असणं. करा ट्राय म्हणजे मुद्दा समजेल आणि त्याला मुद्दा पकडता येणं म्हणतात हे पण कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/11/2020 - 15:16 नवीन
मग आडवं पडलं कि जाणीव व्हर्टिकल होईल कि. (म्हणजे झोपेपूर्वी चिंतन केलं कि !) ते आइन्स्टाइन सापेक्षता वादाचा सिद्धांत म्हणून "काही तरी" सांगून गेलाय एवढं सोपं असून तुम्हाला समजलं नाही? सर्वज्ञ असूनही? आश्चर्य आहे ! बघा मुद्दा सापडला का? किंवा पकडता आला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Mon, 08/10/2020 - 13:29 नवीन
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?
हाहाहा!!! ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 08/10/2020 - 14:02 नवीन
> ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. यापेक्षा काही वेगळा प्रकार होता का ? तुम्ही कल्पनेतलं पिस्तुल काढून समोर नसलेल्या व्यक्तीचा गेम करायचा प्रयत्न करत होता ! आणि तो ही भिजलेल्या बनीयनवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Mon, 08/10/2020 - 16:58 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 08/11/2020 - 10:37 नवीन
तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य आहे पहा. कल्पनेतच गेम करायचा तर फडतूस पिस्तूल कशाला काढायचं. त्यातून नेम चुकला तर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा खटला उभा राहील ना( कल्पनेतका होईना) चांगला रणगाडा क्षेपणास्त्र नाही तर गेला बाजार बॉम्ब तरी हवा होता. कल्पनेतच गेम वाजवायचा म्हणजे जोरदार का नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Tue, 08/11/2020 - 10:49 नवीन
राफेल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकस२१२ Tue, 08/11/2020 - 01:32 नवीन
संक्षी आपला पहिला प्रतिसाद चांगले होता, त्यातील "भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही ( एक सर्वसामान्य माणूस म्हणून ) पण यात तज्ज्ञ सांगू शकतील जास्त पण आपल्याला एक विचारू का.. का हो तुम्ही सांगल्यांशी भांडता... आता तुम्ही म्हणाल.. येथे डॉ खरे यांनी तुमचं वॉर टिप्पणी केली म्हणून अशी टिपण्णी येते याला काय कारण असू शकेल हे कधी आपल्या मनाला विचारलाय का ? याचं कारण हे असू शकत का ... प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे ,, आणि क्लिष्ट कार्याचे...हि आपली सवय आपण हुशार तर आहातच ( हि चेश्टा नव्हे आपल्या लेखांतून दिसते म्हणून म्हंटले ) पण असा भांडकुदळ पणा करण्यात वेळ का घालवता? आपली अकौंटिंग नयनातील काहीतरी सांगत जा हो .. सगळ्यांना फायदा होईल असो डॉ माधुरी यांच्या कडून त्यातील अजून कळेल तर बरे आणि अजून एक, सर्वांनाच उद्देशून, खास करून वैद्यकीय बाबींबद्दल कोणी लिहीत असले तर त्यांनी आपण कसले डॉक्टर आहोत किंवा त्या विषयातील आपण कोण आहोत हे नक्की लिहावे , सही च्या खाली .. कारण वैद्यकीय विचार, माहिती आणि सल्ला ह्या फार मह्त्वाचया गोष्टी आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 08/11/2020 - 07:11 नवीन
त्यांना सल्ला देण्याचं धाडस करा. मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल.
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
भय हा मूळ प्रश्न आहे, कशाचं भय हे दुय्यम आहे. कारण आपण संपू ही एकमेव भीती सर्व कारणांमागे दडलेली आहे. जर आपल्याला काहीही संपवू शकत नाही हा उलगडा झाला तर कोणत्याही कारणानं भय निर्माण होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Tue, 08/11/2020 - 09:34 नवीन
"....तुमच्याकडे काही समज असेल तर .." संजय क्षीरसागर हे राम... खरंच तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही... सतत दुसऱ्याला अक्कल शिकवत राहा... तुमच्या क्लायंट बरोबर पण असेच वाद घालता काहो ? https://www.youtube.com/watch?v=DCXDyIsPEN8&list=RDWFdNRFAqvDA&index=१२ १:१० विक्रम गोखले टू नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 08/11/2020 - 09:47 नवीन
अक्कल तुम्ही मला शिकवतायं ! बघा :
प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे
आणि मी तुम्हाला म्हटलं मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल >तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ? कमाले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Tue, 08/11/2020 - 12:43 नवीन
- 'प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे' मि? कधि तसा आव आणलाय .. २-३ विषयात थोडा अनुभव आहे तिथेच लिहितो, नाट्य, स्थलांतर , ट्रेडिंग ( फिनंसिअल) इत्यादी आणि १-२ आवडी, फिरणे खाणे पिणे एवढेच ,( राजकारण यावर तर सगळेच बोलतात आणि भांडतात ) " त्यांना ( डॉ खरे )सल्ला द्या " म्हणता तुम्ही..... अहो कशाला... बहुतेक मंडळींना त्यांचे लिखाण आवडते ( मतभेद असले तरी) नाही वाटत मला कि ते अनाठावी सर्वन्यानी असे वागतात म्हणून, मग कशाला त्यांना सल्ला देऊ? -'तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ?' मला? कशाला? उलट मी तुम्हाल दाखवून देतोय कि तुम्ही किती भांडताय ते .. बरं तुमचं विषयी काही चांगले बोलावे / चांगला प्रतिसाद तरी तरी तुम्ही गुरकावणार असो तुमचा शब्द शेवटचा आणि खरा... बसा उगाळत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सोत्रि गुरुवार, 09/03/2020 - 06:51 नवीन
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
हे का पटलं नाही हे तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं तर काही चर्चा होइल. (संक्षींनी का करत येत नाही हे स्पष्ट केलं आहे.) ता.क.: व्यक्तिगत शेर्‍यांकडे दूर्लक्ष केलं तर साधक बाधक चर्चा (ह्या धाग्याच्या विषयाशी सुसंगत) करता येइल. - (चर्चोत्सुक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सोत्रि गुरुवार, 09/03/2020 - 06:38 नवीन
भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.
कोणतीही भावना हा विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच असतो.
विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.
विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच अतिशय प्रचंड वेगाने होतो आणि तसं होणं हे 'ऑटो पायलट' मोडमधे आपसूकच होते. त्यामुळे विचार खरा वाटू लागतो. जाणीवेत राहून विचारांकडे तटस्थ बघण्याची (mindfulness) साधना करत राहिलं की विचांराना व्यक्तिगत रिस्पॉन्स देणंं हळूहळू कमी होत जातं. - (Mindful होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शा वि कु गुरुवार, 09/03/2020 - 07:43 नवीन
जरी एकवेळ मानलं, की आपण केवळ शरीर नाही, पण आपण शरीर आजिबात नाही हे पटत नाही. संक्षींना आपली शरीर सोडून काही ओळख असते असे वाटते हे वाचून फार आश्चर्य वाटले. (मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही.) माझे शरीर ही माझी ओळख आहेच. म्हणून तर माझे हात पाय कापले जाऊ नयेत अशी माझी अगदी मनापासून आणि तीव्र इच्छा आहे. याबाबत मी जरासाही उदासीन नाही. उदा – मी व्हॉट्स अॅप स्टेटस बाबतीत उदासीन असतो कारण ती माझी ओळख नाही हे मला पुरेपूर पटत. शरीराची जीवापाड काळजी घेऊन शरीर नष्ट होणे ह्यात काही भिण्यासारखे नाही असे म्हणणे – पटण्यासारखे नाही वाटत. त्यामुळे आनंदिनी यांनी उल्लेखलेले भीतीचे विविध प्रकार हे केवळ अध्यात्मिक गैरसमजातून आले आहेत असे नाही वाटत. तसे मानणे या गोष्टींना फार अंडर एस्टिमेट करणे होईल. डिप्रेस्ड व्यक्तीला "डिप्रेस्ड राहू नकोस ना मग." असा सल्ला दिल्यासारखा. अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म, पिनपॉइंट समस्यांवर आहे. त्यामुळे हे अवांतर होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि गुरुवार, 09/03/2020 - 09:03 नवीन
अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म
नेमकं उलटं होतय. शारिरीक पातळीवरची जाणिव ही स्थूल (Gross Reality), त्याच्यापलीकडची जाणिव ही सूक्ष्म (subtle reality).
मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही
ही मानण्याची गोष्ट नसून अनुभूतीची अवस्था आहे. - (शरीर आणि मन ह्यांच्या पलीकडचा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु गुरुवार, 09/03/2020 - 10:48 नवीन
हे असं होतं "जीवन समरसून जगा, जीवनात चढ उतार येतात" हे जेनरिक वाक्य ओके आहे. एक जीवन जगण्याचा मंत्र म्हणूनसुद्धा चांगले आहे. पण हे वाक्य क्रॉनिक डिप्रेशन सारखा रोगावर इलाज आहे काय ? किंवा " डेबिट व्हॉट कमस इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट" हे रियल अकाउंट्स चे मुख्य सूत्र आहे, जे बारावीत शिकवले जाते. हे चुकीचे आजिबात नाही, आणि खरतर यातच सर्वकाही समावल आहे. पण सीए फायनल ला येणारे प्रश्न केवळ या ढोबळ सूत्राने सोडवता येत नाहीत. अश्या प्रकारे मला "शरीराच्या जाण्याची भीती अनाठायी वाटते" हे वाक्य ढोबळ वाटते. तुम्हाला सूक्ष्म वाटत असेल तर ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/03/2020 - 11:11 नवीन
आता जिथे बसला आहात तिथे, खुर्चीला पाठ टेकवून शांतपणे डोळे मिटा. तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलं आहे आणि आपल्याला कळतंय. आपणच शरीर असतो तर असं कळणं शक्य नाही. या नंतर धारणा निस्सरण आणि मी डिवेलप केलेली एक ध्यानपद्धती यामुळे आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव सघन होत जातो. यथावकाश निद्रेत ही अनुभुती आली की शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय ही स्थिती येते. आपण मृत्यूला पार करतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥ या श्लोकाचा नेमका अर्थ तो आहे. संकेतस्थळावरच्या लोकांना अध्यात्मात शून्य रस आहे (इथे बहुतेक देवभोळे आहेत) त्यामुळे इथे त्याविषयीचं लेखन मी बंद केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु गुरुवार, 09/03/2020 - 11:25 नवीन
मान्य आहे, अशी अनुभूती येते. पण याचा शरीर सोडून स्वची जाणिव असू शकते असा अर्थ नाही वाटत. उदाहरणार्थ , मेंदुशिवाय/हृद्य थांबल्यावर/चेतातंतूच्या जाळ्याशिवाय ही जाणीव असेल का ? शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/03/2020 - 11:34 नवीन
फक्त व्यक्त जाणण्यासाठी आहे. स्वतःला जाणण्यासाठी न्यूरो सिस्टमचा काहीएक उपयोग नाही कारण आपण अंतीम आहोत. स्व स्वतःला जाणू शकत नाही कारण जाणण्यासाठी आपण स्वतःला स्वत:पासून वेगळं करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
अ
अर्धवटराव Fri, 09/04/2020 - 05:18 नवीन
आपण शरीर नाहि.. कारण शरीर अ‍ॅज सच काहि नाहि. अवयवांच्या असेम्ब्लीला शरीर म्हणतात. अवयव देखील अस्तीत्वात नाहि. एक प्रचंड पेशी समुह म्हणजे अवयव. पेशी देखील अस्तीत्वात नाहि. काहि रसायनांची असेम्ब्ली म्हणजे पेशी... असं कितीही सुक्ष्मात जाता येते. शरीर म्हणा किंवा पर्वत, सूर्य म्हणा किंवा अमीबा... तत्वतः हे असं काहिच अस्तीत्वात नसतं.. आपल्याला कुठलिही गोष्ट तिच्या स्वरुपानुसार कळत नसुन कार्यावरुन कळते. तुम्ही कार्याचे कॉण्टेक्स्ट बाद करत चला.. मग प्रत्येक गोष्ट एका युनिफॉर्म ऑब्जेक्टमधे परावर्तीत व्ह्यायला लागते. या प्रकारे विश्वाची युनिफॉर्मीटी लक्षात आलि कि सारं सुख-दु:ख त्यात विरघळुन जाईल. डिप्रेशन वगैरे तर नावाला देखील राहाणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
अ
अर्धवटराव Fri, 09/04/2020 - 05:21 नवीन
यात अध्यात्म वगैरे काहि नाहि.. साधा कॉमनसेन्स आहे.. विज्ञानाची सिद्धता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
शा वि कु Fri, 09/04/2020 - 05:51 नवीन
तुमचं म्हणणं अर्थातच बरोबर आहे. पण मायक्रो असण्याने मॅक्रो का रद्द करावा ? आणि अणू/ पेशी/केमिकल्स/अवयव/शरीर हे माझ्या "मी" असण्यासाठी मस्ट आहेत. इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 09/04/2020 - 20:22 नवीन
अजीबात रद्द करु नये. इन फॅक्ट या सर्व आपला "मी' च्याच अवस्था आहेत. त्यातल्या किती जाणवतात, किती नाहि हे व्यक्तीपरत्वे/परिस्थीतीनुसार ठरतं.. पण त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडीटीला बाधा येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
R
Rajesh188 Sat, 08/08/2020 - 08:49 नवीन
भीतीच्या ह्या सर्व प्रकारातील एका प्रकारची भीती जास्तीजास्त लोकांना असते. सर्वांना कशाची तरी भीती वाटतं असते. मी दुचाकी वर माग बसलो की गाडी चालवणं रा काळजी पूर्वक गाडी चालवत नाही कधी ही accident करू शकतो अशी भीती वाटते. पण स्वतः चालवत असताना ती भीती वाटतं नाही.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sat, 08/08/2020 - 08:55 नवीन
Dr. मैडम आपन खुप छान संमजावत आहात पुढचे भाग येऊ दया आम्ही वाट पाहतोय, आणी हो एक महत्वाचे इथे स्वयंघोषित महावतार पन आहेत ज्याना सगळ सगळ कळत ते भोचकेगिरी करायला आले तरी दुर्लक्ष करा ही नम्र विनंती :)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 08/08/2020 - 09:11 नवीन
लेख वाचुन असे वाटले कि लेखात उल्लेखिलेल्या सगळ्या भीती मला कमी अधिक प्रमाणात वाटतात. : )
सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
माझ्या एका मित्राची आई टी.वी वर देखील साप पाहु शकत नसायची. त्यावेळी छायागीत चित्रहार मध्ये नगीना नागीन वा तत्सम नागधारी चित्रपटातील गाणी सर्रास लागायची तेव्हा त्या, त्या गाण्यापुरते मान वळवुन घेत असत.
  • Log in or register to post comments
श
शुभावि Sat, 08/08/2020 - 18:56 नवीन
  • Log in or register to post comments
श
शुभावि Sat, 08/08/2020 - 18:57 नवीन
  • Log in or register to post comments
श
शुभावि Sat, 08/08/2020 - 18:57 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 08/09/2020 - 08:01 नवीन
छान सुरवात. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा