कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा).
प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे :
मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो. तोपर्यंत करोनाबद्दल फारशी काळजी करण्यासारखे वातावरण नव्हते. उदयपुरात बाजार वगैरे सर्व नेहमीप्रमाणे चालू असले, तरी परदेशी प्रवासी कंपन्यांनी केलेली मोठमोठी हॉटेल- आरक्षणे रद्द केली गेली होती. परिणामी टॅक्सीवाले, गाईड, खास गोऱ्या टुरिस्टांसाठी बनवलेले सामान विकणारे दुकानदार वगैरे मंडळीत घबराट पसरलेली होती.
दिल्लीला परतल्यावर Luftansa कडून परतीची उड्डाणे रद्द झाल्याचे समजले, मग धावपळ सुरु झाली. पुढले सर्व बेत रद्द करून शक्य तितक्या लवकर अमेरिकेला परतणे मुलांसाठी गरजेचे होते. सरतेशेवटी भारतातून अमेरिकेला जाणारे एरिंडियाचे अगदी शेवटले उड्डाण गाठून मंडळी तिकडे पहुचली, आणि पुन्हा घरी आम्ही दोघेच उरलो.
यथावकाश टाळ्या - थाळ्या - पणत्यांसह गाजावाजा होत ताळेबंदीचा प्रकार सुरु झाला. मार्च-एप्रिलात दिल्ली परिसरातले हवामान मस्त असते. त्यातून आकाश अगदी निळेभोर आणि संध्याकाळची आकाशातली रंगांची नित्यनूतन उधळण.
(ऐका : रवींद्रनाथांची रचना: নীল দিগন্তে ওই ফুলের আগুন লাগল )
https://www.youtube.com/watch?v=Hq5CM0IJMoE
अशा आकाशात मुक्तपणे विहरणारे पक्षी, प्रदूषण- धुळीपासून मुक्ती, आजवर अननुभूत अशी शांतता, घराबाहेर पडायचे नसल्याने आपसूकच लाभणारी विश्रांती, या सर्वातून “प्रभू अजि गमला” असे वाटू लागले. वाचन चित्रकला, संगीत यात मनसोक्त रमता येऊ लागले.
प्रकरण २ : आमचे ‘तिकिटेच्छुत्व’ आणि ‘चल री सजनी’
पुढे मे - जून मध्ये उन्हाळ्याचा तडाखा जाणवू लागल्यावर मात्र आधीचा सगळा रोम्यांटिसिझमपणा वगैरे लयाला जाऊन हवालदिल होणे सुरु झाले. एव्हाना सक्तीचे घरकोंडत्व देखील कंटाळवाणे वाटू लागले होते. तिकडे मुलांनाही आमची काळजी वाटू लागली होती. विशेषतः आम्हाला इकडे काही झाले तर फ्लायटा बंद असल्याने कुणी येऊ शकत नव्हते, आलेच तरी विमानतळावरून सरळ दोन आठवडे क्वारंटाइन साठी रवानगी. त्यातून आमचा काही वर्षांपासूनचा हलकट शेजारी मला इकडे शिंक वा खोकला आल्याचा सुगावा लागला तर “कहीं ये ‘वो’ तो नहीं” या शंकेने तात्काळ पोलिसांना फोन करून क्वारंटाइनरुपी नरकात मला ढकलणार, याबद्दल त्याची भेदक, शोधक, संशयी नजर ग्वाही देऊ लागली होती. एरवीच्या निरुपद्रवी “और कैसे चल रहा है ?” या प्रश्नाला आता एक वेगळीच सैतानी धार चढलेली वाटत होती.
त्याच सुमाराला एरिंडिया च्या ‘वंदे भारत’ फ्लायटा सुरु झालेल्या होत्या. पाहिल्यांदा त्यासाठी बुकिंग सुरु झाले तेंव्हा एका रात्रीत बावीस हजार सिटा विकल्या गेल्या म्हणे. आमच्यासारखे हजारो तिकिटेच्छू, एकसमयावच्छेदेकरून (... अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि…) एरिंडिया-घोषित विविक्षित वेळी आपापल्या परीने तिकिटप्राप्तीयत्न करत असल्याने हवे तेंव्हाचेच तिकीट लाभणे अवघड दिसत होते. आपण रेल्वेच्या ‘तात्काल’ आरक्षणासाठी बरोबर दहाला तयार बसावे, आणि नाव-वय-लिंगादि टाईपेस्तोवर उपलब्ध बर्था संपाव्यात, असेच काहीसे घडत होते.
सरतेशेवटी आमची वर्णी लागली, आणि २८ जूनचे तिकीट लाभले. सध्या एवढा दूरचा प्रवास करण्याची फारशी इच्छा नसलेल्या सौ. ने पण माझ्या ”चल री सजनी अब क्या सोचे” ला “हम है तैयार चलो” असा प्रतिसाद दिला आणि आम्ही तयारीला लागलो.
मशारनिल्हे (पुन्हा एकदा - अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि…) फ्लायटांमध्ये ‘यात्रियों की सुविधा के लिए’ तीन-चार वेळा पुरेल, एवढे खाण्याचे सामान, पाणी वगैरे एका मोठ्या पिशवीत भरून प्रतिएक सिटेवरी ठेविलेले असते, असे ‘वंदे भारत’योगेच अमेरिकेला पहुचलेल्या एका हितचिंतकांकडून समजले, शिवाय “तरी शक्यतो तुम्ही घरीच बनवलेले अन्न घेऊन जा” असा प्रेमळ सल्लाही मिळाला.
(… इथे काही जिज्ञासू वाचक अशी पृच्छा करतील, की हे “अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि” प्रकरण काय आहे बुवा/बाई ? अर्थात या शंकेचे समाधान करणे आता क्रमप्राप्तच आहे. तर “शे.ए.हा.श.वा.सं.मि.” म्हणजे “शेवटी एकदाची हा शब्द वापरण्याची संधी मिळाली”.
प्रकरण ३ - आला, मंगल दिन तो आला… (संगे कोविड घेऊनि आला ?)
(ऐका : मंगल दिन आज … कुमार गंधर्व)
https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw
रात्री दीड वाजता उड्डाण असल्याने आम्ही संध्याकाळी साडेसातला घरून निघालो, तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
यथावकाश दिल्ली विमानतळावर पोचल्यावर सौ. च्या गुडघेदुखीमुळे तिच्यासाठी चलित-चक्रासनाची योजना केली. आम्हाला लाभलेला चलित-चक्रासनचालक त्याच्या मते आम्हाला खूपच मदत करत होता. हातमोजे घातलेले आपले हात तो अनेक गोष्टींना लावत होता. मला विविध फॉर्म आणून देणे, आमच्या आणि इतरांच्या ब्यागा उचलणे, खाली पडलेला बोर्डिंग पास तत्परतेने उचलून देणे, फॉर्म भरत असताना अगदी जवळ उभे राहून मी काय लिहितो हे डोकावून बघत गरज नसता सल्ले देणे, चलित-चक्रासन मागल्या बाजूने योग्य ते दांडे धरून न ढकलता भलत्याच ठिकाणी धरणे या त्याच्या लीला बघून खरेतर “ आता माझी सटकली” असे झाले होते, पण ‘आपण स्वतःहून घराबाहेर पडून जी जोखीम पत्करली आहे, तिची ही तर फक्त सुरुवात आहे, असली ड्रामा तो आगे हय’ असे मानून त्याला थोडीशी सौम्य समज देण्याचा क्षीण यत्न केला. (“ तरी मी सांगत होते” हे पालुपद इथून पुढले तीसेक तास वारंवार ऐकत रहावे लागणार, याची खात्री पटण्याची हीच ती सुवर्णबेला)
पुढे बोर्डिंग पास तपासून आम्हाला मुखावरणे देण्यात आली. माझी सीट मधली असल्याने मला पूर्णवेळ चेह-यावरील ढाल, मुखावरण आणि प्लास्टिक अंगरखा घालूनच बसावे लागणार होते.
तिथल्या एका दर्पणात आपले ते सोंग बघून “ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार” असा माझाच मला प्रश्न पडला, आणि “आप के हसीन रुख पे आज नया नूर है” असेही मी स्वतः:लाच म्हणून घेतले. तेवढ्यात सौ. ने "देखतेही रहो आज दर्पण ना तुम, फ्लायटका ये महूरत निकल जायेगा” अशी तंबी दिल्यावर “चलो दिलदार चलो” म्हणत आमची स्वारी निघाली.
विमानात स्थानापन्न झालो तेंव्हा प्रत्येक सिटेवर आमच्या हितचिंतकाने उल्लेखिलेली भली मोठी पिशवी ठेवलेली होती. तिजला "कृपया अपने सॉमने वॉली सीट के नीचे” रखण्याची ‘हिदायत’ मिळाली. यथावकाश ती उघडून बघितल्यावर तिच्यात तीन लिटर पाणी, अन्य पेये, चिप्सादि अरबटचरबट पदार्थ, दही, काहीतरी तुपाळ मिठाई आणि अलमिनच्या पातळ पत्र्यात लपेटलेले काही शिजवलेले अन्न असे होते. त्यातले फारसे काही न घेता आम्ही घरून नेलेलेच खाल्ले, शिवाय ते खट्टामीठा, चिपा वगैरे पण चरले. पुढे वॉशिंग्टनास विमान बदलून शेवटी पोचलो एकदाचे घरी.
प्रकरण ४ - वादळापूर्वीची शांतता आणि वादळात अडकली जीवननौका....
अमेरिकेत मुलाने काही गृहोउद्योग बळेच अंगावर घेतले होते, जसे दोन वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या मेहनतीने स्वहस्ते पॉलिशलेल्या फर्निचरास हल्ली बोकाळलेल्या टूम प्रमाणे हस्तिदंती रंग लावणे वगैरे. मग त्यासाठीचे सामान आणणे, रेजमालाने टेबल-खुर्च्या रगडणे वगैरे उद्योग सुरू झाले. त्याशिवाय लांब पायी फिरायला जाणे, आम्ही येणार/आलो म्हणून केलेले चमचमीत पदार्थ हादडणे हे सर्व सुरू झाले. खरेतर आम्हाला किमान दोन दिवस व्यवस्थित विश्रांति घेणे आणि खाण्यावर संयम ठेवणे गरजेचे होते, पण ...
... मग तीन -चार दिवसात भयंकर खोकला होऊन कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला. ताप अजिबात नव्हता. भारतातून आणलेले कफ सिरप घेऊन काडीचाही फरक पडला नाही. दिवसेंदिवस अशक्तपणा वाढत जाऊन रात्रंदिवस अंथरुणावरच पडून राहू लागलो.
ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनाची टक्केवारी ९४ ते ९७ वगैरे असली, तरी श्वासावर एरव्ही असणारा थोडाबहुत ताबा नष्ट होऊन लोहारच्या भात्याप्रमाणे सतत जोरजोरात अतिशय वेगाने श्वास चालू लागला. एक सेकंदही श्वास रोकणे शक्य नव्हते. सतत गुंगीत असल्यासारखे झाले, अन्नावरची वासना उडून अन्नाकडे बघावेसेही वाटेनासे झाले. तीस-चाळीस वर्षांपूर्वी दिवंगत झालेले आईवडील सतत डोळ्यासमोर येऊ लागले आणि "आई मला वाचव, बापू मला यातून बाहेर काढा " असा सतत धोशा सुरु झाला. हे मनातल्या मनात होते की तोंडातून तसे शब्द उच्चारले जात होते, मला ठाऊक नाही. कधी अचानक जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्यांच्या लडीच्या लडी उलगडल्या जात. मुकेश, हेमंतकुमार, गीता दत्त, मुबारक बेगम वगैरे अगदी आपल्या कानात येऊन गात आहेत, असे वाटायचे. शौच्याला लागणे फार दुर्मिळ झाले. प्रवासात संपवलेली हल्दिरामची पौचे नजरेसमोर येऊन ओकारीसारखे वाटायचे आणि आपल्याला त्या शिळ्या पदार्थातून विषबाधा झाली, असे वाटून स्वतःचाच पश्चात्तापयुक्त संताप यायचा. आपण बरे झाले पाहिजे या एकाच विचाराशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत अजिबात मन रमत नव्हते.
तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. अशक्तपणामुळे आम्हाला तिकडे जाताही आले नसते. याबद्दल मुलाने त्याच्या कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही. घरीच योग्य ती खबरदारी घेत आराम केल्याने हळूहळू ठीक होतील.
त्याच सुमारास इंदौरच्या माझ्या एका मित्रानेपण त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारून त्यांनी प्रिस्क्रिबलेल्या औषधांची यादी मला कळवली. त्यात भूक लागावी म्हणून अमुक गोळ्या, खोकल्यासाठी तमुक, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताप येऊ नये यासाठी अमुकतमुक अशी ती यादी होती. माझ्यामते तहान - भूक लागणे, झोप येणे वगैरे सगळे नैसर्गिक रीत्याच व्हायला हवे, त्यासाठी गोळ्या घेणे वगैरे मला अजिबात पटत नाही, आणि असे काही होणे, ही पण निसर्गाचीच एक योजना आहे, रोगप्रतिकारक यंत्रणेने आता पूर्ण शरीराचा ताबा घेऊन आघाडी सांभाळल्यामुळे अन्नावरची वासना उडणे वगैरे सर्व झालेले आहे, याची मला खात्री वाटत होती. स्ट्रेस वगैरे तर काही नव्हतेच. मग ती यादी बाजूला ठेवली. मागे चिकनगुनियाच्या वेळीपण कोणतेच औषध घेतले नव्हते. मुदत संपल्यावर आपोआप बरा झालो होतो. आपण यातून नक्कीच बाहेर पडणार याची मला खात्री वाटत होती. जीवेषणा अजिबात क्षीण झालेली नव्हती.
दहा-बारा दिवस असेच गेल्यावर जरासे बरे वाटू लागले. थोडेसे खाणे आणि घरातच चालणे फिरणे सुरू झाले. कायप्पा वगैरेवर “वाफारा घ्यावा किंवा नाही” सारखे उलटसुलट वाद येत असले तरी सकाळी काढा, दिवसा मिठाच्या गुळण्या आणि वाफ घेणे, रात्री हळदीचे दूध वगैरे करत राहिलो.. शिवाय रोज एक तरी लिंबू ( मध्यरात्री जाग यायची तेंव्हा घसा भयंकर कोरडा पडलेला असायचा, त्यावेळी लिंबूपाणी प्यायचो !) आणि तासभर उन्हात बसणे, काजू, अक्रोड वगैरे खाणे हेही करत होतो.
आणखी जरा बरे झाल्यावर मला एकदम आठवले की व्हॅनगॉगला त्याच्या डॉक्टरने सांगितले होते की तू पेंटींग करत रहाशील तोवरच ठीक (जिवंत) रहाशील… मग जरा उत्साहाने माझा स्टुडियो वगैरे आवरून मागल्या वर्षी अपूर्ण राहिलेली चित्रे भितींवर टांगली. सर्व सामान सुसज्ज करून जमेल तेवढे पेंटिंग सुरु केले. यातून उत्साह वाढला आणि बाहेर फिरायला जाणे वगैरे सुरु केले.
इथे मला माझ्याच मिपावर गेल्या नोहेंबरात लिहिलेल्या एका कवितेची आठवण येते आहे. त्या कवितेत अगदी अशीच परिस्थिती वर्णिली आहे:
तुका म्हणाला
उरलो आता
उपकारापुरता ...
मी म्हणालो
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
नुरली शक्ती
विरली काया
शिथिली गात्रे
आटली माया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
खपलो झिजलो
कोड चोचले
देहाचे पुरवाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
वाटले -
जिंकेन जग.
लोळेन -
सुखात मग.
धडपडलो - कडमडलो
नको तिथे अन गेलो वाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
एके दिवशी आणि अचानक
उन्मळला चैतन्य-झरा
विस्मयलो गहिंवरलो आणिक -
अनुभवाला आनंद- सोहळा
उचलला-
कुंचला -
रंग झराले झरा झरा
सूख दाटले -
दुःख आटले -
चित्र रंगले भरा भरा
उरलो आता
भिंतीवरल्या
रित्या चौकटी
भरण्याला
चित्रानंदी लावुनि टाळी
गीत सृजेचे गाण्याला...
या सर्व अनुभवातून गेल्यावर वाटू लागले , की माझ्यासाठी ही एक इष्टापट्टीच होती. आता उर्वरित आयुष्यात आरोग्य हे सर्वोपरी, अन्य सगळे दुय्यम मानून जगायचे. त्याप्रमाणे आता नियमितपणे व्यायाम, योगासने, प्राणायाम, सकाळ-संध्याकाळ पायी चालणे, आहाराबद्दल सजगता हे सर्व करू लागल्यावर एक नवीनच ऊर्जा जागृत झाल्यासारखे वाटू लागलेले आहे.
कल्पना करा, की आपण एका प्रचंड मोठ्या घरात अगदी एकटे राहात आहोत. मदतीला घरात किंवा आसपास कोणीही नाही. घरातील सगळी आवश्यक यंत्रणा आणि कामे आपल्याला एकट्यालाच सांभाळायची आहे. अर्थात वर्षानुवर्षे आपण हे करत आलेलो असल्याने सगळे अंगवळणी पडलेले आहे. मग एक दिवस अचानक समजते की आपल्या या घरात कोणी एक उपटसुंभ शिरलेला आहे, जो आपल्याला ठार करून घराचा ताबा मिळवण्याच्या खटपटीत अहोरात्र आहे. तो आपल्याला कधीच दिसत नाही पण त्याचे अस्तित्व मात्र जाणवत राहाते…. एकीकडे आपण घाबरूनही जातो आणि जास्त सावधगिरीनेही वागू लागतो …. आपल्या जीवावर उठलेला तो उपटसुंभ आता जणू घराचा कायमचा रहिवासीच झालेला आहे..... आपण जोवर अत्यंत सजगतेने जगत आहात, तोवरच जिवंत राहू, एकादी क्षुल्लकशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते.
…. मित्रहो, सध्याच्या करोना - पर्वात आपल्यापैकी प्रत्येकाची स्थिती अशीच आहे, आणि ती किती काळ तशी राहील हे कुणीच सांगू शकत नाही. क्षणोक्षणी सावध राहणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी सांगितलेल्या “सावधपण सर्वविषयी’ आणि “अखंड सावधान रे। प्रयोग प्रेत्न मान रे। प्रसंग हा तुफान रे। नकोचि वेवधान रे।।” या वचनांचा खरा अर्थ आता कळतो आहे.
ही झाली माझी कहाणी. हे करोना प्रकरण वैयक्तिक वा सामजिक-आर्थिक वगैरे दृष्ट्या काही लोकांसाठी एक इष्टापत्ती ठरल्याचे तुमच्या माहितीत आलेले असेल, तर अवश्य इथे लिहावे अशी विनंती करतो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...