Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुलंचा एक सुरेख लेख !

स
संजय क्षीरसागर
Fri, 08/14/2020 - 15:15
💬 57 प्रतिसाद
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं. पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख. _______________________________________________ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात. पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे. संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो. त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात. कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’. मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. पु.ल.देशपांडे (धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही..एक शुन्य मी’ या पुस्तकातून)

प्रतिक्रिया द्या
20302 वाचन

💬 प्रतिसाद (57)
प
प्रसाद प्रसाद Wed, 08/19/2020 - 07:29 नवीन
पुलंनी त्यांच्या पश्चात, स्वतःच्या लेखनाचे सर्व हक्क लोकार्पण केलेत. ह्याची तुम्हाला खात्री आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे पुलंच्या बहुतेक सर्व लेखनाचे copyrights पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानकडे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 08/19/2020 - 11:05 नवीन
सध्या IUCAA कडे आहेत आणि प्रताधिकाराचा प्रश्ण त्यांच्या सादरीकरणा संदर्भात आहे. हे लेख पब्लिक डोमेनवर आहेत. ते त्यांच्या नांवासहित आणि कोणताही फेरफार न करता, प्रकाशित करण्याला ते लागू नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद
स
संजय क्षीरसागर Wed, 08/19/2020 - 11:13 नवीन
The will had opened up the rights of only Pu La’s plays on the condition that shows of the plays follow the original script in toto. “Those staging the plays in the original form need not take prior permission or pay any royalty. However copyrights of the plays and books are entrusted to IUCAA,” the family members said
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 18:43 नवीन
लढाया जिंकणे हे महत्त्वाचे असते मग त्या जिंकण्ासाठीच आराखडे आखले जातात धर्म हा जर फायद्याचं विषय असेल तर त्या नुसार लढाई ची योजना असते योजना अखणाऱ्या लोकांचा धर्म वाढवा ही इच्छा नसते फक्त माझे सामर्थ्य वाढावे हीच इच्छा असते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 08/18/2020 - 20:02 नवीन
१.
योजना अखणाऱ्या लोकांचा धर्म वाढवा ही इच्छा नसते फक्त माझे सामर्थ्य वाढावे हीच इच्छा असते.
सध्या भारतात नेमकं हेच चाललं आहे पण लोकांना वाटतंय की आपला धर्मच परमोच्च अवस्थेला नेला जातोयं ! आता तुमच्या या विचाराशी आणि विधानाशी कायम प्रामाणिक राहून जोपर्यंत इथे वावर आहे तोपर्यंत सगळीकडे प्रतिसाद देत रहा, मधे अजिबात हुकू नका. धर्माच्या नांवाखाली राजकारण करणार्‍याला न धर्माची पडलेली असते, न लोकांची; तो फक्त आपलं सत्तास्थान मजबूत करण्यामागे लागलेला असतो. लोक धर्माचं गाजर बघून गाढवासारखे त्याच्यामागे धावतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 20:20 नवीन
Ipc सर्व नागरिक ना सामान लागू असावा ही मागणी अयोग्य नाही. मग अनुसाचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा आयपीसी ला छेद देत आहे . त्या विषयी संजय जी तुमचे काय मत आहे. सर्वांना समान संधी मिळावी जात,धर्म,प्रांत ह्या गोष्टी त्याच्या आड येवू नयेत असे अपेक्षित आहे. मग आरक्षण विषयी तुमचे काय मत आहे. समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्मातील रिती रीवज नष्ट करून सर्वांसाठी एकाच सामान नागरी कायदा असावा ह्याला विरोध का आहे. बहुसंख्य हिंदूचा विरोध नाही आणि सामान नागरी कायद्या मुळे हिंदू चेच जास्त नुकसान होणार आहे तरी. मग विरोध जा फक्त हे भेदभाव नष्ट होवू नयेत म्हणून.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 08/18/2020 - 20:39 नवीन
१. सगळे नागरिक समान आहेत २. सर्वांना विकासाची संधी मिळणं आणि त्यांचं जगणं सुखकारक होईल हे बघणं ही सरकारची एकमेव जवाबदारी आहे. ३. गरीबांना विकासाच्या जास्त संधी उपलब्ध होतील अशा योजना सरकारनी आणल्या पाहिजेत. सधन लोकांनी त्या दिलखुलासपणे आणि सक्रीय होऊन स्वीकारायला हव्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा