देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!
देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!
‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील.
चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे. एवढेच नाही तर यात सेलिब्रेटी आणि अगदी मीडियाशी संबंधित लोकांची आणि अनेक गुन्हेगार, आरोपींची नावेही यादीत आहेत. 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
" दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला. या माहितीसाठय़ाला कंपनीने ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेस’ (ओकेआयडीबी) असे शीर्षक दिले आहे. या माहितीसाठय़ात शेकडो नोंदी आहेत. त्यातून भारताबद्दलची माहिती शोधण्यात आली. ही माहिती अस्पष्ट नोंदींमध्ये चिन्हांकित केलेली नसल्याचे आढळले. अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या माहितीचा साठाही कंपनीने केला आहे. कंपनीने ही माहिती कंपनीशी संबंधित असलेल्या संशोधकांच्या जाळ्यामार्फत जमविली आहे.
ही माहिती शेन्झेनमध्ये अध्यापन केलेल्या व्हिएतनाममधील प्राध्यापक ख्रिस्तोफर बाल्डिंग यांच्यामार्फत सूत्रांनी काही वृत्तसंस्थांना दिली. त्यात दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. "
वरील माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्याच ‘लोकसत्ता’ ह्या मराठी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत देण्यात आली आहे.
घटनात्मक पदांवरील मंडळी, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय पुढारी / नेते, न्यायाधीश, उद्योगपती, गुन्हेगार अशा लोकांची माहिती जमवून त्याचा उपयोग देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या गुप्तचर संघटना / संस्थांकडून होणे हि काही नवीन गोष्ट नाही. त्यातल्या अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून / फितवून अथवा वेळप्रसंगी अपहरण करून त्यांच्याकडून मिळवलेल्या गोपनीय माहितीचा सरकारकडून संबंधित देशाविषयीचे आर्थिक, व्यापार, युद्ध, परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या कामी उपयोग केला जातो हे सर्वश्रुत आहे. आय. एस. आय. ह्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने दाऊद सारख्या गुन्हेगाराला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकरवी मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांचेही आपण साक्षीदार आहोत.
चीनच्या ‘झेनुआ’ कंपनीकडून ज्यांच्यावर नजर ठेवली गेली त्यात आपल्या सारख्या सर्वसामान्य भारतीयांची नावे नसली तरी आपण सुरक्षित आहोत का?
आपण काय बोलतोय ते कोणी आपल्या नकळत ऐकतंय का?
आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय ते अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचतय का?
वरील पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखतो त्या AI (Artificial intelligence) च्या सध्याच्या जमान्यात अशा हेरगिरी पासून आपण सर्वसामान्य भारतीयही सुरक्षित नाही.
आणि पुढच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत. आपले बोलणेही आपल्या नकळत महा-संगणक ऐकत असेल आणि आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय तेही अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचत आहे.
AI (Artificial intelligence) चा आवाका आता फक्त स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडी, पसंती विषयीची माहिती मिळवून त्या अनुषंगाने आपल्याला जाहिराती दाखवण्या पुरता मर्यादित राहिला नसून तो आपल्या कल्पनेपलीकडे प्रचंड वाढला आहे.
मागील पाच-सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले असून ती परिस्थिती अजूनही कायम आहे. कालच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केली असल्याची बातमी आली आहे.
अशा परिस्थितीत भारत आणी चीनमध्ये युद्ध होईल की नाही होणार ते येणारा काळच ठरवेल परंतु अशा तणावग्रस्त काळात जवाबदार देशवासी म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत.
सध्या सामाज माध्यमांवर युध्द विषयक चर्चा चालू आहेत. त्यावर व्यक्त होताना अनेक जण “युद्ध झाले तर भारताला ते परवडणारे नाही.” , “भारताने सामंजस्याची भूमिका घेऊन युद्ध टाळायला हवे." , “लष्करी ताकदीत चिन आपल्यापेक्षा वरचढ असून युद्ध झाल्यास आपला पराभव अटळ आहे” अशा अर्थाची मते मांडताना दिसत आहेत.
भारत, चीन, युद्ध, गलवान, लडाख हे आणि अशा विषयांशी सबंधित शब्द असलेले लेखन, तसे लेखन करणारे, त्या लेखनावर दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रिया देणारे, दृकश्राव्य माध्यमांवरील चर्चा सत्रे, मुलाखती अशा सर्व डेटाचे अत्यंत कमी वेळात विश्लेषण करून अचूक अथवा अचूकतेच्या जवळ पोचणारा अहवाल तयार करून देण्याचे सामर्थ्य AI (Artificial intelligence) मध्ये आहे आणि चीन सह जगातील अनेक देश त्याचा यशस्वीपणे वापरही करत आहेत.
देशातील जनमताचा कौल जाणून घ्यायला सर्वच माध्यमांवर व्यक्त होणारी मते फार मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकतात. समजा भारत सरकार अथवा आपल्या संरक्षण दलांकडून जनमत युद्धासाठी अनुकूल आहे कि नाही ह्याचा अंदाज घ्यायला अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर अशा अप्रस्तुत चर्चा/प्रतिक्रियांमुळे अल्प प्रमाणात का होईना पण त्रुटी येऊन हाती येणाऱ्या अहवालाच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. पर्यायाने सरकारला / संरक्षण दलांना योग्य तो निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांचे मनोधैर्यही खच्ची होण्याचा धोका उद्भवतो.
दुसऱ्या बाजूला शत्रू राष्ट्राकडून जर अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असल्याची धारणा होऊन त्यांचे मनोधैर्य वाढल्याने त्यांच्याकडून दबाव वाढवण्याची /आणखीन नवीन कुरापती काढण्याची वा युध्द पुकारण्याची शक्यता वाढते.
प्रत्येक भारतीय मग तो कुठल्याही जाती धर्माचा / भाषेचा असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा / नेत्याचा समर्थक वा विरोधक असो परंतु अशा कठीण प्रसंगी त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
प्रसंग बाका आहे खरा, पण तो टळला पाहिजे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)
Click the button to demonstrate line-breaks in an alert box.
Try it function myFunction() { alert("Hello\nHow are you?"); }