अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक. ज्ञानप्रबोधिनीशी राष्ट्रवाद विचार मंडळापुरताच संबंध.मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी कायम संपर्क व त्याचे एक हितचिंतक. Pakistan India Peoples Forum for Peace & Democracy च्या पुणे शाखेचे सभासद.त्यांचे काही लेख अंतर्नाद, परममित्र इत्यादीतून प्रसिध्द. झाले आहेत. अनेक विचारसरणींच्या बैठकांना ते नेहमी जातात. त्यात अंनिस च्या बैठकीला आपटे प्रशालेत ते सुरवातीला आले होते. तेव्हापासून त्यांची माझी ओळख व पुढे मैत्रीपूर्ण संबंध. अंनिसशी त्यांचे फारसे जमले नाही कारण त्यांची मते कडवी इहवादी व निरिश्वरवादी होती. त्यांनी दै सकाळ व डॉ नरेंद्र दाभोलकर यांना पाठवलेली व प्रकाशित न झालेली वाचक या नात्याने प्रतिक्रिया- दि. 19/12/2000. मल ही प्रतिक्रिया स्वतंत्र पत्रासोबत पाठवली होती. ते पत्रही एक सार्वजनिक दस्तैवज आहे. त्याविषयी नंतर कधी तरी.
अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया
“मी हिंदू आहे म्हणून आधी माझ्या धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो” डॉ नरेंद्र दाभोलकर
सुमारे दोन महिन्यापूर्वी प्रभात वाहिनीवर डॉ. दाभोलकरांची श्री.सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत " थेट भेट” या कार्यक्रमात पाहिली. श्री गाडगीळ यांनीही हा एक प्रश्न “ तुम्ही फक्त हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धेविरुद्ध चळवळ करता का ? ” विचारला. पण त्यावेळी मात्र दाभोलकर यांनी वेगळीच नव्हे तर जरा विरोधीच भूमिका घेतली. डॉ. दाभोलकर म्हणाले, “या देशांत बहुसंख्य हिंदु आहेत म्हणून सहाजीकच आमच्या चळवळीतून हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धांवर जास्त प्रमाणात घाला घातला जातो. पण मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धांवरही आम्ही चळवळी केल्या आहेत. आमच्या चळवळी धर्मनिरपेक्ष आहेत. लोकसंख्येप्रमाणे कमी प्रमाणात का होईना पण मुसलमान, ख्रिश्चन कार्यकर्तेही आमच्या चळवळीतून कार्यकर्ते आहेत." श्री गाडगीळांनी तेव्हा अशा मुसलमान व ख्रिश्चन कार्यकत्यांची नावे विचारली नाहीत. मी ती विचारु इच्छितो कृपया डॉ. दाभोळकरांनी ती नावे प्रसिद्ध करावीत.
पण त्याहून महत्वाचा मुद्दा असा की परवाच्या आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणाच्या वृत्तांतात ( पुणे दि. 30 जुलैला झालेले व्याख्यान) डॉ दाभोलकरांनी असं विधान केल आहे की,” मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो. आधी स्वत:चे घर स्वच्छ करावे ,नंतर बाहेर बघावे, हा त्यामागील उद्देश आहे.” डॉ दाभोलकर पुढे असही म्हणाले, "तुम्ही असं कधी म्हणता का हो, हा रोज रोज फक्त स्वतःचच घरा का झाडतो? शेजार्यांगची घरे का झाडत नाही!" या वाक्यावर मंदसा हशाही झाला (व्याखानाला मी उपस्थित होतो)
डॉ दाभोलकरंच्या या विधानातून, विचारधारेतून एक गोष्ट स्पष्ट होते. डॉ दाभोलकर स्वत: व ते” अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधित्वातून बोलत असतील तर अंनिस.असं मत आहे की,” ते हिंदु म्हणूनच स्वत:च्या घरात रहातात.
हिंदुंच घर स्वतंत्र आणि मुसलमान ख्रिश्चन इत्यादि अन्य धर्मियांची घरे वेगळी. ते शेजारी , फार तर चांगले शेजारी , अगदी सख्खे शेजारी पण शेजारीच. आपल्या घरातील कुटुंबीय नव्हे हे मात्र नक्की.”
प्रथमत: मी असे स्पष्ट करु इच्छितो की अंनिस. च्या कार्याशी मी संपुर्ण सहमत आहे. मी शिवसेना रा.स्व. संघ भाजपा विहिंप अशा कोणत्याहि संस्थेचा प्राथमिक, द्वितीय तृतीया अशा कुठच्याही श्रेणीतील सभासद नाही. किंबहुना या सर्वच संस्था आणि चळवळीच्या धर्म सापेक्ष विचारसरणीचा मी विरोधकच आहे. पण तरीही डॉ दाभोलकर व अंनिसने काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे .1) अंनिस त मुसलमान आणि ख्रिश्चन कार्यकर्ते किती आहेत?. संख्येने किती आणि टक्केवारीने किती?
2) हिंदुएतर धर्मातील एकही कार्यकर्ता नसेल तर तसं का? म्हणजे हिंदु सोडून इतर धर्मियांना अं.नि.स. प्रवेश घटनेनेच नाही की तसं बंधन नसूनही कोणी मुसलमान वा ख्रिश्चन समितीत येउ इच्छित नाहीत.
3) पण मुसलमान आणी ख्रिश्चन कार्यकर्ते असतील तर डॉ. दाभोलकरांच्या वरच्या विधानाचा अर्थ काय? अशा इतर धर्मिय कार्यकर्त्यांना घेउन ते ते हिंदु आहेत म्ह्णून फक्त हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचंच कार्य करणार काय?
4). डॉ दाभोलकरांनी भाषणात शिवसेना, भाजप, विहिंप आणि अस्तित्वात नसलेल्या हिंदु महासभे वर हि टीका केली. ती टीका अगदी रास्तच होती. पण याहून जरा जास्तच अंधश्रद्धा असणार्याध इतर धर्मियांच्या संस्थांचा उल्लेख मात्र आला नाही. पण त्याहूनहि खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांचं हे तिरकस वाक्य." एका –प्रार्थनामंदिराला उध्वस्त करुन एखादा पक्ष लोकसभेतील आपले सांसद चार वरुन एकशे चाळिसवर नेउ शकतो "- अंधश्रद्धेशी संबंध नसणारे असले राजकीय प्रश्न आणि तेही एकांगी दृष्टीने अं.नि.स.च्या भाषणातून येऊ नयेत. पुरोगामित्वाच हे एक आवश्यक लक्षण असं डॉ.दाभोलकर मानतात काय?
-या पत्राच्या (कि लेखाच्या?) समारोपात काही गोष्टी कळकळीने सांगाव्याशा वाटतात. 1, अंनिसचे कार्य संपूर्णतः स्तुत्य आहे, ते केवळ हिंदुंपुरते मर्यादित राहिले तरी आणि त्यात इतर धर्मियांचा समावेश झाला तरीहि
२ अंधश्रद्धा आणि राष्ट्रवाद याची गल्लत अंनिसने करं नये आणि आपलं कार्य क्षेत्र केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंतच स्तिमित ठेवाव. 3. राजकारण आणि राजकीय पक्ष यांच्यावर टीकाटिप्पण्या करु नयेत, तिरकसपणे तर नक्कीच करु नयेत. राजकारणाशी संबंध आला तर डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे शरद जोशी व्हायला वेळ लागणार नाही’.
- -अरविंद बाळ लेन नं.५ मनीषा सोसायटी, कर्वेनगर
पुणे ४११०५२
भेकड पलायनवाद
आहे. मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर त्यांनी घराला आग लावली असती आणि ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर नको इतके कायदेशीर खटले गळ्यात आले असते. हे भीषण वास्तव आहे आणि ते स्वीकारण्याची हिम्मत डॉक्टर दाखवू शकले नाहीत हे कटू सत्य आहे. असंतांचे संत हा लेख आठवा. कुबेरांनी शेपूट घालून हा लेख मागे घेतला आणि स्वतःची विश्वासार्हता घालवून बसले. अंनिसचे कार्य स्पृहणीय असूनही शेवटी डॉक्टर डाव्या फुरोगामी सेक्युलरांचे नादी लागले म्हणून मग हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे आपोआप आलेच. यामुळे आपल्या बद्दलचा समाजातील आदर ते घालवून बसले आणि अंनिसला उतरती कळा लागली. जोवर बाबा, बुवाबाजी, देवदासी सारख्या अंधश्रद्धांविरुद्ध आंदोलन होते तोवर हिंदुत्ववाद्याना सुद्धा त्यांच्या बद्दल आदर होता.