Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुर्हाळ

न
नीलकंठ देशमुख
Sat, 12/05/2020 - 10:50
💬 38 प्रतिसाद
गुर्हाळ...     पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई. समोर मोकळ्या जागेत तात्पुरते पत्र्याचे गुर्हाळ घर तयार केले जाई.लागणारे साहित्य,तयार ढेपी ठेवण्यासाठी,जेवणासाठी त्याचा  उपयोग होई. गणपतीच्या मुर्तीची स्थापना होई.आधण निघाल्यावर प्रथम गुळाचा नैवेद्य गणपतीला.तिथे गुळ आळण्यासाठीचा वाफा,असे. समोर टाकलेल्या पलंगावर बसून आजोबा व वडील देखरेख करीत.रात्री वडील मळ्यात झोपत.कधी मी पण सोबत जाई.    उस तोडणी चे काम मजूरांच्या जोड्या करत. उस कोयत्याने तोडून, पाला व वरचा भाग (वाढे) काढून, उसाच्या मोळ्या बांधून बैलगाड्यातून चरकाजवळ आणून टाकायच्या.रस काढायचा चरक घरी होता.सिलेंडरच्या आकाराचे तीन लोखंडी भरीव चक्रे,(दोन मोठे (नर)एक छोटे (मादी))जोडून ते लोखंडी पायावर जमिनीत रोवायची .ते फिरवण्यासाठी आडवे लाकडी दांडे जोडायचे जे बैलाचे साहाय्याने फिरवले जात. दांड्या सोबत चरक गोल फिरे. चरकात  घातलेला उस पिळून दुसरीकडून चिपाड होऊन येई. निघालेला रस ,चरकाचे पन्हाळीतून, बाजूचे खड्ड्यात ठेवलेल्या पिंपात पडे. बैल हाकायला माणसे असत.उस खात चरकाचे बैल हाकायचे काम माझ्याही आवडीचे. उसाची चिपाडे(सोतरी) मोकळे जागेत पसरवून वाळवले की ,तेच चुलाणाचे इंधन म्हणून वापरले जाई.एक पिंप अर्ध्या तासात भरे .रस घागरीने चुलाणा वरील कढईत टाकला जाई.तीन पिपे रस कढईत पडल्यावर चुलाण पेटवले जाई.चुलाणात जळण घालणारे मजुरास 'जाळवे ' म्हणत.उसाचा रस कढईत पडल्यापासून,ते गुळाची ढेप (भेली)तयारहोई पर्यंतचे काम येरागबाळ्याचे नाही.गुळास चांगली चव व रंग येणे महत्वाचे.त्यासाठी गुळ करणारा 'गुळव्या' सर्वात महत्वाचा घटक.त्याची कामे अनेक.तो अष्टावधानी असावा लागतो.रसावरील मळी लांब दांड्याचे चाळण्यांनी काढून स्वच्छ करणे, फावड्याने रस  घोटणे,त्यात आवश्यक  रसायने,वनस्पती मिसळणे,चुलाणातील आच कमी ,जास्त करण्यास सांगून ,रस उकळण्यावर सतत लक्ष ठेवणे हे सातत्याने करावे लागते.थोडी ढिलाई झाली की काम बिघडू शकते.त्याला एक मदतनीस पण असे.एक दोन वर्षे गुळव्या चे हाताखाली उमेदवारी केली की तो पण गुळव्या म्हणून काम करायला पात्र होत असे.   कढई पाकाला आल्यावर तयार  द्रव म्हणजे काकवी. त्या नंतर थोड्या वेळात उकळण्याची प्रक्रिया पूर्ण होते. कढईतील उकळणारे रसात होणार बदल पाहायला मजा वाटे.अधून मधून मळी काढायचे काम पण मी करायचो.उकळत्या रसाने भरलेली दहा बारा फुट व्यासाची कढई उचलणे सोपे व्हावे म्हणून कढईला असलेल्या चार रींगांतून दोन मोठे दांडे  घेतले जात.सात आठ माणसे "हर हर महादेव "च्या गजरात  दांड्यांनी ,कढई उचलून त्यातील तप्त द्रव गुर्हाळ घरातील तयार वाफ्यात रिकामे करीत .तोथंड होउन पूर्णपणे आळल्यावर पत्र्याचे बादल्यात भरायचा.काही वेळाने गुळाच्या ढेपी वा भेली तयार .तेव्हा कुठे  गुळव्याचे काम संपे.रोज अशी चार पाच आधणे (कढाया )निघत. सकाळी नउ वाजता चरक सुरू होई.रात्री तीन चे दरम्यान शेवटची कढई उतरे पर्यंत मळ्यात जाग असे.थंडीचे दिवस असायचे.चुलाण धगधगते असे.बाजूची जमीन पण तापे.कामाने थकलेले लोक तिथेच झोपून थंडीपासून बचाव करुन घेत. उस गुळ खाण्यासाठी, रस पिण्यासाठी ,गावातून मुले माणसे गर्दी करत. उनाड मुले उस पळवून नेत.त्यांना आवरता आवरता गडी त्रासून जात. गुळाच्या ढेपी बैलगाडीने सकाळी घरी येत. रसाची घागर अन उस अन काकवी येई.गल्लीत घरोघरी त्याचे वाटप होई. घरी रसाच्या पोळ्या ,रसाचा भात, असे पदार्थ होत.एखाद्या दिवशी घरातील सगळ्यांचे मळ्यातच वनभोजन होई. गुर्हाळ एक दीड महिना चाले.काम करणारे लोकांसाठी ते दिवस कष्टाचे असत .माझ्या साठी मात्र तो एक  उत्सवच जणू . परगावाहून पाहुणे ही  येत.गावातील प्रतिष्ठीत पुरुष स्त्रीयांना बोलावले जाई.आद्रक लिंबू टाकून रस आणि एरंडाचे पानावर चिकीचा गुळ दिला जाई.वाफ्यातील गुळाची साय अलगदपणे उसाच्या कांड्यावर धरुन चाखणे हा परमानंदच. ती चव अजूनही जीभेवर रेंगाळते. केव्हा तरी  गुर्हाळ संपून जाई. उस तोडल्यामुळे उघडा झालेला मळा, बंद चरक,विझलेले चुलाण,उखाडलेले गुर्हाळ घर, रिकामा वाफा पाहून मन उदास होई.    तयार गुळ विक्रीसाठी माजलगाव किंवा जालन्याला नेला जाई .तो पर्यंत गुळाच्या ढेपींनी माडी भरलेली असे. ढेपी उकरून खाणे अन त्यापायी आई ची बोलणी खाणे हे माझ्या साठी नित्याचे. नको तेवढा गूळ खाल्ला की त्रास व्हायचा.पण चवीपुढे त्याचे काय?   आता लक्षात येते की आजोबांना वडिलांनी , गुर्हाळ व्यवसाय म्हणून केलाच नाही. नफा तोट्याचा हिशोब  नव्हताच .घरच्यांनीच नाही तर इतरांनी ही खाउन पिउन तृप्त व्हावे हाच मुख्य उद्देश. त्यातून जो काही उरेल तो फायदा.     कालांतराने बैल चरकाचे जागी इंजीनावरचे चरका(क्रशर)वर गुर्हाळ सुरू झाले.काम दुप्पट वेगाने होऊ लागले. पण गुर्हाळाची मजा गेली.नंतर साखर कारखाने उभे राहिले आणि  गुर्हाळे बंदच झाले. शेतात उस अजूनही असतो.तो कारखान्याला जातो.गावाकडे गेल्यावर उस खात खात शेतात चक्कर मारायला आवडते .तेव्हा गुर्हाळाची आठवण येते. काही वर्षांपूर्वी प्रवास करताना   उकळत्या रसाचा ,काकवीचा ,गुळाचा ,गोड वास आला. कुठे तरी गुर्हाळ सुरू होते.गाडी थांबवली.तो गंध श्वासात भरून घेतला. आणि तो काळ ,ते वातावरण ,ती माणसे , समोर  दिसायला लागली.अचानक डोळे पाणावले. किती वर्षे लोटली,गुर्हाळ अन त्याच्या गुळा सारख्या गोड आठवणी अजूनही जात नाही मनातून.                  नीलकंठ देशमुख .  

प्रतिक्रिया द्या
15005 वाचन

💬 प्रतिसाद (38)
स
सोत्रि Sat, 12/05/2020 - 11:59 नवीन
सुंदर! लहानपणीच्या गुऱ्हाळातल्या चरकावरच्या बैलांना हाकण्याचे काम आनंदाने करण्यच्या तसेच काकवीच्या आठवणी जाग्या झाल्या ह्या लेखाच्या निमीत्ताने, धन्यवाद! - (नॅास्टॅल्जिक झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Tue, 12/08/2020 - 07:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
प
पॉइंट ब्लँक Sat, 12/05/2020 - 13:19 नवीन
गावाकडच्या आठवणी छान लिहिल्या आहेत :)
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sat, 12/05/2020 - 13:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
अ
अथांग आकाश Sat, 12/05/2020 - 13:22 नवीन
गुळा सारख्या गोड आठवणी!! Image removed.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sat, 12/05/2020 - 13:53 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
R
Rajesh188 Sat, 12/05/2020 - 13:44 नवीन
आमच्या गावात पण तेव्हा गुऱ्हाळ चालायची . पण बैल वर चालणारे माझ्या काळात नव्हते. मोटर चा वापर सुरू झाला होता. एक मात्र खरे आहे गुऱ्हाळ वर गेल्यावर पोटभर रस प्यायला मिळायचा.. पोट भर ह्यासाठी म्हणतोय तिथे रस पिण्यास ग्लास नाही तर तांब्या ठेवलेला असायचा. ओळखीचे असू नाही तर नसू किती ही रस प्यायला मिळतच असे. त्या वेळी लोक गरीब होती पण मनाने नक्कीच खूप मोठी होती. दिलदार होती.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sat, 12/05/2020 - 13:52 नवीन
धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून छान वाटले
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/05/2020 - 14:02 नवीन
गुऱ्हाळ बघायला कधी मिळाले नाही. कारण आम्ही मेच्या सुटीत गावी ( सांगली जिल्हा)जायचो.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 12/05/2020 - 17:10 नवीन
आवडले. तुमचा प्रत्येक लेख मला माझ्या भूतकाळात नेवून ठेवतो... खूप आठवणी आहेत माझ्याही अश्या.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/05/2020 - 17:44 नवीन
जिभेवरल्या ताज्या गुळाच्या आठवणी ताज्या झाल्या.. मस्तच!!
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sun, 12/06/2020 - 05:30 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
श
शेखरमोघे Sat, 12/05/2020 - 21:13 नवीन
गुर्‍हाळाच्या, "इतरांनी ही खाउन पिउन तृप्त व्हावे" या जुन्या काळातल्या विचारसरणीला आणि गावाकडच्या मनोरम्य आठवणीना छान उजाळा दिला आहेत आपण. गुर्‍हाळानन्तर ....."उघडा झालेला मळा, बंद चरक,विझलेले चुलाण,उखाडलेले गुर्हाळ घर, रिकामा वाफा पाहून मन उदास" होत असले तरी आताच्या काळातला साखर कारखान्याच्या आजूबाजूला एक मळीचा आणि कुठेतरी प्रक्रिया न करता सोडून दिलेल्या उत्सर्गाचा नको वाटणारा वास, साखर कारखान्याशी जोडलेले राजकारण आणि एकूणच वाढलेला बकालपणा अनुभवता "शेवटी प्रगती होऊन काय हाती मिळाले" असाच विचार मनात रेन्गाळत रहातो.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sun, 12/06/2020 - 05:30 नवीन
धन्यवाद. खरे आहे. आणखी एक . जुन्या काळातील लोक विशेषतः माझ्या भागातील (मराठवाड्यातील)असेच होते. भाबडे. आजच्या भाषेत व्यवहारशून्य .पण फार ऐश्वर्याचे नाही तरी समृध्द आयुष्य जगले. माझ्या त त्यांचे ते अंश आहेत हे बरे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
ध
धर्मराजमुटके Sun, 12/06/2020 - 08:09 नवीन
तुमचे लेख चांगलेच स्मरणरंजनी असतात पण एक छोटिशी सुचना आहे. सर्वसाधारणपणे लेखावर जास्त प्रतिक्रिया आल्या की तो लेख बर्‍याच जणांना आवडला हे समजून येते. मात्र लेखावरील प्रत्येक प्रतिक्रियेला तुमचे उत्तर असते त्यामुळे प्रतिक्रियांची संख्या जास्त दिसते आणि त्यामुळे फसायला होते. पाच दहा प्रतिक्रियांना उद्देशून एकच उत्तर देता येईल काय ? हीच सुचना. डॉ. सुधीर देवरे यांना देखील कराविशी वाटते. प्रत्येक सभासदाच्या प्रतिसादाखाली जाऊन केवळ धन्यवाद लिहून प्रतिसादांची संख्या न वाढवता एकदाच ५/१० जणांची नावे लिहून आभार प्रदर्शनाची पद्धती समर्पक वाटते.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sun, 12/06/2020 - 10:27 नवीन
धन्यवाद.इथे मी नवीन आहे. प्रतिक्रिया वाढविण्याचा काही उद्देश नाही. जे वाचक लेखा वर मत व्यक्त करतात त्यांची व्यक्तीशः दखल घेणे आवश्यक आहे असे वाटते. प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेळी येतात. एकदम नाही. त्या मुळे त्या त्या वेळी त्यांना उत्तर दिले जाते. प्रतिक्रिया ची संख्या जास्त असल्याने लिखाणाचे दर्जात फरक पडत नाही. चांगले ते चांगले व जे वाईट ते वाईटच. हे सहज खुलासा म्हणून लिहिले आहे
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sun, 12/06/2020 - 11:08 नवीन
लेखावर आलेल्या प्रतिसादाची व्यक्तीशः दखल घेता हे आवडते. लेखांची वाचणे हजारांच्या घरात होतात पण फार कमी वाचक वेळात वेळ काढून अभिप्राय देतात. मी लेखक नाही एक सामान्य वाचक व प्रतिसादक आहे. मला दिलेल्या प्रतिसादाची पोच लेखकाने दिली तर आवडते. नवीन जुने असा विचार करू नका. तुम्हाला काय बरोबर वाटते तसे करा असा अनाहूत सल्ला देतो :-) माणूस, त्याचा मुलगा आणि गाढवाची गोष्ट तुम्हाला आठवते का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकंठ देशमुख
न
नीलकंठ देशमुख Sun, 12/06/2020 - 12:44 नवीन
धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे योग्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
र
रमेश आठवले Sun, 12/06/2020 - 16:35 नवीन
उसापासून गुळ बनवण्याच्या प्रक्रियेतील मधल्या टप्प्यावर काकवी नावाचे एक घट्ट द्रव्य तयार होत असते. ही काकवी खायची पण एक वेगळी मजा असे.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:52 नवीन
धन्यवाद. काकवी मस्तच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
च
चामुंडराय Sun, 12/06/2020 - 18:15 नवीन
छान जुन्या आठवणी ! रच्याकने हे "गुऱ्हाळ" असे लिहायला पाहिजे न? गुऱ्हाळ लावणे हा वाक्प्रचार कसा तयार झाला असेल?
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:54 नवीन
धन्यवाद.माझ्या मोबाईल वर टाइप करताना गुर्हाळ असेच येते. पूर्वी गुर्हाळ संपता संपायचे नाही. लांबण लागायची. म्हणून कुणी बोलणे लवकर न संपवता लांबवतो तेव्हा गुर्हाळ लावले म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
म
मराठी_माणूस Mon, 12/07/2020 - 04:30 नवीन
खुल्ताबाद मधल्या टाकळी ह्या गावी गुर्‍हाळातील ताजा गुळ खाल्ल्याचे आठवले. छान गुर्‍हाळ लावले :)
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:55 नवीन
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ट
टर्मीनेटर Mon, 12/07/2020 - 06:05 नवीन
आठवणी आवडल्या 👍
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:56 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
स
सिरुसेरि Mon, 12/07/2020 - 08:09 नवीन
सुरेख आठवणी . बाकी या लेखामुळे "भागी गाय चुलाणात पडली " हि कथा आठवली .
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:57 नवीन
धन्यवाद. कथा वाचण्यात नाही. कुणाची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Mon, 12/07/2020 - 12:42 नवीन
हि श्री . भा . रा . भागवत यांची फाफे कथा आहे . त्यामधे फुरसुंगी येथील गु-हाळाचे वर्णन आहे . श्री . चि. वि. जोशी यांचा "एरंडाचे गु-हाळ" हा विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध आहे . अर्थात एरंडाचे गु-हाळ हा एक विनोदी शब्द प्रयोग असुन त्याचा प्रत्यक्ष गु-हाळ प्रक्रियेशी संबंध नसावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकंठ देशमुख
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 17:59 नवीन
एरंडाचे गुर्हाळ वाचलेले. फाफे कथा पण लहानपणी वाचलेल्या. पण ही कथा आठवत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
R
Rajesh188 Mon, 12/07/2020 - 08:28 नवीन
वर्णन करताना योग्य शब्दांचा वापर आणि प्रसंगाची सलग्नाता योग्य राखली आहे. त्या मुळे लेख प्रभावी झाला असून शब्द प्रसंग उभा करण्यास सक्षम झाले आहेत. लिहीत रहा.. छान लिहीत आहात.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:58 नवीन
धन्यवाद. अशा प्रतिक्रिया उत्साह वाढवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ब
बबन ताम्बे Mon, 12/07/2020 - 09:00 नवीन
मस्त आठवणी जाग्या केल्या. आम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर काकवी खायचो. आमच्याकडे पण साखर कारखाना झाला आणि गुळाची गुर्‍हाळे बंद पडली.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:59 नवीन
धन्यवाद. बाजरीच्या भाकरी सोबत काकवी छान लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ग
गोरगावलेकर Mon, 12/07/2020 - 10:08 नवीन
साधारण दहा वर्षांपूर्वी अष्टविनायकाची सहल करतांना एका गुऱ्हाळावर थांबलो होतो तेव्हा ही सर्व प्रक्रिया पहिली आहे व काकवीची चव देखील चाखली आहे. बहुदा रांजणगावच्या आसपास होतो. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 11:59 नवीन
प्रतिक्रिया वाचून छान वाटले
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 12/07/2020 - 15:16 नवीन
नीळकंठ देशमुख, आठवणी आवडल्या. गरमागरम ताजा गूळ खावासा वाटला. गूळ तयार करतांना त्यात औषधी वनस्पती घालतात हे नव्याने कळलं. गुळात लोह व साखर असते. त्यामुळे तो शरीरास हवाहवासा वाटतो, असा माझा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Mon, 12/07/2020 - 18:01 नवीन
धन्यवाद. गावरान भेंडी एरंडी आणि बहुतेक नवसागर इ.टाकत असत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा