Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... पौष शु. १२ लंकेवरील स्वारीची तयारी !

A
Ashutosh badave
Mon, 01/25/2021 - 11:56
💬 15 प्रतिसाद
आज काय घडले... पौष शु. १२ लंकेवरील स्वारीची तयारी ! पौष शु. १२ रोजी रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली वानरसैन्याकरवी लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रावर सेतु बांधून पूर्ण झाला. बिभीषण रामाच्या पक्षास येऊन मिळाला होता. त्याच्या सल्ल्यावरून सामोपचाराने समुद्रास अनुकूल करून घेण्याचा अध्यात्मिक सामर्थ्याने प्रयत्न रामाने केला, पण तो सफल झाला नाही. तेव्हां रामचंद्र क्रोधयुक्त होऊन म्हणाले, लक्ष्मणा, पाहिलात समुद्राचा गर्विष्ठपणा! अरे या जगांत कीर्ति वा यश सामोपचाराने मिळणे शक्य नाही. सर्वत्र हाती दंडा उगारून असलेल्या माणसालाच लोक मान देतात. (सर्वत्रोत्सृष्ट दण्डं च लोकः सत्कुरुते नरम्।) आण धनुष्य, पाहतों.कसा वश होत नाही ते.” असें म्हणून रामाने बाणांचा वर्षाव केला. तेव्हां समुद्राने सेतुबंधनास योग्य असा मार्ग दाखविला आणि अवघ्या पांच दिवसांत मानवी प्रयत्नांच्या बळावर सेतुबंधनाचे काम पूर्ण झाले. त्याचे वर्णन महर्षि वाल्मीकि देतात हस्तिप्रायान् महाकायाः पाषाणश्व महाबलाः। पर्वतांश्च समुपत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च। (युद्ध. २२।५६) म्हणजे “ मोठमोठ्या हत्तींच्या अंगाएवढे दगड व पर्वतांचे कडे मुळांतून उखडून काढून, मोठे धिप्पाड वानर वीर यंत्रांच्या साह्याने वाहून आणत होते... कांही वानर वीर सूत्र हाती धरून लांबी मोजण्याचे काम करीत होते, तर काही वीर दण्ड उभे धरून उंची पाहत होते व बाकीचे दगड, माती, झाडेझुडपें आणून भर घालीत होते." वानर ही एक मानवी जमात पुढारलेली होती, हे ध्यानी घेतल्यावर.वरील वर्णनांत विस्मयकारक काही न वाटतां शुद्ध मानवी प्रयत्नांचे स्वरूपच.दिसून येते. पौष शु. १२ स शंभर योजने लांब व दहा योजने रुंद असा सेतु तयार झाल्यावर तो आकाशांत गंगा दिसते त्याप्रमाणे शोभू लागला आणि वानरसेना त्या सेतूवरून पार होऊ लागली. स्वतः बिभीषण पुढे होऊन शत्रुसमोर उभा राहिला. आणि त्याच्यामागून राम, लक्ष्मण, सुग्रीव आदि लोक.जाऊ लागले.“

प्रतिक्रिया द्या
5536 वाचन

💬 प्रतिसाद (15)
भ
भीमराव Mon, 01/25/2021 - 17:03 नवीन
पैलवान, तुम्ही एका महिन्यासाठी एक धागा काढत जा आणि त्याच धाग्याच्या प्रतिसादात नवीन नवीन परंतु त्या त्या महिन्यात घडललेलं विशेष टाकत जा. म्हणजे विनाकारण धागे वाढनार नाहीत आणि आमच्या सारख्या नवीन रोचक माहितीच्या इच्छुंकांना अपेक्षित लिखाण एकाच धाग्यात मिळेल. तसेच ज्यांना अनेक धागे निघाल्याचा त्रास होतो त्यांचा पण त्रास कमी होईल. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे Tue, 01/26/2021 - 06:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
A
Ashutosh badave गुरुवार, 01/28/2021 - 12:41 नवीन
करायचे ते मला येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
ब
बोका गुरुवार, 01/28/2021 - 15:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
स
सतिश गावडे Mon, 01/25/2021 - 18:49 नवीन
हल्ली तुम्ही तारीख देत नाही. :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 01/26/2021 - 04:59 नवीन
मी म्हणतो आज काय घडले यासाठी स्वतंत्र विभाग तयार करावा
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave गुरुवार, 01/28/2021 - 12:40 नवीन
ते कसे करायचे मला येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 15:03 नवीन
लेखन खालील लिंक वर कॉपी-पेस्ट करा, धाग्यापेक्षा तिथे तुमचे लेखन जास्त वाचले जाईल. --- http://www.misalpav.com/guestbook
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ashutosh badave
च
चौथा कोनाडा गुरुवार, 01/28/2021 - 16:18 नवीन
ही गेस्टबुक काय भानगड असते. टिचकी मारल्यास Access denied असे का दाखवते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ब
बोका गुरुवार, 01/28/2021 - 15:13 नवीन
या पुढचे तुमचे लेखन याच धाग्यावर प्रतिसदात लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ashutosh badave
म
मदनबाण Sat, 01/30/2021 - 08:21 नवीन
काका... एकाच धाग्यात प्रत्येक नविन प्रतिसादात तुम्ही माहिती देता आली तर पहा, म्हणजे वाचकांना तुमचे लेखन वाचणे सोपे जाइल आणि आपणास नविन धागे काढावे लागणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave Tue, 02/02/2021 - 09:58 नवीन
आज काय घडले... पौष व. २ वासुकाका जोशी यांचे निधन ! शके १८६५ च्या पौष व.२ रोजी लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व महाराष्ट्राच्या धकाधकीच्या सार्वजनिक जीवनांत ठळकपणे दृष्टीस पडणारे थोर कार्यकर्ते वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन झाले. वासुकाकांचा जन्म बाईशेजारी कृष्णाकाठी असलेल्या धोम या क्षेत्री झाला. जोसपणा, सावकारी व शेती करून यांचे घराणे रहात असे. वयाच्या चौदाव्या वर्षी हे पुण्यास आले व इंग्रजी पांच-सहा यत्ता शिक्षण झाल्यावर त्यांनी एक वर्ष इंजिनियरिंग कॉलेजांतील अॅग्रिकल्चरल क्लासमध्ये काढले. यांचे विस्तृत चरित्र श्री. देवगिरीकर यांनी प्रसिद्ध केले आहे. आयुष्याच्या सुरुवातीस विष्णुशास्त्री चिपळुणकरांची ओळख झाल्यानंतर वासुकाका निबंधमालेचे व्यवस्थापक बनले. त्यांनी चित्रशाळाहि भरभराटीस आणली. विष्णुशास्त्र्यां नंतर ते टिळकांचे सहकारी बनले. सन १९०३ मध्ये ताईमहाराज प्रकरणांत टिळकांना शिक्षा झाली तेव्हां ते विष्णुपंत छत्रे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या सर्कसबरोबर चीन-जपानकडे गेले. परक्या देशांत सकेशीची आगाऊ व्यवस्था करण्याचे काम वासुकाका करीत. तिकडे सर्कशाला खूप पैसा मिळाला. चीनची डॉवेजर राणी झुशी हिने प्रसन्न होऊन सर्कशीला तीस हजार रुपये बक्षीस दिले. तेव्हां त्यांनी सर्कशीतील एक हत्ती माहूतासह राणीला नजर केला. जपानमध्ये यांची व स्वामी रामतीर्थीची भेट झाली. स्वामींना मोठा आनंद झाला. तेथून पुढे अमेरिकेत गेल्यावर त्यांनी रामतीर्थीची व्याख्याने पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली. तेथून परतल्यावर कृ. प्र. खाडीलकर आणि वासुकाका काही दिवस नेपाळमध्ये कौलांचा कारखाना' काढण्यात गुंतले होते. त्यांचा शेवटचा प्रवास म्हणजे लो. टिळकांबरोबर त्यांनी केलेली इंग्लंडची सफर. राष्ट्रसभेच्या निमित्ताने ते भारताच्या कानाकोपऱ्यांत हिंडले होते. अग्रेसर असणाऱ्या जहाल राजकारणात त्यांचा नेहमीच भाग असे. सार्वजनिक, राजकीय चळवळीत प्रत्यक्षपणे भाग घेण्यापेक्षां अंतस्थ हालचाली अचूकपणे करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धि होती. - १२ जानेवारी १९४४Image removed.
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave Tue, 02/02/2021 - 10:00 नवीन
आज काय घडImage removed.ले... पौष व. ३ रामचंद्रांनी लंकेस वेढा दिला ! पौष व. ३ या दिवशी मदोन्मत्त रावणास शासन करण्यासाठी श्रीरामचंद्रांनी त्याच्या लंकेस वेढा दिला. लंकेचा राजा रावण अत्यंत जुलमी आणि गर्विष्ठ झाला होता. ब्रह्मदेवापासून अवध्यत्वाचा वर मिळाल्यावर त्याने अनन्वित कृत्ये करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष कुबेराचाहि पराभव रावणाने केला. कैलास पर्वतावरील शंकरांना उपद्रव दिला. कुशध्वजाची मुलगी देववती ही तपस्विनी होती, तिच्यावर बलात्कार करून रावणाने अधमपणाची सीमा गांठली. शेवटी जुलमाच्या व क्रूरतेच्या इमारतीवर कळस म्हणजे प्रत्यक्ष रामचंद्रांची पत्नी सीतादेवी हिलाच रावणाने पळवून नेली. रामाने त्याचे पारिपत्य करण्याचे ठरविले. दक्षिणेतील सुग्रीव, हनुमंत वगैरे रामास मदत करण्यास तयार झाले. मारुतीने अशोक वनांतील सीतेचा शोध लावला. स्वारीची जय्यत तयारी सुरू झाली. प्रचंड शक्ति खर्च करून सेतु बांधण्यात आला. आणि राम, लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण, अंगद, हनुमान वगैरे लोकांनी समुद्रपार होऊन लंकेस वेढा दिला. रावणास ही सर्व वार्ता समजलीच. त्याने रामाचें मायावी शिर उत्पन्न करून तें सीतेपुढे आणले व तो तिला म्हणाला, "मूर्ख स्त्रिये, हे पहा, माझा सेनापति प्रहस्त याने रामाचे शिर तोडून आणले आहे. आतां तरी हट्ट सोड.” परंतु रावणाच्या या कपटविद्येचा काहीहि उपयोग झाला नाही. कोणाचेंहि न ऐकता रावणाने युद्ध करण्याचा निश्चय केला.रामचंद्रांनीहि आपल्या सैन्याची व्यवस्था चांगलीच ठेवली. पूर्वेकडील दरवाजावर नील, दक्षिणेकडील दरवाजावर अंगद व पश्चिमेकडील दरवाजावर हनुमान यांची नेमणूक करून खुद्द आपण लक्ष्मणासहित उत्तरेकडील दरवाजावर राहिले व सर्वांना मदत करणान्या सैन्याच्या विभागावर राजा सुग्रीव, जांबवान, बिभीषण यांची नेमणूक केली. याप्रमाणे सर्व व्यवस्था होऊन लंकेचा वेढा दृढ झाला. रावणाच्या जुलमी कारकीर्दीची शंभर वर्षे भरत आली होती.
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave Tue, 02/02/2021 - 10:03 नवीन
Image removed.शके १५८५ च्या पौष व. ४ रोजी श्रीशिवाजी राजे यांनी सुरत लुटून बादशहास चांगलीच दहशत बसविली. त्या वेळी सुरत हे अत्यंत श्रीमंत शहर असून मोंगल बादशाहीतील पश्चिम किनाऱ्यावरील व्यापाराचे मोठेच ठिकाण होते. त्यावर हल्ला करण्याचा विचार छत्रपती शिवाजी राजांनीे केला. बहिर्जी नाईक नांवाच्या चतुर हेराने सर्व गुप्त बातमी आणली. अचानकपणे चार हजार स्वारांनिशी शिवराय सुरतेवर येऊन पोचले. सर्व लोकांच्या अंगांत धडकी भरली. इनायतखान शहरांतील मोंगली अमलदार होता. किनाऱ्यावर इंग्रज व डच यांच्या वखारी होत्या. आदल्या दिवशी शिवाजी राजांनी नागरिकांना कळविले, " इंग्रजी व एतद्देशीय व्यापारी किंवा इतर लोक यांस कोणत्याहि प्रकारें इजा पोचविण्याची आमची इच्छा नाही. फक्त बादशहाने आमच्या मुलखावर हल्ला करून लोक मारिले; आणि आमचे पुण्याचे वास्तव्य बंद पाडिलें त्याचा वचपा घ्यावा, येवढाच आमचा हेतु आहे." शिवाजी राजांचा दावा फक्त बादशहाशी होता. त्याने शिवाजी राजांचा नायनाट करण्याचा प्रयत्न चालविला होता. तेव्हां त्याला हात दाखविणे क्रमप्राप्तच होते. सुरतेचा अंमलदार इनायतखान यानो शिवाजी राजांशी कपट कारस्थान करण्याचा व त्यांचा खून करण्याचा डावहि खेळून पाहिला पण तो शूर सैनिकांच्या सावधतेने फसला. शिवरायांनी त्या सर्वांना जबरदस्त शिक्षा दिल्या आणि पौष व. ४ रोजी लुटीस प्रारंभ झाला. तीन-चार दिवसपर्यंत येथेच्छ लूट करण्यांत आली. चांदी, सोने, मोती व जवाहीर यांची प्राप्ती मोठ्या प्रमाणावर झाली. शिवाजी राजांच्या या कृत्यास कोणी कोणी 'लुटारूपणा'चा अर्थ चिकटवितात. परंतु येथे हे ध्यानात घेतले पाहिजे की, मोंगल सुभेदार पुण्यामध्ये खुद्द शिवाजीच्या वाड्यांत राहून हिंदु धर्म, हिंदु समाज यांचा उच्छेद करण्यास प्रवृत्त झाला होता. त्यावेळी त्याने स्वराज्या मुलुखाची नासाडी केली रयतेय त्रास दिला. त्याचा बंदोबस्त शिवाजी राजांनी करावयाचा नाही तर कोणी? औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला दहशत बसवण्यासाठी याचा फार उपयोग झाला. -६ जानेवारी १६६४
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave Tue, 02/02/2021 - 10:05 नवीन
Image removed. शके १८१८ च्या पौष व. ५ रोजी भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे उपासक, आझाद हिंद सेनेचे प्रमुख व कुशल संघटक 'नेताजी' सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. बंगालमधील कटक येथील सुप्रसिद्ध वकील जानकीनाथ बसू यांच्या घरी सुभाषचंद्रांचा जन्म झाला. त्यांची आई प्रभावतीदेवी. या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे सुभाषबाबूंच्या मनावर चांगलेच संस्कार झाले. शाळेत शिकत असतांना श्रीरामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीचा यांच्या मनावर अत्यंत परिणाम झाला, आणि गंगायमुनांच्या तीरीं व हिमालयाच्या गिरिकंदरांतून ' सुभाष ' गुरूच्या शोधार्थ हिंडू लागले. कलकत्त्याच्या प्रसिडेन्सि कॉलेजमधून नांव कमी केल्यावर हे इंग्लंडला गेले आणि तेथे आय. सी. एस्. ची परिक्षा पास झाले. मायदेशी येऊन सरकारी नोकरी न करतां देशसेवेसाठी त्यांनी आपणास वाहून घेतले. म. गांधी व चित्तरंजनदास यांच्या नेतृत्वाखाली देशसेवा सुरू केली. राष्ट्रसभेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणण्यासाठी त्यांनी जी अतोनात खटपट केली तिला लाहोर सभेत यश आले. सन १९३८ साली हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचे यश सर्वत्र विकसू लागले. पुढल्या वर्षीहि त्रिपुरी काँग्रेसच्या वेळी गांधींनी पाठिंबा दिलेल्या पट्टाभिसीतारामय्यांपेक्षा अधिक मते पडून हेच निवडून आले. त्या वेळी त्यांना गांधीगटाच्या असहकाराला तोंड द्यावे लागले. त्यानंतर सशस्त्र क्रांतीवर अधिक विश्वास, बसू लागल्यावर २६ जानेवारी १९४१ रोजी ते राहत्या घरांतून अदृश्य झाले. बहिऱ्या व मुक्या असणाऱ्या झियाउद्दीनच्या वेषाने पेशावरमार्गे काबुलास जाऊन तेथून बर्लिन व त्यानंतर सिंगापूर येथे सुभाषबाबू आले. तेथे आझाद हिंद सेनेची स्थापना करून २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हिंदुस्थानचे स्वतंत्र सरकारहि स्थापन केले. जपानचा पराजय होण्याची चिन्हें होत असतां सुभाष बाबू सिंगापूरहून १६ ऑगस्ट १९४५ रोजी विमानाने टोकियोला निघाले असतां विमानाला अपघात होऊन त्यांचे निधन झाले. -२३ जानेवारी १८९७
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा