आज काय घडले... पौष शु. १२ लंकेवरील स्वारीची तयारी !
आज काय घडले...
पौष शु. १२
लंकेवरील स्वारीची तयारी !
पौष शु. १२ रोजी रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली वानरसैन्याकरवी लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रावर सेतु बांधून पूर्ण झाला.
बिभीषण रामाच्या पक्षास येऊन मिळाला होता. त्याच्या सल्ल्यावरून सामोपचाराने समुद्रास अनुकूल करून घेण्याचा अध्यात्मिक सामर्थ्याने प्रयत्न रामाने केला, पण तो सफल झाला नाही. तेव्हां रामचंद्र क्रोधयुक्त होऊन म्हणाले, लक्ष्मणा, पाहिलात समुद्राचा गर्विष्ठपणा! अरे या जगांत कीर्ति वा यश सामोपचाराने मिळणे शक्य नाही. सर्वत्र हाती दंडा उगारून असलेल्या माणसालाच लोक मान देतात. (सर्वत्रोत्सृष्ट दण्डं च लोकः सत्कुरुते नरम्।) आण धनुष्य, पाहतों.कसा वश होत नाही ते.” असें म्हणून रामाने बाणांचा वर्षाव केला. तेव्हां समुद्राने सेतुबंधनास योग्य असा मार्ग दाखविला आणि अवघ्या पांच दिवसांत मानवी प्रयत्नांच्या बळावर सेतुबंधनाचे काम पूर्ण झाले. त्याचे वर्णन महर्षि वाल्मीकि देतात
हस्तिप्रायान् महाकायाः पाषाणश्व महाबलाः।
पर्वतांश्च समुपत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च। (युद्ध. २२।५६)
म्हणजे “ मोठमोठ्या हत्तींच्या अंगाएवढे दगड व पर्वतांचे कडे मुळांतून उखडून काढून, मोठे धिप्पाड वानर वीर यंत्रांच्या साह्याने वाहून आणत होते... कांही वानर वीर सूत्र हाती धरून लांबी मोजण्याचे काम करीत होते, तर काही वीर दण्ड उभे धरून उंची पाहत होते व बाकीचे दगड, माती, झाडेझुडपें आणून भर घालीत होते."
वानर ही एक मानवी जमात पुढारलेली होती, हे ध्यानी घेतल्यावर.वरील वर्णनांत विस्मयकारक काही न वाटतां शुद्ध मानवी प्रयत्नांचे स्वरूपच.दिसून येते. पौष शु. १२ स शंभर योजने लांब व दहा योजने रुंद असा सेतु तयार झाल्यावर तो आकाशांत गंगा दिसते त्याप्रमाणे शोभू लागला आणि वानरसेना त्या सेतूवरून पार होऊ लागली. स्वतः बिभीषण पुढे होऊन शत्रुसमोर उभा राहिला. आणि त्याच्यामागून राम, लक्ष्मण, सुग्रीव आदि लोक.जाऊ लागले.“
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]