प्रवास भाग 6
भाग 5
https://www.misalpav.com/node/48240
प्रवास
भाग 6
नविनने हाक मारल्या बरोबर अनघा आत जायला वळली पण तिचा हात धरत मनाली म्हणाली;"नको ग अनघा. आत अजून काहीतरी असेल. मला आता याहून जास्त धक्के सहन होणार नाहीत ग. त्यांना तू बाहेर बोलावं बघू. जे काही आहे ते असुदे आतच. आता आपण इथून लगेच निघुया." तिच्या हातावर थोपटत अनघा म्हणाली;"मनाली वेडेपणा नको करुस. त्याने आत बोलावलं आहे तर आपण जायलाच हवं. जे काही आहे त्याची जवाबदारी आपल्या चौघांवर आहे. तू इतकी का घाबरते आहेस? जे काही आहे ते आपण सांभाळून घेऊ. तशीच वेळ आली न तर पोलिसांकडे जाऊया आपण. हे बघ! भिकू तुझ्यावर आणि माझ्यावर धावून आला म्हणून आपण self defence म्हणून त्याला मारलं हे आपण सांगूच शकतो. त्यामुळे जर असंच काही असेल तर आपण लगेच पोलिसांकडे जाऊ. पण आत्ता आत गेलं पाहिजे. नवीन आणि मंदारवर सगळं सोडून नाही चालणार."
अनघाचं बोलणं मनालीला फार पटलं असं नव्हतं. पण तरीही जवाबदारी चौघांची आहे हे तिला मान्य होतं. त्यामुळे ती अनघाचा हात घट्ट धरून तिच्या सोबत आत गेली.
काही क्षणातच भिकूच्या खोलीतून सगळे बाहेर आले. नवीन, मंदार, मनाली, अनघा आणि..... आणि सर्वात शेवटी आनंद!!! आनंद देखील होता त्यांच्या सोबत. काहीसा मरगळलेला... अस्वस्थ... आजारी वाटणारा आनंद देखील भिकूच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने त्याच्या मागे खोलीची कडी लावून घेतली. तोंडावर बोट ठेवत कोणी बोलू नका अशी खुण करून आनंद वाड्याच्या दिशेने चालायला लागला. बाकीचे सगळे देखील त्याच्या मागे वाड्याकडे निघाले.
***
पाचहीजण दिवाणखान्यात बसले होते. आनंदचं बोलून झालं होतं आणि त्याच्या प्रत्येक वाक्याने नवीन-मंदार, मनाली आणि अनघा यांना धक्का बसला होता. सगळे असेच काहीवेळ बसून राहिले. बसलेल्या धक्यातून नवीन पहिल्यांदा सावरला आणि म्हणाला;"एकूण असं आहे तर हे सगळं. एका अर्थी बरं झालं भिकुला आपण मारलं आणि त्याच्या खोलीकडे सोडायला गेलो. त्यामुळे सत्य समोर आलं आपल्या. पण आता मात्र इथे थांबण्यात काही अर्थ नाही. निघालं पाहिजे आपण सगळ्यांनी ताबडतोप."
नवीनचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं आणि सगळे आपापल्या बॅग्स आवरायला निघाले. मनाली एकदम वळून म्हणाली;"अरे आपण निघालो खरे पण.... गाडी? गाडीचं काय करणार आहोत? इथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त एकच उपाय आहे; तो म्हणजे स्वतःची गाडी." तिचं बोलणं ऐकून सगळेच थबकले आणि एकमेकांकडे बघायला लागले. काय करावं कोणालाही सुचत नव्हतं; आणि तेवढ्यात अनघाचं लक्ष खिडकीबाहेर गेलं. अनघा एकदम आनंदने ओरडलीच;"अरे यार.... गाडी तर जागेवरच आहे. असं कसं झालं?"
सगळ्यांनी खिडकी बाहेर बघितलं तर खरंच आनंदची गाडी जागेवरच होती. ते बघून सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि हसायला लागले. आनंद म्हणाला;"चला आता फार time pass नको. निघुया."
सगळ्यांनाच आनंदचं म्हणणं पटलं आणि सगळे आपापल्या खोलीकडे पाळले. सर्वात अगोदर आनंद त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि गाडीच्या दिशेने गेला. त्याने ड्रायव्हिंग सीटकडचं दार उघडतं आहे का याचा अंदाज घेतला. दार उघडलं गेलं. गाडीच्या किल्ल्या आतच होत्या सीटवर. त्या आनंदने ताब्यात घेतल्या आणि वाड्याच्या दिशेने बघत म्हणाला...
आनंद: यार आटपा आता.........
(भाग 1 मधील घडताना घडल्या... https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/2021/01/blog-post.html)
****
रात्री उशिरा इंस्पेक्टर राठी आणि त्यांची टीम अपघात झालेल्या जागेवर पोहोचले. गाडी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पडली होती. लॉरी मात्र कुठेच दिसत नव्हती. इंस्पेक्टर राठींचा वाँकीटॉकी वाजला आणि त्यांनी तो ऑन केला...
इंस्पेक्टर राठी : होय साहेब. बातमी खरी आहे. जबरदस्त अपघात आहे. गाडीची पूर्ण वाट लागली आहे. काय साहेब? काय? नाही....... नाही....... साहेब!!! इथेच गाडीसमोर उभा आहे मी. फक्त ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगा आहे. बाकी कोणी नाही आत!!!
इन्स्पेक्टर राठी त्यांच्या साहेबांना रेपोर्टिंग करत होते तेवढ्यात हवालदार पवार पुढे झाला आणि स्टीअरिंग व्हीलवर झुकलेल्या बॉडीला त्याने सरळ केले. त्याचे डोळे विस्फारले गेले आणि तो इन्स्पेक्टर राठींकडे वळत म्हणाला;"साहेब हा कोण आहे ओळखत का?" वॉकीटॉकी बंद करत राठी पुढे झाले आणि पावरला ओरडले;"अरे हात कशाला लावतो आहेस बॉडीला? हातातली काठी तरी वापर रे. तुला सगळ्याचीच घाई." त्यांनी ड्रीविंग सीटवरील मृत व्यक्तीकडे बघितलं. तो कोण आहे ते त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे अजूनच वैतागत ते पावरला म्हणाले;"तू काय स्वतःला प्रद्युम्न समजतोस का रे? कोडी नको टाकुस. काय ते नीट सरळ सांग."
त्यावर आपल्या साहेबाला काहीही कळत नाही आणि आपण किती ग्रेट आहोत असे भाव डोळ्यात आणत हवालदार पवार म्हणाला;"साहेब याचं नाव आनंद. हा ऍक्टर आहे. ते नवीन सिरीयल आहे ना वह कौन था? त्याचा हिरो आहे हा. सॉलिड आहे सिरीयल. अशा वळणावर आहे की आता खरा व्हिलन कोण आणि खरा हिरो कोण ते कळेल." इतकं बोलून हवालदार पवार विचारात पडला. त्याला विचारात पडलेलं बघून राठींनी प्रश्न केला;"का रे. विचारात का पडला आहेस? हा तोच ऍक्टर आहे न? की आता हा दुसराच कोणी आहे असं म्हणायचं आहे तुला?"
त्यावर गोंधळलेल्या चेहेऱ्याने पवार म्हणाला;"साहेब, हा आनंद जर इथे मरून पडला आहे तर मग आता सिरियलमधलं गूढ कसं कळणार?"
पावरला पडलेल्या प्रश्नाने मात्र राठी प्रचंड भडकले आणि त्याच्यावर ओरडत म्हणाले;"अरे गाढवा आपण काय सिरीयल मधली गूढं उकलायला आलो आहोत का इथे? मूर्खासारखं बोलणं बंद कर आणि खरी माहिती घ्यायला सुरवात कर." असं म्हणून राठींनी स्वतःच एका मागोमाग एक फोन करायला सुरवात केली. एकीकडे फोटोग्राफरने त्याचं काम करायला सुरवात केली होतीच. थोड्यावेळाने फोन ठेवून राठी परत एकदा गाडीजवळ येऊन उभे राहिले. आतापर्यंत हातात ग्लोव्हज घालून प्रत्येकाने आपापलं काम सुरू केलं होतं. पावरकडे बघत राठींनी विचारलं;"काय रे काही मिळालं का?"
पवारने गाडीच्या बाहेर उतरवून ठेवलेल्या पाच सॅक्स दाखवल्या आणि म्हणाला;"साहेब, गाडीत या पाच सॅक्स मिळाल्या आहेत. पण बाकी आत कोणीच नाही. याचा अर्थ यांच्या सोबत अजून काहीजण होते. बहुतेक अपघात झाल्यावर हा मेलेला बघून पळून गेले."
पवारचे बोलणे ऐकून राठींनी नाही नाही अशी मान हलवली आणि म्हणाले;"पवार गाडीत एकटा आनंद होता. बाकी कोणीच नव्हतं."
आता आश्चर्य वाटायची पाळी हवालदार पवारवर होती. पवारच्या चेहेर्यावरचे भाव बघून राठींना हसू आलं. ते म्हणाले;"अरे आपण इथे कसे पोहोचलो ते विसरलास का? ज्याने हा अपघात बघितला तो पोलीस स्टेशनला स्वतः आला होता न! त्यानेच मला सांगितलं की एक मुलगा एकटाच गाडी चालवत होता." राठींचं बोलणं ऐकून पवारने मान डोलावली आणि म्हणाला;"मग साहेब, या पाच बॅग्स कोणाच्या असतील?"
राठी : अरे बहुतेक थर्टीफस्टची मजा करायला आलेला ग्रुप असेल हा सिनेमा वाल्यांचा. पण बॅग्स या गाडीत टाकून सगळे दुसऱ्या गाडीने जाणं शक्य नाही. त्यामुळे काय आहे मामला ते बघायलाच हवं. चल थोडी चौकशी करूया गावात." अरे म्हणून राठी सबइन्स्पेक्टर शेंडेंकडे वळले आणि म्हणाले;"मी जरा गावात जाऊन चौकशी करून येतो शेंडे. तुम्ही तोपर्यंत इथलं सगळं उरकून बॉडी पोस्टमार्टेमसाठी पाठवून द्या. अपघातच दिसतो आहे; पण इतकंच नाही. यात अजूनही काहीतरी आहे; असं मला वाटतं." शेंडेंनी मान डोलवत राठींना सॅल्युट ठोकला आणि राठी त्यांच्या गाडीत जाऊन बसले. पवारने गाडी चालू केली आणि गावाच्या दिशेने वळवली.
लोणावळा तसं मुंबई जवळचं थंड हवेचं ठिकाण असलं आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये गर्दीचं ठिकाण असलं तरी हाम रस्ता सोडला तर अजूनही ते गावंच होतं. पवार तर इथेच लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे त्याने शिताफीने गाडी गावाच्या आतल्या अंगाला वळवली. थोडं पुढे जाऊन त्याने त्याच्या नेहेमीच्या पानवाल्याच्या ठेल्यापाशी गाडी थांबवली आणि त्याला हाक मारली. पवरला बघताच गादी सोडून तो गाडीजवळ आला.
पवार : दिन्या, एक अपघात झालाय मेन रोडकडे. गावात काही चर्चा?
राठींना पवारने केलेली सुरवात आवडली नाही. पण त्यांना खात्री होती की पवार योग्य ती माहिती काढेल. त्यामुळे ते गप बसले. एकदा राठी साहेबांकडे बघत दिन्याने नाही अशी मान हलवली. त्यावर पवार वैतागला.
पवार : उगा नाटक नको करुस. तुला नाही नेत धरून. फक्त विचारतो आहे. आन तुला माहीत नाही तर अपघातच झाला नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे तोंड उचकट आणि बोल बघू.
पावरचं बोलणं ऐकून दिन्या कसंनुसं हसला आणि म्हणाला;"त्या मकरंद भाऊंचा अपघात झालाय त्याबद्दल तर नाही ना विचारत तू?"
दिन्याच्या बोलण्याने पवार चिडला आणि म्हणाला;"भाड्या मी काय सायकल आपटून पडलेल्या पोराबद्दल विचारतो आहे का? कळत नाही साहेब आहेत? गंम्मत करतो का माझी? कोण मकरंद? मी त्या हिरो आनंद बद्दल विचारतो आहे. त्याच्याबद्दल काही माहीत आहे का तुला?"
दिन्यासुद्धा आता पेटला. त्याच्या माहिती खात्याला पवार आव्हान देत होता. त्यामुळे तो देखील स्पष्टपणे म्हणाला;"तोच तो रे. तुम्ही आनंद म्हणा आणि गाव त्याला मकरंद म्हणतंय. समजलं? या मागल्या गल्लीमधून आत गेलास की झाडी संपून जो वाडा दिसतो ना तो त्याचा आहे. त्याचा तो भिकू पडला असेल तिथेच मागल्या झोपडीत पिऊन. साला इतका मारायचा बायकोला की पळून गेली ती. हा आणि तो मकरंद त्याचंच शंका येईल असं गुळपीठ...."
दिन्याच्या एकदम लक्षात आलं की साहेब देखील आहेत आणि त्याचा आवेश कमी झाला. साहेबांना सलाम करत तो म्हणाला;"साहेब, मकरंद भाऊ बद्दल गावात कोणी काही सांगणार नाही. त्याचं कोणाशीही चांगलं नव्हतं. मोठ्या साहेबांनी वाड्यावर यायचं सोडलं आणि मग मकरंद भाऊंच्या आईचंच राज्य सुरू झालं न. सगळं बदलून गेलं मग."
राठींच्या कपाळावरच्या आठयांचं जाळं खूपच वाढलं. ते एकदम गाडी खाली उतरले. त्यांना उतरलेलं बघून दिन्या एकदम घाबरून गेला. पावरकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत तो म्हणाला;"साहेब, मला इतकंच माहीत आहे हो. मला कशाला नेता पोलीस स्टेशनात? माझं वय तर बघा.... मी तर जन्मलो पण नव्हतो ते लफडं झालं तेव्हा. सगळी ऐकीव माहिती हो मला. पवार म्हणाला ना आत्ता.... इथे माझ्या गादीवर सगळे येतात आणि गप्पा मारतात. ते ऐकून मी पावरला माहिती देतो. माझा काही संबंध नाही हो बाकी."
त्याची घाबरगुंडी बघून राठींना मजा वाटली. गाडीला वळसा घालून ते त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि म्हणाले;"दीनुभाऊ मी का तुम्हाला नेईन पोलीस स्टेशनमध्ये? मी तुमच्याशी नीट गप्पा मारायला म्हणून खाली उतरलो. बोला बघू. काय प्रकार आहे या आनंद म्हणा मकरंद म्हणा याचा?"
राठींच्या आवाजातल्या सलगीमुळे दिन्या थोडा स्थिरावला आणि बोलायला लागला.
दिन्या : साहेब, मकरंद भाऊंचे वडील म्हणजे इथलं मोठं प्रस्थ होतं बरं का. त्याची बायको म्हणजे वहिनी देखील माहेरच्या थोरामोठ्यांकडच्या. वहिनी तर खूप खूप प्रेमळ होत्या. मला अजून आठवतं मी लहान असताना माझ्या मोठ्या भावाबरोबर जायचो त्यांच्या वाड्यावर. मोठे मालक आणि वहिनी येणार असले की सगळी पोरं-टोरं बरोबर जमायची तिथे. वहिनी सगळ्यांना मुंबईहून आणलेल्या गोळ्या-चॉकलेटं द्यायच्या. साहेब आता हे लोणावळा म्हणजे थंड हवेचं ठिकाण झालं. पूर्वी कुठे काय होतं हो? आणि त्यात आमच्या सारख्या गरीब पोरांना तर आईकडून पाच-धा पैसे मिळायचे कधीतरी... त्याच्यात त्या मिंट गोळ्या यायच्या न फक्त. त्यामुळे वहिनींच्या येण्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. आम्ही वाड्याच्या मागे जमायचो आणि तिथून गोळ्या घेऊन पसार व्हायचो. आमचे खूप लाड करायच्या वहिनी पण एक नियम होता त्यांचा.... वाड्याच्या मधल्या दाराकडे नाही जायचं कोणी. आम्हाला खूप कुतूहल वाटायचं तेव्हा. वय पण असं होतं न की नाही म्हंटलं की जावंसं वाटतंच. मग कधीतरी आम्ही मुद्दाम त्या अंगाकडून बाहेर पडायला बघायचो. पण तो राक्षस भिकू असायचा आमच्या मागावर. तो असा काही कर्दनकाळासारखा उभा राहायचा की आम्ही गपचूप रस्ता बदलून नेहेमीच्या मार्गाने बाहेर पडायचो. मग कधीतरी फक्त मालक यायला लागले. त्यामुळे आमचं पोरांचं जाणं बंद झालं वाड्याकडे.
मोठे झालो थोडे आणि मग मात्र त्या अर्ध्या वयात त्या वाड्याबद्दल बोलायला आणि ऐकायला मजा यायला लागली." असं म्हणून दिन्याने एकदम जीभ चावली. बोलायच्या नादात आपण इन्स्पेक्टर राठींच्या समोर उभे आहोत ते तो विसरला होता. समोर कोण आहे याची जाणीव झाली आणि तो एकदम गप झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत राठी म्हणाले;"दिनू भाऊ, मला सगळं सांगा. मी शब्द देतो; तुम्ही मला काही सांगितलं आहे ते कोणाला बोलणार नाही. काय पवार?"
आतापर्यंत पवार देखील गाडीबाहेर येऊन उभा होता. तो मनात आश्चर्य करत होता की त्याला हे सगळं कसं माहीत नाही. खरं तर तो देखील तिथलाच तर होता. राठी साहेबांचा प्रश्न येताच तो म्हणाला;"अरे साहेब, मी या दिन्याला नेहेमी सांगतो की तुमची कामाची पद्धत वेगळी आहे. बोल रे दिन्या तो बिनधास्त. पण एक सांग साल्या, आपण दोघे एकत्र वाढलो आणि मला यातलं काही कसं माहीत नाही?"
त्याच्याकडे बघत दिनू म्हणाला;"तू आमच्या टवाळक्यांमध्ये कधी होतास का? साला तुझा बाप त्या वाड्याकडे बघून मुतायला तरी द्यायचा का तुला? मग तुला कसं माहीत असेल काही?"
दिन्याचं बोलणं ऐकून पावरला राग आला. पण राठींकडे बघत तो गप बसला. राठींनी दिन्याच्या गाडीला परत चालना देत म्हंटलं;"त्याचं सोडा हो दीनुभाऊ तुम्ही. त्या भिकू बद्दल आणि वाड्याबद्दल बोला."
पवार समोर मिळालेलं महत्व दिनूला सुखावून गेलं. तो पोपटासारखा बोलायला लागला.
दिनू : साहेब, मालक पण खूप चांगले होते हो. पण ती होती न अवदसा. तिच्या कह्यात गेले आणि मग सगळं बदलून गेलं.
पवार : कोणाबद्दल बोलतो आहेस तू?
दिनू : अरे असं काय करतोस.... तुझा आन माझा बाप नाही का म्हणायचा ती रंभा-उर्वशी दिसली म्हणून...
पावरला एकदम आठवलं... त्याचा बाप खरंच असा उल्लेख करायचा कोणाचातरी. त्याने होकारार्थी मान हलवताच दिनूला परमानंद झाला. त्याच्या बोलण्याला आता पुष्टी मिळाली होती. त्याच उत्साहात तो बोलायला लागला.
दिनू : तर साहेब, एक होती. ती खरं तर आली होती वहिनींच्या माहेराकडून. इथे वाड्यावर ठेवली होती वहिनींनी तिला. जबरदस्त बाई होती. एकटी राहायची इथे. इतका थोरला वाडा पण कधी घाबरली नाही. दिसायला तर अशी लाजावाब होती की बोलायची सोय नाही. पण म्हणूनच मोठे मालक कधीतरी घसरले. तिने पण हवा दिली असेल... कुणास ठाऊक? पण मुंबईकडे वहिनी गरवारशी होत्या तेव्हाच ती पण राहिली पोटुशी इथे. वहिनींना कळलं बहुतेक. कारण त्यानंतर त्या कधीच इथे आल्या नाहीत. पण मालक इथे यायचे. अधून मधून येताना आनंद भाऊंना पण घेऊन यायचे. मकरंद आणि आनंदभाऊ एकत्र वाढत होते. पण आनंद भाऊ कधीच मकरंदशी बोलले नाहीत. थोडे मोठे झाले आणि मग आनंद भाऊ पण यायचे बंद झाले. पुढे पुढे तर मालकांनी मुंबईला जायचंच सोडलं.
असेच दिवस जात होते..... आणि एक दिवस आम्हाला कळलं की मालक मुंबईला गेले.... आणि गेलेच ते!! म्हणजे एकदम ढगात गेले. मकरंद भाऊ गेले होते त्यांच्या आईला घेऊन म्हणे. पण मग.... काहीतरी राडा झाला असणार. ते आले परत. हळूहळू सगळे वाड्याकडे जायचं टाळायला लागले. का ते मला कधी कळलं नाही. कारण आम्हा मुलांसमोर काही बोलायचे नाहीत वडील माणसं. पुढे तिथे जंगल वाढलं. तो राक्षस भिकू.... ती रया गेलेली रंभा आणि मकरंद भाऊ असे राहायचे. काय खायचे... कसे जगायचे... कोणालाही माहीत नाही.
अशी वर्षं गेली आणि अचानक आनंदभाऊ यायला लागले. इथूनच जायचे न माझ्या गादीवरून. कोल्ड्रिंक्स न्यायचे इथूनच...."
राठींनी हसत विचारलं;"कोल्ड्रिंक्स ठेवतोस का?"
त्यावर जीभ चावत दिनू म्हणाला;"साहेब, गरीब आहे. गरज आहे. बिअर ठेवतो मी. पण ओळखिच्यांनाच देतो ना. तर आनंद भाऊ इथूनच न्यायचे. एरवी अंगावर धावून येणारा तो भिकू आनंद भाऊ आले की एकदम गोगल गाय होऊन जायचा. त्याचं लग्न पण आनंदभाऊंनी लावून दिलं होतं. पण त्याने नाही टिकवल. आनंद भाऊ आले की मकरंद नाहीसा व्हायचा. आम्हाला ते कोडं कधीच कळलं नाही. मग ती म्हातारी रंभा पण गेल्याचं कळलं. मध्ये हा करोना आला. तर आनंद भाऊ येत नव्हता. मग गेले दोन-चार महिने यायला लागला. आनंद भाऊंबरोबर एक मुलगी पण यायला लागली होती अलीकडे. बस्.... साहेब मला इतकंच माहीत आहे."
असं म्हणत दिनू गप बसला. राठींनी खात्री करून घ्यायला एकदा पावरकडे बघितलं. पवारने डोळ्यांनीच खूण केली की दिनूने सगळंच सांगितलं आहे. राठींनी दीनुकडे हसत बघितलं आणि म्हणाले;"चल दिनू येतोस का वाड्यावर?"
राठी साहेबांचा प्रश्न ऐकून दिनू एकदम चरकला आणि म्हणाला;"साहेब, मला पोलीस स्टेशनात नेऊन लॉक अप मध्ये टाका. चालेल. पण मी नाही येत त्या बाजूला."
राठींच्या लक्षात आलं की दिनू येणार नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात वेळ न घालवता त्यांनी पावरला खूण केली आणि गाडीत जाऊन बसले.पवार देखील गाडीत बसला. त्याच्याकडे बघत राठी म्हणाले;"पवार किती घबरतोस?"
पवार देखील आता राठींसोबत काम करून सरावला होता. हसत म्हणाला;"चला साहेब...." आणि गाडीबाहेर डोकं काढत दिनूला म्हणाला;"येतो रे. वाड्यावर जातो आहोत आम्ही. पण बोलू नकोस कुठे."
गाडी पुढे गेली आणि राठींनी पवारांच्या खांद्यावर मारलं आणि दोघेही हसले. आता गावात सगळ्यांना कळणार होतं की राठी साहेब आणि पवार वाड्यावर गेले आहेत.
क्रमशः
💬 प्रतिसाद
(15)
ज
ज्योति अळवणी
Fri, 02/05/2021 - 19:25
नवीन
प्रतिक्रिया नक्की कळवा. मला लिहिताना खूप मजा येते आहे. तुम्हाला देखील आवडतंय का याची उत्सुकता आहे
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Sat, 02/06/2021 - 11:21
नवीन
राग मानू नका पण गूढकथा, थ्रिलर मला एका बैठकीत वाचून संपवायला आवडतात. पहिल्या भागानंतर पुढचे भाग वाचले नाहीत. अर्थात नवीन भाग आला की पाहिले खाली जाऊन क्रमशः आहे का बघतो. जेव्हा कथा संपेल तेंव्हा पूर्ण वाचून प्रतिक्रिया देईनच आणि तुमच्या पूर्वीच्या कथांप्रमाणे ही देखिल उत्कंठावर्धक असेल याची खात्री आहे.
शेभाप्र
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Sat, 02/06/2021 - 04:17
नवीन
उत्कंठा वाढत आहे, हळूहळू वाटतं आता उलगडा झाला पण नंतर अजून नाही. लवकर लवकर लिहा. छान आहे
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 02/06/2021 - 04:40
नवीन
खरं सांगू? मी पहिल्या प्रतिसादाची वाटच बघत होते. पुढच्या शुक्रवारी पुढचा भाग नक्की.
मी माझ्या मनस्पंदन ब्लॉगवर दर शुक्रवारी लिहितेच... गेल्या दोन वर्षात अजिबात खंड पडलेला नाही. त्यामुळे भाग तयार असला तरी शुक्रवार पर्यंत थांबावं लागेल
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Sat, 02/06/2021 - 10:56
नवीन
वा! थोडसं अपेक्षित असं पण उत्कन्ठावर्धक.
आता शुक्रवार पर्यंत थांबावं लागणार?
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 02/06/2021 - 11:13
नवीन
थोडं थांबावं लागेल. कारण मी माझ्या ब्लॉगवर दर शुक्रवारी लिहिते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 02/06/2021 - 11:40
नवीन
ही एकच व्यक्ती आहे?
की वेगवेगळ्या?
की एकसारख्या दिसणाऱ्या?
की अजून काही?
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 02/06/2021 - 13:15
नवीन
पण पुढच्या शुक्रवारी. थोडं थांबावं लागेल तोवर आपल्याला सगळ्यांना.
खरंच अजून पुढचा भाग लिहिला नाही. एकदा बसले की एकटाकी लिहू शकते त्यामुळे थोडं easy घेते मी माझं लेखन
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 02/06/2021 - 18:05
नवीन
हा पण भाग आवडला.
सगळं कळलं असं एकीकडे वाटतंय.
पण
नवीन गाठीपण बऱ्याच बांधल्या गेल्याहेत.
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Mon, 02/08/2021 - 05:46
नवीन
नेहमी प्रमाणे उत्कन्ठावर्धक.
कोल्हापुरला कुणी सिनेमा बघुन आल कि विचारातात "कोण सस्पेन्स आहे?"
तर त्या धरतीवर इथ मला वाटतय "अनघा सस्पेन्स आहे"
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Mon, 02/08/2021 - 10:18
नवीन
अनघा?
भिकू?
आनंद?
मकरंद?
की अजून कोणी?
येत्या शुक्रवारी नक्की!!!!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Mon, 02/08/2021 - 10:18
नवीन
अनघा?
भिकू?
आनंद?
मकरंद?
की अजून कोणी?
येत्या शुक्रवारी नक्की!!!!
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Fri, 02/12/2021 - 17:04
नवीन
शुक्रवार संपला की हो
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Tue, 02/09/2021 - 16:39
नवीन
मस्तच, वाचायला मजा येतिये.... शुक्रवार उद्द्याच आहे अस समजा :)
- Log in or register to post comments
स
सुसदा
Fri, 02/12/2021 - 00:52
नवीन
उत्कंठा वर्घक!! शुक्रवार उद्याच आहे , वाट पहाते
- Log in or register to post comments