आण्णामहाराज!!!
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम."
"काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?"
"कळवतो म्हणाले."
"हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच."
"हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?"
"विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी"
"कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?"
"अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?"
"काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?"
"अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर? जाशील ना उड्या मारत?"
"आणि हे सगळं करुनही नाही मिळाली तर? मग काय करायचं?"
"करायच्या आधीच तुझी नकारघंटा! देवाधर्मावर, उपचारांवर तुझा विश्वास नाही म्हणूनच ही वेळ आली तुझ्यावर.फक्त चिडचिड करत राहतोस.जरा देवाधर्माचं कर काहीतरी.म्हणजे डोकं शांत राहील.समस्या सुटेल तुझी.पण त्यासाठी मुळात देवापुढे झुकलं पाहिजे ना? मोडेन पण वाकणार नाही हा बाणा असेल तर देव तरी तुला का देईल काही? त्याला शरण गेलास तर तो काही देईल.माझं ऐक.आण्णामहाराजांवर श्रद्धा ठेव.अध्याय वाच.बघ तरी करुन.तुझ्या प्रयत्नांनी यश येत नाहीये.माझा उपाय करुन बघ."
"तुमच्या उपायात लॉजिक काडीचं नाहीये.तुमच्या त्या आण्ण्याचा अध्याय वाचण्याचा आणि मला नोकरी मिळण्याचा तार्किक संबंध काय?"
"ही अशी नावं ठेवतोस म्हणूनच ते तुला काही देत नाहीत."
"तुम्हाला देतात ना? मग झालं तर! तुम्ही त्यांचे उपासना करता,आरत्या अोवाळत बसता.मी काही म्हणतो का? येतो का त्या आड? तुम्हाला करा ना हवं ते.रोज उठून आण्णा महाराजांचे महत्व,त्यांचे सामर्थ्य,त्यांचे चमत्कार हे मला का ऐकवता?"
"तुझ्याच भल्यासाठी सांगत असतो ना? माझा वैयक्तिक काही फायदा आहे का? तुला चांगली नोकरी मिळावी म्हणून काही सुचवतो ना?"
"काय सुचवता? आण्णांची सेवा? शेवटचं निक्षून सांगतो.तुमच्या आण्णामहाराजांच्या पोथ्या,अध्याय,स्त्रोत्र वाचण्याचा आणि मला नोकरी मिळण्याचा तार्किक संबंध असेल तरच सांगायचं.निव्वळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्या त्या आण्णामहाराजांच्या कच्छपी लागत बसणार नाही."
"अहो! जाऊ द्या.दरवेळी काय तेच? तो काही ऐकत नाही.तुम्ही तुमचं पालुपद सोडत नाही."
"चला.आई! मी जरा पडतो.अर्ध्या तासाने उठव मला."
"बरं!"
"खरंय मंगल तुझं.या बिंडोकाला काही सांगण्यात अर्थ नाही.साधं देवापुढे हातही न जोडणार्याला मी मुर्खासारखं सांगत बसतो.आता यापुढे याच्यावतीने मीच आण्णामहाराजांची साधना वाढवेन.पोरगं निरिश्वरवादी आहे हे आपलं प्राक्तन.दुसरं काय?"
"करा काय करायचं ते.पण बाप लेकांचे वाद थांबवा आता!"
तीन महिन्यांनी
"आई गुड न्यूज! मिळाली नोकरी एकदाची."
"अरे वा! पेढे घेऊनच ये येताना!"
"हो.बाकीचं घरी आल्यावर बोलतो."
"बरं बरं! सावकाश ये!"
---------------------------------------------------
"हं सांग आता काय काय झालं? पगार वगैरे आहे का चांगला?"
"हां.आहे ठिकठाक.करोनामुळे कामं थोडी कमी आहेत.पण वाढवतील पगार काम बघून! कंपनी मोठी आहे.चार राज्यात प्रॉडक्ट जातं त्यांचं."
"मस्त!"
"बघ.ही सगळी आण्णामहाराजांची कृपा.तू त्यांचं काही करायचा नाहीस म्हणून मी तुझ्यावतीनं करायचो.अध्याय वाचायचो,समाधीवर प्रार्थना करुन यायचो.हे त्याचं फलित."
"डोंबल त्या आण्ण्याचं.मला नोकरी मिळाली ती का मिळत नाही या समस्येवर जरा बारकाईनं विचार केला आणि त्यावर उपाय केला म्हणून.एक चांगली कन्सल्टन्सी गाठली.पैसे जरा जास्त घेतले पण नोकरीसाठीच्या अर्जात काही बदल करायला सांगितले.ते केले.त्यांनी अजून काही नोकरीच्या साईटवर रिझ्युमे अपलोड करायला सांगितला होता.तो केला.बर्याच उचापत्या केल्या त्यांनी.हे त्यांचे प्रयत्न आणि त्याचे फलित आणि मी त्यांच्याकडे गेलो म्हणून हे झालं.यात तुमच्या आण्णामहाराजांचा संबंध आलाच कुठे?"
"अरे इथेच तर संबंध आहे आण्णामहाराजांचा.मी तुझ्यासाठी त्यांची उपासना करायचो म्हणून दयाबुद्धीने त्यांनी तुला नोकरीची समस्या सुटण्यासाठी त्या कन्सल्टन्सीकडे अलगद नेले आणि तुझे काम करुन दिले.हा त्यांचाच कृपाप्रसाद आहे हे लक्षात घे!"
"काहीही!"
"काहीही कसं? मग याआधीच तुला ही नोकरी का मिळाली नाही ते सांग!"
"अहो बाबा त्यांच्याकडे व्हेकन्सी फक्त मागच्या आठवड्यापासून उपलब्ध झाल्यायत.त्यांच्याकडून ऑफर उपलब्ध व्हायच्या आधीच मला कशी मिळेल नोकरी?"
"तेच तर सांगतोय.ही व्हेकन्सी निर्माण केली कोणी? आण्णामहाराजांनीच.याआधी त्या कंपनीत या जागा का उपलब्ध नव्हत्या सांग.मी उपासना सुरु केल्यावरच का उपलब्ध झाल्या ते सांग!"
"आण्णामहाराज!!!! मला वर बोलवा.तुम्ही परवडलात पण तुमचे भक्त नकोत!"
💬 प्रतिसाद
(9)
V
Vichar Manus
Fri, 02/12/2021 - 16:28
नवीन
छान आहे. भक्तांपुढे लॉजिक चालत नाही
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 02/13/2021 - 08:28
नवीन
त्यांचे प्रश्न समाज सोडवतो.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sun, 02/14/2021 - 03:26
नवीन
हा हा हा...नर्मविनोदी चिमटा मस्त जमलाय!
- (आण्णामहाराजांनी हा प्रतिसाद देण्याची बुद्धी दिलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 03:29
नवीन
अध्यात्मिक माणसे आहेत ....
मंदिरात टाळ कुटत बसतात आणि ध्वनी प्रदूषण करत बसतात ....
घरातील कामे टाळायची असतील तर, जय अध्यात्म ...
धंदा करायचा आहे, जय अध्यात्म...
नगरसेवक म्हणून निवडून यायचे आहे, जय अध्यात्म...
नातवंडांची जबाबदारी टाळायची आहे, जय अध्यात्म....
रिकामा वेळ खायला उठतो, जय अध्यात्म....
एक साधी गोष्ट आहे .....
शेतकरी आंदोलन करत नाही आणि ज्याच्या कडे फावला वेळ नाही, तो बाबा महाराज, यांच्या नादी लागत नाही.....
बाबाला सोन्याचे सिंहासन आणि मेळघाट उपाशी....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 03:50
नवीन
ही दहा वर्षे विविध देवळे पालथी घातली.
एकच गोष्ट समजली .....
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, हिंदू धर्म टिकला नसता...
आमचे आता एकच महाराज, छत्रपती शिवाजी महाराज...
धर्म टिकतो तो तलवारीच्या जोरावर, जपजाप्य कामाला येत नाही...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 04:54
नवीन
स्थळ डोंबिवली, पुर्व, स्टेशन जवळ, स्वामी समर्थ मठ...
आधी रामाचे मंदिर होते, पण विशेष काही गर्दी नसायची. नंतर मंदिराचा मठ झाला. अध्यात्मिक माणसे जमायला लागली.आता जुने मंदिर पाडून नवीन प्रशस्त मंदिर बांधले आहे.
जे रामाच्या भक्तांना शक्य झाले नसते, ते स्वामी समर्थांच्या भक्तांनी करून दाखवले..
डोंबिवली येथील, पांडुरंग वाडी ....
मुळ मंदिर, विठ्ठलाचे.. अतिशय तुरळक गर्दी आणि वर्षांतून 3-4 कार्यक्रम आणि ते पण कमी आवाजात...
सध्या तिथे, गोंदवलेकर महाराज यांचा मठ आहे.सांगायला ध्यानसाधना आणि करतात काय? तर, ध्वनी प्रदूषण ...पहाट म्हणू नका, रात्र म्हणू नका, कार्यक्रम चालूच...
ह्यांच्या त्रासाला कंटाळून, एकाने फ्लॅट विकला तर, ह्याच भक्तांनी दुसर्या व्यक्तीला, तुम्हाला फ्लॅट सोडायला लावूच, अशी धमकी दिली...
ह्या दोन्ही गोष्टींचे पुरावे कधीही मिळतील....
आता ऐकीव माहिती सांगतो ....
स्थळ डोंबिवली, एका व्यक्तीचा संसार चालेना, बाबा मंदिर स्थापन केले आता आरामात जगतो...
........
एक गोष्ट शिकलो, जर तुम्हाला जागा राखायची असेल तर, ट्रस्ट स्थापन करा आणि बाबा महाराज यांचे मंदिर स्थापन करा... एक इंच जमीन इकडेतिकडे होणार नाही....
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 02/15/2021 - 04:28
नवीन
खंडोबाची नवसाला पावण्याची क्षमता खूप जास्त असल्याने खंडोबा विविध रुपांमधे मध्यप्रदेशापासून ते कन्याकुमारीपर्यंत जाम प्रसिद्ध आहे.मुरुगन,अय्यप्पा ही त्याचीच रुपे.
खंडोबा या देवाला मानणारा एक मुस्लिम पंथही आहे.ते खंडोबाला 'मल्लुखान' असे संबोधतात. ज्या धर्मात मुर्तीपुजाच मान्य नाही त्या धर्मियांनासुद्धा खंडोबा महत्वाचा वाटला तो त्याच्या नवसाला पावण्याच्या क्षमतेमुळेच. :)
मनुष्य हा प्राचीन काळापासून स्वार्थी आहे. आपला स्वार्थ (बहुतेकवेळा भरपूर पैसा,प्रसिद्धी,मुलं होणे) पूर्ण करेल त्या देवाला,संताला भजणे हे तेव्हापासून सुरु आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 02/15/2021 - 05:23
नवीन
माणसाला देवत्व बहाल केले की राष्ट्राची अधोगती ही ठरलेलीच...
वाकाटक, राष्ट्रकूट, नंद राज्य ही काही उदाहरणे ....
तुर्कस्तानची प्रगती, केमाल पाशाच्या काळातच जास्त झाली, कारण, केमाल पाशाने सगळ्या बाबा महाराज यांचा धंदा बंद केला...
माणसाला देवत्व बहाल करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची.... हा फार आधीपासूनच धंदा आहे....
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 02/15/2021 - 12:28
नवीन
"आण्णामहाराज!!!! .....
_/\_
- Log in or register to post comments