Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर

च
चौथा कोनाडा
Fri, 03/12/2021 - 17:46
💬 16 प्रतिसाद
१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ? याच दरम्यान त्याची रेव्ह. बोवर (ज्यांनी प्राचीन तामिळ संतकवी थिरुवल्लावूर मद्रासयांच्या थिरुक्कुरल (आव्या / अभंग) चा इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता) आणि मि. क्लार्कशी (मदुरैचे उपजिल्हाधिकारी होते) यांच्याशी भेट झाली. (मि. क्लार्क खुप वर्षे कोडईकनल इथं, तिथली सुरुवातीची घरे देखील त्याच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली होती. काल्डवेल यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ७ महिने यापैकी एका घरात काढले) हे दोघेही तामिळ भाषेत पारंगत होते, याचीही त्याला खूप मदत झाली. … .. पुढे काल्डवेलने मग तमिळ बोलीभाषा आत्मसात केली त्याचा बरोबर पारंपारिक तमिळ साहित्यवाचन, आधुनिक शिक्षण प्रक्रिया, स्थानिक लोकांचा भाषा शिकण्याचा कल यांचाही अभ्यास केला. हे करत असताना त्याचा स्थानिक जनतेशी वेळोवेळी संवाद होत राहिला. Caldwell_345107 काल्डवेलला आता चर्चचा कार्यात सहभागी वाटू लागले. येशूच्या शिकवणीच्या प्रसारासाठी एसपीजी (सोसायटी ऑफ प्रोपोगेशन) संस्थेद्वारे कार्य करण्याचे त्याने ठरवले, यासाठी त्यानं तामिळनाडू प्रांताच्या दक्षिणपूर्व टोकाशी असलेलं तिरुनेलवेली हे जिल्ह्याचा प्रांत निवडला. तिरुनेलवेली मद्रासपासून साधारण ६००-७०० किमी दूर होते. जवळ नव्हतं, पण खुप लांब देखील नव्हतं. त्याने आरामात पायी जायचं ठरवले. यामुळं स्थानिक भाषा आणि संस्कृती त्याला समजू शकली, बोलीभाषा, आदिवासी भाषा, त्यांच्या पोटभाषा, उच्चारातले लहेजे, विविध जाती मधील भाषा वैशिष्ठे इ. गोष्टी समजून आल्या. या प्रवासादरम्यान तो हजारो स्थानिकांना भेटला. त्याचं भाषिक अन अनुभव विश्व खुपच विस्तारलं. इथल्या मातीत मिसळत तो आता जणूकाही स्थानिक तमिळच झाला होता ! तमिळप्रदेशातील ग्रामीण वस्ती: Caldwell_107123 तो दिवसभर प्रवास करायचा, सकाळी निघून संध्याकाळपर्यंत दुसऱ्या गावी पोहोचायचा. मधे दुपारच्या वेळी जेवण आणि विश्रांतीची सुट्टी. रात्री पोहोचलेल्या गावात विश्रांती. पुदुच्चेरी, कुंभकोणम, मेट्टूपलयम, कोयंबतूर असा प्रवास करत उटीला येऊन पोहचला. तिथल्या बिशपने त्याची मुक्क्क्म, जेवणखाण्याची सोय केली. तिरुनेलवेलीच्या जिल्ह्यातलं इडयनगुडी हे खेडं त्याच्या सेवाकार्याला उत्तम राहिल असं बिशपने सुचवलं.पुढील प्रवासासाठी त्याने घोडा विकत घेतला. पण घोड्याचे नखरे सांभाळत वेळ घालवण्यापेक्षा तो तिथंच विकून पायीच प्रवास सुरु केला. आता मदुरैला पोहोचला, तिथून त्याचे गंतव्यस्थान तिरुनेलवेलीच्या पुढे किनाऱ्या जवळचं इडयनगुडी (Idaiyangudi) आता टप्प्यात आलं होतं. अचानक पायातल्या वहाणा टोचायला लागल्या म्हणून त्याने त्या फेकून दिल्या आणि अनवाणी प्रवास चालू ठेवला. काळीशार खडकभूमी, सपाट मैदानं, कापसांची शेतं या मधून पायपीट करत त्याचं मार्गक्रमण सुरु राहिलं. काल्डवेलचा साधारण प्रवास-मार्ग :

तिरुनेलवेलीच्या अलीकडंच काल्डवेलचं स्वागत नाडार ख्रिश्चनांनी केलं. त्यांचा उत्तम पेहराव, अदबशीर बोलणे आणि “वन्नकम” म्हणत केलेले दिलखुलास स्वागत याने तो भारावून गेला. त्यांच्या सौम्य आणि अतिथ्यशील स्वभावाचा काल्डवेलवर चांगलाच ठसा उमटला. ते सुधारणावादी लोक होते. आपल्या ईश्वरी कार्याचा प्रसार करायला हे असेच लोक हवे आहेत असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. येशूची हीच ती लेकरे जी माझ्या दिव्य कार्यासाठी प्रतीक्षा करत आहेत या विचाराने तो हर्षभरीत झाला. त्याचवेळी नाडार समुदायावर पुस्तक लिहिण्याचे त्याने ठरवले आणि लिहिले देखील. वाटेत एक दोन चर्चचे आदरातिथ्य घेत काल्डवेल रविवारी २८ नोंव्हेंबर १८४१ ला दिवस उजाडत असतानाच तिरुनेलवेलीला पोहोचला. सकाळी सकाळी तिरुनेलवेलीच्या मि. कॅमेरेरच्या चर्चमध्ये तमिळ भाषेत आपले पहिले वहिले पहिला प्रवचन दिले. दुपारी मात्र वाट चुकल्याने इडयनगुडीला पोहोचायला त्याला रात्र झाली ! हे छोटेसे खेडं. तिरुनेलवेली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७०-८० किमीवर. ख्रिश्चन मिशनरी तिथं ७०-८० पूर्वीच पोहोचलेले होते. आधीच्या मिशनरी लोकांनी तिथं चर्च उभा करून धर्म प्रसाराचं काम सुरु केलं होतं पण धामधुमीचा काळ, चुकीचं नियोजन आणि अयोग्य अंमलबजावणी या मुळं त्यांना या धर्मांतर कार्यात फारसं यश येत नव्हतं. ख्रिश्चन झालेले लोक परत हिंदू धर्मात यायचे. काल्डवेलने या यशापयशाचा पूर्ण अभ्यास केला. मोठ्या जोमानं या "धर्मकार्या" साठी वाहून स्वतःला घेतले. गावात शाळेसारख्या महत्वाच्या सोयी करून लहानमोठ्या विविध सवलती देऊन अतिशय चातुर्याने त्याने पुन्हा धर्मांतरित करून घेतले. याचा परिणाम असा झाला की वाड्याच्यावाड्या ख्रिश्चन होऊ लागल्या आणि काल्डवेलचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले. इडयनगुडीचा स्थान-नकाशा:

इडयनगुडी गावाची रचना क्लिष्ट होती. छोटे चर्च, बारक्या गल्ल्या आणि स्थानिकांची कशाही पद्धतीने बांधलेली घरे यामुळे नीटनेटकेपणाचा अभाव होता. त्याच्या सारख्या शीत हवामानात राहिलेल्या समर्पित येशू सेवकाला रणरणते ऊन, वाळूच्या टेकड्या, दमट हवा आणि गावाची रचना हे आवडले नाही. ही दयनीय अवस्था काल्डवेलने सुधारायची ठरवली. स्वतःसाठी आणि येशूच्या लेकरांसाठी त्याने सुंदर गाव वसवायचं ठरवले. अडीअडचणींवर मात करत आजूबाजूची जमीन विकत घेतली. नियोजित गावाचा नकाशा तयार केला. नविन गावातली एकसारखी नियोजित घरे, रस्ते, चर्च, शाळा गावकऱ्यांच्या मदतीने बांधायला सुरुवात केल्या. स्वतः जमिनी मोजल्या, सपाटी करणे, खणणे, सांडपाणीचर काढणे या कामात झोकून दिले. गाव सुशोभित करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. गाव सुंदर करून टाकले. त्याच्या सौंदर्यदृष्टीचे नव्याजुन्या सर्वानी कौतुक केले. त्यामुळे त्याला येशूचे कार्य करण्यासाठी आणखी हुरुप आला ! काल्डवेलचा विवाह आणि पुढील वाटचाल: इडयनगुडीत येऊन काल्डवेलला ४-५ वर्षे झाली होती, तिशीत प्रवेश करत असल्यामुळे त्याची लग्नाची वेळ झालीच होती. काल्डवेलला दक्षिण त्रावणकोरचे मिशनरी रेव्ह. चार्ल्स मॉल्ट यांची मोठी मुलगी एलायझा हिचे स्थळ सांगून आले. एलायझाचे शिक्षण नागरकोइलमध्येच झाले होते त्यामुळे तिला तमिळ-मल्याळम भाषेचे सखोल ज्ञान होते, , त्याबरोबरच ती विणकामात देखील पारंगत होती. १८४४ मध्ये रॉबर्ट आणि एलायझा विवाहबद्ध झाले. एलायझा तेव्हा २१ वर्षांची होती. काल्डवेल आणि त्याची पत्नी एलायझा त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. एलायझा काल्डवेल स्वभावाने लाघवी होती, लोकांना पटकीनी आपलेसे करून घ्यायची. एलायझाला बोली तामिळ-मल्याळम भाषेच्या खाचाखोचा माहित असल्यामुळे रॉबर्ट काल्डवेलने तिच्याकडून भाषेचे आणखी ज्ञान घेतले. तिच्या मार्गदर्शनाखाली बोलीभाषेतील बारकावे, त्यातील शब्दांच्या अर्थछटा याचा भरपूर अभ्यास केला. काही काळातच एलायझाने इडयनगुडीला गर्ल्स बोर्डिंग स्कूल सुरू केले आणि मुलींना लिहायला, लिहायला शिकवले. या कामात ती लवकरच निष्णात झाली. विशेषतः महिला-पुरुषांचा विकास आणि आर्थिक उन्नती याचा विचार करून आखणी करून विविध उपक्रम सुरु केले. आणि मि. रॉबर्ट काल्डवेल आणि मिसेस एलायझा काल्डवेल दोघे मिळून शाळेचे, चर्चचे काम आणि समाजसेवा करू लागले. ती तिच्या पतीसाठी एक उत्कृष्ट सहकारी आणि विश्वासार्ह मित्र बनली होती, एवढी गुणवान सहचरी म्हटल्यावर कामाचा धडाका सुरु होणारच ना ! एलायझा काल्डवेल:

१८७० च्या सुमारास रॉबर्ट काल्डवेल यांनी इडयनगुडी मध्ये गॉथिक शैलीचे सुंदर असे होली ट्रिनिटी चर्च बांधायला घेतले.. कौलारू छत, खिडक्यांच्या तावदानासाठी काचांचा वापर आणि भव्य कमानी यामुळे चर्चची वास्तू आकर्षक झाली. काल्डवेल यांनीच बनवलेल्या मातीच्या मॉडेल वरूनच स्थानिक कारागिरांनी चर्च बांधले. चर्चच्या स्थापत्याची, बांधकामाची आणि त्यात सहभागी कारागिरांची उदा. शिल्पकार आणि सुतार यांच्या कौशल्याची खुप प्रशंसा केली गेली. या होली ट्रिनिटी चर्चचे १८८० मध्ये उदघाटन झाले. काल्डवेल यांनी बांधलेले इडयनगुडी मधील होली ट्रिनिटी चर्च: Caldwell_123407 दुरून दिसणारी होली ट्रिनिटी चर्चची वास्तू: retdgv12345 काल्डवेल यांनी ख्रिस्ती धर्म प्रसारा बरोबरच परिसरांत अधिकाधिक शाळा स्थापन करून निरक्षर आणि अडाणी लोकांचे शिक्षण देणे सुरू केले, त्यांच्यासाठी आरोग्यसेवा देऊन त्यासाठी कर्तव्यदक्ष अश्या सेवकांची फळी उभी केली. तिथल्या कुटुंबांची सामाजिक, आर्थिक समस्या सोडवणे सुरु केले. या सोयी ख्रिश्चनेतर लोकांसाठी देखील "येशुचीच सेवा" म्हणून दिल्या. यात एलायझाने सिहांचा वाटा उचलला. तिच्या विणकामाच्या उद्योगाने स्त्रियांबरोबच मुले पुरुष यांनाही रोजगार मिळून आर्थिक स्थिती सुधारली. त्यांच्या अनिष्ट चालीरीती संदर्भात मार्गदर्शन करून त्यांचे समस्या निराकरण केले. तिरुनेलवेली परिसरातील प्राणघातक अश्या कॉलरासाथीच्या वेळी मोठी मानवसेवा केली. १८७८ मध्ये जेव्हा तिरुनेलवेली येथे तीव्र दुष्काळ पडला तेव्हा खुप मोठे मदतकार्य त्याने लोकांना सोबतीला घेऊन केले. यामुळे त्यांना सर्वांचीच आपुलकी व आदर मिळाला. सर्व जातीधर्मात त्यांचे प्रशंसक निर्माण झाले. राज्य, देश-परदेशात त्याचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. त्यांच्या समाजसेवेचे मोठी दखल घेतली गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त अश्या रेव्ह. रॉबर्ट कॅल्डवेल यांची १८७७ मध्ये मध्ये तिरुनेलवेलीच्या बिशपपदी निवड करून कलकत्ता येथील सेंट पॉल कॅथेड्रल येथे आयोजित ऐतिहासिक समारंभात सन्मानित करण्यात आले. बिशपपदी निवड झाल्यानंतर रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल: Caldwell_236107 आपल्या बिशपपदाच्या कारकिर्दीत काल्डवेल १८८६ मध्ये काल्डवेल यांनी कोडाईकनालला सेंट पीटर्स चर्च ऑफ बांधले. तिरुनेलवेली जवळच असलेले किनारपट्टीवरील तुतीकोरिन हे एस.पी.जी. चे (सोसायटी फॉर प्रोपोगेशन ऑफ गॉस्पेल मिशन, SPG) मुख्य ठाणे करायचे असल्याने त्यांना प्रमुख म्हणून तुतीकोरिन येथे स्थलांतरित व्हावे लागले. तिथंही त्यांनी त्यांचे धर्मप्रसार आणि समाजकार्य सुरु ठेवले. स्थानिकांच्या शिक्षणासाठी उच्च माध्यमिक शाळा आणि आणि महाविद्यालय स्थापन केले. तिरुनेलवेली, तुतीकोरिन परिसरातील शनार (नाडार) समुदाय हा सामाजिक दृष्ट्या पिचलेला होता. दुःख दारिद्याबरोबरच सवर्ण जमातींकडून होणारी अवहेलना पाहून केल्डवेल हेलावून गेले. शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली. याचे काल्डवेल यांना वाईट वाटले. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- क्रमश: प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार.

प्रतिक्रिया द्या
6664 वाचन

💬 प्रतिसाद (16)
उ
उपयोजक Sat, 03/13/2021 - 03:28 नवीन
या पाद्र्यांचा मुख्य उद्देश भारतीयांना ख्रिश्चन बनवणे हाच होता हे विसरुन चालणार नाही. गरीब लोकांना गंडवून, गरजेच्या वस्तू,पैसे देऊन त्या लोभापायी ख्रिश्चन धर्मात खेचणे याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/13/2021 - 06:25 नवीन
धर्मांतरण केले तर ख्रिश्र्चन लोकांनी, गोड बोलून.... आता ह्यांनी फार वेगळी पद्धत अवलंबली आहे, धर्म बदलला तरी नावे हिंदूच ठेवतात कृष्णा, नावाचा ख्रिश्र्चन बरोबरच होता, तर पाटोळे आडनावाचा ख्रिश्र्चन पण होता.... नावा मुळे, हिंदू मुली भुलतातच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ब
बापूसाहेब Sat, 03/13/2021 - 07:37 नवीन
मी कुलकर्णी नावाचे मुस्लिम गृहस्थ पाहिलेत.. ते सुद्धा लाल दाढी मध्ये. असो.. विषयाला फाटे नको फोडायला.. छान चाललीये लेखमाला.. वाचतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
उ
उपयोजक Sat, 03/13/2021 - 10:59 नवीन
मुस्लिमांमधेही आहे. कुळांवर देखरेख ठेवणारे ते कुलकर्णी. मुतालिक असे मुस्लिम वाटू शकणारे आडनाव ब्राह्मणांच्यात आहे. हे ही पदाचेच नाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब
R
Rajesh188 Sat, 03/13/2021 - 13:15 नवीन
धर्म परिवर्तन करण्यासाठी समाजातील दुर्बल घटकांना टार्गेट केले जाते. आर्थिक मदतीचे आमिष दाखवून गरीब लोकांचे धर्म परिवर्तन केले जाते त्या बदल्यात आर्थिक सहाय्य केले जाते. नाव न बदलण्याचे महत्वाचे कारण. आरक्षण ना वरील हक्क अबाधित रहावा हाच हेतू असतो. म्हणजे धर्म तर सोडायचा पण हिंदू जाती च्या नावाखाली जे आरक्षण मिळते ते पण सोडायचे नाही . त्या साठी कागदपत्र वर हिंदू च नाव ठेवले जाते. अशी खूप लोकं माझ्या पण पाहण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
च
चौथा कोनाडा Sat, 03/13/2021 - 12:50 नवीन
@उपयोजक, समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. समाजसेवेच्या आवरणाखाली ख्रिश्चन धर्माने असाच धर्मप्रसार केला आहे. दुर्दैवाने याला आपल्या देशातील दुर्बल घटक बळी पडले. काल्डवेलने स्थानिक भाषा याचसाठी शिकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ह
हेमंतकुमार Sat, 03/13/2021 - 04:09 नवीन
माहीतीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/13/2021 - 12:57 नवीन
🙏 धन्यवाद, कुमार१ साहेब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सौंदाळा Sat, 03/13/2021 - 07:11 नवीन
लेख छानच मात्र दहशतीने, अमिष, लालूच दाखवून, भुकेकंगाल लोकांना जेवण देऊन धर्म प्रसार केलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या माणसाबद्दल प्रचंड चीड येते. अर्थात त्यांच्या बाजूने विचार केला तर हे असामान्य कार्यच आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/13/2021 - 13:01 नवीन
सौंदाळा, चीड तर येतेच पण त्या काळी स्थानिक राजेमहाराजे यांना काहीच का करता आलं नाही याची आगतिकता येते. ज्या समाज सुधारणा आपल्या स्थानिक राजे-महाराजे यांनी करायला हव्या होत्या त्या त्यांनी सातासमुद्रापार येऊन केल्या.
लेख छानच
धन्यवाद, सौंदाळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
मुक्त विहारि Sat, 03/13/2021 - 18:07 नवीन
एक म्हणजे, हिंदू कधीच एकत्र येऊ शकत नाहीत... आणि दुसरे म्हणजे, व्यक्तीपुजा, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा शाप आहे.... इतर धर्मात, व्यक्तीपुजा नाही, त्यामुळे ते लगेच एका झेंड्याखाली येतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Sun, 03/14/2021 - 14:03 नवीन
.... आणि दुसरे म्हणजे, व्यक्तीपुजा हे काल्डवेलसारख्या लोकांनी बरोबर हेरले. आपल्या मागे लोक येतात हे पाहून ख्रिश्चन धर्माचा प्रसार "जोरका झटका, धीरेसे लगे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
उ
उपयोजक Sat, 03/13/2021 - 19:07 नवीन
हिंदू राजे एकत्र आले नाहीत. आपण बलवान असल्याने आपण राज्य करावे आणि बलवान नसणार्‍या सामान्य लोकांनी आपली प्रजा बनून रहावे ही एकच संकल्पना या देशात होती. लोकशाही वगैरे संकल्पना त्याकाळी हिंदू समाजात नव्हत्या. १७ व्या शतकात किंवा त्या आधी शिवाजी महाराज आणि अन्य राजे यांच्या काळी परकीय मुस्लिम आक्रमक हा एकच घाला हिंदू धर्मावर होता. मुस्लिम आक्रमक आक्रमकपणे, मंदिरे पाडून, मुर्ती फोडून, घरात घुसून, दादागिरी करुन, नासधूस करुन हिंदूंना मुस्लिम बनवायचे त्यामुळे ते त्यावेळच्या हिंदू राजांचे शत्रू बनले. पण इंग्रज पुरस्कृत ख्रिश्चन धर्मप्रचारक हळूवारपणे, गावोगावी जाऊन येशु हा तुमच्या हिंदू देवापेक्षाही दयाळू आहे, हिंदू धर्मात तुम्हाला सन्मान मिळत नाही, पण ख्रिश्चन धर्म हा दयाळू आहे, वंचितांनाही जवळ करतो वगैरे भ्रामक तत्वज्ञान सांगून, सहानुभूतीने बोलून, पैसे, वस्तू वाटून ख्रिश्चन बनवायचे. मंदिरे न पाडता नवीन चर्च बांधायचे. या प्रकारात कुठेच आक्रमकपणा नसल्याने १८-१९ व्या शतकातले राजे लोक या प्रकारापासून थोडे अनभिज्ञ राहिले असावेत. आपली मंदिरे,मुर्ती फोडल्या जात नाहीयेत ना! आपलं राजेपण ,महाल ,वाडे, संपत्ती याला धोका नाही ना? मग झालं तर. असा विचार झाला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
म
मुक्त विहारि Sun, 03/14/2021 - 05:00 नवीन
प्रत्येक धर्मात, कमीअधिक प्रमाणात, जातीच्या, शिक्षणाच्या, आर्थिक किंवा वैचारिक भिंती आहेत ख्रिश्र्चन धर्मात देखील, प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक ह्या जातीच्या भिंती आहेतच मुस्लिमांत, शिया आणि सुन्नी, यांच्या शिवाय, खान, पाशा, अन्सारी, मुल्ला-मोलवी ह्या जाती आहेतच आणि सध्याच्या काळांत देखील त्या कट्टरपणे पाळल्या जातात... सौदी अरेबिया येथील मुस्लिम, भारतीय मुस्लिमांना, जास्त जवळ करत नाहीत... माहितीचा स्त्रोत, बिहारी मुस्लिम आणि सौदी मुस्लिम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ग
गोरगावलेकर Sun, 03/14/2021 - 12:01 नवीन
नवीन माहिती मिळते आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/14/2021 - 13:44 नवीन

_/\_

धन्यवाद, गोरगावलेकर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा