Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढग

अ
अनुस्वार
Tue, 04/27/2021 - 15:36
💬 1 प्रतिसाद
कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून. समाजाचे अनौरस विचार आपल्या माणूसपणाचं वस्त्रहरण करून आपल्यातलं आदिम श्वापद उघडं करत आहेत हे आपल्या लक्षातही येईना इतके आपण या प्रक्रियेला सरावलो आहोत. विचार हे व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि कार्य हे समाजाचे. ही मांडणी उलट केली म्हणजे आजवरच्या सगळ्या उत्क्रांतीची वजाबाकी होते. बालपणीची स्वप्ने आता कुणालाच पूर्ण करायची नाहीत. आणि आज नविन स्वप्ने पाहण्यासाठी झोपण्याची आवश्यकता उरली नाही. कारण वास्तवातले जिणे हेच एक स्वप्नरंजन झाले आहे. सगळा मानवच जणू निद्रितावस्थेत गेलाय. संपत्तीची मालकी मोजायची ठरली तर शिवाजी महाराजांपेक्षा शेकडो पटीने संपत्ती असणारी माणसे याच मातीत उपजली पण त्यातल्या एकालाही जनतेने "श्रीमंत श्री.." असे गौरविले नाही. कारण शिवरायांच्या विचारांची श्रीमंती एवढी प्रगल्भ होती की पुढल्या कैक पिढ्यांचे दारिद्र्य या विचाराने गळून पडले. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वे आपल्याला एक चिरंतन स्फूर्ती देतात- विचार करण्याची! माझा 'मी' 'माझ्या'पुरता मर्यादित नाही ही जाणिव म्हणजे 'स्व'ची ओळख. आपण सगळे म्हणजे स्वतंत्र ढग. विचारांनी घडवायचं, काळाने वाहून न्यायचं आणि कर्माने बरसायचं. सगळ्या समुद्राचे ढग बनत नाहीत आणि सगळ्याच मनुष्यप्राण्यांचा 'माणूस' होत नाही. सागराच्या खाऱ्या पाण्यासारखं जागेवर पडून राहायचं की सूर्याचे चटके सोसून आकाशाची सैर करायची याचं प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. सागराचा तळ आणि विचारशून्य मन दोन्ही एकाच ठिकाणी असतात- गडद काळ्याकुट्ट काळोखात.

प्रतिक्रिया द्या
1656 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 21:19 नवीन
सगळ्याच मनुष्यप्राण्यांचा 'माणूस' होत नाही. हे आवडले....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा