Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहं

च
चंद्रकांत
Sun, 05/23/2021 - 18:36
💬 22 प्रतिसाद
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील, तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो लहानमोठा असू शकतो. अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच. तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तन व्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तन व्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का? सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून तो सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. कदाचित डोळसांच्या ललाटी नियतीने वंचनेचा शाप कोरलेला असतो. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का? - चंद्रकांत चव्हाण ••

प्रतिक्रिया द्या
7355 वाचन

💬 प्रतिसाद (22)
स
सोत्रि Mon, 05/24/2021 - 13:26 नवीन
विषय खुपच रोचक आहे. पण लेख थोडा विस्कळीत वाटला. बराचसा गझलेसारखा, गझलेत जसं शेरांचा एकमेकांशी सबंध नसतो तसा वाटला. एकाच परिच्छेदात विरोधाभास असणारी वाक्य आहेत त्यामुळे नेमकं काय मांडायचं आहे ते पकडीत येतय असं वाटत असताना पटकन निसटून जातं.
ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही
औषध म्हणजे मार्ग उपलब्ध आहे, ध्यानमार्ग! - (मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 05/24/2021 - 14:05 नवीन
औषध म्हणजे मार्ग उपलब्ध आहे, ध्यानमार्ग! आरे वा, फार कुतुहलजनक प्रकार आहे हा म्हणजे. याबाबत आजुन जाणून घ्यायला आवडेल की. नुस्त्या एकोळीने काय होणार ? अजुन दोन चार ओळी अवश्य द्याव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Tue, 05/25/2021 - 01:20 नवीन
नक्कीच, कुतूहलजनक तर आहेच पण अद्भुतदेखील आहे! ह्या लेखातील तिसऱया प्रश्नाच्या उत्तरात जो मार्ग सांगितला तो कुतूहल शमवेल, भगवतगीतेतील सहावा अध्याय ते कुतूहल चरमसीमेवर नेईल आणि साधनेतलं सातत्य अद्भुततेची अनुभूती देईल! - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 05:08 नवीन
आपण सांगितलेला लेख पावर ऑफ नाऊ पुस्तकातील तत्वज्ञानाची शब्दरचना बदलून करून दिलेली ओळख आहे... आणि लेखकाला नेमकं काय आकलन झाले आहे हे बुद्धाच्या नावाखाली पूर्ण दबलेले आहे. तसेही एखादी गोष्ट तुम्हास साध्य असेल तर त्यासाठी तुमचा वैयक्तिक अनुभव पुरेसा आहे त्यासाठी, कृष्णाने अंमके बोलले, बुद्ध ते म्हणतो, माऊली फलाना मार्ग सांगतात या कुबड्या गरजहीन आहेत... असो, त्या लेखात विपश्यनेचा उल्लेख तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात आलाय... गीतेचा मर्यादित उल्लेख आपल्या प्रतिसादात आलाय गीतेत विपश्यना कुठेच सांगितली नसल्याने अजूनच गोंधळ उडत आहे ? गीतेच्या 6व्या अध्यायात योगाभ्यास व योगी बाबत विवेचन आहे पण गीता स्वताच सांख्य, ज्ञान यापेक्षा कर्मयोगाचे महत्व जास्त अधोरेखित करत आहे मग भगवंताचे समग्र म्हणणे ऐकायचे की गीतेचे सिलेक्टिव्ह रीडिंग करायचे यात अजून गोंधळ उडत आहे... अर्जुन गीता ऐकून आनापान नक्कीच करू लागला न्हवता... विपश्यना हि कृत्रिम वातावरणात शिकवली जाणारी कृती आहे म्हणून तिचा अनुभव कितीही मोठी तातपूर्ती प्रगाढ शांतता हा असला तरी तो क्षणिक ठरतो व आपोआप नाहीसा होतो (व आपोआप पुन्हा प्रकट होत नाही) ज्याप्रमाणे एखाद्या बंद खोलीत दिव्याची ज्योत शांत वा स्थिर ज्योत हजारो वर्षे जागवली तरीही ज्याक्षणी तिला खोली बाहेर वाऱ्यात न्हेले जाईल ती अस्थिर होऊन विझेल तसेच कृत्रिम वातावरणात करण्यात येणाऱ्या साधनांचे असते त्या आपले कृत्रिमतेचे अवलंबित्व वाढवतच न्हेतात व कृत्रिमतेचा परीघ मोडू पाहता दाणकन जमिनीवर आढळतात... विपश्यना समजून/शिकून घेतल्यावर पुन्हा विपश्यना सेंटरला आजिबात भेट न देता बुद्ध बनलेले / त्यामार्गावरच असलेले लोक किती हे मोजले तर माझे म्हणणे आपण्यास रास्त आहे याची खात्री पटेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/25/2021 - 05:41 नवीन
विपश्यना हि कृत्रिम वातावरणात शिकवली जाणारी कृती आहे म्हणून तिचा अनुभव कितीही मोठी तातपूर्ती प्रगाढ शांतता हा असला तरी तो क्षणिक ठरतो व आपोआप नाहीसा होतो (व आपोआप पुन्हा प्रकट होत नाही) हा आपला स्वतःचा अनुभव असावा असे गृहित धरुन विचारत आहे. कृत्रिम वातवरण म्हणजे? तिकडे कोणत्या प्रकारची विषेश व्यवस्था केलेली असते? या कृत्रिम रित्या तयार केलेल्या वातावरणाचे आपल्याला (शरीरावर किंवा मनावर) काही दुष्परीणाम जाणवले का? विपश्यना करुन त्या कृत्रिम वातावरणातून भसकन व्यवहारी जगात प्रवेश केल्याने एखाद्या कमकुवत मनुष्याचे मानसिक संतुलन ढळेल असे आपल्याला वाटते का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 06:39 नवीन
कृत्रिम वातावरनाचा बेस आहे आयसोलेशन
विपश्यना करुन त्या कृत्रिम वातावरणातून भसकन व्यवहारी जगात प्रवेश केल्याने एखाद्या कमकुवत मनुष्याचे मानसिक संतुलन ढळेल असे आपल्याला वाटते का?
मानसिक संतुलन ढळेल असे मला खात्रीने तर आजिबात वाटत नाही पण तो आत्मिक प्रगती करणार नाही व काही दिवस , आठवडे संपल्यांतर त्याला पुन्हा कृत्रिम वातावरणाची चटक लागू शकते... शांततेचा अनुभव व्यक्ती म्हणून त्याच्यात काही बदल करेल पण ते बदल एका आसक्ती मधून दुसऱ्या आसक्तीत जाणे इतपतच उरतील... कृत्रिम वातावरणाच्या आभावें तो साधनाही दीर्घ काळ चालवू शकणार नाही.... कृत्रिम वातवरण म्हणजे? कृत्रिम वातवरण म्हणजे एका विशिष्ट स्थितीचा साधनेसाठी आवश्यक असा आग्रह मग ती स्थिती, शरीर, परिसर, मनाची बंधने होय. बाकी विपश्यनेच्या दृष्टीने आपण जर हा प्रश्न विचारत आहात तर नेटवर आधीच बरेच काही विपश्यनेला गेलेल्या लोकांनी लीहलेले पण विपश्यनेपासून लोकांना दूर करणे हा माझा हेतू नसल्याने ती उदा इथे देणे टाळतो कारण विपश्यना करू नये या मताचा मी नाही... आध्यात्मिक अनुभवाची बालवाडी म्हणून जगातील प्रत्येकाने विपश्यनेचा अनुभव एकदा तरी घ्यावा असे माझे वैयक्तिक मत आहे या कृत्रिम रित्या तयार केलेल्या वातावरणाचे आपल्याला (शरीरावर किंवा मनावर) काही दुष्परीणाम जाणवले का? वातावरणाच्या आपण आहारी किती जाता यावर ते अवलंबून आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सोत्रि Tue, 05/25/2021 - 08:55 नवीन
कृत्रिम वातावरनाचा बेस आहे आयसोलेशन
श्वास ह्यासारखं दुसरं कुठली साधन त्यापेक्षा अधिक नैसर्गिक असणं शक्य नाही. त्यामुळे ध्यानासाठी त्याचा वापर करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. श्वास घेण्यासाठी कुठल्याही कृत्रिम वातावरणाची गरज लागत नाही. त्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठीसुध्दा आयसोलेशनची गरज नाही. ते तसं, कसं करायचं हे फक्त शिकणयासाठी आयसोलेशन (शिबीरात जाणं) गरजेचं आहे.
कृत्रिम वातावरणाच्या आभावें तो साधनाही दीर्घ काळ चालवू शकणार नाही....
कृत्रिम वातावरणाची गरज नाही हे कळलं की साधना दीर्घ काळ चालवू शकण्यास काही अडचण नसावी.
वातावरणाच्या आपण आहारी किती जाता यावर ते अवलंबून आहे...
कृत्रिम वातावरणच नसल्याने त्याच्या आहारी जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/25/2021 - 10:42 नवीन
आध्यात्मिक अनुभवाची बालवाडी म्हणून जगातील प्रत्येकाने विपश्यनेचा अनुभव एकदा तरी घ्यावा असे माझे वैयक्तिक मत आहे हे खरच महत्वाचे आहे. योग्य दिशेने टाकलेले पहिले पाउल अंतिम धेय्य गाठण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. एकदा का बालवाडीत प्रवेश घेतला की पुढचे दरवाजे आपोआपच उघडले जातात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 10:47 नवीन
एकदा का बालवाडीत प्रवेश घेतला की पुढचे दरवाजे आपोआपच उघडले जातात.
मी म्हणेन ड्रॉपाउट्स हा यशाचा राजमार्ग आहे, तो जिथे दरवाजे उघडत नाहीत तिथे भिंतीना खिंडारे पाडायची क्षमता बहाल करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सोत्रि Tue, 05/25/2021 - 08:43 नवीन
कृष्णाने अंमके बोलले, बुद्ध ते म्हणतो, माऊली फलाना मार्ग सांगतात या कुबड्या गरजहीन आहेत...
कोण काय म्हणालं यापेक्षा काय म्हटलं गेलय ह्याकडे लक्ष देणं महत्वाचं.
आपल्या प्रतिसादात आलाय गीतेत विपश्यना कुठेच सांगितली नसल्याने अजूनच गोंधळ उडत आहे ?
अध्याय १५ - श्लोक १० आणी ११ समजून घेतलात तर गोंधळ उडणार नाही, फक्त सिलेक्टीव्ह रीडींग होणार असेल तर मात्र गोंधळ उडणार नाही असं म्हणता येणार नाही.
अर्जुन गीता ऐकून आनापान नक्कीच करू लागला न्हवता
अर्जुन / कृष्ण / गीता ही सगळी रूपकं आहेत असं समजून त्यातून आपण नेमकं काय घ्यायचं ह्याच सिलेक्टीव्ह आकलन महत्वाचं, सिलेक्टीव्ह रीडींगपेक्षा.
विपश्यना समजून/शिकून घेतल्यावर पुन्हा विपश्यना सेंटरला आजिबात भेट न देता बुद्ध बनलेले / त्यामार्गावरच असलेले लोक किती हे मोजले तर माझे म्हणणे आपण्यास रास्त आहे याची खात्री पटेल...
कोणाला काय वाटतं, कोणाला काय होतं ह्या बहिर्मुखी विचारांतून बाहेर पडून स्वत:ला काय कळतंय आणि हे वळवून कसं घ्यायचं ह्यात अंतमुर्खी होणं हे महत्वाचं.
विपश्यना हि कृत्रिम वातावरणात शिकवली जाणारी कृती आहे म्हणून तिचा अनुभव कितीही मोठी तातपूर्ती प्रगाढ शांतता हा असला तरी तो क्षणिक ठरतो व आपोआप नाहीसा होतो (व आपोआप पुन्हा प्रकट होत नाही) ज्याप्रमाणे एखाद्या बंद खोलीत दिव्याची ज्योत शांत वा स्थिर ज्योत हजारो वर्षे जागवली तरीही ज्याक्षणी तिला खोली बाहेर वाऱ्यात न्हेले जाईल ती अस्थिर होऊन विझेल तसेच कृत्रिम वातावरणात करण्यात येणाऱ्या साधनांचे असते त्या आपले कृत्रिमतेचे अवलंबित्व वाढवतच न्हेतात व कृत्रिमतेचा परीघ मोडू पाहता दाणकन जमिनीवर आढळतात... विपश्यना समजून/शिकून घेतल्यावर पुन्हा विपश्यना सेंटरला आजिबात भेट न देता बुद्ध बनलेले / त्यामार्गावरच असलेले लोक किती हे मोजले तर माझे म्हणणे आपण्यास रास्त आहे याची खात्री पटेल...
हे स्वानुभवावर बेतलेलं आहे किंवा सिलेक्टीव्ह रीडींगवर बेतलेलं हे कळण्यास मार्ग नाही. पण जर स्वानुभवावर बेस्ड असेल तर दुर्दैवाने कुतुहलाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही झालेला नाहीयेय. विपश्याना शिकली गेली पण समजली गेली नाही. - (मुमुक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 08:56 नवीन
कोण काय म्हणालं यापेक्षा काय म्हटलं गेलय ह्याकडे लक्ष देणं महत्वाचं. अगदी तेच महत्ववाचे हो, जे काय म्हटलं गेलंय ते कुणी म्हटलंय कुबड्या न घेता स्वानुभवाच्या कलेने स्पष्ट करता आले पाहीजे... बाकि चालूदे, श्वास जसा आहे तसा बघायला तो कायम तर असायला हवा ना ... कधी थांबला तर बघणार काय ? नाहीसे झालेले शरीर संवेदना देणार कसली तेंव्हा कशावर ध्यान लावाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Tue, 05/25/2021 - 09:11 नवीन
कधी थांबला तर बघणार काय ? नाहीसे झालेले शरीर संवेदना देणार कसली तेंव्हा कशावर ध्यान लावाल ?
कुबड्या न घेता स्वानुभवाच्या कलेने ही अवस्था तुम्ही कशी समजावून सांगाल? हा सिरीयस प्रश्न आहे, पण पास म्हणून सोडून दिलात तरी हरकत नाही! - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 09:45 नवीन
कुबड्या न घेता स्वानुभवाच्या कलेने ही अवस्था तुम्ही कशी समजावून सांगाल? नाही सांगु शकणार कसे सामजावायचे ते. पण प्रत्यक्ष सामजावु मात्र शकेन इतरांच्या कुबड्या न घेता. आणी हे करु शकणारा न मी पहीला आहे ना शेवटचा असेन ही सुध्दा माझी खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 08:48 नवीन
जेंव्हा एखाद्या कृतीच्या result च्या बाबत आपण बेफिकीर असतो/उदासीन असतो फक्त तेंव्हा आणी तेंव्हाच त्यापासून आपण विलग असु शकतो... अनेक मुले तासन तास पब्जी खेळतात का ? कारण कितीही सामने हरले अथवा जिंकले तरीही त्यानं आयुष्यात घंटा फरक पडत नाही... म्हणून ती गोष्ट ते तासन तास करू शकतात ते हि समरसून/देहभान विसरून.... त्यांचे 100% कष्ट देऊन. आता समजा उद्या पब्जीने नियम काढला कि खेळाडूने किमान 35% सामने जिंकलेच पाहिजेत तर काय होईल ? किती जण खेळातील जर आता खेळणे नामक कर्म जिंकणे नामक result ने बंदिस्त झाले तर ? यालाच बोजड भाषेत कर्म करा फळाची चिंता करू नका असे म्हणतात... म्हणजे अर्जुनाने पब्जी खेळल्या प्रमाणे युद्ध केले असेल तर त्याने कर्मयोग साधला म्हणता येईल
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 05/25/2021 - 10:21 नवीन
उत्तराच्या स्वरूपात मत न मांडता प्रश्नांच्या स्वरूपात मांडावे म्हणतो. - अहं स्वतःसाठी कमी व्हावा की समाजासाठी? इतरांच्या अहं मुळे आपला अहं दुखावतोय काय? - अहं कमी होणं गरजेचं का आहे? त्यानं आपल्याला स्वतःला काय त्रास होतोय? - कोणतीही ध्यान पद्धती, जप-जाप्य.. किंवा तत्सम उपायांमुळे अहं कसा कमी होतो? शरीर/मनात नक्की असा काय बदल घडतो की अहं कमी व्हावा? कुणाला स्वानुभव असल्यास व सांगायची ईच्छा असल्यास जरूर सांगावे. - ध्यान पद्धती, जप-जाप्य.. किंवा तत्सम उपायांव्यतिरिक्त काय उपाय असू शकेल? जसं कोर्टानं काही दिवस वृद्धाश्रमात जाऊन सेवा देण्याचा निर्णय दिलेला ऐकीवात होता. तसा काहीसा उपाय आपणच आपल्यावर लादून घेतला तर उपयोग होईल काय?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 10:35 नवीन
अहं स्वतःसाठी कमी व्हावा की समाजासाठी? फॉर बोथ. पण स्वत:साठी अहं कमी होणे जास्त फायदेशीर. इतरांच्या अहं मुळे आपला अहं दुखावतोय काय? अहं चे स्वरुपच दुखणे हे आहे. जे दुखते ते सर्व अहं चा भाग होय. जसं कोर्टानं काही दिवस वृद्धाश्रमात जाऊन सेवा देण्याचा निर्णय दिलेला ऐकीवात होता. तसा काहीसा उपाय आपणच आपल्यावर लादून घेतला तर उपयोग होईल काय? :) करके देखो, प्रत्येकाच्या अहंचे कांगोरे वेगवेगळे असतात. कोणतीही ध्यान पद्धती, जप-जाप्य.. किंवा तत्सम उपायांमुळे अहं कसा कमी होतो? शरीर/मनात नक्की असा काय बदल घडतो की अहं कमी व्हावा? कुणाला स्वानुभव असल्यास व सांगायची ईच्छा असल्यास जरूर सांगावे. मी ध्यान करत नाही, मानवी मन हे शारीरीक द्रुश्ट्या ध्यानासाठी बनलेले नाही परीणामी ते ध्यान करण्यास सक्षम आहे यावरच माझा विश्वास नाही. मनाने ध्यान करायचा प्रयत्न करणे तितकेच कश्टकारक आहे जितके हाताने चालायचा, पायाने लिहायचा आणी नाकाने गिळायचा प्रयत्न करणे होय ( हे मी ओवीरुपातही लिहु शक्तो बरे का) स्वतः ध्यान करणारे अनुभव स्व-हिनतेचा घेतात/ त्याच्या मागे असतात पण प्रत्यक्ष जगात हे लोक अत्यंत आत्मकेंद्रीत झालेले पहिले आहेत. दे जस बिकम्स इनसेनली रीजीड/ स्टीफ्फ, अँड फनी थिंग इज दे अ‍ॅब्सोलुटली हॅव नो आयडीया की ते अजुनही तिथेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Tue, 05/25/2021 - 11:04 नवीन
हे डिस्क्लेमर टाकायला विसरलो होतो - प्रश्नांचा हेतू तिरकस बोलणे किंवा उगाच डिवचण्यासाठी नाहिये. :-)
फॉर बोथ. पण स्वत:साठी अहं कमी होणे जास्त फायदेशीर.
अहं चे स्वरुपच दुखणे हे आहे. जे दुखते ते सर्व अहं चा भाग होय.
मोठी मजेची गोष्ट आहे ही. जोवर इतरांमुळे आपल्याला त्रास होतो तोवर, आपला अहं कमी झालेला नाही असा अर्थ आहे. म्हणजेच जर आपला अहं कमी होणे हे दुसर्‍यांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर, तो कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पाण्यावर काडी मारून पाणी दुभंगायचा प्रयत्न करण्यासारखे निरुपयोगी आहे. जर दुसर्‍यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला होत नाही पण स्वतःचाच अहं त्रास देतोय, तर आपण त्यासाठी उपाय शोधणे श्रेयस्कर. म्हणून पुढचा प्रश्न विचारलाय - - अहं कमी होणं गरजेचं का आहे? त्यानं आपल्याला स्वतःला काय त्रास होतोय?
:) करके देखो, प्रत्येकाच्या अहंचे कांगोरे वेगवेगळे असतात.
बरोब्बर. प्रत्येकाच्या मनाचे कंगोरे वेगळे, अनुभव वेगळे आणि अहं मुळे होणारे त्रासही वेगळे. त्यामुळे एकच उपाय सगळ्यांना समान लागू पडेल असे नाही असेच म्हणायचे होते.
मी ध्यान करत नाही, मानवी मन हे शारीरीक द्रुश्ट्या ध्यानासाठी बनलेले नाही परीणामी ते ध्यान करण्यास सक्षम आहे यावरच माझा विश्वास नाही.
ह्याबद्दल खरंच जाणून घ्यायला आवडेल की हा कठोर निष्कर्ष का आणि कसा आला. माझ्या मते कोणतीही गोष्ट आपण कशासाठी करतोय ते लक्षात घेऊन करायला घेतली तर त्याचा उपयोग होतो. अर्थात् सगळ्या गोष्टी पुस्तकं वाचून होणार नाही. कुणी स्वानुभवी व्यक्ती त्यावर समाधानकारक उत्तरं देऊ शकली आणि योग्य ते सांगू शकली तरच पुढे जाता येईल.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 11:17 नवीन
मोठी मजेची गोष्ट आहे ही. जोवर इतरांमुळे आपल्याला त्रास होतो तोवर, आपला अहं कमी झालेला नाही असा अर्थ आहे. म्हणजेच जर आपला अहं कमी होणे हे दुसर्‍यांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर, तो कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पाण्यावर काडी मारून पाणी दुभंगायचा प्रयत्न करण्यासारखे निरुपयोगी आहे. जर दुसर्‍यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला होत नाही पण स्वतःचाच अहं त्रास देतोय, तर आपण त्यासाठी उपाय शोधणे श्रेयस्कर. आरे जिओ राघवजी जिओ. आपने तो मेरे मुकी बात छिनली ती सुध्दा न उदाहरणे न देता. आता तुमचे पहिले पाउल पडलयं योग्य दिशेने.. तर विषय असा आहे की स्वप्नात तुम्ही आत्महत्या केली काय अथवा तुमची हत्या झाली काय, वेदना तुम्हाला कारण स्वप्नच तुमचे त्याला कोण काय करणार ? म्हणून पुढचा प्रश्न विचारलाय - - अहं कमी होणं गरजेचं का आहे? त्यानं आपल्याला स्वतःला काय त्रास होतोय? त्रास होतोय ही जाणीव अहं चा भाग आहे स्व्तःमुळे की दुसर्‍यामुळे हा भाग तुलनेने गौण आहे. ह्याबद्दल खरंच जाणून घ्यायला आवडेल की हा कठोर निष्कर्ष का आणि कसा आला. जसे निसर्गात न्याय अस्तित्वात नाही, न्याय ही मानवी भावना आहे म्हणुन यच्चावत निसर्गाची निर्मीती करणारा जर अस्तित्वात असेल तर तो न्यायी असेल असे आजिबात समजता येत नाही. तसेच वास्तव हे वास्तव असतं ते कठोर की मृदु ही बाब आपला अहंकार ठरवते. कुणी स्वानुभवी व्यक्ती त्यावर समाधानकारक उत्तरं देऊ शकली आणि योग्य ते सांगू शकली तरच पुढे जाता येईल. असे विरोधाभासी का बरे बोलता ? स्वानुभव म्हणजे स्वानुभव इतर कोणाचा अनुभव स्वानुभव कसा बरे ठरेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Tue, 05/25/2021 - 11:37 नवीन
आता तुमचे पहिले पाउल पडलयं योग्य दिशेने..
माझं पाऊल कोणतं आणि कुठे ते मला नीट ठाऊक आहे. माझा अहं चांगलाच जागेवर आहे. काळजी नसावी. :-)
त्रास होतोय ही जाणीव अहं चा भाग आहे स्व्तःमुळे की दुसर्‍यामुळे हा भाग तुलनेने गौण आहे.
नाही. या दोन्हींमधे दृष्टीकोनाचा फरक आहे. ज्यामुळे उपाय बदलतो. त्यामुळे याला गौण म्हणता येत नाही.
मी ध्यान करत नाही, मानवी मन हे शारीरीक द्रुश्ट्या ध्यानासाठी बनलेले नाही परीणामी ते ध्यान करण्यास सक्षम आहे यावरच माझा विश्वास नाही.
आणि
जसे निसर्गात न्याय अस्तित्वात नाही, न्याय ही मानवी भावना आहे म्हणुन यच्चावत निसर्गाची निर्मीती करणारा जर अस्तित्वात असेल तर तो न्यायी असेल असे आजिबात समजता येत नाही.
यांचा काय बरे परस्पर संबंध असेल ते समजत नाहीये ब्वॉ.
असे विरोधाभासी का बरे बोलता ? स्वानुभव म्हणजे स्वानुभव इतर कोणाचा अनुभव स्वानुभव कसा बरे ठरेल ?
शिकायचे स्वानुभवानेच असते. पण जर एखाद्या व्यक्तीनं स्वतः मार्ग अनुभवलेला असेल तर ती चार महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकते, मार्गदर्शन करू शकते. जसं गाडीवरून जातांना अनोळखी गावाकडे जातांना एखादा गावकरी सांगतो, रस्ता आहे पण पुढे काही ठिकाणी फार खराब आहे, जरा सांभाळून जावा.. तसंच. शेवटी जातो आपणच आणि स्वानुभवातून शिकतो देखील.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 12:00 नवीन
माझं पाऊल कोणतं आणि कुठे ते मला नीट ठाऊक आहे. माझा अहं चांगलाच जागेवर आहे. काळजी नसावी. :-) ब्वारं... झालं लै काळजी पडली होती तुमच्या अहं ची, आता ती शष्प करणार नाही. नाही. या दोन्हींमधे दृष्टीकोनाचा फरक आहे. ज्यामुळे उपाय बदलतो. त्यामुळे याला गौण म्हणता येत नाही. आजिबात नाही, हा द्रुश्टीकोन नाही तर एक वास्तव आहे. तुम्ही आहात म्हणून आणी फक्त म्हणूनच त्रासाचे अस्तित्व आहे तुमीच नाही तर त्रासच मीटला, मग तो कसाही होउदे. यांचा काय बरे परस्पर संबंध असेल ते समजत नाहीये ब्वॉ. सर्वगोष्टी समजल्या पाहिजेत हा अट्टहास म्हणजे अहं होय. आणी सोप्या गोश्टीही न समजणे म्हणजे काय ते... तुम्हीच ठरवा, तुमचा चांगलाच जागेवर असलेलां अहं बाजुला ठेवुन. शेवटी जातो आपणच आणि स्वानुभवातून शिकतो देखील. दुसर्‍याचा स्वानुभव हा आपला परानुभव असतो इतपतच मला सांगायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Tue, 05/25/2021 - 12:04 नवीन
बरं, तुम्ही म्हणता तर तसं. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 05/25/2021 - 12:12 नवीन
पुर्ण विसरुन गेलोय बघा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा