अकुपार : ध्रुव भट्ट
अकुपार : ध्रुव भट्ट
रसग्रहण
फळांचं फ्रुटसलाद करतात ही झाली इन्फो.
ते स्वतः करणं अनुभवणं हे ज्ञान.
टोमॅटो हे देखील फळच आहे हेही अधिक स्पेसिफिक ज्ञान आणि माहिती.
पण तरी ते फ्रुटसलाद मध्ये वापरायचं नसतं ही काही न शिकता आजीवगैरे लोकांना *जाण* होती.
अमुक प्रकाश असेल की कितीवर अपरेचर ठेवायचं? शटरस्पीड किती? वगैरे शिकवता येतं पण फ्रेम कोणती सिलेक्ट करायची? छायाप्रकाश काय परिणाम करतात? हे शिकवता येत नाही. त्यासाठी जाण लागते.
जगाकडे बघायचा एक विशिष्ट नजरिया आपल्या सवयीचा झाला आहे. तो अत्यन्त उपयोगी आहेच. त्या नजरियात गडबड नाही तर आपल्या विचारांची जी त्याच तर्हेने विचार करायची, जगाकडे पहायची, समजून घ्यायची जी चाकोरी पडली आहे ती खरी समस्या आहे. आपण काहीच सरळ, थेट 'जसं ते आहे तसं' बघत नाही ही ती समस्या.
उदाहरण द्यायचं तर गुलाब बघितला, वास घेतला, ते अनुभवलं.. पूर्णपणे.. अस होत नाही. आपण ते बघितलं, त्याचं नाव गुलाब आहे हे डोक्यात आलं, त्याचा वास कसा असेल याची प्रतिमा डोक्यात तयार झाली, त्याच्या अपेक्षेसह आपण वास घेतला. 'पण सोनचाफा तो सोनचाफाच' हेही मनात येऊन गेलं. फुल अनोळखी असेल तर त्याची ज्ञात फुलांशी मनात तुलना सुरू! हेच माणसांबद्दल, कवितेबद्दल, सगळ्यांबद्दल. गुलजार कविता कशी वाचावी हे सांगताना म्हणतात..'लब्ज ऐसे पढो, के जैसे जन्मा हो अभी अभी. उसे अपने रुह मे धडकने दो.'
जंगलात खूप झाडं असतात. ती 2000, 20000 वगैरे मोजता देखील येतात. पण निसर्गात कोणतंच झाड 2543वं म्हणून उगवत जगत वाढत नाही. ते फक्त असतं. ते तसंच समजून घेता अनुभवता आलं पाहिजे. त्यातून उमलते ती जाण. माहिती, ज्ञान यापेक्षाही खोल, संपृक्त.
ज्ञानेश्वरांची ओवी आहे एक. साधारण भावार्थ असा..
तो कलाकार आहे, हुशार आहे, श्रीमंत, शक्तिमान आहे, काव्य शास्त्र यात पारंगत आहे,(ही लिस्ट अजून आहे) पण जर त्याला अध्यात्माचा गंध नाही तर आग लागो त्याच्या इतर गुणांना..
हे अध्यात्म म्हणजेच ती खोल जाण.
ध्रुव भट्ट यांची अकुपार वाचायला घेतली तेंव्हा वाटलेलं की गीर च्या जंगलात कुणी शहरी माणूस राहतो. त्या जंगलाचं, सिंहाचं, माणसांचं वर्णन करतो. असं असणार. ते तर आहेच. पण त्यापलीकडे लेखक ही जाण उलगडून सांगतो. कुणी बोटाने चंद्र दाखवत असेल आणि पाहणारा बोटाकडेच बघेल तर चंद्र दिसणारही नाही. तसं लेखक हे जंगल वगैरे सांगतोच, पण मुख्य बोट दाखवतो ते जाण या गोष्टीकडे. जी तिथल्या वनस्पतीत, वनचरांत, स्थानिक अशिक्षित माणसांत पुरेपूर रुजली फुलली आहे. जाण या गोष्टीचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे ती आतून आपोआप फुटते. आपण फक्त पुरेसा वेळ आणि योग्य परिस्थिती देऊ शकतो. 7-8 दिवस तिथे (खरतर कुठेही) राहून, कंडक्टेड टूर करून ती जाण उमटायची शक्यता तशीही कमीच. ध्रुव भट्ट तिथे काही महिने राहिले, तिथल्या स्थानिकांत मिसळले, निसर्गाला त्याचा आदर करत मनापासून भेटले. त्यातून झालेली ही कादंबरी.. अकुपार!
-अनुप
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments