असं नको.. तसं लिही..
नाही.. नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून काढलेल्या दगडांसारखी टोकदार आणि खुनशी झाली आहेत..
समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी..
आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार !
आणि 'मनुष्य' म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस.. 'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..!
असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही...
एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर.. माणसाळव त्यांना.. सभ्य सुसंस्कृत कर ... !
आता उदाहरणार्थ 'मी त्यांना झ्याटावरनं कोलतो' हे वाक्य घे... ह्याच्यामध्ये जो विवक्षित शब्द आहे, त्याच्यामुळे अंगावर पाल पडल्यासारखं होतं.. थोडं सॉफ्ट कर.. लिही.. 'मी त्यांना जुमानत नाही'.. हे छान आहे, अर्थही बदलत नाही, आणि शिवाय भावनाही व्यवस्थित पोचतात..!
घंटा ss..! शब्दांतला सगळा जाळ निघून गेल्यावर काय झ्याट्याच्या भावना पोचणार..!
छि: छि: छि: फारच ग्राम्य आहेस बुवा तू... पुन्हा पुन्हा तोच विवक्षित शब्द वापरतोयस.. खाजगीत बोलताना कसंही बोललं तर चालतं, पण लिहिताना एकेक वाक्य सावडून घेतलेलं बरं असतं... असो.. थोडंसं संपादन केलं की होऊन जाईल.. !
अच्छा ..? पण काय होऊन जाईल? आणि काय व्हायला पाहिजे? किंवा काय होऊ? आणि असं होता येत असतं का?
हो..!
बरंच काही होता येतं..!
किंवा बराच काही हो..!
उदाहरणार्थ..
हा तुझ्या जातीचा उल्लेख काढून टाक.. आधुनिक हो..!
हा तुझ्या धर्माचा उल्लेख काढून टाक.. सेक्युलर हो..!
सुरे तलवारी घेऊन भोकसत फिर .. कट्टर हो.!
गांधींसारख्या गोड म्हाताऱ्याला गोळ्या घाल.. राष्ट्रभक्त हो..!
अग्रलेख लिही. रोज सगळ्या दुनियेला डोस पाज. सदैव नाक उंच ठेव... बुद्धिजीवी हो..!
सिग्नलवर (पोट जाळण्यासाठी) लिंबू-मिरच्या विकणाऱ्यांकडे बघून तेच नाक मुरड.. पुरोगामी हो..!
सवाई गंधर्वला जाऊन उगाचच मान डोलव.. सुसंस्कृत हो..!
मराठी बिराठी असलं काही नसतं, असं मान... ग्लोबल हो..!
अजून सांगायचं झालं तर..
बापाला येड्यात काढ, शेतीवाडी सगळी फुंकून टाक.. शहरी हो..!
पोरींना फक्त सुरुवातीलाच इंप्रेस कर.. लिबरल हो..!
आणि मग चान्स मिळेल तेव्हा मजा मार... पुरूष हो..!
ह्या सगळ्या भोगांचा कंटाळा आला की संन्यासी हो..
विपश्यनेसाठी वगैरे जा दहा दिवस...
कायमचा नकोस जाऊ.. दुनियेत अजून भरपूर मज्जा बाकी आहे.. परत ये..
मेडीटेशन वगैरे करतोस की नाही ?
मग मेडीटेशनमध्ये अडथळा आणणाऱ्या डासांना जोरजोरानं शिव्या दे..
शिवाय अधूनमधून चार पेग घेऊन, बधिर हो.. !
आणि लगेच मन:शांतीवर सभा हेपलायला सुरुवात कर...!
शरीर मन आत्मा कांदा बटाटा लसूण वगैरे..
तीन हातांची जेजुरी रे ss
त्यात आत्मा मल्हारी रे ss
जेजुरी? कुठली जेजुरी? अरुण कोलटकरांची?
की सासवडच्या पुढची?
नाय रे वेड्या ... ही वेगळी जेजुरी आहे..!
कवीनं इथं 'शरीराला' जेजुरीची आणि 'आत्म्याला' मल्हारीची उपमा दिलीय..!
आणि प्रत्येकाच्या आतला मल्हारी सेमच असला, तरी आपापली जेजुरी सांभाळण्याची भानगड ज्याच्या त्याच्यावरच टाकण्यात आलेली आहे..!
म्हणून आपण फक्त आपापली जेजुरी सांभाळत रहायचं..
दुनियेला आग लागली तरी फरक पडू द्यायचा नाही..
लक्षच द्यायचं नाही तिकडं...!
कान डोळे त्वचा घट्ट बंद करून घ्यायचं...!
आपलं आपलं सरळ नाकापुढं जगायचं..!
मग आपली जेजुरी सुरक्षित राहते..!
आत्मा वगैरे काय.. येत जात राहतो..!!
बरंच काही होता येतं..! किंवा बराच काही हो..!खरोखर कितीजण होतात आणि कितीजण होण्याचं सोंग घेतात?