आठवणीतील श्रावण - कहाणी
आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं !
नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे. हे व्हॉट्सॅप्प आल्यापासुन ही ऑनलाईन भक्ती चांगलीच उत्कर्षाला लागली आहे , इरव्ही सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा पार्वतीने महादेवांना तरी दिल्या असाव्यात का ह्याबद्दल शंकाच आहे . पण ते असो . कधीही स्टेटस न टाकणार्या मित्रानेही शिवमंदिरात दर्शन घेताना फोटो टाकलेला पाहुन कुतुहल चाळवले . म्हणलं "कैसे हो दोस्त , आज एकदम काशी विश्वनाथ के दर्शन ?!" त्याचा रिप्लाय आला - " क्या सर जी , मजाक कर रहे हो क्या ? काशी विश्वनाथ के दर्शन , वो भी सावन के पहले सोमवार को ? नामुम्किन है , इतनी भीड होती है के आप सोच भी नही सकते ! येह तो मेरे घर के पास वाला शिवालय है !"
तेव्हा डोक्यात ट्युब पेटली - अरेच्च्या श्रावण सुरु झाला !
लहानपणी श्रावण म्हणजे सुख असायचं , निखळ सुख ! म्हणजे एक दिवस असा नसायचा की काही सण उत्सव नाही काही कार्यक्रम नाही ! रोज काही ना काही नवीन. तेव्हा आम्ही चिल्लीपिल्ली असल्याने नोकरी धंद्याचे पाश नसायचे . शाळाही नुकतीच सुरु झालेली असायाची अन घटक चाचणी की सहामाही परीक्षा कसलेच टेंशन नसायचे. मस्तपैकी सकाळी उठावं, उबदार पांघरुन अंगाभोवती लपेटुन अन खिडकीत बसुन चहा पीत अजिंक्यतार्याकडे पहात बसावं . रिमझिम उन्ह पावसाचा खेळ पहावा , हिरव्या गार कड्याकपार्यातुन वाहणारा झरा पहावा. अंगणात अक्षरशः पारिजातकाचा सडा पडलेला असावा . इतकी फुलं की नंतर नंतर तर कोणी ते वेचायचे कष्टही करायचं नाही. बस्स त्या फुलांच्या मंद सुगंधाने घर भरुन जायचं अन अगदी रुक्मिणीच्या घरी असल्यासारखं वाटायचं ! बस्स काहीही गडबड नाही. सर्व अगदी सुखनैव ! त्यात तो रविवार असल्याने कोणीच मागेही लागायचे नाही. मामाची मात्र गडबड असायची , मस्त सोवळं नेसुन , कुठे फुलांचे हार कर की कुठे पुजेच्या साहित्याची जमवाजमव कर . नुसती धांदल असायची. देवघरात पुजा उरकुन तो "कहाणी" म्हणायला बसायचा . पहिली गणपतीची कहाणी :
ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडांव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे, मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि करिजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.मामा काय वेगळ्याच सुरात म्हणायचा ! ऐकत रहावसं वाटायचं . तसं काही कळायचं नाही , आम्ही सात भावंडं आपल्याच तंद्रीत असायचो , त्यात नेमकं पशा पायलीचं म्हणल्यावर सगळे माझ्या कडे बघुन हसायचे , तेव्हा राग यायचा पण आता हसु येतं ते सारं आठवुन , छोट्या छोट्या गमजा . बाकी तेव्हा काहीच कळायचं नाही. नुसता आनंद मिळायचा. "अरे ही कहाणी कुठली , त्याला काय वैदिक पौराणिक संबंध काय ? त्यातुन कळणारे सनातन वैदिक मुल्य काय ? " असले काहीच प्रश्न पडायचे नाही. समर्थ म्हणाले - "भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव ??" म्हणुन आम्ही आपलं सुसाट वाचत, अभासत गेलो पण त्या नादात हा निरागसपणा हरवला ! हे म्हणजे सुंदर इंद्रधनुष्य दिसावं , भारी वाटावं अन हे नक्की कसं पडलयं म्हणुन पहायला जावं अन ढगाआड दडलेला सुर्य दिसावा अन क्षणार्धात डोळे दिपुन जावेत अन इंद्रधनुष्य हरवावं तसं काहीसं झालं ! सुर्य पाहिल्याचा आनंद आहेच पण इंद्रधनुष्यही दिसायला हवं राव ! - "जाणोनि नेणते | करी माझे मन | तुझी प्रेम खुण | देवोनिया || मग मी असेन | व्यवहारी वर्तत | जैसे जळात | पद्मपत्र ||" बाकी गणपती नंतर सुर्यनारायणाची कहाणी / आदित्यराणुबाईची प्रदीर्घ कहाणी ! अगदी सगळं कसं साग्रसंगीत . विड्याच्या पानावर रक्तचंदनाने रेखलेला सुर्य ! सहा रेघांचं मंडळ सहा सुतांचा तांतु , त्याला सहा गाठी , साधासा गुळखोबर्याचा नैवेद्य ! प्रत्येकाच्या हातात तांदुळाचे ३ च दाणे , मन केवळ त्यावर एकाग्र ! कित्ती सोप्पा विचार होता हा मनाला एके ठिकाणी गुंतवुन ठेवण्याचा ! त्या तल्लीन अवस्थेत ऐकलेली वाक्य अगदी आजही आठवत रहातात - " बाबा बाबा गुळ खा पाणी प्या , गूळ खात नाही पाणी पीत नाही , माझी कहाणी करायची आहे ती तु ऐक " " अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या , आम्ही दासी प्रधानाच्या " " काय रे बाबा मावशीने काद दिलं , दैवे दिलं कर्माने नेलं , कर्माचं फळ पुढे उभे राहिलं " "करारे हाकारे पिटारे डांगोरा , नगरात कोणी उपाशी आहे का ह्याचा शोध करा " मामा काय सुरेख आवाजात म्हणायचा ! संपुच नये असे वाटायचं ! " ब्राह्मणाला , मोळीविक्याला , राजाच्या राणीला , माळ्याला , म्हातारीला, कानाचा डोळा मासाचा गोळा इतक्यांना सुर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हां होवो | ही साठा उत्तराची कहाणी पाचां उत्तरी सफळ संपुर्ण ! " आताही मामा तेवढ्याच भक्ती भावाने उठतो , तेवढ्याच श्रध्देने कहाणी म्हणतो, आता मात्र दंगा करायला चिल्ली पिल्ली गावी नसतात, सगळ्यांना पंख फुटले . कोणी मुंबईत, कोणी बंगळुरात, कोणी बडोद्यात, कोणी पुण्यात, . सगळे शिस्तीत आपापले पंख कापुन सोन्याचा पिंजर्यात सुखनैव कोडींग करत बसलेत. नातवंडांना तर कल्पनाच नाही , त्यांना डोरेमॉन पोकेमॉन पिकाच्यु माहीतीये . त्यांना आदित्य राणुबाई काय माहीती असणार? मामा मात्र अजुनही गावी . घेतलेला वसा टाकायचं त्यांना पिढीला कधी जमलंच नाही . बाकी ढगांआड आदित्यराणुबाई निष्कामपणे त्याची परिक्रमा चालुच आहे. पारिजात कधीच तुटुन गेलाय आता त्याच्या जागी गाड्या उभा आहेत भर पावसात गंजत . अजिंक्यतारा आधी ढगांआड जायचा धुक्याआड जायचा , आता तो सिमेंटच्या बिल्डींगच्या आड गेला . आणि श्रावण ? , श्रावणही तसाच आठवणींच्या पडद्याआड . पण कधीतरी एखादी वार्याची झुळक येते अन दाट धुकं अकस्मात हटतं अन त्या आडुन सोनेरी उन्हात चमकणारा हिरवागर्द अजिंक्यतारा मनाला सुखावुन जातो ! श्रावणाचंही तसंच काही !! _________________________________________________________________ संदर्भ : १) हिंदू सण,वार आणि देवांच्या कहाण्या २) संपुर्ण चातुर्मास पुस्तक ३) अजिंक्यतारा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"