नवकवी आणि आचार्य अत्रे
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच.
त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात.......
"तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच. प्रेमाचा तीळ घ्या, भक्तीचा पाक घ्या, हृदयाची कढई करा, अन् अशा तऱ्हेने हलवा करा. या हलव्याच्या कविता वाचल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. होळीवरच्या एकूण एक कविता होळीत टाकण्याच्या लायकीच्या असतात. गोकुळात कृष्णाने जेवढा धुमाकूळ घातला नसेल तेवढा धुमाकूळ त्याच्या 'मुरली'ने मराठी साहित्यात माजवलेला आहे. जो कवी उठतो तो वीतभर लाकडाचा तुकडा कृष्णाच्या तोंडी अडकवतो आणि सांगतो त्याला की 'वाजिव वाजिव कान्ह्या मुरली !' मुरली वाजवून वाजवून त्याच्या तोंडाला ' फेशल पॅरॅलिसिस ' होईल की काय अशी आपल्याला भीती वाटते. अन् ह्या कवितेवर एखादे चित्र दिलेले असते. ते पाहिले तर कृष्ण मुरली वाजवतो आहे की उसाचे कांडे दातांनी सोलतो आहे हे कळत नाही. " असो.
😆
दरवर्षी पाडव्याच्या अश्या शुभेच्छांचा पाऊस पडतो ! मी ही अॅडव्हान्स मध्ये घेतला हात धुवून !