Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारताचे शीत (पेय)युद्ध!

आ
आदित्य कोरडे
Sat, 02/26/2022 - 16:13
💬 62 प्रतिसाद
भारताचे शीत (पेय)युद्ध! इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठा शीख मोगल अशा एतद्देशीय सत्तांना हरवून. पण नंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर असे क्रांतिकारक किंवा टिळक,गांधी,पटेल ह्यांच्या सारखे पुढारी मात्र समाजातल्या सर्वसामान्यवर्गातून, म्हणजे पूर्वी सत्ताधारी नसलेल्या वर्गातून पुढे आले. भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाचे स्वरूप काहीसे असेच आहे. १९४७ साली इंग्रजांनी हा देश सोडल्यानंतर स्वातंत्र्यलढा संपला असे जर घटकाभर गृहीत धरले तर त्या अर्थाने भारतातले शीतपेयांचे युद्ध अजून सुरुच आहे नव्हे आता कुठे त्यालढ्यात इथल्या मातीतल्या स्पर्धकांचे पदार्पण होत आहे. शीतपेयांचा इतिहास फार काही जुना नाही. साध्या पाण्यात कार्बनडायऑक्साइड(कर्बद्वीप्राणीलवायू असे संस्कृतप्रचुर नाव मराठीत आहे म्हणे ह्याला) हा वायू विरघळवून ते पाणी बाटलीबंद केले आणि थंड करून ठेवले कि लाक्षणिक अर्थाने (अगदी प्राथमिक अवस्थेतील) शीत पेय तयार होते. फळांचा रस, अर्क, सरबते ह्यांना त्या अर्थी शीतपेय म्हणता येत नाही, म्हणत नाहीत. म्हणजे तसा प्रघात नाही आणि तो प्रतिपाद्य लेखाचा विषयही नाही. १७८४ साली ब्रिटीश रसायन शास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली ह्याने प्रथम सध्या पाण्यात कार्बनडायऑक्साइड विरघळवून शीत पेय तयार करण्याची पद्धत शोधली. ह्या पेयाला कार्बोनेटेड वाटर किंवा सोडा वाटर म्हटले गेले. काही वर्षानी म्हणजे १८३७ साली भारतामध्ये हेन्री रॉजर्स नावाच्या इंग्रज रसायनतज्ञ आणि व्यावसायिकाने रॉजर्स सोडा ह्या नावाने भारतातील पहिली कार्बोनेटेड वाटर किंवा सोडा वाटर बनवणारी कंपनी काढली. ब्रिटीश सोजीराना दारु पिताना दारूत मिसळायला हा सोडा, साध्या पाण्यापेक्षा जास्त पसंत पडला आणि पाहता पाहता ह्याचे लोण इतर भारतीयात देखिल पसरू लागले. मागणी वाढली तशी अनेक पारशी व्यावसायीकानी ह्या नव्या धंद्यात उडी घेतली आणि आपली शीतपेय बाजारात आणली. पालनजी(स्थापना १८६५), मेरवानजी(स्था.१८६६), अर्देशीर(स्था.१८८४), दिनशाजीचा ड्युक सोडा (स्था.१८८९) हि काही ठळक नावे. थोड्याच कालावधीत हा प्रकार इतका लोकप्रिय झाला कि सगळ्या भारतात लहान-मोठे उद्योगी आणि हिकमती लोक आपापली शीत पेये बनवू लागले. आजही तालुका किंवा खेडेगावीदेखिल स्थानिक लोकांनी बनवलेली गोटी सोडा किंवा उत्तर भारतात त्याला बंटा म्हणतात ती पेयं सर्रास मिळतात. तिकडे अमेरिकेत १८८६ साली कोकाकोला आणि पेप्सी(१८९३-त्याकाळी त्याचे नाव ब्राड्स ड्रिंक होते) हे देखिल सुरु होऊन चांगलेच नावारुपाला आले. पण त्यांचा शिरकाव भारतात झाला नाही.इंग्रजांनी त्यांना परवानगी दिली नाही कि त्यानीच काही प्रयत्न केला नाही, ह्या बाबत नक्की माहिती मिळत नाही. rogers soda असो, तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच पार्ले (प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज बिस्कीटवाले)ह्यांनी १९४८-४९ साली आपला पार्ले-ग्लूकोकोला बाजारात आणला.त्याच वेळी कोकाकोला भारतात यायच्या तयारीत होता आणि त्यांनी आधीच भारतीय बाजारासाठी आपला कोकाकोला हा ट्रेड-मार्क रजिस्टर केला होता त्यामुळे त्यानी पार्लेच्या ग्लूकोकोला ह्या नावाला आणि त्या नावाच्या डिझाईनला आक्षेप घेतला. त्यावर पार्लेने ग्लूको नाव काढून आपल्या शीत पेयाचे फक्त पार्लेकोला असे नाव ठेवले. ह्याला देखिल कोकाकोलाने आक्षेप घेतला. भारताला नवीनच स्वातंत्र्य मिळाले असल्याने आणि ट्रेडमार्क, लोगो आणि नाम साधर्म्य ह्याबाबत फारशी माहिती नसल्याने असे झाले असावे. २ वर्षे कोर्टात केस चालली आणि तीत हरल्यावर पार्लेने आपले पेय बाजारातून हटवले. १९५० साली दिल्ली इथल्या आपल्या नव्या ‘प्युअर ड्रिंक्स लिमिटेड’ नावाच्या बॉटलिंग प्लांट मधून भारतात कोकाकोलाने आपला कोला बनवून विकायला सुरुवात केली. त्याच सुमारास पेप्सीने आपले शीत पेय भारतात आणले. पार्लेचे पेय बाजारातून हटवल्यावर आणि दुसरा कोणी मोठा प्रतिस्पर्धी भारतात नसल्यामुळे भारतात ह्या दोन शीत पेयान्चीच मक्तेदारी असणार होती हे उघड होते. पण पार्लेने देखिल पराभव मान्य केला नव्हता (अजूनतरी). १९५२ साली त्यानी आपले गोल्डस्पॉट हे नारिंगी रंगाचे आणि संत्र्याच्या स्वादाचे पेय बाजारात आणले.हे पेय भारतीयांना विशेषत: मुलांना भलतेच आवडले आणि अल्पावधीत ते प्रचंड लोकप्रिय झाले. कोकाकोलाचा देखिल भारतीय बाजारात चांगलाच जम बसला होता पण पेप्सीला मात्र म्हणावे तसे यश मिळाले नाही. १९६२ साल येईतो पेप्सीची भारतातली अवस्था बिकट झाली होती आणि त्या सालीच त्यानी भारतीय बाजारातून आपला गाशा गुंडाळला. आता बाजाराची सत्ता स्पर्धा कोका कोला आणि पार्ले ह्याच्यात होती. १९७१ साली पार्लेने लिम्का हे लिंबाच्या स्वादाचे पेय बाजारात आणले आणि ते तरुण विशेषत: तरुण मुलींच्यात लोकप्रिय झाले.ग्राहकांना-मुख्यत्वे तरुण पुरुषांना आकर्षित करण्यासाठी पार्लेने मोठी जाहिरात मालिका सुरु केली आणि रेखा सारख्या नवोदित आणि सनसनाटी चेहऱ्याना घेऊन जाहिराती केल्या. अर्थात ह्याचा त्यांना फायदा झाला. पण कोकाकोला भारतात नंबर एकला होता आणि त्याला अजून तरी कोणताही धोका दिसत नव्हता. १९७१ साली भारत पाकिस्तान युद्ध झाले नंतर मोठा दुष्काळ पडला ह्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला त्यामुळे भारतातून पैसा बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करण्याराठी म्हणून तत्कालीन इंदिरा सरकारने परकीय चलन नियंत्रण कायदा १९७३ साली आणला . ह्या कायद्यान्वाये कोणत्याही परदेशी कंपनीला भारतीय उद्योगातील हिस्सा ४० टक्क्यापेक्षा जास्त ठेवता येणार नव्हता.ह्याचा कोकाकोलाला भारतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार होता आणि त्यानी आपले लागे बांधे वापरून ह्यात खोडे घालायचे प्रयत्न केले. त्यामुळे एकंदरीतच हा प्रस्ताव संसदेत २-३ वर्षे तरी रेंगाळला.शिवाय त्याना आपला भारतीय कंपनीतला हिस्सा ४० टक्क्यावर आणायला २ वर्षाची मुदतही दिली गेली. अशात १९७५ साल आले आणि आणिबाणी लागू झाली मग तर हे प्रकरण काहीसे मागेच पडले. पार्ले कंपनीला ह्या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता १९७६ साली त्यानी भारतीयांचे अत्यंत लाडके फळ आंबा त्याच्या स्वादाचे माझा हे शीतपेय बाजारात आणले.त्यापूर्वी मुंबईस्थित ड्युक्सचा म्यांगोला लोकांचा अतिशय आवडता आणि प्रसिद्ध होता.ड्युक्सचाच सोडा आणि लेमोनेड ही पेयंदेखिल प्रसिद्ध होती आणि ड्युक्स तसा पार्लेशी काही झगडा नव्हता. पण पार्लेला सध्यातरी बाजारात दोन नंबरची जागा पक्की करायची होती. 1977 साली आणीबाणी हटली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकात स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान तर जहाल कामगारनेते, भांडवलशहा आणि ‘भांडवलशाहीचे शत्रू’ जॉर्ज फर्नांडीस हे उद्योगमंत्री झाले. त्याना कोकाकोलाला धडा शिकवून सगळ्या भांडवलशहाना दमात घ्यायचे होते म्हणून मग ते कोका कोलाच्या मागे हात धुवून लागले. १९७३च्या परकीय चलन नियंत्रण कायद्याबरोबरच(Foreign exchange Regukations Act-FERA1971) १९७०च्य भारतीय पेटंट कायद्यातील( Indian Patents 1970 Act-IPA70) तरतुदीचा आधार घेत त्यानी कोकाकोला कंपनीला आपला शीतपेयाचा ‘तथाकथित’ गुप्त फॉर्म्युला उघड करायला सांगितले. ह्या गोष्टीला कोकाकोला कधीही तयार होणार नव्हते (हे जॉर्जना माहिती होते). कोकाकोलाने ह्यातून मार्ग काढायचा बरच प्रयत्न केला. पण इरेला पेटलेल्या जॉर्ज समोर त्यांचे काही चालले नाही आणि अखेर त्यानी भारतातून आपले चंबू गबाळे हलवले. त्यामुळे त्यांच्या मालकीचे २२ बॉटलिंग प्लांट बंद पडले आणि जवळपास १० हजार लोक बेकार झाले. बेकार आणि संतप्त कामगारांनी जॉर्ज ह्यांच्या घरासमोर निदर्शने देखिल केली पण त्यांना भांडवलशहांचे हस्तक ठरवून त्यांची संभावना केली गेली.ह्या काळात जॉर्ज ह्यांचे एक विधान बरेच गाजले होते. भारतातल्या ९० टक्के खेड्यात लोकांना साधे प्यायचे स्वच्छ, शुद्ध पाणी उपलब्ध नाही पण कोकाकोला,पेप्सी उपलब्ध आहे. आपल्याला ह्याची गरज आहे का?(जणू कोकाकोला असल्यामुळे खेड्यात प्यायला पाणी मिळत नव्हते अन आता कोकाकोलाला भारतातून हाकलल्याने खेड्यात शुद्ध पेयजल उपलब्ध होणार होते!...असो) १९७७ हे साल जसे शीतपेयांच्याबाबतीतल्या घडमोडीनी गाजले तसेच इतर अनेक घडामोडींनी देखिल गाजले होते. भारताच्या लोकशाहीच्या प्रवासात/इतिहासातदेखिल त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. ह्यावर्षी आणीबाणी हटली होती. इंदिरा कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाला होता, आणि भारतातच्या इतिहासात प्रथमच एका बिगर काँग्रेसी पक्षाचे म्हणजे जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते. ह्या नव्या सरकारात उद्योग मंत्री असलेल्या जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी अमेरिकन भांडवलशाहीचे प्रतिक असलेल्या कोकाकोला ह्या कंपनीला पार्श्वभागावर सणसणीत लाथ मारून हाकलून लावले होते. पण कोकाकोला भारतातून गेला तरी लोकांना कोकाकोला हवा होता. त्याची चटक लागली होती म्हणा ना! मग काय लवकरच पाकिस्तानातून कोकाकोलाची चक्क तस्करी सुरु झाली.स्फोटके, शस्त्रास्त्रे, सोने-चांदी,अंमलीपदार्थ ह्यांच्या जोडीला कोकाकोलासारख्या या:कश्चित शीतपेयाची तस्करी! सरकार,पोलीस आणि प्रशासनाच्या डोक्याला हा नवीनच ताप सुरु झाला. ह्यावर उपाय काय! तर सगळे काम धंदे आपल्याच अखत्यारीत सुरु करण्याच्या आवेशात सरकारने चक्क कोकाकोलाच्या कोला सारखाच एक कोला भारतात बनवून विकायचे ठरवले. आणि सरकारला आव्हान कोण देणार! मग काय म्हणता हो! भारत सरकारने आपल्या म्हैसूर इथल्या केन्द्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान संस्थान CFTRI (Central Food Technological Research Institute at Mysore)ह्यांना कोकाकोलाच्या धरतीवर एक शीत पेयाचा फॉर्म्युला बनवायला सांगीतला.(ह्या CFTRI ने पूर्वी अमूल करता दुध पावडर बनवण्याचे तंत्र विकसित केले होते..असो तर .तो फॉर्म्युला वापरून 1977 साली भारत सरकारने स्वत:च्या मालकीची असलेल्या मॉडर्न फुड इंडस्ट्रीज मार्फत डबल सेव्हन ह्यानावाने एक कोला बाजारात आणला. त्याचे उद्घाटन/ अनावरण/प्रथम सादरीकरण काहीही म्हणा हे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई ह्यांनी केले होते. ह्या कोलाचे नाव डबल ७ हे खास होते. १९७७ साली आणीबाणी हटली होती. इंदिराजीन्चा आणि त्यांच्या कॉंग्रेसचा पराभव झाला होता, त्यांच्या मते हुकुमशाहीचा पराभव लोकशाहीने केला होता. ज्या साली हे घडले ते साल अधोरेखित करणारे नाव डबल सेव्हन(७७) ह्या नव्या डबल सेव्हन कोला च्या जाहिरातीसाठी वापरलेली tagलाईन देखिल मोठी रोचक आहे For the good times म्हणजे “अच्छे दिनके लिये” एकंदरीत बिगर काँग्रेसी लोकांना अच्छेदिनचे भारीच आकर्षण बुवा! (आजचा भाजप म्हणजेच तेव्हाचा जनसंघ या जनता सरकारात सामील होता.)...असो अर्थात लोकांना हा नवा कोला काही फारसा पसंत पडला नाही आणि हळू हळू मागे पडला. पुढे लवकरच म्हणजे १९८० साली जनता पक्षाचे सरकारही पडले आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी आणि इन्दिरा कॉंग्रेस हापक्ष सत्तेवर आला. आता अर्थातच आपल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणारे नाव धारण करणाऱ्या आणि आपल्या पराभवाचे अन त्यांच्या विजयाचे प्रतिक असलेल्या डबल सेवन कोला मध्ये त्यांना फार रुची नव्हती, जनतेलाही नव्हती(वेगळ्या अर्थाने) पण त्यानी हा कोला सरळ बंद केला असता तर त्यात विरोधकांना खुनशीपण दिसले असते. म्हणून मग त्यानी प्युअर ड्रिंक्स ह्या पूर्वाश्रमीच्या कोकाकोलाच्या बॉटलिंग करणाऱ्या कंपनीला ह्या डबलसेव्हनचा कारभार हाती घ्यायला सांगितले. पण प्युअर ड्रिंकचा स्वत:चाच एक कोला बाजारात आणायचा मानस होता, त्याचे नाव होते कॅम्पाकोला.त्यामुळे त्यानी हा प्रस्ताव नाकारला मग हळूहळू हा डबलसेव्हन कोला मागे पडला, बंद पडला, आणि विस्मृतीतही गेला. हा कॅम्पाकोला अगदी चवीला दिसायला आणि नाव लोगो जाहिरातबाजी ह्या बाबतीत कोकाकोलाचीच सही सही नक्कल होता पण त्यावर आक्षेप घ्यायला आता कोका कोला भारतात नव्हता. काळाचा महिमा अजून काय? त्यामुळे हा कॅम्पाकोला भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला. डबलसेव्हन कोलाच्या तुलनेत तरी तो नक्कीच उजवा ठरला, लोकांच्या पसंतीत उतरला ह्या सगळ्या गदारोळात आपला जुना भिडू पार्ले स्वस्थ बसला नव्हता त्यांची इतर पेयं बाजारात धडाक्यात खपत होती आणि कोला ह्या प्रकारच्या पेयात कोकाकोला बाहेर गेल्यानंतर भरपूर वाव होता पण त्याना आता कोला हेच नाव धारण करून कोका कोला ची नक्कल करणारे पेय नको होते, त्यानी बरेच प्रयत्न करून, निरनिराळ्या चाचण्या करून, भारतीय मसाले वापरून(म्हणे) म्हणजे थोडक्यात अनेक खटपटी लटपटी करून त्यांचा स्वत:चा एक कोला बाजारात आणला. त्याचे नाव थम्ब्सअप!... हो सुरुवातीला ह्याचे नाव थम्ब्सअप असेच होते पण मग लिहायला वाचायला आणि उच्चारायला सोयीचे व्हावे म्हणून त्यातला b काढून टाकून फक्त थम्सअप असे नामकरण केले गेले.ह्या पेयाची चव खरोखर वेगळी होती(आहे). आणि मुख्य म्हणजे ती लोकांना आवडली. मला आठवतंय, मी लहान होतो आणि बाजारात तेव्हा कोकाकोला, पेप्सी परत आले होते. तेव्हा चित्रलेखा मासिकात मोठमोठ्या लोकाना त्यात अगदी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा ते चक्क बाळासाहेब ठाकरे ह्यांना कोकाकोला, पेप्सी थम्सअप एका ग्लासात ओतून दिले होते आणि डोळे बांधून फक्त चवी वरून कोणते पेय कोणते आहे ते ओळखायला सांगितले होते आणि सगळ्यानी थम्सअप अगदी सहज ओळखले होते. असो... आता बाजारात स्पर्धा होती पारलेच्या थम्सअपची आणि प्युअरड्रिंकच्या कॅम्पाकोलाची. आपले पेय जास्त खपावे म्हणून कॅम्पाकोलाने आपल्या पेयाची किंमत १० टक्क्याने कमी केली त्यावर उत्तर म्हणून आपल्या पेयाची किंमत कमी करण्या ऐवजी पार्लेने थम्सअपच्या बाटलीची क्षमता वाढवून २५० मिली केली. तेव्हा सगळी शीत पेय २०० मिली च्या बाटलीत मिळत. त्या पेयाचे नाव केले थम्सअपमहाकोला. ह्याबरोबरच त्यानी सुनील गावस्कर, कपिल देव अशा लोकप्रिय खेळाडूना घेऊन जबरदस्त जाहिरातबाजी सुरु केली आणि ‘जाहिरातयुद्धाचे’ पडघम वाजायला सुरुवात झाली.पार्लेला ह्या युद्धात सुरुवातीला तरी मोठेच यश प्राप्त झाले असे म्हणावे लागेल. हळूहळू ह्या धंद्यात अनेक नवे भिडू पण उतरू लागले. डीक्सि कोला, किंग फिशरच्या विजय मल्ल्या ह्याने आणलेला थ्रिल कोला, बॉवोटो, सास्स्यो,टेरीनो असे अनेक नवनवे स्पर्धक ह्या बाजारस्पर्धेत उतरू लागले.पण निर्विवाद राजा होता पार्ले. कॅम्पाकोला हळूहळू मागे पडला आजही हरियाणामध्ये हा कोला बनतो आणि खपतो (म्हणे!) पण अगदीच नगण्य प्रमाणात.असे असले तरी आपल्या ह्या विजयाचे खरे श्रेय पेयाच्या चवीला नसून ते जाहिरातबाजीला आहे हे पार्लेला माहिती होते. म्हणून मग त्यानी आपल्या निरनिराळ्या पेयासाठी जाहिरात मोहिमा चालवल्या. मोठमोठ्या सिनेतारका आणि ताऱ्याना, खेळाडूना घेऊन चटकदार, चुटचुटीत जाहिराती, जिभेवर रेन्गाळतील अशी कॅचफ्रेजेस ह्यांचा धडाका लावला. थम्सअप साठी टेस्ट द थंडर, गोल्ड स्पॉट साठी ‘द झिंग थिंग’ किंवा लिम्का चे ‘लाईम एन लेमनी लिम्का’ लोकांच्या आजही लक्षात आहेत, नव्हे ओठांवर आहेत. १९८० साली पार्लेने अजून एक पेय प्रकार बाजारात आणला सिट्रा म्हणून त्याला त्यानी सुपर कुलर असे म्हटले हा प्रकार देखिल लोकांना जाम आवडला. १९८५ साली पेप्सीने परत एकदा भारतात शिरकाव करायचा प्रयत्न केला. गोयंका उद्योगसमूहाशी हातमिळवणी करून त्यांनी भारतात परत आपले पेय उतरवायचा प्रयत्न करून पहिला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. थोडक्यात भारतातल्या शीतपेय बाजारात १९८० ते साधारण १९८७-८८ पारलेचाच वरचष्मा होता आणि त्यांचे थम्सअप हे सगळ्यात जास्त खपणारे पेय होते. इथे थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे म्हणजे ह्या शीतपेयांचा आणखी एक उपयोग म्हणजे दारू पिताना दारूत ते मिसळायचे. हा प्रकार भारतात जास्त प्रमाणात आढळतो किंवा आढळत असावा.परदेशी विशेषतः युरोपियन आणि अमेरिकन अगदी जपान कोरियन अशा बर्याच देशातील लोकांशी आमच्या कंपनी मुळे माझा संपर्क आला. बहुतेक वेळा ते लोक दारू पिताना दारूत काही मिसळत नाहीत किंवा क्वचित प्रसंगी साधेपाणी, बर्फ किंवा सोडा मिसळतात. भारतात मात्र कोणत्या प्रकारच्या दारूत काय मिसळावे ह्याचे संकेत ठरले आहेत. व्हिस्की मध्ये थम्सअप किंवा पेप्सी, रम मध्ये सोडा,पाणी किंवा थम्सअप, जीन, वोडका मध्ये स्प्राईट किंवा लिम्का असे संकेत आहेत म्हणजे हेच मिसळावे असे नाही पण बहुतांश वेळा ते पाळले जातात. सिंगल माल्ट किंवा उत्तम प्रकारच्या स्कॉच मध्ये पेप्सी, थम्सअप मिसळून पिणारे महाभाग मी पहिले आहेत. का कोणजाणे पण कोका कोला मात्र ह्यासाठी फारसा कोणी वापरत नाही म्हणजे माझे तसे निरीक्षण नाही...असो १९८५ साली अपयश आले तरी पेप्सी अजून भारतात शिरकाव करायच्या प्रयत्नात होते. त्याकाळी पंजाब खलिस्तानप्रणीत फुटीरतावादी चळवळीने पेटलेले होते तिथे बेरोजगारी आणि उद्योगधन्द्याची कमतरता देखिल निर्माण झाली होती. तेव्हा भारत सरकारची पंजाब अग्रो, टाटाची वोलटास आणि पेप्सी ह्यांनी मिळून पंजाब मध्ये शेती विषयक अनुसंधान करणे, बॉटलिंग प्लांटस उभारणे आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची साखळी उभी करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला. पेप्सी पहिल्या वर्षी दीड कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ह्यात करणार होता, तर एकूण प्रकल्पात त्याचा हिस्सा ३९ टक्के असणार होता. ह्याबदल्यात पेप्सीला संपूर्ण भारतात आपले शीत पेय विकायचा परवाना हवा होता. भारतात ह्याबाबतीतल्या लालफीतशाही, नोकरशाही आणि निरनिराळ्या परवानग्या, राजकारण्यांचे आरोप-प्रत्यारोप ह्याच्या दिव्यातून जात जात १९८८ साली त्यांना तशी परवानगी मिळाली. आता विरोधी पक्षात असलेले जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी खरमरीत पत्र लिहून पेप्सीला चक्क धमकीच दिली. “मी मागे कोकाकोलाला भारतातून हाकलून लावले. लवकरच आम्ही परत सत्तेत येऊ आणि मग तुमची हि तशीच वासलात लावू.” त्यावेळी अखिल भारतात वर्षाकाठी सुमारे ३अब्ज इतक्या शीत पेयांची एकूण विक्री होत असे. इतक्या मोठ्या बाजारात हिस्सा मिळवण्याची संधी पेप्सी सोडणार नव्हता. १९८९ साली मात्र खरोखरच कॉंग्रेसचे सरकार पडले आणि व्ही पी सिंग ह्यांनी राष्ट्रीय आघाडीचे सरकार बनवले त्याला भाजपने बाहेरून समर्थन दिले.ह्या नव्या सरकारात जॉर्ज फर्नांडीस रेल्वे मंत्री होते (पेप्सीने सुटकेचा नि:श्वास टाकला असणार.)हा वेळे पावेतो पेप्सीने पंजाबात बरीच गुंतवणूक केली होती आणि आता त्याचे काय होणार! ह्याबाबत सरकार बदलल्याने अनिश्चितता आली होती. पण अशा वेळी अमेरिकन सरकार(नेहेमीप्रमाणे) त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सरकार बदलले म्हणून धोरण आणि निर्णय पूर्ण उलट फिरवून आधीच गुंतवणूक केलेल्या परदेशी कंपन्याचे नुकसान केले जाणार असेल तर त्यामुळे जगाच्या बाजारात चांगला संदेश जाणार नाही आपली पत देखिल चांगली राहणार नाही ह्याची जाणीव व्ही पी सिंग ह्यांना होती. दहशतवाद, अलगाववाद आणि हिंसाचार ह्यामुळे होरपळून निघालेल्या पंजाबला पेप्सी, पंजाब अग्रो आणि वोलटास ह्यांच्या प्रकल्पाचा फायदा होणार होता.त्यामुळे १९८८ सालच्या निर्णयाला स्थगिती न देता पेप्सीला भारतात व्यवसाय करण्याची परवानगी दिली गेली. ह्यावर पार्लेने कायद्याची पळवाट शोधत एक अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला. परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करताना एखाद्या भारतीय व्यवसायाशी भागीदारी करणे गरजेचे असते. त्यातल्याच एका तरतुदी नुसार त्या कंपन्यांना आपले मूळ नाव जसेच्या तसे वापरता येत नसे. त्यामुळे त्यानी पेप्सीच्या ‘पेप्सी’ ह्या नावाला आक्षेप घेतला. आता १९८८ साली परवानगी मिळाल्याने पेप्सीने आतापर्यंत पेप्सी नाव कोरलेल्या साधारण १ कोटी बाटल्या बनवल्या होत्या त्या सागळ्या त्यांना वितळवून परत नव्याने तयार कराव्या लागल्या. त्याचा साधारण दहा लाख अमेरिकन डॉलर्स इतका भुर्दंड त्यांना बसला. वेळ गेला ते वेगळेच. असो पण ‘लेहर पेप्सी’ ह्या नावाने अखेर पेप्सी भारतात धुमधडाक्यात आले. ह्याच सुमारास पार्लेने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स सुरु केले.भारतीय लोकांनी केलेल्या जागतिक विक्रमांची दखल आणि नोंद हे करते. त्याला भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अर्थात हा लोकप्रियता आणि आपली बाजारातील ओळख टिकवून ठेवायच्या डावपेचाचा एक भाग होता हे लक्षात ठेवले पाहिजे.ह्या सगळ्या घडामोडी, विशेषत: पार्ले-पेप्सी स्पर्धा आणि डाव पेचांवर कोकाकोला बारीक नजर ठेवून होता. १९९० च्या दशकाचा सुरुवातीचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत बिकट होता. १०० टन सोने गहाण ठेवण्याची वेळ येणे, परकीय गंगाजळी आटणे, वर्ल्ड बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे जिकीरीचे होऊन बसणे थोडक्यात अर्थव्यवस्था गर्तेत जाणे हे सगळे आपल्याला चांगलेच लक्षात आहे. हा काळ १९९१चे आर्थिक महासंकट म्हणून ओळखला जातो. १९९१च्या मध्यावर हे आघाडी सरकार कोसळले आणि परत एकदा कॉंग्रेस सत्तेवर आली. पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान झाले तर पूर्वी रिझर्व बँकेचे गवर्नर असलेले मनमोहन सिंग ह्या सरकारात अर्थमंत्री होते. ह्यांनी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेला खुली करण्याचे सूतोवाच केले. पूर्वीची परदेशी कंपन्यांची भारतीय उद्योगातील भागीदारीची कमाल मर्यादा ४० टक्क्याहून वाढवून ५१ टक्के केली. ही संधी कोका कोला हातून जाऊ देणे शक्यच नव्हते. त्यानी पुन्हा एकदा भारतात व्यवसाय करायची परवानगी मागितली आणि अक्षरश: काही महिन्यात कोकाकोला भारतात व्यवसाय करायची परवानगी मिळाली. काळ कसा आणि किती झपाट्याने बदलला होता पहा. इकडे तोपर्यंत पेप्सी आणि पार्ले मध्ये व्यावसायिक स्पर्धा आता युद्धाच्या स्वरूपाला पोहोचली होती. पेप्सिकडे प्रचंड भांडवल आणि आर्थिक बळ होते जे वापरून त्यानी मोठमोठ्या सिने तारका आणि तारे, खेळाडू, गायक, गायिका ह्याना आपल्या जाहिरात मोहिमेत सामील करून घेतले. रेमो फर्नांडीस, जुही,अमीर शहरूख, सलमान,सुनील, सचिन, कपिल देव असल्या मोठ मोठ्या लोकांना घेऊन चालवेली ‘यही है राईट चॉइस बेबी-आहा!” हि जाहिरात मालिका अनेकांना आजही आठवत असेल. अशात कोकाकोलाही आता आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला. त्यांच्या लक्षात आले कि आपल्या पुढे भारतात आपल्या पेयांचे बॉटलिंग करण्यासाठी मोठमोठे बॉटलिंग प्लांट उभे करण्याचे मोठे आणि वेळखाऊ काम वाढून ठेवलेले आहे. तेव्हा भारतात पार्लेचे सगळ्यात जास्त म्हणजे ६२ बॉटालिंग प्लांट कार्यान्वित होते पण त्यापैकी फक्त ४ त्यांच्या स्वत:च्या मालकीचे होते बाकीचे ५८ पार्लेचे फक्त पुरवठादार होते. त्यांना कोकाकोलाने आपल्या कच्छपी लाऊन पार्ले ऐवजी कोकाकोलाच्या पेयांचे बॉटलिंग करायला राजी केले..बाजरात त्यांची मक्तेदारी असताना पुरवठादारांशी त्यांचे वर्तन ही ठीक नव्हते.त्यामुळे पार्लेच्या पेयांचे बॉटलिंग करायला नवा पुरवठादार कुणी मिळेना, (तशी व्यवस्था देखिल कोकाकोलाने केली.) हा घाव मात्र पार्लेला वर्मी बसला.त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोतच आटला. त्यांच्या पेयांना बाजारात चांगली मागणी होती पण ते पुरवठाच करू शकत नव्हते. अनेक प्रयत्न करून देखिल ते ह्यातून मार्ग काढू शकले नाहीत. ज्याच्याशी संगनमत करून भागीदारी करून ह्या परदेशी स्पर्धका विरुद्ध काही करु शकतील असा (ड्युक्स सारखा)प्रादेशिक प्रतिस्पर्धी देखिल उरला नव्हता नव्हे त्यानीच शिल्लक ठेवला नव्हता. सरकारी धोरण आणि कायदे आता त्यांच्या फारशा उपयोगाचे राहिले नव्हते. जनतेत त्यांची पेय लोकप्रिय होती पण त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचे मार्ग कोकाकोलाने रोखून धरले होते. अखेर हार मानत सप्टेंबर १९९३ साली पार्लेने आपला थम्सअप, गोल्डस्पॉट, लिम्का, सिट्रा, माझा सकट सगळा व्यवसाय ६ कोटी अमेरिकन डॉलर्स इतक्या क्षुल्लक किमतीला कोकाकोला कंपनीला विकून ह्या धंद्याला कायमचा रामराम ठोकला. खरेतर पार्लेची पेय भारतात लोकप्रिय होती आणि त्यांची चव लोकांच्या जिभेवर चांगलीच रुळलेली देखिल. तेव्हा त्यात हरवून पुढे जाणे कोकाकोला साठी सोपे नव्हतेच पण खर्चिक आणि वेळ खाऊ देखिल होते. म्हणून ह्यावर कोकाकोलाने आपली आर्थिक ताकद वापरून असा तोडगा काढला.(तसेही कोकाकोला,पेप्सी सारखे अमेरिकन उद्योगसमूह अमेरिकेबाहेर व्यवसाय करताना न्याय्य , कायदेशीर,श्रेयस्कर मार्ग चोखाळतात असा काही त्यांचा लौकिक नाहीच ... असो.) आता कोकाकोला भारतात सगळ्यात मोठा शीतपेयांचा उत्पादक होता आणि थोडा मागे दोन नंबरला होता पेप्सी. कोकाकोलाने हळूहळू पारलेची एकएक पेय बंद करून त्याजागी आपापली पेय आणणे सुरु केले पहिला बळी गेला गोल्डस्पॉटचा, त्याजागी आला फंटा..( हा फंटा म्हणजे मूळ जर्मन ब्रॅण्ड! अगदी नाझी जर्मनीत उदयाला आलेला! म्हणजे झाले असे कि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर व्यावसयिक निर्बंध आणल्याने जर्मनीतील कोकाकोला कंपनीला आपला धंदा करता येईना, म्हणून मग जर्मनीतील कोकाकोलाचा मुख्य व्यवस्थापक मॅक्स कीथ ह्याने फंटा हे पेय् बनवले.आज ते जगात सगळ्यात जास्त खपणाऱ्या शीत पेयांपैकी एक आहे.)नंतर नंबर लागला लिम्काचा मग सिट्राचा. त्यांच्या जागी आला स्प्राईट. आणि शेवटी थम्सअप. अर्थात थम्सअप पूर्ण बंद कधीच झाला नाही. ही सगळी पारलेची पेय हळूहळू बंद करत त्याजागी कोकाकोलाची पेय लोकांच्या गळ्यात बांधायचा किंवा घशात ओतायचा कोकाकोलाचा मूळ प्लान. पण त्यांच्या लक्षात आले कि थम्सअप ज्याचा भारतीय कोला पेयाच्या बाजारात ८५तक्के हिस्सा होता तो पूर्ण पणे आपल्याला मिळत नाहीये, मिळणारही नाही. उलट पूर्वी थम्सअप पिणारे लोक आता तो मिळेनासा झाल्यावर कोकाकोला ऐवजी पेप्सीकडे वळताहेत.भारतीय स्पर्धक न उरल्याने आता स्पर्धा होती पेप्सी आणि कोकाकोला ह्या दोन महाकाय कंपन्यांमध्ये.१९९४ साली खूप जुनी अशी पारशी शीत पेयाची कंपनी ड्युक्स हि पेप्सीने विकत घेतली आणि आणखी एका भारतीय कंपनीचा बळी गेला.१९९६ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी ही स्पर्धा अधिक हिडीस झाली. कोकाकोला क्रिकेटचा ऑफिशियल स्पॉन्सर बनली तर आपण स्वत: ओफिशियल स्पॉन्सर बनण्याचे प्रयत्न करणारी पेप्सी लगेच ‘नथिंग ऑफिशियल अबाउट इट’ म्हणत जोरदार जाहिरातबाजी करू लागली.ह्यात पैसा घालवून हात शेकून घेतले कोकाकोलाने पण खरेतर ह्या जाहिरात युद्धात हात धुवून घेतले जाहिरातदारांनी, सेलीब्रीटीनी आणि वितरकांनी.थम्सअपचा पारंपारिक ग्राहक आपल्या ऐवजी पेप्सिकडे वळतो आहे आणि आपण ते थांबू शकत नाही, हे पाहून कोकाकोलाने थम्सअपला परत बाजारात जोरदार पणे उतरवले आणि बऱ्याच प्रमाणात पेप्सिकडे वळणारा ग्राहक परत आपल्याकडे खेचला. आजही भारतीय तरुणात थम्सअप आवडणारे आणि पेप्सी किंवा कोकाकोला आवडणारे असे स्पष्ट दोन वर्ग आहेत. ‘टेस्ट द थंडर’ नावाचे वादळ अजूनही चालूच आहे. २००० साली लिम्का देखिल परत आला किंवा आणावा लागला असे म्हणा. वांद्र्याची(त्याला अनेकजन बँड्रा म्हणतात) माउंट मेरी जशी लोकांनी मोत मावली म्हणून स्वीकारली तसाच हा प्रकार. आज देखिल मूळ अस्सल भारतीय असलेला पण सध्या कोकाकोला नावाच्या परकीय सत्तेचा मांडलिक झालेला थम्सअप कोका कोला किंवा पेप्सी पेक्षा अधिक खपतो. लिम्काची देखिल तीच गत आहे. जनता त्यांना विसरली नाही पण जनतेचे काय हो... तिला कायम गृहीतच धरले होते पूर्वी पार्लेने तसेच आता पेप्सीने आणि कोकाकोलाने. मल्टीप्लेक्सच्या, मॉल्सच्या जमान्यात कोकाकोला, पेप्सी आपली पेय अनेक मल्टीप्लेक्स मालकांना नाममात्र किमतीत देत असताना ते मात्र एक कप भर पेय ८०-८५-१०० वाटेल त्या किमतीला विकत, आजही विकतात. घरचे पाणी नेलेले चालत नाही तिथलेच बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.इथे आत शिरणाऱ्या बायकांच्या पर्स मध्ये हात घालून सिक्युरिटी पाण्याची बाटली तर नाहीना हे तपासतात जणू तो बॉम्ब आहे. साधा हॉटेल-रेस्टॉरंटवाला किंवा किराणा दुकानदार त्याला शीत पेयांचा फ्रीज कंपनीने दिलेला असूनही आणि काही प्रसंगी त्याचे विजेचे बिल देखिल वितरक कंपनी भरत असतानाही शीत पेय थंड करायचे २-२.५ रुपये जादा लावतो. MRP पेक्षा जास्त किंमत आकारायची नाही असा कायदा असताना सुद्धा आणि ह्यात आपला म्हणजे ग्राहक राजाचा उपमर्द अपमान फसवणूक होते आहे असे ग्राहक राजाला देखिल वाटत नाही. हे राजे ग्राहक रस्त्यावरच्या भाजीवाली कडून भाजी घेतली कि कडीपत्ता किंवा मिरची फुकट मिळावी म्हणून भांडतात. दांभिकपणा...पण...असो... आताशा अनेक लहान लहान प्रादेशिक ब्रॅण्ड्स ह्या स्पर्धेत उतरू लागलेत आणि जरी ते लहान स्वत:च्या प्रदेशापुरते मर्यादित असले तरी सगळे मिळून भारतीय शीत पेयाच्या बाजारातला २४ टक्के इतका हिस्सा काबीज करून आहेत. ह्या प्रकरणाचा आता कुठे दुसरा अध्याय संपतो आहे. तिसऱ्या अध्यायात काय घडेल हे पाहणे मोठे रंजक असणार आहे हे नक्की. मी स्वत: पुणेकर असल्याने ह्या शीतपेय आणि पुण्याबाबत एक महत्वाची आणि रंजक माहिती देण्याचा मोह आवरत नाही म्हणून थोडा पाल्हाळ लावण्याचा दोष पत्करून ती इथे देत आहे अमेरिकेत कोका कोला(१८८६) सुरु व्हायच्या देखील २ वर्षे आधी पुण्यात एक शीत पेय सुरु झाले होते आणि आजही ते आपले अस्तित्व टिकवून आहे ते म्हणजे अर्देशीर. आज १३६ वर्षानंतर देखील सुरू असणारी हि पुण्याची शीतपेय बनवणारी कंपनी आणि त्यांचे दहा प्रकारच्या चवीत उपलब्ध असणारे शीत पेय भारतात (आणि कदाचित जगात देखील) सगळ्यात जुने, अजूनही चालू असलेले आणि मुख्य म्हणजे आपली मूळ मालकी टिकवून असलेले छोटेखानी शीतपेय आहे. ह्या कंपनीचे संस्थापक,अर्देशीर खोदादाद मूळचे इराणी, तिकडे मुस्लिम धर्मच्छळाला घाबरून/कंटाळून १८६५ साली इराण मधील यझद प्रांतातून भारतात आले. सुरुवातीला ते इतर पारशांप्रमाणे मुंबईत आपले बस्तान बसवू इच्छित होते पण काही कारणाने त्यांची डाळ मुंबईत शिजेना. मग ते पुण्यात आले आणि पुण्यातल्या लष्कर भागात (आजचा कॅम्प एरिया) राहिले तिथे त्यांना जाणवले कि ह्या भागातले ब्रिटीश सोजीर दारु पिताना दारूत मिसळायला सोडा म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड विरघळवून बनवलेले, फस्फसणारे जिभेवर चुरचुरणारे पाणी, साध्या पाण्यापेक्षा जास्त पसंत करतात. पण भारतात तेव्हा तयार बाटलीबंद सोडा मिळण्याची सोय नव्हती आणि इंग्लंड वरून येणारा सोडा महाग आणि सहज मिळेलच, ह्याची शाश्वती नसे. अर्देशीर ह्यांनी ही संधी हेरून स्वत:च असा सोडा बनवण्याचा धंदा चालू केला. त्याकाळी कार्बन डाय ऑक्साईडचे सिलिंडर वगैरे नसत त्यामुळे अर्देशीर कोळसे जाळून त्यापासून कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार करत. मग तो व्यवस्थित फिल्टर वगैरे करून त्यापासून सोडा बनवत. हे सगळे ज्ञान त्याकाळी त्यांनी कसे मिळवले! कोण जाणे! पण त्यांचा हा बाटलीबंद सोडा ब्रिटीश सोजीराना एकदम आवडला. मागणी वाढली तशी घरात चालू असलेला हा उद्योग त्यांनी कॅम्पातल्याच गफार बेग रस्त्यावर सेठना ह्या पारशी कुटुंबाची मालकी असलेल्या मोठ्या जागेत हलवला. ह्या त्यांच्या उद्योगाने तिथल्या चौकाचे नाव सरबतवाला चौक असे पडले. आजतागायत हि अर्देशीर अँड सन्स ही शीत पेयांची कंपनी इथूनच कारभार करते. पारशी लोक भारतात खूप आधी पासून म्हणजे कमीत कमी १०००-१२०० वर्षांपासून आहेत पण १९, २०व्या शतकात इराण मधून जे पारशी आले, त्यांनी मुख्यतः हॉटेल, कॅफे, शीतपेय असले खाद्य,पेय पदार्थाचे उद्योग चालू केले. त्यांच्या हॉटेलांना इराण्याचे हॉटेल असे म्हणत आणि त्यांना स्वातंत्र्य पूर्व काळातल्या पुण्या-मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळेच स्थान होते. कॅफे नाझ, कॅफे गुडलक,लकी,येझदान अशी पुण्यातली तर ब्रिटानिया, मेरवान, याझदानी, कयाणी अशी मुंबईतली इराणी हॉटेलं आजही अनेकांच्या मनात आठवणींचे धागे धरून आहेत. पुण्यातले सगळ्यात जुने दोराबजी(स्था. १८७४) हे त्या अर्थाने इराणी हॉटेल नव्हे, ते पारशी हॉटेल आहे हे ही जाता जाता सांगायला हवे. असो... तर कुठल्याही अस्सल सणकी / विक्षिप्त पारशाप्रमाणे ह्या गृहस्थाचे आपल्या मुलाशी पटत नसे. मुलगा फ्रामजीही स्वभावाने तसाच. म्हणून मग त्याने बापापासून वेगळे होऊन स्वत:चा पुन्हा शीतपेयाचाच उद्योग सुरु केला फ्राम्स नावाने, हि कम्पनी देखील त्याकाळी पुण्यात नावारूपाला आली.(आज मात्र हि कंपनी बंद पडली आहे.) बापाचे मुलाशी पटत नसले तरी आजोबांचे नातवाशी पटे त्यामुळे आजोबांचा म्हणजे अर्देशीर ह्यांचा उद्योग फ्रामजीच्या मुलाने म्हणजे गिलानी इराणीने पुढे चांगला सांभाळला. आज मर्झबन इराणी वय 48 म्हणजे त्यांची चौथी पिढी हा छोटेखानी उद्योग सांभाळते आहे. दोराबजी, जॉर्ज ,रुस्तमस, कॅफे याझदान, कॅफे वोहुमन, ब्ल्यू नाईल अशा जुन्या इराणी/ पारशी हॉटेलातच फक्त ही शीत पेय मिळतात, शिवाय अनेक पारशी समारंभात, सोहळ्यात, मेळाव्यात यजमान ही शीत पेय आवर्जून मागवतात अन्यथा बाजारात, रिटेल दुकानात ती मिळत नाहीत. हि पेय फक्त काचेच्या बाटल्यातच मिळतात त्यामुळे जुन्या शिरस्त्याप्रमाणे १० रु डिपॉझिट ठेवावे लागेल अन रिकामी बाटली परत करून पैसे घ्यावे लागतील त्यामुळे ते आज कुणी दुकानदार मान्य करत नाही. मी स्वत: पेप्सी किंवा कोकाकोला स्प्राईट असे कोणतेही पेय पित नाही पण कधीही कॅम्पात गेलो तर हे अर्देशीर नक्की घेतोच घेतो. साधा सोडा, आईसक्रीम सोडा ( हा प्रकार मला ट्राय करायचा आहे ), ग्रीन ऍपल, पीच, पायनॅपल , ऑरेंज, लेमन( निंबूसोडा ) जीरा मसाला, जिंजर सोडा, आणि सगळ्यात प्रसिद्ध आणि फक्त पारशी इराणी शीतपेयातच सापडणारे रास्पबेरी अशा दहा प्रकारच्या चवीत शीत पेय पुरवणारी अर्देशीर अँड सन्स पुण्याचा मानबिंदू म्हणणे जरा जास्त होईल पण हृद्य ओळख नक्कीच आहे. ---आदित्य

प्रतिक्रिया द्या
21271 वाचन

💬 प्रतिसाद (62)
आ
आदित्य कोरडे Sat, 02/26/2022 - 16:18 नवीन
https://www.mediafire.com/folder/71jvj3jt5x48o/भारताचे_शीत(पेय)युद्ध_photo
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/26/2022 - 16:50 नवीन
मस्त लेख. मी शितपेयांचा इतकाही भोक्ता नाही. शितपेयी कंपन्यांनी केलेल्या उचापती येथे माहितीस पडतील. https://www.youtube.com/results?search_query=coca+cola+in+mexico COCA-COLA LIVES HERE (People Drink 2.2 Liters PER DAY)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 02/26/2022 - 17:56 नवीन
मस्त लेख आणि रोचक माहिती
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 02/26/2022 - 18:21 नवीन
मस्त लेख आहे, पूर्वी आधा सोडा आधा पानी + ओल्ड monk किंवा solan no 1 पण आता on the rocks. पूर्वी सॉफ्ट drinkers म्हणजे एखाद्या.....वाटायचे आता मात्रा drinkers chi संख्या कमी झालेली दिसते. माहिती छान आहे नवी माहिती मिळाली धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शेर भाई Sat, 02/26/2022 - 20:01 नवीन
तुम्हाला Sosyo बद्दल माहिती आहे का ?? आमच्या पप्पांमुळे आमची याची ओळख झाली. दादरला ठराविक दुकानांतच मिळते. आमचे काही जाणकार म्हणतात कि याची चव रशियन वारुणी सारखी लागते. हे पण एक अस्सल देशी शीतपेय आहे (का?) कॉलेजात असताना आमचे बरेच वार्षिकोत्सव बऱ्याचदा पार्ले नी प्रयोजित केले होते. सुरुवातीला पार्ले आणि कोका कोला मधल्या युद्धात पार्ले जिंकत होते त्याचा कुठेतरी असुरी आनंद होत असे. पण कोका कोलाने मधल्यामधे जी फालतुगिरी केली आणि शेवटी त्यांना रडीचा डावच करावा लागला त्याबाबत आज खुलासा झाला.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sun, 02/27/2022 - 03:48 नवीन
सोस्यो हा भारतीय कोला आहे.१९२३ साली. सुरतचे व्यावसायिक मोहसीन हाजुरी ह्यानी इंग्रजी पेय vimtoचे रिफिलिंग आणि बोटलिंग करण्याचा उद्योग चालू केला. १९३० च्या आसपास स्वत:चे पेय सोस्यो आणले.आधी ह्याचे नाव Socioअसे होते जे सोशालीजम ह्या शब्दावर बेतलेले होते. नंतर ते सोस्यो झाले. हा पूर्णपणे भारतीय brand आहे. हा गुजरात आणि महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबई पुणे नाशिक अशा पश्चिम महारष्ट्रातील मोठ्या शहरात मिळतो. हा आफ्रिका, ईंग्लंड,अमेरिका, सौदी, दुबई ते ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी निर्यात होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई
स
सर टोबी Sun, 02/27/2022 - 05:56 नवीन
मला स्वतःला खूपच आहे पण त्यातही मी थोडासा डोळसपणा दाखवतो. म्हणजे असं की हिंदुस्तान लिवर ची उत्पादने संपूर्णपणे देशी असतात. आपल्या लोकांना त्यातून रोजगार मिळतो. एवढेच नाही तर बऱ्याच भारतीयांनी या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व दिलं आहे. त्यामुळे ग्राहक पेठेचे बिंदुमाधव जोशी म्हणायचे की लाईफ बॉय ज्याचे घरी तो देशाचा मारेकरी आणि त्यांच्या दुकानात मात्र प्रॉक्टर अँड ग्यांबल आणि हिंदुस्तान लीवरच्या उत्पादनाची रेलचेल असायची असा वैचारिक गोंधळ माझ्यात नसायचा. तर आता बघुया काही दादागिरी असणारी भारतीय उत्पादने ज्यातील काही आता भारतीय राहिली नाहीत. सिंथोल हा खुद्द गोदरेज ने विकसित केलेला साबण. या साबणाचा पाहिला प्रकार आजही जसान तसा मुळ अवतारात मिळतो. टाटांचा मोती साबण म्हणजे जणू काही मराठी कुटुंबांच्या दिवाळी स्नानाची ओळख बनला आहे. आता हा साबण हिंदुस्तान लिव्हर चा झाला आहे. टाटांचाच हमाम हा साबण पूर्वी मध्यमवर्गियांचा साबण होता. हिंदुस्तान लिव्हर ने हे उत्पादन आता बंद केले आहे. पाँड्स ची फेस पावडर आणि कोल्ड क्रीम ही आजही त्यांची लोकप्रियता कमालीची टिकवून आहेत. डी मार्ट सारख्या दुकानात जिथे एकावर एक फ्री किंवा किरकोळ किमतीपेक्षा खूप स्वस्त वस्तूंची रेलचेल असते तिथे ही उत्पादने जवळपास त्यांच्या मुळ किमतीलाच विकली जातात. क्वालिटी आइस्क्रीम ही कारखान्यात आइस्क्रीम बनवून मोठ्या स्तरावर वितरीत करणारी पहिली कंपनी. त्यांच्याच जोडीला जॉय आइस्क्रीम बनवणारी पण एक कंपनी होती पण ती सध्या अस्तित्वात नाही. म्हैसूर सोपची उत्पादने अशीच त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. काळाच्या ओघात विरलेले ब्रँड्सचा विचार केला की आठवतात साठ्ये बिस्किट्स आणि रावळगावची चॉकलेट्स. स्वस्तिकच्या स्लीपर, आणि टाटा ऑईल मिलचा शाम्पू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई
च
चौकस२१२ Sun, 02/27/2022 - 10:54 नवीन
गेलया काही वर्षात २ प्रसिद्ध उत्पादनबद्दल पडलेला प्रश्न १) आयोडेक्स चा रंग का बदलला ? आणि त्याचे त्याचे घडण पण बदलली का? जाणकार सांगतील का? २) अमृतांजन चा रंग का बदलला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
व
विजुभाऊ Sun, 02/27/2022 - 17:43 नवीन
साठेची श्रुजबेरी बिस्कीट्स आत अकुठेच मिळत नाहीत. कोल्हापूरला पेरीना नावाचे आईस्क्रीम अजूनही मिळते. अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. कोला मधे बाजल / डू इट या नावाचे कोला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
B
Bhakti Sun, 02/27/2022 - 18:01 नवीन
अहमदनगरला पण आईस्क्रीमचा एक लोकल ब्रांड होता तो आता दिसत नाही. Royal का?आहे अजून.आणि अहमदनगरची लस्सी तर कुठेच नाही मिळणार.आमची शाखा कुठेही नाही. शीतपेयांची​ चर्चा म्हणून हे मुद्दे टाळत होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगणेशा Sun, 02/27/2022 - 19:15 नवीन
रॉयल कुल्फी (आणि चवही) आठवतेय अजून! नगरच्या मध्यवर्ती एस टी स्टँडवर मिळायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
ज
जेम्स वांड Sat, 03/12/2022 - 04:29 नवीन
अहमदनगरची लस्सी तर कुठेच नाही मिळणार.
द्वारकासिंग लस्सीवाला, माणिक चौक, एम जी रोड, अहमदनगर :) &#128077 &#128077 &#128077
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
स
सर टोबी Sat, 03/12/2022 - 05:28 नवीन
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
B
Bhakti Sat, 03/12/2022 - 06:10 नवीन
नाही , माणिक चौकात द्वारका सिंग आणि गंजात दुर्गा सिंग लस्सी वाला.दुर्गासिंगकडे जास्त लस्सी फ्लेवर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी Sat, 03/12/2022 - 05:28 नवीन
मला वाटते ते द्वारिका सिंग नसून दुर्गासिंग आहे. ही लस्सी आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकार आहेत. लस्सी मध्ये कोणी आइस्क्रीम आणि सुकामेवा घालतं का असा प्रश्न न आवडणाऱ्या लोकांकडून विचारला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 02/27/2022 - 04:07 नवीन
छान माहीती. पार्ले सारख्या देशी कंपनीचे पानिपत झालेले पाहून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/27/2022 - 04:14 नवीन
तुम्हाला Sosyo बद्दल माहिती आहे का ?? Sosyo फक्त बघितले आहे. अजूनही ते मिळते हे माहीत नव्हते.दादरला कुठे मिळते?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 02/28/2022 - 07:04 नवीन
सोसयो गुजरातेत अजूनही मिळतो भरपूर, मिक्स फ्रुट फ्लेवर ड्रिंक असते, डार्क कलरचे, अकवायर्ड टेस्ट भयानक, गुजरातेतील कुठल्याही शहरात/गावात/तालुक्याला मिळेल नक्कीच. गुजरातमध्ये सोडा प्यायचे प्रमाण प्रचंड आहे असे जाणवले. रोजच्या आहारात असलेले बेसन तेल इत्यादी जड पदार्थ खाणे आणि चवाणु उर्फ चिवडा शेव फाफडे इत्यादी खाल्ल्यावर बहुतेक सोडा गरजेचा वाटत असावा तिथे, रोज रात्री जेवण झाल्यावर पानबिडीला बाहेर पडतात माणसे तसेच सोडा प्यायला बाहेर पडण्याची पद्धत दिसली मला तरी तिथे. सोसयो मध्ये चिमूटभर काळेमीठ टाकून पिण्याची रीत आहे किमान राजकोटला. सोडा फाउंटन प्रत्येक ठिकाणी सापडतात तिथं, कुठल्याही फ्लेवर्ड सोड्यात वरतून एक मूठ खारे दाणे टाकले की तो होतो "सिंग सोडा" सौराष्ट्रात एकदा एका कस्टमरनं तर छास सोडा पाजला होता अर्धा ग्लास ताक, त्यात मसाला, मीठ वरतून सोडा, तुफान आवडला होता तो प्रकार मला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
श
श्रीरंग_जोशी Sun, 02/27/2022 - 04:57 नवीन
भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाबद्दलचा हा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. ९० च्या दशकात जाहिरातींद्वारे शीतपेय कंपन्या बरेच मनोरंजन करायच्या (एकमेकांची टर उडवणे इत्यादी) . कॅम्पॉ कोला हे पेय मला केवळ चश्मेबद्दूर या चित्रपटामुळे कळले होते. मागे एकदा लेहर पेप्सीबाबत शोधले असता न्यू यॉर्क टाइम्समधली ही २४ मे १९९० ची बातमी मिळाली होती. Talking Deals; After Long Fight, Pepsi Enters India.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 02/27/2022 - 04:59 नवीन
हा लेख पहिला मायबोलीवर प्रकाशित केला होता काय ? वाचल्यासारखा वाटला. एकेकाळी मी शीतपेयांचा जबरदस्त भोक्ता होतो पण गेल्या ३ वर्षांपासून शीतपेय पिणे अजिबात म्हणजे अजिबातच बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sun, 02/27/2022 - 12:05 नवीन
हो! तो मीच टाकलेला. माझाच लेख आहे. काही कारणानी मला मिसळपाव वर login होताच येत नव्हते अखेर आज जमले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अनन्त्_यात्री Sun, 02/27/2022 - 05:55 नवीन
आइस्क्रीम सोडा लहानपणी प्यालो होतो. फार आवडला होता. पण तेव्हाही तो कोल्ड्रिंक्सच्या सर्व दुकानांत मिळत नसे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sun, 02/27/2022 - 07:07 नवीन
नाशकातही असे एक नाव होते आर एस - रहाळकर सोडावॉटर. त्यात मसाला सोडा हा एक खास प्रकार असतो! नाव नसलेले अनेक सोडावॉटर बाटल्यांचे कारखाने पुर्वी होते.
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Sun, 02/27/2022 - 08:15 नवीन
राउत सन्स होता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
भ
भटक्य आणि उनाड Sun, 02/27/2022 - 08:03 नवीन
छान माहिती...
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 02/27/2022 - 10:33 नवीन
ड्युक्सचाच लेमोनेड " मला लिंमका पेक्षा जास्त आवडायचे .. कारण कदाचित त्यात थोडा आल्याचा स्वाद असावा.. आणि फॅटा पेक्सह गोल्ड स्पॉट जास्त पुढे इकडे आल्यावर "जिंजर एल " किंवा " जिंजर बीर ( अल्कोहोल नसलेली ) प्यायली.. ती आवडते ड्युक्स मुळेच बहुतेक , भारतात खरे तर जिंजर जिंजर एल लोकप्रिय व्हायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 02/27/2022 - 11:28 नवीन
मला ड्युक्सचा मँगोला जास्त आवडायचा. तो घट्ट असायचा. गोड असायचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 02/27/2022 - 11:34 नवीन
अभ्यासपूर्ण लेख _/\_ गोल्ड स्पॉट, थम्स अप, लिम्का पेये पार्ले कंपनीने तयार केली होती हे माहिती नव्हतं!
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 02/27/2022 - 13:10 नवीन
पण थोडाफार अर्धवट वाटला, शितपेयांच्या बरोबरीने भारतात बोटल्ड पाण्याचा व्यवसाय फोफावला आहे, तो पण जवळपास त्याच काळात (१९९१ नंतर). बोटल्ड वॉटर सेगमेंट ही एक भारतीय कॉर्पोरेट सक्सेस स्टोरी म्हणून प्रेझेंट होते कैकवेळा. बोटल्ड वॉटर सेगमेंट मधूनच पार्ले ऍग्रो ह्या पार्लेच्या उपकंपनीचा आकार वाढीला लागला, बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून त्यांचा कित्ता गिरवत मणिकचंद ऑक्सीरीच, तसेच कैक स्थानिक लहानसहान कंपनीज म्हणण्यापेक्षा व्यावसायिकांनी एक एक मध्यम किंवा लघु आरओ प्लांट लावून ह्या धंद्यात आपापले खुंट मजबूत रोवले आहेत, इतके की त्यांच्या पुरवठा, दर्जा अन डिमांड पुढे पेप्सीचा ऍक्वाफिना अन कोकाकोलाचा किनले पण फिक पडला आहे, आयारसीटीसनं ह्या धंद्यात आपल्या कंपनीचे निशे मार्केट मजबूत हाती धरून भारतीय रेल्वेच्या साहाय्याने भारतभर रेल्वे स्टेशनवर "रेल नीर" ची जबरदस्त मक्तेदारी क्रियेट करून कोकाकोला आणि पेप्सीकोला त्यांच्याच औषधाची मात्रा पाजली आहे. आता तर आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (आवा) चे सेनाजल पण मार्केटमध्ये आले आहे, हळूहळू प्रसिद्धी पावणारे हे बाटलीबंद पाणी भारतीय जनमानसांत असलेले फौजांप्रती प्रेम अन आदर ह्यांचा वापर करून लवकरच आपला एक खात्रीशीर ग्राहकवर्ग स्थापन्न करेल ह्याविषयी शंका वाटत नाही. विषयांतर झालेले वाटल्यास शितपेयांबद्दल बोलता पार्ले ऍग्रोनं जणू कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या गेलेल्या धंद्यावर सूड उगवल्यागत ऍपी, ऍपी फिझ ह्यांचे राक्षसी मार्केटिंग केले आहे, २०२२च्या दरम्यान शेतकऱ्यांचे इन्कम डबल करण्याच्या सरकारी वायद्याला अनुसरून हल्लीच काही वर्षे अगोदर पंतप्रधान मोदींनी शीतपेय कंपन्यांना आपल्या उत्पादनात काही टक्के फळांचा रस मिसळण्याची विनंती केली आहे, मला वाटतं रियल ज्युस बनवणारी डाबर, पतंजली ह्यांनी ह्याचा उत्तम प्रयोग केला आहे, अगदी ट्रॉपीकाना ह्या पेप्सीकोच्या मालकीच्या ब्रँडची स्पर्धा असताही. त्याशिवाय अगदीच प्रामाणिक फॉलोइंग असणारी काही पेये उदाहरणार्थ रुहअफजाह पण चांगले सेल्स फिगर्स मेन्टेन करतात, रुहअफजाह हे पाकिस्तानी ड्रिंक असल्याची मध्यंतरी आवई उठली होती, पण भारतातील हमदर्द लॅबोरेटरी आणि तिचे पाकिस्तानी भावंड ह्यांचं आज काहीही घेणं देणं नाही. मुळात रुहअफजाह बनवणाऱ्या मौलवीसाहेबांचे काही गणगोत पाकिस्तानात गेले (१९४७ मधेच) अन तिथे हमदर्द पाकिस्तान सुरू केले, भारतीय तर आधीपासून होतेच धंद्यात, रुहअफजाह हे जसे जॉन पेंम्बरटननने कोला डोकेदुखीचे औषध म्हणून काढले होते तसेच रुहअफजाह हे भारतीय उष्णतेला मारक आणि शरीराला थंडावा देणारे "कंपोजिशन" म्हणून बनवले गेले होते, युनानी औषधप्रणालीतील प्रचलित औषधी बुटी जसे की सब्जा, खस (वाळा), गुलाबजल इत्यादी वापरून त्यांचा अर्क साखरेच्या पाकात मिसळून रुहअफजाह तयार होते. तुमचे लेखन न्यून असे म्हणत नाही मी अजिबात फक्त मला वाटेल अशी एक वीट मात्र मी तुमच्या ताजमहालला लागावी ह्या अँगलने लिहिले आहे, आगाऊपणा बद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sun, 02/27/2022 - 14:22 नवीन
बेलीज ह्या बहुतेक फ्रेंच ब्रँडचे नाव वापरून आणि नंतर बिसलेरी ह्या परत बहुतेक फ्रेंचच असणाऱ्या ब्रँडच्या आकर्षक पाण्याच्या बाटल्या (आता दहा रुपयात अर्धा लिटर) मिळत असून
वांडोबा पहिली बिसलेरीच. फ्रेन्च नाहीतर इटालियन. फेलिक्स बिसलेरी. १९६९ ला चौहान फॅमिलीने हा टायप सुरु केला. सुरुवातीला बिसलेरी कार्बोनेटेड वॉटर म्हणजे सोड्यासाठीच होते नंतर मात्र बिसलेरी हे नाव पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर साठी जसे कोलगेट म्हण्जे पेस्ट आणि जेसीबी म्हणजे बॅकहोलोडर्/बुलडोझर तसे कॉमन नेम झाले. आजही हॉटेलात साधे पाणी की बिसलेरी आअच प्रश्न विचारला जातो. भले बिसलेरी म्हणल्यावर येणारे पाणी लोकल सप्लायरचे स्वामीअ‍ॅक्वा किंवा बिस्लेनी असेल पण म्हणणार बिसलेरीच. वीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चनने सेटवर बिसलेरी मागितले असता कशाबशा ४ बॉटल आणण्यात आल्या तेंव्हा साहेब बिसलेरीने आंघोळ करतात असे सुनावल्याचे गॉसिप वाचनात आले होते. काही काळापुरते बीआयएस ने बिसलेरीचे लायसन्स सस्पेंड केले होते. तेंव्हा सपोर्टिव्ह ब्रॅन्ड बेलीज. बेलीज आता एक्स्ट्रा अ‍ॅडेड मिनरल वॉटर पण फुल्ल पैसे लावून विकते. पार्ले ने बिसलेरी पहिल्यांदा काच, नंतर पीव्हीसी मग पेट बॉटल्स मध्ये वितरीत करुन जम बसवला पण त्यांना चक्क ४०० टक्के ग्रोथ मिळाली ती अर्धा लिटरच्या बॉटल मार्केटमध्ये उतरवून. पार्ले अगदीही काही कोक किंवा पेप्सीमुळेच गाळात गेले नाही. चौहान फॅमिलीत अंतर्गत वाद बरेच होते. त्रिभाजन ही झाले. बिस्कीट कन्फेक्शनरी वाले पार्ले प्रॉडक्ट्स फ्लॅगशिप पार्ले जी, क्रॅकजॅक, मोनॅको, २०-२० अशी बिस्कीटे करत चौकलेट, हिप्पो सरखे बेक्ड स्नॅक्स, वॉफल्स अशा बर्‍याच धंद्यात आहेत. पार्लेचा पार्ले अ‍ॅग्रो ह्या अपत्याचा लार्जेस्ट सक्सेस हा फ्रुटी होता. आजही ते भारतातले लार्जेस्ट सेलिंग मँगो ड्रिंक आहे. अ‍ॅपे फिझ्झ सोबत पिनाकोलाडा, ढीशूम नावाचा जिरा सोडा आणि बरेच सॉफ्ट ड्रिंक ब्रँड पार्ले अ‍ॅग्रो सतत आणत असते. पार्ले बिसलेरी मात्र पाणि आणि सोडा इतकेच करतही जोरात धंदा करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sat, 03/12/2022 - 04:36 नवीन
बिसलेरी उगमस्थळ अन आडनाव क्लेरिटी बद्दल आभार, बिसलेरीनं हल्ली काढलेल्या उंट वाल्या ऍड मस्तच आहेत एकदम, आजच सकाळी वापीला कस्टमरकडे जाताना गाडीतून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरून बिसलेरी दिसले अन एकदम आठवले तुम्हाला पोच देणेच बाकी उरले होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
ज
जेम्स वांड Sun, 02/27/2022 - 13:20 नवीन
आईस्क्रीम सोडा हा पारशी टच पेयाचा प्रकार फक्त आर्देशीर नाही तर मुंबईत विकला जाणारा पालनजी पण बनवतो. आईस्क्रीम सोडा हा वेगळा काही नसून साखरेच्या पाण्यात व्हॅनिला इसेन्स आणि कार्बनडायऑकसाईड मिसळून बनवला जातो. ह्या धंद्यात फक्त पारशी टिकेलेले नाहीत तर कदाचित एकुलते एक उदाहरण असल्याप्रमाणे ज्युईश ब्रँड पण आहे एक, त्याचे नाव डी सॅमसन्स सोडा असे आहे, अलिबाग जवळ पालीला त्यांची फॅक्टरी आणि आऊटलेट असून ते ठिकाण सोडून इतर ठिकाणी त्याची विक्री झालेली मला तरी दिसली नाही आजवर, कोकणात किंवा अलिबागला फिरायला वीकएंडला वगैरे जाणारी पर्यटक मंडळी आजही त्यांच्या दुकानाला आवर्जून भेट देतात, आईस्क्रीम, पाईनऍपल, रासबेरी असे अनेक फ्लेवर्स डी सॅमसन्स सोडा बनवत असतात, डॅनियल सॅमसन दिगोडकर नावाच्या ज्युईश किंवा ज्यांना कोकणात शनिवार तेली म्हणतात (त्यांच्या पिढीजात तैलिक व्यवसाय व शनिवारी शाब्बाथ पाळण्याच्या परंपरेमुळे) १९३८ साली ही सोडा कंपनी स्थापन केली होती आणि आजही ती सुरू आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 02/27/2022 - 14:16 नवीन
कोकणा वरून आठवले , कोणी कोकम सरबताचे कार्बोनेटेड पेय बनवले आहे का? जसे जलजिरा बनवले होते आणि हो यात रसना चा उदय ( tang येण्याआधी होते ) कसा झाला हा पण एक महत्वाचा भाग आजकाल चाय काळात मूळ ऑस्ट्रेलियन "बूस्ट जूस" भारतात ज्यूस्ट या नावाने उदयाला आली ( बूस्ट नाव आधीच वापरात असल्याने त्यांना भारतात प्रवेश करताना जुस्ट असे बदलावे लागले !) या शिवाय आरे चे मसाला दूध विषय मस्तच आहे , आता राष्ट्रीय पातळीवरचे भारतीय - मिठाई , गोड/ खरे ( पार्ले जी , बिकानेर आणि हल्दीराम , ब्रिटानिया बॉरबॉन - दारू ( मोहन मेकी न , युनायटेड ब्रुअरीस - चीज ( अमूल ) - दूध - याचा इतिहास असा हि एक लेख येऊ द्या
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/28/2022 - 08:45 नवीन
कोकमात खूप पोटेंशियल असूनही इतर फळांच्या मानाने कोकमाचे एकूणच शीतपेय, टिकाऊ हवाबंद / बाटलीबंद पण पिण्यास तयार (रेडी टू ड्रिंक) असे प्रकार फार कमी आले आहेत. कोकम म्हणजे मुख्यत: कोन्सेन्ट्रेट सिरप असेच बघण्यात येते. काहीतरी रासायनिक मर्यादा असू शकेल. पण नक्की कल्पना नाही. लेख उत्तम आहे. लेखात उल्लेख केलेला आर्देशीर हा पुणे क्याम्प फेम प्रकार आवर्जून शोधून टेस्ट केला होता पूर्वी. नंतर अनेकदा पुन्हा पुन्हा वेगळाले फ्लेवर ट्राय केले. पण एखादा फ्लेवर वगळता हे ओव्हरहाईप्ड / ओव्हररेटेड प्रकरण वाटले. पांचट आणि अति कृत्रिम. लाल रंगाचे एक पेय आकर्षक दिसते पण तेही तसेच पांचट. क्याम्प एरियातले फेरीवाले सोडावाले यांचा सोडा वापरतात. बाकी कुठे फारसा दिसत नाही. या भागात दोराबजी वगैरे काही जुन्या रेस्टॉरंटसनी ही आर्देशीर शीतपेये आवर्जून ठेवलेली दिसतात. पण त्यात नोस्ताल्जिया हाच मुख्य यूएसपी असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सुरिया Mon, 02/28/2022 - 10:15 नवीन
दिवेआगारला एका समुद्रकिनार्‍यावरच्या विक्रेत्याने कोकम सोडा की प्लेन असे विचारुन कोकम सिरप मध्ये प्लेन सोडा घालून दिले होते. अर्थात छान लागले. घरीही हा प्रयोग नेहमीच होतो. पण हे सोडा मिक्स करुन बॉटल्ड अवतारात विकण्यात काहि अडचणी असाव्यात. अर्थात शुगर बेस्ड सिरप मिळतेय त्यामुळे बनवणे सोपे आहे पण टिकण्यातल्या आडचणी असाव्यात. गोटी सोड्यात सोडा आणि लेमन असे दोन फ्लेवर असायचे. प्लेन सोडा हिरव्या बॉटलमध्ये तर लेमन हे ट्रान्स्परंट किंवा किंचित पिवळट बॉटलमध्ये असायचे. लेमन चा कलरही फिक्का पिवळा असायचा. जंजीर म्हणून सोडा मिळायचा. अर्थात तो जिंजर फ्लेवर्ड असायचा पण त्याचा बच्चनप्रेमी जंजीर अपभ्रंश त्या सोड्याइतकाच सॉलिड होता. पिताच पोट गुडगुड करायला लागायचेच तस्मात घराजवळच पिणे बरे असायचे. ता.क. गोटी सोड्याच्या बाटलीतली गोटी गस्टल, कॅन्टर म्हणून गोट्या खेळताना वापरायची बोत होती. लगेच फुटाय्ची नाही. ह्यासाठी अजुन एक पर्याय मार्बल गोटी म्हणून असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुरिया Mon, 02/28/2022 - 10:20 नवीन
सोडा वॉटरच्या बाटली फोडून त्याच्या काचेचा भुगा हा पतंगीच्या मांज्यासाठी सर्वात घातक मटरेल होते. सरस पघळवून त्यात हा काचेचा भुगा आणि थोडा कलर घातलेला मांजा तयार करणे हा सुट्टीतला गच्चीद्योग असायचा. पूर्वी देशी दारु दुकानात सोड्याच्या बाटल्या हारीने लावून ठेवलेल्या असत. त्याच्या जाड काचा, गोटी आत जायची आणि सोड्याच्या प्रेशरने सील होण्याची युनिक डिझाईन हा फारच कुतुहलाचा विषय होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
स
सर टोबी Sun, 02/27/2022 - 14:28 नवीन
पंधरा वर्षापूर्वी पर्यंत महिमला, राजा बढे चौकात आइस्क्रीम सोडा मिळायचा. आता पण मिळतो की नाही त्याची कल्पना नाही. एकूणच मुंबईच खूप अनोळखी वाटते आता. दोन वर्षापूर्वी गडकरी चौकातल्या आस्वाद मध्ये जावं म्हणून तिथे गेलो तर ते लांब कुठेतरी गोखले रोडला गेल्याचं समजलं.
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sun, 02/27/2022 - 16:17 नवीन
माहीतीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/28/2022 - 06:08 नवीन
ठंडा मतलब टॉयलेट क्लिनर रामदेव बाबांनी केलेल्या या प्रचारामुळे सुध्दा बरेच लोक प्रभावीत झाले होते. बहुतेक ती जाहिरात नंतर बंद करण्यात आली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/28/2022 - 08:10 नवीन
लै भारी थम्सप्प लेख ! Image removed. शीतपेयांमधलं फक्त थम्सपच आवडलेलं, लहानपणी बर्‍यापैकी पिलं. पेप्सीने पार्ले घेतल्यावर (पेप्सीसारखंच) पांचंट करुन टाकलं होतं , तेव्हापासून बंद करून टाकलं. आता अधून मधून थम्सप पितो, पांचंटपणा कमी झाल्यासारखा वाटतोय !
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 02/28/2022 - 10:36 नवीन
लहानपणी क्रिकेट मॅच टीवी वर बघताना ( दुसर्यांच्या घरी जाऊन.खाली जमीनीवर फतकल मारुन बघायची संस्कृति असतानाच्या दिवसात). ड्रिंक्स ब्रेक ला थम्पअप गोल्डस्पॉट ची जाहीरात असलेला एखादा ठेला मैदानात यायचा. त्यावेळेला आम्हा सर्व मुलांना असे वाटायचे कि तेव्हा हे क्रिकेटर्स हे असेच शीतपेये पीत असावेत. त्यामुळे क्रिकेटर होण्याच्या इच्छेमागे असे मनसोक्त कोल्ड्रींग (कोल्ड्रींक नव्हे) पिता येणे हा ही एक हेतु असायचा.
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Mon, 02/28/2022 - 16:05 नवीन
आईस्क्रीम सोडा, मसाला सोडा आता प्रत्येक गावात बनते, ही लोकल कोल्ड्रिंक्स काही वर्षांपूर्वी गावात लग्नांचा अविभाज्य भाग बनली होती, आता प्रमाण कमी झालेय, आता आईस्क्रीमनी बाजी मारलीय.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 03/02/2022 - 13:36 नवीन
पेप्सी व कोला या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणायचे गमतीशीर कामही भारतीय बाजाराने केले होते !! ह्या चित्रात दिसणारा हे पेय (!!) पेप्सीकोला नावाने पुर्वी शालेय विद्यार्थ्यांत लोकप्रिय होते. अगदी २५ वा ५० पैशांचा लहान्/मोठा पेप्सीकोला मिळायचा. आता मिळतो की नाही माहित नाही.. पण मोठ्या शहरांत तरी बहुधा असले जुगाड आता फारसे चालत नसावेत. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/03/2022 - 07:54 नवीन
येस, पेप्सीकोला सुपर हीट होता (अजुनही खेड्यापाड्यात चालतो) जसजशी नवनविन सॅचेट फूड्स् यायला लागली तशी याची क्रेझ कमी होत गेली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Fri, 03/04/2022 - 15:08 नवीन
Thums Up becomes a billion-dollar brand Read more at: https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/food/thums-up-becomes-a-billion-dollar-brand/articleshow/89486419.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/04/2022 - 15:21 नवीन
यात मी वाचलेली एक अजून कहाणी आहे. कोका कोला भारतात आला त्यावेळेस (१९९०-९१) भारताची अर्थव्यवस्था गाळात गेली होती आणि पार्लेच्या चौहान याना सुद्धा आर्थिक निकड होती. त्याच वेळेस कोका कोलाने त्यांचा गळा आवळला होता. त्यामुळे पार्ले ने आपला शीतपेयांचा व्यवसाय कोका कोलाला विकण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस श्री रमेश चौहान यांनी कोका कोलाला अट घातली कि आमच्याकडे जितके थम्सअपचे काँसंट्रेट आहे तेवढे तुम्ही विकत घ्यायचे कोका कोलाला वाटले असून असून किती असणार एक वर्षापुरते. परंतु श्री चौहान यांच्याकडे पाच वर्षे पुरेल इतके थम्सअपचे काँसंट्रेट होईल त्यामुळे कोका कोला ला पुढची पाच वर्षे थम्स अप विकावे लागले. हे काँसंट्रेट विकून श्री चौहान यांनी ६ कोटी डॉलर्स शिवाय अतिरिक्त नफा सुद्धा कमावला. या कालावधीत लोकांना कोका कोला पेक्षा थम्स अपच जास्त आवडले यामुळे नाईलाजाने आपलया कोका कोला बरोबर त्यांना थम्स अप चालू ठेवणे भाग पडले.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 03/04/2022 - 16:32 नवीन
पाच वर्षाची बेगमी करून ठेवणे आणि त्या स्टॉकच्या मुद्दलावर व्याज भरत बसणे किंवा मुद्दल अडकवून ठेवणे आणि आपण काय विकत घेतोय याची कोका कोला कंपनीला कल्पना नसणे हे काही पचनी पडत नाहीय. किस्सा तुमचा नाहीय याची मला कल्पना आहे पण कुठल्या गोष्टीला आपण मान डोलवतो तो तरी आपला निर्णय असतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेम्स वांड Sat, 03/05/2022 - 04:11 नवीन
कोकाकोला सारख्या ट्रान्सनॅशनल सोडा/ फिझी ड्रिंक्स निशे (niche) असणाऱ्या कंपनीला पार्ले सारख्या कंपनीज मर्ज अँड एकवायर करून घेताना त्यांच्या पेंडींग स्टॉकची किंवा मटेरियल इन्व्हेंटरीची कल्पना नसेल हे पचनी पडणे थोडे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सुबोध खरे Sat, 03/05/2022 - 05:33 नवीन
मला हि सुरुवातीला हीच शंका होती. परंतु कोका कोलाला थम्स अप विकत घेतल्यावर ते चालू ठेवण्याचे काय कारण असावे? ते सुद्धा स्वतःच्या कोका कोला या उत्पादनाशी थेट स्पर्धा करणारे? आपल्याच पायावर कुर्हाड मारण्याचे काम कोका कोला कंपनी का करेल? त्यांनी थम्स अप बंद केले असते आणि केवळ कोका कोलाच ठेवले असते कि. म्हणजे मग जगभर जे सर्वात खपणारे उत्पादन आहे त्यापेक्षा इथले स्थानिक उत्पादन जास्त लोकप्रिय आहे हा कलंक माथी लागला नसता पण त्यांच्या गणितापेक्षा चौहान जास्त हुशार निघाले हि वस्तुस्थिती. बाकी विश्वास ठेवायचा कि नाही हा आपला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सर टोबी Sat, 03/05/2022 - 06:10 नवीन
आपले उत्पादन हे स्थानिक आवडी निवडीनुसार घडवावे लागते. Domino's किंवा पिझ्झा हट चे पिझ्झा आणि क्वालिटी वालस्सची आइस्क्रीम मध्ये कुल्फी आणि केशर तसेच सुकामेव्याचा वापर केलेली उत्पादने हेच दर्शवतात. विलिनीकरण हे नेहमीच एका उत्पादकाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नसते. आपल्या उत्पादनाला अधिक विविधता देणं आणि अधिक मोठी तयार बाजारपेठ मिळविणे हाही उद्देश असतो. आता बघुया पार्ले च्या उत्पादनाचं खच्चीकरण करण्याच्या उद्दिष्टाकडे. लिंबू सरबत आणि संत्रा सरबत सदृश लिम्का आणि गोल्ड स्पॉट संपवणं हे तुलनेनं सोपं होतं. या उत्पादनांना स्थानिक पातळीवर एकनिष्ठ असणारा ग्राहक आहे. पण मद्य आणि पिझ्झा बर्गर प्रेमिंमध्ये असणारी थमस् अपची क्रेझ त्यांना थांबवता आली नाही. आज काल मार्केटिंग किंवा इतर विषयांवरील सल्लागार तज्ञ आपली प्रेझेंटेशन चटपटीत करण्याच्या नादात काही कल्पित किस्से तयार करीत असतात. हा तसाच प्रकार असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा