तो शहाणा होतोय....
एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते. (अशाच एका आधीच्या जाहिरातीत ती गृहिणी गायिका असते.) विशिष्ट खाद्यतेल वापरल्याने स्वयंपाक "लवकर" कसा काय होतो आणि गायन, नृत्यादी कला जोपासण्यासाठी वेळ कसा काय मिळतो हे मला कळले नाही.
त्या जाहिरातीत एक वाक्य आहे"आईची जागा फक्त स्वयंपाकघरात नाही". म्हणजे काय चातुर्य पाहा! तिनं स्वयंपाकघर सोडून नव्हे तर सांभाळून शिवाय नृत्यही करायचं.(आणि फक्त चार माणसांसाठी भदाडभर पदार्थ करायचे.) शेवटी जाहीरातच ती. ती एवढ्या सिरियसली घ्यायची नाही, असं मी ठरवते.
मग मला जाणवतं की अलिकडे बरेच पुरुष घरातल्या स्त्रियांना स्वयंपाकात आणि इतर कामात मदत करतात. अशा पुरुषांची संख्या कमी आहे पण नगण्य नाही. शहरात तरी. त्यामुळे स्त्रियांची कामं हलकी होतात. अनेक स्त्रिया त्यामुळे स्वतःचं करियर करु शकतात.
संसाराच्या रामरगाड्यात स्त्रीला स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडी, छंदाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नाही हे खरे,पण पुरुषांना तरी असा वेळ कुठे मिळतो? नोकरीच्या चक्रात अडकलेला पुरुष त्याची इच्छा असली तरीही आपला विशिष्ट खेळ खेळण्याचा, विशिष्ट वाद्य वाजवण्याचा जोपासू शकतो का? त्याच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला जातोच. त्यालाही करियरकडे लक्ष देता येत नाहीच. दिवसभर काम करून तोही थकून जातो. अगदी शारिरीक श्रम नसलेल्या नोकरीतही लॅपटॉपवर दिवसभर खिळवलेले त्याचेही डोळे दमतातच. त्यानंतर पती येण्याच्या वेळेला सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करु न शकणाऱ्या गृहिणी प्रमाणे त्याचीही अवस्था होते. तो पत्नीपुढे हसऱ्या चेहऱ्याने आणि सर्व नीटनेटके आवरलेल्या अवस्थेत नाही जाऊ शकत! तिला जशी रविवारची सुट्टी एन्जॉय करता येत नाही,कारण घरातली कामं असतात. तशी त्यालाही रविवारी घरातली कामं असतात. इलेक्ट्रिशियनला बोलवा,प्लंबरला बोलवा त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना हवं असलेलं सामान मार्केटमध्ये चौकशी करून आणून द्या. पत्नीला, मुलांना संध्याकाळी फिरायला न्या. बाहेरच जेवा. या सगळ्यात रविवारी पूर्ण आराम जशी गृहिणी करु शकत नाही तसाच तोही करु शकत नाही. पत्नीला पसंत नसेल, तिला तिथं कंटाळा येत असेल तर अनेक जणींचे पती आताशा मित्रांकडेही नाही जात असं दिसतं..!
आजचा सुधारलेला, समजूतदार पुरुष घरातली अनेक कामं सुट्टीच्या दिवशी करताना दिसतो. घराची साफसफाई, उंचावरची जळमटं काढणं, मशीनमध्ये जास्तीचे कपडे धुणे, गरज असल्यास डॉक्टरकडे व्हिजिट, किराणा माल आणणं, अशी कितीतरी कामं तो करतो. त्याला तरी फुरसत मिळते का? पण स्त्रियांकडे करुण नजरेने पाहायचं, तिच्यावर दया दाखवायची, तिला अनुकंपेचा विषय बनवायचं अशी आपल्याला सवय लागली आहे. ती घरादारासाठी कष्ट उपसते, तसा तोही आपल्या कुटुंबासाठी ,कच्च्याबच्च्यांसाठी कष्ट उपसतोच. आपली पत्नी नोकरी करून पैसे कमवून आणते याची आजच्या शहाण्या पुरुषाला जाणीव आहे. आजचा नागर, सुशिक्षित पुरुष बदलत चाललाय. समजूतदार, सहिष्णु होत चाललाय, हा बदल हळुहळू पण निश्चितच घडतोय. त्याचं स्वागत करायला हवं.
माझ्या बघण्यात तर अशीही जोडपी आहेत जिथं पत्नी मिळवते आणि पुरुष घर सांभाळतो. मुलांकडे लक्ष देतो. काही सेलिब्रिटीजमध्येही अशी उदाहरणं आढळतात. बायको आजारी असेल तर नवरा तिची सेवा करताना दिसतो. मुलांचीही आजारपणं तो काढतो. त्यांचा अभ्यास करून घेतो. तो पालकसभांना जातो. त्यांच्या शाळेतल्या इव्हेंटसना जातो. आमच्या काळी आपली मुलं कितवीत आहेत हे वडिलांना माहीत नसायचं.
आजकाल IT इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना रात्री अपरात्री सुद्धा काम करावे लागते. पती-पत्नी निवांतपणे एकमेकांना भेटूही शकत नाहीत. तरीही ते एकमेकांना सांभाळून घेतात.ॲडजस्ट होतात. को ऑपरेट करतात. आळीपाळीने स्वयंपाक करतात. एकमेकांचा आदर करतात. कदर करतात. भावना जपतात. यात पुरुषही काही काळापूर्वी होता तसा मुक्त मोकळा नाही. तोही अडकलेला, जखडलेला आहे. स्त्रीइतकाच!
अर्थात भारत देशातल्या अनेक खेड्यापाड्यातील अशिक्षित, असंस्कृत जनतेमध्ये स्त्री-पुरुष नातं असं बरोबरीचं नाही याची प्रखर जाणीव मला आहे. दारु पिऊन मारणे, छळ करणे, जिवंत जाळणे, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या असे प्रकार घडतात, हे दुर्दैवाने खरे आहे. त्याबद्दल दुःख होतं. आपण त्यात बदल घडवून आणू शकत नाही. फार तर एखाददुसऱ्या स्त्रीला मदत करु शकतो. ही स्त्री वरील आणि पुरुषावरीलही अन्यायाची समस्या फारच जटिल आहे. तो एखाद्या लहानशा लेखाचा विषय नाही. ह्या समस्येला अनेक बाजू आहेत. आपल्या खंडप्राय देशातलं दारिद्रय आणि अज्ञान घनघोर आहे. पण ही परिस्थिती कायम राहणार नाही. ती बदलेल. काही दशकांत बदलेल. हा विश्वास आजचा शहाणा आणि सुसंस्कृत पुरुष आपल्याला देतो. स्त्रीप्रतीची ही सहिष्णुता समाजातील निम्न स्तरातील पुरुषांपर्यंतही झिरपेल. झिरपावी. तथास्तु!
💕
हे विशेष भावलं ! दोन्ही व्यक्ति समजून घेण्यार्या असतील, एकमेकाना योग्य ती मदत करत असतील तर तिथे समाधानासह आनंद नांदत असतो !या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही.आणि सबळ झाल्यावर स्त्रियांनी पुरुषांशी कसे वागावे याचादेखील बराच अभाव आहे. बाकी लेख आवडला. बाकी लेख आवडला