विराट कोहली: फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई संघांच्या अपयशानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची ...२०२२ च्या आयपीएल मध्ये कोहली पहिल्या १३ सामन्यांमध्ये ५ वेळा १० पेक्षा कमी धावा काढून बाद झाला, ३ सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियन मध्ये परतला. तेरा सामन्यांत त्याने १९.६७ च्या सरासरीने २३६ धावा काढल्या. यादरम्यान तो एकदाच अर्धशतकी पल्ला गाठू शकला. हे सर्व आकडे विराट कोहलीने गेल्या १०-१२ वर्षात जे काही पराक्रम केलेत त्यापुढे एकदम तुच्छ वाटत होते. माजी खेळाडू, क्रीडा पत्रकार, क्रिकेटप्रेमी असे सर्वचजण कोहलीला विश्रांतीचा सल्ला देत होते. आयपीएल पाठोपाठ भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा आणि बीसीसीआय सोबतचं शीतयुद्ध यानंतर कोहली मानसिकदृष्ट्या थकलेला वाटत होता. विराटचा चाहता म्हणून हे सर्व पाहताना खूप वाईट वाटत होत...
या तेरा सामन्यात विराटवर क्रिकेटच्या सगळ्या देवांबरोबरच त्याचं नशीब पण त्याच्यावर रुसल होत बहुतेक... ते म्हणतात ना माणसाच्या खराब काळात त्याची सावली देखील त्याची साथ सोडते.. तसच काहीस झाल होत विराटच्या बाबतीत. तो कधी धावचीत व्हायचा, कधी बाहेर जाणारा चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हाती जायचा, तर कधी एखादा साधा झेल देऊन तो बाद झाला. प्रत्येक सामन्यात बाद व्हायचा नवा प्रकार तो शोधून काढायचा.
पण काल मैदानात प्रेक्षकांना जुना विराट कोहली पाहायला भेटला. अगदी सुरवातीपासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याला "किंग ऑफ क्रिकेट" का बोलतात हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. गुजरातविरुद्व झालेल्या महत्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराटची बॅट चांगलीच तळपली. काल कोहलीने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५४ चेंडूत ७३ धावा केल्या. त्याचा strike rate होता १३५.१९.
कालच्या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्व मस्त फलंदाजी केली. गेल्या २-३ वर्षात तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध सांभाळून खेळायचा प्रयत्न करायचा पण कालच्या सामन्यात त्याने ज्याप्रकारे रशीद खान ला २ खणखणीत षटकार लगावले त्यावरून त्याने फिरकीविरुद्धचा आपला पवित्रा बदलला आहे आहे हे दिसून आल. त्याचबरोबर त्याचा फुटवर्क आणि आखूड टप्प्याच्या चेंडू विरुद्धची बदललेली रनरीती स्पष्ट दिसत होती.
आणखी एक गोष्ट म्हणजे याआधी कोहली कोणतही दडपण न घेता बिन्दास्त फटकेबाजी करायचा पण गेल्या वर्षभरात त्याच्यातला आक्रमक खेळाडू कुठेतरी गायब झाल्यासारखा वाटत होता, त्याच्या देहबोलीतूनही हे प्रकर्षानं जाणवत होत. पण काल प्रेक्षकांना विराटच आक्रमक रूप पुन्हा पाहायला मिळालं, ज्याप्रकारे चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा अर्धशतकानंतर कोहली सेलीब्रेशन करत होता ते पाहताना भारी वाटत होत.
विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू फॉर्म मध्ये आला ही भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. २०२२ च्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T-२० विश्वचकामध्ये त्याची भूमिका महत्वाची राहणार आहे..त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील.....
धन्यवाद ....!!
त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील.....तथास्तु! त्याच्या बरोबरीने रोहीत शर्मा व बुमराह हे सुद्धा पुन्हा एकदा फॉर्मात यावे हीच प्रार्थना _/\_.