पृथ्वीचे शत्रू
‘No matter what we do, an asteroid is going to wipe us out. So we should party hard and wreck the place!’ – to which Homer replies: ‘Yeah, why should the asteroid have all the fun?’
पृथ्वीची सध्याची (साल २०२०) लोकसंख्या आहे ७९६ कोटी आहे.
लोक बिंदास जीवन जगतायेत.
बिंदास जीवन जगायला माझी काही हरकत नाही. मी कोण हरकत घेणार? कृपया गैरसमज नसावा. मला एवढेच म्हणायचे आहे कि आपला, आपल्या संस्कृतीचा, आपल्या या सुंदर धरतीचा विनाश अटळ आहे. तो कदाचित पुढील दहा वर्षात होऊ शकेल किंवा अजून लाखो वर्षात देखील होणार नाही. कोण आहे असा शत्रू जो आपल्या भोवती घिरट्या घालत आहे? कोविड? प्लेग? भूकंप? हवामान बदल? छ्या. ह्या असल्या चिल्लर गोष्टींना मानव घाबरणार नाही. आमचे हुशार शास्त्रज्ञ ह्यावर सहज मात करतील. अगदी आत्ताच आपण कोविडला पुरून उरलो. आणि आपण काही डायनास्रॉर इतके मूर्ख नाही आहोत. किंवा पॉंपी शहराच्या रोमन नागरीकांसारखे अनभिद्न्य नाही आहोत. त्या बिचाऱ्यांना वेसुविअस ज्वालामुखीचे रौद्र स्वरूप माहित नसावे. पण आता प्रगत विज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ ज्वालामुखीच्या उत्पाताच्या वेळेचे भविष्य करू शकतात.
मग कोण आहेत आपले हे शत्रू?
जरा समजून घेउया.
अजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥
Virtuous men go about collecting knowledge and wealth as if they will live for ever. When it comes to following Dharma, they never procrastinate. They perform their duties as if death is holding them by their hair.
कोण आहेत हे पृथ्वीच्या जिवावर उठलेले?
ते आहेत धुमकेतू, लघुग्रह आणि उल्का.
पुरातन काळी—सध्या देखील-- माणसं धूमकेतूला घाबरत होती/घाबरतात. चायनीज खगोलशास्त्रींनी त्यांना दिसलेल्या धूमकेतूंची सविस्तर माहितीची नोंद करुन ठेवली. त्यात धूमकेतूंची चित्रे, त्यांच्या शेपट्यांची चित्रे, त्यांच्या आगमनाचं आणि गमनाचं वेळापत्रक आणि आकाशातील त्यांची स्थाने इत्यादी माहिती होती. अश्या नोंदींचा पुढच्या पिढीच्या शास्त्रज्ञांना खूप फायदा झाला.
धुमकेतू म्हणजे ४.६ बिलिअन वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या सूर्यमालेची निर्मिती झाली तेव्हा राहिलेले—वापरलं न गेलेलं सामान सुमान, राडा रोडा, मलवा. इमारतीचे बांधकाम झाल्यावर सळया, भंगार सिमेंटची पोती, वाळू वगैरे पडीक समान राहते तस.
काही मोठ्या उल्का वातावरणातून येताना पूर्ण जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतात. अशा अपार्थिव पदार्थांना अशनी म्हणतात. उल्कांच्या मानाने अशनींची संख्या अल्प असते, कारण बहुसंख्य उल्का वातावरणातच जळून जातात. पृथ्वीवर त्या क्वचितच आढळतात.
पण अश्या विशाल उल्का जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन आदळतात तेव्हा त्या जागी मोठा खड्डा तयार (Crater) तयार करतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशी बरीच क्रेटर निर्माण झालेली आहेत. अमेरिकेतील अरिझोना येथील क्रेटर प्रसिद्ध आहे. फ्लॅगस्टाफ शहराच्या जवळ असलेल्या ह्या क्रेटरचे नाव आहे बॅरींजर क्रेटर. सुमारे ५०००० वर्षांपूर्वी ५० मीटर व्यासाच्या अशनीपाताने हा खड्डा निर्माण झाला. हा खड्डा १.२ किलोमीटर लांब आणि २०० मीटर खोल आहे.
महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे लोणारचे सरोवर ह्याची निर्मिती सुद्धा एका उल्कापातामुळेच झाली.
वाचकांना कदाचित अतिरंजित वाटेल पण लघुग्रह आणि धूमकेतू ह्यांच्यामध्ये पृथ्वीवरील जीवनाचा समूळ नाश करायची शक्ति आहे, पृथ्वीला सगळ्यात जबरदस्त धक्का देणारा प्रसंग ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी घडला. एक उल्का/लघुग्रहा पृथ्वीवर येऊन आदळला, ज्या ठिकाणी ही टक्कर झाली त्या जागेचे नाव आहे “चिक्स्ललब खड्डा - Chicxulub crater—अस आहे. हे क्रेटर मेक्सिको मधल्या युकातान प्रदेशात आहे. ह्या उपग्रहाची लांबी/रुंदी १० ते १५ किलोमीटर असावी. ह्या आघाताने पडलेल्या खड्ड्याचा व्यास १५० किलोमीटर आहे. ह्या आघातामुळे प्रचंड प्रमाणात धुराळा पृथ्वीच्या वातावरणात उडाला. जिथे हा अपघात झाला त्या जागेवरील आणि त्याच्या खालील खडक आणि तो लघुग्रह ह्यांची वितळून वाफ झाली!!
पृथ्वीच्या वातावरणात लाखो टन भूळ फेकली गेली. त्यामुळे सूर्य पूर्णपणे झाकला गेला अस म्हणता येणार नाही, पण सूर्यापासून येणारा प्रकाश आणि अर्थात सौरउर्जा ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली. हळू हळू झाडे झुडपे नष्ट होऊ लागली. आणि त्याच्यावर अवलंबून असणारे प्राणी. ह्या कालखंडात पृथ्वीवर महाकाय डायानासोर चे राज्य होते, त्यांच्या सह जवळपास पंचाहत्तर ते ऐशी टक्के प्राणी जीवन नष्ट झाले.
पृथ्वीच्या इतिहासातला एक अध्याय समाप्त झाला.
अशी टक्कर पुन्हा होऊ शकते का?
सूर्यमालेत हजारो लघुग्रह आहेत. त्यांच्या भ्रमणकक्षा पृथ्वीच्या भ्रमणकक्षेला छेदून जातात. केव्हातरी अशी वेळ येऊ शकते की एकमेकांशी टक्कर अनिवार्य होईल. हे धुमकेतूच्या बाबतीतही होऊ शकते. लघुग्रह आणि धूमकेतूंची काही कमतरता नाही. सूर्यमालेच्या कायपर पट्टा(The Kuiper belt) आणि ओर्टचा ढग(Oort cloud) ह्या ठिकाणी भरपूर लघुग्रह आणि धूमकेतू आहेत. जवळून जाणाऱ्या ताऱ्याच्या प्रभावाखाली येऊन ते आपले घर सोडून “बाहेरख्याली” होऊन सूर्याकडे आकर्षित होतात. आपल्या खराब बॅडलक मुळे त्यांची आणि आपली जीवघेणी गळाभेट होऊ शकते.
मी सांगतो आहे ते खर वाटत नसेल तर चंद्राकडे पहा, चंद्रावर जी असंख्य विवरं, डोंगर, आणि काळे डाग दिसतात ते उल्कापातांनी तयार झाले आहेत. पृथ्वीवर ते नाहीत त्याचे कारण आहे आपल्यावर असलेली
वातावरणाची कवचकुंडले. त्यामुळे उल्का लामिनीवर पोहोचण्याआधी हवेत जळून जातात. अगदी अलीकडे झालेली शूमाकर लेवी-९ धुमकेतू आणि गुरू ग्रहाचीची प्रेक्षणीय फ्री-स्टाईल झटापट(१९९४मध्ये) सर्व प्रसिध्द आहे. त्याने गुरूला झालेल्या जखमा आजही आपण बघू शकतो. (https://en.wikipedia.org/wiki/Comet_Shoemaker%E2%80%93Levy_9)
आणि हा बघणीय विडीओ
(https://www.youtube.com/watch?v=gbsqWozEBBw&ab_channel=ScienceAtNASA)
कल्पना करा कि गुरूच्या जागी आपली पृथ्वी असती तर?
डायानासोरना नामशेष करणारा लघुग्रह १० किलोमीटर लांबीचा असावा. समजा एक किलोमीटर ok शंभर मीटर लांबीचा अशनी पृथ्वीवर आदळला तर? पृथ्वीवरचे संपूर्ण जन जीवन नष्ट होणार नाही हे निश्चित पण हा आघात दाट लोकवस्तीच्या शहरावर झाला तर? अरिझोना क्रेटर निर्माण करणारी उल्का केवळ पन्नास मीटर लांबीची होती! रशियातील तुनगुश्का(Tunguska) येथे आकाशातच स्फोट झालेली उल्का एवढ्याच आकाराची असावी. ती जमिनीवर पडली नाही. हवेत स्फोट झाल्यावर निर्माण झालेल्या अग्निगोलकाने तीस किलोमीटरच्या परिसरातील लाखो झाडांची आहुती घेतली. कल्पना करा की केवळ ३६०० किलोमीटरदूर असलेल्या मास्कोकडे ह्या उल्केने मोर्चा वळवला असता तर?
“अर्मागेडान”, “डीप इम्पॅक्ट” सारखे चित्रपट आपण पहिले असणारच. ह्यातील अवास्तव विज्ञानाकडे जरा दुर्लक्ष करूया. पण त्यातील मुख्य संकल्पना महत्वाची आहे. काळजीपूर्वक नियोजन करून आखलेली अवकाशयात्रा करून लघुग्रहांचा जागेवरच विनाश करणे आता प्रगत विज्ञानाच्या सहाय्याने शक्य आहे. त्या दृष्टीने पाउले उचलली जात आहेत.
त्याचा उहापोह पुन्हा कधीतरी.
जर आपण प्रेमकथा वाचून वाचून कंटाळला असाल तर माइंड फ्रेश करण्यासाठी आपले स्वागत आहे.
(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)
💬 प्रतिसाद
(20)
B
Bhakti
Fri, 07/15/2022 - 09:45
नवीन
भारी लेख.चांगली माहिती समजली.
लोणार तर कधीचा पाहायचा आहे.डिपार्टमेंटमध्ये लोणारच्या पाण्यावर कोणाचा तरी प्रोजेक्ट होता.
+१
- Log in or register to post comments
भ
भागो
Fri, 07/15/2022 - 11:50
नवीन
धन्यवाद भक्ती
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/15/2022 - 12:11
नवीन
लघु ग्रहांचा जागेवर विनाश करणे हा एक उपाय झाला त्या ऐवजी...
एखादी नवी इमारत बांधताना कशी बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावलेली असते. वरुन जे काही पडेल ते त्या जाळीत झेलले जाते. तसे काही आकाशात लावता येणार नाही का?
किंवा त्या लघु ग्रहाला नष्ट करण्या ऐवजी थोडेसे बाजुला ढकलुन द्यायचे म्हणजे तो पृथ्वीला कोणतेही नुकसान न पोचवता पुढे निघुन जाउ शकतो.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 07/15/2022 - 13:20
नवीन
जर पृथ्वीमध्ये अनेक किलोमीटरचे विवर बनवू शकेल असे काही पडणार असेल- म्हणजे ते तितके मोठे आणि तितक्या वेगाने येत असेल तर त्यापुढे संरक्षक जाळी कशी टिकणार? शाळेत असताना नेहमी वाटायचे की पाऊस इतका त्रास देतो (हे फक्त मुंबईच्या लोकांना वाटू शकते :) ) तर मग आकाशात पत्रे का लावत नाहीत म्हणजे पावसाचे पाणी जमिनीवर येणार नाही. त्याची आठवण झाली :)
बाकी पृथ्वीवर लघुग्रह वगैरे आपटून सगळी पृथ्वी नष्ट होणार असेल तर कधी ती तारीख सांगा. हे काही दिवसात/महिन्यात होणार असेल तर तोपर्यंत भरपूर धम्माल करून घेईन म्हणतो :)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/15/2022 - 13:33
नवीन
पण त्या वेगाने येणार्या वस्तुचा वेग कमी करु शकेल असे काहीतरी, जेणेकरुन ती वस्तु आकाशातच नष्ट न करता तशीच ठेवता येईल किंवा पुढे पाठवुन देता येइल,
आकाशात नष्ट करुन टाकणे अगदीच अप्रशस्त वाटले म्हणुन दुसरा काही उपाय असेल का ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत होतो.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 07/15/2022 - 13:37
नवीन
हो दुसरा काहीतरी उपाय असू शकेल.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sat, 07/16/2022 - 20:48
नवीन
तांत्रिकदृष्ट्या असं होईल की नाही किंवा असं होण्याचा दिवस आधीच समजेल की नाही हे मला माहित नाही. पण समजा असा दिवस आधीच समजला आणि तो विश्वसनीय सुत्रांकडून सर्व जगात प्रसिद्ध केला गेला आणि बहुसंख्य लोकांचाही त्यावर विश्वास बसला तर तो दिवस प्रत्यक्षात उजाडण्याआधीच काय हाहाकार माजेल त्याची कल्पना करवत नाही.
असाच विचार बहुसंख्य लोक करतील, सध्या असलेले पैसे त्या दिवसापर्यंत पुरतील तर कशाला काम करा असा विचार करुन बहुसंख्य लोक कामावर जाणार नाहीत.. अनेक कामे बंद पडतील. अगदी रुग्णालये, पोलिसदल , पाणीपुरवठा, अग्निशमन दल, व्यापारी, शेतकरी , मिडीया ई ई ई .. चोर, दरोडेखोर, बल्तकरी ई गुन्हेगार तेवढे सुटी घेणार नाहीत... पैसे असून तहानेने वा उपासमारीने मरण्याची वेळ येईल, कधी कोण घर लुटायला येईल अशी सतत भिती राहील.... बाप रे.. याहून अधिक कल्पनाही करवत नाही.. त्यामुळे पृथ्वी वा मानवप्रजाती नष्ट होणारच असेल तरी तो दिनांक शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तच रहावा..
- Log in or register to post comments
भ
भागो
Fri, 07/15/2022 - 14:22
नवीन
जाळी लावणे अशक्य आहे. वातावरणाची "जाळी" आपल काम चोख करत आहेच.
लघुग्रह जागेवर नष्ट करणे हा पर्याय शास्त्रज्ञांच्या यादीत शेवटच्या जागेवर आहे.
आपण सुचवलेल्या दुसऱ्या म्हणजे " दे धक्का" ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यावर लिहावे असा विचार आहे.
मध्यंतरात रुची आणि वेळ असेल तर हा विडीओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=3yacH2SIWts&ab_channel=ThePlanetarySociety
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 07/15/2022 - 13:31
नवीन
लेख आवडला.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 07/15/2022 - 14:20
नवीन
पृथ्वीला धोकादायक अशनी शोधून त्यावर काय पाऊल उचलता येऊ शकेल ह्यावर नासाचे संशोधन चालू आहे.
https://www.nasa.gov/feature/saving-earth-from-asteroids
- Log in or register to post comments
न
नीळा
Fri, 07/15/2022 - 16:05
नवीन
- Log in or register to post comments
न
नीळा
Fri, 07/15/2022 - 16:05
नवीन
यांची एक गोष्ट लहानपणी वाचली होती..असाच एक धुमकेतु किंवा अशनी आपल्या पृथ्वी वर आपटणारा असतो.....
मग रोकेट सोइ त्याचा मार्ग बदलला जातो
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 07/16/2022 - 09:34
नवीन
जयंत नारळीकरांच्या यक्षांची देणगी या पुस्तकात ही कथा आहे. कथेचं नाव आठवंत नाही.
-गा.पै.
- Log in or register to post comments
न
नीळा
Fri, 07/15/2022 - 16:05
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 07/15/2022 - 16:35
नवीन
आवडला
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 07/16/2022 - 14:42
नवीन
अवकाशात भटकलेल्या एखाद्या खडकाने पृथ्वीला धडक देऊन पृथ्वीला राहण्यास अयोग्य बनवणं, ही काही दशकोटी वर्षांत एकदा होणारी घटना असली, तरी अशी एकच घटना शेकडो कोटी वर्षांत विकसित आणि उत्क्रांत झालेले जीवन नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे.
म्हटलं तर भीतीदायक आहे.. म्हटलं तर नाही..
- Log in or register to post comments
भ
भागो
Sat, 07/16/2022 - 18:03
नवीन
दशकोटी वर्षांत एकदा होणारी घटना असली>>> नाही नाही. इतकी दुर्मिळ पण नाही. २०१३ साली झालेल्या घटनेचा हा विडीओ
पहा.
https://www.youtube.com/watch?v=dpmXyJrs7iU&ab_channel=Tuvix72
अगदी अलीकडे घडलेल्या घटनांबद्दल एक वेगळा लेख लिनार आहे.
NASA ने Planetary Defense Coordination Office (PDCO) उघडले आहे. केवळ पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 07/17/2022 - 05:07
नवीन
दशकोटी वर्षातून होणारी घटना हे chicxlulub सारख्या घटनांसाठी होतं ज्यांनी पृथ्वीवर तत्कालीन जीवांसाठी राहण्यास अयोग्य परिस्थिती निर्माण केली.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Sat, 07/16/2022 - 19:37
नवीन
अंतरिक्षात पृथ्वीची vulnerability दर्शविणारा विषय आहे.
खगोलशास्त्रात काही गती नाही पण उत्सुकता नक्कीच आहे.
अजून येऊ द्या.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sat, 07/16/2022 - 21:01
नवीन
Anti matter बनवण्याच्या आणि साठवण्याच्या तंत्रात विलक्षण प्रगती झाली तर कदाचित matter ने बनलेले लहान मोठे लघुग्रह अगदी काही ग्रॅम Anti matter ने ही सहज नष्ट करता येतील. Anti matter बनवण्याचे पुढील प्रयोग अंतरिक्षातच करणे श्रेयस्कर व सुरक्षित ठरतील कदाचित.
अर्थात Anti matter हा किचकट व गहन अभ्यासाचा विषय आहे... माझी फक्त तोंड ओळख झाली आहे या विषयाशी.
- Log in or register to post comments