कारगिल विजय दिवसाचे निमिताने
नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती. माझ्या पिढितल्या मंडळींसाठी हे युद्ध चांगलेच लक्षात राहिले कारण त्याआधी टिव्हिमिडियामधे कोणत्याही युद्धाचे या प्रमाणात प्रसारण झाले नव्हते. हे प्रसारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा निराळा आहे पण त्या प्रसारणामुळे माझ्यासारख्यांच्या मनात युद्धाच्या चित्रस्मृती (Visual Memory)जाग्या आहेत. जनरल मलिक, कमांडर पुरी, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन हनीफ, कॅप्टन बत्रा, सुभेदार योगेंद्र यादव अशी नावे सामान्य जनतेपर्यतं पोहचली.
मे महिन्यापासून घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. साधारण २५ मेच्या आसपास भारताने ऑपरेशन विजयची सुरवात केली आणि २६ जुलै रोजी भारताने या युद्धात पूर्ण विजय मिळविला. ९ ते १० जुलैच्या आसपास टोलोलिंग आणि टायगर हिल्सचा पूर्ण पट्टा भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यानंतर युद्ध भारताच्या बाजूने झुकले होते. ऑपरेशन विजयमधील विजय सोपा नव्हता, ५०० च्यावर सैनिकांना प्राण गमवावा लागला. या युद्धाच्या निमित्ताने दोन प्रश्न नेहमीच उपस्थित होतात
१. येवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली तर याची भारताच्या गुप्तहेर खात्याला कल्पना नव्हती का?
२. भारतीय सैन्याला या युद्धासाठी मोठी किंमत का मोजावी लागली. ?
पहिल्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. जनरल व्ही. पी मलिक असे म्हणतात की अशी कोणतीही माहिती सैन्यापर्यंत आली नव्हती. (Discovery: Tale of Valor)गुप्तहेर खात्याचे म्हणणे वेगळे असेल. या विषयावर नक्की भाष्य करणे कठीण आहे पण मी जे वाचले त्यावरुन एक लक्षात आले की घुसखोरी झाली अशी काही माहिती असली तरी त्यातून धोक्याची कल्पना येत नव्हती. किती सैनिक आहेत, त्यांच्या नक्की जागा कोणत्या, त्यांच्याकडे असणारी शस्रास्त्रे या सर्वांची पूर्ण कल्पना नव्हती. या घुसखोरीच्या स्वरुपाचा पूर्ण अंदाज हाती असलेल्या माहितीवरुन येत नव्हता असा निष्कर्ष कदाचित काढता येईल. तसेच जी माहिती होती त्याची खातरी करुन घेता आली नव्हती. यामागे सर्वात महत्वाचे कारण होते संसाधनांचा अभाव. सर्वेक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध नव्हती. आतासारखे सॅटेलाइट तंत्रज्ञान तेंव्हा विकसित व्हायचे होते. सर्वेक्षणाचा सारा भर हा मानवी सर्वेक्षणावर होता. तसेच भारतीय सैनिक त्याकाळी काश्मिर खोऱ्यात अतिरेक्यांविरुद्धाच्या विविध कारवायांमधे गुंतले असल्याने सीमेवरील काही सैन्य तिकडे हलवण्यात आले होते. या साऱ्याचा फायदा घुसखोरांनी घेतला.
दुसरा मु्द्याच्या बाबतीत साधारणतः तीन कारणे सांगितली जातात.
१. टायगिर हिल, टोलोलिंग, ५१४० , ४८७५, ५१९० टॉपही सारी उंच शिखरांची ठिकाण होती आणि भारतीय सैनिक त्याच्या तळाशी होते. शत्रू उंच डोंगरावर बसला असेल आणि तुम्ही खाली असाल तर त्यात तुमच्या सैन्याची हानी अधिक होते. शत्रू किती आहेत, त्यांच्याकडे शस्त्रांस्त्रांचा साठा किती आणि कशा प्रकारचा आहे याची कल्पना नसल्याने सुरवातीला इंनफँट्री युनीटचा वापर करुन भारतीय सैन्याने काही जोखीम असलेले हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आले.
२. कारगिलच्या युद्धात भारतीय वायुसेनेने देखील हल्ले केले. भारतीय वायुसेनेला सुरवातीच्या काळात तितकेसे यश मिळाले नाही. घुसखोरांचा आकडा, त्यांच्या नक्की जागा आणि त्यांच्या जवळ असणारी आयुधे याची पूर्ण कल्पना नसल्याने असे घडले. सुरवातीला बाँम्ब हल्ला करण्यासाठी विमानं बरीच खाली उडायाची त्यामुळे ती स्टिंगरच्या माऱ्याच्या अंतरात यायची. याचा फटका काही विमानांना बसला. एका विमानाचे इंजिन बिघडल्यामुळे पायलट नचिकेत राव यांनी POK च्या भागात उडी मारली आणि ते पाकच्या ताब्यात सापडले. अशाच एका उड्डाणाच्या वेळी पायलट आहुजा शत्रूंच्या हातात सापडले त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हळूहळू गोष्टी स्पष्ट होत गेल्या आणि भारतीय वायुसेनेने नंतर टारगेट हेरुन हल्ले केले. बटालिकच्या भागात वायुसेनेने केलेल्या हल्ल्यामुळे घुसखोरांचे मोठे नुकसान झाले.
३. जेंव्हा शत्रू शिखरावर आणि तुम्ही खाली अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळेला शत्रुची रसद तोडणे, वर असलेल्या शत्रूपर्यंत कोणतीही कुमक पोहचू न देणे त्यातून शत्रूला नामोहरम करणे अशी युद्धनीती असते. समस्या अशी होती शत्रूला मिळणाऱ्या मदतीचे मार्ग POK च्या भागातून जात होते. भारतीय सैन्याला LOC पार करु नये असे आदेश होते. तसेच काही मार्ग हे भौगोलिक दृष्टया भारतीय भागातून पोहचणे अशक्य होते. या साऱ्याचा परिणाम असा झाला की पाक सैन्य आणि भारतीय सैन्य आमने सामने असले तरी पाक सैन्य वर भारतीय सैन्य खाली असा प्रकार होता. बराचसा भाग थंड वाळवंटाचा असल्याने त्यात लपायला जागा नव्हत्या. त्यामुळे खालून वर चढणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला करणे पाक सैन्याला तुलनेत खूप सोपे होते. या साऱ्याचा विचार केला तर भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आणि शौर्याची पूर्ण कल्पना येईल. तरुण ऑफिसर आणि JCO यांनी या युद्धात फार महत्वाची भूमिका बजावली.
जसजसे घसुखोरांची संख्या, त्यांच्याकडे असलेला शस्त्रास्त्र साठा याचा अंदाज यायला लागला तसे मग भारतीय सैन्य आणि वायुसेना यांनी मिळून योजनाबद्ध रितीने हल्ले करायला सुरवात केली. आर्टिलरी बोलाविण्यात आली. कारगीलच्या युद्धाला कलाटणी देण्यात बोफोर्स तोफांनी मोठी भूमिका बजावली . असे म्हणतात भारतीय सैन्य कुठली आयुधे वापरु शकतो याचा अभ्यास करुन पाकिस्तानने जी तयारी केली होती त्यात बोफोर्स तोफा नव्हत्या. १० ते ३५ किमीवर मारा करु शकणाऱ्या या तोफांमुळे उंचावर असलेल्या शत्रूवर मारा करता आला. तोफांचा मारा, वरुन होणारे हवाई हल्ले याने घुसखोरांना नामोहरम करता आले. मग सैन्य खालच्या बाजूने वर जात घुसखोरांना हुसकावून लावण्यात भारतीय सैनिकांना यश आले. एकेक करीत सर्व शिखरे ताब्यात घेतली. कारगिलच्या युद्धाचे आंतरराष्ट्रिय राजकारणावर देखील दूरगामी परिणाम झाले.
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने एक मुद्दा मांडावसा वाटतो. आपण जेंव्हा सैन्याविषयी वाचतो, कविता वाचतो किंवा युद्धकथा वाचतो त्यात सैनिकांची हिंमत, शौर्य, पराक्रम आणि बलिदान या मुद्दयांवर अधिक भर असतो. सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाशिवाय कोणतीच लढाई जिंकता येत नाही हे निर्विवाद सत्य आहे. युद्ध जिंकायला त्यापलीकडे जाऊन योजना, निती आणि Operational Logistics (मराठी शब्द यंत्रणा?) ची गरज असते. याविषयी हवे तेवढे बोलले जात नाही. ते समजून घेतले जात नाही. यात सैन्य, शस्त्रात्र, त्यांच्या खान्यापिण्याची सोय या व्यतिरीक्त मेडिकलची सोय, युद्धाच्या ठिकाणी वापरायचे कपडे , सैन्याचे Acclimatization, भौगोलिक परिस्थिती, हवामान या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करुन विचार करुन योजना करावी लागते. १९७१ मधे जनरल माणेकशा यांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितले होते मी युद्धाला तयार नाही मला तयारीला वेळ द्या. सामान्यांना या साऱ्याची, त्यात येणाऱ्या असंख्य अडचणींची कल्पना नसते. सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. ही माहिती गुप्ततेच्या अटी सांभाळून सामान्यापर्यंत पोहचायला हवी जेणेकरुन सामान्य नागरींकांची याविषयीची समज वाढेल .
आपणा सर्वांसाठीच इतिहास १९४७ साली भारत स्वतंत्र झाला इथेच संपतो. त्यापलीकडे भारताचा राजकीय आणि सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सैनिकी शिक्षणासाठी, किंवा तज्ञ मंडळी तसा अभ्यास करीत असतात पण सामान्य माणसाला त्याची तितकी कल्पना नसते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ साली पाच महत्वाची युद्धे झाली. भारताच्या भूमीवर घडले नसले तरी भारतीय सैन्याने १९८९ मधे श्रीलंकेत जाऊन लढाई केली. या मोठ्या लढायांव्यतिरीक्त १९६७ साली सिक्किम मधे नथूला आणि चोला ला ची लढाई, १९८४ सालचे सियाचीन वर ताबा मिळविण्यासाठी केलेले ऑपरेशन मेघदूत, १९८७ सालातील अरुणाचल प्रदेशातील ऑपरेशन फाल्कन, ऑपरेशन पराक्रम, डोकलाम, उरी, बालाकोट आणि गलवान अशा छोट्या लढाया किंवा युद्धसदृष परिस्थिती निर्माण झाली होती. नागालँड, काश्मिर या भागात सुद्धा ज्या देशविरोधी कारवाया घडल्या त्या मोडून काढण्यासाठी सुद्धा सैन्याचा वापर झाला. थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे. या सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते.
संबंधित काही पुस्तके
India's War: A military History (1947 to 1971), आणि Full Spectrum (1972 to 2020) by Arjun Subrmaniam
1962 the war that wasn't आणि 1965 A WESTERN SUNRISE by Shiv Kunal Verma
Ours is not reason to why by Brig R R Palsokar (श्रीलंकेतील शांतीसेनेचा अनुभव. मी वाचले नाही अजून)
Kargil from Surprise to Victory by General VP Malik
Himalayan Blunder by Brig Jon Dalvi (नामकाचू मधे ब्रिगेडियर दळवी आणि त्यांचे सैन्य लढले. हे पुस्तक मी वाचले नाही. या पुस्तकावर पूर्वी बंदी होती तेंव्हा हे उपलब्ध आहे की नाही ते माहिती नाही. )
डिस्कव्हरी चॅनेलवरील काही प्रोग्राम
Tale of Valor
Special force Operation
तसेच StratnewsGlobal या युट्युब चॅनेलवर देखील याविषयावर उत्तम चर्चा होत असते.
[लेखातील बरीच माहिती ही Full Spectrum या पुस्तकातून घेतली आहे. ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga