स्मरणरंजन : रेडियो
ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...
बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.
या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...
बाबांना नाट्यसंगीत खूप आवडायचं... त्यांच्यामुळे माझीही सगळी नाट्यगीते तोंडपाठ... रात्रीच्या अंधारात झोपता झोपता बेला के फूल कार्यक्रम लागायचा... त्यातली जुनी हिंदी गाणी एका निराळ्याच विश्वात आमच्या बालमनाला घेऊन जायची...
पुढे कॉलेज ला असताना एफेम रेडियो शी ओळख झाली. रत्नागिरी जवळ एफेम स्टेशन नसलं तरी बऱ्याच वेळा त्यातल्या त्यात उंच जागी मुंबई, पणजी, पुणे चे सिग्नल यायचे. पावसाळ्या अगोदर एप्रिल मे मध्ये तर चक्क पाकिस्तान, अरब कन्ट्री आणि केरळ तामिळनाडू चेही एफेम सिग्नल घरामागच्या डोंगरावर गेलो तर ऐकू यायचे...
रेडियोवर क्रिकेट कॉमेन्ट्री ऐकणे हा तर जिव्हाळ्याचा विषय... 1992, 1996 च्या वर्ल्ड कप च्या वेळी रेडियो कॉलेजसाठी प्रवास करताना सतत उपयोगी पडे...
झूमरी तलय्या या गावाबद्दल एक जबरदस्त अनामिक आकर्षण वजा कुतूहल विविधभारती मुळे त्यावेळी निर्माण झालेले... कारण फर्माईश कार्यक्रमात बरीचशी पत्रे झुमरी तलय्या वरूनच यायची. उर्दू सर्व्हिस वर फर्माईश कार्यक्रमात अनेक पत्रे सीमापार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चीं असायची...
1989 साली आकाशवाणी ने विज्ञान प्रसारासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून "विज्ञान दृष्टी " नावाची स्पर्धात्मक सीरीज प्रसारित केली. या स्पर्धेत देशातील 150 ब्राईट स्टुडन्ट निवडण्यात आले, त्यात मी एक होतो, हे सांगताना अभिमान वाटतो!
विदेशात असतानाही रात्री आवर्जून विविध भारती नेट वरून ऐकत असायचो... असा हा आमचा रेडियो सोबतचा प्रवास... या आठवणी सदैव सोबत राहतील...!
या आठवणी सदैव सोबत राहतील...!अगदी सहमत