Welcome to misalpav.com
लेखक: सागर | प्रसिद्ध:

पल्या सर्वांना माहीत आहे की स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्माण करणे या एकाच ध्येयासाठी काम करत आहेत.

२०५० सालापर्यंत १० लाख लोकांची वस्ती मंगळ ग्रहावर वसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अगदी १० लाख नाही, पण किमान मंगळ हा ग्रह मनुष्यासाठी राहण्यायोग्य होईल आणि काही हजार लोक तिथे स्थायिक होतील, अशी आशा करू या.

1

मंगळावर मानवाचे हे स्थलांतर का केले जात आहे? याची गरज काय आहे? हे स्वप्न कसे प्रत्यक्षात येईल? यात सर्वांना संधी असेल काय? राजकीय हेतू काय असतील? कोणकोणते देश यात सहभागी असतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भविष्यकाळात मिळतीलच, पण तरीही यातल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण या लेखाद्वारे प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी मंगळ ग्रह आणि तेथे मानवाचे वास्तव्य करण्यासंदर्भात जी माहिती उपलब्ध आहे आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलोन मस्क जे काम करत आहेत, त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे.

2

मंगळावर मानवाला स्थलांतर करण्याची गरज का आहे, हे आधी पाहू या. आपल्या सूर्यमालेत 'हॅबिटॅबल झोन'मध्ये केवळ दोनच ग्रह येतात - एक म्हणजे पृथ्वी आणि दुसरा ग्रह म्हणजे मंगळ. हॅबिटेबल झोन म्हणजे ताऱ्यापासूनचे असे क्षेत्र, ज्या अंतरावर सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी पुरेसे सुरक्षित वातावरण आणि परिस्थिती उपलब्ध आहे.

भविष्यात एक वेळ अशी नक्की येणार आहे की ग्रीन हाउस इफेक्टमुळे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आज उपलब्ध असलेले द्रव पाणी राहणार नाही. आणखी द्रव पाणी नाही म्हणजे आणखी जीवन नाही. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरील सजीव प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी हॅबिटेबल झोनमधील दुसर्‍या ग्रहावर स्थलांतरित होणे भाग आहे. आणि हीच मंगळावर स्थलांतर या मोहिमेची गरज आहे.
3

मार्स उर्फ मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सर्वसाधारणपणे १४ कोटी मैल अर्थात २२.५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर आहे. पृथ्वीपासून मंगळ या ग्रहावर यात्रा करण्यासाठी कमीत कमी ८ महिने लागतात. आणि ही यात्रा २६ महिन्यांतून केवळ एकदाच करता येऊ शकते. मंगळ ग्रहाचे आपल्यापासूनचे किमान अंतर केवळ ३.३९ कोटी मैल अर्थात ५.४५ कोटी किलोमीटर एवढे कमी असते आणि अधिकतम (कमाल) अंतर २५ कोटी मैल अर्थात ४० कोटी किलोमीटरपेक्षा जास्त असते. याचे प्रमुख कारण आपली पृथ्वी सूर्याभोवती जवळपास गोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरते, तर त्या तुलनेत मंगळ ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. म्हणूनच आपल्याला मंगळावर जाण्यासाठी २६ महिन्यांतून एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येण्याची वाट बघावी लागते.

4

यासाठी स्पेस एक्सने खास तयार केलेल्या अत्याधुनिक रॉकेट 'स्टारशिप'चा वापर करावा लागेल, हे उघड आहे. स्पेस एक्सने फाल्कन अग्निबाणाच्या शेकडो चाचण्या घेतल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचल्या असतीलच. भविष्यकाळात दुसऱ्या ग्रहावर मनुष्यवस्ती निर्माण करण्यासाठी आपण आता सज्ज आहोत. तर २०१८पासून या स्टारशिप रॉकेटची निर्मिती सुरु आहे आणि पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी या परतीच्या प्रवासासाठी या रॉकेटचा अनेक वेळावापर होणार आहे. अनेक वेळा प्रवास करण्याची क्षमता बाळगून असणाऱ्या या स्टारशिप रॉकेटचे दोन भाग आहेत. यातला एक भाग सुपर हेवी बूस्टर आहे, जो पृथ्वीच्या तीव्र गुरुत्वाकर्षण शक्तीशी संघर्ष करून रॉकेटला अवकाशात नेऊन स्थापित करेल. त्यानंतर हा बूस्टर वेगळा केला जाईल आणि मंगळ ग्रहाच्या प्रवासासाठी त्याच्या जागी या रॉकेटला दुसरा बूस्टर लावला जाईल.

5

स्पेस एक्स नेतृत्व करत असलेल्या मंगळावर स्थलांतर मोहिमेचे काही ठळक टप्पे असे आहेत -

6

एप्रिल २०२५ - ५ स्टारशिप रॉकेट्स मार्सवर उतरवण्याची स्पेस एक्सची योजना आहे. ही रॉकेट्स उतरल्याबरोबर ७ फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढ्या क्षेत्रात मंगळावर सोलर पॅनेल्सचे जाळे उभारले जाईल. त्यासाठी रोबोट्स आणि स्वयंचलित वाहने वापरून मंगळावरची जमीन सपाट करून तयार ठेवली जाईल, म्हणजे भविष्यकाळात मंगळावर जेवढी रॉकेट्स येतील, त्यांना अडचण होणार नाही.

जून २०२७ - दोन स्टारशिप रॉकेट्स मंगळावर उतरतील, तेव्हा मंगळाची लोकसंख्या ३० होईल. थोडक्यात या दोन स्पेसशिप्समधून ३० मानव मंगळ ग्रहावर वास्तव्यासाठी येणार आहेत. त्यांच्यामागोमाग आणखी दहा स्टारशिप रॉकेट्स असतील, ज्यात या ३० लोकांच्या उपयोगाचे सर्व सामान असेल. या सामानापैकी मुख्य भाग अर्थातच या ३० लोकांच्या जेवणाचा असणार आहे, जेणेकरून त्यांना दीर्घ काळ मंगळावर वास्तव्य करता येईल. या ३० लोकांत डॉक्टर्स, वैज्ञानिक, इंजीनिअर्स आणि सैन्यातील काही लोक असतील. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर असलेले गुरुत्वाकर्षण ७०% कमी आहे. त्यामुळे या सर्व ३० लोकांना (कमी गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेल्या) मंगळावरील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ तर लागेलच. पण याचा दुसरा फायदा हा आहे की पृथ्वीवरून मंगळावर आणलेले जड सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणे सोपेही होणार आहे. या चमूतील काही वैज्ञानिक लगोलग मिथेन गॅसची निर्मिती सुरू करण्यासाठी काम सुरू करतील, ज्यामुळे स्टारशिप रॉकेट्समधील इंधनाच्या टाक्या ते पुन्हा भरू शकतील आणि ही रॉकेट्स अवकाशात पुन्हा झेप घेऊन पृथ्वीच्या दिशेने प्रवास करू शकतील. तर काही जीवशास्रज्ञ पृथ्वीवरून आणलेल्या काही रोपट्यांना मंगळावरच्या लाल मातीत वाढवण्याचा प्रयोग सुरू करतील, ज्यात टोमॅटो, बीन्स, मुळा, गाजर, बटाटा यासारखी जवळपास कोणत्याही वातावरणात वाढणारी कंदमुळे किंवा भाज्या प्रामुख्याने असतील. यांचा उपयोग मंगळावर खाण्यासाठीदेखील पुढे केला जाणार आहे. २०१५ साली मंगळावरील वास्तव्याचा वेध घेणारा एक सुंदर चित्रपट आला होता - 'The Martian'. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच जवळपास भाज्या आणि रोपटी मंगळावर वाढवली जाणार आहेत. उतरलेल्या चमूच्या सदस्यांची विष्ठा गोळा करून ते खत म्हणून वापरून या भाज्या आणि कंदमुळे उगवली जाणार आहेत. जुलै २०२९ - मंगळावरची लोकसंख्या आता ७६ने वाढलेली असेल. या प्रवासातदेखील अतिशय कुशल बॉटॅनिस्ट, वैज्ञानिक, इंजीनिअर्स इत्यादींना आणले जाईल. पण या हा चमू एका गोष्टीसाठी खास असेल. कारण पहिल्यांदा ४ सामान्य माणसेदेखील या चमूसोबत आलेली असतील. अर्थात हे ४ लोक तिकीट विकत घेऊन आलेले असणार आहेत. आता मंगळाची एकूण लोकसंख्या ३०+७६ म्हणजेच १०६ झालेली असेल. मानवासाठी निर्मित वस्तीमध्ये ग्रीन हाउस तयार केले जातील, जेणेकरून सूर्यप्रकाशाचा वापर करून भाज्या पिकवणे सोपे होईल आणि मंगळावरील सर्व रहिवाशांसाठी तिथेच अन्नाची सोय केली जाईल. ऑगस्ट २०३१ - मंगळावरची लोकसंख्या आता १६६ झालेली असेल. मंगळावर आता खोदकाम सुरु झालेले असेन. मंगळावरील जमिनीखाली मानवासाठी सुरक्षित वसाहत निर्माण करता येते का हे बघणे या खोदकामाचे प्रमुख मिशन आहे. एलोन मस्कची बोअरिंग कंपनी यासाठी अनेक वर्षांपासून तयारी करत आहे.
7

सप्टेंबर २०३३ - मंगळाची लोकसंख्या आता ३५४ झालेली असेल.

आता जगभरातल्या अंतराळ क्षेत्रातील कंपन्या एव्हाना मंगळावर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पाठवण्यासाठी तयार झालेल्या असतील. जेफ बेजोस यांची अमेझॉन कंपनी ही आत्तापासूनच पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी अशी डिलिव्हरी सेवा देण्याच्या मॉडेलवर काम करत आहे. जेफ बेजोस यांनी ब्लू ओरिजिन ही कंपनी भलेही एलोन मस्क यांना व्यावसायिक स्पर्धा निर्माण करण्यासाठी निर्माण केली आहे. पण पुढे अ‍ॅमेझॉनच्या सर्व डिलिव्हरी याच कंपनीमार्फत केल्या जातील, यात काही शंका नाही. आता माशांनादेखील या यात्रेत मंगळावर वाढवून प्रयोग केले जातील.
8

नोव्हेंबर २०३५ - मंगळाची लोकसंख्या ७४८ झालेली असेल.

हे वर्ष विशेष असणार आहे. कारण या काळात मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असेल. त्यामुळे नेहमी लागते त्या ७ किंवा ८ महिन्यांऐवजी मंगळावरून येणारे यान पृथ्वीवर केवळ ५ महिन्यांतच पोहोचेल. आतापर्यंत मानवासाठी राहण्यायोग्य अशा वसाहतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले असेल आणि मंगळावरचे पहिले हॉस्पिटलसुद्धा बांधायचे काम सुरू झालेले असेल. सप्टेंबर २०४० : या वर्षी मंगळाची लोकसंख्या झालेली असेल ३,३३१. स्पेस एक्सची सहकारी कंपनी बोअरिंग जमिनीखाली मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या कामात व्यग्र असेल आणि मंगळावर वस्ती करण्यासाठी जगातील जवळपास सर्वच देशांना या वेळी संधी दिली जाईल. मंगळावर जन्म घेणारे पहिले बालकदेखील याच सुमारास आपल्याला बघायला मिळेल. जून २०४२ - मंगळावरची लोकसंख्या आता ७,०४० एवढी झालेली असेल. मंगळावर लोकसंख्या वाढल्यामुळे आणि ती वाढतच जाणार असल्यामुळे राजकीय धोरणे निश्चित केली जातील. कायदे निर्माण केले जातील आणि मंगळावरील नागरिक त्यांच्या समस्यांची उत्तरे तिथेच शोधू शकतील. पृथ्वीवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे पहिले पाऊल असेल. याच वेळी मंगळावरचे सर्वात पहिले रेस्टोरंट सुरु झालेले बघायला मिळेल. इथे बायो तंत्रज्ञानाने उगवल्या गेलेल्या भाज्यांचे खाद्यपदार्थ या रेस्टोरंटमध्ये मिळतील. ऑगस्ट २०४४ - स्टारशिप रॉकेटद्वारे पृथ्वीवरून मंगळावर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पाठवली जातील. नवीन जन्मलेल्या अर्भकांची काळजी घेतली जाईल. मार्सचे स्वतःचे एक मोठे पॉवर स्टेशन बांधण्याचे काम सुरू झालेले असेल, जेणेकरून सारखे सारखे पृथ्वीवरून सोलर पॅनल मागवण्याची गरज संपेल. ऑक्टोबर २०४६ - या वर्षात मंगळ ग्रहावरचे उंच शिखर माउंट ऑलम्पस - जे माउंट एव्हरेस्टपेक्षा अडीच पटीने मोठे आहे, यावर चढाई करण्यासाठी मंगळवासी प्रयत्न करतील. अर्थात मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याचा फायदा गिर्यारोहकांना मिळेल आणि ही चढाई यशस्वी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आतापर्यंत मंगळावर शिकण्यासाठी युनिव्हर्सिटी तयार होऊन तिचे काम सुरूदेखील झालेले असेल. शिवाय सोलर पॅनेल्स तयार करण्याची फॅक्टरी निर्माण झालेली असेल. बॅटरी रिसायकल करून मंगळावर चालवता येतील अशा गाड्यांची निर्मिती केली जाईल, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरच्या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल. फेब्रुवारी २०५१ - मंगळावरची लोकसंख्या आता १,४०,०००पेक्षाही जास्त झालेली असेल. या वर्षी देखील मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ आला असल्यामुळे खूप लोक मंगळावर येतील. पृथ्वीच्या जवळ आल्यावर आता २०,०००पेक्षाही जास्त प्रवासी प्रत्येक वेळी मंगळावर जायला सुरुवात झाली असेल. बोअरिंग कंपनीने मंगळाच्या जमिनीच्या आत मानवाला राहण्यास योग्य आणि एकमेकांना जोडलेली अनेक मार्गांची जाळी निर्माण केलेली असतील. आता यापुढील प्रगती वेगवान होईल. मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळवून झरे, नद्या निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल. मंगळावरील मुलांना पृथ्वीवर आणले जाईल. किंबहुना त्या वेळचे अनेक फोटो बघून कोणता फोटो पृथ्वीवरचा आणि कोणता मंगळावरचा हेही ठरवणे कदाचित अवघड होईल तर मानवाच्या मंगळ ग्रहावरील या स्थलांतराला शुभेच्छा आणि आपण सर्व लवकरच या सर्व अद्भुत इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करण्यासाठी या लेखाचा उपयोग झाला तरी पुरेसे आहे. धन्यवाद, सागर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

खूपच जबरदस्त शैलीत लिहीलंय. हे इतकं प्लॅनिंग सुरू असेल त्या लोकांचं माहिती नव्हतं! सत्य हे कल्पनेपेक्षा नाट्यमय म्हणतात तसं असेल कदाचित! बघूया काय काय आणि कधी होतंय!

अगदी लहान सहान गोष्टींचा विचार देखील या प्लॅनिंग मध्ये केला गेला आहे. स्पेस एक्स ची रचना अशी आहे की बव्हंशी वैज्ञानिकच ते चालवतात. त्यामुळे एलोन मस्क एक धंदेवाईक म्हणून आपल्याला माहिती असला तरी त्याच्या शिवाय सुद्धा हे काम पुढे सुरुच राहीन अशी व्यवस्था आहे.

कितीही योजना आखल्या तरी मंगळावर जाऊन वास्तव्य करण्यास कोणी तयार होईल असे वाटत नाही. २०२२ पर्यत एकही मानव मंगळावर पोहोचलेला नाही. पुढील अंदाजे २५ वर्षात किमान ३००० माणसे मंगळावर राहतील हे दिवास्वप्न आहे. लेख उत्तम आहे, परंतु ही सर्व योजना काल्पनिक विज्ञानकथा वाटतीये.

तुम्ही म्हणताय तसे वाटण्या सारखी परिस्थिती आज नक्कीच आहे. कारण प्रत्यक्ष रिझल्ट्स दिसत नाहियेत. पण सदर लेखात जो प्लॅन मी दिलेला आहे. तो आराखडा एलोन मस्क आणि स्पेस एक्स मधील तन्त्रज्ञ यांनी अनेक वर्षां पूर्वीच तयार केलेला आहे. कामात येणार्‍या अपयशासकट सर्व शक्यतांचा विचार करुन देखील हे होणारच आहे. मंगळ मोहिमेवर जाणार्‍या पहिल्या मानव मिशन मध्ये सहभागी असलेल्या सर्व अंतराळ वीरांचे ट्रेनिंग सुरु आहे. तर २०३० नंतर मंगळावर जाणार्‍या पुढील क्रू मेंबर्स ची तयारी देखील करुन घेतली जात आहे. यात केरळ मधील एका १८ वर्षीय तरुण पण बुद्धीमान मुलीची देखील निवड झालेली आहे. सर्व काही शिस्तबद्ध नियोजनानुसार सुरु आहे. महामारी येऊन सुद्धा स्पेस एक्स चे काम सुरुच होते. २०२५ सालापासूनची पुढील २५ वर्षे नक्कीच थरारक असतील. स्टारशिप रॉकेट बूस्टेर मध्ये आलेल्या तात्कालिक तांत्रिक अडचणींमुळे २०२४ ची यात्रा पुढे ढकलावी लागली एवढेच. स्पेस एक्स ने तयारी मात्र खूप मोठी केलेली आहे. वेळे अभावी या लेखात अनेक बाबींचा समावेश करता आला नाही. पण पुढे मागे जसजसा वेळ मिळेल तसतशी अधिक माहिति देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.

आपण उपस्थित केलेला प्रश्न व्यवसायिक द्रुष्टीने अत्यंत योग्य आहे. पण पैशांची वसुली हा मुद्दा मंगळ स्वारी च्या अनुषंगाने गौण आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे हा सर्व वर्चस्वाचा खेळ आहे. अमेरिका या स्पर्धेत खुप पुढे आहे हे खरेच आहे. पण अमेरिकेला गुप्तपणे टक्कर देणारा देश म्हणजे चीन. चीन देखील मंगळावर वस्ती निर्माण करण्याच्या दिशेने गुप्त पातळीवर काम करतो आहे. त्यांनी काही प्रोब मंगळाकडे धाडले देखील आहेत. मंगळावर वस्ती करणे हा मानवी बौद्धिक क्षमतेचा कदाचित उत्कर्ष बिंदू असू शकेल. पण प्रामुख्याने मंगळावर जो जास्त संख्येने आणि लवकर वस्ती करणार ते लोक तेथिल राजकीय नेतृत्वाचे शिल्पकार असणार आणि ते तयार करतील ते नियम वा कायदे पृथ्वीवरुन येणार्‍या देशांतील लोकांना पाळावेच लागतील. भारताला २०१३ मध्ये मंगलयान पहिल्याच प्रयत्नात पाठवून मिशन मार्स यशस्वी केल्यानंतर खूप मोठी संधी होती. आणि इस्त्रो चा मंगळ मोहिमेसाठी रोड मॅप पण होता. दुर्दैवाने २०१४ मध्ये नवे सरकार आल्या नंतर बजेट ला कात्री लागली आणि त्यात भर म्हणजे चन्द्रयान - २ मोहिमेच्या अपयशा नंतर सरकारी दृष्टीकोन अधिकच बजेट आकसण्याकडे झाला. भविष्यकाळात भारत या स्पर्धेत उशिरा उतरले तर कदाचित आपल्याला मंगळावर उतरण्याचा परवाना घ्यावा लागेल. सांगायचा मुद्दा हा की व्यवसायिक बाबीपेक्षा मंगळावर ताबा मिळवण्याची ही स्पर्धा आहे. जेणेकरुन अमेरिकेला आज चीन कडून जी आर्थिक टक्कर मिळते आहे त्यासाठी पर्यायी जमीन आणि पर्यायाने अधिक शक्तिशाली असा अस्तित्वाचा पर्याय निर्माण करणे हेच अमेरिकेला अपेक्षित आहे. जगातील सर्व देशांना या मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्यासाठी समान न्याय मिळणार का नाही या प्रश्नांची उत्तरे भविष्यात दडलेली आहेत. तूर्तास आपण सर्वांकडे केवळ प्रतिक्षा करणे हाच पर्याय उपलब्ध आहे.

आपले लिखाण वाचायला मिळाले. लेख आवडला. आपल्या पृथ्वीवरच कुठेतरी वाळवंटात लाईन सिटी नावाचे शहर वसवण्यात येत आहे असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. छान लेखाबद्दल धन्यवाद.

सौदी मध्ये हा लाइन प्रोजेक्ट निर्माण केला जात आहे. याचा प्रमुख हेतू पर्यवरणाला हानी न करता ९० लाख लोकांसाठी एका रेषेत वस्ती निर्माण करणे हा आहे.

मानव अकल्पित कल्पना करतो आणी त्या पुर्ण करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो. व प्रयत्नांती परमेश्वर बनतो. इतकी स्थित्यंतरे बघितल्यावर आपली कथा सत्यात येईल यात शंका वाटत नाही. आजच्या दिवाळीची चाळीस वर्षापुर्वी सई परांजपे यांनी कल्पना केली होती. "दिवाळी काल,आज आणी उद्या" ह्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात. लेख आवडला. आजकाल सायन्स फिक्शन खुप कमीच वाचायला मीळतात.

सर आपल्या कमेंट मधील या माहितीचे कुठे संदर्भ उपलब्ध आहेत का यु ट्युब वगैरे? म्हणजे मलाही ते बघायला आवडेल आजच्या दिवाळीची चाळीस वर्षापुर्वी सई परांजपे यांनी कल्पना केली होती. "दिवाळी काल,आज आणी उद्या" ह्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात. आजच्या दिवाळी बद्दल ४० वर्षांपूर्वी नेमकी काय कल्पना केली होती हे समजून घ्यायचे आहे.

सागरभौ, लेखिकेने भविष्यात दिवाळी कशी असेल याची कल्पना केली, दिवाळी कालची- लवकर उठून अभ्यंग स्नान, देवपूजा,फराळ,फटाके,मातीच्यआ पणत्या इत्यादी. नातेवाईक, मित्र मंडळीची गर्दी. दिवाळी आजची-नर्कात पडणे ही कालबाह्य कल्पना,उशीरा पर्यंत लोळत पडणे,नो फटाके कारण पर्यावरण दुष्परिणाम ,नो फराळ कारण शरीर प्रकृतीवर प्रतीकुल परीणाम. नो पणत्या,विजेचे लुकलुकत दिवे पब,क्लब मधे दिवाळीची पार्टी,इलेक्ट्रॉनिक संदेश आणी प्रायव्हसीच्या नावाखाली एकटेपण. उद्याच्या दिवाळी-दिवाळी फक्त एक आठवण,इतर ग्रहावरून नातेवाईकाचे व्हाइस मेसेजेस. लाडू करंज्या व फराळाच्या कॅप्सुल आणी असेच बरेच काही. त्यात इतर ग्रहावर मानवी वस्तीची कल्पना केली आहे. हा दुरदर्शनवरचा कार्यक्रम साधारण 1980 च्या आसपासचा असावा. यु ट्युब बद्दल माहीत नाही.मिळाल्यास पहायला आवडेल.

माहितीबद्दल धन्यवाद @कर्नलतपस्वी मी तुनळी उर्फ यु टयुब वर शोधले पण सापडले नाही. सई परांजपेंची काही पुस्तके आहेत संग्रही. त्यात बघावे लागेल आता :)

मार्स उर्फ मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सर्वसाधारणपणे १० कोटी मैल दूर अंतरावर आहे. पृथ्वीपासून मंगळ या ग्रहावर यात्रा करण्यासाठी कमीत कमी ८ महिने लागतात. आणि ही यात्रा २६ महिन्यांतून केवळ एकदाच करता येऊ शकते. मंगळ ग्रहाचे आपल्यापासूनचे किमान अंतर केवळ ३.३ कोटी किलोमीटर एवढे कमी असते आणि अधिकतम अंतर २५ कोटी मैल अर्थात ४० कोटी किलोमीटरपेक्षा जास्त असते. हे आकडे बरोबर नाहीत. One crore is equal to 10 million The closest recorded distance to Mars from Earth was recorded in August 2003 when the two were 34.8 million miles (56 million km) apart. Mars and Earth are farthest apart when they are both at aphelion and on opposite sides of the sun. Here, they can be 250 million miles (401 million km) apart according to the New York Times(opens in new tab). The average distance between Earth and Mars is 140 million miles (225 million km). https://www.space.com/16875-how-far-away-is-mars.html

@अमेरिकन त्रिशंकू चूक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. योग्य ते बदल केले आहेत. नेमका घोळ कुठे आणि कसा झाला हे माझ्या लक्षात आले नाही. चुकीबद्दल दिलगीर आहे. अजून काही चूक असल्यास अवश्य अधोरेखित करा. पुन्हा एकदा धन्यवाद!

एकदम भारी लिहिलंय मित्रा. हे सर्व सध्यातरी विज्ञानकथेत शोभेल असं जरी असलं तरी प्रत्यक्षात उतरलं तर फारच भारी होणार आहे. मस्क मात्र मंगळावरचा हुकूमशहा होणार ह्यात काहीच शंका नाही. सध्या काहीश्या ह्याच विषयावर आधारित असलेली 'द एक्स्पान्स' ही सिरीज बघतो आहे. भविष्यात मानवांनी सूर्यमालेच्या पट्ट्यात तीन ठिकाणी वसाहती निर्माण केल्या आहेत. पृथ्वी आणि चंद्रावरची युएनच्या आधिपत्याखालील वसाहत ही अर्थर्स नावाने ओळखली जातेय. मंगळावर स्वतंत्र सामरिक शक्ती असलेले डस्टर्स आणि मंगळ आणि गुरुमधील लघुग्रहांच्या पट्ट्यातील एस्टेरॉइड्सवर वस्ती करणारे बेल्टर्स. ह्या तीन वसाहतींमधील संघर्ष उत्तम प्रकारे टिपलाय. एका परीने पृथ्वी-चंद्र आणि मंगळ हे विकसित देशांचे प्रतिक आहेत तर बेल्ट हा तिसर्‍या जगाचे प्रतिक आहे. सीरीज अगदी आवर्जून बघावी अशीच.

बरोबर आहे तुझे मित्रा. पण एलोन मस्क ऐवजी त्याच्या पुढील पिढ्यांना कदाचित ही संधी मिळू शकेल. :) एक्स्पान्स बद्दल खूप छान माहिती दिलीस. बघतो ही सिरिज लवकरच. या सिरिज चे ट्रेलर पाहीले होते. पण बघणे राहूनच गेले होते. तुझ्यामुळे एका सुंदर सिरिज ला मी आता मुकणार नाही :) मंगळावर वस्ती झाली की संघर्ष होणारच आहे. एकूणच मानवाची प्रगती जोरात सुरु आहे. आपण ती संधी साधतो की नाही हे बघणे मजेशीर असेन. भारताचे मंगलयान पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचले पण त्यानंतर मिशन मंगळ थंड आहे. किंबहुना ठाम योजना देखील नाहिये. आर्थिक बाब ही महत्वाची आहेच. पण या स्पर्धेत आता उशिर करुन चालणार नाही. चीनने आधीच मंगळावर अनेक मोहिमा केल्या आहेत. स्पेस एक्स सारखा त्यांचाही रोड मॅप तयार आहे. बहुतेक स्पेस एक्स चे पहिले मिशन यशस्वी झाल्यावर आपला देश देखील या स्पर्धेत उतरेल.

मस्त. अगदी पाच-दहा वर्षांनी वेळापत्रक हालले तरी आपल्या पैकी बरेच जण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होतील. सगळे जरी प्रत्यक्षात आले तरी किमान ५ आणि कमाल ८+ महिन्यांचा प्रवास म्हणजे खूपच झाला. अगदी मस्क साहेबांनी मला स्पेशल यायचा-जायचा पास दिला तरी विचार करेन :) मंगळावर पोचल्यावर काही(शे) वर्षांनी गुरु पण आवाक्यात येईल का?

>>> मंगळावर पोचल्यावर काही(शे) वर्षांनी गुरु पण आवाक्यात येईल का? गुरु गॅस जायंट असल्याने ती शक्यताच नाही. शनीचा टायटन हा उपग्रह कदाचित अनुकूल होऊ शकतो.

हेच म्हणतो. प्रचेतस ने सांगितल्याप्रमाणे शनि चा टायटन हा उपग्रह मानवाच्या वस्तीसाठी आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी व्यतिरिक्त सर्वात उपयुक्त ठिकाण आहे. कारण इथे बर्फ आहे. पाण्याचे झरे आहेत. ज्वालामुखी असल्याने बर्फ वितळून निर्माण झालेल्या नद्या ही टायटन ची जमेची बाजू. @सौंदाळा गुरु आणि शनि अशा ग्रहांवर वस्ती करणे केवळ अशक्य आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या ग्रहांवर थेट जमीन नाहिये हे वायुरुप आहेत म्हणजेच जमीन असलीच तरिही ती कित्येक हजार किलोमीटर खाली असेन. दुसरे असे की या ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती अवाढव्य आहे. गुरु कडे जो जातो तो गुरुच्या अवाढव्य गुरुत्वाकर्षण शक्तीच्या तावडीतून सुटणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे गुरुवर मानवाची वस्ती होणे केवळ अशक्य आहे. कारण तो केवळ एकतर्फी प्रवास असेन.

फारच उत्तम रोचक विषय आणि लेख. यात दोन मुद्दे नोंदवावेसे वाटतात: १. मंगळावर जाऊन परत येणे अशी स्कीम सध्या तरी अशक्य किंवा अवास्तव आहे. मार्स टु स्टे (कायमचे) अशीच संकल्पना आहे. बझ आल्ड्रिन याचा मुख्य समर्थक आहे. २. मंगळावर देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. वातावरण अगदीच नावापुरते, पण नगण्य. ओक्सिजन नाहीच. हवेचा दाब नगण्य, जणू निर्वात. गुरुत्वाकर्षण खूप कमी. पण चंद्राइतकेही कमी नाही. त्यामुळे परत येण्यासाठी उड्डाण/ प्रक्षेपण पूर्ण मोठा सेट अप आवश्यक. जो इथून नेणे किंवा तिथे manufacture करणे जवळपास अशक्य/ prohibitively expensive. रेडिएशन्स पूर्ण ताकदीने, वातावरण कवच जवळपास नाही. स्पेसमधे राहणे आणि मंगळावर राहणे यात केवळ पायाखाली जमीन आहे इतकाच फरक आहे. अगदी टेराफॉर्म करुन वगैरे तिकडे ओक्सिजन उत्पन्न केला तरी तो टिकून तर राहायला हवा. गुरुत्वाकर्षण कुठून आणणार? मग सर्वाभोवती क्याप्सुल करुन सदैव आत वस्ती करायची तर स्पेस स्टेशनसारखे पण आणखी मोठे प्लेटफॉर्म बरे. बघू काय होतेय.

आपले मुद्दे योग्य आहेत. पण त्याची उत्तरे देखील आहेत. १. सुरुवातीच्या क्रू पैकी कोणीच परत येणार नाहिये हे खरेच आहे. पण मी लेखात दिल्याप्रमाणे पहिले मंगळवासी उतरल्याबरोबर इंधनाची निर्मिती सुरु करणार आहेत. त्यामुळे त्यानंतरच्या काळात मंगळावरुन पृथ्वीवर येणे शक्य होणार आहे. लेखात याचा प्लॅन देखील दिलेला आहेच. अर्थात हे आपण म्हणत आहात तसे आव्हानात्मक नक्कीच आहे. पण शक्य आहे. भविष्यकाळातील तंत्रज्ञ हे काम नक्कीच यशस्वी करुन दाखवतील अशी खात्री आहे. त्यासाठीच तर पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पॄथ्वी या प्रवासासाठी स्पेस एक्स ने स्टारशिप या अनेक वेळा वापरता येणार्‍या अत्याधुनिक रॉकेट ची निर्मिती केली आहे. २. आपला दुसरा मुद्दा देखील योग्यच आहे. परिस्थिती विषम असली तरीही इतकी वाईट नाहीये. अगदीच गुरुत्वाकर्षण आणि वातावरण मंगळावर नाही असे नाही. पृथ्वीच्या तुलनेत ते नक्कीच कमी आहे. याची सविस्तर माहिती इथे बघायला मिळेल. Earth Vs Mars Comparision

अगदीच गुरुत्वाकर्षण आणि वातावरण मंगळावर नाही असे नाही.
पृथ्वीच्या वातावरणीय दाबाचा एक टक्काही दाब तिथे नाही. हा सर्वार्थाने नगण्य आहे. ही साधारण vacuum सारखी स्थिती आहे (मानवी शरीराच्या दृष्टीने). आणि हा दाब वाढवण्याचे उपाय नाहीत. अगदी ओक्सिजन तयार झाला तरी तो वातावरणात टिकणे आणि श्वासावाटे आत घेणे मानवी शरीराला near vaccum conditions मधे शक्य नाही. तहहयात बंद काचगृह किंवा प्रेशर सूट्समधे रहावे लागेल इतकाच मुद्दा आहे. तुलनेसाठी, हा वातावरणीय दाब पृथ्वीवर जमिनीपासून साधारण एक लाख फूट उंचीवर जितका असतो तितका आहे. त्याला स्पेसच म्हणावे लागते, वातावरण नव्हे. बाकी उपक्रमाचे कौतुक आहेच. असे प्रयोग झाले पाहिजेत.

बंद काचग्रह हाच सध्याचा पर्याय आहे. पुढे मागे वातावरण निर्मिति साठी झाडे , पाणी हे सर्व नैसर्गिक पर्याय निर्माण करण्याच्या दिशेने देखील प्लॅनिंग आहे. पण ते पुढील शतकात होईल बहुतेक.

Sci-Fi चित्रपटाची पटकथा शोभावी असा मस्त, माहितीपूर्ण लेख आवडला! प्लॅनिंग तर जबरदस्त करुन झाले आहे. ह्या सर्व खटाटोपात यश येईल कि अपयश हा भाग अलाहीदा... पण अशी भव्य-दिव्य स्वप्ने बघितलीच पाहिजेत असे मला वाटते. जर आपल्या पुर्वजांनी तेव्हा अशक्य वाटणारी पण आज वस्तवात उतरलेली स्वप्ने बघितलीच नसती तर आपण आजही अश्मयुगातच रहात असतो त्या 'The Flintstones' कार्टून मालिकेसारखे 😀

ह्या सर्व खटाटोपात यश येईल कि अपयश हा भाग अलाहीदा... पण अशी भव्य-दिव्य स्वप्ने बघितलीच पाहिजेत असे मला वाटते. जर आपल्या पुर्वजांनी तेव्हा अशक्य वाटणारी पण आज वस्तवात उतरलेली स्वप्ने बघितलीच नसती तर आपण आजही अश्मयुगातच रहात असतो +१ मार्मिक प्रतिसाद ! :)

मस्त माहीती :) आम्ही एका पुस्तकाची समरी लिहीली आहे...ह्याच संदर्भात..नक्की ऐका.. https://kukufm.com/show/the-future-of-humanity-3/?utm_source=share_ch

कुकु आणि प्रतिलिपि सारखे प्लॅटफॉर्म्स नक्किच चांगले आहेत. वापराल तसे पे करा या तत्त्वाने चालणार्‍या अ‍ॅप वर हे अवश्य बघतो

मस्त माहीती :) आम्ही एका पुस्तकाची समरी लिहीली आहे...ह्याच संदर्भात..नक्की ऐका.. https://kukufm.com/show/the-future-of-humanity-3/?utm_source=share_ch

मस्त माहीती :) आम्ही एका पुस्तकाची समरी लिहीली आहे...ह्याच संदर्भात..नक्की ऐका.. https://kukufm.com/show/the-future-of-humanity-3/?utm_source=share_ch

मस्त माहीती :) आम्ही एका पुस्तकाची समरी लिहीली आहे...ह्याच संदर्भात..नक्की ऐका.. https://kukufm.com/show/the-future-of-humanity-3/?utm_source=share_ch

माझ्यासाठी ही सर्वच माहिती नवी आहे. मंगळावर वस्ती ही केवळ एक कल्पना असेल असं वाटलं होतं. पण त्याचं इतकं जबरदस्त प्लॅनिंग असेल असं वाटलं नव्हतं. बघुयात काय होतं ते.

|भविष्यात एक वेळ अशी नक्की येणार आहे की ग्रीन हाउस इफेक्टमुळे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आज उपलब्ध असलेले द्रव पाणी राहणार नाही. आणखी द्रव पाणी | नाही म्हणजे आणखी जीवन नाही. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरील सजीव प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी हॅबिटेबल झोनमधील दुसर्‍या ग्रहावर स्थलांतरित होणे भाग |आहे. आणि हीच मंगळावर स्थलांतर या मोहिमेची गरज आहे. ते सगळ ठीक आहे, मान्य पण आहे, मी म्हणतो मंगळच का सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहावर मानवाने वस्ती करावी. पण तिथे जाण्यासाठी पृथ्वीला नष्टच का झाले पाहिजे? मागे स्पिलबर्ग काकांच्या एका सिनेमात नाव नाही आठवत, एका यंत्रमानवाला, माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवाला खऱ्याखुऱ्या मानवी आईची माया हवी असते, तिथे पण त्याची इच्छा पूर्ण होण्यापूर्वी काकांनी अगोदर पृथ्वीवरील मानवता संपवलेली आहे. अहो, आम्ही येऊ की मंगळावर अधी-मधी आणि वाटल कधी तर चाय-खारी खायला परत जाऊ आमच्या घरी.

याचे प्रमुख कारण लेखातच दिले आहे. "हॅबिटॅबल झोन" सजीव सृष्टी निर्माण होण्यास पोषक वातावरण असण्यास योग्य क्षेत्र. योग्य उष्णता, उर्जा निर्माण असणे, इत्यादि इत्यादि अनेक घटक आहेत. इतर अनेक ग्रहांवर मनुष्य वस्ती अशक्य का आहेत याची अनेक कारणे आहेत. बुध आणि शुक्र ( सूर्याच्या जवळ असल्यामुळे आणि विषम तापमान वातावरण असल्यामुळे बाद) गुरु शनि युरेनस नेपच्युन वायुरुप ग्रह आहेत. गुरु प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तिमुळे बाद. एकदा गेलेला माणूस कोणत्याही कारणास्तव सहज परत येणे अशक्य. शनि नेप्च्युन इथले काही उपग्रह वस्ती योग्य भविष्य काळात होऊ शकतील. पण मंगळच का? सर्वात महत्वाचा घटकः पृथ्विपासून चे सर्वात कमी अंतर असलेला ग्रह. पृथ्वी वरुन तिथे जाणे - येणे सुलभ होण्यासाठी हे आवश्यक आहे. मंगळ मिशन यशस्वी झाले की पुढे तंत्रद्नान प्रगत होईल तसे इतर सर्व ग्रहांवर जाण्याची शक्यता वाढू शकते. पण ते शक्य करण्या इतके प्रगत तंत्रज्ञान आज तरी उपलब्ध नाहिये. मंगळ मात्र आवाक्यात आहे.

अगदी योग्य मुद्दा अंतराचा. बाकी मानवी जीवनास इतर ग्रह तूर्त मंगळाहूनही अधिक प्रतिकूल आहेत हा भाग चर्चेतून तात्पुरता वगळून फक्त अंतरावर फोकस केले तर लक्षात येईल की शनि ग्रहाच्या उपग्रहापर्यंत पोचायला 4 वर्षे एका बाजूचा प्रवास लागेल, आणि नेपच्यूनपर्यंत पोचायला बारा वर्षे. सलग बारा वर्षे छोट्या वाहनाच्या जागेत कोंडून प्रवास ही कल्पना वाटते तितकी सोपी नाही. शिधा, ओक्सिजन साठा याचा तर विचारच नको. साधा प्राथमिक विचार करता असं वाटतं की बारा वर्षे एका बंद केबिनमधे कम्पल्सरी एकत्र रहावे लागले तर सह्प्रवासी लोक वाटेतच एकमेकांचा जीव घेतील ही शक्यता दाट.

मैने ऐसा तो नही कहा था.............(आता म्हणू नका: य्ये जवळ ये लाजू नको!!!!) कुठे हि वस्ती करण्यासाठी पृथ्वीचे नष्ट होणे Preliminary Condition असावी का किवा का असावी ??

अजिबात नसावी. नष्ट होणे आवश्यक नाहीच. आणि वरील अंतर, वेळ याचा उल्लेख हा केवळ सागर यांच्या प्रतिसादातील एका मुद्द्यावरुन काहीसा विस्तार होता.

अत्यंत रोचक लेख आणि त्यावर झालेली माहितीपूर्ण चर्चा आवडली. परत न येण्याच्या तयारीने मंगळावर वस्ती करायला जाण्यार्‍या चमुची मानसीक तयारी काय जबरदस्त असेल. पैजारबुवा,