Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सैरभैर डायरी - ३

क
कपिलमुनी
Tue, 03/10/2026 - 17:24
💬 3 प्रतिसाद
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता. दोन वर्षातच बाबांना हार्ट अटॅक आला . ऑपरेशन झाले की लगेच कॅन्सर झाला, त्याच्या उपचारात २ वर्षे निघून गेली. त्या आजारात बाबा आम्हाला सोडून गेले. हायस्कूलसाठी गाव सोडल्यापासून गावाचा सुट्टीपुरताच संबंध होता. जायचं ,खायच, प्यायच !भावंडासोबत मज्जा करायची एवढाच गाव माहिती. यात्रा, उत्सव यांना बाबा मला नियमाने घेऊन जायचे. गावाशी नाळ जोडून ठेव नेहमी सांगायचे. बाबांच्या नंतर शेतीकडे पुन्हा लक्ष द्यावे असा विचार केला. बाबा नेहमी हिशोब मेन्टेन करायचे त्यामुळे किती दिले होते याचा हिशोब होता पण आलेला पैशाचा काही हिशोब दिसेना. गावी पोचून बाळूमामांची गाठ घ्यायचा प्रयत्न केला. आमच्या आधी हजर असणारा आता फोन उचलणे टाळू लागला, कधीही घरी गेले तर भेटायचा नाही. एके दिवशी अचानक रात्री गाठला. त्याने कांगावा सुरू केला , मी 3 वर्षे सांभाळल, ह्यांनी काही पैसे दिले नाहीत, मी रानात घातलेत.. वगैरे दंगा करून गाव गोळा केले. आमचे घर तिथं असला तरी गावासाठी तो रोजचा होता आणि मी उपरा ! माझ्या नशिबानं बाबांनी सगळे अग्रीमेंट स्टॅम्प वर केले होते, नाहीतर यांनी जमिनीचा ताबा सुद्धा घेतला असता, पण पैसे वसूल करायला कोर्ट कचेरी मध्ये जाणे मूर्खपणा असतो. बदलते वातावरण बघून मी पण टोन बदलला, "मामा, मला इथे येणं जमणार आहे का ? आहे ते सगळ तुम्हीच सांभाळायचा आहे! बाबांचा तुमच्यावर लई विश्वास ..आम्हाला ह्यातलं काय कळतंय?" असा सांगून उद्या आपण चार शहाणी माणसं घेऊन तुमचा हिशोब करून टाकू आणि पुढचा ठरवू खरं तर ह्या माणसाने 3 वर्षात सगळा ऊस स्वतःच्या नावावर घालवला होता, इतर पिकांचा पण उत्पन्न स्वतःच घेतला होता. म्हणून आता त्याला हिशोब नको होता. आता फक्त भांडण काढायचं म्हणजे पैसे द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आपण भांडण करायचा नाही हे नक्की होते. दुसऱ्या दिवशी ४ ज्येष्ठ गावकरी घेऊन बैठक बसली, बाळूमामांन "मी रानात अमुक शेणखत घातले, तमुक केले" सांगायला सुरुवात केली. त्यामुळे इथून मागचे काहीच देणार नाही असा पवित्रा घेतला, उंदराला मांजर साक्ष असणारे ४ जण तिथे होतेच. शिवाय मला जमीन अजून ३ वर्षे कसायला मिळाली पाहिजे नाहीतर मी घातलेले पैसे मला द्या अशी उलटी बोंब ठोकली. मी सगळ्यांना नमस्कार करून "बाळूमामाने अतिशय चांगली जमीन सांभाळली आहे . मला गावातले फार माहिती नाही, त्यातला काही कळत नाही, मला फक्त दर वर्षी किती पैसे मिळणार एवढे कळले की झाले. मी 3 वर्षे जमीन कसायला द्यायला तयार आहे" असे सांगितले. पण ह्यांनी अगोदरचे काहीच दिले नाहीत, मग मी यांचा पुढचा विश्वास कसा धरावा ? थोडी फार चर्चा होऊन सगळेजण मागचे ३ वर्षाचे निम्मे बाळूमामाने द्यावेत आणि पुढचे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट २०% ने करावे , म्हणजे सगळी जमीन ते करून उत्पन्नापैकी फक्त 20 % मला देणार. हा संपूर्ण लॉस मधला व्यवहार करण्यासाठी हो म्हणालो आणि बैठक संपवली. गावात बाबांचे काही जवळचे मित्र होते, त्यातल्या नानाला घेऊन बाळूमामांची कुंडली काढली . उसाचे पैसे बँकेत होते. या वर्षीचे एक - दोन दिवसात जमा होणार होतें . बँक मॅनेजर बाबांचा शाळेतला मित्र निघाला . त्याने सहकार्य करायचं आश्वासन दिला. वाळूच्या अकाउंटला पैसे आले की मला फोन करा आणि त्यावर कोणते ट्रान्सेक्शन होणार नाही याची हमी दिली. इकडे बाळूमामा खुष होता, एकदा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट झाला की पुढचे तीन वर्ष लॉस दाखवून उत्पन्न द्यायचा काही प्रश्नच नव्हता. मागचे पैसे देणे कसे टाळायचे याचा प्लॅन त्याच्या डोक्यात शिजत होताच.. मॅनेजरकडून बॅंकेत पैसे जमा झाल्याचा फोन आला आणि आम्ही सकाळी नोटरीकडे जाऊन पुढील ३ वर्षाची जमीन लिहून दिली आणि आम्ही बँकेत आलो, इथं तुम्हाला पैसे काढून देतो असे बाळूमामाने सांगितला होता, टोकन घेऊन नंबर यायची वाट बघत होतो, तेवढ्यात फोन वाजला, इथे रेंज नाही म्हणून मामा बोलायला बाहेर गेला आणि तसंच कंपाऊंडबाहेर जाऊन पळून गेला. पैसे ही द्यायचे नाही आणि कॉन्ट्रॅक्टही मिळाले . हे पोरग २ दिवस गावात हिंडेल.. याला त्याला तक्रार करेल आणि जाईल पुण्याला, किती दिवस थांबतय ? कोर्टात गेला तरी कागद दाखवे पर्यंत ३-४ वर्षे जातात.गावाकडचा बेरकी हिशोब परफेक्ट होता. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी! शहरात वाढलो असलो तरी मी पण याच गावच्या विहिरीचा पाणी पिले होते. आम्ही नोटरी करायला गेलो तेव्हाच मी माझ्या दादाला बाळूच्या घराकडे पाठवले होते. बाळूचे नुकताच मिसरूड फुटलेले पोरग दहावीत होता. "तुला आधार कार्ड घेऊन तालुक्याला बोलावल आहे" सांगून त्याला गाडीत टाकून सकाळीच उचलला होता. दादाने मस्त घोळात घेऊन त्याला जेवायला घेऊन गेला.एक बियर पाजली. बियर पिल्यावर घरी कळल्यावर ओरडतील म्हणून फोन बंद करून ठेवला. कुठलासा हॉट पिक्चर बघायचा कार्यक्रम केला. बाळूचा पोरगा सातव्या असमान मध्ये तरंगत होता. मी गावातल्या चार मध्यस्थाना बोलावले, बाळूचे प्रताप सांगितले, बाळूने बरेच आढे वेढे घेऊन तासाभराने बैठकीला हजेरी लावली. आता बैठकित माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याने हात वर केले. आता पुन्हा टोन बदलायची वेळ होती. आता मामा, बाळू वरून बाळ्या वर यायला लागणार होते. मी बाळ्याला सांगितल, "पैसे गेले गाढवाच्या गांडीत.. मी लई पैसे छापतो.. मला चुत्या बनवतो आणि गावात बोंबलत फिरतो हे मला चालणार नाही, तुझी जिरवणार ! तुझ्या पोराचे हातपाय मोडणार. मग पोलिस केस कर, तिथे पण पैसे देऊन सुटेन. " बाळ्याने गडबडीने घरी फोन केला तर पोरग माझ्या दादाबरोबर सकाळीच बाहेर पडले समजल्यावर बाळ्याचे तोंड पडले. पोराचा फोन नॉट रिचेबल मग मात्र बाळू वैतागला, धमकी द्यायला लागला, सोडणार नाही, गावात तुमचा घर एकच आहे वगैरे.. "एकच आहे आणि महाराजांच्या वेळेपासून आहे, त्यामुळं ही धमकी मला देऊ नकोस. माझे ३ लाख दे नाहीतर पोरावर ४ लाख खर्च करायची वेळ येईल." गावातले मध्यस्थी जाणकार लोक माझा पवित्रा बघून गडबडले.हा पुणेरी रेडिओ अचानक बँड कसा काय वाजवायला लागला ? गावात असे चालत नाही, गावकी असते वगैरे समजणुकीच्या गोष्टी सांगू लागले तसे मी त्यांना पण कोलला," हा तुमच ऐकत नाही मग मी का ऐकू? " तेवढ्यात बाळ्याची फॅमिली तिथे रडत ओरडत आली. "माझा पोरगा परत द्या" मला हात लागला तर परिणाम तिकडे पोरावर होतील हे माहिती असल्याने सगळे गप्प होते.लोकांनी समजावल्यावर बाळ्याने पैसे द्यायचे कबूल केले. बँकेत जाऊन सगळ्याच्या समोर बाळूने पैसे आणले. माझ्या ताब्यात दिले , मी लगेच माझ्या अकाउंटला भरले.सकाळचा बाँड पेपर बाळ्याच्या तोंडावर फेकून मारला. "पुन्हा रानात दिसलास तर याद राख , पुढच्या वेळी सोडणार नाही" आणि दादाला फोन केला , तो पोराला घेऊन तिथे आला. "पप्पा, दाद्याने आणि मी लई मजा केली, मटण खाल्ला, पिक्चर पाह्यला" पोरगा खुश होऊन सांगायला लागला तसा बाळ्याने पोराला तिथेच हाणायला सुरुवात केली.. बिचाऱ्या पोराला आपण काय चुकलो, पप्पा का मारत्यात हे काही कळले.नाही..

प्रतिक्रिया द्या
368 वाचन

💬 प्रतिसाद (3)
व
विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 23:05 नवीन
मुनीवर्य फर्मास लेखान झालंय. जरा भाग लवकर लवकर येवू द्या. उत्सुकता टिकून रहाते
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 03/11/2026 - 03:45 नवीन
मस्त. भारी.. याहून वाईट अनुभव असूनही तुमच्यासारखे धाडस (?!) दाखवणे शक्य झाले नाही आणि जमीन मालकी नशिबात उरली नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 06:52 नवीन
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा