भटकंती

एक उनाड भटकंती (सुरुवात)

Primary tabs

आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आलेल्या बाळानुसार आपण आपले सर्व आयुष्य जुळवून घेतो. झोपणे,उठणे, खाणे , पिणे या सर्वांबरोबरच अजुन एक बंधन येते ते फिरण्यावर. कुठेही जायचे म्हणले की, बाळाचा जामानिमा सोबत घेऊन जायचा कंटाळा येतो. शिवाय त्याला अंगावर घेऊन फिरायला लागते त्यामुळे हात दुखतात ते वेगळेच.
आमच्या दोघांच्याही आयुष्याने हा बदल मनापासून स्वीकारला. जस-जसा आमचा मुलगा मोठा होत गेला तसं मी फिरायला जायचं टाळायचेच. कारण बाहेर गेलं तरी माझा मुलगा मी सोडून कुणाकडेच जायचा नाही. त्याचं शी,शू, खाणं-पिणं याचं पाहताना मला भटकंतीचा आनंद घेताच यायचा नाही. त्यामुळे माझा त्याला घेऊन कुठेही जायचा उत्साहच संपला. यातच 3-3.5 वर्षे कशी निघून गेली कळलं नाही.
अशातच एक दिवशी रात्री नवरा म्हणाला “उद्या बाहेर जाऊयात का फिरायला?” मी हा बरा आहे नं? अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहत विचारलं ‘उद्या वर्कींग डे आहे आणि मध्येच का असं वाटलं तुला?’ जरा भावूक होतच तो म्हणाला ‘ उद्या वर्कींग आहे म्हणूनच म्हणतोय. ससुल्याला डे केअरला पाठवल्यावर आपल्याला दिवसभर निवांत फिरता येईल. सुटीच्या दिवशी तो घरी असतो नं.” मी उडालेच. ससुल्याला सोडून असं कुठे फिरायला जायचं याचा मी विचारच करु शकत नव्हते. गेल्या तीन वर्षात त्याला असं सोडून मी कधी कुठे गेले नव्हते. एकतर त्याला डे केअरमध्ये ठेवावं लागतं याचंच मोठं शल्य होतं मनात. त्यामुळे ऑफीसनंतर जास्तीत जास्त वेळ त्याला द्यायचो आम्ही. मी नवऱ्याला आपण सुटीच्या दिवशी सगळेच जाऊयात असं सांगितलं. त्यावर त्यानं मला विचारलं “आपण दोघंच शेवटचं एकत्र कधी फिरायला गेलो होतो आठवतंय का?”
मी आठवायचा प्रयत्न करु लागले. लग्नापूर्वी सतत सोबत असणारे आम्ही दोघे, लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात राहू लागलो. शेवटी 3 वर्षांनंतर मुंबईत एकत्र राहणे शक्य झाले पण दोघांच्याही कामाच्या व्यापामुळे कुठे जाणेच जमले नाही. आणि त्यानंतर 4 वर्षांनी घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली. थोडी गुंतागंत असल्याने डॉक्टरांनी प्रवास करण्यास सक्त मनाई केली होती. रोजचा लोकलचा प्रवासच पुरेसा आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यानंतरही फिरणे असे नाहीच. बापरे! गेल्या कित्येक वर्षात आम्ही सोबत कुठे एका दिवसासाठीही बाहेर गेलो नव्हतो! खरंच! आधी करीयर व नंतर बाळाच्या नादात आम्ही आमचं विश्वच हरवून बसलो होतो. अर्थात हे साहजिकच असलं तरी काहीतरी गमावलंय याची जाणीव त्याक्षणी मलाही हळवं करुन गेली.
“मला माहित आहे आता परिस्थिती बदललीय. ससुला आपलं विश्व आहे आता. तरीही आपण आपल्या दोघांचें असे काही क्षण पुन्हा जगूयात का आधीसारखे? ससुल्याचा विचार करता करता आपण आपलं अस्तीत्वच विसलोय. थोडं आपल्यासाठी , फक्त आपल्या दोघांसाठी जगूयात का? केवळ एक दिवस?” तो आतुरतेनं माझ्या होकाराची वाट पाहत होता आणि मी होकार दिला. अतीव आनंदाने आम्ही झोपी गेलो. उद्याचा दिवस उगवणार होता.........आमच्या उनाड भटकंतीसाठी................!

कंजूस

आवडली सुरुवात.
आमच्या आफिसात होता एक मर्चंट नावाचा पारशी मुलगा. तो मुलीला सहा महिन्याची असल्यापासून घेऊन जायचा रेल्वेने फिरायला.

गणेशा

वाचत आहे..
थोडे दिवस नव्हतो येथे पहिलाच धागा मस्त..

टर्मीनेटर

चांगली सुरुवात झाली आहे श्वेताजी.
तुमचा लेख वाचल्यावर मी आणि माझ्या बायकोने (दोघांनाही भटकंती प्रिय असल्याने) अपत्य जन्माला न घालण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य होता ह्याचे समाधान वाटले 😀
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

चौथा कोनाडा

सुंदर सुरुवात ! ओघवत्या शैलीमुळे वाचायला सुरुवात केली तर शेवटाला पोहोचलो.
(परिच्छेदात एकदी मोकळी ओळ का नाही सोडली ? आणखी "सु:वाच्य !)
पुढील भागाची उत्सुकता आहे, प्रतिक्षेत.

श्वेता२४

परिच्छेदात एकदी मोकळी ओळ का नाही सोडली ?
मी खरंतर व्यवस्थित परिच्छेद, मार्जिन वगैरे सोडून लिखाण केलं होतं.पण पूर्वपरिक्षण करताना आता जसं आहे तसं दिसत होतं. खूप प्रयत्न केले पण जमलं नाही. मला देखील असं सलग वाचायला आवडत नाही. आता कोणी मार्गदर्शन केलं तर मला उर्वरीत भागात हे दुरुस्त करता येईल. यासाठी काही विषेश सेटींग करावे लागते का? मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

चौथा कोनाडा

आता तर परिच्छेद गॅपसह व्यवस्थित दिसत आहेत. त्या वेळी दिसले नाहीत ते वेळी मिपाच्या सिस्टीम सेटिंग्जमुळे की काय ?
विशेष सेटींग नाही करावे लागत.

श्वेता२४

कंजुसकाका व रंगासर यांनी सांगितल्याप्रमाणे बदल केले


आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात.

फक्त स्त्रीच्या नव्हे अख्ख्या कुटुंबाच्या. मूल जर मुलगा असेल तर बापाला दरारा असलेला अंगरक्षक मिळतो. आमच्या चि छोटा असतांना माझ्या आईला आणि बहिणीला मस्त धोपटत असे.

छान ओघवते लोहिले आहे. मस्त. धन्यवाद.

भटकंती मालिकेची सुरुवात म्हणून लिहिलेले अनुभवकथन भावले.

माझी कन्या चार वर्षांची आहे. ती सव्वा वर्षांची झाल्यापासून आम्ही काही मोठ्या सहली केल्या. काही वेळा नक्कीच त्रास झाला पण लहान मुले बदललेल्या परिस्थितीबरोबर बरेचदा जुळवून घेतात असा अनुभव मिळालाय.

श्वेता२४

चित्रे अपलोड करताना थोडी अडचण येतेय. पण उद्या नक्की करते. सर्वांना खूप खूप धन्यवाद