काथ्याकूट

अहमदनगर कट्टा!

Primary tabs

नमस्कार मिपाकरांनो,

दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच.

लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल.

धन्यवाद.

गेल्या नोव्हेंबर मधे नाशिक येथे यशस्वी मिपा कट्टा झाला. त्यानंतर बहुधा हाच मिपा कट्टा आयोजित होत आहे. यशस्वीतेसाठी शुभेच्छा.

एकेकाळी ठाणे व पुणे येथे बहुतांश मिपा कट्टे व्हायचे. आता इतरही शहरांत होत आहे याचा आनंद वाटतो.

टर्मीनेटर

धन्यवाद श्रीरंग जोशी!

गेल्या २ वर्षांत कुटुंबियांना सालाबादाप्रमाणे कुलदेवीच्या (योगेश्वरी, अंबाजोगाई) दर्शनाला जाणे जमले नाही त्यामुळे ह्यावेळच्या दौऱ्यात औरंगाबाद आणि सोलापूर अशी नेहमीची ठिकाणे टाळून अहमदनगर आणि परिसरात भटकंती करण्याचे ठरवले आहे त्यामुळे अहमदनगर येथे २ रात्री मुक्काम होणार आहे. त्या जोडीला अहमदनगरात एखादा मिपा कट्टा झाला तर दुधात साखर!

Bhakti

@आलो आलो
व्यनि केलाय.

ॲबसेंट माइंडेड…

शुभेच्छा.

कपिलमुनी

एकेकाळी मिपा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले आणि आता लोप पावलेले सार्वजनिक कट्टे पुन्हा होताना दिसत आहेत.

कट्ट्याला शुभेच्छा .

प्रचेतस

कट्ट्यास शुभेच्छा.
भ्रमंती कुठे कुठे असणार आहे? निघोजची रांजणकुंडे, टाकळी ढोकेश्वर लेणी, वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ तिथून तसे जवळच आहेत.

निनाद

रणगाडा संग्रहालय ही आहे येथे. त्यातले काही अगदी एकमेव उरलेले रणगाडे येथे पहायला मिळतात (असे ऐकून आहे)

टर्मीनेटर

रणगाडा संग्रहालय पण मस्त आहे.
सुचवणीसाठी धन्यवाद!

1

2

3

निनाद

म्युझियममध्ये सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार ही १९२१ मध्ये बनलेली, भारतीय पॅटर्न असलेली, जगात एकमेव कार कम रणगाडा अशी गाडी फक्त नगर मध्येच आहे. जगात यातल्या फक्त सहा शिल्लक आहेत पैकी एक नगरला आहे. आशा आहे की ही पहिली असेल. बहुदा हीचा वापर दुसर्‍या महायुद्धात झाला असावा. पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही. शिवाय येथे दोन जपानी रणगाडे पण आहेत हे दुसर्‍या महायुद्धात बर्मा ते इम्फाळ या दरम्यान पकडलेले गेलेले आहेत / असावेत.

टर्मीनेटर

हे रणगाडा संग्रहलय खूपच छान आहे, त्यात ठेवलेल्या विविध प्रकारच्या रणगाड्यांवर एक चित्रलेख लिहावा म्हणतोय!

तुम्ही म्हणताय ती 'सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार' पाहिली. तिचे काही फोटो खाली देत आहे.
इथे प्रत्येक रणगाड्याची माहिती देणारे फलक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत लावले आहेत पण सदर फोटोत आलेला बोर्ड हिंदी भाषेतला आहे त्यामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करून ठेवतो 😀

1

2

3

टर्मीनेटर

भ्रमंती कुठे कुठे असणार आहे?

सध्या तरी मांजरसुंभा जवळील शिव गोरक्ष मंदिर हे एकमेव ठिकाण नक्की केले आहे.
शुक्रवारी परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई करून अहमदनगरला पोहोचायला संध्याकाळ होइल. शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारी दुपार पर्यंत जे काही पहाता येईल तितके पाहून परतीचा प्रवास सुरु करणार!

प्रतिसादांतून तुम्ही आणि अन्य मिपाकरांनी अनेक चांगली ठिकाणे सुचवली आहेत, त्यातले कानिफनाथांची मढी आणि रणगाडा संग्रहालय पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, अर्थात बाकीचीही ठिकाणे नक्कीच चांगली वाटत आहेत, उपलब्ध वेळात त्यातली जितकी पाहता येतील तितकी पाहण्याचा प्रयत्न करणार.

धन्यवाद.

प्रचेतस

निघोजची रांजणकुंडे मात्र नक्कीच बघा, हे ठिकाण नगरपासून थोडं लांब असलं तरी अद्भूत आहे. नुसते जालावरील फोटो पाहून त्यांची कल्पना कधीच येणार नाही. प्रत्यक्ष बघूनच हे अनुभवावे असेच आहे. पुण्यास परत येताना टाकळी हाजीस जाऊन हे बघता येईल.

टर्मीनेटर

टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ दोन्ही मस्त आहेत. आवडले!
धन्यवाद प्रचेतस आणि भक्ती. तुम्हा दोघांचे लेख वाचत बघितल्यामुळे जास्त मजा आली.

ढोकेश्वर मंदिर / लेणी
1

2

वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ.
3

4

दर्याई आणि वेल्हाई देवी मंदिराबाहेरील वनारसेना.
5

प्रचेतस

मस्त.
वडगाव दऱ्याची गुहा सतत ठिबकणाऱ्या पाण्यामुळे एकदम थंडगार असते.

टर्मीनेटर

हो... बराच वेळ आत होतो त्यामुळे ठिबकणाऱ्या पाण्याने भिजलो पण :)

Bhakti

कूल कूल :)
आम्ही गेलो होतो,तेव्हा माझा नवरापण लवकर बाहेर येत नव्हता.बळेच बाहेर आणलं.नंतर मी वानरसेनेबरोबर फोटो काढत होते,तर नवरा गायब ..परत आत गुहेत गेला होता ;)

>>> प्रचेतस आणि भक्ती. तुम्हा दोघांचे लेख वाचत बघितल्यामुळे जास्त मजा आली.

सहमत..! प्रचेतस यांनी भटकंतीचे दालन समृद्ध केले आता त्या पाठोपाठ भक्ती यांचेही लेखन माहितीपूर्ण असते. दोघांचेही मन:पूर्वक आभार. असेच लिहिते राहा. धन्स्.

-दिलीप बिरुटे

जुइ

आमच्या गावी कट्टा होत आहे. मन भरून आले ;-) कट्ट्याला शुभेच्छा! सचित्र वृत्तांत अवश्य टाका.

Bhakti

छान!
एक भटकंती सूचवते कल्याण रोड
१.जामगाव महादजी शिंदे भुईकोट किल्ला(नगरपासून३० किमी)
२.टाकळी ढोकेश्वर लेणी(जामगाव पासून साधारण १० किमी)
३.लवणस्तंभ(लेणीपासून सा.२० किमी)
४.पळशी वाडा(टाकळी पासून १६-१७ कि) मी हा पाहिला नाही , पण इथलं विठ्ठल मंदिर,वाडा सुंदर आहे असं वाचलंय .
सकाळी लवकर प्रवास सुरू केल्यास तर ही सगळी ठिकाणे पाहता येईल , नाही तर एखादं स्कीप होईल.
नगराचा लस्सीचा कट्टा माझ्याकडून :)

टर्मीनेटर

नगराचा लस्सीचा कट्टा माझ्याकडून :)

तुम्ही अहमदनगरला राहता का? तसे असेल तर लस्सी कट्टा होऊनच जाऊदे!

लेणी बघण्यात फक्त मला आणि भाऊजींना रस आहे, बाकीची मंडळी तयार झाली तर टाकळी ढोकेश्वर लेणी बघता येतील
प्रचेतस आणि तुम्ही सुचवलेले 'लवणस्तंभ' बघण्याची इच्छा नक्कीच आहे, बघू काय काय पाहता येते ते!

धन्यवाद.

चौथा कोनाडा

मिपा कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.

अ. नगर जवळच्या नातेवाईकांचे गाव असून देखिल अ. नगर परिसर पाहिला नाही.
तुमच्या सोबत येणे (कट्ट्यासह ) आवडले असते, पण आधीच ठरलेल्या कार्यक्रमानुसार येणे जमणार नाही !

भटकंती आणि कट्टा वृतांत जोरकस येईल या प्रतिक्षेत आहेच !

एकतर पुण्यात कट्टा नाही. आणि १५-१६ एप्रिलला आमची हनुमान जयंती यात्रा असल्याने मुक्काम गावी असणार.
अजून एक कट्टा मिस करावा लागेल :(

चिक्कु

शनी शिंगणापूर, देवगड, कानिफनाथांची मढी, मायंबा गड, मोहटादेवी, नगर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरील बुर्हानगर येथिल भवानी माता, रणगाडा संग्रहालय,चांदबिबी चा महाल,मेहेरबाबा , पुणे ते नगर प्रवास करत असाल तर निघोज येथिल रांजणखळगे आणी मळगंगा माता, राळेगण सिध्दी, हिवरेबाजार, चास कामरगाव येथिल वाडा, वाटेत सुपा येथे फुलांचे हार खरेदी करावीत, सरदवाडी येथे भेळ खायचा बेत करावा, खर्डा,नगर येथील भुईकोट किल्ले पहावेत.. वेळ भेटला तर नगरमधिल सोपान वडापाव चा बेत करावा.

टर्मीनेटर

परतीचा प्रवास नगर पुणे मार्गावरून करणार आहे त्यावेळी तुम्ही सुचवलेल्यातली काही ठिकाणे पाहण्याचा प्रयत्न करणार!

धन्यवाद.

निनाद

अंबिका नगर म्हणायचे आहे का? आम्ही या नगरीला नगर किंवा अंबिका नगर असेच म्हणतो!

टर्मीनेटर

@ चिक्कू:- तुम्ही सुचवलेल्या ठिकाणापैकी कानिफनाथांची मढी आणि रणगाडा संग्रहालय बघितले. मंदिर फारच आवडले.

1

2

3

4

5

सर्व ठिकाणे नाही पाहता आली, अर्थात अवघा दीड दिवस नगर शहर आणि परिसर बघण्यासाठी खूपच अपुरा वेळ आहे हे लक्षात आले आहे.

धन्यवाद.

कंजूस

कट्ट्याला विशाल जनसागर उसळो.

टर्मीनेटर

आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा.

हो, तसेच करावे लागणार आहे, नगर परिसरातील भटकंतीसाठी दीड दिवस खूपच कमी पडला!

कट्ट्याला विशाल जनसागर उसळो.

कट्ट्याला 'विशाल' (आलो आलो) + जनसागराच्या रूपात आम्ही अन्य चार जण उपस्थित होतो, त्यामुळे तुमचे शब्द खरे ठरले आहेत 😀

कंजूस

मोटो विडिओ ब्लॅागही करून टाका.

टर्मीनेटर

कपिलमुनी, निनाद, जुइ, कुमार१, चौ. को, तुषार काळभोर, कंकाका

प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार!

सर टोबी

माझ्या भाच्यांबरोबर काढतो तेव्हा हे काहीतरी भाऊसाहेबांची बखर मधील प्रकरण असावे असा त्यांचा चेहेरा असतो. माझा नगरमधील शेवटचा मोठा मुक्काम ८७ सालचा. एक पडदा सिनेमाला घरघर लागण्याचे दिवस खूपच लांब होते. सरोष टॉकीजच्या आजूबाजूला बाग सदृश्य मोकळी जागा असे. संध्याकाळी तिथल्या कॅंटीनमध्ये चहा पित चकाट्या पिटणे हा आवडता उद्योग होता. गुलमोहोर रोडवर सायंतारा नावाची टपरी होती. तेथील साबुदाणा वडा फार फेमस होता. सिदधी बागेच्या समोर मोकळ्या जागेत नगरची सुप्रसिध्ध रॉयल कुल्फी मिळायची.

कुठेही असह्य अशी गर्दी नसायची, मोकळी कोरडी हवा, उन्हाळ्यात देखील मध्य रात्रीनंतर थंड वाटावे असे वातावरण आणि आटोपशीर, टुमदार असा शहराचा आकार. आपण लहान शहरात राहतो याची काही खंत नव्हती. नगरच्या काही खास गोष्टी इतर ठिकाणी सहसा मिळत नाहीत. त्या म्हणजे कणकेची बिस्किटं आणि रोट बनवून देणारी बेकरी, या बेकरींमधून मिळणारं आमण बिस्कीट नावाचा प्रकार, गुलाब रेवडी आणि मढी येथे मिळणाऱ्या मोठ्या आकाराच्या रेवड्या, नगरची पतंगबाजी, आणि बन्सीलालची चुरमा बर्फी.

टर्मीनेटर

नगर शहरातल्या 'न्यू टिळक' रस्त्यावरील 'नंदनवन' हॉटेल मध्ये बघितलेले एक दृष्य माझ्या कायम आठवणीत राहील 😀

१४ एप्रिलला दुपारी सव्वा दोन-अडीचच्या दरम्यान आम्ही तिथे जेवण्यासाठी गेलो होतो. मुख्य उपहारगृह, बार, फॅमिली रूम अशा खानपानाच्या (स्वतंत्र इमारतीत) व्यवस्था असणाऱ्या ह्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्किंग शेजारच्या मोकळ्या जागेत भव्य मांडव घालून त्यात तीस एक टेबल्स लावून (विस्तारित) बार तयार केला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यादिवशी 'ड्राय डे' होता, पण इथले दृष्य मात्र भलतेच विलक्षण होते. टळटळीत दुपार असूनही ग्राहकांनी तुडुंब भरलेल्या त्या 'विशेष' कक्षातले एकही टेबल रिकामे नव्हते. ड्राय डे च्या दिवशीही ग्राहक मंडळी जणू काही ३१ डिसेंबर असावा इतक्या सहजपणे मद्यपान करत होती हे बघून नगरकरांचा हेवा वाटला!
चार वर्षांपूर्वी २६ जानेवारीच्या दिवशी केरळ मध्ये असेच दृष्य पाहिले होते आणि केरळमध्ये २६ जानेवारी ह्या भारतीय प्रजासत्ताकदिनी देखील ड्राय डे नसतो हे समजले तेव्हा जसे आश्चर्य वाटले होते तसेच आश्चर्य इथले दृष्य पाहूनही वाटले, फक्त परिस्थिती उलट होती 😀

आलो आलो

नाही म्हणजे नंदनवन म्हटले कि आमच्याकडे भुवया वर होतात ड्राय डे च्या दिवशी
ईतर वेळी कोणी जास्त जात नाही तिकडे
२०० मीटर नियमावली वेळेस जबऱ्या गर्दी अनुभवलीये

टर्मीनेटर

सहज निवडले हॉटेल कि .....

परळीला जात असताना जेवणासाठी चांगले हॉटेल शोधत होतो, सहज दिसले, चांगले वाटले आणि

  • वातानुकूलीत स्वतंत्र फॅमिली रूम्स
  • व्हेज नॉन-व्हेज साठी दोन स्वतंत्र किचन्स

अशी वैशिष्ट्ये वाचून इथे जायचे ठरवले.

पण बाकी काही असो इथले जेवण मात्र खूप छान होते. 'पनीर तुफानी', काळा मसाला घालून बनवलेली 'शेव भाजी', 'दाल तडका', 'जिरा राईस', 'मसाला ताक' असे सर्वच पदार्थ रुचकर होते.

nutanm

पूर्वी असे कट्टे पुणे वठाणे येथे होत मग आताच काय झालय? ,आम्हा नविन एकही कट्टा न बघीतलेल्याना अनुभवता येईल व सोयीचे होईल . तरी पुणे ठाणे येथे एक कट्टा कराच आम्हा नविन मेंबरांना अनुभवता येइल.

nutanm

तसेच इतरांची नांवे , लेख प्रतिक्रिया भांडणे वाचतो त्यांची ओळख होईल व नवे अनुभव येतील.

इथे एकमेकांशी कचाकचा भांडणारे लोक कट्ट्याला मात्र एकमेकांच्या बशीतला चहा पितात असे ऐकुन आहे
खखोदेजा
पैजारबुवा,

तसेच आहे ....

वैचारिक मतभेद, वैयक्तिक मनभेदात रुपांतरीत होत नाहीत...

एका बशीत चहा पिणारे, नंतर देखील इथे, वैचारिक मतभेद व्यक्त करत असतातच....

चिक्कु

अहमदनगर चे नामांतर केल्यास अंबिकानगर चांगले वाटेल की शहाजी नगर? मला शहाजीनगर ठेवलेलं आवडेल.

चित्रगुप्त

थोडीशी अक्षरांची फेर्जुळवणी करून 'द अहम नगर' करता येईल.
फोटोसकट कट्ट्याच्या वृत्तांताची प्रतिक्षा आहे. शुभेच्छा.

चौथा कोनाडा

अहमदनगरचे "आनंदनगर" अशी ही मागणी काही लोकांनी केल्याचे आठवते.

टर्मीनेटर

@ आलो आलो

काल रातच्याला नगरात पोचल्यांव, आता टाकळी ढोकेश्वर लेणी आणि लवणस्तंभ बघायला चाललोय... सांजच्याला भेटूयात....

टर्मीनेटर

मस्त झाला कट्टा!
आलो आलो (विशाल), भक्ती आणि त्यांची मुलगी गिरीजा, मी आणि माझी बायको असे पाच जण उपस्थित होतो.
कट्ट्याचा वृत्तांत भक्ती किंवा आलो आलो ह्यांनी लिहावा, बाकीचे त्यात भर टाकतीलच!

1
डावीकडून मी, विशाल, अदिती, गिरीजा आणि भक्ती.

2

2
नगरचे ग्रामदैवत.

Bhakti

+१
विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो,ज्याचा लाभ काल पुन्हा मिळाला.

टर्मीनेटर

विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो

+१०००

त्याबाबतीत तुम्ही नगरकर खूपच भाग्यवान आहात. आम्ही हा सुंदर अनुभव पहिल्यांदाच घेतला. आपल्याकडे वेळ कमी होता नाहीतर नगारा आणि अन्य मंगलवाद्यांच्या साथीने सुमारे तासभर होणारी ही आरती पूर्ण ऐकायला नक्कीच आवडले असते!

आलो आलो

|| कै. तात्या म्हाराज कि जै ||
मिपा संस्थापक तात्यासायाब ह्यांनी मिपा संस्कृतीमध्ये कट्ट्याची सुरुवात करून दिली त्या संस्कृतीला अनुसरून आज आपले सर्वांचे लाडके (प्रसिद्द्य लेखक) टर्मिनेटर भौ ह्यांच्या फुडाकाराने आमच्या अहमदनगरात मिपा कट्टा साजरा झाला.
या कट्ट्याला याची देही उपस्थिती लावता आली यातच आम्ही धान्य जाहलो.
मागच्या आठवड्यात टर्मिनेटर सायबांनी अहमदनगर कट्ट्याचा धागा काढला आणि आपुन नी लगेच कट्ट्याला जायचा निर्धार केला व तसा तो त्यांना लगेच कळवला.
मिपा वरील आमच्या नगरच्या (एकमेव ऍक्टिव्ह) असलेल्या भक्ती तैनीं सुद्धा लगेच उत्साह दाखविला त्याबद्दल अखिल नगर मिपा संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.
या ऐतिहासिक कट्ट्याला टर्मिनेटर भौ त्यांच्या सुविद्य पत्नी सह तसेच भक्ती तै आपल्या छकुली (गिरीजा सह ) व अस्मादिक (एकलेच) असा भव्य जनसागर लोटला होता.
फूडच्या कट्ट्यासाठी आजपासूनच तैय्यारी सुरू ..... अर्रर्ये - बोल बजरंग बली कि जय |

असो .... टर्मिनेटर भाऊ यांनी आपल्या घाईच्या शेड्युलमध्ये कट्ट्यासाठी आवर्जून वेळ राखला व ठरल्याप्रमाणे कट्टा साजरा केला व भक्ती ताईंनी सुद्धा त्यांच्या कामातून वेळ काढून कट्ट्यासाठी उपस्थिती लावली हे पाहून अस्सल मिपाकर असल्याचा आज खरेच आनंद झाला.
सर्व मिपाकर बंधू भगिनींचे आभार सर्व लेखकांचे आभार आमच्यासारख्या बाकीच्या सर्व वाचकांचे आभार हम सबको यह मौका देनेके लिये मिपा के सभी संपादकोंका आभार .
या कट्ट्याचा साद्यन्त - सचित्र असा वृत्तांत प्रसिद्ध लेखक टर्मिनेटर भाऊ अथवा प्रसिद्ध लेखिका भक्ती ताई आपल्या ओघवत्या लेखणीतून आपल्यासमोर लवकरच देतीलच तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द आहेत.
कळावे
लोभ असावा

Bhakti

छान लिहिलंय.
श्री व सौ टर्मीनेटर यांनी आत्मियतेने कट्टयाला उपस्थिती दाखवली,छान वाटलं.आलो आलो यांना बराच वेळ वाट पाहावी वाटली, क्षमस्व.माझी व्यर्थ लुडबुड (मुलगी) बरोबर असल्यामुळे जरा फास्टच झाला कट्टा!
नगरात काय पाहायला आहे? यावर अनेक पर्याय मिळाले.
सगळे लिहीत राहा! :)

चौथा कोनाडा

भारी पोचवृतांत, "आलो आलो" !
नावाला जागून कट्ट्याला आलात (म्हंजे उपस्थित राहिलात), लै भारी
झकास !!!

ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !

आलो आलो

चौ को भौ आमच्या नगरात नेहमीच पाऊस कमी.... कला सांस्कृतिकदेखील.... त्यामुळे मिपा वरील साहित्य वर्षा हीच आमची वाचनाची तृष्णा भागविण्याचे हक्काचे व्यासपीठ ....आणि चक्क वळिवाप्रमाणे टर्मिनेटर भौनीं कट्ट्याचे नियोजन केले म्हटल्यावर आमची हजेरी क्रमप्राप्तच.
एके दिवशी मराठी याहू M1 येथील एका मित्राने (कळव्याचा खोटा सिक्का ID होता का तो ?) मिपा बद्दल ओळख करून दिली.
त्यानंतरची बरीच वर्षे (अंदाजे १० ?) मिपा वाचक म्हणून रेग्युलर वावरत आहे.
कै. तात्या सोबत बऱ्याचदा फोनवर आणि फेबु वर संवादहि झालाय पण बाकी कोणाशीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क झालाच नाही ...किंबहुना माझ्याकडून तसा काही प्रयत्न केला गेला नाही (खंत ?)
चला आता कालपासून श्रीगणेशा झालाच आहे तर यापुढे नक्कीच.
माझ्या अबकड चे कौतुक करून प्रेरणा दिल्याबद्दल चौको आपले आभार व्यक्त करतो.

सर टोबी

वर वर पाहता असे वाटू शकते. या शहराला स्वतःची प्रसिद्धी करणं जमलं नाही. पण हे शहर कलाकारांच्या बाबतीत अगदीच दुष्काळी होते आणि आहे असं ज्यांना वाटते त्यांच्या साठी हा प्रतिसाद.

अमर भूपाळी मधील प्रसिद्ध गायक आणि नट पंडितराव नगरकर हे नगरचे. पटवर्धन चौकाजवळ असणाऱ्या लंके वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य नगरला होते. प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते. सी. रामचंद्र नगर जवळील चितळीचे. कृष्णाची हातखंडा भूमिका करणारे शाहू मोडक नगरचे. प्रसिद्ध मूर्तिकार साखळकर आणि अंबादास मुदगंटी तसेच मोल्डेड प्लास्टिक पासून अप्रतिम शिल्प बनवणारे प्रमोद कांबळे, फलज्योतिषमध्ये दबदबा असणारे दत्तू रेखी.

या खेरीज रेव्ह. टिळक यांची नगर ही कर्मभूमी. रामदास फुटाणे आणि जागतिक स्तरावर ग्रामीण आरोग्य सेवेचं आधारभूत कार्य केलेले डॉ. रमाकांत आरोळे हे नगरमधील जामखेड तालुक्यातील आहेत. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे नगरचे. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख प्रशासनाची सुरुवात करणारे अनिलकुमार लखिना यांनी नगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांची ओळख असणारे प्रारूप तयार केले.

नगरचे सहकार सभागृह हे कला व्यासपीठासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टीने एक आदर्श प्रारूप होते.

नगरला सकाळ सारखे आपल्याच शहराची टिमकी वाजवनारे वर्तमानपत्र मिळाले असते तर या शहराचा खूप बोलबाला झाला असता.

आलो आलो

धन्यवाद सर टोबी
आपण खूपच मौलिक माहिती दिलीत काहींबद्दल माहिती आहेच तर काही नवीन ज्ञान प्राप्त झाले .
उण्यापुऱ्या चाळीस वयातील पहिली शालेय १५ वर्षानंतर कॉलेज व त्यानंतर व्यावसायिक तथा नोकरीनिमित्ताने या ना त्या कारणास्तव पुणे मुंबई औरंगाबाद असे विविध ठिकाणी अशी भटकंती केल्यावर आता मागील काही वर्षांपासून नगरलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय तरीही जन्मभूमी बद्दल अजूनही म्हणावी तेव्हडी माहिती नाही हे कबूल
परंतु माझ्या प्रतिक्रियेमध्ये मी अगदीच दुष्काळ नव्हे तर मुं पु च्या तुलनेने थोडा कमी वर्षाव असा उल्लेख आहे तो देखील कट्ट्याच्या अनुषंगाने
नगरबद्दल आणि नगरी असल्याबद्दलचा खचितच अभिमान आहेच आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे तो अजून वाढलाय हेवेसांनलगे
पुनश्च धन्यवाद !

टर्मीनेटर

छान माहिती दिलीत सर टोबी 👍

माणिक चौकात जिथे आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या बरोब्बर समोरची मालमत्ता सुप्रसिद्ध सिने अभिनेते 'कै. सदाशिव अमरापूरकर' ह्यांची असल्याचे आणि प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते हे आलो आलो ह्यांनी परवा सांगितले होते, त्याव्यतिरिक्त आपण दिलेल्या मौलिक माहितीसाठी आभारी आहे 🙏

कंजूस

या प्रभावी बादशहाने शेवटची संध्याकाळ इथे घालवली.

टर्मीनेटर

इथे की खुलताबाद इथे?
नक्की नाही, पण मला खुलताबाद येथे घालवल्याचे वाचल्यासारखे अंधुकसे आठवतंय.

चौथा कोनाडा

बरोबर कंजूस जी !

"तब्बल ४९ वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने अहमदनगर जवळील भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला.

आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. १६८१ मध्ये सुरू झालेली ही मोहीम १७०७ मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं १६८३ मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी १७०६ मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी १७०७ मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.

औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत.

औरंगझेबाने मृत्यूपुर्वी इच्छा व्यक्त केली होती की "आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, त्यानुसार आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्याचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.

संदर्भः आंजा

आलो आलो

हाकेच्या अंतरावर असूनही परधर्मीय प्रार्थनास्थळ आणी औरंगजेब चे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण एवढीच माहिती आजपर्यंत दिली किंवा मिळाली ( कदाचित अनुल्लेखाने मारणे हा हेतू असावा )
असो पूर्वी तिकडे फक्त मुस्लिम वस्तीच होती परंतु आता भरपूर नव्या टाउनशिप आणि रो स्कीमा झाल्यामुळे हिंदू बहुसंख्य आहेत
तरी त्या मशिदीच्या आसपास मात्र मुस्लिम एरियाच आहे आधी त्या संपूर्ण एरीयाला आलमगीर म्हणूनच संबोधले जायचे परंतु आता दत्तनगर विजयनगर मधुबन सोसायटी माधवबाग सोसायटी असे विविध नामकरण होऊन हिंदुबहुल वस्ती वाढली आहे. शिवाय मिलिटरी ट्रेनिंग एरियासुद्धा तेथून जवळच आहे तेथे रणगाड्यांचा सराव होत असतो
भिंगारला देशातील सर्वात मोठे टॅंक ट्रेनिंग रेजिमेंट आहे.
औरंगजेबाच्या मुक्कामाच्या काळातच
मिनीनाथ महाराजांच्या समाधीला मिरावली दर्ग्यात रूपांतरित केले अशी एक कथा ऐकिवात आहे खखोदेजा .....

टर्मीनेटर

चांगली माहिती चौ. को. 🙏
मायला हल्ली शाळेत शिकलेला इतिहास विसरत चाललो आहे 😀

मनो

पुण्याची प्रगती होण्याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणाच्या उत्तम सोयी. आमच्या काळात नगरमध्ये विळद घाटात एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज होते, आणि पुण्यात १२/१४ पर्याय होते. तीच बाब इतर कॉलेजची, सप, फर्ग्युसनच्या तुलनेचे नगरमध्ये काय आहे? शिक्षणातूनच पुढे कंपन्या वाढल्या, आणि त्यातून अर्थकारण. नगर तसेच मोठे खेडे राहिलेले आहे.

सर टोबी

बजाज उद्योग समूहात सामिल असलेला फिरोदिया उद्योग समूह मूळचा नगरचा. याच उद्योग समूहाने पुढे दुचाकी क्षेत्रातील क्रांती ठरलेली लुना मोपेड बाजारात आणली जिला नंतर टीव्हीस आणि हिरो उद्योग समूहाकडून स्पर्धा निर्माण झाली. गुटखा किंग धारिवाल उद्योग समूह पण नगरचा. पूर्वी त्यांची ऑइल मिल स्टेशन रोडवर होती. धूतपापेश्वर यांची पनवेल नंतरची फॅक्टरी नगरला होती. त्याच बरोबर वैद्य नानल यांचा आफाली हा आयुर्वेदिक औषधांचा कारखानापण नगरला होता. व्हिडीओकॉनचे धूत नगरचे. त्याच बरोबर पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा फक्त नगरला होती.

व्हीआरडीई हे नवीन वाहनांची चाचणी घेणारे केंद्र चेन्नई नंतर फक्त नगर येथे आहे.

लखनौला असलेला बडा इमामचे एक पिठ नगरला आहे त्याला स्थानिक भाषेत बारा इमाम म्हटले जाते. तसेच बुर्हाण नगर येथील मंदिर हे तुळजापूरचे पिठ समजले जाते.

नगरचा रामप्रसाद चिवडा हा पुण्यातील लक्ष्मीनारायण चिवड्याइतकाच जुना आणि दर्जाने काकणभर जास्तच चांगला असा चिवडा आहे.

टर्मीनेटर

ही माहिती देखील आवडली.

पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा

'हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी' विषयी म्हणताय का तुम्ही?

एकंदरीत नगरला एवढी औद्योगिक, सांस्कृतिक परंपरा लाभली असूनही हे शहर/ हा प्रदेश खरोखर दुर्लक्षित राहिला आहे हे खरेच! अर्थात त्याचे कारणही तुम्ही आधीच्या प्रतिसादात दिले आहेच.

'गाय छाप' वाले मालपाणी हे आत्याच्या मिस्टरांचे अतिशय जवळचे मित्र होते त्यामुळे नगर जिल्ह्यातील हे एकमेव प्रस्थ मला माहित होते. पण इथे तुम्ही अनेक प्रस्थांची मंदियाळीच सादर केली आहे!

Bhakti

+१
सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी Masters in Mass Communication न्यू आर्ट या महाविद्यालयातून पूर्ण केले आणि त्या दरम्यान इथेच प्रोजेक्ट म्हणून केलेला 'पिस्तुल्या' या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.नागराज यांना नगरबद्दल कायम आस्था आहे.

टर्मीनेटर

ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !

सहमत!

नगर कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही तुमच्या हटके लेखनशैलीत लिहावा अशी आग्रहाची विनंती 🙏

ॲबसेंट माइंडेड…

छान. सविस्तर वृत्तांत लवकर येऊदेत.

आलो आलो

बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा पुण्यात .... भेटू कि सगळे

बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा पुण्यात .... भेटू कि सगळे

आलो आलो

नक्कीच प्रयत्न करिन

मंडळी कळवा

आमी बी पुण्यात, येऊ की वाड्यावर म्हणजे शनिवार वाड्यावर.बक्कळ जागा हाय.

अहो मी इथे कधीचा कॉलींग करतोय, पण कुणी मनावर घेईल तर शपथ!

सं - दी - प

प्रचेतस

आठवड्यातून एक दोन तरी असतात, फक्त जाहीर होत नाहीत इतकेच. इकडील स्थानिक मिपाकर वरचेवर भेटत असतात.

कंजूस

आणि मग मिपाकर.
कट्ट्याची जागा अशी असावी की तिथे काही पाहण्यासारखे असावे. जसे अगोदरचे घारापुरी,नेरळ वनविहार,माथेरान ( मिनी झाला).
म्हणून एक कर्नाळा युसुफ मेहरल्ली सेंटर'चा सुचवला टर्मिनेटरना.

चौथा कोनाडा

पिंचिंवाडीतील मिपा कट्टा पिंचिं नवनगर प्राधिकरणात गणेश तलाव, वीर सावरकर उद्यान येथे ७ वर्षांपुर्वी झाला होता, त्याला सपत्निक उपस्थित राहण्याचा सुंदर योग आला होता !

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

धाग्यात डॉ. सुहास म्हात्रे उर्फ (इस्पिक एक्का अर्थात एक्काकाका ) यांनी काढलेले सुंदर फोटो चुकवू नका !

टर्मीनेटर

भारीच झाला होता हो 'प्राधिकरण कट्टा'.
फोटोही मस्तच 👍

कंजूस

हिरवळ फक्त बागेतच उरली नाही. पाहु तिथे असते.

प्रचेतस

कट्टा वृत्तांत येऊ द्यात लवकर. फारच धमाल केली असे दिसतेय.

टर्मीनेटर

भक्ती सध्या व्यस्त आहेत त्यामुळे 'आलो आलो' ह्यांनी (त्यांच्या व्यस्त दैनंदिन वेळापत्रकातून थोडा वेळ काढून) कट्टा वृत्तांत लिहिण्याचे मनावर घ्यावे अशी आग्रहाची विनंती मी पुन्हा एकदा करत आहे!

आलो आलो

आपल्या कट्टा भेटीत मी सांगितल्याप्रमाणे कट्ट्याच्या दुसऱ्याच दिवशी मी व्यावसायिक व खाजगी कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....

टर्मीनेटर

कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....

हरकत नाही! धंदा पहले भाया....

मदनबाण

वा... कट्टा छान झालेला दिसतोय... वरती गणपती बाप्पाचा फोटो पाहुन क्षणभर उगाच इंदुर च्या बडा गणपतीची आठवण आली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)

टर्मीनेटर

बऱ्याच वर्षांपूर्वी इंदूरला गेलोय पण 'बडा गणपती' पहिल्याचे आठवत नाही!

आलो आलो

पायाच्या ठेवणीत जाणावणारा फरक सोडला तर आठवण येण्याईतपत साम्य आहे नक्किच

मनो

माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नगरचे आयुष्य पूर्वीतरी बरेच संथ होते, त्यामुळं भरपूर वेळ हाताशी आणि करण्यासारखे फार थोडं असायचं. गाव इतकं लहान की सायकलवर कुठेही सहज जाता येत असे. एका दिशेला चांदबीबी महाल ते दुसऱ्या दिशेला डोंगरगणपर्यंत सायकलवर निवांत जात येत असे. मित्र घरून कुठे गेला ते माहीत नसले तरी तो कोणत्या दिशेला गेला त्यावरून आम्ही मग काढत त्याचा शोध लावत असू. आता नुसत्या दुचाकी गाड्या इतक्या झाल्या आहेत की पार्किंगला जागा पुरत नाही. त्या काळात अशोकभाऊ फिरोदिया सोसायटीचे अध्यक्ष होते आणि शहराच्या आर्थिक नाड्या आणि बाजार इत्यादी मारवाडी समाजाच्या हातात होते. आजची परिस्थिती माहीत नाही.

Bhakti

आजची परिस्थिती माहीत नाही

अजूनही मारवाडी समाजामार्फत व्यापार वाढतोय.फिरोदिया कुटुंबातील नरेंद्र फिरोदिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम​ आयोजित करण्यात आघाडीवर आहेत.सावेडी(नगरच कोथरूड) हे उपनगर जोमात प्रगतीशील झाले आहे.उद्योग क्षेत्रात अजूनही पिछेहाट होत आहे.एका बाजूला औरंगाबाद आणि एका बाजूला पुणे अशी मोठी शहरे असूनही फायदा करून घेता आला नाही.फ्लाय ओव्हरमुळे जरा चांगला लूक आलाय.सध्या यास वृद्ध शहर म्हणतात,६०-७० दशकातील पिढीने मोठमोठाली मालमत्ता येथे घेतली परंतु त्यांची तरुण मुले इतरत्र पोटापाण्यासाठी स्थायिक झाली.एकंदरीत अजूनही संथ वाहते सीना नदी ;)

आलो आलो

भक्ती ताई
मागील ५-७ वर्षांपासून सकारात्मक बदल होतोय अगदी जाणवण्याइतपत
माझ्याच माहितीतील १०-१२ जण (माझ्यासह) गड्या आपुला गाव बरा असे म्हणत परत नगरला येऊन इथेच स्थायिक होत आहेत
म्हणजे तिकडील बाजू कमकुवत झाली किंवा नाईलाज आहे म्हणून नाही तर चॉईस करून ठरवून प्लॅन करून बिझनेस स्वयंरोजगार व औद्योगिक क्षेत्रात देखील आपले पाय स्थिरावत आहे
याला आश्वासक बदल किंवा बदलाची सुरुवात म्हणू शकतो (का ?)

टर्मीनेटर

माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे.

म्हणजे हेच आताचे 'विशाल गणपती' मंदिर आहे का? तसे असेल तर नव्याने बांधलेले हे मंदिर छानच आहे, अर्थात जुने लाकडी मंदिर पाहिले नसल्याने तुलना करता येत नाहीये!

तुमच्याही आठवणी आणि शहर आवडले 👍

अहमदनगरचा कट्टा जोरदार झालेला दिसतोय. सर्व उपस्थितांचे अभिनंदन.
या धाग्यावर अहमदनगरबाबत उत्तम माहिती वाचायला मिळाली.
अहमदनगर शहराबाबत श्री आनंद शितोळे यांचा वाचनीय लेख - काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर.

टर्मिनेटर यांची भटकंती आणि कट्टा उत्तम झाला आहे.
इतर प्रतिसादातून नगरविषयी भरपूर माहिती मिळत आहे.

चौथा कोनाडा

छान संदर्भ. धन्यवाद !
लेख वाचून गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या !
स्थानिकांनी कोर्टात जाऊन वेशी वाचवल्या हे खरंच कौतुकास्पद.
माझ्या गावतली महत्वाची वेस तातडीने निर्णय घेऊन १९८२ मध्ये पाडली गेली होती. स्थानिकांना काहीच करता आले नव्हते.
एक महत्वाचा वारसा अस्तंगत झाल्याबद्द्ल नागरिक हळहळले !

छान भटकंटी, कट्टा आणि वृत्तांत!
मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो पण सध्या फारच बिझी आहे त्यामुळे नाही जमले.
असो, या नगर कट्ट्याच्या धाग्याच्या निमीत्ताने नगर बद्दल बरीच माहीती कळाली. कधीतरी निवांत एकदोन दिवस भटकंती नक्की होईल नगरला.

सं - दी - प

टर्मीनेटर

मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो

तो विचार प्रत्यक्षात आणला असतात तर मजा आली असती, द्वारकासिंगच्या लस्सीला मुकलात 😀

मिपाकर 'नगरी' ह्यांचाही व्यनी कट्टा सुरु होण्याच्या थोडा आधी आला होता पण दुर्दैवाने तो उशिरा वाचला गेला त्यामुळे त्यांना कट्ट्याची वेळ आणि ठिकाण कळवता नाही आले ह्यची खंत वाटते आहे.

जेम्स वांड

कट्टा उत्तमच झालेला दिसतो, लवकर वृत्तांत लिहा आणि रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा

तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर

टर्मीनेटर

रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा

येस सर!

तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर

पाचवा भाग अर्धा लिहून झालाय पण पूर्ण करण्यास मुहूर्त लागत नाहीये अजून 😔

चिक्कु

आमच्या शहराविषयी बरिच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अहमदनगर मिपाकरांचे आभार. शहराच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल असे औरंगाबाद ते अहमदनगर आणी नगर ते कल्याण असे विलंबित रेल्वे मार्ग मंजुर होऊन प्रत्यक्षात यायला हवेत. सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे साठी गडकरी यांचे आभार त्याचबरोबर कल्याण ते नांदेड असाच हायवे मंजुर करण्यात यावा अशा गडकरी यांच्या कडे अपेक्षा आहेत.दौंढ ते मनमाड दरम्यान रेल्वे चे इलेक्ट्रिफिकेशन झाले त्याचबरोबर दुहेरीकरण चालु आहे. गडकरी यांनी वाघोली ते शिरूर असा जो मेगाप्रोजेक्ट घोषणा केली आहे त्याला भविष्यात अहमदनगर पर्यंत वाढविण्यात यावे. शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा. अहमदनगर मधिल बरीच कुशल, अकुशल कामगार जनता पुणे येथील चाकण, रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत आपली रोजीरोटी ,भाकरीचा चंद्र मिळवत आहेत. अहमदनगर चे मध्यवर्ती लोकेशन या जमेची बाजू असलेल्या गोष्टीचा हवा तितका उपयोग स्थानिक नेत्रुत्वाला करता आला नाही असे वाटते. मुळात आजुबाजुच्या लोकसभा खासदार यांनी मिळुन परिसरात केंद्राकडून मोठे मोठे प्रकल्प या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. पक्षिय राजकारण बाजूला ठेवून शिरूर,नगर दक्षिण,शिर्डी,बीड, औरंगाबाद,कल्याण , नाशिक, सोलापूर या मतदारसंघांतील खासदारांनी सतत संघटीत प्रयत्न करणे सामान्य नागरिकांना अपेक्षित .

शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा.

हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही.
पुण्यात, बेंगलोर मध्ये जी काही हिरवळ आज टिकून आहे, ती केवळ आणि केवळ लष्कर, मोठ्या संस्थांच्या जमिनी आणि त्यांच्यावरचे वृक्षारोपण यांच्यामुळेच.

पुण्याचा, बेंगलोरचा नकाशा उघडा. त्यातला लष्कराचा, कॅम्पांचा एरिया पाहा. तो वगळून शहर कसे असेल याची कल्पना करा.
वनराई ही श्रीमंत वस्त्यांमध्ये, लष्करी एरियांमध्येच टिकून आहे. बाकी शहर हे भेसूर आणि विद्रूपच आहे.

मला भारतीय सैन्यदलं हवीहवीशी वाटतात कारण त्यांच्या जागांमुळेच मोठ्या शहरांमधे थोडीफार झाडं शिल्लक आहेत.

चिक्कु

लष्कर शहरात असणं भाग्यांच नाही असा आमच्या प्रतिसादाचा अर्थ इथे अभिप्रेत नाही आणि तसा जर अर्थ वरील प्रतिसादातून अधोरेखित होत असेल तर आम्ही आमची प्रतिक्रिया उडवण्याची संपादक मंडळींना विनंती करतो. आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे आहे की लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल. याच समस्येला उपाय म्हणून प्रधानमंत्री गतीशक्ती योजना राबविण्यात येत आहे असे ऐकिवात आहे.
अहमदनगर शहरात तीन बाजूंनी लष्कर आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान असतो इतकेच नव्हे तर अहमदनगर मधे भारतातील सर्वात जास्त गुप्त दारूगोळा चा साठा आहे असे ऐकिवात आहे. खरं काय?खोटं काय? माहित नाही .

चौथा कोनाडा

लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल.......

या मुद्द्याशी सहमत चिक्कु.

नगर शहराबाहेरच्या सारोळा येथील टेकडीवरील देवळाला भेट दिली असता काढलेले दोन फोटोज (जानेवारी २०१८).

टर्मीनेटर

छान आहेत फोटोज!
पहिल्या फोटोत बऱ्यापैकी झाडे-झुडपे दिसत आहेत. खाली नगर जवळच्या मांजरसुंभा परिसरातील (डोंगरगण) गोरक्षगडावरून परवा काढलेला फोटो देत आहे. त्यात बराचसा परिसर रखरखीत दिसत आहे. तापमान ४१°C होते पण घाम मात्र येत नव्हता!

1

ह्या गडावरील शिव-गोरक्ष मंदिर देखील छान आहे.

2

चिक्कु

डोंगरगण ला आमच्या जेष्ठ भगिनीचे २००१ साली लग्न करण्यात आले होते. आमच्या गावापासून अंदाजे ७० किलोमीटरवर लग्न ठेवले होते. वर आणि वधू एकाच गावातील असल्यामुळे गावातील सर्व वर्हाडी मंडळींना डोंगरगण येथिल सिताची न्हानी इत्यादी इत्यादी देवस्थानच्या परिसरात दर्शन घडले होते.२००१ साली मी इयत्ता पहिली मधे असताना हे पाहिलेले आहे. एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.

टर्मीनेटर

एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.

एखाद्या दिवशी अचानक तिथे भेट देऊन या.

डोंगरगण गोरक्षगडावरून काढलेला शिव-गोरक्ष मंदिराच फोटो आवडला.
पहिला फोटो पुन्हा पावसाळ्यात काढल्यास हिरवा गालिचा आंथरलेला आहे असं दृश्य टिपता येईल.

नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला. मी रात्रीच्या वेळी गेलेलो. लै भारी दिसते. आणि मोठेही आहे.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर

नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला.

1

ह्याच मंदिराबद्दल म्हणताय का?
क्षीरसागर महाराजांचे (सावेडी) दत्त मंदिर म्हणुन प्रसिद्ध आहे. आम्ही गेलो होतो तिथे. पण गेटवरच बेल्ट काढून ठेवा, फोन स्विच ऑफ करा अशा सूचना तिथल्या सिक्युरिटी गार्डनी दिल्यावर मी बाहेरच थांबणे पसंत केले, असले नखरे असतील अशा ठिकाणी मी जात नाही, आखिर अपने भी कुछ उसूल हैं भाय 😀

घरची सगळी मंडळी आत जाऊन आली आणि मंदिर खूप छान असल्याचे त्यांनी सांगितले.
(ह्याच मंदिरात घरच्यांनी खूप वेळ घालवल्याने कट्ट्याची आधी ठरलेली ६:३० ची वेळ बदलून ती ७:०० ची करावी लागली!)

सुक्या

राहुरी ला शिकत असताना बर्‍याच वेळा ह्या मंदीरात गेलो आहे. तेव्हा हे अगदीच छोटे मंदिर होते (१९९३ - १९९७) . तेव्हाही तिथे बेल्ट काढून ठेवावा लागत असे. विद्यार्थीदशेत असल्याने तेव्हा फार काही वाटायचे नाही परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो. देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक.

बर्‍याच ठिकाणी मंदीरात आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत. नेला कुणी फोन मधे काढले दोन चार फोटो तर काय बिघडणार आहे?

टर्मीनेटर

परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो.

अगदी... अगदी.... 👍
फोटो काढण्यास मनाई बाबतही सहमत!

देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक.

चामडे हे मृत प्राण्याचा भाग आहे. अनेकदा ते शिकार करुन देखील कमावलेले असू शकते. देवाच्या दरबारी अशी हिंसेपासून मिळविलेली वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. त्यामुळेच चपला / बूट देखील बाहेर काढावे लागतात.

आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत.

बरीच कारणे आहेत.

गर्दीच्या वेळी फोटो काढणार्‍यांमुळे इतरांना व्यत्यय येतो. काही जण तर स्वतःचे फोटो व्यवस्थित यावेत म्हणून इतरांना बाजूला सरकायला सांगतात. भांडणे होतात.
मोबाईल फोनवर बोलल्याने इतरांना त्या आवाजाचा त्रास होतो. शांतताभंग, साधनेत व्यत्यय, इत्यादी.

काही ठिकाणी मंदिराची छायाचित्रे, सचित्र माहितीपुस्तके इत्यादी साहित्य विक्रीकरिता उपलब्ध असते. पर्यटकांनी स्वतःच फोटो काढले तर हे साहित्य विकले जात नाही.

मी स्वतः नास्तिक असल्याने असल्या नियमांचे समर्थन करीत नाही फक्त त्या नियमांमागील कारणे इथे विषद केली आहेत.

मला चप्पल / बूट काढून मंदिरात जाणे यात फारसे तथ्य वाटत नाही. कारण बुट (जर नाडीचे असतील) काढताना हात अस्वच्छ होतातच. तसेच बूट काढल्यानंतर त्यापुढच्या परिसरात धूळ, माती इतर अस्वच्छता असेल तर पाय देखील खराब होतात. त्यामुळे कोणासोबत मला जर मंदिरात जायची वेळ आलीच तर जिथवर चपला बूटांसहित जाता येते तिथवर मी जातो. मग पादत्राणे काढून इतर सोबती पुढे जातात मी त्यांची वाट पाहत तिथेच थांबतो.

अर्थात नारायणी धाम (तुंगार्ली, लोणावळ्याजवळ) सारखे मंदीर असल्यास आत देखील जातो. इथे चप्पल / बुट काढल्यावर पुढे जाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याने पायास घाण लागत नाही. तसेच बूट काढताना हात अस्वच्छ होत असल्याने तिथेच हात धुवायची उत्तम सोय देखील आहे. गेल्याच महिन्यात पत्नीच्या आग्रहाखातर बत्तीस वर्षांनी आमच्या मूळ गावी (देडगाव बालाजी - तालुका नेवासा - जिल्हा अहमदनगर) अजिबात गर्दी नसताना गेलो होतो तर अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच बूट काढले आणि सोबत मंदिर व्यवस्थापकाने पाणी ठेवले असल्याने हात धुवून मगच मंदिर प्रवेश केला. बेल्ट उतरवा, फोटो काढू नका असले काहीही बंधन नव्हते. तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच. फोन देखील चालूच ठेवला होता. इन फॅक्ट मंदिरास देणगी देखील फोन पे चा वापर करुनच दिली.

टर्मीनेटर

तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच.

हल्लीच्या सिंथेटीक लेदर / रेगझीनच्या काळात किती जण शुद्ध चामड्याचे पट्टे वापरत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल, त्यामुळेच असल्या नियमांचा राग येतो. शुद्ध चमड्याचा पट्टा असल्यास तो काढून ठेवण्यास भाविकांनाही हरकत नसावी.

सुरिया

मृगजीन चालायचे म्हणे पूर्वी. :)
बऱ्याच श्रीमंत घरात, आश्रम मठात मंदिरात असायची मृगाजिने.
आता फॉरेस्ट वाले जप्त करतात, तुरुंगात घालतात.

सर टोबी

शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते.

चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन.

तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.

सर टोबी

शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते.

चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन.

तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.

कंजूस

सर्व जण पाळतात. परदेशी लोक प्रसादाचे जेवणही जेवतात. गट्टे का साग विशेष.