Warning: array_flip(): Can only flip string and integer values, entry skipped in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 73 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).
Warning: array_flip(): Can only flip string and integer values, entry skipped in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 73 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).
Warning: array_flip(): Can only flip string and integer values, entry skipped in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 73 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).
Warning: array_flip(): Can only flip string and integer values, entry skipped in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 73 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).
"आई, यंदा गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक'जोशी वहिनींचे किचन'मधून आणायचे का?
आधी ऑनलाइन ऑर्डर द्यायची आहे."
इति माझा मुलगा.
"हो! आणा बाबांनो!" मी वेळ न दवडता उत्तर दिले.
बदलत्या काळानुसार बदलण्यातच शहाणपण आहे. आपल्याला आता होत नाही. विचारले हे काय कमी?
खरेच, किती काळ बदलला आहे.
माझे मन स्वातंत्र्यपूर्व व नंतर अगदी सत्तरच्या दशकापर्यंत गेले.
रेशनिंगचे दिवस!
आता खिशात पैसे किंवा कार्ड पेमेंट किंवा गूगल पे अशी टेक्नॉलॉजी वापरून काहीही होम डिलिव्हरी मागवू शकता. अगदी उकडीचे मोदकसुद्धा!
पण त्या काळात महिन्याची दोन टोके जुळवताना मध्यमवर्गीयांच्या नाकीनऊ येत. शेवटचा आठवडा 'पेपर विक(वीक)'!
सणावाराची तरतूद करायला लागायची, नाहीतर वाण्याची उधारी!
त्यात रेशनिंगचे दिवस. रेशनिंगच्या दुकानात उधारी नाही. रेशन कार्ड दाखवा पैसे मोजावे आणि ज्या क्वालिटीचे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी मिळेल ती मुकाट्याने घेऊन चालू पडा. नो चॉइस!
निळसर जांभळ्या रंगाच्या कार्डला दर महिन्याला पांढरी स्लिप लावून आणायची!
रेशनिंगचे दुकान सकाळी नऊ वाजता उघडायचे. एक आठवड्याचेच रेशन मिळायचे. पण सकाळी सात वाजल्यापासून लाइन लागायची. तरच नंबर लागायचा. उशीर झाला तर 'आजचा साठा संपला' हा बोर्ड पाहून हिरमुसले होऊन परत!
माझी मोठी बहीण व मी सकाळी सात वाजता नंबर लावत असू. आई घरकाम करून दहा वाजता यायची. वडिलांची फिरती नोकरी.
गहू लाल किंवा पांढरा नि:सत्त्व! आयात केलेला. कॅनडा, अमेरिका.. जिथे तो गुरांना घालत. ज्वारी लाल. तांदूळ बरेचदा उकडा किंवा जाडाभरडा. धान्यात खडे कुच्चर, काड्या, पोरकिडे ह्यांची रेलचेल!
आमच्या खाली नारू आणि चक्कू हे मद्रासी भाऊ राहत. त्या वेळी 'साउथ इंडियन' शब्द रूढ नव्हता. नारूची पत्नी जानकीवहिनी हिने एक युक्ती सुचवली - "तुमचे उकडे तांदूळ आम्हाला द्या, आमचे गहू तुम्ही घ्या." त्या वेळी आपल्याला इडली-डोसा माहीत नव्हता
काय असेल तो डिफरन्स देऊन टाकायचा.
तेव्हा आम्ही विलेपार्ले इथे गोखले वाडीत राहत होतो. आमचे सगळे खानदान यूपी, एमपी, गुजराथ, राजस्थान इकडे वसलेले. तिकडे ओला नारळ त्या वेळी मिळत नसे. तांदळापेक्षा गव्हाचा आहार जास्त. त्यामुळे कोरड्या खोबऱ्याचे कणकेचे तळलेले मोदक आणि करंज्या. कणकेचे मोदक करा की उकडीचे मोदक, धान्याची क्वालिटी अगदी 'वाखाणण्याजोगी' असायची. पण आपले गणपतीबाप्पा सगळे गोड मानून घ्यायचे.
आता खुल्या बाजारात अगदी स्वच्छ निवडलेले धान्य मिळते.
नंतर हळूहळू बदल होत गेला. रेशन कार्ड जाऊन पुस्तिका आली. आता तर रेशन कार्ड फक्त दारिद्रयरेषेखालील नागरिकांना लागते.
आज जसे आधार कार्ड, पॅन कार्ड लागते, तसेच त्या वेळी रेशन कार्ड लागायचे. मी आमचे रेशन कार्ड त्या काळाची आठवण म्हणून जपून ठेवले आहे. आता त्या रेशन कार्डाला कोणी विचारत नाही. तर असे ते रेशनिंगचे दिवस. प्रत्येक राज्यात नियम वेगळे वेगळे.
घरी बाळ जन्माला आले, मुलाचे लग्न होऊन सून आली की बर्थ सर्टिफिकेट, लग्नपत्रिका नेऊन रेशन कार्डात नाव वाढवून घ्यायचे आणि मुलगी लग्न करून सासरी गेली, कोणी वैकुंठवासी झाले तरी लग्नपत्रिका, मॅरेज सर्टिफिकेट वा मृत्युदाखला दाखवून नाव कमी करायचे. ही कामे एका खेपेत कधीही होत नसत.
मंगलकार्यासाठी किंवा श्राद्धविधीसाठी निमंत्रण पत्रिका वा डेथ सर्टिफिकेट दाखवून ५० जणांसाठी आपला नेहमीचा स्वैपाक परवानगी मिळायची.
पण जास्त मंडळी असतील तर मेनू अशा प्रकारे साधारण -
टोमॅटो सार, वऱ्याच्या तांदळाचा भात / मसालेभात, राजगिरा पुऱ्या, आरारूट जिलबी, बटाटेवडे / भजी, कोशिंबीर, दही-ताक.
चहा गुळाचा कितीही करा, पण साखरेचा ५० कप.
रेशनिंगचे तपासणी अधिकारी अचानक येत. मग एक धावपळ नियम मोडले असतील तर!
त्या वेळी पर पात्री रेट्स नव्हते. एकूण किती पाने? कधीकधी कार्यालयाचे आचारी असत, तर कधी आपल्याला सोय करावी लागायची. पण म्हणून मंगलकार्य वा श्राद्धविधी होण्याचे थांबले नव्हते. बऱ्याच प्रकारे 'अॅडजस्टमेंट' चालायची, तुम्ही आम्हाला समजून घ्या, आम्ही तुम्हाला!
सुज्ञ वाचक समजतीलच.
रिसेप्शनला बटाटेवडा, साबुदाणा खिचडी, आरे दूध डेअरीचे गोड दूध चालायचे.
ह्यातून ब्लॅक मार्केटिंग जन्मले. जिथे निर्बंध नव्हते, तिथून धान्य यायचे. लोक अडीअडचण, समारंभ म्हणून चार पैसे जास्त मोजून घ्यायचे. रेशन दुकानदार धान्य संपले म्हणून बोर्ड लावायचा आणि ते धान्य ब्लॅकने विकायचा. रेशनचे अन्न खाऊन खाऊन कंटाळलेले सामान्य लोक घ्यायचे. श्रीमंतांना कसलीच चिंता नसते.
गुजरातमधून साखर दोन शेर आणता यायची. मग आमचे नातेवाईक येताना आणत असत. तर एका मामांनी चक्क श्रीखंडच आणले. त्या वेळी फ्रीज नव्हते, त्यामुळे एका दिवसात सगळे श्रीखंड फस्त!
महू (मध्य प्रदेश) येथे आमचे काका-काकू राहत. गहू आणायला बंदी होती, पण कणीक आणता येत असे. खांडवा गव्हाची डबाभर कणीक ते दर वर्षी आणत. मग काय? छान पिवळसर पोळ्या!
लाल-पांढऱ्या पोळ्यांना सुट्टी! ठाणे जिल्ह्यातून दोन शेर तांदूळ आणता येत असे.
उल्हासनगर (यूएसए)हून २-२ शेराच्या पोटल्या घेऊन बायका रेल्वेच्या डब्यात किंवा ठरावीक ठिकाणी जाऊन विकत असत. सुरती कोलम किंवा आंबेमोहोर किंवा कमोद! बासमतीचे आगमन झाले नव्हते.
रेशनिंगचा एक किस्सा लिहून लेख पूर्ण करते.
विलेपार्ले इथे एका मोठ्या बंगल्यात रेशनिंग ऑफिस होते. बाहेरच्या दालनात आठ-दहा टेबले, सगळा महिला वर्ग. आतल्या दालनात साहेब बसत. तिथे जायला झुलते दार ढकलून आत जायचे.
मोठी बहीण दहा वर्षे, मी आठ वर्षे. एकदा आईने आम्हाला कार्डावर स्लिप लावायला पाठवले.
लहान मुली पाहून त्या बायका एका टेबलावरून दुसऱ्या असे पाच-सात वेळा केले. आमची टिंगल करू लागल्या. फिदीफिदी हसत होत्या.
बहीण म्हणाली, "आपण परत जाऊ."
मी तिला म्हणाले, "नको, आपण साहेबांना सांगू."
तिच्या हो-नाहीची वाट न बघता हात धरून सरळ झुलते दार ढकलून साहेबांच्या दालनात गेले. एका दमात साहेबांना सांगितले, "साहेब! आमच्या वडिलांची फिरती असते. आईला घरी काम असते. म्हणून आईने आम्हाला स्लिप लावायला पाठवले. पण बाहेर बसलेल्या मावश्या आमची टिंगल करतात. स्लिप लावून देत नाहीत."
साहेब चांगले होते. "चला, बघतो मी!"
बाहेर येऊन साहेबांनी त्या महिलांना चांगला दम भरला. "लहान मुलींना मदत करायची की टिंगल करायची? माझ्यासमोर स्लिप लावून द्या."
एकीने मुकाट्याने स्लिप लावून दिली. त्या आमच्याकडे रागाने बघत होत्या.
त्या वेळी 'थँक्यू' वगैरे म्हणणे माहीत नव्हते. मी फक्त "साहेब! तुम्ही चांगले साहेब आहात" असे म्हटले.
घरी आल्यावर बहिणीने आईला सगळा किस्सा सांगितला. आईने मला जवळ घेतले. "माझी गुणाची पोर ती" असे म्हणाली. मग वाडीमध्ये बरेच दिवस कौतुकाचा विषय झाला. मूठभर मांस चढणे ह्या म्हणीचा प्रत्यय आला.
अनुराधा काळे (वय ८२)
ठाणे (प) 400602)
ओघवते सुंदर लिखाण. मी रेशन कार्ड कधी बघितलं नाही पण तुमच्या लिखाणातून एक चित्र तयार झाले. आत्ता जरी या आठवणी रोचक वगैरे वाटत असल्या तरी त्या काळी बरेच त्रास सहन करावे लागले असतील.
अहो - जाहो पद्धतीने(च) बोलतो,
पण मला तुझ्यात माझी आजी दिसतेय ग अनुराधा आजी :) .
तुझ्या पिढीने आहे तो आनंद मानला, साजरा केला (पर्याय नव्हता दुसरा आणि काय !) स्वतः जगलात, आम्हाला जगात आणलेत म्हणून आज ऑनलाईन मोदक आहेत चैन करायला !
रेशनिंग अन्नधान्य, रॉकेल, कापडचोपड, सगळे फेस करूनही आपला समाज वर्धिष्णू राहिला ह्यात तुझ्यासारख्या कैक खंबीरपणे वयाच्या १०व्या वर्षी स्लिपा लावून आणणाऱ्या कैक आज्यांची मेहनत अन् पुण्याई आहे.
लेख आवडला ग आजी, लिहीत जा स्मरणरंजन अधूनमधून :)
अनुराधाताई थोडक्यात पण छान लिहीलयस. आजच्या पिढीला जन्माला घालताना वाढवताना मागच्या पिढीने काय कळा सोसल्यात कळणार नाही.
त्याकाळात रेशनचे धान्य आणणे म्हणजे स्वराज्यात एक गड जिंकून आणण्या सारखे होते. कधी कधी तर शाळा बुडवावी लागे.
मिलो,म्हणजे लाल ज्वारी कार्डावर घ्यायला लागायची तरच गहू साखर मिळायची.
१९७० मधे राजेश खन्ना आशा पारेख यांचा चित्रपट आला होता "आन मिलो सजना ",आम्ही मुलांनी त्याला आण मिलो सजणा करून रेशनच्या लाल ज्वारी,मिलो बरोबर जोडलाय होत.
केरोसिन, मका,सुकडी ,पाम तेल इत्यादी पदार्थ सुद्धा रेशन कार्डावर मिळायचे.
लग्न,मुंजी करता पाच किलो ज्यादा साखर मीळायची.
अशा अनेक आठवणी.
एक वेळ सरसकटीकरण परवडलं. नशीब कर्नल काकांनी एखादी करुण कविता नाही केली. नाही तर मूळ लेख परवडला पण हा अत्त्याचार नको असं झालं असतं.
कर्नल काका हळूच घ्या. :)
करुण कविता नाही केली.
प्रश्नच येत नाही.
शाळेला दांडी मारून रेशनच्या लाईनीत मित्रांबरोबर मस्ती करायची मजाच वेगळी होती.
वर "किती गुणाच गं बाळ माझं", प्रशस्तीपत्रक.
गुळ दाणे खोबरं चोरून खाल्ल्याचे एक दोन गुन्हे माफ.
मी नाही जात,माझे पाय दुखतात,अभ्यास आहे म्हणले तर रावळगाव चाॅकलेट,खारी बिस्कीट गारीगार,कुल्फीची लाच.
काय भौ,ठिक हाय आम्ही म्हातारे, पण सारख सारखं रडगाणं नाय गात.
हे घाऊक सार्वत्रिकरण झाले, पण असोच..
१०१%सहमत.
आम्हांला मागच्या पिढीने ऐकवले,आम्ही तो वारसा पुढच्या पिढीला देत आहोत. "कळा सोसणे " याचा शब्दशः अर्थ न घेता त्यावेळच्या परीस्थीतीत असलेल्या गैरसोई व आजच्या सुखसोई असा घेतला तर .....
सृजना करता कळा सोसाव्याच लागणार मग ती कुठलीही पिढी असो. भावी पिढीकरता घेतलेल्या कष्टात आनंदच असतो त्यात उपकार वगैरे भावना किंवा आम्ही इतके केले वगैरे काही नाही.
हल्के घ्या.
१९७६ मध्ये नागपूरच्या एका लग्नाला जायचे होते. त्यावेळी दिल्लीत गव्हाचा भाव 100 रु किलो पेक्षा कमी होता आणि नागपुरला ब्लॅक मध्ये 350 रु किलो होता. तिथे राशन मध्ये मिलो मिळायचा. ज्या नातेवाइका येथे लग्न कार्य होते त्यांचे पत्र आले येताना जमल्यास गहू घेऊन या. वडिलांनी दोन होल्डल मध्ये एक क्विंटल गहू पॅक केले आणि सोबत नागपूरला घेऊन गेले. अर्थातच पांघरून चादरी इत्यादि सोबत घेतल्या नाही. दिल्लीत लोक समझदार असतात त्यामुळे समस्या नव्हती. नागपूरला पकडले जाण्याची भीती होती. पण ओळखी मुळे गहू सही सलामत स्टेशनच्या बाहेर आणता आले. पंक्तीत गव्हाच्या पुर्या खायला मिळाल्या.
त्यांच्या आवडत्या आयुर्वेदिक आणि FMCG कंपनी ची स्थापना झाली नव्हती म्हणून कदाचित त्यांच्यासाठी १००₹/ किलो भाव असतील गव्हाचे त्यांच्यासाठी.
कृ. ह. घ्या. हे. वे. सां. न.
मी लहानपणी (६-८ वर्षापर्यंत) मावशीसोबत रेशनच्या दुकानातून गहू व साखर आणलेली आठवते. पण काही काळच. नंतर वाणसामान दुकानातून आणणे सुरु झाले. त्यामुळे अगदी क्वचित रेशनच्या दुकानात जावे लागे. त्यामुळे लेखातील सर्व गोष्टी समजू शकते. स्थित्यंतरे वेगाने अनुभवलेली आमची पिढी. सततचे भारनियमन. त्यामुळे लहानपणी संघ्याकाळी मेणबत्ती, वातीचे कंदील पाहिलेली आमची पिढी. नंतर इन्वर्टर, सोलर लॅंप, एलईडी दिवे आता पाहत आहोत. आता इथे मुंबईत वीज फार क्वचित जाते.लहानपणी घरात तांब्य पितळेची भांडी ,पाटा वरवंटा वापरलेले पाहणारी आमची पिढी स्वत: जेवण बनवण्याइतके मोठे होईपर्यंत हे सर्व हद्दपार होऊन स्टील, मिक्सर ग्राईंडर घरोघरी आलेले पाहिले आहे. असो. त्यामुळे असे स्मरणरंजन करवणारे लेख खूप आवडतात मला.धन्यवाद
खरेच ते दिवस त्रासाचे होते. पण त्यावेळेस तरी त्रास असा काही वाटला नाही. त्या त्रासाचीही सवय झाली होती. तो रंगीत लालसर भात ही एक दैनंदीन गोष्ट होऊन गेली होती. पुढे तर रेशनवर कापडं पण मिळायची.
पण भारताची प्रगती होत होती हे नक्की. वेग खूप कमी होता. बंधने खूप होती. पण सगळ्या परिस्थितीत आपली लोकशाही टिकली हे महत्वाचे. भारताचे तुकडे होतील व युरोपसारखे अनेक देश जन्माला येतील हे भाकीत सपशेल अपयशी ठरले हे महत् भाग्य समजले पाहिजे. मी तरी भूतकाळासंबंधात फारसा निराशावादी नाही आहे. तर भविष्यकाळाबाबत पूर्णपणे आशावादी आहे.
रेशनिंग ही त्या त्या काळात उपलब्ध स्रोत मर्यादेत वापरण्यासाठी असलेली यंत्रणा होती.
त्यामुळे दोनच प्रकारे वस्तू मिळायच्या - रेशनिंग आणि काळा बाजार.
पण तीच यंत्रणा नंतर स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यासाठी वापरली गेली. "रेशनिंग कार्डावर" देखील स्वस्त धान्य पुरवठा असं काहीसं लिहिलेलं असायचं. त्यामुळे
रेशनिंग आणि खुला बाजार असे दोन प्रकार झाले. त्यामुळे जर परवडत असेल तर खुल्या बाजारातही चांगले किंवा अधिकचे धान्य/तेल्/साखर घेता येऊ लागले. खुल्या अर्थव्यवस्थेत वाढलेल्या मला सत्तर-ऐंशीच्या दशकातील काळा बाजार करणारा किरकोळ व्यापारी ही संकल्पनाच अगम्य वाटायची. आम्ही जिथून रेशनिंगचं - म्हणजे स्वस्त सामान घ्यायचो, तो दुकानदार रेशनिंगच्या वस्तू जास्त किमतीने खुल्या बाजारात विकायचा. पण सामान्य दुकानदाराला वस्तू सामान्य किमतीतच विकाव्या लागायाच्या. नव्वदीच्या दशकाच्या शेवटी बासमती तुकडा साधारण दहा रु/किलो होता. दुसर्या दुकानात साडेनऊला असेल तर तिकडे जाऊन घेता यायचा. मी पंधरा रुपयांना विकणार, घ्यायचं तर घ्या, नाहीतर उपाशी राहा", हा प्रकार कधी पाहिला नाही. (हो, गरीबांना केवळ स्वस्त धान्यच परवडायचं. पण तेवढं त्यांना मिळायचंही. कारण किती तारखेला धान्य येतं ते माहिती असायचं. ज्यांना त्या धान्याची खरी गरज होती, ते रोज जाऊन चौकशी करायचे आणि गाडी आली की स्वस्त धान्य घ्यायचे).
बरीच वर्षे रेशन कार्ड बघितलेलं नाही. आताही कनिष्ठ मध्यमवर्ग ते गरीब वर्गात रेशनिंगचं धान्य वापरलं जातं. विशेषतः दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (पिवळं रेशन कार्ड्/अंत्योदय) आताही त्याचा प्रचंड फायदा होतो. आम्ही साधारण २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत रेशनकार्ड वापरायचो. रॉकेल आणावंच लागायचं. महिन्याला तीन लिटर. ते निळं असायचं. खुल्या बाजारात रंगहीन रॉकेल मिळायचं. नव्वदीच्या दशकात रेशनिंगचं रॉकेल बाहेर विकलं जाऊ नये म्हणून ते निळं केलं.
काळाबाजाराची जागा खुल्या बाजाराने घेतली, हे खुल्याअर्थव्यवस्थेचं यश म्हणता येईल.
@ अनुराधाजी,
इथे लिहिलेत, आनंद वाटला. बऱ्यावाईट दिवसात कण्हत न बसता सदैव कार्यरत आणि आनंदी राहण्याची तुमची प्रवृत्ती माहित आहे, लेखात-आठवणीत ती दिसत आहे.
तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा.
आम्हीही हे दिवस अनुभवले आहेत शाळेत न जाता 4/4 भावंडे खूप पावसात लाईन लावून उभे राहून मुंबईतच तांदूळ फक्त रेशनवरच मिळत ते दिवस काढले आहेत फक्त चांगले धान्य दर्जा चांगला असे, रेशनवर आंध्रचे कमी दर्जाचे तांदूळ मिळत तेही खाल्लेत बासमती हून खूप कमी क्वालिटीचे पण सुवासिक व असत तसेच त्चांया काळी अन्नाला चांगली चव ,वास व दर्जाअसे पौष्टिक व पोट भरून समाधानकारी असे . अर्थात तेव्हा व आता तुलना करण्यातच अर्थ नाही ,खाद्यसंस्कृती ते अन्न मिळणे . सर्व जगभरातून कमतरता असलीच तर फक्त पैशांची त्यावेळी बहुतेक सर्व साधी रहाणी उच्चविचारसणी पाळत. व पैसाही लोकांकडे नसे आमच्याकडे वडिल एकटे कमवून मिळालेला पैसा आई दोन वेळेचे जेवण व्यवस्थित वाढी व गोडधोड ,तळण असेही काटकसरीने करून आम्हा सात सख्ख्यांमधे व2/3 पाहुणे धरून पुरवी. तेव्हा इतर खर्चही नसायचे आम्ही लहान वयाचे वलहान शाळेत होतो हे सोडचनहीखर्च कमीच करायची मध्यमवर्गीय प्रवृत्ती होती.
छान लिहिल्या आहेत जुन्या आठवणी! जसे "उल्हासनगर आणि तान्दूळ" याबद्दल लिहिले आहेत, तसेच मुम्बईहून गणपतीदर्शन आणि "तान्दूळ आदलाबदल" (रेशनचा देऊन "चान्गला" घेणे) याकरता निघालेल्या एका मोहिमेत सहभागी झाल्याचे अन्धुक आठवते - प्रत्येकी २ किलोची मर्यादा पाळण्याकरता, जितका मोठा group तितका चान्गला!
रेशनिंग दिवस चांगले होते असे मी अजिबात म्हणणार नाही. उगाच गरिबीचे उदात्तीकरण डोक्यात जाते.
उकडा तांदूळ अजिबात खाववत नसे, भाताला भयानक वास मारतो. साधा तांदूळ त्यात भरपूर खडे असत. ते डोळ्यात तेल घालून निवडावें लागत. हे काम आमची आई करत असे. साखर कधी जाड कधी बारीक तर पावसाळ्यात भिजलेली मिळत असे.
गहू घरी आणून निवडावे लागत.पण ते जास्त सोपे होते. ते काम मी आणि माझा भाऊ करत असू. यानंतर गहू गिरणीत जाऊन दळून आणावे लागत. यानंतर ते चालून त्यातील कोंडा काढावा लागे म्हणजे मगच पोळ्या मऊसूत होत असत.
आमच्या वडिलांनी आजोबा गावाहून आमच्याकडे कायमचे राहायला आल्यावर तेंव्हा त्यांचे रेशन कार्ड वेगळेच ठेवले होते.
यामुळे आमच्या कडे रॉकेल साखर गहू तांदूळ दुप्पट मिळू शकत. शिवाय वडिलांनी दोन्ही कार्डांवर गॅस बुक केलेला होता त्यापैकी एक आत्याचे लग्न झाल्यावर तिला ट्रान्स्फर करून दिला होता. पण गॅस गेला कि स्टोव्ह ची आराधना करावी लागे. पण दोन कार्डावर रॉकेल मिळत असल्याने रॉकेलची टंचाई आम्हाला कधीच झाली नाही. या अतिरिक्त रॉकेलचा उपयोग आमच्या मोलकरणीना होत असे. यामुळे आमच्या मोलकरणी सहज सहजी काम सोडत नसत.
साखरेसाठी गहू तांदूळ किंवा रॉकेल साठी रांगेत उभे राहिल्याचे आठवते. आम्ही काळया बाजारात कधीही धान्य विकत घेतले नाही. दुधासाठी पत्र्याचे कार्ड होते. त्यावर दोन बाटल्या होल दूध मिळत असे. त्यासाठी एक देहू नावाची मोलकरीण पहाटे जाऊन सोसायटीतील सर्वांचे दूध घेऊन येत असे. याशिवाय आमच्या कडे कर्जत हुन के दूधवाला रोज पहाटे १ लिटर दूध टाकत असे. आमच्या अन्नधान्यात सर्वात जास्त खर्च दुधाचाच होत (२ लिटर रोज) असे हे आठवते.
माझे लग्न होईपर्यंत मी रोज दोन ग्लास दूध पीत असे.त्यानंतर बायकोला चहा लागतो म्हणून दोन ग्लास दुधाऐवजी रोज दोन कप चहा पितो आहे
आणीबाणी संपल्यानंतर खुल्या बाजारात चांगले गहू आणि तांदूळ मिळायला लागले. तोवर आमच्या वडिलांनी नोकरी करता करता १० वर्षे कष्ट काढून घेतलेले शिक्षण कामास येऊ लागले. त्यांनी सकाळी कॉलेज नंतर नोकरी करून बी ए, एल एल बी आणि नंतर जमनालाल बजाज मधून डी बी एम केल्याने त्यांच्या पगारात आणि हुद्द्यात चांगली सुधारणा झाली.
यानंतर रेशनवरचा शिधा बहुधा मोलकरणीच्या नशिबात येत असे.
मुंबई तुन कोकणात जाण्यासाठी ६० दिवस अगोदर आरक्षण करण्यासाठी पहाटे ६ वाजता ठाणे आगारात जाऊन रांग लावत असू. आणि श्री क्षेत्र परशुराम येथे पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी चिपळूण आगारेट जाऊन पार्टीचे आरक्षण करावे लागत असे.
ठाणे येथील परिस्थिती खूप बरी होती. मुंबई सेंट्रल येथे लोक आदल्यादिवशी रात्री जाऊन रांगेत झोपत असत.
गेलेले दिवस चांगले होते का? नक्कीच नाही. आलेले दिवस चांगले होते का? होय
येणारे दिवस अजून चांगले असतील का ?
नक्कीच
मला आठवतंय साधारण ८७ का ८८ साल असावे, त्यावेळेस मी यत्ता तिसरी किंवा चौथीत असेल.
घरी अजुन गॅस आला नव्हता, त्यामुळे रॉकेलचा स्टोव्ह वापरावा लागे. गहु, तांदुळ, साखर व रॉकेल हे सगळे रेशनिंग मध्येच मिळत असत.
धान्यासाठी एक रांग व रॉकेल साठी दुसरी.
मी आणि माझा लहान भाऊ या दोन्हि रेशनिंगच्या लाइन मध्ये सकाळी ७ वाजेपासुन लागत असु. साधारण ५०/६० लोकं अगोदर पासुन उभे असत. ३ ते ४ तास पायाचे तुकडे झाल्यावर नंबर यायचा, तिकडे शाळेला ऊशीर व्हायचा त्याची वेगळी घालमेल व्हायची.
आमचा नंबर येइस्तोवर जवळ्पास धान्य संपलेले असे , चुकुन माकुन मिळाले तर परमानंद व्हायचा.
ज्यावेळेस सण जवळ आले असतील त्यावेळेस खुप झुंबड उडालेली असे.
मग पुढे जावुन गॅस सिलिंडर आले. त्यातही गॅस संपला तर नंबर लावायला परत लाइन मध्ये उभे रहावे लागायचे. मला आठवतंय एकदा मी आणि वडिल तब्बल ८ तास गॅस साठी लाइन मध्ये ताटकळत होतो.
खूप छान वर्णन केले आहे. या वयातही लिहित्या आहात याचे खूपच कौतुक वाटते. एकोणीसशे पासष्ट साली रेशनवर माणशी आठशे ग्राम साखर मिळत असे. आमचे अडीच माणसांचे कार्ड होते. आई, बाबा आणि मी अर्धा. तेव्हा दोन किलो साखर आणलेली आठवते. तीही पुळणी सारखी बारीक. त्या नंतर थोड्याच काळात खुल्या बाजारात ही धान्य मिळू लागले.
मनोगत आवडले. लहानपणी रांगेत थांबून रेशनवर साखर आणि रॉकेल आणलेलं आहे. एका किराणा दुकानातच रेशनचं पण धान्य यायचं. शेजारीपाजारी कोणीतरी येऊन रॉकेल आलंय सांगायचे, मग आम्ही कार्ड आणि कॅन घेऊन साखर-रॉकेल आणायला जायचो. रॉकेल सुद्धा ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांनाच मिळायचं बहुतेक, पण या २ गोष्टींव्यतिरिक्त रेशनवर काही मिळाल्याचं आठवत नाहीये.
नोस्टॅलजिक करणार्या आठवणी.
उज्जैनमध्ये थंडी फार पडते. त्यामुळे लाकडे/गोवर्या जाळायचे ठरवले. हेतु हा कि कन्येलाही हा अनुभव घेता यावा. त्यासाठी रॉकेल कुठे मिळते का ते शोधत होतो. रॉकेल हद्दपार झाले आहे असे कळले. एकाने पेट्रोल्/डिझेल वापरा असेही सुचवले.
प्रतिक्रिया
ओघवते सुंदर लिखाण. मी रेशन
लेख आवडला! रेशनिंगच्या दिवसांत
शक्यतो मी मिसळपाव वर
मम
+१
व्वा....
अहो
राहू द्या वांड साहेब
टोनी भौ...
जेम्स भो...
आजी, तुमचे मनोगत फार भावले.
१९७६ मध्ये नागपूरच्या एका
किलो की क्विंटल?
खपली गहू
तेव्हा
खूप छान लेख
खरेच ते दिवस त्रासाचे होते.
खरं आहे.
छान लेख.
मस्त आठवण
दिवस रेशनिंगचे
लेख आवडला...
रेशनच्या आठवणी जाग्या झाल्या ...
@ अनुराधाजी,
सहमत.
आम्हीही हे दिवस अनुभवले आहेत
हे सर्व 60--70 दशकातील आहे पण
छान लिहिल्या आहेत जुन्या
लेख आवडला. बऱ्याच गोष्टी
रेशनिंग दिवस चांगले होते
गेलेले दिवस चांगले होते का? नक्कीच नाही. आलेले दिवस चांगले होते
आरारूट जिलबी,?
रेशनिंगच्या आठवणी
सुरेख वर्णन!
मनोगत आवडले. लहानपणी रांगेत
नोस्टॅलजिक करणार्या आठवणी.
कापुर वापरा
होय.मी ही कापूरच वापरला.पण
रेशनिंग