Welcome to misalpav.com
लेखक: शेर भाई | प्रसिद्ध:

द्या शुक्रवार, म्हणजे आमच्या Madamना हिंदू कॉलनीत ललित संगीत कला अकादमीच्या त्यांच्या आठवडे बाजारात (त्यांचाच शब्द) म्हणजेच विद्यार्थी गुणविकास केंद्राच्या साप्तहिक सभेला जायचे असणार, म्हणजे उद्याची सकाळ मोकळी ठेवली पाहिजे, असे मनाला बजावत मी निद्रादेवीला शरण गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तसा थोडासा उशीरच झाला होता, म्हणून शक्य तितकी गाडी दामटवत होतो. त्या काळी उड्डाणपुलांचे जाळे आजच्याइतके दाट नव्हते. किंग्ज सर्कलला - महेश्वरी उद्यानाजवळ जर तुम्हाला पहिला सिग्नल लागला, तर पुढचे दोन सिग्नल तुम्हाला हमखास लागायचेच. त्यामुळे पहिलाच सिग्नल नारिंगीवरून लालवर जाताना मी संशयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण नेमका त्याच वेळेला तिथे उपस्थित वाहतूक नियंत्रकाच्या मते मी सिग्नल तोडला होता. माझी आणि नियंत्रक साहेबांची वादविवाद स्पर्धा रंगली असताना आमच्या Madam गाडीबाहेर उतरल्या आणि मला म्हणाल्या, "दंड काय तो भरून टाक, मला आधीच उशीर झाला आहे." पण आमच्या Madamना बघताच नियंत्रक साहेबांचा नूरच पालटला. त्यांनी Madamच्या अक्षरशः पाया पडायचे बाकी ठेवले होते. ते म्हणाले, “Madam, मला ओळखले का? मी टागोर नगर म्यु. उ. प्रा. मराठी ३चा XXX तुम्ही आम्हाला कला विषयाला होतात. फक्त तुमचा तास असायचा, म्हणून मी वर्गात बसायचो, तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीही करून १०वी पास झालो, तिथून पुढे सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि ही नोकरी मिळाली. त्या वेळी तुम्ही जर १०वीचं महत्त्व समजावलं नसतं, तर आज मीसुद्धा कुठेतरी गांजा मारत पडलो असतो. आता तुम्हाला आणखी उशीर करत नाही. तुम्ही निघा.” कसेबसे हसू दाबत मी गाडीत बसलो. पण अशा वेळी Madamचे म्हणणे होते की "तुम्हा लोकांना सगळे आयते मिळते आहे, ही मुले ज्या परिस्थितीत राहतात, ती जर तुम्ही बघितलीत तर यापुढे हसणार नाहीस." तर मंडळीहो, ह्या Madam म्हणजे दुसरेतिसरे कोणी नाही, माझीच आई. NJ म्हणजे आमचे पप्पा. पेशाने ते वकील होते. त्यांचे सहकारी त्यांना NJ म्हणत. सहकार क्षेत्र त्यांचे एकदम लाडके. मी कॉलेजमध्ये असताना त्यांचे टंकलेखनाचे आणि मदतनिसाचे काम मी सांभाळत असे. बऱ्याच सहकारी संस्थांना त्यांनी मदत केली होती. कांदिवलीतील एका संस्थेचा रखडलेला पुनर्विकास त्यांनी विकासकाबरोबर मोजून तीन बैठकीत सोडवलेला मी पाहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले असल्याने ते नेहमी स्वतःला 'मालवणी मीडियम' म्हणत असत. मुंबईत ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी आले, तेव्हा गिरगाव परिसरात त्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर गिरगाव, फोर्ट, सहकार न्यायालये, उच्च न्यायालय फिरताना तिथली इत्थंभूत माहिती मिळत असे. त्यांचे म्हणणे होते की उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होता आले पाहिजे, याला आणखी एक वकिली कंगोरा होता, तो म्हणजे समोरच्याला पूर्ण बोलायला दिले की त्याच्या बोलण्यातच त्याचा प्रतिवाद करायचा मुद्दा आपल्याला मिळतो. तसेच आपण आपला मुद्दा मांडताना शक्य तितक्या कमी शब्दात मांडावा, यासाठी ते नेहमीच आग्रही असत. माझ्या आईला एकूण सात भावंडे, तीन भाऊ आणि चार बहिणी. त्यात सगळ्या बहिणींनी शिक्षणप्रसाराचा वसा घेतला होता, त्या सगळ्याच शिक्षिका. लग्नापूर्वी आमची आई माहुल गावच्या शाळेत होती. एकदा तिच्या वर्गातील विद्यार्थ्याने तिला विचारले की "बाई (हो, त्या काळी मराठी माध्यमातील मुले त्यांच्या शिक्षिकांना बाईच म्हणत, आणि बाई आणि Period सारखे विनोद(?) कोणाला सुचत नसत.) तुम्ही कोंबडी खाता का?" तर आई म्हणाली, "हो खातो." तर संध्याकाळी तो विद्यार्थी जवळजवळ ७–८ कोंबड्या घेऊन त्यांच्या दारात हजर. तेव्हा आईने त्याला तसेच परत पिटाळले आणि सांगितले की असे करायची काहीच गरज नाही. आमच्या आईचे विद्यार्थी कुठेही भेटायचे. एकदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोणी एक उमेदवार आमच्या इमारतीमध्ये मतदार भेटीला आला होता, आईला बघून सगळ्यांना बाजूला सारत तो पुढे आला आणि म्हणाला, “ह्या Madamमुळेच माझे शिक्षण पूर्ण झाले. तुम्हाला आठवत नसेल, पण मी तुमच्या खोलीमध्ये Elementary Drawingच्या सरावासाठी येत असे.” कोणी भाजीवाला, कुठे हॉटेलमध्ये, कुठल्यातरी ऑफिसमध्ये, सरकारी कार्यलयात तिचे विद्यार्थी हमखास मिळायचेच. गमतीत आम्ही तिला नेहमी चिडवायचो की तुझे विद्यार्थी कुठूनही टपकू शकतात, एका अर्थी ते खरेच होते म्हणा!! यातील गमतीचा भाग सोडला, तर आमची आई होतीच तिच्या विद्यार्थ्यांवर जीव लावणारी. ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची कर्मचारी होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ललित कला अकादमीच्या माध्यमातून तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी Camlin, Navneet, तसेच Cipla यासारख्या संस्थांच्या मदतीने विद्यार्थी गुणविकास केंद्राचा पाया घातला होता. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय मिळाला. तिचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यामुळे तिच्या निवृत्तीनंतरदेखील Camlin, Navneet, तसेच Cipla त्यांचे शैक्षणिक साहित्य आमच्या घरी पाठवत असत, कारण त्यांना एक माहित होते की आपल्या साहित्याचा गैरवापर होणार नाही. ती गेल्यानंतरही एक वर्ष त्यांनी यात खंड पडू दिला नव्हता. सद्य:स्थितीतिल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बघायला ती नाही, ते एका अर्थी बरेच आहे. आज जेव्हा टीव्हीवर एखाद्या मालिकेत नायक आणि जेवण याबाबतचा कौतुक सोहळा चालू असतो, तेव्हा स्त्री-पुरुष समानता आपल्यापासून किती लांब आहे याची जाणीव होते. याच्या एकदम उलट आमच्या आईने आम्हाला आमच्या लहानपणापासूनच आमच्याही नकळत जेवण करण्याची सवय लावली होती. ती कशी, तर लहानपणी आमची शाळा घराशेजारीच असल्याने मधल्या सुट्टीत आम्ही घरी जात असू. त्यामुळे घरी आलो की एक चिठ्ठी फ्रीजवर चिकटवलेली असे - 'मी मिरची आणि कांदा कापून ठेवला आहे, त्यात बेसन घालून (प्रसंगी अंडे घालून आम्लेट) थालीपीठ करून चपातीबरोबर खावे, चहा उकळून गाळून प्यावा.' असे करता करता नंतर तर कांदे-मिरची कापायचेही काम आमच्यावर येऊ लागले. पण त्यामुळे भूक लागली तर काय करायचे? अशा प्रश्नामुळे जेव्हा बऱ्याच जणांचे हातपाय गळतात, तिथे काय काय आणि किती करायचे? असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्ही कधीही हॉटेलमध्ये गेलो की तिथल्या पदार्थात काय काय जिन्नस असतील याची चर्चा होऊन तसाच पदार्थ आमच्या घरी बनत असे. यासाठीच त्या काळात तिने पाककलावाली बरीच पुस्तके जमवली होती. आज सगळ्या गोष्टी बोटाच्या एका टोकावर उपलब्ध असताना त्या काळातील ह्या पुस्तकांचे मोल कोणालाच कळणार नाही. तिच्यामुळेच आम्हाला लहानपणासून वाचायची सवय लागली. चांदोबाचे, किशोरचे, नंतर इंद्रजाल मासिकांचे आम्ही वार्षिक सभासद होतो. वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या १२ अंकांचा एक संच बाइंड करून घेणे आणि नंतर उन्हाळी सुट्टीत त्या अख्ख्या संचाचे पुनर्वाचन करणे असे उद्योग आम्ही करत असू. माझी आई कलाप्रेमी होती. माझी चित्रकला जरी तिच्यासारखी नसली, तरी तिच्याबरोबर फिरल्याने कलेचा आस्वाद घ्यायला मात्र मी शिकलो, नाही म्हणायला माझ्या लेकीच्या चित्रकलेत थोडा तिचा भास आहे, म्हणजे मी एक उत्तम वाहक तरी झालो असे म्हणायला हरकत नाही. मी त्या भाग्यवंतांपैकी आहे, ज्यांना लग्न झाल्यानंतरही कधीमधी आईच्या उबदार कुशीत झोपायला मिळत असे. त्यातली जी मझा आहे, ती शब्दातीत होती. आता आई नाही, पण आता जेव्हा माझी धाकटी लेक हट्टाने माझ्या कुशीत येऊन झोपते, तेव्हा एक चक्र पूर्ण होत असल्याची जाणीव होत राहते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चांदोबाचे, किशोरचे, नंतर इंद्रजाल मासिकांचे आम्ही वार्षिक सभासद होतो. वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या १२ अंकांचा एक संच बाइंड करून घेणे आणि नंतर उन्हाळी सुट्टीत त्या अख्ख्या संचाचे पुनर्वाचन करणे असे उद्योग आम्ही करत असू.
चांदोबा मासिकाचा बाईंड केलेला वाचायला मिळणे ही किती अप्रुपाची गोष्ट होती. तीन जुळ्या बहिणी, रामायण, महाभारत, विक्रम वेताळ, परोपकारी भीम, भयानक दरीतील त्रिदंडी....

मस्त लिहिलंय 👍 माझीही आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होती त्यामुळे तुमच्या सारखे काही अनुभव मलाही आले असल्याने छान रिलेट होता आले. थोडा फरक असा कि माझी ह्या जगात 'एंट्री' झाल्यावर दोन वर्षांनी आजी ने 'एक्झिट' घेतली, त्यामुळे मला सांभाळायला म्हणून आईने चांगली सरकारी नोकरी सोडल्यावर आमच्या घरातच तिची शाळा भरायला लागली 😀

पाभे G, ॲबसेंट माइंडेड G (ॲमाG), मुवि G,सुखी G,सस्नेह G,शलभ G आणि श्वेता G आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. हा लेख बरेच दिवस मनात घोळत होता आणि खुद्द संपादकांचा निरोप मिळाल्यावर या दिवाळी अंकात हा पाहिजेच असे मनोमन ठरवले होते. नेमके त्याचवेळी मिसळपाव विश्रांती संक्रमणात गेले "त्यामुळे मेरा नंबर आयेगा??" ह्याची धाकधुक होतीच. शशिकांत G: आजकालच्या नागिन, पिशाचिनी वगैरे मालिका लिहिणाऱ्याने एकदा तरी चांदोबाची त्रिदंडी वाचावी, त्यांमुळे ते किती पानीकम आहेत याची त्यांना थोडी जाणीव होईल. टर्मीनेटर G: आपली तर Same Pinch. पण "आमच्या घरातच तिची शाळा भरायला लागली." समजले नाही.

मस्त निर्मळ लिहिलंय.भाग्यवंत आहात. खरोखर विद्यार्थी कधी कुठं भेटतील आणि कृतज्ञता, विश्वास काय देऊन व्यक्त करतील सांगता येत नाही.याच भेटवस्तू घरभर विखुरलेल्या आहेत ..ज्या प्रचंड समाधान , आनंद देतात.

भक्तीG, श्वेताG आणि स्वधर्मG आपले मनःपूर्वक आभार. तुषारG: एखाद्या जागेहून जात असता किवा एखादी गोष्ट करता असताना त्या दोघांच्या आठवणी मनः पटलावर सारख्या आपटत असतात. उदाहरणार्थ कोणालाही Mail पाठवताना आमच्या NJ नची एक गोष्ट नेहमी आठवते, ते म्हणायचे कि तुम्हाला जे काही सांगायचे आहे त्याचा फाफटपसारा नको, तुमचा आशय दोन किंवा तीन ओळीत व्यक्त झालाच पाहिजे. तसेच वाचताना वाचणाऱ्याला तुमचा स्वर समजला पाहिजे, जर त्याला तो समजला तर तुमचे काम सोपे होते. आणि Madam बद्दल म्हणाल तर ती पक्की खवैयी होती त्यात बटाटा वडा तिचा अति लाडका, माझ्या लहानपणी तिच्याबरोबर हिदू कॉलनीत जाताना एकदा तिने मला तिथल्या तेव्हाच्या Sent George शाळेतील गरमागरम वडा खायला दिला होता. त्यामुळे आताही कधी त्या भागात असेन तर आठवणीने जाऊन तो वडा नक्कीच खातो.