काथ्याकूट

धारावी दर्शन सोहळा...

Primary tabs

आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे.

माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे.

अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूम
निघाली होती.

शिरस्त्याप्रमाणे सब से तेज वाहिन्यांची गिधाडे धारावीकरांना मते विचारायला गेली तेव्हा तिथल्या सुबुद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले की हे परदेशी पर्यटक आपले पाहुणे आहेत त्यांना आम्ही जरुर मान देऊ मात्र त्यांना इथे घेऊन येणारी जी भारतीय मंडळी आहेत त्यांना चांगलाच चोप देऊ.

त्या नंतर कोणी ही झोपडपट्टी पर्यटनाचे नाव काढलेले दिसत नाही.

सुमीत

खरोखर फटकेच दिले पाहिजेत, "मुन्नाभाई एम बी बी एस" मध्ये सर्कीट त्या जपान्याला असेच विचारतो की तुम्हाला भारतात येऊन काय गरिबीच बघायची असते का?
देशाचे विकॄत चित्रण करणार्‍या देशींना आणि अतिउत्साहि, अविवेकी बातमीदारांना बंदिच घातली पाहिजे.

विवेकवि

मी सुमीतच्या म्हणण्याशी सहमत आहे....
कारण तूम्ही आपल्याच देशात (भारतात) राहता .
तुम्ही शनिवार वाडा , ओ॑कारेश्वर , ई ई ई दाखवा....

असो पण ते कोणीच करणार नाही .....

विवेक वि.

माझ्या मनांतीलच भावना वरील तिघांनी व्यक्त केल्यात. मला पर्यटनाची हौस असल्यामुळे मी आमच्याकडे बाहेरगांवाहून येणा-या प्रत्येक पाहुण्याला कमला नेहरू पार्क, गेटवे, म्यूझिअम, नेहरू सेंटर वगैरे दाखवून पिळतो.

हे धोबीघाटाचे काय नवीन खूळ? या वाहिनीवर खरेच कांहीतरी इलाज केला पाहिजे.

सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते. या सृलाताई आमच्या कंपूत स्वागत.

खरेच समाज फारच निबर आणि संवेदनाहीन झाला आहे. मणसे रस्त्यात थुंकतात, कर बुडवतात, भ्रष्टाचार करतात, फेरीवाल्याकडून खरेदी करतात. आपल्यासारखी संवेदनाशील माणसेच समाजाचा कणा आहेत. भावनांस वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

अवांतरः
डोंबिवली फास्ट चित्रपट पाहील्यावर पण मला असेच वाटले होते.
जेव्हा काही आदर्शवादी गोष्ट आपण प्रत्यक्षात शक्य नाही असे म्हणतो तेव्हा तो षंढपणा असतो असे मला वाटते.
(मी पण त्यातलाच एक षंढ :(( कारण मला सुखी जीवन हवे आहे ना! शिवाजी हवा पण शेजारच्या घरात. आणि मावळा त्याच्या पलिकडच्या घरात. आणि आम्ही कुठे राहणार? आम्ही मात्र स्वराज्यात राहणार. स्वराज्याचे सुख तर हवे पण मग त्यासाठी खर्ची मात्र पडायला नको! हीच माझी षंढ मनोवृत्ती).
१० लोक करतात म्हणून एखादी चूकीची गोष्ट मी पण का करावी? माझ्या मताला मी एक म्हणून काहीच कीम्मत नाही का? हा प्रश्न खरेच काळजाला घरे पाडून जातो.
कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करणे आणि त्यातून जनमत भडकावून टी.आर्.पी. वाढवणे हा प्रकार देखील मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखाच आहे. पत्रकारीतेचा विपर्यास म्हणजे काय हे या चॅनेलवाल्यांकडून शिकावे. पत्रकारीतेमागची तळमळ आणि ध्येयनिष्ठा 'लोकहितवादी','लोकमान्य','भालाकार'(भोपटकर),'काळकार'(परांजपे) या अनेक पत्रकारांनी दाखवून दिली आहे. पण त्याकडे बघतो कोण.
असो. भावनेच्या भरात जास्त बोलून गेलो. माफी असावी.
सृ.ला.ताई आपण परखड मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
पुण्याचे पेशवे

धनंजय

मुंबईचा धोबीघाट हा कामसू लोकांचे अचाट कार्यस्थळ आहे. त्यात संगणकीकरण नाही तरी दररोज लाखोंनी कपडे धुतले जाऊन व्यवस्थित ज्याचे त्याच्याकडे पोचतात. जुन्या पण कार्यक्षम कार्यपद्धतीचे हे मोठे आश्चर्य आहे.

मी खुद्द गोव्याला गेल्यावर आमच्या गावच्या आठवड्याच्या बाजाराला कॅमेरा घेऊन जातो (आणि पुण्याला मंडईत). होय, तिथे उकिरडे अस्वच्छ आहेत, लोक आरडाओरडा करत आहेत, नाल्या घाण आहेत. फोटोच्या विषयास अनुसरून मी ते टिपेन किंवा न टिपेन. (सामान्यपणे, मला विविधरंगी भाज्या, फळे यांची चित्रे घ्यायची असतात.) पण गावच्या बाजारात जो जिवंतपणा आहे, तो मॉल आणि प्लास्टिकच्या पिशवीत हवाबंद भाज्यांच्या सुपरमार्केटमध्ये सापडत नाही.

व्यापाराचे जुने तंत्र जोवर कार्यक्षम आहे तोवर पर्यटनाच्या योग्य आहे, असे मला वाटते. इतकेच नव्हे तर जुन्या तंत्रात काय होते, जे नव्या तंत्राने गमावले आहे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. म्हणजे स्वच्छता आणि जिवंत उत्पादक-गिर्‍हाईक संवाद यांचा मेळ नवीन तंत्रज्ञानात बसवता येईल का, हे माझ्या बाजाराच्या उदाहरणात विचार करण्यालायक आहे.

परदेशात पर्यटन करताना, त्यांच्या जुन्या पद्धतीने काम करणार्‍या खर्‍याखरच्या उद्योगांना प्रत्यक्ष बघण्याची माझ्यात इच्छा असते - त्यांचे शेतकाम, बागायती, कारखाने, इ.इ. त्याच प्रकारे विदेशी पर्यटकांना भारतात धोबीघाट बघण्यात रस असावा, यात काय विशेष?

१) ह्या धोबीघाटाला लागून महापालिका कचरा केंद्र आहे जे महालक्ष्मी स्थानकातून सहज दिसते.

२) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा.

माझी विनम्र विनंती अशी की आपण प्रत्यक्ष येऊन मन भरे पर्यंत ही जागा पहावी (अगदी महालक्ष्मी स्थानकाला लागूनच आहे). हा धोबीघाट मुन्नाभाई मध्ये दाखविलेला आहे तितका पण बरा नाही.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

इनोबा म्हणे

२) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा.
हे आधी का नाही सांगीतलं.च्यायला जाईल तिथं भैय्या!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

चतुरंग

तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आणि ज्या प्रकारे तिथली मॅनेजमेंट होते ती एक अचंबित करणारी गोष्ट आहे (जसे मुंबईचे डबेवाले की ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे मोठमोठ्या मॅनेजमेंट कंपन्याही देतात!) तेव्हा अशा गोष्टींबाबत लाजिरवाणे काही वाटू नये.
धारावी बाबत मात्र मी सहमत आहे ते मुद्दामहून दाखवणे चूकच.

चतुरंग

प्राजु

पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा?
धोबीघाट... खरंतर माझंही असं मत आहे की धोबी घाट दाखवू नये. आणि धारावी तर.. आउट ऑफ क्वेश्चन...!

- (सर्वव्यापी)प्राजु

धनंजय

हजार गोष्टींमधला तरतमभाव ठरवणे हे वैयक्तिक असते. काही लोक ताजमहाल न बघता थेट हिमालयात जातात. एखाद्याला नव्या इमारती आवडतात, आणि जुने भग्नावशेष बघून फार वाईट वाटते. दुसर्‍या एखाद्याला भग्नावशेषांत गतवैभव बघण्याची कल्पनाशक्ती असते, नव्या इमारतीत ती कलात्मकता दिसत नाही.

माझ्या आईला शांत-एकांत देवस्थानात मूर्तीचे डोळे भरून दर्शन घ्यायला आवडते - गर्दी मुळीच आवडत नाही. बद्री-केदारला गर्दी नसती तर आईला आणखी आवडले असते. मी मात्र भीमाशंकरच्या तुडुंब जत्रेला गावकर्‍यांबरोबर गेलो - डोंगरातल्या पायवाटा पायवाटा मिळून लोकांचा प्रचंड लोंढा झाला, तसा भारावून गेलो.

एखाद्याला एखादी गोष्ट भकास, त्रासदायक दिसते. दुसर्‍याला तीत काही दिव्य दिसते.

अर्थात पश्चात्ताप नसलेले क्रौर्य, दुर्बलांची बेकायदा फरफट (उदा : कुंटणाखाने) हे केव्हाही पर्यटन करण्यास योग्य नाहीत. धोबीघाट त्या प्रकारात बसत नाही. धारावीची "टूर" तेथील लघु-उद्योगांच्या संदर्भात मी टीव्हीवर बघितली आहे - आणि त्या गलिच्छ पर्यावरणात स्वतःची उन्नती करून घेण्याची लोकांची दुर्दम्य शक्ती बघून मी आपल्या मऊमऊ सोफ्यावर शरमलेलो आहे.

तुमची-आमची स्फूर्तिस्थाने काहीकाही एकसारखी असतील (उदा : भावार्थदीपिका), काही वेगवेगळी (उदा : धोबीघाट). पण अनेक ठिकाणून लोक भारावून जाऊ शकतात, हे समजून घेतले, की तुम्हाला आधी वाटले तसे किळसयुक्त आश्चर्य वाटणार नाही.

सचिन

पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा?
प्राजुशी १००% सहमत !!

मीनल

धोबी घाट पाहताना ``अरेरे `` असे वाटते.
``अहाहा`` असे वाटते का?
तिथे नेऊन highligh केले जाते ते labour intensive outdated technique of production.

कोणाला काही दाखवताना चांगला भाग दाखवावा.दर्शनिय!
साहनुभुती मिळवून काय होणार?आपल्या कडेची तांत्रिक कमतरता कशाला दाखवा?
भारतात येऊन ५* होटेल मधे राहणारे पर्यटक १रुपया तरी त्या धोब्याला देतात का?देत असतील टिप तर ती जाते होटलच्या लोकांना जाते.

अमेरिकेत काय १०० % लोक मशिन मधे कपडे धुतात काय?
इथे चाळित राहणारे लोक नाहित?
इथे ही अशी गावं आहेत की जिथे इन्टरनेट नाही.

धोबी घाट ला घेऊन जाणा-या लोकांना काय म्हाणावे कळत नाही.

देशाची जी काही आहे ती भव्यता दाखवा.दारूणता काय दाखवता?

धनंजय

सर्व कार्ये यांत्रिक झालेली नाहीत, आणि त्या गोष्टी आपुलकीने दाखवतात.

फ्रान्समध्ये हाताने तोडलेली द्राक्षे मोठ्या गर्वाने दाखवतात. वगैरे.

भारतातलीही अयांत्रिकी मॅनेजमेंटची प्रभावी शैली बघून "अहाहा" असेच वाटते. धारावीतल्या विजिगीषू लोकांना बघून "अहाहा" असेच वाटते. तुम्हाला ती तत्त्वे बघून "अरेरे" असे तर वाटत नाही ना?

चतुरंग

तांत्रिक कमतरता असण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रश्न कुठे येतो?
मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्याची पूर्वापार चालत आलेली एक अनोखी पध्दत, पण जी इतरत्र इतक्या कौशल्याने कदाचित वापरली जात नसेल, इतक्या साध्या नजरेने आपण त्याकडे का बघू शकत नाही?
तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

चतुरंग

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

मी माझ्या मुलांना, त्यांनी अनावश्यक वस्तूंसाठी हट्ट केला की, नेहमी, "जगात असे असंख्य लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही" असे सांगत असतो.

त्यांना त्यातील सत्य पटत नाही. त्यांच्या दृष्टीने हे अशक्य आहे. कारण परिचितांपैकी कूणाचीच अशी परिस्थिती नाही. अशी टूर असेल, तर त्या टूर वर त्यांना नेण्यास मी उत्सुक आहे.

- सर्किट

प्राजु

मिनल.. तू झाशीची राणी आहेस.... मानलं तुला.
प्रत्येक टूर गाईडने एकदा तरी तुझे मार्गदर्शन घ्यावे.
- (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगा..
प्रेक्षणीय म्हणजे पाहण्याजोगा...

दाखवणार्‍याला जे दर्शनीय वाटते, ते बघणार्‍याला प्रेक्ष्हणीय वाटेलच असे नाही..

ग्राहक हाच देव मानून बघणार्‍याच्या "रीझनेबल" अपेक्षा पूर्ण कराव्यात.

समजा एखाद्याला धोबीघाट बघावासा वाटत असेल, तर दाखवायला का हरकत आहे ?

तसेच, धारावीचेही..

मुंबईला येऊन नुसत्या इंग्रजांनी उभारलेल्या इमारती बघायला मिळणार असतील, तर इंग्लंडहून पर्यटक मुंबईला का येतील ? ते तर त्यांना त्यांच्या देशातही मिळेल की बघायला.

धोबीघाट, आणि धारावी, दोन्ही भारताचाच भाग आहे. त्या देशाच्या परंपरांचा भाग आहे. ह्या परंपरांचे आपण पाईक आहोत. त्यांचा मला अभिमान आहे.

मला त्यात दारूण काहीच वाटत नाही. धारावीतील चर्मकारी उद्योग भव्यच आहे !

- सर्किट

मीनल

काहींना पर्यटकांना धोबी घाट/झोपड्पट्टी प्रेक्षणिय वाटत असेल. कारण त्यांनी ते पाहिलेले नसते.
मला म्हणायचे आहे की जे दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगे आहे तेच दाखवावे.
कारण काही पर्यटक `ते` म्हणजेच भारत ही ईमे़ज त्यांच्या गावात परत जाऊन क्रिएट करतात.

ताजमहाल प्रेक्षणिय तसेच दर्शनीय आहे.
इंग्रजांनी उभारलेल्या इमारतीं शिवाय इतरही अनेक भारतीयांनी बांधलेले अनेक राजवाडे आहेत,कोरीव काम केलेल्या लेण्या ,देवळे आहेत.
सिल्कचे छोटे मोठे कारखाने आहेत.
हस्तकलेचे उदयोग आहेत.
काहीही पैसे घेता सेवाभावी वृत्तीने काम करणा-या संस्था आहेत.
इंग्लंडलाही नसलेले अनेक रिसर्च सेंटर्स आहेत.

दाखवणा-यला कळले पाहिजे आपण काय दखवतो आहे.
अहो ,` पाहणारे ` खूप तयार असतात.
केवल कस्ट्मर पैसे देतो म्हणून त्याच्या कुठल्याही अपेक्षा"रीझनेबल" मानाण्याचा धंदा, भारताची ईमेज ब-याचदा डागाळू शकतो.
आणि धोबी घाट/झोपड्पट्टी ह्या जर परंपरा असतील तर ह्या व्यतिरिक्त भारताच्या ब-याच उत्तम परंपरा आहेत.त्या दाखवाव्यात.
मग इंग्लंडच काय जगातले अनेक पर्यटक येतील भारत पहायला.
अर्थात परदेशी पर्यटकाला आवश्यक वाटणा-या सोयी ही हव्यात.उदा:- बूकिंग्ज्,संरक्षण ,योग्य ,अचूक माहिती वगैरे.

धारावीत जाऊन जर चर्मकारी उद्योगाची भव्यता दाखवली जात असेल तर काही हरकत नसावी .
काही अभ्यासक ते पहायलाच जातात तिथे.
पण ते नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण हे जर कोणाला नुसतच पहायचे असेल आणि `अरेरे` करायचे असेल तर ते काही दर्शनीय नाही.

मी सामा॑न्य माणूस आहे .
मला नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण या गोष्टी दारूण वाटतात.त्याचा मला तरी अभिमान वाटत नाही.
चांगल्या परंपरांची मी ही पाईक आहे . मला ही त्यांचा अभिमान आहे.

बूरा मत देखो ,सूनो ,कहो आणि दिखाओ ही.
म्हणजे दाखवायचच असेल तर बूरा मत दिखाओ.त्यातल अच्छा दिखाओ.

आता `बूरा ` कशाला म्हणायच आणि अच्छा कशाला ते ज्याच त्याने ठरवावे.

विसोबा खेचर

आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे.

का? धोबीघाट दाखवला तर बिघडलं कुठे? आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल!

तात्या.

आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल!

मुळात भारताची जगात प्रतिमा काय आहे याचा किती लोकांनी विचार केलाय. गेले २ वर्ष मी जर्मन टीव्ही पाहत आहे (खास तात्यांसाठी: मला जर्मनसुद्धा कळते असा ह्या वाक्यापाठी प्रचाराचा हेतु नाही. नोंद घ्यावी.) तिथे भारत हा तिसर्‍या जगातील देश म्हणून दाखवितात. गेले २ वर्षात त्यांनी भारतातील गरीबी, दारिद्रय, घाण, बकालपणा सोडून काहीही दाखविलेले नाही (अपवाद फक्त टाटांच्या नॅनो कारचा, ते पण त्यांचा नाईलाज झाला कारण खुद्द बीएमडब्ल्यु, फोल्क्सवागनला जे जमले नाही ते टाटांनी करून दाखवले).

मी स्वत: जर्मन टीव्हीवर भारतात कसे गटारात उतरून घाण, मैला हाताने साफ करतात त्यावर २-३ लघुपट पाहिले आहेत. आपला भारत जगाला फारच आवडतो असे म्हणणे कुपमंडूक वृत्ती झाली.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

चतुरंग

प्रतिमेसंबंधी उद्गार काढले आहेतत्यामुळे राहवले नाही, अन्यथा तुमच्या आणि तात्यांच्या सुखसंवादात तोंड घातले नसते:)

एकूणच पाश्चिमात्य जग (हे पहिले जग बरंका- हे ठरवणारे कोण? स्वतःच!) हे संभावित मनोवृत्तीचे आहे असा माझा ६ वर्षांच्या निरीक्षणाअंती बनलेला विचार आहे. जो पर्यंत त्यांच्या स्थानाला धक्का लागत नाही तो पर्यंत ते तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार तिसर्‍या जगातले देश आणि लोक कसे प्रगती करत आहेत, त्यांना 'मदत' करणे आमचे कसे कर्तव्य आहे इ.इ...आणि एकदा का स्पर्धा निर्माण झाली की दुटप्पीपणा दाखवायला सुरुवात! (आठवा आठवा - अमेरिकेने नाकारलेला महासंगणक, त्यानंतर विजय भटकरांच्या विजयी नेतृत्वाखाली आपण त्यांना दिलेली 'परम' मात!). मग येन केन प्रकारेण ते इथून तिथून नाही नाही ते सगळे दाखवून चिखलफेक करणार आणि प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणार.
तुम्ही जर्मनी म्हणताय तिथेही वेगळा प्रकार नाही. तिथेलेही काही किस्से मी ऐकून आहे.

खरी गोम इथेच आहे की ह्या सगळ्या प्रकाराला आपण कसे तोंड देतो. तिथे जे दाखविले जाते त्याबद्दल आपापसात चर्चा होताना आपण आपल्या सहकार्‍यांसमोर भारताची चांगली प्रतिमा आणणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मी मानतो - मी स्वतः त्याबाबत जागरुक असतो.
भारताबद्दल कोणी अनुदार बोलायला लागला की मी त्यांचे इथले तिथले जगभरातले प्रताप त्यांच्या पदरात (किंवा स्कर्टमध्ये म्हणा हवंतर) घालतो!

असो. जरा जास्त लिहिले पण काय करणार "बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!" हे शेवटी खरेच!!

चतुरंग

शरुबाबा

सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते.