जनातलं, मनातलं

एप्रिल फळ (६)

Primary tabs

मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.
असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते. केवळ हारीने मांडलेली फळे हीच काय ती सजावट . रंगपंचमीच्या वेळी रंगानी नटलेले दुकाना असवे इतक्या विविध रंगांनी फळानी दुकान सजलेले असते.
हिरव्या पिवळ्या मोसंब्या , काळ्सर शेवाळी हिरवे कलींगड , पिवळे धमक आंबे , हिरवी गार द्राक्षे ,सोनेरी खरबूज , अन्जीरी गुलाबी अन्जीर , पांढर्यावर हिरवे पट्टे असलेली साखर काकडी .खाकी रंगाचे चिक्कू , आंब्याशी स्पर्धा करणारी पपई,लालभडक स्ट्रॉबेरी , जांभळे ,तुत्तु, रायण्या ,आंबोळया वगैरे माकड मेवा अजून यायचा असतो.या सार्‍या फळांच्या सोबत बसलेला फळवाल्याचा कळकट छोटा मुलगा सुद्धा या रंगसंगती मध्ये शोभुन दिसतो
ही सगळे फळे म्हणजे सम्राटांच्या दरबारातले मानकरी. सम्राटाला साजेल अशाच वेशात असतात. प्रत्येकाचा थाट काही औरच.
द्राक्षाचा बहर संपत आलेला असतो. मोत्यांची रास रचावी तशी द्रक्षांच्या घडाची रास पाहीली की आपण गर्भश्रीमन्त असल्यासरखे वाटु लागते,हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
माझ्या लाहनपणी द्राक्षे बीयांसहीत असायची. मोठीमोठी द्राक्षे आणि त्यात एखादे बी. चांगली टपोर्‍या जाम्भळाएवढी असायची द्राक्षे. सीडलेस द्राक्षे आली तेंव्हा ती या बीवाल्या द्राक्षांसमोर वामन बटु च दिसायची . आम्ही त्याना हिमगौरी च्या कथेतली सात बुटके म्हणायचो.
काही म्हणा द्राक्षे तेंव्हाही कधी आपल्या मातीतली वाटली नाहीत. ते फळ थोडे दुरावा राखुनच असते.फक्त थोड्या खस्ता खाउन वाळुन द्राक्षा बेदाणे होउन आल्या की त्या पाहुण्या वाटतात. थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते ; डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
घरातले बाकी लोक हसायला लागले की कळते अरेच्च्या द्राक्षानी आपल्याला एप्रिल फूल केले की.....
(क्रमशः)

धनंजय

लेखात द्या की विजुभाऊ.
लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत.

छान चालू आहे.

विजुभाऊ

बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन
त्या अगोदर हे पहा

http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)

इनोबा म्हणे

डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते.

भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की....

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

शक्तिमान

असेच म्हणतो...

>>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा.

आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...

सुरवात द्राक्षांची छान केलीत.
गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा.
अगदी बरोबर.........
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.

पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....

चतुरंग

द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;)
परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत
वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;((

द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला?
आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;))

चतुरंग

मनस्वी

उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड

विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.

सहज

विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे.

पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.

आनंदयात्री

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही !
दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे
आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात.
बिनकोयीचा आंबा झकास!
विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान!
स्वाती

धमाल मुलगा

हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.

ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ!

आईशप्पथ, चतुरंगराव,
काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची!
हाय! जुने दिवस आठवले.

थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते

...और ये लगा चौका !

बाकी, स्वातीताईच्या,

पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.

ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत.

-(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.