Skip to main content

वसई किल्ला, मिपाकरांसोबत

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/03/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
वसई किल्ला- तीन्ही बाजूंनी पाणी व जमिनीवरून चिंचोळा रस्ता अशी याची रचना. मूळ मराठी सरदाराने उभारलेला व पुढे गुजराथच्या सुलतानाच्या ताब्यात आलेला व त्यापुढे पोर्तुगीजांनी बळकावलेला व त्याची भक्कम पुनर्बांधणी केलेला एक अभेद्य दुर्ग. पुढे चिमाजीअप्पांच्या अतुलनीय शौर्याने हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. रविवार करावे लागणारे हापिसचे काम ऐनवेळी पुढे ढकलेले गेल्यामुळे माझा मुंबई प्रवासाचा मार्ग सुकर झाला व मी आणि मोदक पिंपरीला भल्या सकाळी सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढलो, सूड पुण्याहून बसलेलाच होता. तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या. सूड बदलापूरला जाऊन ठाण्याला आम्हाला जॉईन होणार होता. किसनदेवांनी ठाण्यात मामलेदार मिसळ खाऊ घालून आम्हास तृप्त केले. आधी पोटोबा मग विठोबा या उक्तीला जागून आम्ही तिघे कौपिनेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन १२.३० च्या आसपास ठाणे बस थांब्यावर आलो. सूडही थोड्याच वेळात तिथे आला. मीरारोड स्थानकावर उतरून तिथून विरार लोकल पकडली आणि १५ मिनिटातच वसई रोड स्थानकावर उतरलो. लगोलग मागच्या लोकलने चर्नीरोडवरून विलासराव व आत्मशून्य येऊन पोहोचले. वसई रोड स्थानकावरच्या हाटेलात पोटपूजा उरकून दोन रिक्षांद्वारे आम्ही ६ जण वसई किल्ल्यात डेरेदाखल झालो. किल्लाची तटबंदी चहूबाजूंना दिसत होती तेव्हा आम्हास समजले की आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी आहोत व डांबरी सडक थेट किल्ल्याच्या मध्यभागापर्यंत आली आहे. तिथल्या जवळच्याच एका भव्य चर्चच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. . पोर्तुगीज आणि रोमन शैलीचा सुंदर मिलाफ इथल्या इमारतीच्या धाटणीत आढळतो. तिथूनच एका चोरवाटेने आम्ही एका मोकळ्या प्रांगणात आलो. सर्वत्र वाढलेल्या झाडीतच इमारतींचे भग्नावशेष दिसून येत होते. एका प्रवेशद्वारातून झाडीभरल्या वाटेनं जात आम्ही एका उत्तुंग इमारतीपाशी आलो. उंच उंच कमानी मध्ये पटांगण व शेवट मनोरा अशी याची रचना. मनोर्‍यावर जायला गोलाकार भुयारी जिने खोदलेले आहेत. ४ मजली जिने चढून जाऊन आम्ही मनोर्‍यावरच्या बुरुजावर पोहोचलो. तिथून चहूबाजूंचे दृश्य नजरेस येत होते. वसईची खाडी व त्यापल्याडच्या समुद्राचे लोभस दर्शन होत होते. इतर तीनही बाजूंना उभारलेले उंच उंच भक्कम तट दाट झाडीने कोंडल्यागत वाटत होते. १. चर्चची भव्य इमारत २. चर्चचा अंतर्भाग ३. पडके बुरुज, उद्धस्त भिंती ४. मनोर्‍याची इमारत ५. मनोरा ६. मनोर्‍याच्या पार्श्वभूमीवर मिपाकर (किसन, आशू, मोदक, सूड, विलासराव) ७. इमारतीचा अंतर्भाग मनोरा उतरून आलो. तटालगतच्या पायर्‍यांवरून पश्चिमेकडच्या तटावर आलो. आता समुद्र अगदी जवळच दिसत होता. जेमतेम फूटभराची अरूंद वाट सुमारे ३०/३५ फूट उंचीच्या तटावरून पुढे सरकते. त्यावरून भिंतीला खसटूनच आम्ही एका बुरुजावर आलो. मोदकाने तिथे तटाच्या दगडांना मध्यभागी ठोकलेले जाड्सर खिळे व दुसर्‍या बाजूंना असलेल्या खाचा याचा वापर करून बुरुजांचे भक्कम बांधकाम होत असे असे विशद केले. पायर्‍या उतरून हनुमान मंदिराजवळील दरवाजाने बाहेर आलो. इथून लांबच लाब पसरलेला किल्ल्याचा अजस्त्र घेर दिसत होता. किल्यात असलेल्याच डांबरी सडकेने चालत आम्ही चिमाजीअप्पा पेशव्यांच्या स्मारकापाशी पोहोचलो. स्मारक अतिशय निगुतीने राखलेले आहे. १७३७ साली मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहिल्या बाजीरावाने चिमाजीअप्पांच्या हाती वसईची मोहीम सोपवली. तुंबळ लढाई करूनही वसईचा किल्ला दाद देत नव्हता. अखेर चिमाजीअप्पांनी दलदलीच्या बाजूने चढाई करण्याचे ठरवले. मराठ्यांचे सैन्य सेंट सेबेस्टीयन बुरुज फोडून आत शिरले व हातघाईच्या लढाईनंतर वसईचा अभेद्य दुर्ग स्वराज्यात आला. पुढे १७८० नंतर मात्र तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. ८. मोदक आणि सूड तटाच्या अरूंद वाटेवरून भिंतीला लगटून चालताना ९. तटाच्या खिडकीतून दिसणारी वसईची खाडी व मधला खाजणाचा प्रदेश १०. वसईची खाडी ११. हनुमान मंदिराच्या इथे असलेला दरवाजा १२. चिमाजीअप्पांचा पुतळा चिमाजीअप्पांना मनोमन वंदन करून आम्ही किल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. इथे काही पोर्तुगीज शैलीतल्या चिन्ह प्रतिमा , तसेच काही शिलालेख कोरलेले आहेत. बाजूलाच काही भव्य इमारती आहेत. ते बघत बघतच पेशव्यांनी स्थापन्न केलेल्या वज्रेश्वरी देवीचे व नागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. १३. भव्य इमारती १४. कमानदार रचना १५. पडक्या भिंती १६. काही पोर्तुगीजकालीन चिन्हे १७. पोर्तुगीजांचा सागरी सत्तेचे निदर्शक चिन्ह १८. अजून काही अवशेष ते पाहून दर्या दरवाजातून आतल्या कोळीवाड्यात शिरलो ते किनार्‍यावर जाण्यासाठी. इथले सर्व कोळी लोक किरिस्तांव आहेत. थोड्याच वेळात जेट्टीवर पोहोचलो. तिथे मिपाकरांच्या मनमुराद गप्पा रंगल्या. आशूच्या नर्मदा परिक्रमेविषयी एक छोटंसं चर्चासत्र तिथं पार पडलं. आशूचे अनुभव ऐकल्यानंतर वसईच्या मच्छीमार बोटी पाहून मासे जाळ्यात कसे गावतात, जाळे समांतर लावतात का लंबाकार, आत शिरलेले मासे बाहेर का पडू शकत नाहीत यावर एक काथ्याकूट झाला पण निष्कर्ष कुठलाच निघाला नसल्याने मिपावर काथ्याकुटात हा विषय मांडावा का यावर खल झाला. किनार्‍यावर मनमुराद गप्पा मारून परत किल्ल्यातल्याच डांबरी रस्त्यावर आलो तिथून बस पकडून वसई रोड स्थानकावर आलो. वसई - ठाणे एसटी पकडून मी,सुड, किसनदेव आणि मोदक निघालो. आशू आणि विलासराव लोकलने चर्नीरोडला जाण्यास निघाले. १९. जेट्टीवर २०. सूर्यास्ताच्या सुमारास २१. वसईचे सहा शिलेदार ठाण्यास स्पा आणि विमे स्वाद मध्ये आमची वाटच पाहात होते. स्वादची स्वादीष्ट थाळी अमर्यादित बासुंदीसह रिचवून प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. मी आणि मोदक मात्र किसनदेवांच्या घरी मुक्कामास गेलो ते दुसर्‍या दिवशीचा कान्हेरी लेण्यांचा कार्यक्रम ठरवूनच. त्याविषयी लवकरच...

वाचने 21326
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

झक्कास हो वल्लीशेठ. फोटॉ भारीच. बम ऐश करुन र्‍हायला बाप्पा तुम्ही !!! बाकी ते "मिपाकरांसोबत" ढिश्क्लेमर कशासाठी? इतर कुणा खास व्यक्तीसोबतही जाता काय? ;)

In reply to by इरसाल

ते तळ घरात कपडे बदलतात ;) बाकी , ईंडियाना वल्ली अ‍ॅन्ड टीम ...भिड !! मस्त सफर आणि वर्णन अवांतर : कान्हेरी चे फोटो काढता-काढता दम लागला असेल नाही का ;)

नेहेमी प्रमणे झक्कास वृत्तांकन आणी फोटो... :-) आता हाणामारीचे मुद्दे:- ;-) @थोड्याच वेळात जेट्टीवर पोहोचलो. तिथे मिपाकरांच्या मनमुराद गप्पा रंगल्या. आशूच्या नर्मदा परिक्रमेविषयी एक छोटंसं चर्चासत्र तिथं पार पडलं.*** ''मासे जाळ्यात कसे गावतात, जाळे समांतर लावतात का लंबाकार, आत शिरलेले मासे बाहेर का पडू शकत नाहीत'' यावर काथ्याकूट झाला पण निष्कर्ष कुठलाच निघाला नसल्याने मिपावर काथ्याकुटात हा विषय मांडावा का यावर खल झाला. >>> *** इथे परिच्छेद द्यायचा र्‍हायला काय..? ;-) @ठाण्यास स्पा आणि विमे स्वाद मध्ये आमची वाटच पाहात होते. स्वादची स्वादीष्ट थाळी अमर्यादित बासुंदीसह रिचवून प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. >>> १)मला हुंबैस येत नाही...असे म्हणणारा हा स्पांडु किल्ला सफरिला स्थानिक असुन, का बरे जॉइन झाला नाही..? तेवढिच काही रोचक प्रसंगांची वाढ झाली असती... तिकडे आणी इकडे धाग्यातही ;-) २) वल्ली,बासुंदी खाताना आधी बाजुला शिंपडलीत ना..? ;-) आणी किती वाट्या रिचवल्या..? तिथल्या थाळीचा फोटू र्‍हायला काय..? :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

इथे परिच्छेद द्यायचा र्‍हायला काय..?
योग्य तो बदल केल्या आहे. :)
असे म्हणणारा हा स्पांडु किल्ला सफरिला स्थानिक असुन, का बरे जॉइन झाला नाही..?
त्याला शनिवारी हापिस होते. रविवारी तो कान्हेरीस होताच. :)
वल्ली,बासुंदी खाताना आधी बाजुला शिंपडलीत ना..? Wink आणी किती वाट्या रिचवल्या..?
छे छे. थेंबभर बासुंदी पण आम्ही वाया जाऊ दिली नाही. वाट्या रिचवायचे काम मोदक आणि सूड कडे होते. बासुंदीवाल्याला विन्मुख पाठवणे तर सोडाच पण सारखे सारखे बोलावून आणत होते हे दोघं. ;)

In reply to by प्रचेतस

@छे छे. थेंबभर बासुंदी पण आम्ही वाया जाऊ दिली नाही.>>> आमच्या नावानी एक(ही) थेंब न उडवल्या बद्दल... णिषेध णिषेध णिषेध ;-) @वाट्या रिचवायचे काम मोदक आणि सूड कडे होते. >>> मोदक बासुंदी रिचवतो... @बासुंदीवाल्याला विन्मुख पाठवणे तर सोडाच पण सारखे सारखे बोलावून आणत होते हे दोघं. >>> पुढल्या वेळेस आले तर कळावे,म्हणुन हाटिल वाल्यांनी चोरुन फटु काढले असतील,अशी बासुंदि इतकिच घट्ट शंका येत आहे... ;-)

वल्ली, वसई चा किल्ला आणि लेख छानच आहेत. किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत असे दिसते. लेखातील वर्णनाने वसईचा किल्ला आणि समोरील समुद्र हे डोळ्यासमोर उभे राहिले. एकंदरीतच या सहलीमध्ये तुमचा पोटोबा चांगला झाल्याचे (शेवटच्या चित्रावरुनही) कळले.

मस्त हो, वल्लीशेठ! छान झाला वृत्तांत. फोटोही सॉलिड आले आहेत, विशेषतः वसई किल्ला मोहिमेवरच्या सहा शिलेदारांचा... :-) आता कान्हेरीच्या वृत्तांताची वाट बघत आहे. स्वाद थाळीचा फोटू न दिल्याने इनो घेण्याची वेळ न आणल्याबद्दल आभारी आहे.

जबराट फोटू , आणि उत्तम माहिती रात्री स्वाद ला धमाल आली .. मोदक ने बासुंदीवर हल्ला करून स्वाद च्या वाढप्यांना अक्षरश: जेरीस आणले :D वल्ली ची तोफ थंडावली होती, पण सूड ने मोदक ला उत्तम साथ दिली. इतका हल्ला करून, वर बासुंदी खास नव्हती हे सांगून मोदकाने ४० रुपये परत मिळवले , आणि आपण पुणेकर असल्याचे सिद्ध केले , त्या बद्दलही त्याचे अभिनंदन ;)

In reply to by स्पा

झकास वृत्तांत रे.. (किल्ल्याचा वृत्तांत झाल्यामुळे मी फक्त खादाडी बद्दल लिहितो..) ठाण्याला सकाळी पोहोचल्यापोहोचल्या मामलेदारकडे मिसळ, वडा आणि अप्रतीम हिरवी चटणी अशी सुरूवात झाली. ठाणे, मामलेदार, तिथली कार्यालये या सगळ्याची माहिती किसन कडून अव्याहतपणे मिळत होतीच. मामलेदार मिसळ हा कार्यक्रम लगेच आवरल्यामुळे व सूड ला येण्यास उशीर असल्यामुळे आमचा मोर्चा तिथूनच जवळ असलेल्या मॅजेस्टिक बुक कडे वळाला. इथेच आहे.. टाकीमागेच आहे.. हे बघा समोरच असे सांगत किसन ने शेवटी मॅजेस्टिक मध्ये नेले आणि सगळेजण त्या पुस्तकाच्या दुकानात हरवले. निघायची वेळ झाली तेंव्हा एक मजेदार चढाओढ चालू झाली. चला चला असे मागे लागून आम्हाला दरवाज्यापाशी ढकलून किसनदेव पुस्तकांमागे (पुनःपुन्हा) अंतर्धान पावत होते.. आणि त्याला शोधायला जाणाराही तिथेच हरवत होता.. हाच प्रवेश मी आणि वल्ली ने ही तितक्याच उत्साहाने पार पाडला. बाहेर पडायच्या शेवटच्या क्षणी मलाही एक पुस्तक आवडले आणि खरेदी पार पडली. (किल्ल्याचा वृत्तांत वल्लीने लिहिला आहेच.) स्वाद च्या डायनींग हॉल मध्ये स्पा आणि विमे आमची वाट पहात होते आणि शनिवारी संध्याकाळीसुध्दा संपूर्ण रिकामा हॉल बघून सगळेजण स्तुती करतात ते स्वाद हेच का अशीही शंका डोक्यात आली.. (पण तिथले पेंटींग + रामदास काकांचा लेख यामुळे खात्री पटली.) किल्ला आणि मिपा यांवर गप्पा रंगू लागल्या आणि जेवणास सुरूवात झाली.. तिथली बासुंदी.. अप्रतीम. मध्यम गोड, हवी तितकीच थंडगार आणि ठीक्कच पडलेली साखर.. पहिला अर्धा तास (व ८ ते ९ वाट्या बासुंदी) अप्रतीम चव सेट झाली होती.. पण जशी जशी आमची मागणी वाढू लागली तशी बासुंदीची चव बदलू लागली.. कारण विचारले असता असे कळाले की आजच्या स्टॉकमधली बासुंदी संपली असून (Reserve Stock मधली) कुल्फी स्वरूपातली बासुंदी गरम पाण्याच्या मदतीने मूळ बासुंदी रूपात आणली जात होती.. आणखी २ / ३ वाट्यात चवीमध्ये खूप जास्त फरक पडल्याने नाईलाजाने जेवण अर्ध्यातच सोडावे लागले... :-( बिल देताना हे कानावर घातले असता तिथल्या काकूंनी बाणेदारपणे 'मग आम्ही बासूंदीचे पैसे घेणार नाही' असे सांगितले. "अहो मी १० पेक्षा जास्त वाट्या संपवल्या आहेत.. शेवटी शेवटी चव बदलली.. त्यामुळे पैसे घ्या.." असल्या माझ्या बोलण्याकडे काकूंनी शांतपणे दुर्लक्ष केले व रू ४० परत दिले. सूड, स्पा व विमे यांना टा टा करून आणि मसाला पान जमवून आम्ही किसन कडे मुक्कामाला आलो. (यापुढचा प्रतिसाद पुढील वृत्तांतावर :-))

In reply to by मोदक

(किल्ल्याचा वृत्तांत झाल्यामुळे मी फक्त खादाडी बद्दल लिहितो..) खादाडीच एवढे रसभरीत वर्णन करुन तोंडाला पाणी आणले ते आणले पण फोटो देऊन मनःशांती न केल्याबद्दल मोदकाचा णिशेद ;)

झक्कास.. मी भरपूर काही मिस केलंय हे माहीत असूनही आता प्रत्यक्ष पाहिल्यावर वाईट वाटलंच.. पण धागारुपाने पहायला मिळाल्याचा आनंद झाला... रच्याक : अनलिमिटेड थाळी तर त्यांची आहे पण अनलिमिटेड बासुंदी ? आँ? हा काय चमत्कार.. कर्व्यांच्याकडे बराच मोठा क्रांतिकारक बदल झालेला दिसतो गेल्या काही आठवड्यांत.. :)

कर्व्यांच्याकडे बराच मोठा क्रांतिकारक बदल झालेला दिसतो गेल्या काही आठवड्यांत.. होय मलाही असंच काही वाटलं .

In reply to by रामदास

@ गवि, रामदास काका थाळीत २ प्रकार आहेत कर्व्यांकडे १६० मध्ये अनलिमिटेड ( गोड मर्यादित ) आणि २२० मध्ये गोडासकट सर्व अनलिमिटेड

In reply to by स्पा

बरोबर हेच लिहायला आलो होतो..१६० मध्ये अमर्यादित जेवण ( मिष्टान्न मर्यादित ) आणि २२० मध्ये मिष्टान्नासकट सर्व अमर्यादित . (हल्ली पेठकर काका शुद्धलेखनाच्या चूका लाल अक्षरात लिहून देतात, म्हणून आधीच दुरुस्ती केली.) ;)

In reply to by सूड

हे माहीत नव्हतं.. अनेक धन्यवाद... हा ऑप्शन पूर्वी नसावा असं वाटतं आहे कारण गोड नेहमीच मर्यादित असं सांगण्यात यायचं, २२० चा ऑप्शन कधीच दिला गेला नव्हता. चांगलं झालं आता.. आता कोणा पाहुण्यांना जेवायला घेऊन गेल्यावर गोड मर्यादित आहे असं आवर्जून सांगावं लागणार नाही.. (किंवा तसं न बोलल्यास पाहुण्यांनी जास्तीच्या ओरपलेल्या वाट्यांच्या एक्स्ट्रॉ चार्जेसने पोटात गोळा उठणार नाही..)

ह्याच किल्ल्यात अर्ध्या चड्डीत (म्हणजे लहानपणी) क्रिकेट खेळण्यात घालवलेला काळ आठवला. विरार वसईच्या आठवणी जाग्या झाल्या.... - (पूर्वाश्रमीचा विरार-वसईकर) सोकाजी

In reply to by प्यारे१

येव्हढे चान चान प्रवासवर्णन लिहिणार्‍या वल्लीचे व्यक्तिमत्वही भारदस्तच असणार... त्यामुळे फोटोतील भारदस्त व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे वल्ली. ;)

In reply to by अन्नू

तुम्ही सगळे असे कसे चमे लोक्स रे??? ;) अरे प्रश्नकर्ती के प्रश्न का रोख तरी समझो? ;) - प्यारक सराफ (हातात चेंडू पकडल्यासारखा नि चेहर्‍यावर हताश भाव)

In reply to by प्यारे१

समझ्या समझ्या हमकु समझ्या! यहाँ पे तो काऊंटींग चालू हय.

In reply to by प्यारे१

@प्यारक सराफ (हातात चेंडू पकडल्यासारखा नि चेहर्‍यावर हताश भाव)>>> प्यार्‍याला आंम्ही खादाडीच्या धाग्यावर संन्यस्त प्यारे असं म्हंटलवतं ते उगाच नाही...त्यांचं संन्यस्त केलेलं खड्ग कधी उफाळेल सांगता नै येत.. ;-)

मस्त मस्त... श्रीदत्त राऊतांच्या अनेक व्याख्यानाला आणि वसई किल्ला संवर्धन कार्यक्रमांना जातीने हजर असतो :) :) काय राव इथे आलात आणि धड कळवलं पण नाहीत :( :(

मस्त वृत्तांत वल्ली, मजा केलीत तर एकंदरीत. बाळ मोदक आमच्याकडं यायचा आहे खरा पण जरा पुढचा 'योग्य' दिवस बघावा म्हणतो. ;) ____________________________________________ (मोदकचा वरील वृत्तांत वाचल्यावर) मोदक या आयडीची आणि माझी अज्जिबात ओळख नाही असे मी इथेच जाहीर करतो. :) - (इच्छा नसताना पुणेकर होऊ घातलेला) प्यारे१

In reply to by प्यारे१

(बूच मारले आहे त्यामुळे आता बदल शक्य नाही. ;-)) >>>बाळ मोदक आमच्याकडं यायचा आहे खरा पण जरा पुढचा 'योग्य' दिवस बघावा म्हणतो. बघुया.. लवकरचा मुहूर्त काढा म्हणजे मिळवले... :-) पुढचा कट्टा दुर्वांकूरमध्ये (एखाद्या रविवारी आमरस चापण्यासाठी) ठरवावा असा जोरदार प्रस्ताव वल्ली, सूड (आणि मी) यांच्याकडून आला आहे. आशू ने ही यावे असे सुचवले गेले आहे. गणेशा ला गृहीत धरले आहेच. प्यारे, ५०, अतृप्त आत्मा अशी वडीलधारी मंडळी (कोण रे तो 'मागच्या पिढीतील' म्हणतो आहे..??) आहेतच. बोला मंडळी १८ मार्च ला ठरवायचे का..?

फोटू मस्त आलेत. जवळच्याच वर्तक कालिजातली चार वर्षं आठवून अं.ह. झालो ;) कान्हेरी लेण्यांबद्दलच्या लेखाची वाट पाहतो.

In reply to by ५० फक्त

सविस्तर शिव्या वैयक्तिक भेटित घालण्यात येतील.
........या वाक्याला बेंच वाजवून जोरदार अनुमोदन ! - मालोजीराव

In reply to by जयंत कुलकर्णी

नक्कीच येऊ द्यात. वसईचा इतिहास फारसा माहित नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

नेकी और पूछ पूछ... येउद्या लवकर! - (किल्ल्याचा इतिहास जाणण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

In reply to by जयंत कुलकर्णी

तुम्ही ईतिहास, भूगोल, शास्त्र कुठल्याही विषयावर लिहा आम्ही वाचणारचं (जकु चा पंखा)

वसईच्या जवळ राहत असूनही कधी जायचा योगच आला नाही. पण तुमच्यामुळे आज त्याची सैर घडली. धन्यवाद! __/\__ :)

वल्लीने वृत्तांत मस्त लिहीलाय. माझ्यातर्फे थोडी भर. सिंहगडने इथून निघायचं पक्कं झालं..फोनाफोनी झाली. शुक्रवारी माझं हापिसाचं काम उरकेपर्यंत अकरा वाजले (आम्ही हापिसात आणि घरीपण हापिसाची कामं करतो असं दाखवायचं असतं ). मला अकरा वाजेपर्यंत जागं बघून खोलीमित्राने (रुममेट हो) प्रश्न केला. 'उद्या कवा निघायलाय ??' गजर लावलाय साडेचारचा..इति मी 'आरं मंग झालं की साडेचार आता' मला बोलण्याचा रोख कळेना. 'म्हंजे आत्ताच जाउ म्हंतोस ?' मी जरा त्याच्याच ष्टाईलने सुरु झालो. 'आरं तसं न्हाई. उद्या जाग यील का ?' ह्या एका प्रश्नाने झोप उडाली. एरवी मी एकटा जातो तेव्हा चालून जातं. आता सगळा प्लान झाल्याने माझ्यामुळे तो बोंबलू नये हे सारखं डोक्यात होतं. आधी दोनला मग साडेतीनला उठून घड्याळ पाह्यलं. मग कसली झोप लागते. खोलीमित्राच्या प्रश्नाला मनोमन शिव्या (किंवा श्या) देत सवाचारला उठलो. साडेपाचला स्टेशन गाठलं. गाडीत बसलो तर बाजूला एक नवदांपत्य वाटावं अशा व्यक्ती-व्यक्तीण बसले होते (असेलही नवदांपत्य, उगाच का चौकशा करा ). गाडी सुटली तसं त्यांचं बारीक आवाजात हितगुज सुरु झालं. मनात हसून म्हटलं लेको आता काय बोलायचं बोलून घ्या आता मिपाकर आले की तुमचं बोलणं ऐकू यायचं नाही तुम्हाला. :D आणि तसंच झालं. आमच्या अशा काही गप्पा रंगल्या की दोघेही वैतागले असणार. पण सांगणार कुणाला. कर्जत आलं तसं मी उतरलो. ब्याग घरी बदलापूरात टाकून अकराच्या गाडीने ठाण्याला हजर. तोवर मंडळी बष्टाप्पावर पोचली होतीच. पुढचा वसई वृत्तांत वल्लीने कव्हर केलाच आहे. त्यात मासे जाळ्यात कसे अडकतात यावर छोटं चर्चासत्र झालं. तिथल्या स्थानिक मच्छीमाराला विचारलं तर त्याने सांगायचा प्रयत्न केला पण काही समजेना. शेवटी 'आमचे घरान आलांव तर दाखवता तुमाना माशे कशे आडकतान ते' असं उत्तर मिळालं. पण ते शक्य नव्हतं. पुढे यष्टीचा प्रवास करुन स्वादला पोचलो. स्पा, विमे तिथे हजर होतेच. मग थाळीची विचारणा झाल्यावर दोनशेवीस रुपै अमर्यादित मिष्टान्न वाल्या थाळीसाठी चार जण तयार झालो. 'बासुंदी संपली, थांबा दुसरी घेऊन येतो' असं म्हणेपर्यंत बासुंदीवर यथेच्छ ताव मारला.

In reply to by सूड

गाडी आणि गप्पांनी वेग घेतल्यानंतर सूड, मी आणि ते दांपत्य तीनच्या सीट वर बसलो. (राजरोसपणे कोपर्‍यात सरकवल्याबद्दल त्यांनी शिव्या घातल्या की शुभेच्छा दिल्या हे मात्र शेवटपर्यंत कळाले नाही ;-)) थोड्या वेळाने टीसी माझे व सूड चे तिकीट चेकवून गेला. वल्लीला (बहुदा भारदस्त व्यक्तीमत्त्वाकडे बघून) टीसी ने तिकीट सुध्दा मागितले नाही..

रविव्रारी रात्रीच मी आणि मोदक भेटलो होतो, तेव्हांच आमची या विषयावर चर्चा झाली होती. झक्कास वृतांत व फोटू पण अप्रतिम.

वल्लीने लिहिलेल्या वृत्तांतास सूड, मोदक, स्पा यांनी उपवृत्तांत लिहून लेख संग्राह्य केला आहे. कान्हेरी वृत्तांताच्या प्रतिक्षेत. स्वाद थाळीचा फोटो न टाकल्याबद्दल इनोचे वितरक तुमच्यावर रागावलेले असणार यात शंका नाही ;)

१९६३ ते १९७२ या काळात वसईला मामाकडे जायचो. दाबून बर्फाचे गोळे , ताडगोळे खायचो. मग दरवेळी वसईचा किल्ला आलाच. नारळीच्या कुशीत वसलेली वसई. एस टी च्या गाड्या . सकाळी महाराष्ट्र टाईम्स चे वाचन. मजा यायची . तरूण झालो . वसईचा किल्ला लांबूनच गाडीतून दिसायचा. मामा गोविंदाच्या गावी विरारला गेला. वसईचा किल्ला ,' पुरानी खंडहरमे रातके बारा बजे माल लेके आओ सब नोट सो सो के चाहिये ' या सिचुएशन साठी किंवा शेवटच्या ढिशुम साठी सिनेमात दिसायला लागला. जिथे खरी लढाई झाली बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ल्ला असला से ज्याचे वर्णन तिथे खोट्या कचकड्याच्या लढाया कॅमेरा टिपू लागला.

क्या बात है दोस्तो. लगे रहो. फोटो आणि वृत्तांत नेहमीप्रमाणेच झकास. -दिलीप बिरुटे

मस्तच वृत्तांत! सगळ्यांनीच डिट्टेलवार लिहल्यामुळे आम्हाला लिहण्यासाठी काहीच उरलं नाहिये, त्यामुळे याची भरपाई पुढच्या कान्हेरी वृत्तांतात नक्कीच करण्यात येईल. :) पुढच्या कान्हेरी वृत्तांची वाट पाहतोय रे...

वल्ली मित्रा, एकदम सुरेख वर्णन केले आहेस या वसईच्या किल्ल्याचे. मला खास करुन क्र.९ व क्र.१० हे फोटो खूप आवडले. एकाच दृष्याकडे दोन अँगलने बघणे खूप मजेशीर आणि आनंददायक असते. पोर्तुगीजांच्या काळातले कुत्र्यांनी तोंडात काठी धरलेली २ शिल्पे एकदम मजेशीर वाटली. बाकी किल्ल्याची दुरावस्था बघणे क्लेशकारकच असते. तरी तू जी छायाचित्रे टिपली आहेस ती अप्रतिमच आहेत. त्यावरुन किल्ल्याचा अंदाज छान करता येतो. चिमाजीअप्पांचे शौर्य तर सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या पराक्रमामुळे एक भौगोलिक आणि सामरिकदॄष्ट्या महत्त्वाचे ठाणे स्वराज्यात दाखल झाले होते हे विसरणे शक्यच नाही. आता मिपाच्या इंडियाना जोन्सने 'कान्हेरी लेण्यांचा ' वेध लवकरच वाचकांना सादर करावा अशी आग्रहाची विनंती. या लेण्यांमध्ये खजिना शोधायचा प्रयत्न केलास का? खजिना शोधण्यात इंटरेस्ट असेल तर सांग तुला दंतकथेसकट सगळी माहिती पुरवतो. ;)

म्होरच्या टायमाला आमी बी यायाचा प्रयत्न करु..अप्रतिम मित्रांनो. मला रामदास काका म्हणाले होते की सेना वसईचा किल्ला सर करायला निघालीय तू जातोस का पण काही अपरिहार्य कारणामुळे मला येता आलं नाही. लेखन छान केले आहे.फोटो पण सुंदर आहेतच. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहोत. रघू सावंत