काथ्याकूट

राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ?

Primary tabs

आपल्या देशासमोरचे अनेक प्रश्न अन् अडचणी बघून त्याचे मूळ कशात असावे असा विचार मनात आला. त्यावर चिंतन केले असता जे वाटले ते खाली मांडत आहे. आपली मते जाणून घेण्यास उत्सुकता आहेच!

कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते. देशासाठी, राष्ट्रासाठी जेथे विचार उगम पावतात तेथे अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच आज भारतात एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.

राष्ट्रभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल -
राष्ट्रभिमान, राष्ट्रप्रेम, त्यासाठी जबाबदारी घेण्याची तयारी, राष्ट्राच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे राष्ट्रभावना.

याचा अर्थ सारखे तलवार काढून कापाकापी करत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील.

डॉ. विक्रम साराभाई या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास 40 वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत. त्यांची या स्वप्नामागची प्रेरणा राष्ट्रभावना नसेल तर आणखी काय असेल?

आपल्यामुळे किंवा आपणास दिसणार्‍या इतर लोकांमुळे आपल्या राष्ट्राच्या प्रतिमेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर राष्ट्राचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही.
उदाहरणार्थ, एक साधी सूचना -
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत. "मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही अन् भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणार नाही"असा विचार केल्याने काय एकदम राष्ट्रभावना जागृत होऊ शकेल? नाही. तसे नाही. पण मानसिकता बदलण्यास ही सुरुवात ठरू शकते. १०० कोटी लोकसंख्येत एक जण जरी असा निघाला जो विचार करतोय, "मी भ्रष्टाचार नाही करणार, हे माझ्या देशासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले? किती मोठा विचार आहे हा!
[
अशी सूचना देण्यामागचा एक हेतू हा की, एक दिवसभर असा विचार करून तो अमलांत आणला तर आपण किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये क्षुल्लक स्वार्थासाठी खोटे बोलतो, वागतो ते स्वतःचे स्वतःलाच दिसून येईल.
कारण कितीही केले तरी कुणी स्वमनाला कधीही फसवू शकत नाही.
आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला जाणीव होवून पश्चात्ताप होणे ही चूक सुधारण्याची पहिली पायरी असते.
दुसऱ्याने ती चूक लक्षात आणून दिली तर ती मान्य केल्याच जाईल असे नाही, पण स्वतःला लक्षात आलेली चूक मान्य होण्याचे प्रमाण निश्चितच जास्त असणार.
या साध्या सूचनेच्या पालनामुळे आपण स्वतःच्या वागणुकीकडे बघू शकू असे वाटते.
आणि हेच दिन निवडण्याचे कारण हे की भ्रष्टाचाराचा प्रश्न सरळ देशाच्या प्रतिमेशी आणि प्रगतीशी निगडित असल्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे दुसरे उत्तम साधन कोणते?

दुसरा हेतू असा की, जेव्हा लोकांना स्वतःच्या चुकांबद्दल जाणीव अन् पश्चात्ताप होईल, तेव्हा देशाबद्दल विचार करण्याची वृत्तीही उगम पावू शकेल. काही नाही तर निदान थोडे लोक तरी यादृष्टीने विचार करू लागतील. त्यामुळे आज नाही तर उद्या खचितच आशादायक चित्र बनू शकेल.
(याचा अर्थ असा नाही की आज असा विचार कुणी करतच नाहीत. पण जास्त्तीत जास्त लोक असा विचार करण्यास लागावेत हे नक्कीच चांगले.)
]

मला डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे वाक्य फार आवडते -
"असाल तेथून पुढे चला!" (सौ. वीणा गवाणकर यांच्या "एक होता कार्व्हर" या पुस्तकातून).

आज इतर देशांमधली समृद्धी आपण बघतो तर आपल्याला आपल्या देशाची लाज वाटते. पण त्यांची प्रगती अशाच राष्ट्रभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो? आपली राज्यप्रणाली इंग्लंडच्या राज्यप्रणालीवर आधारलेली आहे. एखादे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेत बहुमत असावे लागते हे आपल्याला माहीत आहे. इंग्लंडमध्ये तिथल्या पॉलिटिशियन्सनी पूर्ण बहुमत असताना सुद्धा एखाद्या प्रश्नासाठी लोकमत अजमावण्याची, फिरून निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली आहे. पुढे जाऊन त्या प्रश्नावर निवडणूक घेतल्यावर, सरकार पडले अन् प्रश्न सर्वमान्य झाला नाही म्हणून पॉलिटिशियन्सना खुर्च्या सोडाव्या लागल्या. आपणास बहुमत आहे म्हणजे एखादा विषय संपूर्ण राष्ट्राला मान्य होईलच असे नाही अन् अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर जनतेचे मत विचारात घेतलेच पाहिजे असे मानणारे लोक तिथे होते (आजची परिस्थिती माहीत नाही!). आज दुर्दैवाने आपल्या देशात तरी अशी परिस्थिती दिसत नाही (उदाहरण - डॉ. वेणुगोपाल आणि श्री. अंबूमाणी रामाडोस वाद).

लहान असताना एकदा आमच्या शाळेत श्री. विनय वाईकर आलेले होते. हे लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात काही आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण अशी -
एकदा परदेशात गेलेले असताना एके दिवशी श्री. वाईकर त्यांच्या मित्रासोबत एका बागेत उभे होते. त्यांनी एक सिगरेट ओढली अन् विझवताना आपल्या येथील पद्धतीप्रमाणे जमिनीवर टाकून जोड्याने विझवली, आणि परत आपल्या मित्रासोबत बोलत उभे राहिले. इतक्यात कुठुनसा एक मुलगा झाडू न डस्टमेकर घेऊन आला. त्याने श्री. वाईकरांना विनंती केली की त्यांनी आपला पाय बाजूला घ्यावा. यांनी पाय बाजूला घेतल्यावर त्या मुलाने ते सिगारेटचे थोटूक झाडूने डस्टमेकरमधे गोळा केले. आणि यांना थॅंक यू म्हणून तो जाऊ लागला. श्री. वाईकरांना फार ओशाळल्यासारखे झाले. त्यांनी त्या मुलाला माफी मागितली. तर त्यावर तो मुलगा त्यांना म्हणतो, "तसे म्हणू नका. येथे माझी नेमणूक कचरा गोळा करण्यासाठी झालेली आहे. पण कुणी कचराच करत नसल्यामुळे, मी जवळ जवळ फुकटंच पगार घेतो. आज आपण मला काम करायची संधी दिलीत याबद्दल मी आपला आभारी आहे." जेथे अशा भावनेने लोक काम करत असतील तो देश किती भाग्यवान!!

आपले या विषयावर काय मत?

[दुसरीकडेही हा लेख मी अगोदर प्रकाशित केलेला आहे. किंचित मांडणी बदलून येथे प्रकाशित करतोय.]

विसोबा खेचर

हम्म! आपल्या देशाचा आणि देशवासियांचा कमीपणा दाखवणारा अजून एक लेख...!

बाकी लेख छानच आहे हो, चालू द्या! :)

इथे एवढा भ्रष्टाचार, अनाचार, अनागोंदी वगैरे असतानादेखील छान छान नी सुंदर सुंदर नी मारे शिस्तशीर वगैरे देशातली गोरी माकडं इथे मोठमोठी हापिसं थाटून धंदे करायला मात्र बरी येतात याची मात्र अंमळ गंमत वाटते! :)

स्वगत : अहो एवढी मोठी भारतीय बाजारपेठ! दमड्या मिळतात, दुसरं काय! कमवा लेको...:)

आपला,
(भारतीय) तात्या.

--
आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी थांबली नाही आणि आहे म्हणून कधी वेगानं पळाली नाही! चाल मात्र कोकणी वाटेसारखी. सदा नागमोडी! :)
(अंतुबर्वा)

पूर्ण सहमत...

मी मुमुक्षू यांच्याशी सहमत आहे. राष्ट्रभावनेचा अभाव हा भारतासमोरील 'खूपश्या' (पण सर्व नव्हे) अडचणींच्या मुळाशी आहे. पण राष्ट्रभावनेची व्याख्या थोडीशी 'राष्ट्राभिमान' / 'नॅशनल सेल्फ आयडेन्टिटी' अशी करेन. जर एखाद्याला ही भावना असेल, तर आपण रोज आजूबाजूला बघतो त्यातल्या कितीतरी गोष्टी नाहिश्या होतील, भ्रष्टाचार, हिंसक दंगे इत्यादी. इतकेच काय सार्वजनिक मालमत्तेची नासधूस (हे काही दंग्यांमधेच होते असे नाही, रेल्वेच्या डब्यांवर नजर टाका), ऐतिहासिक स्थळांची नासधूस, त्यांची दूरवस्था, कित्येक धार्मिक ठिकाणी बोकाळलेली अव्यवस्था, दुर्गंधी, अस्वच्छपणा, किती किती उदाहरणे देता येतील.

याचा अर्थ सारखे तलवार काढून कापाकापी करत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील.

बिपिन.

धनंजय

दुसर्‍या कुठल्या मोठ्या लोकशाही देशाच्या तुलनेने बघता "भारतात राष्ट्रभावनेचा तुलनात्मक अभाव नाही" असे माझे मत आहे. (तुम्ही परदेशातल्या झाडूवाल्याचे, जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हरचे उदाहरण दिलेत, म्हणून तुलनात्मक विचार केला.)

आता जर प्रश्न असा असेल की "समूहभावनेचा अभाव - मानवसमाजांतील अडचणींचे मूळ?" तर वेगळा विचार करावा लागेल.

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत.

सर्वच लोक म्हणतात की जो काही भ्रष्ट व्यवहार करतात ते अगतिकतेमुळे करतात. आपण मुद्दामून देशाच्या वाइटासाठी भ्रष्टाचार करत आहोत, असे म्हणणारा कोण सापडेल? स्वतःला "व्हिलन" जाणणारे व्हिलन केवळ सिनेमातच असतात. सरकारने लाच देऊन विरोधी आमदार विकत घेतले, तर काय मुख्यमंत्री असा विचार करतात का - "चला, महाराष्ट्राचे नुकसान करू"? तर, नव्हे. ते असा विचार करतात - "भारताच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे राज्य असणे महत्त्वाचे आहे. त्या हावरट विरोधी आमदारांसाठी कोणाला सुपारी देण्यापेक्षा, त्यांना १०-२०कोटी द्यावेत. सरकार वाचेल, यातच राष्ट्राचे भले आहे." तोच प्रकार गल्लीत लाच घेणार्‍या पोलिसाचा - "सरकार मला इतके तुटपुंजे वेतन देते, की रोजचा खर्च होत नाही. मग चोरांना पकडू कसे? चला या भुरट्या चोराकडून लाच घेतो, म्हणजे जीवितार्थ चालेल. मग मोठ्या चोराला पकडायला मी समर्थ असेन."

राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने भ्रष्टाचार करणारा कोणी मला दिसला तर मला कमालीचे आश्चर्य वाटेल. "अगतिक नसेन तर भ्रष्टाचार करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील, आणि २६ जानेवारीलाच नव्हे, कुठल्याही दिवशी.

भ्रष्टाचार हा "सिस्टिम्स प्रॉब्लेम" आहे. १९व्या शतकात अमेरिकेत भ्रष्टाचार टप्प्या-टप्प्यावरती बोकाळला होता. आजकाल तो फक्त उच्चपदस्थांपाशी होतो. (कोपर्‍यावरचा पोलीस असेच कोणाहीकडून लाच मागत नाही. केवळ नेहमीच्या गुंडांकडूनच हप्ता घेतो... वगैरे.) बहुतेक वेळ लाचलुचपत न देताघेता जर उदरनिर्वाह करता आला, अशी सिस्टिम असली तर "परदेशातल्या"सारखे भारतातही वागतील, असे मला वाटते.

बाकी कुठल्याही अन्य देशाशी तुलना न करता :
"असाल तेथून पुढे चला!"
हे तुमचे आवडते तत्त्व पूर्णपणे पटण्यासारखे आहे.

प्रियाली

भारताच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे राज्य असणे महत्त्वाचे आहे. त्या हावरट विरोधी आमदारांसाठी कोणाला सुपारी देण्यापेक्षा, त्यांना १०-२०कोटी द्यावेत. सरकार वाचेल, यातच राष्ट्राचे भले आहे."

सरकार मला इतके तुटपुंजे वेतन देते, की रोजचा खर्च होत नाही. मग चोरांना पकडू कसे? चला या भुरट्या चोराकडून लाच घेतो, म्हणजे जीवितार्थ चालेल. मग मोठ्या चोराला पकडायला मी समर्थ असेन.

:) :) :)

अगतिक नसेन तर भ्रष्टाचार करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील, आणि २६ जानेवारीलाच नव्हे, कुठल्याही दिवशी.

अगदी अगदी! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ;)

प्रतिसाद आवडला.

एकलव्य

राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने भ्रष्टाचार करणारा कोणी मला दिसला तर मला कमालीचे आश्चर्य वाटेल.

भ्रष्टाचार हा एनकेन प्रकारेण राष्ट्रद्रोहच आहे. ह्याची अगदी स्पष्ट जाणीव भ्रष्टाचारी व्यक्तिला असते.

धनंजयराव -

राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने भ्रष्टाचार करणारा कोणी दिसत नाही म्हणणे म्हणजे ज्याच्यात्याच्या चष्म्याचा ईफेक्ट आहे असे मला वाटते. भ्रष्टाचार करणार्‍याला राष्ट्राचे नुकसान होते आहे हे समजत नसते असे मला मुळीच वाटत नाही. अगदी नाईलाज म्हणून भ्रष्टाचाराला सामोरे जाणारी सर्वसामान्य जनता एकवेळ बाजूस ठेवू या.

वानगीदाखल उदाहरणे -

  • तेलगी आणि अनेक राजकारणी यांना राष्ट्राचे नुकसान करूनच स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता.
  • पैशाच्या बंडलांसाठी पाचपाच पासपोर्ट एकाच माणसाला एकाच दिवशी पास करणार्‍या अधिकार्‍याला हे पासपोर्ट देशविघातक कामासाठीच वापरले जाणार होते हे पक्के माहीत होते. राष्ट्र्घाताला तो हातभारच लावत होता.
  • चित्रपटात राहू दे - पण प्रत्यक्षातही औषधांमध्ये भेसळ करणारी, पुलाच्या कामाचे पैसे खाणारी, कंपनीतील मालाची चोरबाजारात विक्री करणारी मंडळी जागोजागी दिसतील.

अवांतर - वय वर्षे ९४ असणार्‍या माझ्या एका दूरच्या आजोबांना पेन्शनसाठी भ्रष्ट्राचाराला सोकावलेल्या कारकुनांनी मारायला लावलेले खेटे हा सरळसरळ राष्ट्र्द्रोहच आहे असे म्हणणे मला चुकीचे वाटत नाही. हा सिस्टिमचा दोष नाही... तर हपापलेल्या वृत्तीचा परिपाक आहे.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्यांशी सहमत !

अनेकदा स्वतः विरुद्ध राष्ट्र असा परस्परविरोध निर्माण होतो. भ्रष्टाचार हा असाच विषय.

जाणून बुजून केलेला नसला, तरी हा राष्ट्रद्रोहच ठरावा.

- सर्किट

(पण पासपोर्टविषयी: दक्षिण ओसेसिया मधील लोकांना रशियातील सरकारने रशियन पासपोर्ट गेले दोन-तीन वर्षे दिलेत. आज जॉर्जियाने आपला हा असंतुष्ट भागसाहे असे म्हणून तिथे स्वतःचे सैन्य पाठवले, तेव्हा रशियाला कारणच मिळाले, कारण की तेथील ७०००० लोक रशियन पासपोर्ट धारक आणि म्हणूनच रशियन नागरीक आहेत. भारताला पाकव्याप्त काश्मिरत अशी आयडीया का सुचली नाही ?)

एकलव्य

भारताला पाकव्याप्त काश्मिरत अशी आयडीया का सुचली नाही ?

खरंच? भारताच्या ताब्यातील काश्मीरकडे पाहल्यास कदाचित हा प्रश्न पडणार नाही असे वाटते.

(काश्मिरवासी) एकलव्य

कवितानागेश

एकदा का जीव घ्यायला अतिरेकी समोर आल्यावर कोण काय करणार पासपोर्टचे?
असे किती काश्मिरी अता शिल्लक आहेत हो पासपोर्ट वाटायला?

...मूळ विषयाबद्दल,
लोकाना देश 'आपला' वाटत नाही, जबाब्दारीच जाणवत नाही...
मी काहीही घाण करेन,....
'सरकार'नी ( म्हणजे नक्की कोण ?) साफ करावी.
सरकारनी वीज द्यावी, रस्ते बान्धून द्यावेत, पाणीपुरवठा करावा,....
मी कर बुडवेन, पानी, वीज कशीही वाया घालवीन, जमेल तिथे जमेल तसा जमेल तितका पैसा खाईन,
........... अशी 'सामान्य' नागरिकाची मनोव्रुत्ती आहे.

श्री एकलव्य आणि श्री सर्किट यांच्या अभिप्रायांशी सहमत!
भ्रष्टाचार करणार्‍या प्रत्येक माणसाला, मग तो अल्पशिक्षित असो की बहूशिक्षित, भ्रष्टाचार करते वेळी आपण ही नैतिकदृष्ट्या वा राष्ट्रद्रोहदॄष्ट्या ही आपली अवनती आहे हे माहीत असतेच!
असे असूनही जेंव्हा तो भ्रष्टाचार करतो तेंव्हा अगतिकता वा सगळे करतात म्हणून मी तो करतो वा मी केला नाही तर सगळे मलाच टार्गेट करतील हा कुठलाही बचाब उपयुक्त ठरत नाही.
भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारीच असतात आणि त्यांना तुरूंगात घालणे हा यावर एकच उपाय आहे......
पण समाज जेंव्हा विविध कारणांसाठी या भ्रष्टाचाराला सबबी शोधू लागतो तेंव्हा त्या समाजाची अवनती ही ठरलेलीच असते.......

धनंजय

मला वाटते याबाबत आपण सर्वच सहमत आहोत.

येथे माझा मुद्दा असा नाही की असेच चालत राहिले पाहिजे. म्हणून त्या प्रतिसादात "जिथे आहे तिथून प्रगती करूया" असा समारोप केलेला आहे.

औषधाची भेसळ करणारे वगैरे "हा मी एका रुग्णाचा खून करतो" असा विचार करत पाताळविजयम् मधल्या राक्षसासारखे "ही हा हा" हसत औषधात भेसळ करतात असे मला वाटत नाही. उलट ते परिणामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. स्वतःच्या डोळ्यासमोर नसलेल्या लोकांच्या वेदनेबद्दल डोळेझाक करणे आपण सर्वच लहानपणापासून शिकलेले आहोत.

सेलफोनमध्ये वापरणारे कोलटॅन हे खनिज आफ्रिकेतल्या काँगो मध्ये युद्धे घडवून स्वस्तात मिळवतात. हे मला ठाऊक आहे. तरी मी त्यातल्या त्यात स्वस्त फोन निवडतो. मला हिर्‍यांची विशेष आवड नाही, पण त्या प्रकारात मला पैसे गुंतवायचे असते, प्रियव्यक्तीला हिरा द्यायचा असता, तर हिर्‍यांच्या रक्तरंजित व्यापाराकडे मी दुर्लक्ष केले असते. माझ्या गुंतवणुकीतले म्युच्युअल फंड तंबाखूच्या व्यापारात, आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापारात पैसे गुंतवतात, हे जवळजवळ निश्चित आहे. आणि होय, मी माझ्या समोरच्या लोकांना धूम्रपानापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतो. तिथे माझे पैसे लोकांना विष घेण्याची जाहिरात करत आहेत. इथे मी भारतीय सैनिक मरू नयेत म्हणून विचारशील असतो म्हणे. पण ज्या कंपन्यांमध्ये माझे पैसे गुंतवले आहेत, त्यांची विमाने आणि स्फोटके भारताला आणि भारताविरुद्धच्या देशांना तटस्थ भावनेने विकली जातात - त्यांतून कुठल्या भारतीय जवानाला मृत्यूही होऊ शकेल. हे सर्व मी कसे करतो? माझ्या म्यूच्यूअल फंड गुंतवणुकीतून आलेली सिगारेटची जाहिरात बघून जे मूल सिगारेटच्या व्यसनाच्या आहारी जाते, ते माझे आप्त नसते, त्याच्याकडे मी डोळेझाक करू शकतो. "माझ्या" गुंतवणुकीतल्या विमानाने किंवा स्फोटकाने भारतीय जवान "मरतही असतील, वाचतही असतील" असा काही गुळमुळीत विचार करतो, किंवा त्यापेक्षा विचारच करत नाही. मी बरा, माझ्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज बरे. ही माझी वागणूक आणि विचारपद्धती. यात आणि कोण मरते आहे त्याच्याकडे "खरोखर मनापासून" दुर्लक्ष करून औषधात भेसळ करणे, या दोहोंत मूलभूत फरक काय?

विचार करा, तुमचे पैसे कुठे गुंतले आहेत, तुमच्या सेलफोनमधले भाग बनवणारे खनिज कोणाच्या रक्ताने रंगले आहेत? अहो, आयुष्य सुखकर करण्यासाठी या असल्या डोळ्यासमोर नसलेल्या गोष्टी मनःपटलावरून पुसून टाकणे, हा सामान्य मानवी स्वभाव आहे.

आज "दुसरीकडच्या कुठल्या निग्रोला गुलामीत ठेवणारा" आणि "दुसर्‍यांच्या मुलांना सिगारेटी विकणारा" मी, तोच मी आजच औषधात भेसळ का करत नाही? कारण तसे न करता उदरनिर्वाह करण्याची आर्थिक सिस्टिम माझ्या आजूबाजूला आहे. तसे केल्यास चोखपणे मला दंड करणारी सिस्टिम माझ्या आजूबाजूला आहे. या दोन्ही गोष्टी सिस्टिममध्ये घडवून आणण्यासाठी "राष्ट्रभावनेचा अभाव आहे की नाही" याबद्दल काहीच मत असणे जरुरीचे नाही.

"तेलगी प्रकरणात, करदाता आणि नागरिक म्हणून मला तोटा झाला, त्याला आळा घातला पाहिजे" हा विचार राबवलाच पाहिजे. पण त्यासाठी "तेलगी माझ्यापेक्षा अधिक राष्ट्रद्रोही आहे" असा विचार करून ऐट मिरवण्याने काय मिळणार आहे? (आणि दुसर्‍याला हीन म्हणण्यात पर्यायाने स्वतःला उदात्त म्हणणे असते, नाही का?) "तेलगीच्या ठिकाणी मी असतो तर वेगळे वागलो असतो" अशी बोटे मोडण्यापेक्षा हा विचार करावा : "तेलगीच्या ठिकाणी मी असतो तर मला त्याच्यासारखी वर्तणूक करणे मला दुष्कर कसे झाले असते? सिस्टिममध्ये योग्य वागण्यासाठी काय पारितोषिक असावे लागेल, अयोग्य वागण्यासाठी काय दंड असावा लागेल?" अशा प्रकारे सिस्टिम मध्ये सकारात्मक आणि कार्यक्षम फरक घडू शकेल.

खाली सर्किट असे काही म्हणतात "अजाणतेपणे झाला तरी तो राष्ट्रद्रोहच". मी म्हणेन "अजाणतेपणे झाला तरी ते नागरिकांचे नुकसानच." अजाणतेपणानेही झालेल्या कृत्याला आळा घालणे महत्त्वाचे असते, याबाबत कोणाचाच वाद नसावा. पण अजाणतेपणाने झालेल्या कृत्याचे खापर व्यक्तीवर फोडून सिस्टिमला निर्दोष ठरवण्याने त्या कृत्याला प्रतिबंध होत नाही - पुढे ते कृत्य करणारा तितकाच "अजाणता" असतो, आणि अजाणता मनुष्य वर्तणुकीत काय फरक करू शकणार? उलट सिस्टिमला दुरुस्त करून पुढे कोणी "अजाणता" असूच शकणार नाही, असे करणे अधिक सकारात्मक आणि कार्यक्षम आहे.

पिवळा डांबीस यांना वाटते की मी भ्रष्टाचाराला सबबी शोधतो आहे. तसे नव्हे. "भ्रष्टाचाराचे कारण म्हणजे राष्ट्रभावाचा अभाव" या कारणमीमांसेशी मी असहमती दाखवतो आहे. मी वेगळे कारण सांगतो आहे. मनुष्य स्खलनशील असूनही भ्रष्टाचार कमी करता येतो, स्खलनशीलतेबद्दल भारतातल्या लोकांना दोष देऊन काहीच हशील नाही, असे माझे मत आहे.

मला असे वाटते की "भ्रष्टाचार हा काही विशिष्ट व्यक्तींचे नैतिक अधःपतन आहे" असे म्हणणे सिस्टिम बदलण्याच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठीचा सोयिस्कर युक्तिवाद आहे.

पिवळा डांबीस यांना वाटते की मी भ्रष्टाचाराला सबबी शोधतो आहे. तसे नव्हे. "भ्रष्टाचाराचे कारण म्हणजे राष्ट्रभावाचा अभाव" या कारणमीमांसेशी मी असहमती दाखवतो आहे. मी वेगळे कारण सांगतो आहे. मनुष्य स्खलनशील असूनही भ्रष्टाचार कमी करता येतो, स्खलनशीलतेबद्दल भारतातल्या लोकांना दोष देऊन काहीच हशील नाही, असे माझे मत आहे.

अहो, तुम्ही (धनंजय) स्वतः भ्रष्ट्राचाराला सबबी शोधताय असे नाही म्हटले आहे आम्ही! आमचं म्हणणं इतकच की भ्रष्टाचार करणार्‍याला आपण एक्सचेकरला फसवून आपली तुंबडी भरतोय हे माहिती असतं. मग तो सुशिक्षित असो की अशिक्षित! मी भारतातल्या वा अन्य कुठल्याच समाजाला काहीच दोष देत नाहीये. सर्व समाज ( मग तो कुठलाही असो) जेंव्हा असा भ्रष्टाचार हा रूटीन म्हणून मान्य करतो तेंव्हा तो आपल्या वैचारिक आणि तात्विक रसातळाला जाण्याची तयारी करत असतो. आणि अशा समाजात राष्ट्रभावना क्वचितच आढळून येते. माझ्या मते भ्रष्टाचार हा व्यक्तिगत स्वार्थातून जन्माला येतो आणि राष्ट्रभावना हा वैयक्तिक त्यागाचा विषय आहे. बघा पटतं का तुम्हाला....

धनंजय

एक्स्चेकरकडून पैसा घेत आहोत माहीत तर असते - पण...

मला माहीत असते की माझा म्यूच्युअल फंड तंबाखूच्या जाहिरातीसाठी पैसे देतो तितपतच त्या एक्स्चेकर-चोराला माहीत आहे. तरी मी या म्यूच्युअल फंडाकडून नफा घेतो - मला पैसे काढून नोटा कपाटात ठेवायला जमते ना? तेवढ्या नफ्याचा व्यक्तिगत त्याग का करता येऊ नये? पण मला व्याजाची, नफ्याची लालसा आहे. माझ्या कुटुंबाने सिगारेटी ओढल्या नाहीत तर पुरे. मरू देत दुसर्‍या कोणाची पोरं. मला दिसली नाहीत म्हणजे पुरे - ते चित्र मी डोळ्यांसमोरून पुसतो. तसेच एक्चेकर-चोराचे. देशाची तिजोरी फोडली तर ज्याचे नुकसान होते तो "नागरिक" नेमका कोण ते दिसत नाही. म्हणजे दुसर्‍यांची पोरं. त्यांचे चित्र तो डोळ्यांसमोरून पुसतो. माझ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत, आणि एक्स्चेकर-चोराच्या चोरीमध्ये मूलभूत काहीच फरक नाही. त्यामुळे त्याला पायबंद घालताना उगाच "एक्स्चेकर-चोर माझ्यापेक्षा व्यक्तिगत स्वार्थी" असे मला म्हणता येत नाही.

पण तसे म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराला रुटीन मानणे नव्हे. माझ्या सिगारेट जाहिरातींनी जितक्या नागरिकांचा तोटा होतो, त्यापेक्षा अधिक तोटा एक्स्चेकर चोर घडवतो - त्यामुळे एक्चेकर-चोरीबद्दल आधी काहीतरी करू - असे म्हणूनही काही कार्य करता येते. अशा प्रकारेही भ्रष्टाचाराचा पायबंद घालता येतो.

"व्यक्तिगत त्याग" अशी काही गोष्ट असते याबाबत तुमच्याशी सहमत.

व्यक्तिगत त्याग हा राष्ट्रभावनेचा विषय असेल. पण त्याहूनही मोठा विषय आहे. स्वार्थत्यागामुळे कुठल्यातरी समाजाबद्दल भावना दाखवली जाते, हे खरे. पण नेमका कशासाठी त्याग करायचा हे बदलत असते. माझे एक पणजे भारतातल्या ब्रिटीश सरकारात काम करत. त्यांच्या दृष्टीने राष्ट्र म्हणजे ब्रिटिश साम्राज्य, आणि त्यासाठी त्यांनी चोख व्यवहार, स्वार्थत्याग वगैरे केला. (सरकारी पैसे अफरातफर करून स्वातंत्र्यसैनिकांना पुरवले असते तर... ती राष्ट्रभावना असती का?) आजकाल "भारताच्या भल्यासाठी मराठी माणसानेच स्वार्थत्याग का करावा," अशा प्रकारचे बोलणे ऐकायला मिळते - असे बोलणारे लोक म्हणतात म्हणतात की त्याऐवजी मराठी माणसाने मराठी समाजासाठी स्वार्थत्याग करावा. हासुद्धा कुठलातरी स्वार्थत्यागच, नाही का?

बघितले तर कुठलातरी स्वार्थत्याग तर सर्वच लोक करतात. अफरातफर करून भरपूर पैसा खाल्ल्यानंतर तिरुपतीला सोन्याचा पाऊस पाडणारे कुठलातरी स्वार्थत्याग करतच असतात. तिरुपती बालाजी की एक्स्चेकर - व्यक्तिगत स्वार्थत्यागास अधिक योग्य ध्येय कुठले?

त्या सगळ्या "कुठला त्याग श्रेष्ठ" मध्ये मी पडणार नाही. माझे स्थान हे: मी एक करदाता आणि नागरिक आहे. करदात्यांची आणि नागरिकांची तिजोरी राखणारा खजिनदार चोरी करणार नाही अशी यंत्रणा उभी करावी. [म्हणजे चोरी रुटीन राहाणार नाही.] तो रखवालदार कुठला स्वार्थत्याग महत्त्वाचा मानतो (एक्स्चेकर की तिरुपती) याविषयी मला काही देणेघेणे नाही. [याचा अर्थ नाही की चोरीस मी रुटीन मानतो.]

राघव

"अगतिक नसेन तर भ्रष्टाचार करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील
- पण अगतिक असले तर भ्रष्टाचार करणे समर्थनीय नाही हे तुम्हीही मान्य करताच ना? :)

करदात्यांची आणि नागरिकांची तिजोरी राखणारा खजिनदार चोरी करणार नाही अशी यंत्रणा उभी करावी.
जर राखणार्‍याचे स्वत:चे विचारच असे असले की, "चोरी करणे अयोग्य आहे अन् तसे करून व्यक्तिगत स्वार्थासाठी कुठेतरी मी माझ्या त्या देशबांधवांशी प्रतारणा करेन, ज्यांनी राष्ट्रासाठी स्वत:च्या सर्व स्वार्थांवर पाणी सोडले"तर यंत्रणेची गरज कितीतरी कमी होईल. होय ना?

कारण तसे न करता उदरनिर्वाह करण्याची आर्थिक सिस्टिम माझ्या आजूबाजूला आहे. तसे केल्यास चोखपणे मला दंड करणारी सिस्टिम माझ्या आजूबाजूला आहे. या दोन्ही गोष्टी सिस्टिममध्ये घडवून आणण्यासाठी "राष्ट्रभावनेचा अभाव आहे की नाही" याबद्दल काहीच मत असणे जरुरीचे नाही.
कारण जर त्या नीट काम करत असतील तर ते आधीपासूनच असणार आहे :)
कायदा बनवणार्‍यांनी राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनेच तो बनवलेला असावा लागतो. बरोबर ना?
कोणताही गुन्हा रोखण्यासाठी दोन गोष्टींनी समांतररीत्या काम करण्याची गरज असते. एक म्हणजे कायद्याची कठोर अंमलबजावणी अन् दुसरे म्हणजे गुन्हेगारी विचारांचे उच्चाटन. पण कायदा हा गुन्ह्यास केवळ अटकाव करू शकतो. गुन्हा घडूच नये यासाठी वैचारीक बदल आवश्यक असतो. या बदलाच्या मुळाशी राष्ट्रभावना असते/असायला हवी.
सिस्टिमवर प्रत्येक गोष्टीचे खापर फोडणे म्हणजे जबाबदारीतून पळणे या मताशी सहमत. पण जी गोष्ट सिस्टीमने करणे योग्य ती गोष्ट व्यक्तिगतरित्या करणे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य. तसे झाल्यास सिस्टीम असे करणार्‍यासच दोषी धरेल.

..त्यांच्या दृष्टीने राष्ट्र म्हणजे ब्रिटिश साम्राज्य, आणि त्यासाठी त्यांनी चोख व्यवहार, स्वार्थत्याग वगैरे केला. (सरकारी पैसे अफरातफर करून स्वातंत्र्यसैनिकांना पुरवले असते तर... ती राष्ट्रभावना असती का?) आजकाल "भारताच्या भल्यासाठी मराठी माणसानेच स्वार्थत्याग का करावा," अशा प्रकारचे बोलणे ऐकायला मिळते - असे बोलणारे लोक म्हणतात म्हणतात की त्याऐवजी मराठी माणसाने मराठी समाजासाठी स्वार्थत्याग करावा. हासुद्धा कुठलातरी स्वार्थत्यागच, नाही का?
एक लक्षात घ्या- अंतिम ध्येय योग्य का अयोग्य, हे व्यक्तिसापेक्ष नसते. ते केवळ योग्य किंवा अयोग्य असे असते. योग्य ध्येयासाठी जे कृती करतात त्यांना नैतिकरित्या दोष लागत नाही. जे स्वातंत्र्यसैनिकांनी केले त्याची प्रेरणा राष्ट्रभावना होतीच. ज्यांनी कोणत्याही कारणास्तव त्यांना साथ दिली नाही किंवा देवू शकले नाहीत त्यांनी तसे केले असते तर आपणांस अभिमान वाटला असताच ना?
पितामहांनी दुर्योधनाची साथ दिली, मरेपर्यंत दिली, पण अंतिमत: ते अयोग्य असेच आपण मानतो ना? ते यासाठीच की त्यांची निष्ठा योग्य ठिकाणी नव्हती. माझ्या बोलण्याचा व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे.

शिवरायांचे राज्य हे प्रखर राष्ट्रभावनेनेच उभे राहिले हे कोण नाकारू शकेल? "Country First" याचे हे जिवंत उदाहरण नाही काय? आता जर कुणी असे म्हटले की बाजीप्रभूंनी आपल्या घरच्यांचा विचार न करता हौतात्म्य पत्करले हा त्यांनी घरच्यांवर केलेला अन्याय आहे, तर ते चूकच ठरेल ना?
"हे राष्ट्र माझे आहे अन् त्याच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी मी मला शक्य ते सर्व करेन" याच भावनेतून शिवरायांनंतर मावळ्यांनी औरंगजेबाशी दिलेला लढा हा जागतिक इतिहासात अद्वितीय नाही काय?

वैचारीक पातळीवर योग्य बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रभावना असणे गरजेचे आहेच.

मुमुक्षू

मुमुक्षू साहेब,
आमच्या मनातलेच विचार सविस्तरपणे लिहिल्याबद्द्ल (आणि आमचं टंकलेखन वाचवल्याबद्द्ल!:))
धन्यवाद!

राघव

धनंजयराव,

माझा उद्देश तुलना करणे नव्हता. मी जी उदाहरणे दिली ती राष्ट्रभावनेला स्पष्ट करुन दाखवतात म्हणून. राष्ट्रभावनेला पूरक अशी उदाहरणे भारतात देखील आहेतच. श्री. विक्रम साराभाईं यांचे उदाहरण म्हणूनच दिलेले आहे. :) जर तुलना असे वाटत असेल तर तो माझ्या मांडणीचा दोष आहे, त्याबद्दल क्षमस्व.

स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकजण स्वत:च्या कृतीला पूरक असे तत्वज्ञान मांडतो. प्रथमदर्शनी ते योग्य वाटले तरी अंतिमत: ते चूकच ठरते. याउलट (स्वत:चा स्वार्थ संपूर्णपणे विसरून) केवळ देशहित ध्यानी ठेवून एखादी गोष्ट केली तर, प्रथमदर्शनी एकवेळ चूक वाटली तरी, अंतिमत: ती योग्यच असते.
तुम्ही दिलेली दोन्ही उदाहरणे यात कोठे बसतात ते तुम्ही सहज बघू शकता! :) माझे मत म्हणाल तर असे -
- आजच्या घडीला तरी असे कुठे वाटत नाही की केवळ देशाचे भले करण्याच्या एकमेव उद्देशाने कुणा आमदारांना विकत घेतल्या जाते. स्वत:ची सत्ता वाचवणे हाच मूळ उद्देश दिसून येतो.
- अन् चोराकडून लाच घेतल्यानंतर खाल्ल्या लाचेला जागून त्याला सोडणे हे तर पोलिसाला भाग पडतेच ना? म्हणजे तो आपल्या कामाशी प्रतारणा करतोच ना? मग त्यात देशहित कुठे आले?
एकलव्य आणि सर्कीट यांचे मत याच म्हणण्याची पुष्टी करते.

आपल्या देशात देशभक्तीची वानवा नाही पण देशभावना हव्या तेवढ्या प्रमाणात आढळून येत नाही, असे मला म्हणायचे आहे.
विचारप्रक्रीया बदलणे खूप वेळखाऊ काम आहे. पण त्याची कुठेतरी सुरुवात तर व्हायला हवीच ना?

आणि भ्रष्टाचार हा एक मुद्दा झाला. असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. त्यासर्वांसाठी समावेशक असे एकच उत्तर अशक्य आहे. पण (बिपिनरावांना पटत नसले तरी) या सर्वांच्या उगमाचे मूळ या एका गोष्टीच्या अभावात सापडते असे मला वाटते. दुसरे काही असू शकेल असे वाटले तर ते जरूर मांडावे. त्यासाठीच तर ही चर्चा आहे. :) एकदा अडचणीचे मूळ शोधले तर बाकी उपाययोजना देखील शोधता येतील. नाही?

मुमुक्षू

धनंजय

विचारप्रक्रिया बदलायला पाहिजे. उत्तर "खरी लोकशाही" आणि "नागरिकांनी चोख हिशोब मागणे" अशी काही सुरुवात करून विचारप्रक्रिया बदलायला सुरुवात होऊ शकेल असे वाटते.

(काही लांबलचक प्रतिसाद वर दिले आहेत... :-) इथे इतके पुरे.)

चिन्या१९८५

'चलता है' ही प्रवृत्ती आपण लोकांनी सोडायला हवी.भ्रष्टाचा करणारे म्हणतात कि 'सगळेच खातात्,मग मी का नको खाउ??' ही प्रवृत्ती फारच चुकीची आहे कारण पगार कमी मिळतो म्हणुन पैसा खाल्ला जातो हे चुकीचे ठरते.

रेवती

अनेक आठ्वणी प्रत्येकाच्याच असतात. सर्वाना शाळेत असताना एक प्रश्न विचरला जातो,"तुझे बाबा काय करतात?" माझे उत्तर असायचे (त्यावेळच्या वयानुसार) ईरिगेशन मध्ये डेप्युटि ईंजिनीअर. त्यावर समोरच्या माणसाचा हमखास प्रतिसाद्,"अरे वा मग मजाच मजा, टेबलाखालूनही आणि साईटवरही." ह्याचा अर्थ मला कधिही समजला नाही (किंवा फार उशिरा समजला). अगदी लग्न झाल्यावरही दूरच्या नातेवाईकांनी लग्नात काही गुपचुप देणेघेणे झाले का? तुझे बाबा तर.... असे विचारले होते. अर्थात यामुळे बाबांवरचा विश्वास कधि हलला नाही. आईने नेहमीच काटकसरीने संसार केल्याचेच आठवते आहे. आम्हा तिघा भावंडांची शिक्षणेही फार काटकसरीने झाली.

रेवती

धनंजय

राष्ट्रभावना = स्वार्थत्याग हा राष्ट्राच्या भल्यासाठी आवश्यक आहे असे मानणे तत्त्वतः बरोबर असेल.

शो मी द डेटा!

खालील तक्ता भरावा आणि केवळ जिथे राष्ट्रभावना तिथेच भले, जिथे राष्ट्रभावना नाही तिथे भले नाही हीच घरे भरलेली दिसावीत.

*
राष्ट्रभावना/त्याग आहे
राष्ट्रभावना/त्याग नाही

राष्ट्राचे भले झाले
मराठेशाही,...(आणखी उदाहरणे भरावीत)
राष्ट्रवादाची लाज वाटणारी हल्लीची जर्मनी...(आणखी उदाहरणे भरावीत)

राष्ट्राचे भले झाले नाही
राष्ट्रीय समाजवाद काळातली जर्मनी...(आणखी उदाहरणे भरावीत)
पश्चिम-पूर्व एकत्रित (जुना) पाकिस्तान...(आणखी उदाहरणे भरावीत)

वाटल्यास असा तक्ता "भले झाले/झाले नाही" ऐवजी "भ्रष्टाचार आहे/नाही" असा भरून बघूया. चारही खाने भरले तर तुम्ही म्हणता तसा कुठला अवश्य संबंध मला दिसत नाही. तक्त्यातले दोनच रकाने भरले, दोन रिकामे राहिले, तर तुम्ही म्हणता तसा कुठला अवश्यसंबंध असू शकेल. तुमच्या सोयीसाठी ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल यांची आशियाई देशांची भ्रष्टाचाराची क्रमवारी देत आहे.

माझ्या तत्त्वांविरुद्ध डेटा गेला तर ते तत्त्व मी त्यागण्यास तयार आहे. आता "राष्ट्रीय समाजवाद काळात जर्मन लोकांनी स्वार्थत्याग केला नाही, राष्ट्रभावना मुळी नव्हतीच" असे म्हणत असाल तर ही "राष्ट्रभावना" म्हणजे काय प्रकार आहे, "स्वार्थत्याग" म्हणजे काय प्रकार आहे, त्याची पुन्हा व्याख्या दिली पाहिजे.

आशिया/पॅसिफिक खंडातली कमी-भ्रष्ट-ते-अधिक-भ्रष्ट गुणवत्ता यादी (ट्रान्स्परंसी इंटरनॅशनल २००७)

देशाचे नाव
गुण (अधिक गुण म्हणजे भ्रष्टाचार कमी)
गुणवत्ता क्रमांक

न्यू झीलँड
९.४

सिंगापूर
९.३

ऑस्ट्रेलिया
८.६

हाँगकाँग
८.३

जपान
७.५

मकाऊ
५.७

तायवान
५.७

मलेशिया
५.१

दक्षिण कोरिया
५.१

भूटान
५.०
१०

सामोआ
४.५
११

चीन
३.५
१२

भारत
३.५
१२

मालदीव
३.३
१४

किरिबाती
३.३
१४

थायलँड
३.३
१४

श्रीलंका
३.२
१७

वानुआटू
३.१
१८

सॉलोमन बेटे
२.८
१९

व्हिएतनाम
२.६
२०

पूर्व तिमोर
२.६
२०

नेपाल
२.५
२२

फिलिपीन्स
२.५
२२

पाकिस्तान
२.४
२४

इंडोनेशिया
२.३
२५

बांगलादेश
२.०
२६

पापुआ-न्यू गिने
२.०
२६

कांबोडिया
२.०
२६

लाओस
१.९
२९

अफगानिस्तान
१.८
३०

टोंगा
१.७
३१

म्यानमार
१.४
३२

(मला तर ही आर्थिक प्रगतीच्या/श्रीमंतीच्या गुणवत्ता यादीशी बरीचशी मिळतीजुळती वाटते. म्हणजे वरच्या क्रमांकाच्या देशांत गुन्हे न करता जगता येण्याची अधिक साधने उपलब्ध आहेत, आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची अधिक सुसज्ज यंत्रणा आहे. खालच्या क्रमांकाच्या देशांत कायदेशीर मिळकतीची तेवढी संधी नाही, आणि गुन्ह्यांस शिक्षा करण्याची चोख व्यवस्था नाही. पण तुमचे प्रमेय ठीक असेल तर ही "राष्ट्रभावने"च्या गुणवत्ता यादीशी [आदमासे] मिळतीजुळती हवी. म्हणजे चीनमध्ये आणि भारतात [आदमासे] समसमान राष्ट्रभावना असावी. या यादीत तसा कुठला निकष आहे असे समजावून सांगा, आणि मी तुनचे तत्त्व मानण्यास जरूर तयार आहे.)

एकलव्य

कोणते प्रमेय मांडता आहात तेच कळायच्या पलिकडे गेले आहे.

आमचे साधे हाताच्या बोटांवर करता येणारी आकडेमोड बघा: राष्ट्र = राष्ट्रातील माणसे. त्यांना त्रास म्हणजे राष्ट्रद्रोह.

भ्रष्टाचाराने समाजाचे आणि देशाचे (देशातील माणसांचे होते हे वर कोठेतरी तुम्ही लिहिलेले आठवते. चुभूद्याघ्या. मग आमचे गणित त्याला लावा!) नुकसान होते. भ्रष्टाचारी माणसाला हे पक्के माहीत असते. भ्रष्टाचारी हा राष्ट्र्द्रोही.

असो --- मुंगीला मारायला मशिनगन वापरायचीच असेल तर सवड मिळेल तशी तीही लोड करू.

स्नेहपूर्वक - एकलव्य

धनंजय

प्रमेय १:
"भारतात राष्ट्रभावनेचा अभाव आहे, हे पटत नाही", असल्यास बाकी कुठल्या देशात असतो तितकाच अभाव आहे.

वाद घालायचे कारण :"राष्ट्रभावनेचा अभाव" हे कारण भारताच्या अडचणींसाठी पुरेसे वाटत नाही, अडचणी दूर करण्यासाठी ते कारण सांगणे उपयोगीही वाटत नाही.

एकलव्य, तुमची हरेक कृती तपासली तर राष्ट्राचे नुकसान करणारी एकही कृती सापडणार नाही म्हणता? (माझ्या वागण्यात तरी राष्ट्राला सौम्य नुकसान होणार्‍या अनेक कृती सापडतात, त्यांचा वर पुन्हापुन्हा उल्लेख केला आहे.) आता शक्य आहे, की तुमच्याकडून काहीच अपाय होत नाही, पण असे थोडेच लोक असतील. आता हा कठोर निकष मानून राष्ट्रातल्या जवळजवळ सर्वांनाच राष्ट्रद्रोही ठरवायचे असेल, तर तसे म्हणणे तर्कशुद्ध आहे. पण त्या तर्कशुद्ध मशीनगनने गोळीबार करून नेमके कुठले राष्ट्रहित साधणार आहे? (प्रमेय २)"राष्ट्रद्रोह थांबवा" अशी भडक भाषा वापरण्यापेक्षा "ज्या ज्या प्रमाणात राष्ट्रातील लोकांचे नुकसान होत आहे, त्या त्या क्रमाने त्या त्या कृतींना आळा घाला" हा कार्यक्रम अधिक व्यवहार्य आहे, असे मला वाटते . माझी पाळी आली, तर मग माझ्याकडून होणारे नुकसानही बंद पाडण्याची कारवाई होईल. आता तुम्ही मला राष्ट्रद्रोही म्हणा किंवा म्हणू नका (नाही म्हटल्यास जरा बरे वाटेल).

"राष्ट्रद्रोह थांबवा" असा प्रचार करून भ्रष्टाचार खरेच थांबत असेल, तर मी ते जरूर मानेन. असा कुठला प्रचार कार्यक्रम कुठेही यशस्वी झाला असेल तर "शो मी द डेटा!" मीही बिनशर्त पाठिंबा देईन. आणिबाणीच्या काळात अशा प्रकारचे परखड लोकशिक्षण झाले होते असे ऐकायला मिळते. खुद्ध आचार्य विनोबा भावेंनी प्रशस्तीपत्र दिलेल्या या अनुशासनपर्वामुळे भ्रष्टाचारास आळा बसला होता काय?

माझ्या प्रमेयाच्या बाजूने : आर्थिक घडी बदलून भ्रष्टाचार काही प्रमाणात घटतो त्याचा विदा मी वर दिलेलाच आहे. तो विदा मान्य नसल्यास "का मान्य नाही" ते सांगा.

एकलव्य

धनंजय - आपण व्यक्तिगत आवाहन केल्यामुळे आणि बळेच काही आरोप स्वतःवर ओढवून घेतल्यामुळे उगाचच आक्रस्तळेपणा चालला आहे असे मला वाटते.

एकलव्य, तुमची हरेक कृती तपासली तर राष्ट्राचे नुकसान करणारी एकही कृती सापडणार नाही म्हणता?
ह्या प्रश्नाचा रोख कळला नाही. सदर चर्चेत आणि इतरत्रही असा दावा एकलव्यानेच काय पण इतर कोणीही केलेला आहे असे मला दिसत नाही. कृपया मुद्यावर यावे.

आता हा कठोर निकष मानून राष्ट्रातल्या जवळजवळ सर्वांनाच राष्ट्रद्रोही ठरवायचे असेल, तर तसे म्हणणे तर्कशुद्ध आहे.
हा कठोर निकष कोणीही लावलेला नाही. बळेच आपणच ओढूनताणून लावत आहात. सगळीच माणसे चुकतात मग भ्रष्टाचार्‍यांनाच का बोलायचे असा आपला अघोरी युक्तिवाद दिसतो आहे. त्याला माझा आक्षेप आहे इतकेच.

"राष्ट्रद्रोह थांबवा" असा प्रचार करून भ्रष्टाचार खरेच थांबत असेल, तर मी ते जरूर मानेन.
कोण असला प्रचार करते आहे? आणि कसला विदा? अगदी उलट म्हणजे --- मुमुक्षुंनी आणि इतरही बर्‍याचशा प्रतिसादींनी भ्रष्टाचार थांबवा म्हणजे "राष्ट्रद्रोह" काहीसा कमी होईल असा सूर लावलेला मलातरी दिसतो.

(धनुष्य ठेवलेला) एकलव्य

"राष्ट्रद्रोह थांबवा" असा प्रचार करून भ्रष्टाचार खरेच थांबत असेल, तर मी ते जरूर मानेन. असा कुठला प्रचार कार्यक्रम कुठेही यशस्वी झाला असेल तर "शो मी द डेटा!" मीही बिनशर्त पाठिंबा देईन.

अशा प्रकारचे विदा संकलन हे व्यावहारिक नाही. नमुना पद्धतीचे संकलन संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी केले जात ही असेल. पण हजारो ठिकाणी भ्रष्टाचार घडत असतो त्यावेळी एखादी नोंद होत असते. आरोप असणारे व शिक्षा झालेले यांच्यातील संख्यात्मक गुणोत्तर पाहिले तर तफावत किती असते हे समजेल.

(प्रमेय २)"राष्ट्रद्रोह थांबवा" अशी भडक भाषा वापरण्यापेक्षा "ज्या ज्या प्रमाणात राष्ट्रातील लोकांचे नुकसान होत आहे, त्या त्या क्रमाने त्या त्या कृतींना आळा घाला" हा कार्यक्रम अधिक व्यवहार्य आहे, असे मला वाटते

असे म्हणणे व्यवहर्य म्हणुन ठीक वाटते पण जनमानसिकता ही आपल्या बाजुने वळवण्यासाठी भ्रष्टाचाराची सांगड ही राष्ट्र द्रोहाशी घातली जाते. तत्वतः ती खोडुन काढता येत नाही. भ्रष्टाचाराचे उच्चाटन झाले पाहिजे असे भ्रष्टाचारी माणुसही म्हणत असतो. काही राजकीय सभांना सत्ताबदल करु नका असे लोकांना आवाहन करताना काही जण म्हणतात कि काँग्रेस पक्षाची पोटे इतक्या वर्षात खाउन खाउन भरली आहेत ते जास्त खाणार नाहीत पण विरोधी पक्ष जर सत्तेवर आला तर इतक्या वर्षापासुन सत्तेपासुन वंचित असल्याने ते हपापल्यासारखे खातील व पर्यायाने जनतेचेच नुकसान होईल.
माझ्यामते भ्रष्टाचार ही प्रवृत्ती आहे तो केवळ सिस्टिमचा दोष नाही. लाच घेणारा हा दोषी असेल तर लाच देणाराही दोषी असतो ही मांडणी अ‍ॅकॅडमीक आहे. लाच देणारा हा असहाय्य असतो. मी फारतर लाच घेणार नाही पण(कधीच) लाच देणार नाही असे म्हणावे अशी सामाजिक परिस्थिती नाही. स्वार्था पोटी लाच देणे व असहाय्यतेपोटी लाच देणे या बाबी केवळ आपल्या सदसद विवेक बुद्धीवर ठरतात.
जगा आणि जगु द्या असे तत्व बाळगताना सुद्धा केवळ मलाच जगु द्या तुम्ही जगु नका कारण तुमच्या जगण्याने माझ्या जगण्याची संसाधन मर्यादित होतात. म्हणुन भविष्यातलया माझ्या सुखाने जगण्यासाठी मी तुमच्या जगण्यावर घाला घालत असतो. हा नैतिक दृष्ट्या भ्रष्ट आचार असला तरी मी तो करीत असतो.

धनंजय

(सरकारी पत्रकात प्रसिद्ध केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत घेऊन सरकारी सेवा पुरवणे, किमतीतला फरक सरकारी नोकराने वैयक्तिक उत्पन्न म्हणून घेणे =भ्रष्टाचार
असा अर्थ घेतलेला आहे.)
भ्रष्टाचार आहे याबद्दल दुमत नाही. जितकी उदाहरणे उघडकीस येतात, त्यापेक्षा अधिक घटना घडतात, याबद्दल दुमत नाही.
मात्र भ्रष्टाचार कमी करायच्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये आकडे-आत्त गोळा करण्यातली ही त्रुटी समसमान आहे. समजा १% घटनाच कळू शकतात.
"देशद्रोह आहे" अशी जाहिरात करून त्या कळणार्‍या १% घटना कमी झालेल्या दाखवा ना!

माझे मित्र डॉ. माधव गोयल यांनी उत्तर प्रदेशात माहिती अधिकाराचा वापर कार्यक्षम आहे (दुवा), हे आकड्यांनिशी दाखवून दिले आहे. आधी त्या गावांत प्राथमिक उपचार केंद्रातले कर्मचारी सेवा पुरवत नसत. त्यांच्या अभियानाने गावकर्‍यांना माहिती दिल्यानंतर सेवा सुधारली. (तेवढ्यात गावकरी श्रीमंत झाले नाही.) म्हणजे नेमकी किती लाच आधी दिली-घेतली, आणि नंतर दिली-घेतली, त्याचा पैसा-न-पैसा हिशोब करायची जरूर नाही. "सेवा किती पुरवली" याचा हिशोब चोख करून दाखवला, तरी मार्गाची कार्यक्षमता कळून येते.

"आत्त ('विदा') गोळा करता येत नाही," असे म्हणणे पटण्यासारखे नाही.

धनंजय

कसे विसरलो बरे :-)

त्यांच्या टस्केगी विद्यापीठात मैदानांमध्ये "लॉनचे" गवत लावले होते आणि त्यांच्या बाजूने चालायचे फूटपाथ होते. पण विद्यार्थी लॉन तुडवतच मधून वाट काढत जात होते. विद्यापीठातले अधिकारी बोटे मोडत होते की आपल्या विद्यार्थ्यांना "सिव्हिक सेन्स"च नाही...

कार्व्हर यांनी बघितले, की ते "बेकायदा" मार्ग येण्याजाण्याच्या सोयीचे होते. त्यांनी सूचना दिली "अहो पदचारी पथ या सोयीच्या तुडवलेल्या पायवाटा आहेत तिथे हलवा!" मैदानाच्या मधून फूटपाथ बांधले गेले, आणि गवतहि सुंदर दिसू लागले.

संदर्भ : एक होता कार्व्हर.

आता जास्त कार्यक्षम काय आहे - "गवत तुडवू नका" असे बोर्ड लावून बेशिस्त विद्यार्थ्यांबद्दल उसासे टाकणे, की विद्यार्थी सोय बघून कायद्याकडे दुर्लक्ष करतात हे जाणून कायदा पाळणे सुखकर करणे? तुम्हाला काय वाटते - मुद्दामून समजून-सवरून स्वतःच्या सोयीसाठी विद्यापीठाचे नुकसान करणार्‍या विद्यार्थ्यांना चांगले धारेवर धरून मुकाट बाजूने चालायला भाग पाडायला हवे होते का? त्या बेशिस्त, सामायिक धनाचे नुकसान करणार्‍या विद्यार्थ्यांचीच सोय बघून कार्व्हर यांनी नैतिक अधःपतनाची बाजू घेतली का?

मृदुला

ही चर्चा आवडली. बरेच प्रबोधन झाले.
बाकी वयाची पहिली २५ वर्षे भारतात राहून एकदाही लाच द्यावी लागली नसल्याने मी आनंदी आहे.

गांधीवादी

>> मी भ्रष्टाचार नाही करणार, हे माझ्या देशासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले?

आम्ही कधीपासूनच तयार आहोत हो,
पण एक दिवसाच्या कामासाठी सहा महिने थांबायला लागत असेल तर काय करू ?
हा प्रश्नाचे उत्तर कोण देईल काय ?
आणि परत उलट लोकांचेच जोडे खावे लागतात ते वेगळं.

(फार मोठे उदाहरन नाहीये,
एकदा मनपा मधून काही कागदपत्र हवी होती, तिथला एकही माणूस काही व्यवस्थित उत्तर देत नव्हता कि काम करत होता. ४ दिवस हेलपाटे मारल्यानंतर दिले १५० रुपये हातावर एका कारकुनाच्या.
चुकलो हे मान्य, पण हे नसता केला तर माझा जो की वेळ वाया (हो वायाच) गेला असता तो कोणी भरून दिला असता ?)

एकीचे बळ वगेरे हे फक्त पुस्तकातच वाचायला बरे पडते, पण जव्हा एखाद्या सामान्य माणसावर जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व तथाकथित विचारवंत हे तोंड दाबून गप्प असतात किव्वा कुठेतरी गायब झालेली असतात. कोणीही कोणाचं मदतीला धावून येत नाही. ज्याला त्याला आपपालेच निस्तरावे लागते, वेळप्रसंगी थोडे पैसे सरकवून.
जात हा भस्मासुर उपतायाचाच असेल तर तो वरूनच उपटला पाहिजे. मग तो खाकून नसता होईल. पण एकही विचारवंत मोठ्या माश्यांना धक्का देखील लावण्याचे बोलत नाही. ह्याचे आश्चर्य वाटते.

प्रवाह बरोबर पोहणे थोडे सोपे असते, सामान्य माणूस प्रवाहाच्या विरुद्धात पोहू शकत नाही. त्यानी तसा प्रयत्न केला तर तो बुडून मारेल.

मी काही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाहीये, पण एखादे काम सोयीस्कर रित्या, ठराविक वेळेतच कसे करून घ्यायचे त्याचा काही पर्याय तरी सांगा ना राव.

मदनबाण

भ्रष्टाचार हा देशद्रोहच आहे,आणि आपल्या देशात भ्रष्टाचार करणार्‍यांची संख्या फारच जास्त आहे,याचाच अर्थ राष्ट्रभावनेचा अभाव असणार्‍या लोकांची संख्या दिवसेन दिवस वाढत चालली आहे.
जनतेच्या पैशाची सरळ सरळ उढळपट्टी करणारे हे देशद्रोही मंत्रीगण कशाचीही तमा बाळगत नाही.
ताजे उदा. कॉमनवेल्थ गेम्स. देशाचे जगभरात नाव बदनाम होईल याची जरा सुद्धा काळजी पैसे खाणार्‍यांना वाटली नाही !!! कुठलाच धाक्,लाज यांच्या मनात नाही.फक्त पैसा आणि पैसाच कसा जमवता येईल याच्याच सदैव चिंतेत असणार्‍यांमधे राष्ट्रभावना असेल काय ?
घोटाळ्यांचा देश्,भ्रष्ट्राचार्‍यांचा देश, इथे तिथे कुठेही थुकणार्‍यांचा देश अशीच प्रतिमा बाहेरच्या (परदेशी) लोकांच्या मनात निर्माण होणार नाही तर काय !!!
जी जनता स्वतःच्या पैशाचा जाब विचारत नाही ती सुद्धा तितकीच दोषी आहे.
समाज व्यवस्था इतकी पोखरली जात आहे की आता भ्रष्ट्राचार केल्या शिवाय तुमचे कुठलेच काम सरळ मार्गाने होउ शकत नाही...पैसे खाणार्‍यांनी सामान्य नागरिकाचे कुठलेही काम सरळ मार्गाने होउ नये अशीच व्यवस्था केली आहे का असा कधी कधी प्रश्न पडतो...कारण पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत असाच अनुभव बर्‍याच ठिकाणी येतो.
ज्या देशात रस्ते बनवण्यापासुन ते कॉमनवेल्थ गेम्स पर्यंत भ्रष्ट्राचार बोकाळला आहे त्या देशात राष्ट्रभावनेचा अभाव आहे हे काय वेगळे सांगायला हवे ?

धनंजय

आधी हे वाक्य वाचा : येथे भ्रष्टाचाराचे समर्थन नाही, फक्त लेखात दिलेल्या इलाजाला अकार्यक्षम म्हटलेले आहे. हे वाक्य वाचूनही तुम्हाला जर म्हणायचे असेल की "धनंजय भ्रष्टाचाराचे समर्थन करतो" तर पायावर डोके ठेवण्यासाठी पायाचे चित्र व्यनि ने पाठवा.

"आता वाढला आहे"चा अर्थ "पूर्वी कमी होता आणि आता त्यापेक्षा वाढला आहे" असा मला कळतो. नाहीतर "मुलाची उंची वाढली आहे" वगैरे सामान्य वाक्ये मला समजणार नाहीत.

कॉमनवेल्थ गेम्स सारखे पूर्वी "आशियाड" झाले. त्यात भ्रष्टाचार नव्हता काय? ८०च्या दशकात "बेफोर्स"चा भ्रष्टाचार मला आठवतो.

लहानपणी मी कृशन चंदर यांची हिंदी कादंबरी "एक गधे की आत्मकथा" वाचली होती. १९५०-१९६० दरम्यान लिहिलेली. त्यातही भ्रष्टाचाराच्या अतिरेकाचे वर्णन आहे. त्याही आधी इंग्रज अंमल होता. तेव्हाही भ्रष्टाचार होता. इंग्रज अधिकारी इंडिया सर्व्हिस मध्ये आला की गडगंज श्रीमंत होऊन परत जात असे. काही फायदा राणीचा, काही फायदा लॉर्डसाहेबाच्या खिशात. भारतीय अधिकारी-कारकूनसुद्धा भ्रष्ट होते.

भारतासारखा परदेशातही भ्रष्टाचार असतो. परदेशातही ज्या ठिकाणी भ्रष्टाचार त्यातल्या त्यात कमी आहे, तिथे राष्ट्रभावनेमुळे कमी झालेला नाही. सुबत्तेमुळे कायद्याची व्यवस्था सुरळित आहे, म्हणून भ्रष्टाचार थोडा कमी आहे.

"भारतात अन्य देशांपेक्षा राष्ट्रभावनेचा अभाव आहे", या विधानाशी असहमत आहे. भारतासारख्या कुठल्या महाकाय देशात राष्ट्रभावना अधिक दिसते? चीनमध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे - अधूनमधून एखाद्या भ्रष्टाचारी अधिकार्‍याला फाशी देतात, म्हणून काही भ्रष्टाचार नाहिसा होत नाही. ब्राझिल-रशिया येथेसुद्धा भरपूर भ्रष्टाचार आहे. यू-एस अमेरिका त्या मानाने श्रीमंत आहे, म्हणून भ्रष्टाचार फक्त उच्च अधिकार्‍यांच्या ठिकाणीच आहे. पण भरपूर आहे. भारताच्या शेजारच्या पाकिस्तानात भ्रष्टाचार खूप आहे. राष्ट्रभावना (भारतविरोध सोडल्यास) फार नाही.

भ्रष्टाचाराचा विरोध केलाच पाहिजे. तुम्ही म्हणता तसा माहितीच्या अधिकाराचा वापर आणि अंमलबजावणी केली पाहिजे. पण "भारत या बाबतीत बाकीच्या देशांपेक्षा हीन आहे" असे म्हणणे केवळ चुकीचे आहे. "पूर्वीपेक्षा भारत आता हीन आहे" असे म्हणणेही केवळ चुकीचे आहे. म्हणणारा पूर्वी वर्तमानपत्रे वाचत नासे, आणि रेशनच्या दुकानातही जात नसे, इतकेच काय सिद्ध होते. त्यातून भ्रष्टाचार काडीनेही कमी होणार नाही.

आता तुम्ही "देशद्रोह" वगैरे म्हणा. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शिव्यांचा काही उपयोग होत असेल, तर तुम्हाला सलाम. (खरेच? "देशद्रोही" म्हणून निर्भर्त्सना केल्यामुळे तुम्हाला लायसनसाठी लाच मागणार्‍याने मागणी बदलली?) आणि भ्रष्टाचार कमी होणार नसेल, तर "देशद्रोही" म्हणा, किंवा "तदमाताय" म्हणा, तोंडाच्या वाफेचा अपव्ययच आहे.

सुधीर काळे

माझ्या मतें आपल्या देशांत राष्ट्राभिमान नसलेले किंवा राष्ट्रभावना नसलेले लोक आहेत आपले राजकीय पुढारी! बाकी सर्वांकडे राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभावना भरपूर प्रमाणात आहे व या दोन्ही शब्दांचा अर्थही भारतीय आम नागरिकांना समजतो. समजत नाहीं तो फक्त आपल्या राजकीय पुढार्‍यांना (अर्थत् कांहीं माननीय अपवाद वगळून).
भारताने आर्थिक क्षेत्रात जी नेत्रदीपक प्रगती केली आहे ती आपल्या राजकीय नेतृत्वामुळे नसून असले टुकार नेतृत्व असूनही (in spite of) केली आहे. या बाबतीत आपले राष्ट्र इटलीसारखे आहे. रोममध्ये कोण राज्य करतो याचे सोयर-सुतक आम इटालियन माणसाला नसते असे एक मोठ्या उद्योगसमूहाचे चेयरमन मला एकदा म्हणाले होते त्याची आठवण झाली.
थोडक्यात काय?
चांगल्या नागरिकांनी निवडणुकीला उभे रहाणे जरूरीचे आहे आणि इथेच पहिली 'गोची' आहे.
आणि असे अविनाश धर्माधिकार्‍यांसारखे लोक उभे राहिले तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही मतदार या नात्याने आपलीच आहे. त्यासाठी सुशिक्षित लोकांनी उठून मतदान केले पाहिजे!