Skip to main content

लाह्यांचा खरवस.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 11/09/2012 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या. १ वाटी काजू. १ वाटी खवलेले खोबरे. ८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे) अर्धा चमचा वेलचीपूड. दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी). तूप. कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.

वाचने 8948
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

म्हंजे ही पाकृ अंडे घालून करता येणार नाही?? :( असो. सोपीच आहे कृती. पण आता इथे लाह्या शोधणे आले. ( खर्रेच! :( )

अफलातून पाककृती आहे ही. एक कुतूहूल म्हणून खालील प्रश्न विचारतो: लाह्या म्हणजे काय? त्या कशा बनतात? हे कुणाकुणाला माहित नाही? हात वरती करा.

In reply to by भरत कुलकर्णी

अगदी वेगळी पाकृ आहे. आवडली. भकु, जोंधळे थोडावेळ पाण्यात भिजवतात, नंतर फडक्यात बांधून ठेवतात असे काहीसे आठवते. नंतर मात्र मोठा कुकर कोरडाच गरम करायचा आणि त्यात थोडे थोडे जोंधळे टाकून ते उडू नयेत म्हणून झाकण हातानेच अर्धवट धरायचे. तडतड करत लाह्या फुटतात. त्या काढून पुन्हा जोंधळे टाकायचे. नंतर चांगल्या लाह्या इतर गोष्टींसाठी वापरायच्या तर गणंग/ न फुटलेल्या/ अर्धवट फुटलेल्या लाह्यांपासून आणखी पदार्थ होतात. एकंदरीतच वाया काही घालवायचे नाही. :)

In reply to by कच्ची कैरी

प्रेषक कच्ची कैरी Tue, 11/09/2012 - 07:16. मस्त ,आत्ताच खाव्याश्या वाटत आहे Smile अभिनंदन............... अभिनंदन........ अभिनंदन

In reply to by स्पंदना

मक्याच्या लाह्यांचा कधी करून बघितला नाही.केल्यावर मलाही सांगा कसा होतो ते.

आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर आणि पिस्ते टाकून बनवतात. तुम्ही दिलेला प्रकार खूप वेगळा आहे. छानच असणार

दोन वाट्या लाह्या की लाह्यांचं पीठ? दोन वाट्या लाह्यांबरोबर एक वाटी काजू नि एक वाटी खोबरं हे प्रमाण पाहता त्यांना लाह्यांचा खरवस म्हणायचा की काजू-खोबर्‍याचा? दोन वाटी लाह्या घेतल्या तर त्यांचं पीठ जेमतेम अर्धी वाटी होईल ना? लाह्या अल्पमतात जातायत ना.

In reply to by रमताराम

दोन वाट्या लाह्याच घ्यायच्या.पीठ नाही.लाह्या अल्पमत्तत जात नाहीत्.खर्वसात लाह्यांची चव येते.